Wednesday, September 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.09.2026







                           सुधारित बातमी

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम

 

आदिवासी समुदाय लढवैय्याच, अंद्धश्रद्धेला जीवनात थारा देऊ नका-

 

जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना संदेश

 

        अमरावती, दि. 2 (जिमाका): भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल अशा लढवय्ये व क्रांतिकारी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आणि प्रसंगी मेळघाटात वाघ व अस्वलांशी दोन हात करायला न घाबरणारा हा समुदाय आहे. आपली ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची कास व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विद्यार्थ्यांनी पुढे जावे, असा मोलाचा संदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डोमा येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळेत दिला. तसेच सनदी अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला भीक न घालता आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा मौलिक सल्ला दिला.

 

          चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी, दि. 1 सप्टेंबर रोजीच्या भेटीद्वारे एक अनोखा कार्यक्रम पार पडला. सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाराच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी रात्रभर संवाद साधत प्रगल्भ विचाराचे दर्शन घडविले. याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी संवेदनशील प्रशासनाचे हे एक अत्यंत धाडसी व भूषणावह पाऊल ठरले.

 

       आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  पोलीस अधीक्षक निकेतन कदम,  सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांनी संपूर्ण तालुका प्रशासनासह आश्रमशाळेला भेट दिली.

 

आम्हीही घडलो तुम्हीही घडा

 

         विद्यार्थ्यांसोबत भोजन केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांगत कट्टयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रंगतदार व खुमासदार प्रश्नांनी अनौपचारिक चर्चेतून भविष्यातील ध्येय गाठण्याचे विचार हे यातून पुढे आले. तुम्ही आयएएस आणि आयपीएस कसे झालात हे आपसूक आलेले प्रश्न व त्यांना या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर खास आकर्षण होते. हा संवाद आम्ही घडलो आणि तुम्हीही घडा असाच ठरला.

 

 

 

       शालेय जीवनातच एका आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा बांधलेला चंग जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि आपण विद्यार्थी दशेतच  काय बनायचं हे ठरवलं, ते तुम्हीही करू शकता, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

      सत्यम गांधी आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी बीएची पदवी घेतली असली तरी आपण आयएएस घडलो असल्याचा प्रवास केवळ दुर्दम इच्छाशक्तीने आणि मेहनतीने पूर्ण होऊ शकला. ते आपणही करू शकतात, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

       आश्रमशाळेत कथित भूत असल्याच्या दाव्याविरुद्ध विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला विरोध करण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी या हितगुजावेळी केले. त्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटचालींसाठी मार्गदर्शन केले.

 

       तत्पूर्वी, प्रसिद्ध खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी अंधश्रद्धेविरुद्ध सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन केले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. भोजन करतानाच अनौपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी आश्रमशाळेत मुलींसाठी बांधण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाची पाहणी व उद्घाटनही करण्यात आले.

-------------------

            जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला उद्बोधन केले. आमच्या मनातील भिती दूर केली. आम्हाला विश्वास दिला. मनावर ताबा ठेवून त्याला चांगले वळण लावल्यास आपणही मोठे अधिकारी होऊ शकतो, हा त्यांनी दिलेला संदेश आम्हाला आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत, अशा भावना शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमाची अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी कल्याणी गोपीचंद जावरकरने व्यक्त केल्या.

00000000 

परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी

 

 नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  बुधवार, दि. 8 ऑक्टोबर 2026  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

        वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी  4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

 

      एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी  9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.

 

      कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

0000000

व्यावसायिक व  बिगर  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

 

शासकीय वसतिगृह प्रवेशास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिवार्य आहे.

 

                इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील 12 वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर  येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज  आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.

००००००








पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गाव  व ग्रामीण भाग समजून घ्यावा – माहिती संचालक डॉ. गणेश मुळे

 

आयआयएमसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ. मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका) : पत्रकारितेत बातमी, फिचर,लेख, संपादन आदी बाबी अधिक चांगल्या आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव  व तेथील संस्कृती, समाजकारण अशा सर्व बाबी समजून ग्रामीण भागाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले.

 

           येथील भारतीय जनसंचार संस्थेत (आयआयएमसी) डॉ.मुळे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएमसीचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी रितेश भुयार, आयआयएमसीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, शैक्षणिक सहशिक्षण सहयोगी जयंत सोनोने आणि रोहण तायडे यावेळी उपस्थित होते.

 

             संचालक डॉ. मुळे म्हणाले, गाव हा देश व विकासाचा केंद्र  बिंदू आहे. त्यामुळे गावाचा परिसर तेथील संस्कृती, समस्या, पर्यावरण त्याला जोडून तेथील समाजकारण आणि राजकारण अशा सर्व बाबी पत्रकारितेचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. गाव व ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास केल्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश समजू शकतो व पत्रकारितेतील बातमी, फिचर, लेख, संपादन आदी विषय समजू शकतात. वाचन, मनन आणि चिंतनाच्या त्रिसुत्रीचे महत्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रभावी शासकीय जनसंपर्क, त्याची विविध साधने आणि बदलत्या काळातील जनसंपर्क त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सौदाहरण उत्तरे दिली.

 

         तत्पूर्वी, इंग्रजी पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘द पब्लिक एँगलया प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ.मुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर  जिल्हा मराठी पत्रकार संघ, श्रमीक पत्रकार संघाला भेट देवून त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.     

०००००


Tuesday, September 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.09.2026


 जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्रिलला प्रवेश परीक्षा

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये  शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईल अर्ज करता येणार असून शनिवार, 10 एप्रिल 2027 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

         इच्छुक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय समितीच्या navoday.gov.in संकेतस्थळावर‍ किंवा इयत्ता 11 वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_11 आणि इयत्ता 9वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_9 अधिकृत संकेतस्थळावर नि:शुल्क अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी -विद्यार्थीनी ही अमरावती जिल्हयातील रहिवासी व याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेतून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 10 आणि इयत्ता 8वीत क्रमश: इयत्ता 11 वी व 9वीच्या प्रवेशासाठी अध्ययनरत असणे आवश्यक आहे. 9वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2012 ते ३१ जुलै २०१४ आणि १० वी प्रवेशाकरिता १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान असावा. आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जन्म तारखेची अट सारखीच आहे.अधिक माहितीसाठी navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधता येणार आहे.   

                                                              ०००००  

  

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध करूण देण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत अमरावती शहरातील आदिवासी मुलांच्या तीन वसतिगृहांच्या मंजूर क्षमतेमध्ये वाढ झाल्याने नवीन सुसज्ज इमारतीसाठी  भाडेतत्वावर येत्या सात दिवसात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 

 

         गाडगेनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 1च्या मंजूर क्षमतेत वाढ होवून 100 विद्यार्थी झाली आहे. राठीनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 2 ची विद्यार्थी क्षमता वाढून 125 झाली आहे आणि दस्तुरनगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 3 ची क्षमता वाढून 180 झाली आहे. या तिन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या निवासासाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज इमारत भाडेतत्वाने घेणे आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास कक्ष, कार्यालय, संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, स्टोअर रूम, वैद्यकीय कक्ष, शौचालय व स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ तसेच आवश्यक फर्निचर व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.

 

             ही इमारत अमरावती शहाराच्या मध्यवर्ती व शैक्षणिक परिसराच्या जवळ असावी. इच्छुक इमारत मालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयात किंवा अमरावती येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख किंवा गृहपालास कार्यालयीन वेळेत येत्या सात दिवसात कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास धारणी कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी (वसतीगृह)  यांनी केले आहे.

                                                                 ०००००


                                                                     
7 सप्टेंबर रोजी जिल्हा लोकशाही दिन

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ‘जिल्हा लोकशाही दिना’चे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदारांना आवश्यक कागदपत्र व निवेदनांसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

0000000






विविध स्पर्धांचे आयोजन व खेळाडूंचा गौरव करत क्रीडादिन साजरा

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा, सायकल रॅली आणि खेळाडूंचा गौरव करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

 

             राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्याने ‘एक घंटा खेल के मैदान मे’ या संकल्पनेवर आधारीत विशेष क्रीडा उपक्रमाचे २८ ऑगस्‍ट रोजी  उद्घाटन करण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी येथील विभागीय क्रीडा संकुलात बॅडमिंटन,टेबल टेनिस,स्क्वॅश,आर्चरी,व्हॉलीबॉल या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. शिव छत्रपती पुरस्कारार्थी नितीन चव्हाळे ,मंगेश व्यवहारे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

         या उपक्रमांतर्गत ३० ऑगस्ट रोजी  विभागीय क्रीडा संकुल येथून ‘संडे ऑन सायकल, रन अँड राईड’ या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय खोडके आणि राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त पराग नवलकर  यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकस्वारांना रवाना केले. अमरावती सायकलींग असोसिएशनचे सायकलपटू ,खेळाडू,नागरीक, युवक-युवती या सायकल रॅलीमध्ये मोठया संख्येने सहभागी झाले.

००००००      

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026 मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

 

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026


मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)


- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)


- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)


- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)


- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

Monday, August 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.8.2026








अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बालकांच्या पालकांना 5 लाखांचा धनादेश प्रदान

 

     अमरावती, दि. 31 : जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणचा अतिदक्षता विभाग हा गरजूंसाठी महत्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

     पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मुरके हॉस्पीटल आणि जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

 

     पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी, रूग्णालयातील आपत्कालीन वेळेत नवजात शिशूंचे जीव वाचविणे ही प्राथमिकता होती. 36 बालकांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने या सर्व बालकांची प्रकृती आज ठिक झाली आहे. तसेच घटनेनंतर जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी त्याच‍ दिवशी भेट देऊन चौकशी समितीची घोषणा केली आहे. आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

     जिल्हा स्त्री रूग्णालयाला गेल्या दोन वर्षात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावर्षी या रूग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नाही. रूग्णालयातील प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीकडून छाननी केल्यानंतरच प्रस्ताव नियोजनकडे सादर केले जातात. येत्या कालावधीत अतिदक्षता कक्ष हा एम्सच्या मानकानुसार तयार करण्यात येईल. याठिकाणी जागतिक दर्जाचे उपकरणे बसविण्यात येतील. यात कोणतीही त्रृटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची करतरता भासू देणार नसल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

 

     यावेळी स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे, गंगाराम बेठेकर या पालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच खासगी रूग्णालयांनी शिशूंवर मोफत उपचार केल्याबद्दल आभार मानले.

00000












पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस; जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

 

अमरावती, दि. ३१ (जिमाका),:जिल्हा स्त्री रुग्णालयातील २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बाधित बालकांची राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) तसेच मुरके हॉस्पिटलला भेट देऊन उपचारधीन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी केली.

      पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही नवजात बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बालकांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच, उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत "राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा विश्वास दिला.

      त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेच्यावेळी जीवाची बाजी लावून नवजात बालकांना अतिदक्षता विभागातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या परिचारकांशी त्यांनी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.यावेळी रुग्णालयातील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

      या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            ००००००




 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, ‘एसआयआर’मध्ये जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार

3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली ; 22 मतदान केंद्रांची वाढ

30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती नोंदवावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

            अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीनुसार 8 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण  21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद असून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या प्रस्तावित मतदान केंद्र आणि समायोजनाअंती 2 हजार 682 वरून वाढून 2 हजार 704 झाली आहे. सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

 

            भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेचा तिसरा टप्पा  महाराष्ट्रासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशात राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही.’ या उद्दिष्ट्याने अमरावती जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ)  25 लाख 45 हजार 677 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष खातर जमा करण्यात आली आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याात आली आहे. यात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघात  11 लाख 24 हजार 83 पुरूष मतदार तर 10 लाख 68 हजार 251 महिला मतदार आणि 61 तृतीयपंथी मतदार असे एकूण 21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मय्यत मतदार वगळता जिल्ह्यातील एकही पात्र मतदार यादीमध्ये येण्यापासून वंचित राहू नये. या उद्देशाने पात्र मतदारांना गणनापत्रक बीएलओकडे जमा करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर यादी  उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेअंती 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

 

जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार

 

प्रारूप मतदार यादीमध्ये  धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात 1 लाख 38 हजार 465 पुरूष, तर 1 लाख 30 हजार 935 महिला मतदार आणि 1 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 69 हजार 401 मतदार नोंदण्यात आले आहेत. बडनेरा  विधानसभा मतदार संघात 1 लाख 56 हजार 831 पुरूष, तर 1 लाख 53 हजार 915 महिला मतदार आणि 32 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लाख 10 हजार 778 मतदार नोंदण्यात आले आहेत.

अमरावती  विधानसभा मतदार संघात 1 लाख 51 हजार 82 पुरूष, तर 1 लाख 48 हजार 504 महिला मतदार आणि 18 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 99 हजार 604 मतदार नोंदण्यात आले आहेत. तिवसा  विधानसभा मतदार संघात 1 लाख 28 हजार 93 पुरूष, तर 1 लाख 19 हजार 186 महिला मतदार असे एकूण 2 लाख 47 हजार 279 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

 दर्यापूर  विधानसभा मतदार संघात 1 लाख 42 हजार 984 पुरूष, तर 1 लाख 32 हजार 865 महिला मतदार आणि 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 75 हजार 852 मतदार नोंदण्यात आले आहेत. मेळघाट  विधानसभा मतदार संघात 1 लाख 40 हजार 610 पुरूष, तर 1 लाख 33 हजार 112 महिला मतदार आणि 7 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 73 हजार 729 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

अचलपूर  विधानसभा मतदार संघात 1 लाख 31 हजार 215 पुरूष, तर 1 लाख 22 हजार 83 महिला मतदार असे एकूण 2 लाख 53 हजार 298 मतदार नोंदण्यात आले आहेत. मोर्शी  विधानसभा मतदार संघात 1 लाख 34 हजार 803 पुरूष, तर 1 लाख 27 हजार 651 महिला मतदार असे एकूण 2 लाख 62 हजार 454 मतदार नोंदण्यात आले आहेत.

 

3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली

 

प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 1 लाख 9 हजार 307 मय्यत, आढळून नआलेले 22 हजार 357, कायम स्तलांतरीत 1 लाख 64 हजार 513 आणि 978 इतर तसेच 56 हजार 142 आधिच नोंदलेले मतदार अशा एकूण 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील 10 हजार 681 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 495, कायम स्तलांतरीत 23 हजार 694 आणि 84 इतर तसेच 4 हजार 483 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 40 हजार 437 मतदार वगळण्यात आले आहेत. बडनेरा  विधानसभा मतदार संघातील 23 हजार 667 मय्यत, आढळून नआलेले 3 हजार 523, कायम स्तलांतरीत 25 हजार 983 आणि 264 इतर तसेच 10 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 63 हजार 768 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

अमरावती विधानसभा मतदार संघातील 18 हजार 920 मय्यत, आढळून नआलेले 9 हजार 249, कायम स्तलांतरीत 30 हजार 515 आणि 136 इतर तसेच 16 हजार 976 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 75 हजार 796 मतदार वगळण्यात आले आहेत. तिवसा विधानसभा मतदार संघातील 14 हजार 780 मय्यत, आढळून नआलेले 2 हजार 64, कायम स्तलांतरीत 23 हजार 732 आणि 87 इतर तसेच 7 हजार 659 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 48 हजार 322 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

दर्यापूर विधानसभा मतदार संघातील 8 हजार 688 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 175, कायम स्तलांतरीत 17 हजार 865 आणि 117 इतर तसेच 2 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 30 हजार 176 मतदार वगळण्यात आले आहेत. मेळघाट विधानसभा मतदार संघातील 13 हजार 286 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 805, कायम स्तलांतरीत 12 हजार 455 आणि 127 इतर तसेच 6 हजार 350 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 23 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

अचलपूर विधानसभा मतदार संघातील 10 हजार 210 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 462, कायम स्तलांतरीत 18 हजार 867 आणि 57 इतर तसेच 3 हजार 690 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 286 मतदार वगळण्यात आले आहेत. मोर्शी विधानसभा मतदार संघातील 9 हजार 75 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 584, कायम स्तलांतरीत 11 हजार 402 आणि 106 इतर तसेच 4 हजार 322 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 26 हजार 489 मतदार वगळण्यात आले आहेत.

 

 

 

जिल्ह्यात 22 मतदान केंद्रांची वाढ

 

 

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नवीन प्रस्तावित मतदान केंद्र व समायोजन मतदान केंद्र याद्वारे मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात आले आहे. यानुसार अस्तित्वात असलेल्या 2 हजार 682 मतदान केंद्रांची संख्या वाढून 2 हजार 704 झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 345 वरून वाढून 354 झाली आहे. अमरावती  विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 322 वरून वाढून 328 झाली आहे. मेळघाट विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 356 वरून वाढून 363 झाली आहे.

 

 

30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती नोंदवण्याचे आवाहन

 

अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. 1 आक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी फॉर्म क्रं. 6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

आज ‘डाक अदालत

 

सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार

 

       अमरावती, दि.31 (जिमाका) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात  सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

       सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील ,तक्रारीची  तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा.  वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.

00000000

ग्रामीण भागात  कलम 37 (1) (3) लागू

 

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 1 सप्टेंबर 2026 ते  15 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे  यांनी कळविले आहे.

0000000

DIO NEWS AMRAVATI 02.09.2026

                            सुधारित बातमी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम   आदिवासी समुदाय लढवैय्याच, अंद...