जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Monday, August 10, 2026
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ!
DIO NEWS AMRAVATI 10.8.2026
जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;
डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात
अमरावती, दि.10 (जिमाका) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरु असून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९.९८% गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे व डिजिटायझेशनचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यातील एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २५ लाख ४५ हजार १८३ मतदारांपर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांपैकी धामणगाव रेल्वे, बडनेरा, दर्यापूर, मोर्शी आणि अचलपूरमध्ये अर्ज वितरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. अमरावती (९९.९९टक्के), मेळघाट (९९.९९ टक्के) आणि तिवसा (९९.८६ टक्के) या मतदारसंघांमध्येही वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख ८१ हजार ८९ गणना अर्ज गोळा करण्यात आले असून, गोळा झालेल्या सर्व अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे हे जिल्ह्यातील हे एकूण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. धामणगावरेल्वे मतदार संघात डिजिटायझेशन ८६.८९ टक्के, बडनेरा ८२.६९ टक्के, अमरावती ७८.५८ टक्के, तिवसा ८३.३४ टक्के, दर्यापूर(अ.ज.) ९०.१६ टक्के, मेळघाट (अ.जा.) ८८.०१ टक्के, अचलपूर ८७.६७ टक्के,मोर्शी मतदार संघात ९०.६४% डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे.यानुसार १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेला येत्या १७ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी मतदार याद्यांची प्रारुप प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर २३ सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. २२ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.
000000
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून वकिलांसाठी 40 तासांचे प्रशिक्षण
जिल्हयातील 47 वकिलांचा सहभाग
अमरावती, दि.10 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने वकिलांसाठी 7 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत 40 तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे सुरु आहे.
अमरावती जिल्हयातील एकूण 47 वकील प्रशिक्षण घेत असून त्याचा फायदा पक्षकारांना व न्यायालयाला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता प्रथमेश पोपट, न्यायाधीश वरिष्ठ स्तर, बेलापुर, ठाणे सी. एन. ऑडरे यांच्या मार्फत प्रशिक्षणार्थी वकिलांना मध्यस्थीचे 40 तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे, प्रश्नोत्तर सत्र, तसेच ध्यान, प्रत्यक्ष मध्यस्थी सत्र अनुकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणात वकिलांना मध्यस्थी प्रक्रियेबाबत सैद्धांतिक तसेच व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. मध्यस्थीची संकल्पना व महत्त्व, मध्यस्थाची भूमिका व जबाबदाऱ्या, पक्षकारांशी प्रभावी संवाद, वाटाघाटीची कौशल्ये, विवाद निराकरणाच्या विविध पद्धती, मध्यस्थीची प्रक्रिया तसेच मध्यस्थीतील व्यावहारिक बाबी याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
तत्पूर्वी, 7 ऑगस्ट रोजी या प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष न्या. उज्वला एम. नंदेश्वर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले. जिल्हा न्यायाधीश- 1 ए. जी. जोशी,. अमरावती, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, के. आर. राजपुत, अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख आदी उपस्थिती होते.
000000
मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात ऑफलाईन स्वरूपात 15 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती जिल्हा आणि विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यालयाने केले आहे.
वसतिगृह प्रवेश वर्ष 2026-27 नुसार 7 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची यादी 22 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ७२१-२६६१२६१ वर संपर्क साधता येणार आहे.
000000
क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृहात विद्यार्थीनींना प्रवेश घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त अमरावती येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतीगृह (125 जयंती) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थीनींना 15 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी उत्तपन्नाचा दाखला,मागील वर्षाची गुणपत्रिकेची छायाप्रत ,जात प्रमाणपत्र व बोनाफाईड सर्टिफीकेटची आवश्यकता असून वसतिगृहात मोफत निवास व भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता व ड्रेसकोड भत्ता, सहल आदी सुविधा पुरविण्यात येतात.
Sunday, August 9, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
Saturday, August 8, 2026
कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र !
Friday, August 7, 2026
पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
DIO NEWS AMRAVATI 07.08.2026
नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
कुटीर महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती, दि. 7 : शासनाने खादीच्या वापराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही एक दिवस खादीचे कापड घालणे बंधनकारक केले आहे. खादी उद्योगाच्या विकासासाठी नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीमधील कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या कुटीर महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, उद्योग सहसंचालक नीलेश निकम यांच्यासह कस्तुरबा खादी महिला समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हातमाग, खादी, सौर खादी तसेच पर्यावरणपूरक वस्त्रांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण, आदिवासी महिलांच्या कौशल्याला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कुटीर महोत्सव दि. 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी हातमाग व खादी ही केवळ वस्त्रनिर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, स्थानिक रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा मजबूत आधार आहे. नागरिकांनी खादीचा वापर वाढविल्यास या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी हातभार लागणार आहे. शासनाने खादी उद्योगाला सक्षम करण्यासाठी क्लस्टरची निर्मिती केली आहे. शासनाच्या वतीने या क्लस्टरला सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे, असे प्रतिपादन केले.
कुटीर या ब्रँडच्या माध्यमातून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्याद्वारे तयार होणारे सूत, खादी आणि सौरवस्त्र, तसेच हातमागावर तयार होणाऱ्या विविध उत्पादनांना आधुनिक डिझाइन आणि बाजारपेठेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमातून ग्रामीण व आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, पारंपरिक कौशल्याला आधुनिक बाजारपेठेची जोड मिळत आहे.
कुटीर महोत्सवाच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सोलार चरखा, धागा तयार करण्याची प्रक्रिया, कापडावरील रंगकाम, एम्ब्रॉयडरी, कापडावरील प्रिटींग आदीची पाहणी करून माहिती घेतली.
00000
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचा
डेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव
राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक
अमरावती,दि.७: आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निती आयोगाने जाहीर केलेल्या डेल्टा रँकिंग जानेवारी–मार्च २०२६ मध्ये धारणी आणि चिखलदरा तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य, झोन व राष्ट्रीय स्तरावर महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. राज्यस्तरावर या तालुक्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा, तीन राज्यांच्या झोन स्तरावर अनुक्रमे तिसरा व चौथा तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ३३ व ३६वा क्रमांक पटकाविला आहे.
डेल्टा रँकिंगनुसार या उभय तालुक्यांनी गावांमध्ये आरोग्य आणि पोषण सेवा मजबुत करणे, शैक्षणिक सुधारणा, शेतकरी सहाय्य व कृषी उपक्रम, सामाजिक विकास उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्य केले आहे. डेल्टा रँकिंग नुसार राज्यातील एकूण २७ तालुक्यांमध्ये उत्तम कामगिरी करत धारणी तालुका पहिल्या क्रमांकावर राहिला असून चिखलदरा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे.
देशपातळीवर आकांक्षित तालुक्याचे विविध झोन तयार करण्यात आले आहेत. यामधील चौथ्या झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील ६९ तालुक्यांचा समावेश आहे. झोन स्तरावरही उत्तम कामगिरी करत धारणी तालुका तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून चिखलदरा तालुका चौथ्या स्थानावर आहे.
देशभरातील एकूण 513 तालुक्यांचा आकांक्षित तालुके कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरही या तालुक्यांची कामगिरी उंचावली असून धारणी तालुका ३३ व्या क्रमांकावर तर चिखलदरा तालुका ३७ व्या स्थानावर आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद अमरावती, धारणी व चिखलदरा पंचायत समित्या आणि आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास व मूलभूत सुविधा या संबंधित विभागांतील अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नाने ही उत्तम कामगिरी पार पडली आहे.
जिल्हा प्रशासनाने व जिल्हा परिषद अमरावतीने सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्तरीय यंत्रणा व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.
00000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या यादीनुसार राज्यातील ६ लाखांवर पात्र शेतकऱ्यांना ५हजार कोंटीचा लाभ वितरीत
अमरावती जिल्ह्यातील ३३ हजार ४०१पात्र शेतकऱ्यांना ३०८ कोटींवर कर्जमाफी
अमरावती, दि.७ : राज्य शासनाच्या ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज राज्यातील ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींचा लाभ वितरीत करण्यात आला. याअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३३ हजार ४०१ पात्र शेतकऱ्यांना ३०८ कोटी १६ लाख २७ हजार २८ रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' या योजनेच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर पात्र शेतकऱ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटन मंत्री शंभुराज देसाई, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. या बैठकीस सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहकारी संस्थांचे निबंधक दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
राज्यातील शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आर्थिक बळ देण्याच्यादृष्टीने राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार आहे
व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि.७ : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील १२ वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती येथे तर मुलींनी बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेश वर्ष २०२६-२७ साठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानुसार ७ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.१ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अर्जांची छाननी होईल. पहिली निवड यादी ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल तर पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील निवड यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुसऱ्या निवड यादितील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या मात्र गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारा घेतले जातील असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.
मेळघाट प्रादेशिक वनविभागाचा उपक्रम
चिचाटी धबधब्याकडे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती सुरू; स्थानिक २० युवकांना मिळाला रोजगार
अमरावती, दि. ७: मेळघाट प्रादेशिक वन विभाग, परतवाडा अंतर्गत येणाऱ्या घटांग वन परिक्षेत्रातील चिचाटी गावातील ‘चिचाटी धबधबा’ येथे मार्गदर्शित निसर्ग भ्रमंती (गाइडेड नेचर ट्रेल) सुरू करण्यात आली आहे. अवघ्या दोन आठवड्यात ६०० पर्यटकांनी भ्रमंती केली असून स्थानिक २० युवकांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
निसर्गप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ जुलै २०२६ पासून ही भ्रमंती अधिकृतपणे सुरू झाली आहे. चिचाटी ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती, चिचाटी’ द्वारे केले जात आहे. चिचाटी गाव ते चिचाटी धबधबा यादरम्यानचा ४ कि.मी.चा मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला असून पर्यटकांसाठी हे मुख्य आकर्षण ठरत आहे.
पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि स्थानिक रोजगार २५ जुलैपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला निसर्गप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत तब्बल ६०० हून अधिक पर्यटकांनी या निसर्ग भ्रमंतीचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे चिचाटी गावातील २० स्थानिक युवकांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. सुरक्षेच्या व माहितीच्या दृष्टीने पर्यटकांसोबत चिचाटी गावातील स्थानिक निसर्ग मार्गदर्शक (गाईड) असणे बंधनकारक करण्यात आले आहे.या भ्रमंतीसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारले जात आहे. स्थानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी धारणी व चिखलदरा तालुक्यातील स्थानिक नागरिकांसाठी हे शुल्क सवलतीच्या दरात १०० रुपये ठेवण्यात आले आहे. या शुल्कातच निसर्ग मार्गदर्शकाचे मानधन अंतर्भूत आहे.
अमरावतीहून चिचाटी धबधब्याकडे जाण्यासाठी अमरावतीहून परतवाडा आणि पुढे धामणगाव गढी मार्गे देवगाव आणि चिचाटी येथे पोहचता येते. जास्तीत-जास्त निसर्गप्रेमींनी या मार्गदर्शित भ्रमंतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे ‘एमएसएमई कर्ज वितरण शिबरात उद्योजकांना तब्बल ९० कोटींचे कर्ज वितरीत
अमरावती, दि. ७ : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच उद्योजकांना सुलभ व जलद कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशन हॉल अमरावती येथे आयोजित देशव्यापी एमएसएमई कर्ज वितरण शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून या शिबीरात तब्बल ९० कोटींचे कर्ज मंजूर व वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आशीष सावजी उपस्थित होते. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप जाधव, राजकुमार तरते, निखिल रंजन आदी उपस्थित होते.
एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबीरात विविध उद्योगांना आवश्यक कर्ज सुविधा, बँकेच्या विविध योजना तसेच केंद्र व राज्य शासनाच्या एमएसएमई संबंधित योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमादरम्यान एमएसएमई उद्योजकांना तब्बल 90 कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून स्थानिक उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
प्रास्ताविक राजकुमार तरते यांनी केले. निलेश वाघमारे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध कर्ज योजना व एमएसएमई उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या वित्तीय सुविधांचे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित उद्योजकांना कर्ज प्रक्रियेबाबत तसेच विविध योजनांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन शिवानी ठोकरे यांनी केले तर डॉ. नवनीत इंगळे यांनी आभार मानले.
जिल्ह्यातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू;
१५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन
अमरावती, दि. ७: सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत https://hmasnew.mahait.org संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेशित मुला-मुलींना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात.व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहात ऑफलाईन स्वरूपात १५ सप्टेंबर पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मुलांसाठी अमरावती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ - निंभोरा), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा) येथे तर मुलींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प अमरावती), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प अमरावती - जुने नाव: गुणवंत) , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (युनिट क्र. ४ - जेल रोड) आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (जुने नाव: १२५ जयंती) येथे अर्ज सादर करता येणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्येही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण, अमरावतीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेश वर्ष २०२६-२७ नुसार ७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची यादी २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ७२१-२६६१२६१ वर संपर्क साधता येणार आहे.
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC)
सक्तीचे; तहसीलदारांचे आवाहन
अमरावती, दि.७: संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी तातडीने हयात प्रमाणपत्र काढावे, अन्यथा त्यांचा मासिक लाभ बंद होऊ शकतो, असे तहसिलदार, संजय गांधी योजना शहर विभाग अमरावतीच्या तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लाभार्थी मोबाईलवर संबंधित अॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
०००००
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ!
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ! ➡️६.२२ लाख पात्र शेतकरी; ₹५,०२८...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)







