Thursday, February 12, 2026

DIO NEWS AMRAVATI 12-02-2026

    





                      मेळघाटच्या विकासासाठी आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देणार

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 12 (जिमाका): मेळघाट परिक्रमासाठी सेवा देणाऱ्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्संना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधसाठा, वाहन सुविधा तसेच त्यांच्या राहण्याची सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे पुरविण्यात येईल. मेळघाटच्या विकासासाठी येथील आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे केले.

 महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. विभावरी दाणी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

मेळघाट परिक्रमाउपक्रमातंर्गत माहिती, शिक्षण आणि संप्रेषण अभियान राबविण्यासाठी शिवाजी सायन्स कॉलेजचा सहभाग राहील. या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेळघाटमध्ये कोरकू भाषेतून पथनाट्य, कोरकू बांधवांना समजेल अशा भाषेत संवादसत्र असे विविध उपक्रम राबवून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणार आहेत. अन्य महाविद्यालयांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी यावेळी केले.

             मेळघाटमधील प्रामुख्याने होणारे कुटकी, सावा या मिलेट्स फूड्सबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा. बदलत्या जीवनशैलीत नागरिकांना मिलेट्सचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करावी.  याअनुषंगाने मिलेट्स फुडच्या लागवडीखाली क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. हॉटेल्स तसेच दैनंदिन जीवनात नागरिकांचा मशरूम खाद्यान्नांचा वापर वाढला आहे. मशरूमची वाढती मागणी लक्षात घेता मशरूम ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना यावेळी दिले. मराठवाडा दुग्ध प्रकल्पासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना वैरण विकास चमूमार्फत सहकार्य पुरविण्यात यावे. तसेच या पूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी आकृष्ट व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचेही निर्देश श्री. सातपुते यांना दिले.

              प्राथमिक कृषी सहकारी संस्था ही ग्रामीण स्तरावरील तळागाळातील सहकारी पतपुरवठा संस्था आहे. थेट शेतकऱ्यांशी निगडित ही संस्था खते, बियाणे, कीटकनाशके पुरवणे, अल्प मुदतीचे कर्ज देणे आणि शेतमाल साठवणूक, विक्री यांसारख्या बहुउद्देशीय सेवा पुरविते.  या सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देत असल्यामुळे येथील दोन-तीन गावातील महिलांना एकत्रित करून त्यांच्या आर्थिकस्तर उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबवून या महिलांना सहकार्य करण्याचे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना यावेळी देण्यात आले.

मोह फुलाचा हंगाम सुरू होत असून यावी उत्तम प्रतीची मोहफुले गोळा करण्यासाठी आवश्यक नेट सामग्री येथील स्थानिकांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी संबंधितांना निर्देश दिले.

             मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी मेळघाट येथील आरोग्य समस्यावर सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कार्यप्रणाली राबविण्याचे निर्देश दिले. येथील गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी लवकरच मोबाईल एक्स-रे मशीन घेण्यात येईल. जेणेकरून अती जोखमीच्या गर्भवती महिलांची तपासणी करणे सोयीचे होईल. तसेच आशाकिट मध्ये बीपी मशीन देण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शविली.

             माजी प्राचार्य डॉ. विभावरी गाणी यांनी मेळघाट येथील आरोग्यविषयक विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रमायाबाबत माहिती दिली. मेळघाटमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी असून व्यसनाधिनता अधिक असल्यामुळे जनजागृती करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे येथील नागरिकांना तंबाखू, दारू अशा विविध व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करणे सर्वप्रथम गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी मेळघाट क्षेत्रातील विद्युत पुरवठ्याबाबत आढावा घेतला. येथील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले. याबाबत चुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

000000

राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित;

आता विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून चालणार कामकाज

अमरावती, दि. 12 (जिमाका): राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती हे आता नवीन जागेत स्थलांतरित झाले असून, यापुढे कार्यालयाचे कामकाज नवीन पत्त्यावरून चालणार आहे. या कार्यालयाचा नवीन संपर्क पत्ता राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती - 444 602 असा आहे. संबंधित नागरिकांनी तसेच शासकीय कामकाजासाठी संपर्क साधणाऱ्यांनी या बदललेल्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

000000

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप 13 फेब्रुवारीपासून तात्पुरते स्थगित;

आता तालुकानिहाय होणार किटचे वाटप

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचाचे वाटप 13 फेब्रुवारी 2026 पासून तात्पुरते बंद करण्यात आले आहे. वाटपाच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता हे वाटप तालुकानिहाय केले जाणार असल्याची माहिती कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मंडळामार्फत साहित्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ दिली जाते. ज्या कामगारांनी 13 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गृहपयोगी वस्तू संच मिळण्यासाठी नोंदणी केली होती, अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. यामुळे साहित्यासाठी  नोंदणी केलेल्या कामगारांना वेळेत संच देणे शक्य होत नाही. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सध्याचे वाटप तात्काळ बंद करून प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जास्तीत-जास्त 500 संच वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

तालुकानिहाय वाटपाच्या तारखा संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहेत. तोपर्यंत कामगारांनी वाटप केंद्रावर गर्दी करू नये आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती विभाग यांनी केले आहे.

000000

 विविध राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित;

21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत.

 सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे जोडणे आवश्य, असे आवाहन सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

या पुरस्कारांसाठी अर्जदार व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग आणि उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. पुरस्कारासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून, त्यासोबत शासन निर्णयातील क आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले किंवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुरस्कारांबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत 'सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती' यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि सविस्तर अटी व शर्तींची माहिती जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे, तरी जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 12 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी  2026 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 000000

 निवृत्तीवेतनधारकांसाठी उद्या सायबर सुरक्षा जनजागृती शिबिर;

उपस्थित राहण्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

अमरावती, दि. 12 (जिमाका): आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुरक्षित व्यवहार करता यावेत यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई व सी-डॅक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी उद्या, शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता 'सायबर सुरक्षा जनजागृती' विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये डिजिटल युगात वावरताना, विशेषतः बँक व्यवहार आणि ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता घ्यावा. कोषागार कार्यालयाच्या प्रांगणातील 'जिजाऊ सभागृह' येथे आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

अमरावती कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.

0000000

राष्ट्रीय लोक अदालत 14 मार्च रोजी

अमरावती, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

               त्यात दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. या आयोजनाची विशेष बाब म्हणून त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसून प्रकरणाचा अंतिम निकाल लागतो.

तडजोडपात्र प्रलंबित खटले 'राष्ट्रीय लोकअदालत'मध्ये ठेवून तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच 14 मार्च रोजी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.

000000

भारुडाच्या माध्यमातून कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती; जनुना येथे महिला मेळावा संपन्न

अमरावती, दि. 12 (जिमाका): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनुना ग्रामपंचायत येथे आरोग्य प्रबोधनाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी गावातील वृद्ध महिलांसोबत भारुड सादर केले. या माध्यमातून कुष्ठरोग आणि क्षयरोगाविषयी संदेश देण्यात आला.

यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी शास्त्रीय माहिती देत, कुष्ठरोग हा शाप नसून तो पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात भारुड आणि भजनासोबतच अभिनय हायस्कूलच्या निबंध स्पर्धा विजेत्यांचा आणि रांगोळी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी महिलांना झाडांच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच जगदीश नरखेडकर व ग्रामसेवक जयश्री काकडे यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात, 'लवकर निदान आणि त्वरित उपचार' या सूत्राद्वारे गाव कुष्ठरोग व क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.

Wednesday, February 11, 2026

DIO NEWS AMRAVATI 11-02-2026




जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

·        राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका) : राज्य नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथून जिल्हाधिकारी आशिष येरेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तीनशे कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

              आमदार सुलभा खोडके यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, उपवनसंरक्षक अजुर्ना के. आर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती, त्यांची चालू कामे, सद्यस्थिती तसेच भविष्यकालीन नियोजनाबाबत अभ्यासपूर्ण माहिती सादरीकरणाव्दारे सविस्तर दिली. अमरावती जिल्ह्यात 14 तालुके आहेत. यामुळे विकास कामांसाठी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विकास कामांसाठी जिल्ह्याला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. सन 2025 -26 जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यानुसार 527 कोटी रुपयांची विकास कामे सुरु आहेत. सन 2026 -27 साठी 434. 71 कोटी रुपयांचे स्पिलिंग दिले आहेत. त्यानुसार आराखड्याचे काम करण्यात आले आहे. परंतु यामध्ये अतिरिक्त 300 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे श्री. येरेकर यांनी यावेळी मागणी केली. जिल्ह्याच्या विकासासाठी तालुका हा घटक महत्त्वपूर्ण आहे.जिल्ह्यातील लोकसंख्या, तालुक्यांची संख्या, भौगोलिक क्षेत्रफळ याचा विचार करून अतिरिक्त निधीच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आग्रही भूमिका मांडली.  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक उत्तम काम करणाऱ्यास निधीची कमतरता पडणार नसल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये वाढीव निधी प्राप्त होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील प्रलंबित विकासकामांना आता नवी उभारी मिळणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आमदार श्रीमती खोडके यांनी सन 2026 -27 साठी मनपा अंतर्गत विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपये अतिरिक्त निधीची  विशेष मागणी केली. जिल्ह्यामध्ये मनपाच्या 63 शाळा आहेत. मनपा शाळेच्या दुरुस्ती व देखभालीसाठी जिल्हा नियोजन समिती आराखड्यात नवीन लेखाशीर्ष समाविष्ट करण्याबाबतची मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

0000000 

                            मोर्शी येथे शुक्रवारी ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रम;

शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे होणार वितरण

अमरावती, दि. 11 (जिमाका): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने मोर्शी येथे विशेष ‘मेगा कृषी क्रेडिट आऊटरीच’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा शेतकरी मेळावा येत्या शुक्रवारी, 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिरभाते मंगलम, अमरावती रोड, मोर्शी येथे पार पडणार असून, यामध्ये बँकेच्या विविध नवीन शेती योजनांचे सादरीकरण आणि पात्र शेतकऱ्यांना प्रिन्सिपल सॅन्शन चेकचे वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, गट विकास अधिकारी प्रिती खाटिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुंबई कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक जयशंकर प्रसाद उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात बँक अधिकाऱ्यांमार्फत शेती कर्ज, शासनाच्या नवीन योजना आणि विविध सबसिडींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना बँकेच्या योजनांची माहिती देण्यासोबतच व्याजदरातील सवलतींबाबतही सादरीकरण केले जाईल. शासन आणि बँकेच्या या संयुक्त उपक्रमामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कृषी व्यवसाय विस्तारण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

0000000


Tuesday, February 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10-02-2026

 शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1) व (3) लागू

अमरावती, दि. 10 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 11 फेब्रुवारी ते दि. 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

000000

लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण

अमरावती, दि. 10 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीचे पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसीमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि. 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी कळविले आहे.

0000000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 24 फेब्रुवारी 2026च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

पेंशन समाधान उपक्रम, पेंशन अदालत उत्साहात

अमरावती, दि. 10 (जिमाका) : जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशन अदालत उत्साहात पाडली.

कोषागार अधिकारी अमोल इखे अध्यक्षस्थानी होते. महालेखापाल नागपूर यांचे कार्यालयातील वरीष्ठ लेखाधिकारी मैथीली जगनाथन, सहाययक लेखाधिकारी अनुपमा भटटाचार्य, लेखापाल सचिनकुमार, वरीषठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार उपस्थित होते.

महालेखापाल कार्यालयातील अधिकारी यांनी अचूक निवृत्ती वेतन प्रस्ताव कसे तयार करावेत, ज्यामुळे निवृत्ती वेतन व कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना वेळेवर लाभ प्रदान करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्तीवेतनविषयक प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करुन देण्यात आली. तसेच शंकाचे समाधान करण्यात आले. उपस्थितांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवृत्तीवेतन प्रदाने तात्काळ करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, कोषागार कार्यालय आणि संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

कनिष्ठ लेखापाल साजीया शमसू मोहम्मद यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी निवृत्तीवेतन विहीत कालावधीत प्रदान करणेसाठी कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. तसेच पेंशन समाधान उपक्रम आणि पेंशनअदालतीचे आयोजन करण्याचे उद्दीष्ट सांगितले. कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केली.

निवृत्तीवेतन धारकांकरीता पेंशन अदालत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डी. आर. देशमुख, जगदीश सायसिकमल, विरेंद्र दिक्षीत आदी उपस्थित होते. वरीष्ठ लेखापाल राम जाधव यांनी प्रस्ताविक केले. यावेळी निवृत्तीवेतनधारक, तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. निवृत्तीवेतन धारकास घरपोच सेवा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जगदीश सायसिकमल यांनी सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ त्यांना विहीत कालावधीत मिळण्यासाठी कोषागार कार्यालय आणि महालेखाकार कार्यालय करीत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. विरेंद्र दिक्षीत यांनी मांडलेल्या तक्रारीची महालेखाकार कार्यालयाच्या चमूने तात्काळ सोडवणूक केली.

कनिष्ठ लेखापाल राधिका निरंतर यांनी आभार मानले. श्रीमती जगनाथन यांनी उपस्थित निवृत्तीवेतन धारकांच्या अडचणींची सोडवणूक केली. निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये महालेखाकार कार्यालयाची भूमिका मांडली. कार्यक्रमासाठी कनिष्ठ लेखापाल सुबोध भगत, आदित्य सुरजूसे, लेखा लिपीक प्रणीत टिंगणे, सोनू राठोड, दिपक चव्हाण यांनी पुढाकार घेतला.

00000000




चिखलदरा येथे पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 10 (जिमाका) : चिखलदरा येथे स्काय वॉक, गोलमार्ग, ग्लो गार्डन, मधाचे गाव आमझरी आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे पाठपुरावा करण्यात येत आहे. चिखलदरा परिसरात पर्यटन क्षेत्र विकासाला वाव असून याठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी चिखलदरा येथे सिडकोमार्फत स्कायवॉकचा आढावा घेतला. स्कायवॉकची लांबी असल्याने मध्यभागी आधार द्यावा लागणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली आहे. या स्कायवॉकला कायमस्वरूपी आधार द्यावा लागणार असल्यामुळे या भागातून माकड किंवा इतर प्राणी चढून जाऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. यासोबतच 27 किलोमीटरचा गोलमार्ग तयार करण्यात येणार आहे. वन क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी. तसेच ग्लो गार्डनसाठी शक्यता तपासून पहाव्यात.

चिखलदरा येथे पर्यटन वाढीसाठी नवीन प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. याठिकाणी ट्रेकींगचे पर्याय दिल्यास पावसाळ्यानंतर मार्चपर्यंत पर्यटक येतील. यासाठी वन विभागाने ट्रेकचे मार्ग निश्चित करावेत. पर्यटनामुळे चिखलदरामध्ये क्रांती घडू शकते. त्यामुळे येथे पर्यटकांना सुविधा द्याव्यात. पीएम मित्रा पार्कमधील महापारेषणने उपकेंद्राचे काम सुरू करावे. यासाठी आवश्यक असणारे सहकार्य करण्यात येईल. यासोबतच मेळघाटातील 22 गावांच्या विजेच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची परवानगी मिळातच इतर कामे करावीत. आमझरी मधाचे गाव म्हणून विकसित करण्यात येत आहे. येथे शबरी महामंडळाने रिसॉर्टसाठी एकत्रितरित्या कार्य केल्यास जादा पर्यटकांची सुविधा निर्माण होण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेज, संत्रा प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात यावी, अशी सूचनाही श्री. येरेकर यांनी केली.

0000000



बारावीची परीक्षा 'कॉपीमुक्त' वातावरणात सुरू

*जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्राना भेटी

*पहिल्याच दिवशी प्रशासनाचा कडक पहारा

अमरावती, दि. 10 (जिमाका): बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. जिल्ह्यातील 137 केंद्रांवर पहिल्या दिवशीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्‍यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या 'कॉपीमुक्त' अभियानामुळे परीक्षा केंद्र परिसरात शांतता दिसून आली. आज एकाही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही.

कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून नियोजन करण्यात आले आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संस्था प्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यानुसार प्रत्येक परीक्षा केंद्रावर पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रावरील कोणत्याही गैरप्रकारासाठी या समितीला जबाबदार धरले जाणार आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी आज सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्था प्रमुखांशी संवाद साधून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. प्रशासनातर्फे भरारी व बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागातील वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्र भेटीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज जिल्हाधिकारी अशिष येरेकर यांनी अमरावतीतील विद्याभारती येथील परीक्षा केंद्राला भेट दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी नांदगाव पेठ येथील दोन केंद्राची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने कोणत्याही केंद्रावर बाहेरून असामाजिक तत्वांचा उद्रेक आढळून आला नाही.

जिल्हा प्रशासनाने धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी आयएफएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, निता कट्टे, किर्ती जमदाळे यांनी परिसरातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच मेळघाटातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

केवळ शिस्तच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सोयीचाही विचार प्रशासनाने केला आहे. परीक्षा कालावधीत विद्युत पुरवठा अखंडित रहावा आणि परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यासाठी सहकार्य करावे, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परीक्षेत कॉपी किंवा इतर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध 'महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस ॲक्ट 1982'च्या कलम 8 सह भारतीय दंड विधानाच्या कलम 34, 188 व 127 नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. बारावीच्या परीक्षा केंद्रावर अनुचित आणि कॉपीचा प्रकार होत असल्यास याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000




जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये राज्यात तिसरा, विदर्भात अव्वल

*जिल्हाधिकाऱ्यांकडून बँकांना कडक तंबी

 

            अमरावती, दि. 10 (जिमाका): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्याने मोठी झेप घेतली असून, कर्ज मंजुरीमध्ये जिल्हा विदर्भात प्रथम तर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत हा आढावा घेण्यात आला.

               उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हाधिकारी 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 साठी जिल्ह्याला 1600 कर्ज प्रकरणांचे लक्ष्य देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने 3 हजार 704 प्रस्ताव बँकांकडे पाठवले असून, त्यापैकी 802 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

            सरकारी योजनांच्या कर्ज मंजुरीबाबत खाजगी बँकांकडून दाखवण्यात येणाऱ्या अनास्थेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयसीआयसीआय, ॲक्सिस, एचडीएफसी आणि येस बँक या बँकांच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढत, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भर सभेतून निघून जाण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यातील नवउद्योजक युवक-युवतींच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमरावती येथे 'स्वरोजगार महासंमेलन' आयोजित करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल. यात स्वयंरोजगारातून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी विशेष स्टॉल्स उभारले जातील. यात नाविन्यपूर्ण उत्पादन करणाऱ्या उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. बेरोजगार युवक-युवतींनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000000




जिल्हाधिकारी कार्यालयात 'सुरक्षित इंटरनेट दिन' उत्साहात साजरा

'स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय' या संकल्पनेवर भर

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम

             अमरावती, दि. 10 (जिमाका) : आजच्या वेगवान डिजिटल युगात इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरक्षितरीत्या व्हावा, या उद्देशाने 'सुरक्षित इंटरनेट दिन' जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी हा दिवस स्मार्ट टेक, सुरक्षित पर्याय - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या संकल्पनेवर आधारित होता.

               जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनातील  जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी मनीष कुमार आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल ताहीर अली सय्यद यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, पासवर्डची सुरक्षितता आणि ओटीपी शेअर न करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

               यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, डिजिटल हायजीनमध्ये डिजिटल अकाउंट्स आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या पद्धती, सोशल मीडियाचा वापर करीत असताना शासकीय काम आणि वैयक्तिक जीवनात सोशल मीडियाचा जबाबदार वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोविंद धनेज, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'इंटरनेट आणि एआयच्या सुरक्षित वापरा'ची सामूहिक शपथ घेतली. तसेच, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी एका विशेष प्रश्नमंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.

0000000


DIO NEWS AMRAVATI 12-02-2026

                           मेळघाटच्या विकासासाठी आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देणार -जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती, दि. 12 (जिमाका):...