Thursday, August 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27.8.2026


                        शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अक्षय ऊर्जा दिन’ उत्साहात साजरा

 

अक्षय ऊर्जा संदेशासाठी विविध स्पर्धा, जनजागृती रॅली व ऊर्जा संवर्धनाची शपथ

 

अमरावती, दि. 27 (जिमाका)  : विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेचे महत्त्व, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाबाबत जागृती निर्माणकरण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (इएसए) आणि विद्युत अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात ‘अक्षय ऊर्जा दिन’ साजरा  झाला.

 

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, लघुचित्रफीत निर्मिती स्पर्धा आणि पोस्टर निर्मिती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर आपले ज्ञान, कल्पकता व सर्जनशीलता सादर केली. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रवीण कुमार वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाढती ऊर्जेची गरज, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण, अक्षय ऊर्जेची भविष्यातील भूमिका तसेच या क्षेत्रातील रोजगार, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेच्या विविध संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले, विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. जपे, प्राध्यापक समन्वयक डॉ. पी. पी. बेडेकर आदी  यावेळी उपस्थित होते.

 

महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देत अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली तसेच विविध विभागांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स लावून ऊर्जा बचतीचा आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराचा संदेश दिला.

000000

1 सप्टेंबर रोजी ‘डाक अदालत’

 

 

सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार

 

ख्‍

अमरावती, दि.27 (जिमाका) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात  सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील, तक्रारीची  तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा. प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती-444602 या पत्त्यावर 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज पाठविण्यात यावे. वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.

000000








दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार

        -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

 

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.

 

श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

 

यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली.

00000000

Maharashtra's monsoon is waiting to be captured.







Maharashtra's monsoon is waiting to be captured.

From misty hilltops and roaring waterfalls to timeless heritage, vibrant culture, incredible wildlife, and serene spiritual destinations, every moment has a story worth sharing. Now it's your turn to bring those stories to life. Participate in #CaptureMahaMonsoon, showcase your creativity, win exciting cash prizes, and get featured by Maharashtra Tourism.

Categories: Photography & Reel Making

The registration link is in our bio.

Let your lens celebrate the colours, beauty, and spirit of Maharashtra this monsoon.

महाराष्ट्रातील पावसाळ्याची जादू तुमच्या कॅमेऱ्यात टिपण्याची वेळ आली आहे!

धुक्याने नटलेले डोंगर, खळाळणारे धबधबे, ऐतिहासिक वारसास्थळे, समृद्ध संस्कृती, अद्भुत वन्यजीव आणि शांत व मन प्रसन्न करणारी पवित्र मंदिरे, प्रत्येक ठिकाण एक सुंदर कथा सांगते.

आता त्या कथा तुमच्या नजरेतून जगासमोर आणण्याची संधी तुमची आहे! #Capture MahaMonsoon स्पर्धेत सहभागी व्हा, तुमचं कौशल्य सादर करा, आकर्षक रोख पारितोषिके जिंका आणि महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडियावर झळकण्याची संधी मिळवा.

स्पर्धेच्या श्रेणीः छायाचित्रण (Photography) आणि रील मेकिंग (Reel Making)

नोंदणीसाठी क्यू आर कोड स्कॅन करा.

या पावसाळ्यात तुमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून महाराष्ट्राचे रंग, सौंदर्य आणि संस्कृती जगासमोर आणा !


 

Tuesday, August 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.8.2026

                        मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या लाभासाठी सोमठाना खुर्दच्या

लाभार्थ्यांना मोबदल्यासाठी आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाना खुर्द येथील 42 शेतमुल्यांकनधारक, 21 वनहक्कधारक आणि 112 घरमुल्यांकनधारकांकरिता निधी उपलब्ध झाला असून काही लाभार्थ्यांना मोबदला रक्कम वितरीत करण्यात आली आहे. आवश्यक दस्तऐवजा अभावी उर्वरित लाभार्थ्यांना मुल्यांकन रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे, अशा लाभार्थ्यांना अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे तातडीने दस्तऐवज सादर करण्याचे आवाहन, अकोट वन्यजीव विभागाचे  उपवनसंरक्षक आर.एस.टोलिया यांनी केले आहे.

 

            वर्ष 2012 च्या शासन निर्णयानुसार सोमठाना खुर्द या गावाचे वर्ष 2013-14 मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावातील  शेतमुल्यांकनधारक आणि वनहक्कधारकांना मुल्यांकनाची 4 पट रक्कम देय असून यातील 1 पट मुल्यांकन रक्कम व त्यावरील 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरीत मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु काही शेतमुल्यांकनधारक, वनहक्कधारक आणि  घरमुल्यांकनधारकांनी आवश्यक दस्तऐवज सादर नकेल्याने त्यांना मोबदला अदा करण्यात अडचण येत आहे. या सर्व शेतमुल्यांकनधारक आणि वनमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,शेतीचा 7/12 आणि शेतमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तसेच घरमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,नमुना 8, घरमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तातडीने अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमठाना खुर्द येथील लाभार्थ्यांची नाव निहाय यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

सण-उत्सव काळात ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य गाणे

वाजविण्यासंदर्भात मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): ईद-ए-मिलाद, कावड यात्रा, श्रीकृष्ण जन्माष्टमी,दहिहांडी,पोळा,गणपती उत्सव कालावधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चिन्हीत व आक्षेपार्ह गाणे व भडकाऊ भाषणांच्या क्लिप्स वाजविण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0000000

 

ग्रामीण भागासाठी सोशल मिडीयावर आक्षेपाहार्य पोस्ट

प्रसारीत करण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  सण-उत्सवादरम्यान विविध सोशल मिडीयावरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.  24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.         

                                                                   000000


ग्रामीण भागासाठी सण-उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): येत्या काळात विविध धर्मीय सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक  शांतता, पर्यावरण व  सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यास डॉल्बी सिस्टीम मालक व चालकांसाठी अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

000000

कृषी पर्यटन केंद्र संचालकांची "मामाचं वावर" येथे

एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): पर्यटन संचालनालय प्रादेशिक, अमरावती अंतर्गत अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी "मामाचं वावर" कृषी पर्यटन केंद्र, मौजे वळती, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेले कृषी पर्यटन केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, शाश्वत विकास केंद्र (अमरावती) चे गणेश चौधरी, कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष लहू अवताडे आणि कॅनव्हास फाउंडेशन, द चॅरिटेबल ट्रस्ट (अमरावती) चे आशिष शेरेकर उपस्थित होते.

 

या कार्यशाळेत उपसंचालक विजय जाधव यांनी महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024 अंतर्गत कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, प्रोत्साहन, होमस्टे, पर्यटन व्हिला, व्हॅकेशन होम अशा अधिकृत नोंदणी प्रक्रिया आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात ए.आय चा वापर कसा करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला. गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकासाची कास कशी धरावी आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबद्दल तांत्रिक व व्यावहारिक माहिती दिली.

 

अध्यक्ष लहू अवताडे यांनी राज्यातील कृषी पर्यटनासमोरील आव्हाने, संचालकांचे संघटन आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, यावर आपले अनुभव अभ्यासपूर्ण रितीने मांडले. तसेच शाळेच्या सहली व शासनाच्या विविध विभागांशी कसा समन्वय साधता येईल यावर मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी अमरावती विभागातील विजय श्रीराव (महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरुड), सुनील वारे (वनश्री कृषी पर्यटन केंद्र, उदखेड) तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील मातोश्री कृषी पर्यटन केंद्र (अंबड) आणि श्री गोकुळ कृषी पर्यटन केंद्र (जालना) येथील संचालकांनी आपले अनुभव सांगितले.

 

या एक दिवसीय कार्यशाळेमुळे अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांना केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन नियमावली समजून घेण्यास व नवनवीन संकल्पना राबवण्यास मोठी दिशा मिळाली आहे. "मामाचं वावर" चे संचालक मोहन तेजराव जगताप यांच्या सहकार्याने सर्व संचालकांनी निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'पर्यटन मित्र' शिवाजी गायकवाड यांनी केले, तर प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे उपलेखापाल राजेश मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0000000

गुणनियंत्रण विश्लेषणात जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे 189 नमुने अप्रमाणित

बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरोध जिल्ह्यातून 2 हजारांवर तक्रारी;

 

कंपनी विरोधात एफआयआर दाखल

 

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : सोयाबीन बियाण्यांच्या विश्लेषणासाठी जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून 17 ऑगस्ट पर्यंत यातील 189 नमुने अप्रमाणित आढले आहेत. यासंदर्भात बियाणे उत्पादक कंपनीवर कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांची दखल घेण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या एकूण 3 हजार 157 प्राप्त तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

            विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच कंपन्यांवर कार्यवाही करण्याविषयी वृत्तपत्रांमध्ये विविध वृत्त प्रसारित झाले होते. याची कृषी विभागाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्यांचे वितरकनिहाय,वाणनिहाय,लॉट निहाय माहिती आदी सादर करण्याचे आदेश बियाणे उत्पादक कंपन्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची पाहणी विहित वेळेत होण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या. या समित्यांमार्फत प्रातिनिधिक स्वरुपात कंपनीनिहाय आणि लॉटनिहाय तक्रारींची पाहणी सुरु असून उर्वरीत तक्रारींची पाहणी उपसमित्यांद्वारे करण्यात येत आहे. 17 ऑगस्ट पर्यंत  घेतलेल्या जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून यातील 196 नमुने प्रमाणित तर 189 नमुने अप्रमाणि आढले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्यांवर बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

            एकूण प्राप्त झालेल्या 3 हजार 157 तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या  गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑॅगस्ट 2026 रोजी कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी व इतर कंपनींविरुद्ध एकूण 41 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध 10 गुन्हे तर ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीवर 5, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीवर ५, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 2, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक 1, रवि सिड्स ७, एस. के. बी सिड्स 2, ग्रिन ॲग्री रिव्होल्युशन 2, व्हिगर बायोटेक 2, अंकुर सिंड्स 2, ईगल सिड्स 1, श्री. ओसवाल सिड्स 1 आणि उत्तम सिड्सवर 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागाकडून तपास सुरु आहे.

 

             सोयाबीन बियाण्यांच्या तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 17 ऑगस्‍ट 2026 पर्यंत ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीच्या 273, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीच्या 119, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 103, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक कंपनीच्या 671, रवि सिड्स कंपनीच्या 182, एस. के. बी सिड्सच्या 45 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कंपन्यांचे बियाणे विक्री  परवान्यांवर  बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव निविष्ठा व गुण नियंत्रक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.

0000000

खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत ;

 

34 हजार 462 मेट्रीक टन युरीयाचा पुरवठा खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार नाही

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत झाला असून 12 ऑगस्ट 2026 पर्यंत 34 हजार 462 मेट्रीकटन (मे.ट.) युरिया, 10 हजार 270 मे. ट. डिएपी, 5 हजार 374 मे.ट. एमओपी, 45 हजार 799 मे.ट. संयुक्त खते आणि 20 हजार 526 मे. ट. एसएसपी खतांचा पुरवठा झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून युरीया  व  डिएपी खतांच्या तुटवडयाबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांबाबत  अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. खरीप हंगामात खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात आजपर्यंत कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

            जिल्ह्यात एप्रिल महिन्यात खतांच्या रॅक लागण्यास विलंब झाला मात्र लवकरच पुरवठा सुरळीत करण्यात आला. रासायणीक खतांच्या किमंतीत कोणतीही वाढ झाली नाही. विशेषत: केंद्र  शासन युरीयाच्या किंमती नियंत्रीत करीत असल्याने त्याच्या किंमतीत दरवाढ झालेली नाही. तसेच डिएपीच्या किमंतीत वाढ नाही. फोस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या बाबतीत केंद्र शासनाचे पोषणतत्व आधारीत अनुदान लागू असल्याने किंमतीत वाढ झाली नाही. संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सर्व रासायणीक खतांच्या किंमतीत सरसकट प्रति बॅग 125 ते 300 रुपयांनी वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

  खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्‍ठा रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा स्तरीय भरारी पथक स्थापन करुन कृषी सेवा केंद्रांची नियमीत तपासणी करण्यात आली. लिंकींग व तत्सम तक्रारींबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार निवारणासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये क्यु.आर.कोड आणि बियाणे,खते व किटकनाशक संदर्भातील तक्रारींकरिता व्हाट्सॲप लावण्यात आला.

 

https://adozpamravati.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-O-padding.html  ब्लॉगवर जिल्ह्यातील कृषी केंद्र निहाय उपलब्ध खत साठा बघण्याची सोय करून देण्यात आली.  

             

0000000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय भारत केंद्राकडून  विविध उपक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  माय भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

       पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1600 ठिकाणी सहभागी होणाऱ्या आठ लाखांहून अधिक युवकांना आभाशी माध्यमातून संबोधन करणार आहे. याद्वारे देशभरातील युवक आभासी माध्यमातून एकत्र जुळणार आहेत. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर येथील पोटे पाटील महाविद्यालय आणि बियाणी महाविद्यालयात प्रवेश सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत युवक संवाद व विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

 

        माय भारत स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष युवा संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासात झालेल्या परिवर्तनावर चर्चा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्र, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

      जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.

00000000



मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार

 

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.

 

रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

00000000

Monday, August 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24.8.2026








                        जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

*आठ दिवसात ही समिती अहवाल देईल

*दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 3 नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली.

 

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दुर्घटना घडलेल्या एनआयसीयूला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुलभा खोडके, महापौर श्री. चंद तेजवानी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

 

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आहे. यातून घटनेची भीषणता दिसून आली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दोन वर्षांपूर्वीच हे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे संपूर्ण अद्ययावत सोयीसुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडायलाच नको होती. या घटनेचे नेमके कारण शोधून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. येत्या आठ दिवसात घटनेचा सखोल तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

 

ही समिती समस्येच्या खोलवर जाऊन कारणे शोधणार आहे. व्हेंटिलेटर, वीज यंत्रणेतील दोष, फायर ऑडिट, तसेच अन्य अनियमितता यांची सखोल तपासणी करेल. या दुर्दैवी घटनेतून यंत्रणेलाही शिकावे लागेल. ज्या त्रुट्या आढळून येतील त्या दुरुस्त करण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करेल. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना शासनातर्फे पाच लाख रूपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच जखमी बालकांवर उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल. आजच्या घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट नियमानुसार व नियमीत होण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येईल. तसेच आवश्यक सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या दुर्घटनेतील नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

00000000



संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;

लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

 

अमरावती, दि.24 (जिमाका) : संजय गांधी  निराधार योजना व  श्रावणबाळ  योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अर्थात हयात प्रमाणपत्र (डिएलसी) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमरावती तहसील कार्यालयाने 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विशेष शिबिर आयोजित  केले आहे. सर्व लाभार्थ्यांना विना विलंब हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने  बेनिफीशरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून   हयात  डिजीटल लाईफ सर्टिफीकेट (डिएलसी) काढून आपण हयात असल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा शासकीय लाभ  सुरु राहील. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती शहर संजय गांधी तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर  आयोजित करण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी विना विलंब हे प्रमाणपत्र काढावे असे तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

लाभार्थी  मोबाईलवर संबंधित अ‍ॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

00000000

DIO NEWS AMRAVATI 27.8.2026

                         शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अक्षय ऊर्जा दिन’ उत्साहात साजरा   अक्षय ऊर्जा संदेशासाठी विविध स्पर्धा, जनजागृती...