वसुधाताईंचे
कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी
- पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान
अमरावती, दि. 28 (जिमाका):माजी राज्यमंत्री
वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण
न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी
केलेल्या कार्य कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या
तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ
योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित
सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत
होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत
पाटील, सुलभा खोडके, संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख,
विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सक्षमीकरण हे वसुधाताईंच्या
कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले असून हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने
घेतलेली दखल आहे. ताईंच्या प्रेरणेमुळे आज विदर्भातील महिलाआत्मनिर्भर होऊन काम करीत
आहेत. वसुधाताईंचे कर्तव्यदक्ष , दिशा देणारे विचार, उत्तम वैचारिक भूमिका इतरांसाठी
आदर्श व प्रेरणादायी आहे.त्यांची विदर्भाच्या प्रश्नाबाबतची जाण सखोल आहे. ते समजून
घेण्यासाठी लवकरच मी त्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून घेणार आहे व पालकमंत्री
म्हणून त्या विषयावर कार्य करणार आहे.
विदर्भाचे विकासासाठी वसुधाताई आयुष्यभर झटल्यात.
वसुधाताईंनी विदर्भाच्या विकासासाठी रचलेल्या पायाचा कळस पूर्ण करण्याचे कार्य मी पूर्ण
करेल. त्यांचे अमरावतीच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प
करतो. विदर्भाच्या विकासासाठी त्यांची तळमळ वाया जाणार नाही. तो विकास पूर्ण करण्यासाठी
आम्ही कटिबद्ध आहोत, असे पालकमंत्री श्री.
बावनकुळे यावेळी म्हणाले .
पुरस्काराला उत्तर देताना वसुधाताई देशमुख म्हणाल्या, हा 'जीवनगौरव' पुरस्कार म्हणजे केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, गेल्या अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाचे ऋण फेडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना मिळणारे समाधान सर्वात मोठे होते.
हा प्रवास कठीण होता, पण लोकांच्या प्रेमामुळे तो
सुखकर झाला. माझ्या कामावर विश्वास ठेवून मला सदैव सहकार्य करणारे, माझ्यावर विश्वास
ठेवणाऱ्या माझ्या जनतेचा हा पुरस्कार आहे . शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे हे व्रत
आपण अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या सोहळ्यात
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहयांद्री गावातील 'रुक्मिणी' या मुलींच्या
नवीन वसतीगृह इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा.
नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवनप्रवासावर आधारित 'वसुधा' या कादंबरीचेही प्रकाशन
मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे
संचालन शिप्रा मानकर यांनी केले तर प्रा. विनय वसुले यांनी आभार मानले.
******
पोलीस
पाटील हा प्रशासनाचा कणा
- पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि.
२८ (जिमाका): ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटीलांची
भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा
पोलीस पाटील खऱ्या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी केले.
शिक्षण महर्षी
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी येथे आयोजित 'पोलीस पाटील परिषदे'त पालकमंत्री श्री.
बावनकुळे बोलत होते. खासदार डॉ.अनिल बोंडे,
आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे पाटील आदी मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
ग्रामीण स्तरावर 'पोलीस पाटील' हे प्रशासनाचे डोळे
आणि कान म्हणून काम करतात. गुन्हेगारी नियंत्रण आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यात
त्यांचा सहभाग मोलाचा असतो. त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस पाटीलांच्या
विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात
येईल. पोलीस पाटीलांच्या समस्या शासनस्तरावर मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.
प्रशासनात
पोलीस पाटीलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण स्तरावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची
माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात. गावपातळीवर
वाद मिटवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे आणि शासकीय योजनांची माहिती
जनतेपर्यंत पोहोचवणे, अशा बहुआयामी जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत.
ग्रामीण भागातील
सुरक्षिततेसाठी पोलीस पाटीलांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री
श्री. बावनकुळे काढले. उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या
हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी
तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी त्यांना सपत्नीक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.
पोलीस पाटील परिषदेला जिल्ह्यातील पोलीस पाटील, प्रशासकीय
अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
***
अमरावतीत
ऑक्टोबरमध्ये भव्य पुस्तक महोत्सव घेणार
-पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
*जिल्हा ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण
*गाव तिथे ग्रंथालय उभारणार
*स्पर्धा परीक्षेसाठी ई लायब्ररी उपक्रम
अमरावती, दि.
28 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा भव्य पुस्तक महोत्सव अमरावतीत येत्या ऑक्टोबरमध्ये
घेण्यात येईल. या ठिकाणी पश्चिम विदर्भातील सर्व नागरिक येतील, अशी व्यवस्था करण्यात
येईल. तसेच येथे आलेल्या नागरिकांनी एक तरी पुस्तक विकत घ्यावे, यासाठी दर्जेदार पुस्तकांचे
प्रदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे
लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके,
महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री बावनकुळे म्हणाले, मनुष्याच्या जीवनात पुस्तकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे
समाज प्रगल्भ होऊन अनेक क्रांती घडल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाचन चळवळ निर्माण
करण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यासाठी
गावात असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून येथे वाचनालय सुरू करण्यात येतील.
यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल.
नव्याने निर्माण
झालेली जिल्हा ग्रंथालयाची इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम
राबवतील. त्यासोबतच ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून या ठिकाणी डिजिटल लायब्ररी निर्माण
करण्यात येतील. प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना
या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन शिबिर घेण्यात येतील. यासोबतच मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न
करण्यात येतील, असे सांगितले.
सुरुवातीला
श्री बावनकुळे यांनी जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच नूतन इमारतीच्या कोनशिलेचे
अनावरण केले. श्री. मडावी यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांनी आभार मानले.
00000
शेतकऱ्यांच्या
कायम पाठीशी राहू
-
पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती,
28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून
शेतकऱ्यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या
कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
सत्काराचे आयोजन केले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश
वानखेडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह बँकेचे संचालक
उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून
शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी विविध 31 योजना
दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत
चांगल्या पद्धतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या
मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
अमरावती जिल्हा
बँकेने 1400 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर
होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना
शेतकऱ्यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य
आणि मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे.
प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षे
कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच 2011 पूर्वी सरकारी जागेवर निवासी
अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात
नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी बँकेचे
अध्यक्ष श्री कडू आणि उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश बकाळ यांनी
आभार मानले.
0000
विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या
हस्ते लोकार्पण
अमरावती, दि.
28 : मार्डी रोडवरील विपश्यना केंद्र आणि सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सांस्कृतिक
भवनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकार्पण कार्यक्रमाला
खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते. सुरुवातीला
श्री. बावनकुळे यांनी बुद्ध वंदेनेत सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक
भवन आणि विपश्यना केंद्राची पाहणी केली.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्न
करीत आहे. शासनाने बांधलेले हे सांस्कृतिक भवन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहावे.
या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांसाठी मदत करण्यासाठी केंद्र उभारावे. तसेच आधुनिक
सुविधांनी युक्त इ-लायब्ररी, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे
केंद्र उभे करावे. यासोबतच कौशल्य विकासासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. संस्थेने उभारलेल्या
कार्यासाठी सर्वोत्तरी मदत करण्यात येईल.
चांगले जीवनमान
घडविण्यासाठी विपश्यना हा सर्वात चांगला मार्ग आहे. संस्कारमय जीवन आणि शांतीसाठी विपश्यनेशिवाय
पर्याय नाही. जनतेचे कल्याण करण्याची शक्ती विपश्यनेमध्ये आहे. विपश्यना केल्याने मोठी
शक्ती मिळते. यातून समाज विकासाचे कार्य घडण्यास मदत होत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी
सांगितले.
00000
अमरावतीत इंधन तुटवड्याची अफवा;
जिल्हा प्रशासनाचे
नागरिकांना शांततेचे आवाहन
अमरावती, दि. 28
(जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि
गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे
स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील अग्रसेन
पेट्रोल पंप, (आयटीआय कॉलेज समोरील पंप ) तसेच राजेश आणि विदर्भ गॅस एजन्सी या
ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व ठिकाणी
साठा पुरेसा असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सीवर
पिण्याचे पाणी, ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, सावलीसाठी शेड उभारण्याचे
निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तासाला पेट्रोल पंपावरील उपलब्ध
साठ्याची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन पुरवठा
साखळी सुरळीत असून तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत.
त्यामुळे 'पॅनिक बाइंग' (गरजेपेक्षा जास्त खरेदी) टाळावी, कारण यामुळेच विनाकारण
गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अफवा
पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने
दिला आहे.
0000000

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)






.jpeg)




.jpeg)






