Tuesday, August 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04.08.2026

 शेतकऱ्यांना युरोप, चीन दौऱ्याची संधी

*२० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 4 : कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांतील शेतीविषयक प्रगत तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पातळीवर शेती क्षेत्रात होत असलेले बदल आणि नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या दौऱ्यात परदेशातील कृषी शास्त्रज्ञ व तेथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, शेतीविषयक विविध संस्था आणि आधुनिक शेतांना प्रत्यक्ष भेटी देणे, परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपल्या उत्पन्नात कशी वाढ करू शकतात, याचे प्रात्यक्षिक व ज्ञान मिळवणे या बाबींचा समावेश राहणार आहे.

 

परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी लाभार्थी स्वतः शेतकरी असावा. अ‍ॅग्रीस्टॅक शेतकऱ्याकडे 'फार्मर आयडी' असणे आवश्यक आहे. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असावे, याबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबामधून केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. सहलीच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे आणि शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. शेतकरी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी अथवा खाजगी संस्थेत नोकरीला नसावा. अर्जासोबत ओळखपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

 

याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

 

 

१० ऑगस्ट रोजी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा’

अमरावती, दि.४ :  संत गाडगेबाबा शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) एनएसएस हॉलमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व आयटीआयच्या विद्यार्थ्यांकरिता  ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

        जिल्ह्यातील सर्व आयटीआय मध्ये फिटर,टर्नर,इलेक्ट्रेशियन,मॅकनिस्ट,टूल डाय मेकर, मशीन मोटर व्हेईकल, डिझेल मशीन, इलेक्ट्रेशियन, वेल्डर (गॅस/इलेक्ट्रीक),ड्रेस-मेकिंग, सुईंग –टेक्नॉलॉजी,फॅशन टेक्नॉलॉजी या विषयांत उत्तीर्ण व अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच पदवी व पदविका धारक (मेकॅनिकल) उमेदवारांसाठी या राष्ट्रीय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांमार्फत शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.उमेदवारांनी या भरती मेळाव्यासाठी येताना सोबत बायोडेटा आणि आवश्यक कागदपत्रांच्या छायापत्री आणणे आवश्यक आहे.

सर्व इच्छूक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र , संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी केले आहे. 

                                               ०००००

 

जिल्हा कौशल्य विकास विभागाच्यावतीने ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेचे आयोजन

पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि.४ :  जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली असून पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इंडिया स्किल्स स्पर्धेच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्‍य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.

                                   स्पर्धेत सहभागासाठी अशी आहे पात्रता

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा (काही विशेष तांत्रिक कौशल्यांच्या गटासाठी जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.). शैक्षणिक पात्रतेत आयटीआय ,डिल्पोमा, पदवीचे विद्यार्थी किंवा कोणत्याही क्षेत्रातील तंत्रकुशल तरुण पात्र ठरतील. उमेदवार हा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी किंवा महाराष्ट्रात शिक्षण अथवा नोकरी करणारा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.

                                   येथे करता येईल नोंदणी

पात्र उमेदवारांना शासनाच्या www.skillindiadigital.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ७६२०५६०१२५ किंवा ७०२०९५८२३१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

                               ०००००

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव  अभियान’ ;

‘जागतिक स्तनपान सप्ताहा’निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि.४ : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने १ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध उपक्रमांद्वारे  जिल्ह्यात ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.

 आईच्या दुधातूनच जन्मानंतर पहिल्या एका तासात बालकास स्तनपान सुरु करणे तसेच जन्मापासून पहिल्या महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध देणे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते. आईच्या दुधामुळे बालकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते, आजारांपासून संरक्षण होते , मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ ही यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना आहे. यानुसार  स्तनपानाच्या माध्यमातून  नवजात बालकास आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळावी तसेच ९ ते ५९ महिन्यापर्यंतच्या बालकांना ‘अ’ जीवनसत्व पुरक आहार देण्याबाबतही  जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.   

                                    जिल्ह्यात विविध उपक्रम

जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. प्रवीण परिसे यांच्या मार्गदर्शन  आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पराग राठोड यांच्या नियोजनात  जागति‍क स्तनपान सप्ताहानिमित्ताने जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र ,आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच गाव पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पुनश्चर्या प्रशिक्षण,गर्भवती व स्तनदा मातांसाठी समुपदेशन विषयक कार्यशाळा, माता-पालक बैठका, शालेय स्तरावरील प्रश्नमंजुषा,निबंध व चित्रकला स्पर्धा  तसेच स्नपानास पोषक वातावरण निर्मितीस पोषक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच महिला व बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांमाध्यमातून गृहभेटी ,नियमित लसीकरण सत्रे,व्हिलेज हेल्थ, गावतापळीवरील समुपदेशनाद्वारे स्तनपान,शिशुपोषण,पूरक आहार,स्वच्छता आणि माता-बाल आरोग्या विषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व गर्भवती महिला, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबियांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

                                 ०००००

 


विशेष सखोल पुनरीक्षणाला सहकार्य करावे

*राजकीय पक्षांना आवाहन

 

 

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अद्यापपर्यंत 3 लाख 95 हजार मतदारांनी आवश्यक असलेला फॉर्म भरून दिलेला नाही. परीणामी मतदारयादीतून हे मतदार वगळले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार शोधून त्यांच्याकडून फॉर्म जमा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शिबीरे आयोजित करण्यात आली. बीएलओंकडून स्वगणना करण्यासाठी अर्ज वितरीत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही 3 लाख 95 हजार मतदारांनी हे फॉर्म भरून दिलेले नाही. फॉर्म भरून परत देण्याची मुदत 8 ऑगस्ट आहे. तोपर्यंत फॉर्म भरून दिले नसल्यास मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीमधून वगळले जाणार आहे. प्रारूप मतदारयादीवर आक्षेप घेतला येणार आहे, तसेच मतदारयादीमध्ये नावे समाविष्ठ करण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

 

प्रामुख्याने मतदार मयत, स्थलांतरण किंवा इतर कारणामुळे संबंधित भागात आढळून येत नाही. त्यामुळे त्यांची नावे वगळली जाणार आहेत. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदारयादीमध्ये नाव नसल्यास मतदारांनी नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करावी. यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

00000

सव्वा लाख शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर पहिल्या टप्प्यात 76 हजार शेतकरी पात्र आधार प्रमाणीकरण प्रक्रिया

 


सव्वा लाख शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर पहिल्या टप्प्यात 76 हजार शेतकरी पात्र आधार प्रमाणीकरण प्रक्रिया
दि.04-08-2026

तफावतीची रक्कम बँकाच भरणार कर्जमाफी योजनेबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्पष्टीकरण


 तफावतीची रक्कम बँकाच भरणार कर्जमाफी योजनेबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्पष्टीकरण

दि.04-08-2026

#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#maharashtra

आधार प्रमाणीकरण केल्यावरच मिळणार लाभ जिल्हाधिकारी यांची पत्रपरिषदेत माहिती



आधार प्रमाणीकरण केल्यावरच मिळणार लाभ
जिल्हाधिकारी यांची पत्रपरिषदेत माहिती
दि.04-08-2026

#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#maharashtra

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.


 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare

Saturday, August 1, 2026

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश



शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी 
दै. दिव्य मराठी

#शेतकरीकर्जमुक्ती 
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#Maharashtra

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी 
दै. दिव्य मराठी

#शेतकरीकर्जमुक्ती 
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#शेतकरी
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#Maharashtra

DIO NEWS AMRAVATI 04.08.2026

  शेतकऱ्यांना युरोप, चीन दौऱ्याची संधी *२० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन   अमरावती, दि. 4 : कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२६-२७ साठ...