Tuesday, July 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.07.2026

 चिखलदरा येथे गुरूवारी महाराजस्व समाधान शिबीर

अमरावती, दि. 21 (जिमाका) : चिखलदरा येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदान येथे गुरुवार, दि. 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हे शिबीर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, दिवंगत नेते अजितदादा पवार आणि आदिवासी योद्धा रेंगा कोरकू जयंतीनिमित्त शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरात चिखलदरा तहसील कार्यालयाच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि महसुली सेवा पुरवल्या जाणार आहेत. 

प्रमाणपत्रे व दाखले यात प्रलंबित फेरफार मार्गी लावणे व सातबारामधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा आणि आठ-अ उतारे. उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रे व विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय दाखले देण्यात येणार आहे. जमीन अभिलेख अद्यावतीकरणात महिलांना शेतकरी दर्जा देणे व राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजना आणि शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करणे, जिवंत सातबारा मोहीम या सेवा दिल्या जाणार आहे. शासकीय योजनात सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, नवीन रेशन कार्ड दुरुस्ती व वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी करण्यात येणार आहे.

शिबीरात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. महसूल विभागासोबतच नगर परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग व इतर संबंधित विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांचे महसुली प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावून त्यांना तात्काळ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिखलदराचे तहसीलदार जीवन मोरनकर यांनी केले आहे.

0000000

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव'

अमरावती, दि. 21 (जिमाका): जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शेगावराहटगाव रस्त्यावरील हॉटेल सिल्वर स्टार येथे 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' आयोजित करण्यात आला आहे.

या लोन उत्सवामध्ये जिल्ह्यातील बँकांमार्फत पीएम विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण, तसेच कर्ज वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय नवीन कर्ज प्रस्ताव स्विकारून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. पूर्वी नामंजूर झालेल्या पात्र प्रस्तावांचाही पुनर्विचार करून मंजुरी देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक रतनकुमार, पुणे अंचलाचे अंचल प्रमुख अजयकुमार सिंह उपस्थित राहणार आहेत. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक, एमएसएमई विकास संस्थान, नागपूरचे संचालक, खादी व ग्रामोद्योगचे जिल्हा अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या क्षेत्रीय व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

पीएम विश्वकर्मा योजनेत पात्र असलेल्या सर्व कारागिर व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

00000000

अमरावतीत दोन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

अमरावती, दि. 21 (जिमाका) :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडनेरा विधानसभा मतदारसंघाकरीता गुरूवार, दि. 23 जुलै रोजी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आणि अमरावती विधानसभा मतदारसंघाकरीता शनिवारी, दि. 25 जुलै 2026 रोजी आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये नागरिकांना विविध शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये रेशन कार्ड, संजय गांधी योजनेंतर्गत लाभ, महिलांना शेतकरी दर्जा देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सातबारामधील चुकांची दुरुस्ती, कर्ज वाटप शेतीशी निगडीत साहित्याचे वाटप, आयुष्यमान कार्ड वाटप, माहिलांना एसटी महामंडळाचे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड वितरण, आधारकार्ड दुरुस्ती आदी सुविधांची माहिती आणि वितरण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी शिबाराला उपस्थित राहावे, तसेच शासकीय योजनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.

0000000

शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसहाय्य योजनेसाठी दि. 21 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. सन 2026-27 साठीच्या समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल 25 लाख रूपये, सन 2026-27 साठीच्या असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्यात फर्निचर खरेदी 4 लाख रूपये व प्रस्ताव फक्त एकदाच इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रूपये, ‘ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी 2.50 लाख रूपये, विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी 2 लाख रूपये, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 6.20 लाख रूपये व इमारत विस्तार 10 लाख रूपये, राष्ट्रीयस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य 1.50लाख रूपये, 2.50 लाख रूपये. 3 लाख रूपये, ‘बालकोपरा स्थापन करण्याकरीता 6.80 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावेत. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावे, असे आवाहन  जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अ. पुं. वानखडे यांनी केले आहे.

0000000

सबळीकरण योजनेसाठी जमीन खरेदी करणार

*प्रस्ताव पाठविण्याचे शेतमालकांना आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतजमीन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतमालकांनी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सन 2025-26 करीता शेतमालकांना वैयक्तिक मालकीची शेतजमिन विक्री करावयाची असल्यास शेतजमीन विक्रीसंबंधी प्रस्ताव समाजकल्याण कार्यालयात सादर करावे लागणार आहे. त्यानुषंगाने एकूण शेतीचा सातबारा व आठ अ, तलाठी यांचा चर्तु:सिमेचा नकाशा आणि शेतमालकांची नाव व पत्ता जोडावेत. विक्रीसाठी शेतीचा फेरफार, शेतीवर कोणतीही थकबाकी नसल्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, तलाठी प्रमाणपत्र, शेतीचा सर्च रिपोर्ट, शेत जमिन मोजणीची क प्रत, शपथपत्र, कुटुंबातील व्यक्तींचे संमतीपत्र, दुय्यम निबंधकांकडून शेत जमिनीचे मुल्यांकन पत्र,  शेती योग्य व पिकावू असल्याबाबत तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल, गाव नकाशाची प्रत, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड जोडावे लागणार आहे.

जमिन विक्रीच्या दरास जिल्हास्तरीय समितीमार्फत मंजुरी देण्यात येईल व त्यानुसार जमिनीचे दर निश्चित होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी प्रस्ताव  सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000000

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’


 ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Monday, July 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.07.2026

 जिल्ह्यातील विशेष लोक अदालतीमध्ये विविध प्रकरणांचा यशस्वी निपटारा;

4.13 कोटी रुपयांची तडजोड

अमरावती, दि. 20 (जिमाका): जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे नुकतेच विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत येणाऱ्या 'धनादेश बाऊन्स' प्रकरणांवर तडजोडीसाठी भर देण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

विशेष लोक अदालत पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 18 पॅनल (मंडळ) तयार करण्यात आले होते. या पॅनलमध्ये न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या लोक अदालतीसमोर एकूण 2 हजार 740 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 229 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये विशेष बाब म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या 4 जुन्या प्रकरणांमध्येही दोन्ही पक्षांत तडजोड घडवून आणण्यात यश आले. या संपूर्ण प्रक्रियेतून एकूण 4 कोटी 13 लाख 45 हजार 372 रुपयांच्या तडजोडीच्या रक्कमेचे दावे निकाली काढण्यात आले.

लोक अदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. या कार्यात जिल्हा न्यायाधीश-1 ए. जी. जोशी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, वकील वर्ग, बँक व पतसंस्थांचे प्रतिनिधी तसेच पक्षकारांचे सहकार्य लाभले. सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही लोक अदालत यशस्वी झाल्याचे सांगत सचिव संजय सहारे यांनी सर्वांचे आभार मानले.

00000000

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांकडून अर्ज आमंत्रित;

1 सप्टेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 20 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने 'विशेष गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या पात्र उमेदवारांनी 1 सप्टेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

या विशेष गौरव पुरस्कारासाठी काही प्रमुख निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या माजी सैनिक किंवा वीर पत्नींच्या पाल्यांना इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत, ते या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. याशिवाय चालू शैक्षणिक वर्षात आयआयटी , आयआयएम  आणि एम्स यांसारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश असेल. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेले माजी सैनिक, वीर पत्नी अथवा त्यांचे पाल्यदेखील या गौरव पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.

00000000

 

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 22 जुलैपर्यंत मुदतवाढ:

समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास दि. 22 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जातात. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन स्वरूपात अर्ज जमा करावा. अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3 व निंभोरा) आणि संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींकरिता कॅम्प व जेल रोड येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहे आणि तालुका स्तरावरील सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत 22 जुलै 2026 राहील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहिती व संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000000000

जिल्हास्तर सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत सहभागासाठी 21 जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन:

जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका):क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी करण्याची मुदत दि. 21 जुलै 2026 पर्यंत आहे.

 प्राथमिक स्तरावरील सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी सर्व इच्छुक संघांनी सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या https://www.subrotocup.in/register या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेकरिता 15 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतरचा असावा, तर 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतरचा असावा. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 21 जुलै 2026 पर्यंत विहित नमुन्यातील प्रवेशपत्र भरून करावयाची आहे. तसेच त्याबाबतचे 100 रुपये शुल्क आकारून अधिकृत पावती प्राप्त करून घ्यावी. स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूकडे आधारकार्ड, वयाच्या पडताळणीसाठी जन्माचे 5 वर्षांपर्यंतचे शासकीय दाखले व विहित नमुन्यातील ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संघासोबत जबाबदार क्रीडा शिक्षक किंवा मार्गदर्शक असणे बंधनकारक राहील. वेळेत नोंदणी झालेल्या संघांनाच पुढील स्पर्धेचे वेळापत्रक कळविले जाईल आणि वेळेवर येणाऱ्या कोणत्याही संघास प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000000

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी इयत्ता 11 वी, 12 वी व बिगर व्यावसायिक

अभ्यासक्रमांच्या अर्जांना 22 जुलैपर्यंत मुदतवाढ

अमरावती (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाकरिता इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जांची मुदत दि. 22 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 विविध संघटना, विद्यार्थी व क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांची दखल घेत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ती मुदत पूर्ववत राहील. सध्या ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त होणाऱ्या इयत्ता 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्जांची छाननी  गृहपाल, निरीक्षक व सहायक आयुक्त स्तरावर तात्काळ सुरू करण्यात आली आहे. वाढीव मुदतीनुसार पोर्टलवर प्राप्त सर्वच्या सर्व अर्जांची छाननी संबंधित अधिकाऱ्यांनी दि. 24 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करून घ्यावी. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे समाज कल्याण आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.

00000000

पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन:

सुशिक्षित बेरोजगारांना कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

अमरावती, दि. 20 (जिमाका):नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित उमेदवारांना स्थानिक व इतर जिल्ह्यातील खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या वतीने उद्या, येत्या 21 जुलै 2026 रोजी पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात जाधव गिअर्स लि. अमरावती, कोलब्रो ग्रुप प्रा. लि. अमरावती/नागपूर, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण प्रा. लि. अमरावती आणि स्विगी लि. (क्यूस कॉर्पोरेशन) या कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती व लेखी परीक्षा घेतील आणि पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळवून देतील.

तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 21 जुलै 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. काही अडचण असल्यास उमेदवारांनी 0721-2566066, 8983288982, 8605654025 या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा amravatirojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

कर्जमुक्तीचा लाभ, समृद्धीची वाट! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ, सुधारित अटी आणि पारदर्शक DBT द्वारे निधी वितरण.


 कर्जमुक्तीचा लाभ, समृद्धीची वाट!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ, सुधारित अटी आणि पारदर्शक DBT द्वारे निधी वितरण.

Sunday, July 19, 2026

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा शेतकऱ्यांना ऐतिहासिक दिलासा. 2 लाख रूपयापर्यंत संपूर्ण कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पारदर्शक आणि डिजीटल अंमलबजावणी


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा शेतकऱ्यांना ऐतिहासिक दिलासा. 2 लाख रूपयापर्यंत संपूर्ण कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पारदर्शक आणि डिजीटल अंमलबजावणी
 #शेतकरीकर्जमुक्ती 
#कर्जमुक्तीयोजना2026 
#महाराष्ट्रशासन 
#शेतकरी

DIO NEWS AMRAVATI 19.07.2026









                         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा

तसेच मुलींच्या वसतिगृहास भेट

            अमरावती, दि. 19 (जिमाका):चिखलदरा येथे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान  त्यांनी चिखलदरा दौऱ्यादरम्यान शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तसेच टेंब्रूसोंडा मुलींच्या वसतिगृहास  येथे भेट दिली.

यावेळी भेटीदरम्यान  त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत  महाविद्यालय व वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शिक्षणाचा दर्जा, वसतिगृहातील सुविधा आणि विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

याप्रसंगी आमदार केवलराम काळे, अपर आयुक्त संदीप गोलाइत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला,  मुख्याध्यापक श्री. पुंडकर,  शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.

00000000

Saturday, July 18, 2026

मेळघाटातील आदिवासींचा विकास करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे - आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

 






मेळघाटातील आदिवासींचा विकास करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे

-         आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके

 

अमरावती, दि. 18 (जिमाका): मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिले. आरोग्य प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

आमदार केवलराम काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, आदिवासी महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती जयरेखा, उपसंचालक सुशील वाकचौरे आधी यावेळी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री श्री. उईके म्हणाले, मेळघाटामध्ये बालविवाहामुळे माता आणि बालकांच्या कुपोषणासारख्या आरोग्य तक्रारी निर्माण होतात. तसेच दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे हे देखील कुपोषणाचे कारण आहे. यासाठी प्रशासनासोबतच अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर कार्य करीत असतात. यावर अधिक भर देऊन बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी. मेळघाटामध्ये पुरेसा औषधसाठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी.  या भागामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना सक्षमपणे राबवावी, असे आदिवासी विकास मंत्री. डॉ. उईके म्हणाले.

मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजना राबविण्यात येतात. याच धर्तीवर येथील सामाजिक संस्था देखील कार्य करीत असतात. परंतु त्या स्वतंत्रपणे काम करीत असतात. यापुढे प्रशासनाच्या पूर्वपरवानगी व समन्वय साधून  सामाजिक संस्थांनी काम करावे तसेच या क्षेत्रात जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रचार साहित्याचे शासनामार्फत प्रमाणीकरण करण्यात यावे. आदिवासी बहुल क्षेत्राचा विकास साधण्यासाठी शासनासमवेत सामाजिक संस्थांनी समन्वय साधून काम करावे.

              यावेळी श्री. उईके यांनी महिला व बालकल्याण विभाग व त्यांच्या योजना, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य विभाग या विषायांवर संबंधितांशी चर्चा केली. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने या भागातील कुपोषण हटवायचे आहे. आदिवासी विकास विभाग योजनेअंतर्गत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे,  हे लक्षात घेता आश्रम शाळेतील पाणी प्रश्न, आरोग्य प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या या तातडीने सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या धारणी शाखा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन अधिकारी वरूण कळसकर यांनी प्रास्ताविक केले. दिपश्री देशमुख यांनी संचलन तर शिक्षण विस्तार अधिकारी अनुश्री राऊत यांनी आभार मानले .

00000

DIO NEWS AMRAVATI 21.07.2026

  चिखलदरा येथे गुरूवारी महाराजस्व समाधान शिबीर अमरावती, दि. 21 (जिमाका) : चिखलदरा येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर...