भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : आज उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात
अमरावती विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 16 (जिमाका) : अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय टास्क फोर्स गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती विभाग दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात प्रत्यक्ष तसेच ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यापूर्वीच मागविण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
०००००
गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान
आजपासून अमरावती जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात
अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अमरावती आजपासून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ करीत आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, या प्रमुख उद्देशाने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात अमरावती शहरातील बुधवारा येथील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून होत आहे. या मंडळात 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अमरावती यांच्या तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना आदीबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.
000000
सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 16 (जिमाका): नागरिकांच्या सोयीसाठी आणि गरजूंना लाभ देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे अभियान एक महिनाभर राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, अशा योजना या अभियानात राबविण्यात यावा, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यात प्रामुख्याने वन हक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम धारणी आणि चिखलदरा तालुक्यात प्राधान्याने राबविण्याचे निर्देश दिले. दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक गावात सभा घेऊन वनपट्टे वाटप निश्चित करावे. त्यानंतर दि. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाई करावी. ग्रामसभा, उपविभाग आणि जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन या अभियानात पट्टेवाटप अंतिम करण्यात यावे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला सात ई आणि बारा ईबाबत कार्यवाही करण्यात यावी.
अभियानात राशनबाबत कार्यवाही करण्यात यावी. यात लाभार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक नसलेल्या नागरिकांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात यावे. धान्य नको असलेल्या नागरिकांकडून लेखी घ्यावे, तसेच गरजूंची नावे समाविष्ठ करण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड आणि वयोवंदन योजनेत प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मेळघाटात प्रामुख्याने ही शिबीरे आयोजित करण्यात येतील.
युवकांसाठी 29 सप्टेंबर रोजी सर्व तालुक्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यात 1800 जागा भरण्यात येणार असून यासाठी 56 कंपन्यांनी नोंद केली आहे. आतापर्यंत 5 हजार युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यासोबतच समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात करीअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कामगार विभागातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, विमा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बँकेत पगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
अभियान विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांची जबाबदारीने कार्यक्रमाचे नियोजन करून राबवावे, तसेच याचा अहवाल सादर दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000
राज्य कामगार विमा योजना अतंर्गत सेवा संकल्प अभियानाचे आयोजन
अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत सर्व सेवा दवाखान्यामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी उपचार, जनजागृती तसेच विविध आजाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान व अवयवदान जागरुकता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान शिबिर, स्वच्छता शिबिर, व्यसनमुक्त भारत जनजागृती शिबिर, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण व ॲनिमिया जनजागृती शिबिर, बालरोग शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश या सेवा संकल्प अभियानामध्ये आहे.
वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. प्रिती काटे, प्रशासन अधिकारी डॉ.राजनारायण गोमासे, सर्व सेवा दवाखान्यातील प्रभारी विमा वैद्यकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातील श्रीमती स्नेहा बारसागडे (अधिपरिचारीका), श्री. योगेश कोल्हे (वरिष्ठ लिपिक) व इतर कर्मचारी या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन पार पाडणार आहेत. सदर सेवा संकल्प अभियानाचा लाभ सर्व विमाकामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.
०००००


.jpeg)
.jpeg)







