Friday, March 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20-03-2026

 जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर

अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करावेत

*पशूसंवर्धन विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अंतर्गत अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त पदांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी दि. 2 एप्रिलपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीच्या तरतुदीनुसार आणि नियम 2001 मधील निकषांनुसार, प्राणी क्लेश व्यवस्थापकीय समितीवरील सदस्य, गौशाळा किंवा पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती, मानवहित किंवा प्राणीमात्रांवर प्रेम करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतील.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 2 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा सदस्य सचिव, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, अमरावती या ठिकाणी स्विकारण्यात येतील. जिल्ह्यातील प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. एस. एम. कावरे यांनी केले आहे.

000000

मॅग्नेट' प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेटी दि. 16 ते 18 मार्च कालावधीत पार पडल्या. प्रकल्पाच्या 'बाजार विकास व प्रोत्साहन' घटकांतर्गत दौऱ्यात 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

या दौऱ्यात शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांनी चिखली येथील 'आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी'ला भेट दिली. येथे भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग, निर्यातीच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन फळबाग व्यवस्थापना विषयी माहिती घेतली. सिन्नर येथील कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट देऊन परदेशातील निर्यात संधींची माहिती घेतली. त्यानंतर सह्याद्री फार्म्सला भेट देऊन शेतकरी बळकटीकरण, मूल्यवर्धन आणि मोठ्या प्रमाणावरील निर्यात साखळीचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच जैन हिल्स, जळगाव येथील टिश्यू कल्चर कंपनीला भेट देऊन केळीच्या महिला बळकटीकरण, नवीन जाती आणि दर्जेदार रोपांविषयी माहिती घेतली. जैन इरिगेशनमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याची माहिती घेऊन जैन फूड पार्कमधील प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेशी जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रकल्प उपसंचालक अरुण नादरे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यास दौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्‍ज्ञ अक्षय गणेशपुरे आणि विद्या पुंड यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

0000000

दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग कार्ड जमा करावे

*जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप ऑनलाईन यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी कार्डची झेरॉक्स प्रत गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग येथे दि. 25 मार्च 2026 पूर्वी जमा करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.

0000000

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 30 मार्चपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 23 ते 30 मार्च 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : आर्थिक वर्षाच्या शेवटी मालमत्ता खरेदी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 26 मार्चपासून सलग ही कार्यालये सुरू राहतील.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांत नियंत्रक यांच्या निर्देशानुसार, इष्टांक पूर्तीच्या दृष्टीने दि. 26 मार्च, दि. 28 मार्च, दि. 29 मार्च आणि दि. 31 मार्च या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहतील. तसेच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी ही शनिवार आणि रविवार सोडून अन्य दिवशी आहे. ती कार्यालये त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू ठेवावीत. उपरोक्त दिवसांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहीत वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील कार्यरत राहणार आहे.

सुट्टीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय चालू राहणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब घोंगडे यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवनात मंगळवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या नामांकित आयटी कंपनीमार्फत बीपीएस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून शैक्षणिक पात्रता बीए, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीव्हीओसी, बीएससी जनरल आहे. यात 2023 आणि 2024 यावर्षात उत्तीर्ण, तसेच एमए, एमकॉम 2024 आणि 2025 उत्तीर्ण पात्रता निकष राहणार आहे.

निवड प्रक्रिया ही कागदपत्र पडताळणी, योग्यता परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीतून होणार आहे. नोंदणीसाठी surl.li/lxxjb लिंक वरूनही नोंदणी करता येणार आहे. अधिक महितीसाठी विभागीय रोजगार मेळावा कक्ष प्रमुख अजय चव्हाण (8983419799) तसेच विभागीय कौशल्य विकास सहायक अक्षय डोईजड (7972755787) यांच्याशी संपर्क साधावा.

रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी सहभागी होऊन टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, विभागीय उप आयुक्त द. ल. ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

Wednesday, March 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18-03-2026

                                        मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी

*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

अमरावती, दि. 18 (जिमाका) : निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांच्या सुधारणेसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम (एसआरआर) हाती घेण्यात येणार आहे. राज्यात साधारणत: एप्रिल महिन्यात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सध्या सुरू असलेल्या मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदारयाद्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेबाबत माहिती दिली. निवडणूक आयोगाकडून सध्याच्या मतदारयाद्या ह्या 2002च्या मतदारयाद्यांशी जुळविण्यात येत आहे. या मॅपिंगच्या कामात जास्तीत जास्त मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग करावे लागणार आहे. मॅपिंगमधून उर्वरीत मतदारांची पाच दिवसांत सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात मॅपिंग होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्यास्थितीत 46 टक्के मतदारांचे मॅपिंग झाले आहे. येत्या दहा दिवसात हे प्रमाण 80 टक्के होण्यासाठी प्रयत्न करावेत.

मॅपिंगचे काम सुकर करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ज्या मतदारांचे मॅपिंग करावयाचे आहे, ती यादी आणि 2002ची मतदारयादी तयार ठेवावी. त्यानंतर येत्या दहा दिवसात प्रत्येक घरी जाऊन मतदारांची जुळवणी करावी. ही सर्व कामे संगणीकृत आहेत, तसेच यासाठी दोन ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून कुशल मनुष्यबळ पुरविण्यात यावे. मॅपिंगच्या कामाचे प्रमाण वाढल्यास विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमेतील ताण कमी होणार आहे. त्यामुळे मॅपिंगची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

000000


जिल्हास्तरीय जनगणना प्रशिक्षणाचा समारोप

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जनगणना 2027च्या अनुषंगाने नियोजन भवनात जिल्हास्तरावरील तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षण वर्गाचा आज समारोप करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महापालिका उपायुक्त योगेश पिठे, सहआयुक्त विकास खंडारे, जिल्हा सूचना अधिकारी मनिषकुमार, अधिक्षक निलेश खटके, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक जनगणना संचालनालाचे सहायक व्यवस्थापक प्रविण भगत, जिल्हा समन्वयक ऋषीकेश पाथरे, मास्टर ट्रेनर तहसिलदार मयूर कळसे, अक्षय मंडवे उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी जनगणना ही देशातील योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरत असते. त्यामुळे प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांनी अचूक नोंद घ्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी सोनल सुर्यवंशी, मनोज शहाळे, तांत्रिक सहायक चेतना चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशिक्षणासाठी जणगणना कक्षाच्या राधिका देशमुख यांनी सहकार्य केले. भावना जिचकार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

000000

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 (जिमाका): अमरावती  शहरात चित्रा चौक ते नागपूरी गेट उड्डाणपुलाचे उर्वरित बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने पुर्ण करण्यासाठी दि. 5 एप्रिल 2026 पर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

टांगा पडाव ते नागपूरी गेट चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी पादचारीसह. चित्रा चौक ते नागपूरी गेट सर्व प्रकारचे जड व हलके मालवाहु तसेच बसेस इत्यादी वाहनांना प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            टांगा पडाव-जवाहर गेट-सक्करसाथ-नागपूरी गेट. दीपक चौक-चौधरी चौक-आदर्श हॉटेल-पिंजारा मस्जिद मार्गे नागपूरी गेट. फक्त दुचाकी, कार, ऑटोसाठी प्रवेश सुरु राहील. इतर सर्व जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.            

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

कौशल्य विकास केंद्राचा अमरावती येथे रोजगार मेळावा

येत्या मंगळवारी

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 24 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद भवन, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती  येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये नागपूर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/8983419799/8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह स्वामी विवेकानंद भवन, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारींसाठी शासनाकडून व्हाटस् ॲप क्रमांक उपलब्ध… 👉🏾 ९७६९९१९२२१ #LPG

 एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारींसाठी शासनाकडून व्हाटस् ॲप क्रमांक उपलब्ध…

👉🏾 ९७६९९१९२२१



एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारींसाठी शासनाकडून व्हाटस् ॲप क्रमांक उपलब्ध… 👉🏾 ९७६९९१९२२१ #LPG


 

एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भातील तक्रारींसाठी शासनाकडून व्हाटस् ॲप क्रमांक उपलब्ध…

👉🏾 ९७६९९१९२२१

सर्व एलपीजी (#LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. ज्या ग्राहकांच्या जोडणीचे प्रमाणीकरण (Authentication of LPG Consumers) अद्याप झाले नाही, त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.



 सर्व एलपीजी (#LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. ज्या ग्राहकांच्या जोडणीचे प्रमाणीकरण (Authentication of LPG Consumers) अद्याप झाले नाही, त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

ज्या ग्राहकांनी याआधीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनी ते पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. त्याचा एलपीजी पुरवठा किंवा सबसिडीवर कोणताही परिणाम होणार नाही. एलपीजी सेवा पुरवठादाराच्या संकेतस्थळावर, ग्राहक त्यांच्या ई-केवायसीची सद्यस्थिती तपासू शकतात.

भारत सरकार सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

 

भारत सरका


र सर्वांना मोफत एलपीजी सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

अशी कोणतीही योजना केंद्र शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करू नये तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये.

DIO NEWS AMRAVATI 20-03-2026

  जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करावेत *पशूसंवर्धन विभागाचे आवाहन अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा प्राण...