Wednesday, April 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01-04-2026

 




राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा

अमरावती, दि. 01 (जिमाका): राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शुक्रवार दि. 3 एप्रिल  रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. भोयर शुक्रवार, 03 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता  वर्धा येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता काँग्रेस नगर येथे आगमन व माजी मंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, येथे अमरावती विभागीय शिक्षण मेळाव्यास तसेच सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सिटी लँड अमरावती येथे साधना सहकारी बँक लि. च्या नविन शाखेचे उद्घाटनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने वरूडकडे प्रयाण करतील.

0000000







अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 01 (जिमाका): अमरावती शहरात श्री क्षेत्र चांगापूर हनुमान मंदीर, चांगापूर अमरावती येथे दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भावीकांची गर्दी असते. दि. 02 एप्रिल 2026 गुरूवार, सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे. सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांकरीता प्रवेश बंदी राहील. वाहतूकीस पर्यायी मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर रेल्वे अंडर बायपास या मार्गे फक्त दर्शनाकरीता जाणार दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. हनुमान मंदीर चांगापूर येथे दर्शन घेवून परतणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मंदीरा पासून बाहेर निघणार मार्ग- अयोध्या नगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाचा अवलंब करावा. पार्कीग व्यवस्था- मंदीर परिसरात वाहन पार्कींग फलक लावले असल्या त्याच ठिकाणीच वाहन धारकांनी वाहने पार्क करावे. वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000



मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमात जिल्ह्याची भरारी

*1 हजाराहून अधिक प्रकरणांना मंजुरी

*राज्याच्या अग्रगण्य जिल्ह्यात स्थान

अमरावती, दि. 1 (जिमाका): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे राज्याच्या प्रगती अहवालात जिल्ह्याचा ठसा उमटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 1 हजार 55 प्रकरणांना मंजुरी देऊन जळगाव, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली यासारख्या जिल्ह्याच्या पंगतीत स्थान मिळविले आहे.

जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यात एकूण 4 हजार 184 अर्ज प्राप्त झाले. अर्जाची छाननी करून 3,691 प्रकरणे बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आली. यातील 1 हजार 55 प्रकरणे मंजूर करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी प्रगतीमध्ये क्षेत्रनिहाय प्रगतीचा विचार करता, ग्रामीण भागातून 669 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे, तर शहरी भागातील 386 तरुणांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागात अधिक प्रकरणे मंजूर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे.

योजना राबविताना महत्त्वाच्या पैलूवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. प्रामुख्याने महिला सक्षमीकरणात महिला उद्योजकांवर विशेष भर देण्यात आला. यासाठी एकूण 633 महिलांची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यातून महिला आणि ग्रामीण युवकांना प्राधान्य देण्यात आले. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमात कापड उद्योग क्षेत्रातील 306 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रयत्न केले. यात दर महिन्याला बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या बँकांच्या शाखेला भेट देऊन प्रक्रियेविषयी माहिती घेतली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक उद्योगांना चालना देणे, स्वयंरोजगार निर्मिती, बँकांमार्फत सुलभ कर्ज प्रक्रिया आणि विशेषतः युवक व महिलांना प्राधान्य देणे या चतुःसूत्रीवर भर देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रभावी नियोजनामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होण्यास आणि उद्योजकतेला नवी दिशा देण्यास मदत होत आहे. या मोहिमेत स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी प्रामुख्याने सक्रिय सहभाग नोंदविला.

00000000

पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल

            अमरावती, दि. 01 (जिमाका): पश्च‍िम विदर्भातील उर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्म‍ित सिंचन क्षमता ही 85,002 हेक्टर, तर जलासाठा 564.05 दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक्यामध्ये कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीत अव्वल स्थान पटकाविले आहे.

सन 2025-26 या वर्षा करीता सिंचनासाठी 2.164 कोटी रुपये वसुली करण्याचे उद्द‍िष्ट विभागाला  देण्यात आले होते. सन 2016 मध्ये उर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाचे रुपांतरण  सिंचन पाटबंधारे विभागामध्ये करण्यात आले. कामाचे नियोजन व सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे थकित लाभधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे या विभागाने सुमारे 0.76 कोटी रुपये वसुली केली आहे.

             तसेच या प्रकल्पामधून बिगर सिंचनासाठी पाणी उचल करणाऱ्या सर्व यंत्रणांना मार्च 2026 पुर्वी  थकबाकीचा भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बिगर सिंचनासाठी 40 कोटी उद्द‍िष्टांपैकी 50.75 कोटी रुपयांचा विक्रमी वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी मिळून सुमारे 51.51 कोटी रुपये सर्वाधिक वसुलीच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतिहासामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सिंचन पाणीपट्टी वसुली झाली आहे.

उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी अधिक्षक अभियंता मनिष राजभोज यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे उद्द‍िष्टाच्या 122.17 टक्के उद्द‍िष्ट गाठले आहे. सर्व वसुलीच्या मोहीमेमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीचे योगदान महत्वाचे आहे. या मोहीमेत सहभागी सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कालवा निरिक्षक, मोजणीदार, दप्तर कारकुन व तसेच सर्व क्षेत्रीय तथा विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

00000000

जिल्ह्यात 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांवर बंदी

*नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे कारावास

अमरावती, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27ची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. कापूस लागवडीसाठी शासनाची मान्यता नसलेल्या बीजी-3 (एचटीबीटी) बियाण्यांचा वापर टाळावा, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कारावास आणि एक लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने केवळ बीजी-1 आणि बीजी-2 या वाणांच्या कापूस बियाण्यांना मान्यता दिली आहे. 'राउंडअप बीटी', 'चोर बीटी', 'वीडगार्ड' किंवा एचटीबीटी यासारखी बियाणे बेकायदेशीर असून ती पर्यावरणास घातक आहेत. या बियाण्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बियाणे केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. त्यात पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव असल्याची खात्री करावी. पॅकेटवर सरकारमान्य अधिकृत चिन्ह तपासावे. बीजी-2 (बोलगार्ड 2) वाणाची किंमत 901 रूपये आहे. बियाणे पाकीट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावी. पाकीटावरील बियाणे उगवणीची अंतिम मुदत तपासून पहावी. सर्व वाणांमध्ये बीजी-2 तंत्रज्ञान सारखेच असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करू नये, पूर्व हंगामी लागवड टाळावी. विक्रेत्याने पक्के बिल देण्यास नकार दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा.

बेकायदेशीर बियाणे विनापावती आणि चढ्या दराने विकले जातात. त्यांच्या पाकीटावर गुणवत्तेचे विवरण, तंत्रज्ञान किंवा कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा कोणताही उल्लेख नसतो. जिल्ह्यात जर अशा बोगस बियाण्यांची विक्री किंवा लागवड करताना आढळल्यास, तात्काळ कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना कळवावे. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी कळविले आहे.

0000000


अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!

 




अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 ते 8 एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’!

भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग, आणि 6 विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असेल.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम Mission Karmayogi चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे,वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

महा-साधना सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे iGOT Karmayogi App द्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येईल. अधिकारी आणि कर्मचारी आपले काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी होण्यास मदत होईल.या अभ्यासक्रमांमुळे प्रत्येकाला स्वत:ची क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.

महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत
बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या शासकीय कामकाजात सुद्धा विविध डिजिटल प्रणाली, ॲप्सचा वापर होत आहे. महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर, नागरिक केंद्रित सेवा आणि पारदर्शकता वाढविण्यास या सप्ताहाची मदत होणार आहे.

या सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील विविध शासकीय कार्यालये. जिल्हा कार्यालये यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रम 2 ते 8 एप्रिल दरम्यान पूर्ण करणे गरजेचे असून कर्मयोगी भारत पोर्टलवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे.

मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (या विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये) तसेच विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा) या सर्वांनी साधना सप्ताहात एकूण 4 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे राहील. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
वर्षा फडके - आंधळे
उपसंचालक (वृत्त)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
#sadhana
#missionkarmyogi
#sadhanasaptah

Monday, March 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30-03-2026

 जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;

युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र राज्य युवा धोरणानुसार सन 2025-26 या वर्षाकरिता जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी पात्र युवक-युवती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी 8 एप्रिल 2026 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

 या पुरस्काराचे स्वरूप युवक व युवतींसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह, तर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका नोंदणीकृत संस्थेसाठी 50 हजार रुपये रोख, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.

पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक-युवतींचे वय 1 एप्रिल रोजी 15 वर्षे पूर्ण तसेच 31 मार्च रोजी  29 वर्ष पर्यंत असावे. जिल्ह्यात सलग पाच वर्षांचे वास्तव्य असणे अनिवार्य आहे. तसेच संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार नोंदणीकृत असावी आणि ती किमान पाच वर्षे कार्यरत असावी. अर्जदारांनी आपल्या मागील तीन वर्षांतील कार्याचे पुरावे जसे की, वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, फोटो व व्हिडिओ इत्यादी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुढील किमान दोन वर्षे सक्रिय राहण्याचे हमीपत्रही उमेदवारांना द्यावे लागणार आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र ठरणार नाहीत. अधिक माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड, तपोवन गेटजवळ, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

000000000

 

विशेष लेख - 'डिजिटल महाराष्ट्र'च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!

 


विशेष लेख

 

'डिजिटल महाराष्ट्र'च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!

 

          महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या '१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत' राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या वतीने करण्यात आले. या अत्यंत महत्त्वाकांक्षी मूल्यमापनाचे निकाल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते जाहीर करण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावती महानगरपालिकेने २०० पैकी १७९.५० गुण मिळवत राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. ही नेत्रदीपक कामगिरी महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासन, तांत्रिक कार्यक्षमता आणि सेवा वितरणातील प्रगतीचे जिवंत द्योतक ठरली आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली डिजिटल उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, नाविन्यपूर्ण तांत्रिक प्रयोग आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आल्याने हे यश संपादन करता आले आहे.

        महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री सभागृह, मुंबई येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला.

 

    

 

कार्यपद्धतीत सुधारणा करीत थेट पाचव्या स्थानी झेप !

 

    भारतीय गुणवत्ता परिषदेकडून करण्यात आलेल्या या सर्वंकष मूल्यमापनात सात प्रमुख निकषांवर कामगिरी तपासण्यात आली. यामध्ये महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI (Artificial Intelligence) व Blockchain चा वापर तसेच GIS (Geographic Information System) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता. या सर्व निकषांवर अमरावती महानगरपालिकेने उत्कृष्ट अंमलबजावणी करत ई-गव्हर्नन्स क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमांतर्गत तर्फे विकसित करण्यात आलेल्या स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर संबंधित माहिती व कार्यप्रगती सादर करण्यात आली होती. प्राथमिक छाननीनंतर  भारतीय गुणवत्ता परिषदेकडून सखोल मुलाखती व प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्यात आले. या यशाला विशेष महत्त्व आहे, कारण प्राथमिक मूल्यमापनात अमरावती महानगरपालिका आठव्या स्थानावर होती. मात्र, त्यानंतर प्रशासनाने कार्यपद्धतीत सुधारणा करत नव्याने नियोजन, तांत्रिक सक्षमीकरण आणि नागरिककेंद्रित उपक्रमांवर भर दिला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणून अंतिम मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने पाचव्या स्थानी झेप घेतली.

 

आधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण उपक्रम

 

      'आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शासकीय प्रणाली - एक नवीन युगाची वाट' या ब्रीदवाक्याला अनुसरून अमरावती महानगरपालिकेने अनेक विशेष उपक्रम राबविले आहेत. या यशामागे ई-गव्हर्नन्स क्षेत्रात राबविण्यात आलेल्या ‘माय अमरावती व्हॉट्सॲप चॅटबॉट व चॅनलद्वारे नागरिकांशी थेट संवाद, रिमोट सेन्सिंगवर आधारित ‘कूल रूफ उपविधी २०२५, GIS व ड्रोन मॅपिंगद्वारे सुधारित मालमत्ता कर मूल्यांकन, स्वच्छता वॉर रूम आणि ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी यांचा मोठा वाटा आहे. तसेच, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Re-engineering) करून सेवा वितरण जलद करण्यात आले आहे. या यशाबाबत प्रतिक्रिया देताना आयुक्त सौम्या शर्मा चांडक म्हणाल्या की, महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक, सुलभ व नागरिकाभिमुख करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, भविष्यातही नागरिकांना अधिक दर्जेदार आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 

पर्यावरण संवर्धन आणि शहर विकासातील कामगिरी

स्वच्छ हवा गुणवत्ता सर्वेक्षणात अमरावती भारतात पहिल्या क्रमांकावर !

 

        ई-गव्हर्नन्ससोबतच स्वच्छ हवा गुणवत्ता सर्वेक्षण २०२५ मधील अमरावती शहराची कामगिरी अत्यंत सरस राहिली आहे. ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अमरावती भारतात पहिल्या क्रमांकावर असून, शहराला सर्वेक्षणात २०० पैकी २०० गुण मिळाले आहेत. या कामगिरीसाठी वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे अमरावती महानगरपालिकेला ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय, शहराचे तापमान कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने नवीन शहरी नियोजन धोरणे सुरू केली आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी आणि शहरातील 'शहरी उष्णता बेटे' (Urban Heat Island) प्रभाव कमी करण्यासाठी इमारतींवर 'कूल रूफ' (थंड छप्पर) अनिवार्य करणारे नवीन नियम लागू केले आहेत. हे उपनियम हवामान लवचिकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले असून, या पर्यावरणीय उपाययोजनांची देखरेख करण्यासाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे.

 

 

 

नागरिक-केंद्रित विशेष तंत्रज्ञान उपक्रम

 

       अमरावती महानगरपालिकेने नागरी सेवा सुधारण्यासाठी 'मुख्यमंत्री-१५० दिवस' कार्यक्रमांतर्गत अनेक विशिष्ट उपक्रम कार्यान्वित केले आहेत. यामध्ये व्हॉट्सॲप चॅटबॉट सर्व नागरी सेवा मिळवण्यासाठी 'एकच खिडकी' म्हणून काम करत आहे. 'कामगार पोर्टल'द्वारे कामगार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी हस्तलिखित कागदपत्रे कमी करून प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्यात आले आहे. 'ब्लॉकचेन तंत्रज्ञान' चा वापर करून कागदपत्रांची पुनरावृत्ती टाळणे आणि महत्त्वाच्या प्रमाणपत्रांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे, ज्यासाठी दूरसंवेदन तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. तसेच, 'महापालिका संदेशिनी' हे अधिकृत वृत्त पोर्टल विश्वसनीय पालिका माहितीसाठी कार्यरत आहे. मोठ्या महानगरपालिका व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी यशस्वी स्पर्धा करत मिळवलेला हा पाचवा क्रमांक अमरावती महानगरपालिकेसाठी अत्यंत अभिमानास्पद असून, डिजिटल प्रशासनाच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ देणारा आणि भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. या यशामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे !

                             

 अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

                          

 

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव;

 


महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव; ई-गव्हर्नन्समध्ये अमरावतीची राज्यात उल्लेखनीय कामगिरी

अमरावती, दि. २८ मार्च — महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री १५० दिवस ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री सभागृह, मुंबई येथे आयोजित समारंभात गौरव करण्यात आला.

या राज्यस्तरीय मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने २९ महानगरपालिकांमधून २०० पैकी १७९.५० गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ व मराठवाडा विभागातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

महानगरपालिकेने राबविलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये माय अमरावती व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, चॅनेल व मोबाईल अ‍ॅपद्वारे नागरिकांशी सुलभ संवाद, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित कूल रूफ उपनियम २०२५, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (GPR) अंतर्गत सेवांचे डिजिटायझेशन व नवीन वेब पोर्टल्सची निर्मिती, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परवाने व प्रमाणपत्रांची पडताळणी तसेच मालमत्ता करासह विविध विभागांमध्ये GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे.

अमरावती महानगरपालिकेची ही कामगिरी राज्यातील तंत्रज्ञानाधारित व उत्तरदायी शहरी प्रशासनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, भविष्यातील स्मार्ट प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

00000

 

Saturday, March 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28-03-2026

 











वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

           अमरावती, दि. 28 (जिमाका):माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे.  त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्य कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

          सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत पाटील, सुलभा खोडके, संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सक्षमीकरण हे वसुधाताईंच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले असून हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने घेतलेली दखल आहे. ताईंच्या प्रेरणेमुळे आज विदर्भातील महिलाआत्मनिर्भर होऊन काम करीत आहेत. वसुधाताईंचे कर्तव्यदक्ष , दिशा देणारे विचार, उत्तम वैचारिक भूमिका इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.त्यांची विदर्भाच्या प्रश्नाबाबतची जाण सखोल आहे. ते समजून घेण्यासाठी लवकरच मी त्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून घेणार आहे व पालकमंत्री म्हणून त्या विषयावर कार्य करणार आहे.

        विदर्भाचे विकासासाठी वसुधाताई आयुष्यभर झटल्यात. वसुधाताईंनी विदर्भाच्या विकासासाठी रचलेल्या पायाचा कळस पूर्ण करण्याचे कार्य मी पूर्ण करेल. त्यांचे अमरावतीच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतो. विदर्भाच्या विकासासाठी त्यांची तळमळ वाया जाणार नाही. तो विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे  पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले .

         पुरस्काराला उत्तर देताना वसुधाताई देशमुख म्हणाल्या, हा 'जीवनगौरव' पुरस्कार म्हणजे केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, गेल्या अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाचे ऋण फेडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना मिळणारे समाधान सर्वात मोठे होते.

 हा प्रवास कठीण होता, पण लोकांच्या प्रेमामुळे तो सुखकर झाला. माझ्या कामावर विश्वास ठेवून मला सदैव सहकार्य करणारे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या जनतेचा हा पुरस्कार आहे . शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे हे व्रत आपण अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहयांद्री गावातील 'रुक्मिणी' या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा. नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवनप्रवासावर आधारित 'वसुधा' या कादंबरीचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे  संचालन शिप्रा मानकर यांनी केले तर प्रा. विनय वसुले यांनी आभार मानले.

******







पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती, दि. २८ (जिमाका): ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा पोलीस पाटील खऱ्या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी  येथे आयोजित 'पोलीस पाटील परिषदे'त पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.   खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 ग्रामीण स्तरावर 'पोलीस पाटील' हे प्रशासनाचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. गुन्हेगारी नियंत्रण आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात येईल. पोलीस पाटीलांच्या समस्या शासनस्तरावर मार्गी लावण्याचे आश्वासन  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

प्रशासनात पोलीस पाटीलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण स्तरावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात. गावपातळीवर वाद मिटवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, अशा बहुआयामी जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत.

ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी पोलीस पाटीलांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री श्री. बावनकुळे काढले. उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी त्यांना सपत्नीक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

 पोलीस पाटील परिषदेला जिल्ह्यातील पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

       ***










अमरावतीत ऑक्टोबरमध्ये भव्य पुस्तक महोत्सव घेणार

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

*जिल्हा ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण

*गाव तिथे ग्रंथालय उभारणार

*स्पर्धा परीक्षेसाठी ई लायब्ररी उपक्रम

 

अमरावती, दि. 28 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा भव्य पुस्तक महोत्सव अमरावतीत येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात येईल. या ठिकाणी पश्चिम विदर्भातील सर्व नागरिक येतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच येथे आलेल्या नागरिकांनी एक तरी पुस्तक विकत घ्यावे, यासाठी दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, मनुष्याच्या जीवनात पुस्तकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होऊन अनेक क्रांती घडल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यासाठी गावात असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून येथे वाचनालय सुरू करण्यात येतील. यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल.

नव्याने निर्माण झालेली जिल्हा ग्रंथालयाची इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवतील. त्यासोबतच ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून या ठिकाणी डिजिटल लायब्ररी निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात येतील. यासोबतच मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

सुरुवातीला श्री बावनकुळे यांनी जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. श्री. मडावी यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांनी आभार मानले.

00000








 

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू

-         पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती, 28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचे आयोजन केले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखेडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी विविध 31 योजना दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

अमरावती जिल्हा बँकेने 1400 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना शेतकऱ्यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच 2011 पूर्वी सरकारी जागेवर निवासी अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री कडू आणि उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश बकाळ यांनी आभार मानले.

0000

 









विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 28 : मार्डी रोडवरील विपश्यना केंद्र आणि सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सांस्कृतिक भवनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकार्पण कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते. सुरुवातीला श्री. बावनकुळे यांनी बुद्ध वंदेनेत सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्राची पाहणी केली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शासनाने बांधलेले हे सांस्कृतिक भवन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहावे. या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांसाठी मदत करण्यासाठी केंद्र उभारावे. तसेच आधुनिक सुविधांनी युक्त इ-लायब्ररी, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे केंद्र उभे करावे. यासोबतच कौशल्य विकासासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. संस्थेने उभारलेल्या कार्यासाठी सर्वोत्तरी मदत करण्यात येईल.

चांगले जीवनमान घडविण्यासाठी विपश्यना हा सर्वात चांगला मार्ग आहे. संस्कारमय जीवन आणि शांतीसाठी विपश्यनेशिवाय पर्याय नाही. जनतेचे कल्याण करण्याची शक्ती विपश्यनेमध्ये आहे. विपश्यना केल्याने मोठी शक्ती मिळते. यातून समाज विकासाचे कार्य घडण्यास मदत होत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

 

 अमरावतीत इंधन तुटवड्याची अफवा;

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील अग्रसेन पेट्रोल पंप, (आयटीआय कॉलेज समोरील पंप ) तसेच राजेश आणि विदर्भ गॅस एजन्सी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व ठिकाणी साठा पुरेसा असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सीवर पिण्याचे पाणी, ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, सावलीसाठी शेड उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तासाला पेट्रोल पंपावरील उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन पुरवठा साखळी सुरळीत असून तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे 'पॅनिक बाइंग' (गरजेपेक्षा जास्त खरेदी) टाळावी, कारण यामुळेच विनाकारण गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

0000000

 

 

 





DIO NEWS AMRAVATI 01-04-2026

  राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा अमरावती, दि. 01 (जिमाका): राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शुक्रवार दि. 3 एप्रिल  रोजी जिल्ह्याच्या दौ...