मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या लाभासाठी सोमठाना खुर्दच्या
लाभार्थ्यांना मोबदल्यासाठी आवाहन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाना खुर्द येथील 42 शेतमुल्यांकनधारक, 21 वनहक्कधारक आणि 112 घरमुल्यांकनधारकांकरिता निधी उपलब्ध झाला असून काही लाभार्थ्यांना मोबदला रक्कम वितरीत करण्यात आली आहे. आवश्यक दस्तऐवजा अभावी उर्वरित लाभार्थ्यांना मुल्यांकन रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे, अशा लाभार्थ्यांना अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे तातडीने दस्तऐवज सादर करण्याचे आवाहन, अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आर.एस.टोलिया यांनी केले आहे.
वर्ष 2012 च्या शासन निर्णयानुसार सोमठाना खुर्द या गावाचे वर्ष 2013-14 मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावातील शेतमुल्यांकनधारक आणि वनहक्कधारकांना मुल्यांकनाची 4 पट रक्कम देय असून यातील 1 पट मुल्यांकन रक्कम व त्यावरील 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरीत मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु काही शेतमुल्यांकनधारक, वनहक्कधारक आणि घरमुल्यांकनधारकांनी आवश्यक दस्तऐवज सादर नकेल्याने त्यांना मोबदला अदा करण्यात अडचण येत आहे. या सर्व शेतमुल्यांकनधारक आणि वनमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,शेतीचा 7/12 आणि शेतमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तसेच घरमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,नमुना 8, घरमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तातडीने अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमठाना खुर्द येथील लाभार्थ्यांची नाव निहाय यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
00000
सण-उत्सव काळात ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य गाणेवाजविण्यासंदर्भात मनाई आदेश जारी
अमरावती, दि. 25 (जिमाका): ईद-ए-मिलाद, कावड यात्रा, श्रीकृष्ण जन्माष्टमी,दहिहांडी,पोळा,गणपती उत्सव कालावधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चिन्हीत व आक्षेपार्ह गाणे व भडकाऊ भाषणांच्या क्लिप्स वाजविण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
0000000
ग्रामीण भागासाठी सोशल मिडीयावर आक्षेपाहार्य पोस्ट
प्रसारीत करण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
अमरावती, दि. 25 (जिमाका) : सण-उत्सवादरम्यान विविध सोशल मिडीयावरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागासाठी सण-उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
अमरावती, दि. 25 (जिमाका): येत्या काळात विविध धर्मीय सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, पर्यावरण व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यास डॉल्बी सिस्टीम मालक व चालकांसाठी अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
000000
कृषी पर्यटन केंद्र संचालकांची "मामाचं वावर" येथे
एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 25 (जिमाका): पर्यटन संचालनालय प्रादेशिक, अमरावती अंतर्गत अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी "मामाचं वावर" कृषी पर्यटन केंद्र, मौजे वळती, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेले कृषी पर्यटन केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, शाश्वत विकास केंद्र (अमरावती) चे गणेश चौधरी, कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष लहू अवताडे आणि कॅनव्हास फाउंडेशन, द चॅरिटेबल ट्रस्ट (अमरावती) चे आशिष शेरेकर उपस्थित होते.
या कार्यशाळेत उपसंचालक विजय जाधव यांनी महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024 अंतर्गत कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, प्रोत्साहन, होमस्टे, पर्यटन व्हिला, व्हॅकेशन होम अशा अधिकृत नोंदणी प्रक्रिया आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात ए.आय चा वापर कसा करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला. गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकासाची कास कशी धरावी आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबद्दल तांत्रिक व व्यावहारिक माहिती दिली.
अध्यक्ष लहू अवताडे यांनी राज्यातील कृषी पर्यटनासमोरील आव्हाने, संचालकांचे संघटन आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, यावर आपले अनुभव अभ्यासपूर्ण रितीने मांडले. तसेच शाळेच्या सहली व शासनाच्या विविध विभागांशी कसा समन्वय साधता येईल यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अमरावती विभागातील विजय श्रीराव (महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरुड), सुनील वारे (वनश्री कृषी पर्यटन केंद्र, उदखेड) तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील मातोश्री कृषी पर्यटन केंद्र (अंबड) आणि श्री गोकुळ कृषी पर्यटन केंद्र (जालना) येथील संचालकांनी आपले अनुभव सांगितले.
या एक दिवसीय कार्यशाळेमुळे अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांना केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन नियमावली समजून घेण्यास व नवनवीन संकल्पना राबवण्यास मोठी दिशा मिळाली आहे. "मामाचं वावर" चे संचालक मोहन तेजराव जगताप यांच्या सहकार्याने सर्व संचालकांनी निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'पर्यटन मित्र' शिवाजी गायकवाड यांनी केले, तर प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे उपलेखापाल राजेश मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0000000
गुणनियंत्रण विश्लेषणात जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे 189 नमुने अप्रमाणितबुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरोध जिल्ह्यातून 2 हजारांवर तक्रारी;
कंपनी विरोधात एफआयआर दाखल
अमरावती, दि. 25 (जिमाका) : सोयाबीन बियाण्यांच्या विश्लेषणासाठी जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून 17 ऑगस्ट पर्यंत यातील 189 नमुने अप्रमाणित आढले आहेत. यासंदर्भात बियाणे उत्पादक कंपनीवर कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांची दखल घेण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या एकूण 3 हजार 157 प्राप्त तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच कंपन्यांवर कार्यवाही करण्याविषयी वृत्तपत्रांमध्ये विविध वृत्त प्रसारित झाले होते. याची कृषी विभागाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्यांचे वितरकनिहाय,वाणनिहाय,लॉट निहाय माहिती आदी सादर करण्याचे आदेश बियाणे उत्पादक कंपन्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची पाहणी विहित वेळेत होण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या. या समित्यांमार्फत प्रातिनिधिक स्वरुपात कंपनीनिहाय आणि लॉटनिहाय तक्रारींची पाहणी सुरु असून उर्वरीत तक्रारींची पाहणी उपसमित्यांद्वारे करण्यात येत आहे. 17 ऑगस्ट पर्यंत घेतलेल्या जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून यातील 196 नमुने प्रमाणित तर 189 नमुने अप्रमाणि आढले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्यांवर बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.
एकूण प्राप्त झालेल्या 3 हजार 157 तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑॅगस्ट 2026 रोजी कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी व इतर कंपनींविरुद्ध एकूण 41 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध 10 गुन्हे तर ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीवर 5, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीवर ५, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 2, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक 1, रवि सिड्स ७, एस. के. बी सिड्स 2, ग्रिन ॲग्री रिव्होल्युशन 2, व्हिगर बायोटेक 2, अंकुर सिंड्स 2, ईगल सिड्स 1, श्री. ओसवाल सिड्स 1 आणि उत्तम सिड्सवर 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागाकडून तपास सुरु आहे.
सोयाबीन बियाण्यांच्या तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 17 ऑगस्ट 2026 पर्यंत ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीच्या 273, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीच्या 119, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 103, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक कंपनीच्या 671, रवि सिड्स कंपनीच्या 182, एस. के. बी सिड्सच्या 45 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कंपन्यांचे बियाणे विक्री परवान्यांवर बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव निविष्ठा व गुण नियंत्रक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.
0000000
खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत ;
34 हजार 462 मेट्रीक टन युरीयाचा पुरवठा खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार नाही
अमरावती, दि. 25 (जिमाका) : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत झाला असून 12 ऑगस्ट 2026 पर्यंत 34 हजार 462 मेट्रीकटन (मे.ट.) युरिया, 10 हजार 270 मे. ट. डिएपी, 5 हजार 374 मे.ट. एमओपी, 45 हजार 799 मे.ट. संयुक्त खते आणि 20 हजार 526 मे. ट. एसएसपी खतांचा पुरवठा झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून युरीया व डिएपी खतांच्या तुटवडयाबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. खरीप हंगामात खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात आजपर्यंत कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात खतांच्या रॅक लागण्यास विलंब झाला मात्र लवकरच पुरवठा सुरळीत करण्यात आला. रासायणीक खतांच्या किमंतीत कोणतीही वाढ झाली नाही. विशेषत: केंद्र शासन युरीयाच्या किंमती नियंत्रीत करीत असल्याने त्याच्या किंमतीत दरवाढ झालेली नाही. तसेच डिएपीच्या किमंतीत वाढ नाही. फोस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या बाबतीत केंद्र शासनाचे पोषणतत्व आधारीत अनुदान लागू असल्याने किंमतीत वाढ झाली नाही. संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सर्व रासायणीक खतांच्या किंमतीत सरसकट प्रति बॅग 125 ते 300 रुपयांनी वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा स्तरीय भरारी पथक स्थापन करुन कृषी सेवा केंद्रांची नियमीत तपासणी करण्यात आली. लिंकींग व तत्सम तक्रारींबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार निवारणासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये क्यु.आर.कोड आणि बियाणे,खते व किटकनाशक संदर्भातील तक्रारींकरिता व्हाट्सॲप लावण्यात आला.
https://adozpamravati.
0000000
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय भारत केंद्राकडून विविध उपक्रमांचे आयोजन
अमरावती, दि. 25 (जिमाका) : माय भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1600 ठिकाणी सहभागी होणाऱ्या आठ लाखांहून अधिक युवकांना आभाशी माध्यमातून संबोधन करणार आहे. याद्वारे देशभरातील युवक आभासी माध्यमातून एकत्र जुळणार आहेत. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर येथील पोटे पाटील महाविद्यालय आणि बियाणी महाविद्यालयात प्रवेश सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत युवक संवाद व विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
माय भारत स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष युवा संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासात झालेल्या परिवर्तनावर चर्चा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्र, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.
00000000
मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.
रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.
00000000




.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)





.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)