मेळघाटातील आदिवासींचा
विकास करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे
-
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके
अमरावती, दि.
18 (जिमाका): मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य
उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी
जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास
मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिले. आरोग्य प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे आदिवासी
विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर
क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार केवलराम
काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त
संदीप गोलाईत, आदिवासी महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती जयरेखा, उपसंचालक सुशील
वाकचौरे आधी यावेळी उपस्थित होते.
आदिवासी विकास
मंत्री श्री. उईके म्हणाले, मेळघाटामध्ये बालविवाहामुळे माता आणि बालकांच्या कुपोषणासारख्या
आरोग्य तक्रारी निर्माण होतात. तसेच दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे हे देखील कुपोषणाचे
कारण आहे. यासाठी प्रशासनासोबतच अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर कार्य करीत असतात. यावर
अधिक भर देऊन बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर
याबाबत जनजागृती करावी. मेळघाटामध्ये पुरेसा औषधसाठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला
धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना
सक्षमपणे राबवावी, असे आदिवासी विकास मंत्री. डॉ. उईके म्हणाले.
मेळघाटातील आदिवासींचे
जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजना राबविण्यात येतात. याच धर्तीवर
येथील सामाजिक संस्था देखील कार्य करीत असतात. परंतु त्या स्वतंत्रपणे काम करीत असतात.
यापुढे प्रशासनाच्या पूर्वपरवानगी व समन्वय साधून
सामाजिक संस्थांनी काम करावे तसेच या क्षेत्रात जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या
प्रचार साहित्याचे शासनामार्फत प्रमाणीकरण करण्यात यावे. आदिवासी बहुल क्षेत्राचा विकास
साधण्यासाठी शासनासमवेत सामाजिक संस्थांनी समन्वय साधून काम करावे.
यावेळी श्री. उईके यांनी महिला व बालकल्याण विभाग
व त्यांच्या योजना, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य विभाग या विषायांवर संबंधितांशी
चर्चा केली. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने या भागातील कुपोषण हटवायचे आहे. आदिवासी
विकास विभाग योजनेअंतर्गत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, हे लक्षात घेता आश्रम शाळेतील पाणी प्रश्न, आरोग्य
प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या या तातडीने सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधितांना
दिल्या.
यावेळी शबरी
आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या धारणी शाखा कार्यालयामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे
वाटप करण्यात आले. नियोजन अधिकारी वरूण कळसकर यांनी प्रास्ताविक केले. दिपश्री देशमुख
यांनी संचलन तर शिक्षण विस्तार अधिकारी अनुश्री राऊत यांनी आभार मानले .
00000





No comments:
Post a Comment