Tuesday, April 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28.04.2026

 

जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव

अमरावती, दि. 28 (जिमाका): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन 2024-25 व 2025-26 चे 'जिल्हा युवा पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, अमरावती येथील प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते आणि वरिष्ठ सनदी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा वितरण सोहळा पार पडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी कळविले आहे.

सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासने आपल्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. याच वर्षासाठी युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राउत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. वेदांत मुंदाने यांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे, तर पुजा गुंजरकर यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात योगदान दिले आहे. अचलपूरच्या विवेकानंद विचार मंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे. युवक व युवती पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 10 हजार रुपये रोख, तर संस्था पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये रोख असे आहे.

00000000

'मिशन लक्षवेध' अंतर्गत कुस्ती खेळाडूंची फेर निवड चाचणी; 6 मे रोजी आयोजन

*इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिलपर्यंत सादर करावेत

अमरावती, दि. 28 (जिमाका): ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मिशन लक्षवेध' ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा स्तरावर 'क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' स्थापन करण्यात आले असून, कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यासाठी येत्या 6 मे 2026 रोजी फेर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या चाचणीत जिल्ह्यातील पात्र खेळाडूंना सुवर्णसंधी मिळणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी  यांनी दिली आहे.

ही निवड चाचणी 6 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे पार पडणार आहे.  या खेळाचे आयोजक राहुल निवडंगे ( 7774001579) आहेत. यापूर्वी 9 एप्रिल रोजी चाचणी घेण्यात आली होती, मात्र आता पात्र खेळाडूंसाठी पुन्हा एकदा फेर चाचणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी 21 वर्षांखालील (31 डिसेंबर 2026 रोजी वय ग्राह्य) मुले व मुली पात्र असून, खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसेच, संबंधित खेळाडूने गेल्या दोन वर्षांत राज्यस्तरावरील शालेय किंवा अधिकृत क्रीडा संघटनेच्या स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक प्राप्त केलेले असावे. निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आपला जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिकृत डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र, आधारकार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, पालकांचे संमतीपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

निवड झालेल्या 20 खेळाडूंना शासनाच्या वतीने प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. ही प्रक्रिया अनिवासी स्वरूपाची असली तरी खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, वैद्यकीय उपचार आणि विम्याचा संपूर्ण खर्च मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत केला जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज 30 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या निवड चाचणीचे आयोजन क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर ( 9823704347)  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील जास्तीत -जास्त कुस्तीगीरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

उष्णतेच्या लाटेपासून कामगारांच्या संरक्षणासाठी प्रशासनाचे निर्देश;

कामाच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 28 (जिमाका): सध्या देशासह राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कामगार व मजूर वर्गाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः बांधकाम, औद्योगिक आणि खाण क्षेत्रातील कामगारांना उष्णतेमुळे आरोग्याच्या मोठ्या जोखमीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अमरावतीचे सहायक कामगार आयुक्त अ. सु. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग आणि बांधकाम कंपन्यांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार कामगारांच्या कामाच्या वेळेत आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दुपारच्या कडक उन्हाच्या काळात जड किंवा कठीण कामे टाळून ती दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची मुबलक उपलब्धता करून देणे तसेच कामगारांना सावली व विश्रांतीची सोय उपलब्ध करून देणे आता बंधनकारक असणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक आस्थापना स्तरावर आईस पॅक, प्राथमिक उपचार साहित्य आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक साधने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करणे आणि कारखाने व खाण क्षेत्रात कामाचा वेग मर्यादित ठेवण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. अत्यंत उष्णतेच्या काळात विश्रांतीच्या वेळेत लवचिकता आणणे, आवश्यक असल्यास दोन कामगारांची टीम नेमणे आणि कामाच्या ठिकाणाजवळच विश्रांतीगृहांची सोय करण्यावर भर देण्यात आला आहे.

कामगारांना थंड पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स उपलब्ध करून देण्यासोबतच, उष्णतेचे धोके व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कामगार नाका व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नियमित निरीक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. सर्व नियोक्त्यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देऊन कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन कामगार विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000



जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध मोठी कारवाई;

प्रशासकीय सतर्कतेमुळे एकाच महिन्यात 6 विवाह रोखले

अमरावती, दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला एप्रिल महिन्यात उल्लेखनीय यश मिळाले असून विविध यंत्रणांच्या समन्वयातून एकूण 6 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच महिला व बाल विकास विभाग, पोलीस प्रशासन, बाल संरक्षण यंत्रणा व बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकांनी तात्काळ हस्तक्षेप करून हे विवाह थांबविले. संबंधित पालक व कुटुंबियांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कारवाईमुळे संबंधित बालकांचे शिक्षण, आरोग्य व सुरक्षित भविष्य जपण्यात मदत झाली असून, समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बालविवाह करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित 1098 चाईल्ड हेल्पलाईन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. बालविवाहमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000000

खतांचा काळाबाजार आणि लिंकिंग रोखण्यासाठी कारवाई;

10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर 6 केंद्रांना सक्त ताकीद

अमरावती, दि. 28 (जिमाका): खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात मोठी कारवाई आहेत.  धडक मोहिम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, त्रुटी आढळलेल्या इतर 6 केंद्रांना प्रशासनाने कडक ताकीद दिली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

खरीप हंगामात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून छापील किमतीपेक्षा जास्त दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एप्रिल 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. ज्या केंद्रांच्या ई-पॉस (e-POS) मशीनवरील खतांचा साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली, अशा 17 विक्रेत्यांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीअंती दोषी आढळलेल्या 10 विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये प्रामुख्याने साठ्यात तफावत असणे, अवाजवी दराने विक्री करणे, पक्के बिल न देणे, अनधिकृत बियाण्यांची साठवणूक करणे आणि बंदी असलेल्या एच.टी.बी.टी. (HTBT) कापूस बियाण्यांची विक्री करणे यांसारख्या गंभीर बाबी कारणीभूत ठरल्या आहेत.

कृषी विभागाने शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बियाणे किंवा खते खरेदी करताना केवळ अधिकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावी आणि त्याचे पक्के बिल आवर्जून घ्यावे. जर कोणत्याही केंद्रावर खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती केली जात असेल किंवा अवाजवी दर आकारले जात असतील, तर शेतकऱ्यांनी 8080536602 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

0000000

 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

*कृषी विभागाची कारवाई

अमरावती, दि. 27 (जिमाका) : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कृषी केंद्रांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यात गंभीर त्रुटी आढळल्याने 10 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर 6 केंद्रांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची तपासणी केली. या तपासणीत ई-पॉस मशीनवरील नोंद आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यामध्ये तफावत आढळणे, खतांची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे किंवा पक्के बिल न देणे, परवाना नसताना बियाण्यांची साठवणूक करणे किंवा नोंदवही अद्ययावत नसणे, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक आणि विक्री करणे आदी बाबी तपासून कारवाई करण्यात आली आहे.

कृषी विभागाने एप्रिल 2026 अखेरपर्यंत 100 टक्के विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बियाणे किंवा खते केवळ अधिकृत परवानाधारक केंद्रांकडूनच खरेदी करावीत, खरेदी केल्यानंतर पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्यांच्या पाकिटाचे सील तपासावे, खते खरेदी करताना दुकानदार अनावश्यक उत्पादने (लिंकिंग) घेण्याची सक्ती करत असल्यास तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

शेतकऱ्याची फसवणूक झाली किंवा खतांचा अवाजवी दर आकारला गेल्यास, त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांकडे संपर्क साधावा. तक्रारीसाठी कृषी विभागाने ८०८०५३६६०२ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देखील जाहीर केला आहे.

0000000

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना 3 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

अमरावती, दि. 27 (जिमाका) : राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहिम राबविण्यात येत आहे. या योजनेतून पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जसुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी दिली.

राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन व वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनाच्या देखभालीसाठी व दैनंदिन खर्चासाठी आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज दिले जाते. ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध होणार असून दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवता येते. ज्या पशुपालकांकडे आधीच किसान क्रेडिट कार्ड आहे, त्यांनाही पतमर्यादा वाढवून 3 लाख रुपयांपर्यंत लाभ घेता येणार आहे.

कर्जाचा मूळ व्याजदर 9 टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून 3 टक्के व राज्य शासनाच्या 11 फेब्रुवारी 2025 च्या निर्णयानुसार 4 टक्के अशी एकूण 7 टक्क्यांपर्यंत व्याज सवलत मिळते. बँकांकडूनही 2 टक्के सवलत दिल्याने नियमित परतफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. सन 2026-27 पासून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गतही या कार्डद्वारे खेळते भांडवलाचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 10 लाख पात्र पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे.

दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले व अद्याप योजनेचा लाभ न घेतलेले पशुपालक या मोहिमेसाठी पात्र असून जिल्ह्यात पशुसंवर्धन उपआयुक्त हे योजनेचे संनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सध्या पशुपालन करणाऱ्या व लाभ न घेतलेल्या सर्व पात्र पशुपालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेसाठी प्रकल्प धारकाने केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेच्या अन्य अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा. सर्व पशुधनाची एनडीएलएम पोर्टलवर नोंद आवश्यक आहे. व्याज सवलत ही ठराविक किमान पशुधन संख्या असलेल्या पशूपालकांनाच लागू राहील. यामध्ये 25 हजार मांसल कुक्कुट पक्षी किंवा 50 हजार अंडी उत्पादक पक्षी, 45 हजार क्षमतेचे हॅचरी युनिट, 100 पर्यंत दुधाळ जनावरे, 500 पर्यंत मेंढी किंवा शेळी गट व 200 पर्यंत वराह यांचा समावेश आहे.

घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच योजनेच्या अटी व निकषांनुसार वेळोवेळी होणाऱ्या बदलांचे पालन करणे लाभार्थ्यांसाठी बंधनकारक राहील.

पशूधन संकल्पनेसाठी आर्थिक अडचण येऊ नये व ग्रामीण भागात पशुधन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी पात्र पशुपालकांनी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, दूध संस्था किंवा 1962 या हेल्पलाईनवर संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.

0000000


13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल

अमरावती, दि. 27 (जिमाका): शहरातील सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 13 अवैध तंबाखू विक्रेत्यांकडून दंड वसूल करण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन आणि संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. शहरातील गांधी चौक, अंबादेवी मंदिर परिसर, राजकमल चौक आणि श्याम चौक या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. यावेळी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 मधील कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आणि कलम 6 अ मध्ये 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यास बंदी याचे उल्लंघन करणाऱ्या अवैध विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत 13 विक्रेत्यांकडून 4 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार आहे.

00000

 

 

अमरावतीत 2 मे पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सन २०२६-२७ या वर्षासाठी ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या दि. 2 मे पासून हे शिबीर सुरू होणार असून दि. 15 मेपर्यंत चालणार आहे.

सदर शिबिर हे दि. २ मे पासून सुरू होणार असून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत चालणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. या शिबिरात एकूण १५ हून अधिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच व्हॉलीबॉल, सॉफ्टबॉल, बॅडमिंटन आणि धनुर्विद्या या ४ खेळांचे प्रशिक्षण राज्य शासनाच्या एनआयएस गुणवत्ताधारक प्रशिक्षकांमार्फत विनामूल्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त तलवारबाजी, बास्केटबॉल, स्क्वॅश, नेटबॉल, शुटींगबॉल, मल्लखांब, टेबल टेनिस, थ्रोबॉल, स्केटींग, कुडो आणि बॉक्सिंग या खेळांचेही प्रशिक्षण दिले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल, श्री गणेशदास राठी विद्यालय, गुरुकुल विद्यालय, नांदगाव खंडेश्वर, जय बजरंग व्यायामशाळा, तोगंलाबाद, दर्यापूर आणि इतर तालुका क्रीडा संकुलांमध्ये हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत.

शिबिरादरम्यान खेळाडूंना आहार, दुखापतीवरील इलाज, फिजीओथेरेपी आणि क्रीडा मानसशास्त्र या विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. इच्छुक खेळाडूंनी प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी व्हॉलीबॉल - राहुल निवडंगे ७७७४००१५७९, सॉफ्टबॉल - स्वप्नील चांदेकर ९७६७०००९४९, बॅडमिंटन - रितेश अनंतवार ८६६९०८४१४२, धनुर्विद्या (आर्चरी) - प्रफुल्ल डांगे ९९२३००८४११, वेदांत वानखडे ७४९९०९२३१२ यांच्याशी संपर्क साधता येईल.

खेळाडूंच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संधीचा अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

मातंग समाजासाठी सोमवारी विशेष कार्यशाळा

अमरावती, दि. 27 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील वंचित घटकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. 4 मे रोजी दुपारी 11 वाजता सामाजिक न्याय भवनात होणार आहे.

कार्यशाळेत मातंग समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्या येणार आहे. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना फायदेशीर ठरत असल्याने यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मातंग समाजातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी केले आहे.

00000

दिव्यांगांना तालुकास्तरावरच मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सोयीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा लवकरच तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, धारणी, मोर्शी, दर्यापूर आणि ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, तिवसा येथे कायमस्वरूपी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव 'आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे' यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच संबंधित केंद्रांना 'युडीआयडी' पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड दिले जातील. त्यानंतर तालुकास्तरावरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सन २०२२ ते २०२५ या कालावधीत आयोजित शिबिरांद्वारे एकूण २ हजार ४७३ दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना अमरावती शहरात येण्या-जाण्याचा होणारा त्रास आणि खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र, आजाराचे प्रमाणपत्र किंवा वृद्धांच्या वयाचा दाखला देण्यासाठी शासन स्तरावरून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडे तक्रार करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी कळविले आहे.

00000

डाक विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 27 (जिमाका) : भारतीय डाक विभाग, अमरावती विभागांतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे उपस्थित होते. अमरावती डाक विभागाचे प्रवर अधीक्षक श्री. गेडाम अध्यक्षस्थानी होते.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टपाल विभागाच्या विविध सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी 'अतिविशिष्ट' कामगिरी केली, अशा गुणवंतांचा डॉ. सुधीर जाखरे यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. जाखरे यांनी, प्रत्येक कर्मचारी हा विभागाचा कणा आहे. तांत्रिक युगात ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. प्रवर अधीक्षक श्री. गेडाम यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.

000000

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : मे महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 4 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

Saturday, April 25, 2026

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे 
  - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा गौरव

अमरावती, दि. 25 : गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल. त्यामुळे बँकांनी कर्जवाटप करताना उद्योगाप्रती सकारात्मक रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगामध्ये कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी बँकांची निर्मिती ही छोट्या उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी झाली आहे. हा पतपुरवठा हा सामान्य नागरिकांनी बचतीच्या स्वरूपात गोळा केलेल्या पैशातून केला जातो. मोठ्या उद्योगाप्रती बँकांचे धोरण सकारात्मक असताना छोट्या उद्योगांनाही पतपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातील प्रक्रिया उद्योगांना पतपुरवठा झाल्यास ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल. गेल्या वर्षी जिल्ह्याने प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शासन सहाय्य करणाऱ्या योजनांची एक हजाराहून प्रकरणे बँकांकडे सादर केली आहे. यात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी बँकांनी उद्योगांना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या बँक व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. यात बँक ऑफ बडोदाचे प्रशांत गावंडे, लोहिता के.एस., जयदीप राठोड, बँक ऑफ इंडियाचे रणजीत ठाकरे, घनश्याम ढवळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल शेंडे, प्रशांत चरडे, रुपेश नंदनवार, प्रफुल रसाळपायले, शिवशंकर फड, आलोक कोठेकर, मृणाल क्रांती राणा, कॅनरा बँकेच्या योगिता देशमुख, संदीप तेटे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अजित लिंगाटे, महेंद्र येलमे, नवनीत उमाळे, अमर दाभर्डे, संदीप सूर्यवंशी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुदीप्ता घोष, जयंत मोरे, पंकज समर्थ, कमर सगीर, रिचा निमोणकर, मधुकर तळपदे, अभिनव राऊत, निधी अग्रवाल, युनियन बँक ऑफ इंडियाचे अक्षय सोनोने, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक नवीनकुमार उप्पलवार, मुख्य व्यवस्थापक रविकुमार दालु, ललित त्रिपाठी, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, प्रोसेसिंग हेड प्रवीण जंगम, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एलडीएम नरेश हेडाऊ, प्रादेशिक व्यवस्थापक सुनील पांडे, कॅनरा बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक रामबाबू मीना, बँक ऑफ बडोदाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजेश कुमार, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा समन्वयक अमोल मोरे यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
00000

Tuesday, April 21, 2026

माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.


माध्यमिक शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना.
#Narishaktivandan 
#NariShakti

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपीटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क रहावे...


राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपीटीची शक्यता; नागरिकांनी सतर्क रहावे...
#वादळीपाऊस #गारपीट
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
#IMD

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना नेतृत्वाच्या संधी—निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग!महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती हे सक्षमीकरणाचे ठोस पाऊल ठरत आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांना नेतृत्वाच्या संधी—निर्णय प्रक्रियेत वाढता सहभाग!

महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती हे सक्षमीकरणाचे ठोस पाऊल ठरत आहे. 

#महिला_सक्षमीकरण #Maharashtra #WomenInLeadership

Monday, April 20, 2026

विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी


 

विशेष लेख :

पर्यटन क्षेत्रात महिला राज!

'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी

   पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष पंचसुत्री आणि सवलती जाहीर करण्यात आल्या असून, अमरावती जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १६० महिलांनी हॉटेल, रेस्टॉरंट, होमस्टे आणि वेलनेस सेंटर्स यांसारख्या विविध व्यवसायांसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.

    या धोरणाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे महिला उद्योजकांना मिळणारा आर्थिक आधार. पर्यटन व्यवसायाच्या उभारणीसाठी महिलांनी मान्यताप्राप्त बँकांकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास, त्यावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयामार्फत थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतो. हा लाभ कर्ज परतफेड होईपर्यंत, किंवा ७ वर्षांच्या कालावधीसाठी, किंवा व्याजाची रक्कम ५ लाख रुपये पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) लागू राहते.

     या योजनेअंतर्गत सुमारे ३० प्रकारचे व्यवसाय पात्र ठरवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल), ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, आयुर्वेद व योग केंद्र, वेलनेस सेंटर, हस्तकला दुकाने आणि आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा अस्तित्वातील व्यवसायाची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा आणि त्याची मालकी पूर्णपणे महिलेकडे असणे अनिवार्य आहे. तसेच, महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे. याशिवाय, व्यवसायासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या प्राप्त असाव्यात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे.

इच्छुक महिला उद्योजकांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtratourism.gov.in) ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ५० रुपये प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसायाच्या जागेचा पुरावा (७/१२ उतारा किंवा भाडे करार), आणि ५०० शब्दांत प्रकल्पाची संक्षिप्त माहिती अशी कागदपत्रे अपलोड करावी. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विभागाकडून 'सशर्त हेतू पत्र' दिले जाईल, ज्याच्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घेता येईल.

या क्रांतीकारी धोरणामुळे राज्यातील महिलांना केवळ रोजगाराच्या संधीच मिळत नाही, तर पर्यटन क्षेत्राच्या विकासात त्यांचा सक्रिय वाटा राहत आहे. अधिक माहितीसाठी महिला उद्योजकांनी अमरावती येथील पर्यटन उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा व पर्यटन धोरणातून उद्योजिका बनण्याच्या स्वप्नांना गवसणी घालावी !

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

0000

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आता दहा वाजेपर्यंत भरणार आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी आता केवळ सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरतील. हा आदेश 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत लागू राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी १० नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांसाठी बंधनकारक असेल.

वाढत्या उष्म्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 28.04.2026

  जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी होणार मान्यवरांच्या हस्ते गौरव अमरावती, दि. 28 (जिमाका): सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण...