Wednesday, June 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03.06.2026

 सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला  जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’;

सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

अमरावती, दि. 3 (जिमाका):शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार,  दि. 6 जून 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी ऋण आउटरीच कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे सकाळी 11 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित राहणार असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय  उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कॅम्प केवळ एकाच ठिकाणी मर्यादित नसून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 45 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या मेळाव्यामध्ये शेती आणि पूरक व्यवसायांना गती देणाऱ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड , कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) आणि महिला बचत गट यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरी पत्र आणि थेट कर्जवाटप केले जाणार आहे.

हा कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष संधी निर्माण करणारा आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कृषी उद्योजकांनी शनिवार, दि. 6 जून रोजी आपल्या जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा दर्यापूर येथील मुख्य कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यातील सर्व 840 ग्रामपंचायतींचा ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’

अभियानात उत्स्फूर्त सहभाग

अमरावती, दि. 3 (जिमाका): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची सुदृढ आरोग्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात सध्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, जिल्ह्यातील एकूण 840 ग्रामपंचायतींपैकी सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदविला आहे. संपूर्ण जिल्हा आता स्वच्छता आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देत असून, ग्रामीण भागात या निमित्ताने एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अभियानांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यवाहीच्या जोरावर ‘सुदृढ विजेता’ म्हणून घोषित होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता एक निरोगी स्पर्धा सुरू झाली आहे. गावागावात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या संपूर्ण मोहिमेचे चोख नियोजन व उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व ग्रामपंचायतींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे, ज्यामुळे या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे,  सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.

000000

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण

अमरावती, दि. 3 (जिमाका):  सिंदेवाही परिक्षेत्र (ब्रह्मपुरी प्रादेशिक वनविभाग) येथील 'T२' नामांकित वाघिणीच्या शावकासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारी आहे. या चुकीच्या बातम्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे आणि वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गैरसमजाचे वातावरण निर्माण होत असल्याचे वन विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबतची खरी वस्तुस्थिती अशी की, सिंदेवाही परिक्षेत्रातील 'T२' वाघीण मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करत असल्यामुळे, वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तिला तिच्या शावकांसह सुरक्षितपणे पकडले आहे. मात्र, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे 'T२' वाघिणीला परतवाडा येथे हलवलेले नसून, तिच्या शावकांपैकी एका शावकाला (T२ Cub १) पुढील आवश्यक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि वैद्यकीय देखरेखीच्या दृष्टीने परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या शावकाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याच्या अफवा देखील पसरत आहेत, परंतु सद्यस्थितीत या 'T२ Cub १' शावकास मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्याचा किंवा मुक्त अधिवासात पुनर्स्थापित करण्याचा कोणताही निर्णय अथवा योजना वन विभागाच्या विचाराधीन नाही. शावकाला केवळ सुरक्षित वातावरणात वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक निगा उपलब्ध करून देणे हाच या स्थलांतराचा प्रमुख उद्देश आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही यासाठी वस्तुस्थितीवर आधारित आणि वन विभागाकडून पडताळणी केलेली अचूक माहिती प्रसारित करावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

000000

Tuesday, June 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.06.2026

 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2027:

मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि. 02 जून (जिमाका): केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2027 च्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी राज्यस्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून यासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जून 2026 ही राहील, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी 19 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रवेशासाठीची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रविवारी, सकाळी  11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व महत्त्वाच्या सूचना www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

000000

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान: जिल्ह्यात कडधान्य प्रक्रिया युनिट

उभारणीसाठी 33 टक्के अनुदान

अमरावती, दि. 2 (जिमाका): कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी 33 टक्के अनुदान देवून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती व संस्थांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गट लाभार्थ्यांमध्ये संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी, तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी. वैयक्तिक लाभार्थ्यांचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे आणि एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस हे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य दिले जाईल.

या अभियानांतर्गत पात्र युनिटला प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल रुपये 25 लाख प्रति युनिट, यापैकी जे कमी असेल ते अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत, गोदाम व साठवणूक पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल; तर जमीन, वीज आणि मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच, इमारत व गोदामाच्या बांधकामासाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30 टक्क्यांपर्यंतच मर्यादित असेल. शासकीय अनुदान एकूण प्रकल्प खर्चापैकी ठराविक खर्चाची पूर्तता करीत असल्याने उर्वरित रकमेसाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे भांडवल योगदान किमान 15 टक्के असणे आणि वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज घेणे अनिवार्य राहील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नवीन प्रक्रिया युनिटची किमान क्षमता 300 किलो प्रति तास असणे आवश्यक असून, सर्व यंत्रसामग्री राष्ट्रीय मानकीकरण संस्था किंवा समतुल्य गुणवत्ता मानकानुसार असणे बंधनकारक आहे. यासोबतच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व इतर सुरक्षा, पर्यावरणीय व वैधानिक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. लाभार्थ्याला युनिट उभारणीच्या दिनांकापासून किमान 3 वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकारक असून, निधीचा गैरवापर झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, कंपन्या आणि संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

Monday, June 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.06.2026

 जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

17 जणांवर दंडात्मक कारवाई

अमरावती, दि. 01 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीद्वारे 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा दिवस ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया: तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनाचा प्रतिकार करूया’ या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-2003) अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 7 व्यक्तींकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने पठाणपुरा व चांदणी चौक परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांवर धाड टाकून, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणाऱ्या आणि शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात विक्री करणाऱ्या 10 विक्रेत्यांवर कारवाई करत 2 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 17 व्यक्तींकडून 3 हजार 300 रुपयांची दंडवसुली झाली.

जनजागृतीचा भाग म्हणून रुग्णालयांमध्ये रुग्ण, नातेवाईक, आशा सेविका आणि बचतगटांच्या महिलांसाठी विशेष गटचर्चा व समुपदेशन सत्रे घेण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता वाहनांवरून आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती संदेश प्रसारित करण्यात आले. औद्योगिक व परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली, तर रुग्णालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आकाशवाणी अमरावतीवरून जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर यांचे मार्गदर्शन प्रसारित झाले. आज, दि. 1 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन  ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ या आवाहनासह मोहिमेचा समारोप करण्यात आला.

00000000

माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांना शैक्षणिक साहाय्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. 01 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या पाल्यांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार केंद्रीय सैनिक बोर्डाची (केएसबी) अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळ प्रणाली सुरू झाली आहे. पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नींच्या पाल्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक साहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते बारावी तसेच बीए, बी.कॉम आणि बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. सर्व पात्र माजी सैनिक आणि विधवा भगिनींनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन फॉर्म विहित मुदतीत भरावेत आणि फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट व संकेतस्थळावर अपलोड केलेली सर्व संबंधित कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

Sunday, May 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.05.2026


जिल्हाधिकारी कार्यालयात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

      अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

     यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.     

00000


मेळघाटातील 'कुटीर' साडीचा जागतिक स्तरावर मान्यता; ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ'नील यांनी परिधान करून केले कौतुक

अमरावती , दि. 31  (जिमाका) :
​अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी तयार केलेल्या ‘कुटीर’ ब्रँडच्या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे. दिल्ली येथे आयोजित 'लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली' या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ'नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ'नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.
​धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत. अमरावतीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले की, 'मेळघाटातून जगभर' हा प्रवास आता केवळ एक स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे, ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.

****


विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात, अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी; रुग्णालयाला कर्मचाऱ्यांकडून 'वॉटर कुलर' भेट


स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

'वॉटर कुलर'ची भेट:
उन्हाळ्याचे दिवस आणि रुग्णांची गरज लक्षात घेता, रुग्णालयाचे  *वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे* यांनी जयंतीनिमित्त रुग्णालयात एक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, स्वतःहून निधी गोळा करून रुग्णालयाला एक 'वॉटर कुलर' भेट दिला. यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
महिलांनी केलेले उत्कृष्ट नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक दातृत्वामुळे या जयंती महोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, May 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.05.2026




 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

 

         अमरावती , दि. ३० (जिमाका) : जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या असून यावर्षी जिल्हा प्रशासनाने राज्यात प्रथमच समुपदेशाने बदलीचे धोरण काटेकोरपणे अंमलबजावणी करीत केले आहे. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

         शंभर टक्के बदल्या समुपदेशाने करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत समुपदेशनाने बदलीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरलेला आहे. जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक या संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या-२०२६ दि. २९ मे २०२६ रोजी समुपदेशनाद्वारे पार पडलेल्या आहेत.

 दरवर्षी समुपदेशनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचारी उपस्थित राहून समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेत सहभागी होतात. परंतु यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार घरून काम करण्याची मुभा, अनावश्यक सोने खरेदी टाळणे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करणे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांवरील अवलंबिता कमी करून नैसर्गिक शेती करणे, स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढविणे व परदेश दौरे टाळणे इ. बाबींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपाय योजना प्रस्तावित केल्या आहेत.

त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने सूचित केलेल्या उपाययोजनांचे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसुल सहायक, ग्राम महसुल अधिकारी, वाहन चालक इत्यादी संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच प्रवास टाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात न बोलविता दि. २९ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन बदली प्रक्रिया आयोजित करण्यात आली. यामध्ये  सहायक महसूल अधिकारी संवर्गात बदलीस पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली, ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ८२ कर्मचाऱ्यांची बदली झाली, महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३९ कर्मचाऱ्यांची बदली झाली आणि वाहन चालक संवर्गात ३ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ३ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे.

या बदली प्रक्रियेत सर्व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतलेला आहे. वरीलप्रमाणे पार पडलेल्या बदली प्रक्रियेबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धारणी, वरूड, अंजनगांव सुर्जी, धामणगांव रेल्वे इत्यादी दूरच्या कार्यालयातून बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात न येता त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभागी होता आल्यामुळे अत्यंत पारदर्शक व विक्रमी वेळेत बदली प्रक्रिया पार पडल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आनंद व्यक्त केलेला आहे.  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी अभिनव संकल्पना राबविल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. या बदली प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय न झाल्यामुळे सदर बदली प्रक्रिया यापुढेही अशाचप्रकारे राबवावी, असे कर्मचाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. आशियाई संकटाच्या आव्हानात्मक परिस्थितीत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी प्रशासकीय बदल्या सुयोग्य, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने पार पाडल्या आहेत आणि हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे.

00000


Friday, May 29, 2026

DIO NEWS AMRAVATI 29.05.2026

 पी. एम. किसान योजना: सर्व लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी वार्षिक ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक; कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 29 ( जिमाका): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने चालू वर्ष 2025-26 करिता वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जीवंत शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून, राज्यात 20 मे 2026 पासून यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे अनिवार्य आहे; अन्यथा विहित मुदतीत प्रक्रिया न केल्यास शेतकरी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.

शेतकऱ्यांना नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा 'PM-KISAN' मोबाईल अॅप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे (Face Authentication) अशा दोन सोप्या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणिकरण पूर्ण करता येईल. ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन 'फेस ऑथेंटिकेशन'द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी देण्यात आला होता.

दरम्यान, केंद्र शासनाने संशयित प्रकरणातील शेतकऱ्यांचा हप्ता तात्पुरता स्थगित केला आहे. प्रामुख्याने फेब्रुवारी 2019 नंतर झालेले भूमी हस्तांतरण (खरेदी/बक्षीसपत्र/जमीन मंजुरी), चालू व मागील जमीन मालकाचा संशयास्पद अहवाल आणि मागील जमीन मालकाचा अपूर्ण अहवाल या तीन कारणांमुळे ज्यांचे हप्ते थांबले आहेत, अशा शेतकऱ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटरला भेट देऊन पी. एम. किसान पोर्टलवरील Farmer's Corner मधील "Update Missing Information" या Tab मधून आपली माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानंतर बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, कारण ही प्रक्रिया केल्याशिवाय अर्ज मंजुरीसाठी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होणार नाही.

माहिती अद्ययावत केल्यानंतर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर या प्रकरणांना मंजुरी मिळून संबंधित शेतकऱ्यांचे लाभ पुन्हा सुरू होतील. यादीमध्ये नाव पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, अथवा पी.एम. किसान पोर्टलवर स्वतःचे स्टेटस चेक करावे. तसेच, जे लाभार्थी मयत झाले आहेत, त्यांच्या वारसदारांनी मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या आत कृषी कार्यालयास सादर करून मयत लाभार्थ्यांचे हप्ते बंद करावेत, त्यानंतरच वारसदारांना नवीन नोंदणी करता येईल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी 30 जून 2026 पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000000

Thursday, May 28, 2026

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन

अमरावती, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. 
                                                          00000

DIO NEWS AMRAVATI 03.06.2026

  सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला    जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’; सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप अमरावती, दि. 3...