Thursday, March 5, 2026

DIO NEWS AMRAVATI 05-03-2026

 हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 05 (जिमाका):  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये हरभरा (चना) खरेदीसाठी नाफेड व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावती विभागातील मंजूर केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी हरभरा पिकासाठी केंद्र शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर निश्चित केला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित खरेदी केंद्रावर खालील कागदपत्रांसह नोंदणी करणे अनिवार्य आहे. चालू हंगामातील हरभरा पिकांची नोंद असलेला डिजिटल ७/१२ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किवा कॅन्सल चेक (ज्यामध्ये IFSC कोड स्पष्ट दिसेल), आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक.

शेतक-यांनी आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी तो स्वच्छ, वाळलेला आणि एफएक्यू दर्जाचा असावा याची खात्री करावी. ऑनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल, त्यानंतरच माल केंद्रावर आणावा. कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत खरेदी केंद्रावरच आपली नोंदणी करावी.

अमरावती विभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रांवर जाऊन आपली नोंदणी करावी आणि हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

0000000

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती  शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी दि. 18 मार्च 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दीपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी प्रवेश सुरु राहील. इतर सर्व जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.            

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000







धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा

खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासीबहुल तालुक्यासाठी धरतीआबा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे.  त्यामुळे धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन खासदार बळवंत वानखडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

आदिवासी क्षेत्रासाठी प्रामुख्याने घरकुलांची योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्राम सडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत. वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने अस्तित्वात असलेले रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.

मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे. यातील तीन गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वीत झाली आहे. मात्र देखभाल दुरूस्तीअभावी येथील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरूस्ती करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात. आरोग्य सेवा देताना त्याठिकाणी मुबलक औषध पुरवठा ठेवण्यात यावा. यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशूधन. वीज पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला.

000000

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन;

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 5 (जिमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येत्या 8 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आणि सक्षमीकरण उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. महिलांमध्ये स्वसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून विविध खेळांच्या स्पर्धांना सुरुवात होईल. यामध्ये प्रामुख्याने आर्चरी, मल्लखांब, बॅडमिंटन, हॅण्डबॉल, स्क्वॅश, टेबल टेनिस, सॉफ्टबॉल, बेसबॉल आणि व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांचा समावेश आहे. विविध क्रीडा संघटनांच्या सहकार्याने या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील महिला खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची ही मोठी संधी आहे.

केवळ खेळांपुरते मर्यादित न राहता, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील विशेष सत्रे आयोजित केली आहेत. अंजनगाव सुर्जी येथे रोशनी महिला मंडळाच्या सहकार्याने 'स्वयंरोजगार: काळाची गरज' आणि 'कौटुंबिक हिंसाचार व कायदा व्यवस्था' या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच लघुउद्योगासाठी मार्गदर्शन करून यशस्वी उद्योजक महिलांचा सत्कार केला जाईल. यासोबतच मार्डी रोड येथील जिल्हा क्रीडा संकुलात 'वॉरियर्स स्पोर्ट्स अकॅडमी' तर्फे कराटे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महिला खेळाडूंचा विशेष गौरव केला जाणार आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व युवतींनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावती

जिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित ; 15 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 05 (जिमाका): 'कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013' मधील कायदेशीर तरतुदीनुसार, जिल्हास्तरावर 'स्थानिक तक्रार समिती' गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी पात्र आणि इच्छुक व्यक्तींकडून अर्ज व नामांकने मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.

 

 या समितीवरील अध्यक्षपदासाठी केवळ महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार महिला किमान पदवीधर असावी आणि त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण तसेच सामाजिक क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणे अनिवार्य आहे. या पदाचा कार्यकाळ नियुक्तीपासून 3 वर्षांचा असेल.

सदस्यपदासाठी दोन जागा रिक्त असून, त्यातील किमान एक सदस्य महिला असणे बंधनकारक आहे. यातील एक सदस्य कायद्याची पार्श्वभूमी असलेला असावा, तर दुसरा सदस्य महिलांच्या समस्यांशी परिचित असलेल्या अशासकीय संघटनेतील असावा. तसेच, नियमानुसार किमान एक सदस्य हा अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील महिला असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि पात्र व्यक्तींनी आपली शैक्षणिक पात्रता, अनुभवाचे प्रमाणपत्र, संमतीपत्र आणि अर्जाचा मसुदा 'जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गावती चौक, अमरावती' येथे प्रत्यक्ष सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2026 पर्यंत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि कायद्याची जाण असलेल्या व्यक्तींनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

0000000


Wednesday, March 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04-03-2026







 आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

अमरावती, दि. 4 (जिमाका): महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'टेनिस बॉल क्रिकेट सामने-2026' (वर्ष 8 वे) मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघाने विजय मिळविला. अमरावती येथील छत्रीतलाव मैदानावर नुकतीच ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत आरोग्य विभागातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा अंतिम सामना जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती आणि अचलपूर महिला व बाल रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे राज डुलगज याने मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला. सुशील ओसवाल यांना उत्कृष्ट गोलंदाज, तर अभिजीत निचत यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सेमी फायनलमध्ये डॉ. मनिष गोतमारे आणि दुसऱ्या सेमी फायनलमध्ये स्वप्निल उसरे सामनावीर ठरले.

पुरस्कार वितरण सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. रणजीत राठोड, डॉ. विक्रांत कुळमेथे, अनंतराव पारसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रमोद निरवणे यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, आरोग्य सेवेतील ताणतणाव दूर करण्यासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. निलेश पाचबुद्धे, विशाल पवार आणि आयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. राठोड यांनी आभार प्रदर्शन करून स्पर्धेची सांगता केली.

00000000

कृत्रिम वाळू युनिट स्थापन करणाऱ्यांसाठी संधी;

6 मार्चला विशेष मार्गदर्शन सभेचे आयोजन

अमरावती, दि. 4 (जिमाका): राज्यात बांधकाम क्षेत्रासाठी नैसर्गिक वाळूचा तुटवडा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने 'कृत्रिम वाळू' धोरण निश्चित केले आहे. या धोरणाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नवीन युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिनांक 6 मार्च 2026 रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी 12.30 वाजता जिल्हा खनिकर्म विभागामार्फत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय धोरणानुसार, कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी सध्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मात्र, हे युनिट स्थापन करण्याची कार्यपद्धती, अर्जाचा नमुना आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक इच्छुकांच्या मनात शंका दूर करण्यासाठी या मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी सांगितले की, कृत्रिम वाळू निर्मितीला चालना देण्यासाठी शासन स्तरावर विविध सवलती आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीत युनिट स्थापन करण्याबाबतच्या अडचणींवर चर्चा केली जाईल तसेच नवीन अर्जांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. तरी ज्यांना कृत्रिम वाळू युनिट सुरू करण्यात रस आहे किंवा ज्यांच्या अर्जाबाबत काही शंका आहेत, अशा संबंधितांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खनिकर्म विभागाकडून करण्यात आले आहे.

                                                                         00000                           

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 04 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 11 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

अमरावती, दि. 4 (जिमाका) : शहरातील महत्वाचे असलेले अंबादेवी आणि एकविरादेवी संस्थानचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी दोन्ही संस्थानच्या विकासासाठी एकत्रित आराखडा राबवावा लागणार आहे. यासाठी सर्व जमिनीवरील नियोजन करून एकत्रित स्वरूपात कामांचे नियोजन करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री रूख्मिणी विदर्भपीठ कौंडण्यपूर आणि अंबादेवी, एकविरादेवी संस्थानच्या विकास आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, अंबादेवी आणि एकविरादेवी ही शहराच्या मध्यवस्तीत असून जुन्या वस्तीमध्ये आहेत. भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने याठिकाणी सुविधा उभारणे आवश्यक आहे. प्रामुख्याने मंदिराजवळ असलेले अरूंद रस्ते मोठे करणे गरजेचे आहे. तसेच भाविकांसाठी वाहनतळाची सुविधा उभारावी लागणार आहे. या मंदिरांमध्ये नवरात्री उत्सवाच्या कालावधीत गर्दी होते. गर्दीच्या वेळी सुविधा वाढविणे गरजेचे असते, यावर विश्वस्त मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. विकास आराखडा राबविताना टप्पेनिहाय राबवावा. यासोबतच विकासकामे करताना बांधकाम क्षेत्र वाढविण्याची शक्यता असल्यास महिला बचतगटांना विविध मालाच्या उत्पादनासाठी इमारत देण्यात यावी.

कौंडण्यपूर येथे तिर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकासासाठी निधी देण्यात आला आहे. यातून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. संस्थानकडून कौशल्य विकास, तसेच इतर उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून गरजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी इमारत बांधकाम आणि इतर सोयी सुविधांसाठी निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्यानुषंगाने आवश्यक जमिन हस्तांतरणासाठी संस्थानने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले.

00000

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;

6 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 4 (जिमाका):  महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे नवीन कौशल्य विषयक धोरण तयार करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, या धोरणाचा सुधारित प्रारूप मसुदा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. कौशल्य विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी धोरणाबाबत जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षण संस्था, उद्योजक, महाविद्यालये आणि उमेदवारांनी आपल्या महत्त्वपूर्ण सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

शासनाने गठीत केलेल्या विशेष समितीने 'M/s KPMG Advisory Services' यांच्या तांत्रिक सहकार्याने हा व्यापक मसुदा तयार केला आहे. कौशल्य परिसंस्थेमधील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हा मसुदा 'महास्वयंम' पोर्टलवर (www.mahaswayam.gov.in) नोटीस विभागामध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या धोरणामुळे भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि कौशल्य प्रशिक्षणात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.

जिल्ह्यातील सर्व भागधारकांनी या मसुद्याचे सखोल अवलोकन करून आपल्या सूचना, सुधारणा किंवा हरकती दिनांक 6 मार्च 2026 पर्यंत लेखी स्वरूपात mhskillpolicy@msads.in या ई-मेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे. राज्याचे कौशल्य धोरण अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि संबंधित संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000


Monday, March 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02-03-2026




                                 धारणीत ह्युमन मिल्क बँक, अमरावतीत आयटी पार्कसाठी वेग

अमरावती, दि. 2 (जिमाका) : जिल्ह्यातील दुर्गम असणाऱ्या धारणी येथे ह्युमन मिल्क बँक आणि अमरावतीमध्ये आयटी पार्क स्थापन करण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आज खासदार डॉ. अनिल बोंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार उपस्थित होते.

खासदार डॉ. बोंडे यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने मेळघाटातील कुपोषण निर्मूलनासाठी धारणी येथे 'ह्युमन मिल्क बँक' स्थापित करण्यात यावी. या योजनेची उपयोगिता मेळघाटात सर्वाधिक आहे. डफरीन येथील ह्युमन मिल्क बँकेचे उत्तम परिणाम मिळत आहे. त्याच धर्तीवर ह्युमन मिल्क बँक कार्यान्वित करताना तपासणी, साठवणूक, स्वच्छता घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात यावे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वन विभागाच्या जमिनीवर 'वड उद्यान' निर्माण करण्यात यावे. शहरात आयटी क्षेत्राला चालना देण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा आरक्षित करण्यात यावी. आयटी पार्कच्या विस्तारासाठी सलग जागेची आवश्यकता आहे. यासाठी संबंधितांना जागेची पाहणी करण्याबाबत कळविण्यात यावे.

मोर्शी शहरातील वाढते अतिक्रमण आणि येरला येथील 1998-99 मधील घरकुल पट्टे वाटपाचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांच्या सीएसआर निधीचा प्रभावी उपयोग करण्यात यावा. यासाठी सर्व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. सीएसआर फंडसाठी बॅंक, कंपन्यांनी आवश्यक सामाजिक विषय प्राधान्याने घेण्यात यावा. आरोग्य, जिल्हा परिषदेच्या शाळा, डिजिटल शिक्षण, पर्यावरण यासारख्या घटकांवर निधीचा विनियोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याव्यतिरिक्त, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चिल्ड्रन्स पार्क व ग्लो गार्डन उभारण्यासाठी अंदाजे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संगीता भिसे यांच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धारणे येथे आदिवासी मुलांसाठी खेलो इंडियासाठी क्षेत्र विकसित करण्यासाठी जागेची पाहणी करावी. तसेच चिखलदऱ्याप्रमाणे चांगले गार्डन, चिल्ड्रन पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश धारणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

0000000






जिल्ह्यात महाराजस्व शिबीरात 95 मंडळात कार्यक्रम

*महसूल सेवा आता थेट जनतेच्या दारी

अमरावती, दि. 2 (जिमाका) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. पाच टप्प्यात प्रत्येक महसूल मंडळात एक कार्यक्रम याप्रमाणे 95 कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराजस्व अभियान मार्च ते मे या कालावधीत महसूल मंडळ आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर राबविले जाणार आहे. या अभियानात महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच दिवसात सेवा देण्यात येणार आहे. यात प्रलंबित आणि विवादग्रस्त फेरफार प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे, सातबारामधील चुका दुरुस्त करणे आणि डिजिटल सातबारा व आठ अ उतारे उपलब्ध करून देणे, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे वितरीत करणे, अकृषिक परवानगीबाबत नवीन सुलभ तरतुदी, सनद प्रणाली रद्द झाल्याचे फायदे आणि सुधारीत तुकडेबंदी कायद्याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

अभियानाची सुरवात 7 मार्च रोजी होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वलगाव येथे या अभियानाची सुरवात होणार आहे. 7 मार्च रोजी 18, 14 मार्च रोजी 17, 10 एप्रिल रोजी 18, 17 एप्रिल रोजी 14, 8 मे रोजी 17 आणि 15 मे रोजी 14 मंडळात समाधान शिबीर घेण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्याशी निगडीत जिवंत सातबारा, सामाजिक अर्थ सहायाच्या योजना, तुकडेबंदी, फेरफार, घरपोच सातबारा, सातबारावरील दुरूस्ती, पट्टेवाटप आदी सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. समाधान शिबिरात येणााऱ्या कोणत्याही नागरिकाला या प्रक्रियेत त्रास होणार नाही आणि सर्व सेवा पारदर्शकपणे पुरविल्या जातील याची दक्षता घेण्यात येणार आहे. शिबीराच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.

000000

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी

*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

अमरावती, दि. 2 (जिमाका): मेळघाटातील मोबाईल नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीने 10 मोबाईल टॉवरच्या कामाला मंजुरी दिली आहे. यात 9 बीएसएनएल आणि एक ऑप्टीक फायबरच्या टॉवरचा समावेश आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचे संनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी परतवाड्याचे विभागीय वन अधिकारी अनंता दिघोळे उपस्थित होते.

मेळघाटातील दहा बीएसएनएलच्या टॉवरला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी जिल्हा संनियंत्रण समितीची मंजुरी आवश्यक असते. त्यानुसार मेहरीआम, बिच्छुखेडा, खोकमार, घाणा, खामदा, धोकडा, मारीता, खंडुखेडा, भुत्रुम आणि चौराकुंड ते चोपन, रंगुबेली ते धोकडा, रूईपठार ते भुत्रुम येथे भुमिगत ऑप्टीकल फायबर टाकण्यासाठी मान्यता देण्यात आली.

जिल्हा सनियंत्रण समितीच्या मान्यतेमुळे बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू होणार आहे. यामुळे नेटवर्कींगमध्ये गती येणार असून मोबाईलची सेवा जलद गतीने आणि विनाव्यत्यय होण्यास मदत मिळणार आहे. यासोबतच वनक्षेत्रात करण्यात येणारे जलसंधारण तसेच इतर कामांनाही मंजुरी देण्यात आली.

000000




जिल्हाधिकारी कार्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा

अमरावती, दि. 2 (जिमाका) : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि प्रमुख वक्ते अविनाश दुधे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, अधिक्षक निलेश खटके आणि विधी अधिकारी नरेंद्र बोहरा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रमुख वक्ते श्री. दुधे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध वारशावर प्रकाश टाकला. त्यांनी मराठीला दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा गौरवशाली इतिहास असल्याने तिला 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळाला असल्याचे सांगितले. मातृभाषा हे संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन असून मराठीतून बोलणारी व्यक्ती जगातील कोणतीही भाषा आत्मसात करू शकतो. भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा किमान पाच टक्के भाग पुस्तके खरेदीसाठी खर्च करावा, असे आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी वाचनाच्या सकारात्मक परिणामांवर भर दिला. मराठी भाषेचा ऱ्हास थांबवण्यासाठी नवीन पिढीला वाचनाची गोडी लावणे आवश्यक असल्याने मत व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. मडावी यांनी मराठी भाषा जपण्याचा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन केले.

सिमिता दाभिरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. सुरेंद्र रामेकर यांनी सूत्रसंचालन केले. सलोनी उमाळे यांनी आभार मानले.

0000000

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात

          अमरावती, दि. 2 (जिमाका): स्थानिक उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे ‘अमृत पेठ 2026’ या उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक 6 ते 8 मार्च 2026 या कालावधीत शहरांतील जाधव पॅलेस येथे संपन्न होणार आहे.

       या कार्यक्रमाला  ‘अमृत पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, अमृतचे विभागीय व्यवस्थापक  प्रवीण कोळेश्वर उपस्थित राहणार आहे. स्थानिक नवउद्योजक, महिला बचत गट आणि स्टार्टअप्स यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

          अमरावतीकरांनी आपल्या कुटुंबासह या मेळाव्याला भेट द्यावी. या मेळाव्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. हा मेळावा महिला उद्योजकांसाठी आपली कौशल्ये आणि उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी निर्माण करणार आहे. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील थेट संपर्कामुळे स्थानिक उद्योगांना नवी गती प्राप्त होईल. या प्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी 9527317068 किंवा 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

सामाजिक न्यायच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्या वर्षासाठी आणि ज्या पुरस्काराकरीता अर्ज करण्यात येत आहे, त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. इच्छुकांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षाकरीता चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करावा लागणार आहे.

सन 2024-2025 या वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेव आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब आंबेडकर पारितोषिक, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्काराची जाहिरात आणि अर्जाचा नमुना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे संपर्क करावा. समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी दि. 15 मार्चपर्यंत अर्ज कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 05-03-2026

  हरभरा (चना) हमीभाव खरेदीसाठी नोंदणी सुरूः शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अमरावती, दि. 05 (जिमाका):  केंद्र शासनाच्या किमान आधारभूत...