रस्ते, घरकुल, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या
समस्या सोडवाव्यात
*खासदार बळवंत वानखडे यांचे निर्देश
अमरावती, दि.
4 : केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून
निधी देण्यात येतो. या निधीचा योग्य विनियोग करून ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करावे.
यात प्रामुख्याने पांदण रस्ते, घरकुल, आरोग्य यासोबतच पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यावर
भर देण्यात यावा, असे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले.
जिल्हा नियोजन
भवनात श्री. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची
सभा पार पडली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, गजानन लवटे, प्रविण
तायडे, अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त
डॉ. मंगेश गोंदवले, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
प्रकल्प संचालक प्रिती देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात पायाभूत
सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांचा विकास
होणे आवश्यक आहे. चांगल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होण्यास
मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील काही मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने या कामांना
गती देण्यात यावी. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याला प्राधान्य देण्यात यावे.
त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते महत्वाचे आहेत. यासाठी पांदण रस्त्यांवर लक्ष
केंद्रीत करण्यात यावे. यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा,
अशा सूचना खासदार श्री. वानखडे यांनी केल्या.
गरजूंना आर्थिक
सहाय्याच्या योजना महत्वाच्या आहेत. प्रामुख्याने दिव्यांगांना देण्यात येणारी मदत
थांबविण्यात येऊ नये. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावर शिबीरे घेऊन यूडीआयडी प्रमाणपत्र
वाटप करण्यात यावे. यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात याव्यात. ग्रामीण भागातील
घरकुलांचा प्रश्न महत्वाचा आहे. घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधितास पाच ब्रास रेतीचे
वाटप करण्यासाठी पास देण्यात यावा. तसेच जवळपास असलेल्या रेतीच्या उपलब्धतेबाबत माहिती
देण्यात यावी. तसेच टप्पेनिहाय अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत.
आरोग्य ही महत्वाची
बाब असून यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. रूग्णवाहिकांना इंधनाचा नियमित पुरवठा
होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मेळघाटात आरोग्याचे प्रश्न असल्याने याठिकाणी रूग्णवाहिका
उपलब्ध राहिल, याची दक्षता घेण्यात यावी. आरोग्यासोबतच पाणी पुरवठा महत्वाचे आहे. जलजीवन
मिशनमधून पूर्ण करण्यात येणारी कामे तातडीने पूर्ण करावीत. गावात प्रत्यक्ष पाणी पुरवठा
सुरू होईल, यासाठी कामे तातडीने पूर्ण करावीत. यामुळे साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे
शक्य होईल.
युवकांसाठी रोजगार
मेळावे आयोजित करण्यात यावे. येत्या 29 सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर रोजगार मेळावे
आयोजित करण्यात येत आहे. यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती
कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात
यावी. त्यांना प्रशिक्षण आणि बँकांकडून कर्ज मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. हे उद्योग
कायमस्वरूपी सुरू राहावेत, यासाठी प्रयत्न करावेत. कंत्राटी तत्वावर कार्यरत कामगारांना
पूर्ण वेतन मिळावे, यासाठी कामगार विभागाने जागृती करावी. क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट
खेळाडू घडावेत, यासाठी विद्यापीठाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना खासदार
श्री. वानखडे यांनी केल्या.
000000
‘इंडिया स्किल्स’स्पर्धेसाठी
उमेदवारांना १५ सप्टेंबर पर्यंत
अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि.४ (जिमाका) : ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’साठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून
जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक उमेदवारांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
इंडिया स्किल्स
स्पर्धेच्या माध्यमातून २३ वर्षांखालील उमेदवारांना
जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या
स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग
घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर
भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे
आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.
या स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष
ठेवण्यात आला आहे. वैयक्तीक सहभागासाठी ५६ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी
२००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स,काँक्रिट कन्स्ट्रक्शन
वर्क, लँडस्केप गार्डनिंग या क्षेत्राकरिता
उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा. सायबर सिक्युरिटी,इंडस्ट्री
४.०,मॅकॅट्रोनिक्स,रोबोट सिस्टिम इंटीग्रेशन या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.
शासकीय
व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),पॉलेटेक्निक,इंजिनियरींग कॉलेज,खाजगी शाळा,विद्यापीठ,प्रशिक्षण
संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण
संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या स्पर्धेत
सहभागासाठी इच्छुक उमेदवारांना
skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी
केले आहे.
०००००
दत्तक विधानात जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी
एकाच दिवसात ९ बालकांना हक्काचा 'कुटुंबाधारित' निवारा!
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संवेदनशीलतेमुळे
दत्तक प्रक्रियेला वेग
पालकत्व मिळाल्याने पालकांच्या जीवनात आनंदाची पहाट
अमरावती, दि. 4 (जिमाका) : प्रत्येक बालकाला
प्रेम, माया, सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधार मिळावा, या उदात्त उद्देशाने राबविण्यात
येणाऱ्या दत्तक विधान प्रक्रियेत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी
आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी तब्बल 9 दत्तक प्रकरणांमध्ये आदेश पारित करून या बालकांच्या
आयुष्यात नवीन आशा आणि आनंदाचा अध्याय प्रारंभ केला आहे. तसेच पालकत्व मिळाल्याने पालकांच्या
जीवनात आनंदाची पहाट उगविली आहे.एकाच दिवशी जिल्ह्यातील बाल संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण
बाब असून, प्रशासनाची संवेदनशीलता, तत्परता आणि बालकांच्या सर्वोत्तम हितासाठी असलेली
बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी व्यक्त
केली आहेत.
‘प्रत्येक
बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंबामध्ये वाढण्याचा अधिकार आहे. दत्तक
विधान प्रक्रिया ही केवळ एका कायदेशीर आदेशापुरती मर्यादित नसून ती एका बालकाच्या संपूर्ण
आयुष्याला नवी दिशा देणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य
देऊन पात्र दत्तक प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे ही निश्चितच समाधानाची बाब असून, यामुळे या बालकांना
नवीन कुटुंब,नवीन नाती आणि उज्ज्वल भविष्याची संधी प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी श्री.
येरेकर यांनी सांगितले.
बालकांचे
संस्थात्मक संगोपन करण्यापेक्षा शक्य असेल तेथे त्यांना कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध
करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. दत्तक प्रक्रियेद्वारे बालकाला केवळ निवारा मिळत नाही,
तर त्याला आपलेपण, भावनिक आधार, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण मिळते.
त्यासोबतच पालकांना बाल संगोपनाची जबाबदारी मिळाली आहे.
बालकांचे हित,
संभाव्य दत्तक पालकांची पात्रता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच कायदेशीर प्रक्रियेची
पडताळणी व सर्व बाबींचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी 9 प्रकरणांमध्ये
दत्तक आदेश पारित केले. पालकांच्या संगोपनापासून वंचित राहिलेल्या बालकांना कायमस्वरूपी
प्रेमळ कुटुंब मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण
पाऊल आहे. या निर्णयामुळे बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर कौटुंबिक वातावरणात
वाढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दत्तक विधान
प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट, जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, तसेच बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांच्या समन्वयातून
आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि कुटुंबाधारित संगोपनाच्या
दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,
विशेष दत्तक संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय साधण्यात आला. पात्र
बालकांच्या दत्तक प्रक्रियेतील आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.दत्तक विधान प्रक्रियेत बालकांचे सर्वोत्तम हित,
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित यंत्रणांशी समन्वय आणि प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर
आवश्यक कार्यवाही करण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बालकांना
संस्थात्मक संगोपनाऐवजी शक्य तेथे कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच बालकांच्या
पुनर्वसनासाठी कायदेशीर व सुरक्षित मार्गाने कार्यवाही करणे यासाठी बाल संरक्षण यंत्रणा
सातत्याने प्रयत्नशील आहे.
'बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे'-
अजय डबले
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले
यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत सांगितले, ‘बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे ही
त्याच्या भावनिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दत्तक
विधान प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जाते. संबंधित
सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा बाल
संरक्षण कक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकरणांना
गती मिळाली असून, एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे, ही बाल संरक्षण क्षेत्रातील
उल्लेखनीय उपलब्धी आहे.’
दत्तक प्रक्रिया
ही समाजातील संवेदनशील आणि जबाबदार नागरिकांनी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेतलेल्या बालकाला कुटुंबाचा आधार देणे हे अत्यंत मोठे
सामाजिक योगदान आहे. पात्र आणि इच्छुक पालकांनी अधिकृत प्रक्रियेची माहिती घेऊन कायदेशीर
मार्गाने दत्तक विधान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा संदेशही या निमित्ताने देण्यात
आला. जिल्ह्याच्या बाल संरक्षण व्यवस्थेतील ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय
ठरत आहे.
000000
नागरिकांच्या समस्या निवारणासाठी दररोज वेळ राखीव
*अभ्यागतांसाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत भेटी अनिवार्य
अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील सर्व शासकीय व महसूल विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी नागरिकांच्या अडचणी व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत अभ्यागतांना भेटणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी परिपत्रक जारी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दररोज दुपारी ३ ते ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. राखीव वेळेत विभाग प्रमुखांनी शक्यतो स्वतः उपस्थित राहून नागरिकांची निवेदने, तक्रारी ऐकून त्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी लागणार आहे. ज्या प्रकरणांचे तात्काळ निवारण शक्य नाही, त्यांची नोंद घेऊन विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.
अत्यावश्यक शासकीय बैठका किंवा अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे विभाग प्रमुख उपस्थित राहू शकत नसल्यास, त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे. नागरिकांना विनाकारण ताटकळत राहावे लागू नये आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुरळीत व परिणामकारक व्हावे, यासाठी या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
00000
सेमाडोह येथे १३ नालसा योजनांची प्रभावी अंमलबजावणी
अमरावती, दि. ४ (जिमाका): जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) मेगा ड्राईव्ह अंतर्गत
चिखलदरा तालुक्याच्या सेमाडोह गावातील नागरिकांच्या दारापर्यंत विधी सेवा, कायदेविषयक
मार्गदर्शन व विविध शासकीय योजना अशा एकूण १३ नालसा योजनांचा लाभ पोहचविण्यात येत आहे.
ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साह असून, त्यांच्या दारापर्यंत विधी सेवा आणि शासनाच्या
योजनांची माहिती व लाभ पोहोचत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.
नालसाच्या निर्देशानुसार देशभरातील नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत
विधी सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून
देण्यासाठी महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये
नालसा मेगा ड्राईव्ह-१ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये
हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे या उपक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात
आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम व सामाजिक-आर्थिकदृष्ट्या गरजू भागाचा विचार करून चिखलदरा
तालुक्यातील सेमाडोह गावाची निवड करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष
उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राधिकरणाचे
सचिव संजय सहारे यांच्या समन्वयातून २५ ऑगस्ट २०२६ पासून मेगा
ड्राईव्हची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा मेगा ड्राईव्ह २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
सेमाडोह येथे नालसा मेगा ड्राईव्ह टप्पा
१ अंतर्गत १३ नालसा योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात
आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे सचिव, कार्यालयीन कर्मचारी तसेच पॅरा-लीगल
स्वयंसेवक सेमाडोह गावास वारंवार भेटी देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.
घरभेटी, सर्वेक्षण, कायदेविषयक जनजागृती, पात्र लाभार्थ्यांची ओळख वप्रकरणांची नोंद
तसेच आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. गावातील
नागरिकांची माहिती संकलित करून पात्र लाभार्थ्यांची ओळख करण्यात येत आहे.
नागरिकांना त्यांच्या हक्कांची, विधी
सेवांची तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देऊन आवश्यकतेनुसार विधी सहाय्य
व संबंधित विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या विशेष उपक्रमास ग्रामस्थ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि चिखलदरा तालुका प्रशासनाचे
सहकार्य प्राप्त होत आहे.
०००००००
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)