राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा
विजया रहाटकर शुक्रवारी अमरावतीत
*नियोजन भवनात दुपारी 12 वाजता जनसुनावणी
अमरावती, दि. 1 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या महिला जन सुनावणी घेणे, महिलाभिमुख उपक्रमांचा आढावा घेणे, संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे आणि महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधणे यासाठी दि. 3 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान श्रीमती रहाटकर दुपारी 12 वाजता जनसुनावणी घेणार आहे.
श्रीमती रहाटकर यांच्या दि. 3 जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्यामध्ये विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कार्यस्थळे अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टीने आयोजित 'पॉश'-लैंगिक छळ प्रतिबंध प्रशिक्षण कार्यशाळेने होईल. तसेच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहे. नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
श्रीमती विजया रहाटकर अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. या बैठकीत महिला कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच्या उपाययोजनांचे मूल्यमापन केले जाईल. याव्यतिरिक्त, त्या दि. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 'महिला जन सुनावणी' घेतील. यात पूर्वनोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या जातील. यामुळे महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यावर वेळेत हस्तक्षेप आणि निवारण करणे शक्य होईल. संबंधित क्षेत्रातील महिलांचे हक्क आणि कल्याणासाठीच्या सहकार्यात्मक प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीने या दौऱ्याची सांगता होईल.
00000000
जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन
अमरावती, दि. 01 (जिमाका) : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली.
0000000
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहिती पुस्तिकेचे विमोचनअमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या व्यापक प्रसिद्धीसाठी अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे आज महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात विमोचन करण्यात आले. मुख्य राज्यसेवा हक्क आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या सोहळ्याला राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग, चित्रा कुलकर्णी, संदीप देशमुख,श्री. शिंदे तसेच आयोगाच्या सचिव श्रीमती वैशाली चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविक करून पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाच्या शेवटी अमरावती राज्य सेवा हक्क कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, सर्व आयुक्त, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आणि सचिव श्रीमती चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार मानले. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत व पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
0000000
मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी मेळाव्यात 264 उमेदवारांची प्राथमिक निवड
अमरावती, दि. 01 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती आणि पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच 'मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा' संपन्न झाला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे, कनिष्ठ मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक निकेतन कदम म्हणाले की, पोलीस विभागाच्या शिस्तीसोबतच 'पोलीस मित्र' म्हणून प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी आहे. तरुणांनी या संधीचे सोने करून समाजात पोलीस विभागाची प्रतिमा सन्मानाने उंच करावी. तसेच उपायुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी, या प्रशिक्षणातून मिळणारे शिस्तीचे धडे आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. अत्यंत महत्त्वाच्या विभागासोबत काम करण्याची ही संधी आनंदाने स्वीकारावी, असे प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डाखरे यांनी तर आभार पंकज कचरे यांनी मानले.
00000000
चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळवली
अमरावती, दि.01 (जिमाका) : चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून आजूबाजूचे जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात चिखलदरा येथे येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा-चिखलदार मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे.
याकारणास्तव 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत नंतरचे दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडा वरून चिखलदरा जाणारी वाहतुक ही परतवाडा वरून धामणगांव गढी मार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल तसेच चिखलदरा वरून परतवाडा परत येणारी वाहतुक ही चिखलदरा वरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावातील स्थानिक नागरिकांना रस्ते वाहतुक वळविण्याच्या आदेशात सुट देण्यात येत आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0000000
शुक्रवारी शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी
'एनपीएस संचय' जनजागृती कार्यक्रम
अमरावती, दि. 1 (जिमाका) : अग्रणी जिल्हा बँक सेल - सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विशेष ‘एनपीएस संचय आउटरीच प्रोग्राम’ हॉटेल गौरी इन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे आणि ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांवर केंद्रित असणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील असंघटित आणि वंचित घटकांपर्यंत, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लहान उद्योजकांपर्यंत पेन्शन योजनेचा लाभ पोहोचवणे हा या 'एनपीएस संचय' योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय वाढीस लागेल.
आउटरीच कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबद्दल व्यापक जनजागृती आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणे आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख घटकांना एकत्र आणून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या घटकांना हक्काची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभाग आणि संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, एफपीओ फेडरेशन, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बँक सखी, तसेच धन फाउंडेशन आणि क्रिसिल फाउंडेशनच्या क्षेत्रीय चमूसह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 150 हून अधिक प्रमुख प्रतिनिधींना पेन्शन योजनेची माहिती आणि महत्व पटवून दिले जाणार आहे. हे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन योजनेचा प्रसार करणार आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
