Monday, July 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27.07.2026



 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहात

अमरावती, दि. 27 : सेंट्रल बँक ऑफ इंडियााच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै रोजी 'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यपालक संचालक ई. रतनकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पुणे अंचल प्रमुख अजयकुमार सिंह, वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय, एमएसएमई-डीआय संचालक विजय सिरसाठ, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाळे, युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रमोद परहाते, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रमुख महेश डांगे, बँक ऑफ इंडियाचे अंचल प्रमुख निर्मेश जी., खादी व ग्रामोद्योग मंडळाचे प्रदीप चेचरे उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महत्त्व, पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये या योजनेची भूमिका, तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधांविषयी मार्गदर्शन केले. तसेच नुक्कड नाटकाच्या माध्यमातून योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधी, पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. लोन उत्सवादरम्यान 356 लाभार्थ्यांना साडेतीन कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले.

वरिष्ठ क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांनी प्रास्ताविक केले. निलेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

00000

 

 

 




 

 

 

 

 

 

टिटंबा आश्रमशाळा विषबाधा प्रकरणात मंत्री डॉ. अशोक उईके

यांचा मोठा निर्णय

कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, काही दिवस सेंट्रल किचन बंद ठेवणार

अमरावती, दि. २७ : टिटंबा, ता. धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दखल घेततली. त्यांनी तातडीने धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली.

शनिवारी टिटंबा आश्रम शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तातडीने धारणी येथे भेट देत उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पालकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यानंतर मंत्री डॉ. उईके यांनी थेट टिटंबा आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. विद्यार्थी, पालक, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सविस्तर बैठक घेतली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत टिटंबा आश्रमशाळेसाठी सेंट्रल किचनमधून पुरविले जाणारे भोजन तात्काळ बंद करण्याचा निर्णयही मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दोषी अधिकारी, कर्मचारी अथवा संबंधित संस्थेला कोणीही पाठीशी घालणार नाही. चौकशी अहवालानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सेंट्रल किचन व्यवस्था बंद करणे, दोषींवर गुन्हे दाखल करणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. चर्चेनंतर मंत्री डॉ. उईके यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आणि लेखी आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थी, पालक व आदिवासी संघटनांनी सुरू असलेले आंदोलन मागे घेत मंत्री डॉ. उईके यांचे आभार मानले.

या संपूर्ण प्रकरणात मंत्री डॉ. उईके यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळत विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश मिळाल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

00000

 

 

 

‘पीएम यशस्वीशिष्यवृत्ती योजनेसाठी

31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि.27 (जिमाका) : ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना अकरावीपर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोर्टलवर 'New Registration' करावे. मिळालेला Application ID व पासवर्ड वापरून 'Fresh Login (AY २०२६-27)' अंतर्गत अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याचा तपशील भरून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, गुणपत्रक, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे पीडीएफ, जेपीजीई स्वरूपात अपलोड करावीत. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी. एकदा 'Final Submit' केल्यावर अर्जात बदल करता येत नाही.

अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट काढून शाळेत संपर्क साधावा, जेणेकरून शाळेचे 'Institute Nodal Officer' तो अर्ज ऑनलाईन पडताळू शकतील. वेळापत्रकानुसार विद्यार्थी अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत खुली असली, तरी शाळास्तरावरील पडताळणी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आणि जिल्हा, राज्यस्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना मोबाईल व ईमेल सक्रिय असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो. याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

00000000


नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 27 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या 'माय भारत' उपक्रमांतर्गत 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता विद्याभारती महाविद्यालयात होणार आहे.
या अभियानाचा उद्देश युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणे, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि 'विकसित भारत' उभारणीत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविणे आहे.

स्पर्धांमध्ये सामूहिक लोकगीत, सामूहिक नृत्य, पथनाट्य, चित्रकला, लघुपट, रील निर्मिती, घोषवाक्य लेखन, मौखिक काव्य सादरीकरण आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांचे विषय व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली आणि विकसित भारताशी संबंधित असतील. जिल्हास्तरीय स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अधिक माहितीसाठी माय भारत, अमरावती जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'माय भारत'चे जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.

00000

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मुलाखत..


 ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ मध्ये शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मुलाखत

राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना नवी उमेद देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती देणारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत दि. २७ व २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून; तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये ही विशेष मुलाखत मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे; तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होईल. या मुलाखतीचे निवेदन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले आहे.

कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा ! पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होईल.


कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा ! पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होईल. #शेतकरीकर्जमुक्ती #AgriStack #FarmerID

 

Sunday, July 26, 2026

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#राज्यसरकार

Saturday, July 25, 2026

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६#कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

DIO NEWS AMRAVATI 25.07.2026
















                             मेळघाटातील कुपोषण नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करणार

-महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

अमरावती, दि. 25 (जिमाका) : मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपयोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख,महिला बालविकास उपायुक्त विलास मसराळे आदी उपस्थित होते.

श्रीमती तटकरे म्हणाला, मेळघाटात काही प्रमाणात बालविवाहाची समस्या आहे. त्यामुळे कमी वयात मातृत्व येत असल्याने कुपोषित बालके जन्माला येण्याची शक्यता असते. यावर उपाययोजना म्हणून बालविवाहासोबतच मातांना पोषक आहार मार्गदर्शनासाठी महिला सेविकेची निवड करून तिला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सेविकेमार्फत आदिवासींना समजेल अशा भाषेत आरोग्यविषयक माहिती देण्यात येणार आहे. तसेच बाळ जन्माला आल्यानंतर 1 हजार दिवसांच्या आहाराचे नियोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपाययोजनांमुळे कुपोषित बालके जन्माला येण्यापासून बचाव होणार आहे.

मेळघाटातील अंगणवाडी स्मार्ट करण्यासाठी विजेच्या सोयीसाठी सोलार, स्वच्छतागृह आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी गरोदर मातांना देण्यात येणारा आहार त्यांनी त्याच ठिकाणी घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दर्जेदार आहार मिळण्यासाठी आहार समिती सक्रिय करावी. यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश करावा. जिल्हा नियोजनच्या निधीमधून अंगणवाडी बांधकामासाठी मिळणारा निधी एक वर्षाच्या आत खर्च करावा. खर्च करणे शक्य नसल्यास बांधकाम विभागाला एजन्सी म्हणून नेमून कामे तातडीने पूर्ण करावीत.

आदिवासींच्या मनात आरोग्य यंत्रणेबद्दल गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतींमध्ये नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे आदिवासींना सिजरची असणारे भीती कमी होण्यास मदत होईल. महिला आणि आदिवासींकरिता असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेमधून देण्यात यावी. महिलादिनी होणाऱ्या ग्रामसभेत प्रामुख्याने महिलांच्या योजना सांगण्यात याव्यात.

मेळघाटातील कुपोषणाच्या बाबतीत मध्यम तीव्र कुपोषण आणि गंभीर तीव्र कुपोषण हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. मध्यम तीव्र कुपोषण जरी कमी असला तरी यात सुधारणा करण्यात यावी. गंभीर तीव्र कुपोषणची आकडेवारी 100 च्या आत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आजच्या दौऱ्यादरम्यान श्रीमती तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट, कळमखार, लवादा आणि चित्री येथे अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. तसेच बालके आणि आदिवासी समूहाशी संवाद साधला.

0000000

Friday, July 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24.07.2026

 




मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या शनिवार, दि. 25 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, श्रीमती तटकरे ह्या दि. 25 जुलै रोजी भोकरबर्डी, धुळघाट रोड व कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन बालकांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधतील. तसेच स्थानिक आदिवासी महिला बचत गटांच्या महिलांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजता धारणी येथील एनआरसी केंद्रास भेट देऊन कामकाजाची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता धारणी शासकीय विश्रामगृहात कुपोषण, बालमृत्यू आणि विविध स्थानिक समस्या व उपाययोजनांबाबत प्रशासकीय बैठक घेतील. तसेच लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिल्यानंतर सायंकाळी त्या परतवाडामार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील. रात्री अमरावती शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.

रविवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता समृद्धी महामार्गाने वाशीमकडे प्रयाण करतील.

0000000





एमएफआयएनतर्फे आर्थिक साक्षरता, फसवणूक जनजागृती कार्यक्रम

अमरावती, दि. 24 (जिमाका) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या मायक्रोफायनान्स इंडस्ट्री नेटवर्क या राष्ट्रीय स्वयं-नियामक संस्थेच्या वतीने अंबा मंगलम येथे आर्थिक साक्षरता व जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिला कर्जदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

उद्घाटनाला आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वागणे, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पांचाळ, अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, आरसेटी संचालक निखिल भस्मे, निवृत्त पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे, एमएफआयएन प्रादेशिक प्रमुख देवेंद्र शहापूरकर उपस्थित होते.

श्री. वागणे यांनी वाढत्या सायबर व आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोबाईल, आधार, पॅन किंवा ओटीपीची माहिती कोणाशीही शेअर करू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर किंवा एमएफआयएनच्या टोल-फ्री क्रमांक १८००-१०२-१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन केले.

श्रीमती पांचाळ यांनी कर्ज घेण्यापूर्वी कुटुंबाचे उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन नियोजन करावे. कर्जमाफीच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवल्यास क्रेडिट स्कोअर खराब होऊन भविष्यात कर्ज मिळणे कठीण होत असल्याचे सांगितले.

श्री. हेडाऊ यांनी दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यात मायक्रोफायनान्स संस्थांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले. श्री. भस्मे यांनी वेळेवर कर्ज परतफेडीचे महत्त्व सांगून त्यांनी एमएफआयएनने असे उपक्रम तालुका व ब्लॉक स्तरावरही राबवावेत, अशी सूचना केली. श्री. कोल्हे यांनी मोबाईलच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले.

श्री. शहापूरकर यांनी अनधिकृत घटकांकडून पसरवल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीला आळा घालण्यासाठी भविष्यात मेळघाट आणि चिखलदरा भागातही जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. सदर उपक्रम ॲक्सिस बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., मुथूट मायक्रोफिन, सतीन क्रेडिटकेअर, स्पंदना स्फूर्ती आणि स्वतंत्र मायक्रोफिन यांच्या सहकार्याने पार पडला.

0000000




राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या वर्धापनदिनानिमित्त

रोजगार मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 24 (जिमाका) : केंद्र शासनाच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलच्या 11व्या वर्धापनदिनानिमित्त रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या 6 उद्योजक प्रतिनिधींनी उपस्थित राहून नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यात 128 उमेदवार सहभागी झाले होते. मेळाव्यात क्रेडीट अॅक्सेस ग्रामीण लिमिटेड, प्रेसीजन मॅपिंग जीआयएस, क्वेस कॉर्पोरेशन, ईसीई एनर्जीज, स्वॅगी, आणि जाधव गिअर्स लिमिटेड या कंपन्यांनी सहभाग नोंदवून तरुणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

कार्यक्रमादरम्यान जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. तसेच कौशल्य विकास अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शासकीय उपक्रमांतील उपलब्ध संधीचा लाभ घेऊन करिअर घडवण्याचे आवाहन केले.

वैभव तेटू यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यासाठी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव, यंग प्रोफेशनल क्रपा अरगुलेवार, दिलीप तांभारे, प्रथमेश सोहाळे आणि जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांनी पुढाकार घेतला.

रोजगार आणि कौशल्याशी संबंधित अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ncs.gov.in आणि mahaswayam.in या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000000

DIO NEWS AMRAVATI 27.07.2026

  'पीएम विश्वकर्मा लोन उत्सव' उत्साहात अमरावती, दि. 27 : सेंट्रल बँक ऑफ इंडियााच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवार, दि. 24 जुलै र...