Monday, June 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08.06.2026



                                                     पहिल्या टप्यातील जनगणना कामात

तिवसा नगरपंचायत, दर्यापूर तहसिल अव्वल

*100 टक्के घरयादी, गटयादीचे कार्य पूर्ण

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात जनगणनेच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात तिवसा नगरपंचायती आणि दर्यापूर तहसिलने प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालयाने मुदतीआधीच पहिल्या टप्प्यातील कार्य 100 टक्के पूर्ण केले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे आणि दर्यापूरचे तहसिलदार रविंद्र कानडजे यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जनगणना 2027 मधील पहिला टप्प्याचे कामकाज यशस्वीरित्या पुर्ण करणारे तिवसा नगरपंचायत हे जिल्ह्यातील प्रथम शहर चार्ज कार्यालय ठरले आहे. यानिमित्ताने तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे, कार्यालय अधिक्षक रोहन राठोड, जनगणना लिपीक सुधीर विघ्ने, तांत्रिक सहायक निलकमल बोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वीरित्या कामकाज करणारे दर्यापूर तहसील हे जिल्ह्यातील प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालय ठरल्याने दर्यापूर तहसीलचे तहसीलदार रविंद्र कानडजे, नायब तहसीलदार प्रमोद काळे, जनगणना लिपीक इमरान देशमुख, तांत्रिक सहायक अपेक्षा हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला.

जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात घरीयादी, गटयादी बनविण्यात येत आहे. हा टप्पा दि. 16 मे ते 14 जून या कालमर्यादेमध्ये करण्यात येत आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार कालमर्यादेप्रमाणे दि. 10 जूनपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व एचएलबीचे काम 100 टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र तिवसा नगरपंचायतीने दि. 4 जून 2026 रोजीच त्यांच्या शहर चार्जमधील सर्व एचएलबीचे काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे नगरपंचायत तिवसा हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील 100 टक्के काम पूर्ण करणारे प्रथम कार्यालय ठरले आहे. तसेच ग्रामीण चार्ज कार्यालय दर्यापूर तहसील यांनी दि. 7 जून 2026 रोजी त्यांच्या चार्जमधील सर्व एचएलबीचे 100 टक्के काम पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील एकूण 14 शहर चार्ज कार्यालयापैकी 9 चार्ज कार्यालयांनी 100 टक्के काम पूर्ण केले असून उर्वरित 5 कार्यालयांचे कामकाज 85 टक्केपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच 14 ग्रामीण चार्ज कार्यालयापैकी एका चार्ज कार्यालयाचे 100 टक्के काम पूर्ण झालेले असून 11 ग्रामीण चार्ज कार्यालयाचे काम 90 टक्केपेक्षा जास्त झालेले आहे.

0000000

 मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

*ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 8 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अमरावती' येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थिनींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

मागासवर्गीय विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षात अमरावती शहरातील महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्या अर्ज करण्यास पात्र आहेत. यात अकरावी, पदवी, पदविका, आयटीआय प्रवेश घेतलेल्यांना प्रवेश मिळणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत निवास, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्ट्स (प्रकल्प) खर्च, या सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या जाणार आहेत.

अर्ज करताना विद्यार्थिनींनी उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

00000

सुधारित बातमी

जिल्ह्यात 90 टक्के मतदार मॅपिंग पूर्ण

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे

     अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे अचूक सक्षमीकरण आणि मतदार मॅपिंग मोहिमेने वेग घेतला आहे. 6 जून 2026 पर्यंत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 89.72 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात दर्यापूर विधानसभा मतदार संघ 95.69 टक्क्यांसह सर्वात पुढे आहे.

     जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघांपैकी दर्यापूर मतदारसंघ 95.69 टक्के मॅपिंगसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ धामणगाव रेल्वे 94.88 टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघही 80.06 टक्के मॅपिंगसह प्रगती करीत आहे. जिल्ह्यातील एकूण 25 लाख 58 हजार 364 मतदारांपैकी 22 लाख 95 हजार 319 मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहेत. उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.

    नगरपालिका क्षेत्रात सरासरी 85.19 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात भातकुली नगरपालिका 95.57 टक्केसह सर्वात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील मॅपिंगच्या प्रक्रियेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 17 मार्च रोजी जिल्ह्याचे मॅपिंग 46.37 टक्के होते. यात आता जिल्हा आता 89.72 टक्केवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रगती अमरावती मतदारसंघात झाली असून, तिथली टक्केवारी 28.03 टक्क्यांवरून 80.06 टक्के वाढ झाली आहे.

     जिल्ह्यातील उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. मतदारांनीही मॅपिंगच्या कार्यात सहकार्य करावे, बीएलओंकडून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा कृषि आउटरीच कॅम्‍पमध्ये 19 कोटींचे कर्जवाटप

अमरावती, दि. 8 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे शनिवार, दि. 6 जून रोजी दर्यापुर येथील माहेश्वरी भवन येथे मेगा कृषि ऋण मेळावा घेण्यात आला. यात 19 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

नाबार्डच्या डीडीएम रश्मिता पंचाले अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगर विकासचे सहआयुक्त डॉ. विकास खंडारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.

श्री. पाण्डेय यांनी बँक विविध कृषि योजनामार्फत कृषि विकासासाठी कार्यरत आहे, देशातील कृषि उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनाची माहिती विनय वैश यांनी दिली. श्रीकांत पडवल यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

Saturday, June 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06.06.2026


 जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा

अमरावती, दि. ६ : जन्मजात पायाच्या विकाराविषयी जनजागृती निर्माण करणे, लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आणि उपलब्ध मोफत उपचार सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे डीआयईसी  विभाग व बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  क्लब फूट हा जन्मजात पायाचा विकार असून यामध्ये बाळाचा एक किंवा दोन्ही पाय आत व खाली वळलेले असतात. हा विकार जन्मतःच दिसून येतो. मात्र योग्य वेळी निदान करून उपचार सुरू केल्यास बालकाला पूर्णपणे सामान्य जीवन जगणे शक्य होते.

जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे सन २०१९ पासून क्लब फूट उपचार कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन व प्युअर इंडिया संस्थेच्या संयुक्त विद्यमाने क्लब फूट बाधित बालकांना मोफत उपचार, समुपदेशन, आवश्यक साहित्य व नियमित फॉलोअप सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ८८ क्लब फूट बाधित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून अनेक बालकांना सामान्यपणे चालणे व दैनंदिन जीवन जगणे शक्य झाले आहे.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांना क्लब फूट विकार, त्याची कारणे, लक्षणे, उपचारपद्धती आणि उपचारांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ज्या बालकांना हा विकार आहे, त्यांच्या पालकांनी कोणतीही भीती अथवा आर्थिक चिंता न बाळगता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दर मंगळवारी ऑर्थोपेडिक विभागाच्या ओपीडी क्रमांक १० मध्ये उपस्थित राहून मोफत वैद्यकीय सल्ला व उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्लब फूट हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार असून योग्य वेळी उपचार सुरू केल्यास बालकाचे आयुष्य सामान्य होऊ शकते. त्यामुळे अशा बालकांच्या पालकांनी वेळ न दवडता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे संपर्क साधून उपलब्ध मोफत उपचार सुविधांचा लाभ घ्यावा. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या बालकांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आउटरीच आरएमओ श्री. हेडाऊ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके, बालरोग विभाग प्रमुख  डॉ. सोनाली शिरभाते,  डॉ. नितीन दातीर  तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय क्लब फूट बाधित बालके व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये क्लब फूट या विकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासह, 'क्लब फूट म्हणजे अपंगत्व नव्हे; योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्यावर प्रभावी मात करता येते' हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 

 मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी 'दामिनी' ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अमरावती, दि. ६: मान्सून काळात, ।विशेषतः जून आणि जुलै महिन्यांत वीज पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जीवित, वित्त आणि पशुहानी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या 'दामिनी' मोबाईल ॲपच्या वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याच्या संभाव्य घटनांची पूर्वसूचना सुमारे १५ मिनिटे आधी मिळू शकते. जीपीएस प्रणालीवर आधारित असलेले हे ॲप वापरकर्त्याच्या सद्यस्थितीनुसार परिसरातील विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविते, ज्यामुळे नागरिकांना वेळेत सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य होते. ग्रामपातळीवरील सर्व स्थानिक व शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून, त्यातील अलर्टनुसार नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि जीवितहानी टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

असे डाऊनलोड करा 'दामिनी' ॲप

हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन 'Damini Lightning Alert' असे शोधावे आणि अधिकृत ॲप इन्स्टॉल करावे. ॲप सुरू केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन (GPS) सुरू करून आवश्यक परवानग्या द्याव्यात, तसेच वेळेवर सूचना मिळण्यासाठी नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवावी.

जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आपदा मित्र व सखी, कोतवाल, आशा वर्कर्स, सरपंच आणि पोलीस पाटील यांना या ॲपचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वीज आणि पूर या आपत्तींमध्ये 'काय करावे व काय करू नये' याबाबत विनाईल बोर्डच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

Friday, June 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05.06.2026

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा

            अमरावती, दि. 05 (जिमाका): परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रविवार दि. 7  जून रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

            दौऱ्यानुसार श्री. सरनाईक रविवार, दि. 7  जून रोजी सांयकाळी 7  वाजता रूबी हॉल, द ग्रॅण्ड मेहफील हॉटेल, अमरावती येथे आगमन. व सोईनुसार अमरावती येथून अकोलाकडे प्रयाण करतील.

000000

अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू;

मोफत शिक्षणासह मिळणार विविध सुविधा

अमरावती, दि. 5 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27  साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये निवासी राहून सर्व सोयी-सुविधांसह मोफत शिक्षण दिले जाणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण, भव्य व सुसज्ज शासकीय इमारत, तज्ज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश, खेळाचे साहित्य, नाश्ता व भोजनाची व्यवस्था तसेच अद्ययावत डिजिटल रुमद्वारे उत्कृष्ट अध्यापनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुलांसाठी नांदगांव खंडेश्वर (ता. नांदगांव खंडेश्वर), तुळजापुर (ता. चांदुर रेल्वे), सामदा (ता. दर्यापुर) व बेनोडा (ता. वरुड) येथे तर मुलींसाठी हिंगणगांव-कासारखेड (ता. धामणगांव रेल्वे), बुरडघाट (ता. अचलपुर) व पांढरी (ता. अंजनगांव सुर्जी) या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी अधिक माहितीकरिता व प्रवेश अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट'

बसविण्याचीअंतिम मुदत ३० जून

            अमरावती, दि. 05 (जिमाका) :  केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद केली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांनी त्यांच्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. यापूर्वी यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

विहित मुदतीनंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा वाहनांचे परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला असून सर्व वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

00000

सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू;

31 जुलैपर्यंत मुदत

अमरावती, दि. 05 (जिमाका) :  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक -4 (जेल रोड, अमरावती) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन)  जेल रोड, अमरावती या दोन्ही वसतिगृह योजनांचा शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच सर्व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्र विद्यार्थिनींनी 15 ते 31 जुलै 2026 या कालावधीत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पात्र व इच्छुक विद्यार्थिनींनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

अमरावती जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू;

 30 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 8 वी ते 10 वी शालेय स्तर, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये मोफत निवास, भोजन व इतर सर्व सोयी-सुविधा पुरविल्या जातात. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सर्वप्रथम https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक असून, त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून ती संबंधित वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

अमरावती शहरातील निंभोरा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3) व संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, तसेच मुलींसाठी कॅम्प परिसरातील व जेल रोडवरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाच्या विविध युनिट्समध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासोबतच जिल्ह्यातील तालुका स्तरावरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्येही अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. वेळापत्रकानुसार, इयत्ता 8 वी ते 10 वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 असून, त्यांची पहिली प्रवेश यादी 7 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल.  कनिष्ठ महाविद्यालय व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करता येतील, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले असून, अधिक माहितीसाठी 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.

Wednesday, June 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03.06.2026

 सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला  जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’;

सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

अमरावती, दि. 3 (जिमाका):शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार,  दि. 6 जून 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी ऋण आउटरीच कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे सकाळी 11 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित राहणार असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय  उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा कॅम्प केवळ एकाच ठिकाणी मर्यादित नसून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 45 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या मेळाव्यामध्ये शेती आणि पूरक व्यवसायांना गती देणाऱ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड , कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) आणि महिला बचत गट यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरी पत्र आणि थेट कर्जवाटप केले जाणार आहे.

हा कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष संधी निर्माण करणारा आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कृषी उद्योजकांनी शनिवार, दि. 6 जून रोजी आपल्या जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा दर्यापूर येथील मुख्य कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यातील सर्व 840 ग्रामपंचायतींचा ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’

अभियानात उत्स्फूर्त सहभाग

अमरावती, दि. 3 (जिमाका): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची सुदृढ आरोग्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात सध्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, जिल्ह्यातील एकूण 840 ग्रामपंचायतींपैकी सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदविला आहे. संपूर्ण जिल्हा आता स्वच्छता आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देत असून, ग्रामीण भागात या निमित्ताने एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.

या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अभियानांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यवाहीच्या जोरावर ‘सुदृढ विजेता’ म्हणून घोषित होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता एक निरोगी स्पर्धा सुरू झाली आहे. गावागावात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या संपूर्ण मोहिमेचे चोख नियोजन व उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व ग्रामपंचायतींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे, ज्यामुळे या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे,  सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.

000000

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण

अमरावती, दि. 3 (जिमाका):  सिंदेवाही परिक्षेत्र (ब्रह्मपुरी प्रादेशिक वनविभाग) येथील 'T२' नामांकित वाघिणीच्या शावकासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारी आहे. या चुकीच्या बातम्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे आणि वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गैरसमजाचे वातावरण निर्माण होत असल्याचे वन विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबतची खरी वस्तुस्थिती अशी की, सिंदेवाही परिक्षेत्रातील 'T२' वाघीण मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करत असल्यामुळे, वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तिला तिच्या शावकांसह सुरक्षितपणे पकडले आहे. मात्र, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे 'T२' वाघिणीला परतवाडा येथे हलवलेले नसून, तिच्या शावकांपैकी एका शावकाला (T२ Cub १) पुढील आवश्यक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि वैद्यकीय देखरेखीच्या दृष्टीने परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या शावकाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याच्या अफवा देखील पसरत आहेत, परंतु सद्यस्थितीत या 'T२ Cub १' शावकास मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्याचा किंवा मुक्त अधिवासात पुनर्स्थापित करण्याचा कोणताही निर्णय अथवा योजना वन विभागाच्या विचाराधीन नाही. शावकाला केवळ सुरक्षित वातावरणात वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक निगा उपलब्ध करून देणे हाच या स्थलांतराचा प्रमुख उद्देश आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही यासाठी वस्तुस्थितीवर आधारित आणि वन विभागाकडून पडताळणी केलेली अचूक माहिती प्रसारित करावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

000000

Tuesday, June 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.06.2026

 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2027:

मोफत पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि. 02 जून (जिमाका): केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षा 2027 च्या पूर्व तयारीसाठी उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी राज्यस्तरावर सामायिक प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून यासाठी नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जून 2026 ही राहील, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी 19 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. या प्रवेशासाठीची राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रविवारी, सकाळी  11 ते दुपारी 1 या वेळेत संपूर्ण राज्यात ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेची सविस्तर जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची संपूर्ण माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व महत्त्वाच्या सूचना www.siac.org.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.

000000

कडधान्य आत्मनिर्भरता अभियान: जिल्ह्यात कडधान्य प्रक्रिया युनिट

उभारणीसाठी 33 टक्के अनुदान

अमरावती, दि. 2 (जिमाका): कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियान' राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी 33 टक्के अनुदान देवून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती व संस्थांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम व सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गट लाभार्थ्यांमध्ये संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षांपासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असावी, तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान 15 टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी. वैयक्तिक लाभार्थ्यांचे वय किमान 21 वर्षे पूर्ण असावे आणि एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस हे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, डोंगराळ क्षेत्रे व आकांक्षी जिल्हे यांना प्राधान्य दिले जाईल.

या अभियानांतर्गत पात्र युनिटला प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल रुपये 25 लाख प्रति युनिट, यापैकी जे कमी असेल ते अनुदान केवळ यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत, गोदाम व साठवणूक पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल; तर जमीन, वीज आणि मनुष्यबळ इत्यादी खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच, इमारत व गोदामाच्या बांधकामासाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या 30 टक्क्यांपर्यंतच मर्यादित असेल. शासकीय अनुदान एकूण प्रकल्प खर्चापैकी ठराविक खर्चाची पूर्तता करीत असल्याने उर्वरित रकमेसाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे भांडवल योगदान किमान 15 टक्के असणे आणि वित्तीय संस्थांकडून मुदत कर्ज घेणे अनिवार्य राहील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नवीन प्रक्रिया युनिटची किमान क्षमता 300 किलो प्रति तास असणे आवश्यक असून, सर्व यंत्रसामग्री राष्ट्रीय मानकीकरण संस्था किंवा समतुल्य गुणवत्ता मानकानुसार असणे बंधनकारक आहे. यासोबतच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण व इतर सुरक्षा, पर्यावरणीय व वैधानिक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. लाभार्थ्याला युनिट उभारणीच्या दिनांकापासून किमान 3 वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकारक असून, निधीचा गैरवापर झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, कंपन्या आणि संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

Monday, June 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.06.2026

 जिल्ह्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

17 जणांवर दंडात्मक कारवाई

अमरावती, दि. 01 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीद्वारे 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा हा दिवस ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया: तंबाखू आणि निकोटीनच्या व्यसनाचा प्रतिकार करूया’ या संकल्पनेवर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, बस स्थानक व रेल्वे स्टेशन येथे पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा-2003) अंतर्गत दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या 7 व्यक्तींकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने पठाणपुरा व चांदणी चौक परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांवर धाड टाकून, 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणाऱ्या आणि शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात विक्री करणाऱ्या 10 विक्रेत्यांवर कारवाई करत 2 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 17 व्यक्तींकडून 3 हजार 300 रुपयांची दंडवसुली झाली.

जनजागृतीचा भाग म्हणून रुग्णालयांमध्ये रुग्ण, नातेवाईक, आशा सेविका आणि बचतगटांच्या महिलांसाठी विशेष गटचर्चा व समुपदेशन सत्रे घेण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता वाहनांवरून आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती संदेश प्रसारित करण्यात आले. औद्योगिक व परिचर्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली, तर रुग्णालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आकाशवाणी अमरावतीवरून जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर यांचे मार्गदर्शन प्रसारित झाले. आज, दि. 1 जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन  ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ या आवाहनासह मोहिमेचा समारोप करण्यात आला.

00000000

माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांना शैक्षणिक साहाय्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याचे सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. 01 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या पाल्यांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार केंद्रीय सैनिक बोर्डाची (केएसबी) अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळ प्रणाली सुरू झाली आहे. पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नींच्या पाल्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक साहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते बारावी तसेच बीए, बी.कॉम आणि बी.एस्सी या पदवी अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. सर्व पात्र माजी सैनिक आणि विधवा भगिनींनी आपल्या पाल्यांचे ऑनलाईन फॉर्म विहित मुदतीत भरावेत आणि फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट व संकेतस्थळावर अपलोड केलेली सर्व संबंधित कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

Sunday, May 31, 2026

DIO NEWS AMRAVATI 31.05.2026


जिल्हाधिकारी कार्यालयात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

      अमरावती, दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

     यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.     

00000


मेळघाटातील 'कुटीर' साडीचा जागतिक स्तरावर मान्यता; ऑस्ट्रेलियन विचारवंत बार्बरा ओ'नील यांनी परिधान करून केले कौतुक

अमरावती , दि. 31  (जिमाका) :
​अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी तयार केलेल्या ‘कुटीर’ ब्रँडच्या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे. दिल्ली येथे आयोजित 'लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली' या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ'नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ'नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.
​धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत. अमरावतीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले की, 'मेळघाटातून जगभर' हा प्रवास आता केवळ एक स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे, ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.

****


विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात, अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी; रुग्णालयाला कर्मचाऱ्यांकडून 'वॉटर कुलर' भेट


स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

'वॉटर कुलर'ची भेट:
उन्हाळ्याचे दिवस आणि रुग्णांची गरज लक्षात घेता, रुग्णालयाचे  *वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे* यांनी जयंतीनिमित्त रुग्णालयात एक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, स्वतःहून निधी गोळा करून रुग्णालयाला एक 'वॉटर कुलर' भेट दिला. यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
महिलांनी केलेले उत्कृष्ट नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक दातृत्वामुळे या जयंती महोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाला रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DIO NEWS AMRAVATI 08.06.2026

                                                                   पहिल्या टप्यातील जनगणना कामात तिवसा नगरपंचायत, दर्यापूर तहसिल अव्वल *100 ...