Thursday, February 19, 2026

DIO NEWS AMRAVATI 19-02-2026

 


                    संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती, दि. 19 (जिमाका)  : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश (नागपूर खंडपीठ) न्या. एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025-26 या राज्यव्यापी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथील डॉ. कैलास वसावे, डॉ. दिविता कोठेकर, डॉ. आरती तायडे, डॉ. व्ही. पी. तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई येथील डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. अमोल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

न्या. श्रीमती एम. एस. जावळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक अमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

या विशेष सत्रात न्या. आर. सी. चव्हाण, न्या. पृथ्वीराज चव्हाण, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त समाज कल्याण इ. झेड. खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ. थुल यांनी केले. कार्यक्रमास डॉ. जगदीश खोब्रागडे, डॉ. साहिली सुरजुसे व डॉ. आरती तायडे यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे राज्यातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

     अमरावती, दि. 19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,  अल्पेश हाते आदी उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000






शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे  व्हीएलएसआय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न

अमरावती, दि. 19 (जिमाका): तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची व्याप्ती वाढत असताना, या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभाग आणि पुणे येथील 'एजूस्फियर सिस्टिम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ‘इलेक्ट्रॉनिक डिसाईन ऑटोमेशन टूल्सचा वापर करून सेमीकंडक्टर संकल्पना ते फ्रंट-एंड आणि बॅक-एंड इंडस्ट्री रेडी व्हिएलयसआय (VLSI) चिप डिझाइन ही तीन दिवसीय कार्यशाळा येथे नुकतीच संपन्न झाली.

               प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना चिप डिझाइनमधील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील गरजांशी अवगत करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकार देशात सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील अभियंत्यांना या क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, ऑपरेटिंग तत्त्वे आणि हार्डवेअर प्रोग्रामिंगचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी हे हँड्स-ऑन प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.

             या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना मायक्रोविंड , डिव्हाईस स्केमॅटिक, स्पाइस आणि व्हिवाल्डो यांसारख्या अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून चिप डिझाइन आणि प्रोग्रामिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच एफपीजिये (FPGA) आणि ऍसिक (ASIC) यांसारख्या जटिल प्रणाली कशा कार्य करतात, याचे प्रात्यक्षिक ज्ञानही त्यांना देण्यात आले.

               विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे  नियोजन समन्वयक प्रा. विवेक राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि विभागाच्या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. महल्ले यांनी कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्येच मिळाली नाहीत, तर उद्योगांमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे.

000000


Wednesday, February 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18-02-2026

 अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती  शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी आज दि. 18 फेब्रुवारी ते 4 मार्च 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दिपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी लागू राहील. इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहील.            

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

अमरावती येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

113 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड

अमरावती, दि. 18 (जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्थानिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती कार्यालयाच्या आवारात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लागला.

 

त्यानुसार एकूण 91 रिक्त पदांसाठी ऑनलाईन/ऑफलाईन 196 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 178 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या व मुलाखती दिलेल्या उमेदवारापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये इंदिराबाई मेघे महाविद्यालयाचे प्राचार्य अजय कोल्हे, डाटानोवा टेक्नॉलॉजी प्रा.ली. चे निशांत गिरी, भारतीय महाविद्यालयाचे आवारे, जिओ स्टोअर चे महेश कुंभार, हितेश गावंडे, सचिन निचले, शुभम ठवकर या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राधानिक निवड केली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, अनिषेक ठाकरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश सोहळे यांनी तर आभार प्रदर्शन पंकज कचरे यांनी केले.

000000

कापुसतळणीत शुक्रवारी 'गाव भेट उपक्रम'

*'शेतकरी-महिला संवाद' कार्यक्रमाचे आयोजन

अमरावती, दि. 18 (जिमाका): महसूल विभागातर्फे शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता 'गाव भेट उपक्रम 2026' अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, कापुसतळणी, ता. अमरावती येथे शेतकरी व महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.

यावेही आमदार राजेश वानखडे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अरोरा हे 'महिला संबंधित कर्करोग' यावर मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरादरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्यात प्रामुख्याने गावात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी शिबीर, नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे जागीच निवारण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन, जनावरांच्या आरोग्यासाठी तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, शेतकरी आणि महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजस्व मंडळ डवरगाव आणि तहसील कार्यालय, अमरावती यांनी केले आहे.

000000






‘जनसंवादमध्ये 1200 नागरिकांनी मांडल्या समस्या

*‘जनसंवादला जिल्ह्यात मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

* जागेवरच 137 निकाली, गावातच ऐकल्या समस्या

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या समस्या निवारणासाठी आज एकाच दिवशी तालुकास्तरावर 'जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील 14 तालुक्यात 1197 तक्रारी प्रत्यक्ष येऊन समस्या मांडल्यात. यातील 137 तक्रारींवर जागेवरच समाधान करण्यात आले.

जिल्ह्यातील आज पार पडलेल्या तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अमरावती तालुक्यात 52, तिवसा 35, भातकुली 56, दर्यापूर 85, अंजनगाव सुर्जी 123, अचलपूर 76, चांदुर बाजार 48, धारणी 43, चिखलदरा 80, मोर्शी 76, वरूड 110, चांदुर रेल्वे 136, धामणगाव रेल्वे 134, नांदगाव खंडेश्वर 43 अशा एकुण 997 तक्रारी नागरीकांनी दाखल केल्या.

अचलपूर येथे आमदार प्रविण तायडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, मोर्शी येथे उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, नांदगाव खंडेश्वर येथे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार अश्विनी जाधव, अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार विजय लोखंडे आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

धारणी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यात ग्रामीण ते शहरी भागातील नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. विशेषतः वीज वितरण, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, महसूल, शिक्षण, घरकुल योजना, पुनर्वसन, तसेच गॅस वितरणाशी निगडीत तक्रारींचा समावेश होता.

धारणी येथील कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणी नगरपंचायत अध्यक्ष सुनील चौथमल, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी विजय गायकवाड आदी उपस्थित होते. नागरिकांनी शासन दरबारी आपल्या तक्रारी अधिकृतपणे नोंदविल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी प्राप्त तक्रारींचा आढावा घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. या उपक्रमात नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जनसंवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.

जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी, विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला गेला. तसेच तहसील, जिल्हा परिषद, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यकांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमून त्यांना तालुकानिहाय जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

00000000










छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व आणि विचार आजही सुसंगत

*शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान

*शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

           अमरावती, दि. 18 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या विशेष व्याख्यानाचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी वक्ते प्रा. प्रेमकुमार बोके तसेच डॉ. वैभव मस्के यांनी शिवरायांची विचारधारा, व्यवस्थापन कौशल्य, कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य तसे त्यांचे आजही सुसंगत असलेले विचार यांची यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

            अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक श्रीकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

            प्रेमकुमार बोके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंविषयी माहिती दिली. रयतेची काळजी घेणारा, दुष्काळाच्या काळात राज्याची तिजोरी रयतेसाठी खुली करणारा, स्त्रियांचा आदर करणारा, दूरदृष्टी व सूक्ष्म नियोजनात तरबेज, शेत जमिनीची मोजणी करणारा पहिला राजा ते आधुनिक विचारधारा अंगी कारणारा राजा अशा विविध पैलूंवर त्यांनी दाखल्यांसह माहिती दिली.

 

             वैभव मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची विविध दाखल्यांसह माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन, गुणग्राहकता, उत्तम व्यवस्थापन आणि सर्वधर्मसमभाव वृत्ती, त्यांची प्रसंगावधानता ही विविध प्रसंगातून त्यांनी यावेळी व्यक्त केली.

     शहरात शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे उद्या, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित होईल. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे. तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली जाईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविकेतून केले.

कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार नायब तहसीलदार श्री रासेकर यांनी मानले.

0000000

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित;

कर्जमाफीच्या लाभासाठी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): राज्य शासनाकडून शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 294 शेतकरी सभासदांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याने त्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.

शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफी पोर्टलवर अमरावती जिल्ह्यातील एकूण 73 हजार 413 खाती नोंदवण्यात आली आहेत. यापैकी प्राथमिक कृषी पत पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे 1 हजार 450 थकीत कर्जदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरील 1 हजार 844 कर्जदार अशा एकूण 3 हजार 294 सभासदांची आधार कार्ड माहिती अद्याप अप्राप्त आहे. विहित नमुना प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये ही माहिती भरण्याचे काम सध्या सेवा सहकारी संस्था आणि बँक स्तरावर सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक प्रलंबित आहेत, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना प्रस्तावित योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व शेतकरी सभासदांनी आपल्या संस्थेचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी किंवा तालुका उप/सहायक निबंधक कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. संपर्काच्या वेळी आपले आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.

00000


Tuesday, February 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17-02-2026












 

शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

-खासदार बळवंत वानखडे

अमरावती, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनाच्या वतीने सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात प्रामुख्याने मेळघाटातील आदिवासी भागातील जनतेचे जीव सुकर व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ विनाव्यत्यय देण्यात याव्यात, असे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार श्री. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार गजानन लवटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवाणी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परीविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांच्यासह नगरपालिकेचे अध्यक्ष उपस्थित होते.

खासदार श्री. वानखडे म्हणाले, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचारी संपावरून परत आले आहे. त्यामुळे येत्या काळात कामावरील मजूर परत येतील, याची काळजी घ्यावी. मेळघाटात होळी हा सण महत्त्वाचा असल्याने मजूरी वेळेवर करण्यात यावेत. धारणी परिसरातील मका खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडावी, यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच मेळघाटातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, इंटरनेट यासारख्या सुविधा देताना वन विभागाच्या परवागींची अडसर येत आहे. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन परवानगी आवश्यक असणाऱ्या विभागांशी समन्वय साधावा. तसेच या परवानगी तातडीने मिळावी, यासाठी पुढाकार घ्यावा.

केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. ही कामे चांगल्या दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करावेत. इंटरनेटसाठी भारतनेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. अविरत सेवा मिळावी, यासाठी केबल सुस्थितीत राखण्यात याव्यात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. हल्ला झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवावी. कौशल्य विकासाच्या योजनेत विश्वकर्मा योजनेत युवकांनी नोंदणी केली आहे. त्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा उत्कृष्ट दर्जाच्या देण्यात याव्यात. पल्लवी गुडधे हिच्या मृत्यूसारख्या घटना घडू नये. त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा. त्यासोबतच नगरपालिकांना शववाहिका देण्यात येणार असल्याने याबाबतची मागणी आरोग्य विभागाकडे नोंदवावी, असे सांगण्यात आले.

यासोबतच पाणंद रस्ते, खनीज क्षेत्र कल्याण योजना, कौशल्य विकास योजना, उज्ज्वला योजना, जलसंधारण, अमृत सरोवर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मध्यान्ह भोजन, अटल भूजल, जलजीवन मिशन, रिचार्ज शाफ्ट, घरकुल योजना, जलयुक्त शिवार योजना आदींचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील नगरपालिकांच्या अध्यक्षांनी त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली.

00000

अमरावतीत 20 फेब्रुवारीपासून 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवा'चे आयोजन;

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा उपक्रम

अमरावती, दि. 17 (जिमाका): खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय (भारत सरकार) यांच्यामार्फत  दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026 या कालावधीत अमरावती येथे 'राज्यस्तरीय खादी प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन गाडगे नगर, वलगाव रोड येथील संत गाडगे बाबा समाधी स्थळ यात्री मैदान येथे संपन्न होईल.

खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली वैधानिक संस्था असून, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे आणि लोकांना स्वावलंबी बनवणे हे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी दरवर्षी अशा प्रदर्शनांचे आयोजन केले जाते.

विभागीय कार्यालय, नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात देशभरातील विविध खादी संस्था, स्फुर्ती क्लस्टर आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत  स्थापित लघु उद्योगांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. यामुळे कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खादी वस्त्रे व ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करावीत, जेणेकरून स्वदेशी उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

                                                                0000000 






             

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचा ऐतिहासिक विक्रम

मेळघाटात एकाच दिवशी 112 गावात 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे वाटप

अमरावती, दि. 17 (जिमाका): मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट त्यांच्या दारी मिळावा, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज धारणी तालुक्याने नवा इतिहास रचला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज धारणी तालुक्यातील 112 गावांमध्ये एकाच दिवशी विक्रमी 3 हजार 650 जात प्रमाणपत्रांचे यशस्वीरित्या वाटप करण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेने या मोहिमेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी केली होती. तहसील कार्यालय धारणीच्या चमुने तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात जात प्रमाणपत्रांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध करून दिले होते. नागरिकांकडून हे अर्ज परिपूर्णरित्या भरून घेतल्यानंतर त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात पडताळणी करण्यात आली.  अर्जदारांकडून कोणतेही शुल्क न आकारता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. यासाठी लागणारा संपूर्ण निधी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, धारणी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आला, ज्यामुळे सामान्य आदिवासी बांधवांवर कोणताही आर्थिक भार पडला नाही.

आज सकाळपासूनच महसूल विभागाचे कर्मचारी 112 गावांमध्ये पोहोचले आणि त्यांनी थेट लोकांच्या घरापर्यंत जाऊन प्रमाणपत्रांचे वाटप केले. यामध्ये मोगरदा (286), बेरदाबलडा (251), राणामलूर (239), काकरमल (179), ढोमणाडाणा (108), ढाकरमल (107), नांदुरी (102), भूलोरी (97), टोली (91), तातरा (90), घोटा (89), टिटबा (83) आणि कुटगा (80) यांसह दुर्गम भागातील बोथरा, हरिसाल, सादराबाडी, दुनी, चिपोली आणि लवादा अशा एकूण 112 गावांचा समावेश आहे.

यामध्ये बोथरा (74), पोटीलावा (72), बुलूमगव्हाण (69), दुनी (59), सादराबाडी (57), हरीसाल (55), नारदू (51), झिलांगपाटी (51), चिपोली (50), मानसुधावडी (47), झिल्पी (44), राणीगाव (40), लवादा (38), हिराबबई (38), गडगामालूर (37), घोटा (33), राणी तंबोली (31), मांडू (31), कुसुमकोट खुर्द (30), रबाग (30), केकदाबोड (29), राणापिसा (29), बोबदो (29), धोदरा (28), पाटिया (27), ऊकूपाटी (27), बीबामल (23), सुसरदा (22) आणि खोपमार (20) या गावांचा समावेश आहे.

तसेच बिजू धावडी (20), मांडवा (20), चौराकुंड (20), कारा (19), रेहटा (17), कावडाझिरी (18), धारणमहू (17), राजपुर (17), सावलखेडा (16), नागझिरा (16), चेथर (15), कोठा (15), चटवाबोड (15), सावलीखेडा (15), जांबु (14), चीचघाट (14), गोंडवाडी (14), कासमार (13), डापका (13), गंभेरी (13), चाकरदा (12), चोपन (12), शिरपूर (12), धुळघाट (11), सावरया (11), धारणी (11), धुळघाट (11), भोडीलावा (11), जाम पाणी (10), तांगडा (10), आकी (9), मोखा (9), नागझिरा (8), झापल (8), कढाव (8), काटकुभ (8), टेमली (7), लाकटू (7), नागोडाना (7), बेरदाभुरू (7), खारी (7), गोलाई (6), बोरी (6), भोकरबर्डी (6), टिंगऱ्या (6), बास पाणी (4), गोलांडोह (4), दादरा (4), जामपाणी (4), गोबरकहू (4), पोहरा (3), कारदा (3), गंभेरी (3), खारराटेमरू (3), निरगुडी (3), खापरखेडा (3), पानखाल्ल्या (3), रत्नापूर (2), कसाई खेडा (2), खिडकी (2), बीरोटी (2), चीचघाट (2), दाबिदा (2), बोड (2) आणि बारू (2) या गावांतही प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

मागील वर्षी देखील धारणी तालुक्यात अशाच प्रकारचे विक्रमी वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाच्या सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या आणि पारदर्शकता जपण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत प्रभावी ठरले आहे. एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा आणि युवकांच्या नोकरीसाठी लागणाऱ्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

धारणी येथील महसूल उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील चमुने राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी नियोजनाबद्दल जिल्हा प्रशासनासह धारणी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

000000

शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान आणि भव्य बाईक रॅलीचे आयोजन

अमरावती, दि. 17 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी शहरात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या सोहळ्याचे  आयोजन केले असून, शिवरायांची विचारधारा आणि व्यवस्थापन कौशल्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणाऱ्या व्याख्यानाने होईल. यावेळी 'शिवश्री' प्रा. प्रेमकुमार बोके आणि प्रा. डॉ. वैभव मस्के हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य आणि आजही सुसंगत असलेली त्यांची विचारधारा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित होईल. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले जाणार आहे. तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली जाईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

0000000

जिल्ह्यात उत्सवांच्या काळात ध्वनीक्षेपकांना रात्री 12 पर्यंत मुभा;

जिल्हाधिकाऱ्यांचे 15 दिवसांच्या शिथिलतेचे आदेश

अमरावती, दि. 17 (जिमाका): आगामी विविध सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी वर्षभरातील एकूण 15 दिवसांची विशेष शिथिलता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहेत. केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 मधील तरतुदींचा आधार घेत ही परवानगी देण्यात आली आहे.

या आदेशानुसार, निश्चित केलेल्या उत्सवांच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरता येणार आहे. एरव्ही रात्री 10 वाजेपर्यंत असलेली ही मर्यादा आता काही विशेष दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. ज्या उत्सवांसाठी ही सवलत लागू असेल त्यात प्रामुख्याने 19 फेब्रुवारी रोजीची शिवजयंती, 26 मार्चला श्रीराम नवमी, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनाचा समावेश आहे.

तसेच वर्षाच्या उत्तरार्धात 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जयंती, 14 सप्टेंबरला गणपती उत्सव, 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 15 ऑक्टोबरला नवरात्र पंचमीसाठी ही सूट असेल. नवरात्रीचे मुख्य दोन दिवस म्हणजे 19 व 20 ऑक्टोबर, तसेच दिवाळीमध्ये 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक सुरू ठेवता येतील. वर्षाच्या शेवटी 25 डिसेंबर (नाताळ) आणि 31 डिसेंबर रोजीही ही सवलत लागू राहील.

मात्र, ही शिथिलता देताना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी काही कडक अटीही घातल्या आहेत. झोननिहाय ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येणार नाही. विशेषतः रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांसारख्या 'शांतता क्षेत्र' घोषित परिसरात ही सवलत लागू असणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित आयोजक आणि यंत्रणेवर राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी आणि उत्सव मंडळांनी प्रशासकीय नियमांचे पालन करून उत्सव शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

DIO NEWS AMRAVATI 19-02-2026

                           संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अमरावती, दि. 19 (जिमाका)  : महाराष्ट्र राज्य अनुस...