Thursday, July 6, 2017

ह्युमन मिल्क बँक, ज्येष्ठ नागरिक वॉर्डचे लोकार्पण
उत्तम आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
अमरावती, दि. ६ :  नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नवनवे प्रकल्प राबविले जात आहेत. ह्युमन मिल्क बँकेसारखा महत्वपूर्ण उपक्रम आईच्या दूधापासून वंचित राहणा-या बालकांसाठी जीवनदायी ठरेल. उत्तम आरोग्य सेवेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज सांगितले.
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली व  रुग्णांशी संवाद साधला. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक वॉर्ड, जिल्हा स्त्री रुग्णालयात ह्युमन मिल्क बँक व अतिदक्षता विभागाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच खासदार आनंदराव अडसूळ यांच्या स्थानिक विकासनिधीतून कुष्ठरुग्ण सेवा वाहिनीचेही लोकार्पणही करण्यात आले. खासदार श्री. अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, श्री. जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते. 
आरोग्यमंत्र्यांनी यावेळी तिन्ही रुग्णालयांना भेट देऊन प्रत्येक कामाची माहिती घेतली. यावेळी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील डायलिसीस युनिट व लवकरच कार्यान्वित होत असलेल्या किडनी ट्रान्सप्लान्ट युनिटच्या कामाबद्दलही त्यांनी जाणून घेतले व या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. ह्युमन मिल्क बँकेसारखा उपक्रम आईच्या दूधापासून वंचित राहणा-या बालकांसाठी जीवनदायी ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.
ह्युमन मिल्क बँकेचे लोकार्पण
आईच्या दूधापासून वंचित राहणा-या नवजात शिशूंना दूध उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘ह्यूमन मिल्क बैंक’ सुरु करण्यात आली आहे. बाळाच्या जन्मापासून सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध हा त्याच्यासाठीचा सर्वात सुरक्षित आहार मानला जातो. त्यामुळे काही कारणांमुळे बाळाला आईचे दूध न मिळाल्यास त्याचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हे लक्षात घेऊन ही बँक सुरु करण्यात आली आहे. देशात अनेक ठिकाणी ही बँक सुरु आहे. या बँकेसाठी मातांकडून स्वेच्छापूर्वक दूध दान करण्यात येईल. हे दूध ४५ दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते व गरजू बाळाला उपलब्ध करुन देता येते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वारे यांनी दिली.  
00000





Monday, July 3, 2017

लोकशाही दिनात 10 प्रकरणांवर सुनावणी  
     
      अमरावती, दि.5 : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज झाले.  यावेळी 10 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
           महसूल विभागाशी संबंधित 2 प्रकरणांपैकी 1 प्रकरण निकाली काढण्यात आले, तर 1 प्रलंबित ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेशी संबंधित 1 प्रकरण निकाली काढण्यात आले. त्याशिवाय, भूमी अभिलेख कार्यालय, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर व अमरावती, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, मुख्याधिकारी, नगरपरिषद, दर्यापूर यांच्याशी संबंधित प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली.
           नागरिकांनी आज विविध विभागांशी संबंधित 20 निवेदने दाखल केली. या निवेदनांवर संबंधित कार्यालयप्रमुखांनी तातडीने कारवाई करुन निवेदनकर्त्याचे समाधान करण्याबाबत निर्देश यावेळी देण्यात आले.

00000          


Saturday, July 1, 2017

नव्या संशोधनाची दखल घेऊन शेतीविकासाला चालना
-          पालकमंत्री प्रवीण पोटेपाटील

अमरावती, दि. 1 : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीच्या प्रगतीसाठी  मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन राज्य शासनाकडूनही शेतऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. नव्या संशोधनातून शेतीत अनेक चांगले    प्रयोग होत आहेत. या प्रयोगाची दखल घेऊन शेतीच्या विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा  परिषदेच्या सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ताजी ढोमणे, बांधकाम सभापती जयंत देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रयोगशील शेतकरी रवींद्र माणिकराव मेटकर (बडनेरा) व झाबू सोनाजी जामूनकर (रेहेटखेडा, ता. चिखलदरा) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यांचे कौतुक करत पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शेतीतील उत्कृष्ट प्रयोगशील कार्याचा शासनाकडून गौरव तर होतोच, त्याचबरोबर त्यातील संशोधनाचा अंगीकार करत शेतीविषयक विकासप्रक्रियेला गती देण्याचाही प्रयत्न केला जात आहे.  अशा प्रयोगशील शेतक-यांच्या यशोगाथा समाजापुढे येणे आवश्यक आहे.
श्री. अडसूळ म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण कार्ड देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे जेणेकरुन मातीची तपासणी करुन कुठले पीक घेणे उपयुक्त ठरेल याचा अंदाज मिळू शकेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पोस्टर व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा कृषी अधिकारी वरुण देशमुख यांनी आभार मानले.
00000




4 कोटी वृक्षलागवड अभियानाची पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात

लोकसहभागातून 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण होईल
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील



                  - जिल्ह्यात आठवडाभरात लावणार साडेआठ लाख झाडे 
                  - वृक्षलागवड कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 हून अधिक यंत्रणांचा सहभाग
                  -  जिल्ह्यात 22 लाख रोपे उपलब्ध
                  -  जिल्ह्यात सुमारे 30 हजारापेक्षा अधिक लोकांची हरित सेना नोंदणी पूर्ण

        अमरावती, दि. 1 : वन विभागाने गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत 2 कोटींहून अधिक झाडे लावण्याचे कार्य लोकसहभागातून पूर्ण झाले. त्यामुळे यंदा 4 कोटी झाडे लावण्याचा निर्धार शासनाने केला व त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा राज्यात चार कोटींहून अधिक वृक्षारोपण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
       वनविभागातर्फे चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वडाळी राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपणाद्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते.  खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, मुख्य वनसंरक्षक डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी –कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
      श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनिश्चित पर्जन्यमान, प्रदूषण, वन्यजीवांनी जंगल सोडून शहरात शिरणे अशा विपरीत गोष्टींवर वनांच्या निर्मितीतून मात करता येईल. त्यासाठी वनविभागाकडून चांगले प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी या कार्यात अधिकाधिक योगदान दिले पाहिजे.
श्री. अडसूळ म्हणाले की, शासनाच्या गतवर्षीच्या अभियानातील वृक्षलागवडीतील 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली.  अभियानातून मोठे वनक्षेत्र  निर्माण होत आहे, हे सुचिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन घरोघरी गॅस उपलब्ध करुन देण्यासारखे अनेकानेक लोकहिताचे व पर्यावरणपूरक निर्णय घेत आहे. 
       जनतेच्या मनात वृक्षलागवड करण्याची मानसिकता निर्माण करणे व ती जीवनपद्धतीचा भाग बनविणे, हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे, असे श्री. बांगर यांनी सांगितले. उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण वनसंरक्षक रवींद्र वानखडे, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर,    तहसीलदार गजेंद्र मालठाणे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनराईचे विश्वस्त मधुभाऊ घारड, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
उत्कृष्ट कर्मचा-यांचा सत्कार

 जंगलात पाण्यासाठी फिरणारी बिबट्याची मादी व दोन बछड्यांसाठी स्वयंप्रयत्नातून पाणवठा निर्माण करणा-या वन कर्मचारी श्री. कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचारी नरेंद्र कछुवाह यांचाही सत्कार झाला.
  
           जिल्ह्यात दि. 7 जुलैपर्यंत सुमारे साडेआठ लाखांहून अधिक झाडे लावण्यास सुरुवात झाली असून, त्यानुसार खड्डे, रोपवाटप आदी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विभागाकडे 22 लाख रोपे उपलब्ध असून, यंदा 10 लाख रोपे लागवडीसाठी देण्यात येत आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रात 25 हेक्टर जागेत 27500 झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे.
   


शिवटेकडीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण


महापालिकेच्या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते शिवटेकडीवर वृक्षारोपणाद्वारे झाली. यावेळी खासदार श्री. अडसूळ, आयुक्त श्री. पवार आदी उपस्थित होते.

00000

15 Attachments
 
 











Friday, June 30, 2017

चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शनिवारी प्रारंभ
वृक्षदिंडीत मोठा प्रतिसाद; नागरिकांनी केला वृक्षसंवर्धनाचा निर्धार
             अमरावती, दि. 30 :  शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवड अभियानाला उद्यापासून (दि. 1 जुलै) प्रारंभ होत असून, त्यानिमित्त आज वनविभागातर्फे शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला.   
जिल्हाधिकारी कार्यालयापासून या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. प्रारंभी महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतरदापोरी येथील संत तुकडोजी महाराज भजन मंडळीच्या कार्यकर्त्यांनी गायिलेल्या भजनाच्या तालासुरावर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली.          
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचाही सहभाग
इर्विन चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील हेही दिंडीत सहभागी झाले. पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढवला. ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’अशा घोषणा देत ही दिंडी पुढे रेल्वेस्थानक चौकात आली. त्यानंतर आणखी नागरिक दिंडीत सहभागी होत वातावरण अधिक उल्हसित झाले.
 मोर्शी येथील विद्याधर कोरे यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत चित्ररथावर आरुढ होऊन वृक्षप्रेमाचा संदेश दिला. वृक्षदिंडीत ज्ञानमाता विद्यालय, शिवाजी मराठा विद्यालय, आरडीआयके शाळा, मणिभाई गुजराती शाळा, शासकीय तंत्रनिकतेन आदी शाळांचे विद्यार्थी उत्साहात घोषणा देत वृक्षसंगोपनाचा संदेश देत होते. पुढे बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक असा दिंडीचा मार्ग होता. तिथून सगळे वृक्षप्रेमी बचतभवनाजवळ येऊन दिंडीचा समारोप झाला.  वनसंरक्षक हेमंतकुमार मीना,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, वनसंरक्षक रवींद्र वानखडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पडगव्हाणकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, प्रा. राजेश चिधडी आदी यावेळी उपस्थित होते.
00000 



















Wednesday, June 28, 2017

वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे
             वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद   
             
           अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे!
वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.  
          विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते.
मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयापासून मोठ्या उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली. रोपटी व फुलांनी सुशोभित चित्ररथ व त्यापाठोपाठ सायकलस्वार अधिकारी- कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी असे या रॅलीचे स्वरुप होते. पोलीस आयुक्त शहर कार्यालय – मालटेकडी- बसस्थानक- रेल्वेस्थानक- राजकमल चौक- जयस्तंभ चौक- इर्विन चौक- गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गे रॅली बचतभवनात येऊन तिचा समारोप झाला. 
अनेक शाळा, महाविद्यालये, अशासकीय व सामाजिक संघटनांच्या एकत्रित सहभागातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, असे श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.वनसंरक्षक रवींद्र वानखडे, श्री. कळसकर, सहायक वनसंरक्षक श्री. कविटकर, श्री. पडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                       शुक्रवारी वृक्षदिंडी व वृक्षपूजन
       अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे शुक्रवार, दि. 30 जूनला सकाळी नऊला वृक्ष दिंडी व वृक्ष पूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.  वृक्षदिंडीची जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन ती इर्विन चौक- रेल्वेस्थानक चौक बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जाऊन बचतभवनात समारोप होणार आहे. 
                                     000000









शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी  दै. दिव्य मराठी #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट...