Monday, May 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04-05-2026

 मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
       अमरावती, दि. 4 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरावलोकन जाहिर केला आहे. त्यानुसार याआधी मतदारांची मॅपिंग करण्यात येत आहे. यात मतदारांची मॅपिंग झाली नसल्यास त्यांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवनात मतदारांच्या मॅपिंगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकेचे उपायुक्त महेश देशमुख, योगेश पिटे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी निवडणूक आयोगाने नेमून दिलेले कार्य वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाची जबाबदारी बीएलओवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या मतदारयादीतील मतदारांचा 2002च्या मतदारयादीत शोधावे लागणार आहे. यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बीएलओंनी प्रत्येक मतदारांचा शोध घेऊन मॅपिंग करणे आवश्यक आहे. मॅपिंगची टक्केवारी कमी झाल्यास उर्वरीत मतदारांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. हे काम अत्यंत जिकरीचे होणार असल्याने बीएलओंनी मॅपिंगची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे.
     जिल्ह्यात प्रामुख्याने बडनेरा आणि अमरावती या शहरी भागात मॅपिंगची गती वाढविणे आवश्यक आहे. मतदारांची मॅपिंग झालेली नसल्यास मतदारयादीतील नाव वगळण्याआधी मतदारांकडून फॉर्म नं. सात भरून घेण्याची कारवाई करावी. कमी मॅपिंग झालेल्या क्षेत्रातील मॅपिंगची टक्केवारी वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यामुळे येत्या 15 मेपर्यंत 95 टक्के मॅपिंग होण्यासाठी बीएलओंनी प्रयत्न करावेत. मॅपिंगच्या कामी खासगी संस्थांमधील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनाही पत्र देऊन बीएलओंना शाळेतील कामामधून सूट देण्याची सूचना करण्यात येणार आहे. मॅपिंगच्या कामात अडथळा आणल्यास संबंधित बीएलओंवर फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे बीएलओंनी मॅपिंगचे काम काटेकोरपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले.
   सुरवातीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मतदारांच्या मॅपिंगबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मॅपिंगचे कार्य उत्कृष्टरित्या केलेल्या बीएलओंनी मनोगत व्यक्त केले.
000000

Thursday, April 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.05.2026

 






















जिल्ह्याच्या कृषी-औद्योगिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर

                  - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

*67 वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

 

अमरावती , दि. 1 (जिमाका) : शेती व उद्योग क्षेत्रात आधुनिकतेची कास धरीत जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांनी आज येथे केले.

 

            महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने  पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील  बोलत होते. पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपायुक्त अजय लहाने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

            श्री. पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने पीक कर्जासाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असून ही प्रक्रिया लवकरच प्रत्यक्ष सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित १ लाख १५ हजार ८६२ शेतकऱ्यांना ७४५ कोटी रुपयांची मदत थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता २ लाख ७१ हजार ७६२ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला आहे.  कृषी यांत्रिकीकरणासाठी १४.८५ कोटी रुपये खर्चून २ हजार ९८ शेतकऱ्यांना यंत्र व औजारे खरेदीसाठी मदत केली आहे.

 

            मोर्शी आणि वरुड येथील सिट्रस इस्टेटमध्ये आता एआय (AI) आधारित तंत्रज्ञान राबविले जाईल. 

सिंचनासाठी 'प्रती थेंब अधिक पीक' योजनेत ३ हजार ५५९ आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत २ हजार १५३ लाभार्थींची निवड झाली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला असून ही जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

 

            जिल्ह्याच्या औद्योगिक विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे सांगून सहकार मंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, अमरावतीमध्ये 'पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क' आणि विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क आणि आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र आकारास येत आहे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ हजार ५५ कर्ज प्रकरणे मंजूर झाली असून, यात ६३३ महिला उद्योजिकांचा समावेश आहे. 

 

            आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण आरोग्य विभागातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि आयुष्मान कार्ड वाटप सुरू आहे. मेळघाटातील माता-बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी 'मेळघाट परिक्रमा' उपक्रम राबविला जात आहे. महिलांसाठी 'पिंक ई-रिक्षा', 'आई' योजना आणि 'लाडकी बहीण' योजनेद्वारे आर्थिक सक्षमीकरण केले जात असून, जिल्हा 'बालविवाहमुक्त' करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

      

       पर्यटन क्षेत्रात चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यावर भर दिला जात असून आमझरी गावाची 'मधाचे गाव' म्हणून निवड झाली आहे. तसेच, संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट' विकसित करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल जनगणनेत नागरिकांनी अचूक माहिती भरून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले. महाराष्ट्र दिनानिमित्त आणि जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

पुरस्कार वितरण सोहळा

 

             विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सन 2024-25 या वर्षासाठी 'विशेष जिल्हा युवा पुरस्कार' नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास  पोकळे,  युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केल्याबद्दल युवक गटातून अमर  वानखडे (तिवसा), युवती गटातून कु. जानव्ही राऊत (नया वाठोडा) तसेच संस्था गटातून श्री. संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था (गुरुकुंज आश्रम) यांना सन्मानित करण्यात आले. यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि आदिवासी विकास क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे.

 

      सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाजप्रबोधनकार वेदांत मुंदाने (अमरावती), युवती गटात कु. पुजा गुंजरकर (ब्राम्हणवाडा थडी) आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचार मंच (अचलपूर) यांना सन्मानित करण्यात आले.  अचलपूरच्या विवेकानंद विचारमंचने आरोग्य सेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले आहे.

  याशिवाय अपर आयुक्त सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे , सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, सहायक ग्रंथालय संचालक सुरजकुमार मडावी, अधीक्षक अभियंता मंगेश पाटील, महसूल सहायक मनीषा ढोके, शिक्षिका रितू तळमळे, ग्राम महसूल अधिकारी पवन मुंडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संजय अंबाडेकर, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या सुमेधा बारलिंगे, मंजिरी महाजन, संध्या साउरकर, कविता पाचघरे,पोलीस निरीक्षक निलेश गावंडे,  राखीव पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुळसुंदरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश श्रीवास, अजय मिश्रा, प्रवीण काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय पेठे, होमगार्ड सैनिक राजेंद्र शाहाकार, पोलीस हवालदार राजेश कोचे, राजीव बाहेनकर, दीपक सुंदरकर, शंकर बावनकुळे,पंकज गावंडे, उज्ज्वल सामुद्रे, सुरक्षारक्षक शिवकुमार तायडे यांना उत्कृष्ट कार्याबाबत यावेळी गौरविण्यात आले.

 

 

 

 प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. पाटील यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले.  परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे तसेच दुय्यम परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुंदरे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

 

 ***








जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या स्थापनानिमित्त आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चाफले, तहसिलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000


 

DIO NEWS AMRAVATI 30.04.2026

 सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते

महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

         अमरावती, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिवस समारंभ 1 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार, 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस मुख्यालय अमरावती शहर परेड मैदान येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

        या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

0000000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

             अमरावती, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी नायब तहसिलदार प्रविण ढोले यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

000000

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;

5 मे पर्यंत अंतिम मुदत

अमरावती, दि.30 (जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे 'Sent Back' (परत) करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 30 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून त्रुटी दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहांची संख्या मर्यादित आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी निवासाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नसल्याने किंवा अर्जात तांत्रिक चुका असल्याने हे अर्ज प्रलंबित आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज परत आले आहेत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आणि ई-मेलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्याची हार्डकॉपी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी स्पष्ट केले की, 5 मे 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थी या वर्षाच्या लाभापासून कायमचा वंचित राहील. तसेच त्याला पुढील वर्षीही नव्याने अर्ज करता येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे किंवा 0721-2661261 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

वरुड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात संपन्न;

42 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान

अमरावती, दि. 30 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि संत अच्च्युत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुडचे प्राचार्य कमल किशोर फुटाणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ येथील आदिवासी आश्रम शाळेचे प्रकल्प अधिकारी किशोर काळे, तसेच कौशल्य विकास कार्यालयाचे पंकज कचरे, आकाश येवले , प्रथमेश सोहळे उपस्थित होते.

या मेळाव्यामध्ये नागपूर, पुणे येथील टॅलेंट कॉर्प सोल्युशन आणि हैदराबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमी या दोन नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 100 रिक्त पदांसाठी 163 उमेदवारांनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक खापरे यांनी तर रश्मी माथणकर यांनी आभार मानले.

00000000

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;

10 मे पर्यंत अंतिम मुदत

अमरावती, दि. 30 (जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे 'Sent Back' (परत) करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 30 एप्रिल ते 10 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहून त्रुटी दूर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय वसतिगृहांची संख्या मर्यादित आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी निवासाच्या सुविधेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शासन भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट बँक खात्यात रक्कम जमा करते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केलेली नसल्याने किंवा अर्जात तांत्रिक चुका असल्याने हे अर्ज प्रलंबित आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज परत आले आहेत, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर आणि ई-मेलवर संदेश पाठवण्यात आले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या पोर्टलवर आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करून त्याची हार्डकॉपी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी स्पष्ट केले की, 10 मे 2026 पर्यंत त्रुटींची पूर्तता न केल्यास विद्यार्थी या वर्षाच्या लाभापासून कायमचा वंचित राहील. तसेच त्याला पुढील वर्षीही नव्याने अर्ज करता येणार नाही. ही विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास सर्व जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे किंवा 0721-2661261 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

Wednesday, April 29, 2026

DIO NEWS AMRAVATI 29.04.2026

 

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 29 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 10 मेपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 29 एप्रिल ते 10 मे 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661261 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

वरुड येथे आज कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा

अमरावती, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे गुरूवार, दि. 30 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरूड  जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी केले आहे.

000000000

DIO NEWS AMRAVATI 04-05-2026

  मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत -जिल्हाधिकारी आशिष येरेकर        अमरावती, दि. 4 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त प...