Friday, June 12, 2026

DIO NEWS AMRAVATI 12.06.2026

 



जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा

तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम'; नागरिकांशी साधला थेट संवाद

अमरावती, दि. 12 (जिमाका) :जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकताच तिवसा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे मोझरी येथे 'गावभेट व गावमुक्काम' केला, ज्यामुळे 'प्रशासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचे पाहायला मिळाले. 

              दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, ११ जून रोजी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मौजे शिवणगाव येथील कृषी विभागांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील प्रकल्पांना भेटी दिल्या. यामध्ये निलेश कुरवाडे यांच्या 'अर्क आईस्क्रीम युनिट ' आणि स्वाती डोळस यांच्या 'हळद पावडर प्रकल्पा'ची पाहणी करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच शिवणगाव येथील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            यानंतर त्यांनी तिवसा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून डॉ. पंजाबराव देशमुख खरेदी-विक्री संघाच्या ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 

जिल्हाधिकाऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर गतिमान कारवाई करण्याचे निर्देश दिले. गुरुदेवनगर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामूहिक प्रार्थनेला उपस्थित राहिले. तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त जनार्धन बोथे गुरुजी यांचा शाल व श्रीफळ देऊन प्रशासनातर्फे सत्कार केला. 

सायंकाळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी मोझरी येथील झेंडा चौकात ग्रामस्थांशी व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत अनेक प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेतले व रात्री मोझरी गावातच मुक्काम केला. 

  दुसऱ्या दिवशी, सकाळी त्यांनी मोझरी विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध इमारतींच्या बांधकामांची पाहणी केली. यानंतर तिवसा नगर पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन डेपोला भेट देऊन मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथील स्वच्छता, कर्मचारी उपलब्धता व आरोग्य सुविधांची तपासणी करून त्यांनी आवश्यक सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नूतनीकरण करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाची पाहणी करून त्यांनी दप्तराच्या कामकाजाचाही आढावा घेतला. 

            यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार मयूर कळसे, गट विकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि लोकाभिमुख दौऱ्यामुळे तिवसा तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती अत्यंत सकारात्मक व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0000


 

 

बोगस 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांचा साठा जप्त;

७ लाख १२ हजारांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

अमरावती, दि. १२ (जिमाका): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांकडून चढ्या दराने वसुली केली जाऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

मोहिमेदरम्यान कृषी विभागाचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथक आणि पोलीस विभाग यांनी नुकतीच संयुक्तपणे मोठी कारवाई केली. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विराग देशमुख यांना पोलीस पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील मौजा निमगव्हाण (ता. चांदूर रेल्वे) आणि तळेगाव दशाशर पोलीस स्टेशन (ता. धामणगाव रेल्वे) यांच्या सीमावर्ती भागातील शेतात ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला अनधिकृत आणि बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

संबंधित शेतात धाड टाकली असता तेथे ९ गोण्यांमध्ये 'महाराजा', 'विराट', 'ग्लायको गार्ड' आणि 'कोहिनूर' अशा विविध नावांची बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांची एकूण ४३२ पाकिटे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या या बियाण्यांची एकूण किंमत ७ लाख१२ हजार ८०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमसिंग बलजितसिंह चौधरी (वय २१ वर्षे, मूळ रा. वाडी विस्तारवरदिया, जिल्हा कच्छ, गुजरात; हल्ली मुक्काम हिरापूर, ता. धामणगाव रेल्वे) याला ताब्यात घेतले आहे. पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक रवी राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९ व नियम २०१० आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील विविध कलमांच्या उल्लंघनाखाली करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संजय पाटील आणि जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मल्ला तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*****

 

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) (3) लागू

अमरावती, दि. 12 (जिमाका) : शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू करण्यात आला असून सदर आदेश आज  दि. 11 ते 25 जून 2026 च्या  मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

0000

 

 

 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी १९ जूनपर्यंत मुदत

अमरावती, दि. १२ (जिमाका): सन २०२६-२७ या वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 'मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने' पुरवण्याच्या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत शुक्रवार,  दिनांक १९ जून २०२६ पर्यंत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र बचत गटांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 

00000

 

नौदल माजी सैनिक आणि विधवांच्या

पेन्शन समस्या निवारणासाठी सोमवारी विशेष शिबिर

अमरावती, दि. १२ (जिमाका): मुंबई येथील 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट' (INS Trata, Naval Unit) कडून नौदलाचे माजी सैनिक (Naval ESMs) आणि त्यांच्या विधवा यांच्या पेन्शन तसेच इतर दस्तऐवजांशी संबंधित प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी 'आयएनएस त्राता, नेव्हल युनिट'ची एक विशेष चमू येत आहे. ज्या नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा भगिनींच्या पेन्शन किंवा इतर कागदपत्रांबाबत काही तक्रारी अथवा समस्या असतील, त्यांनी सोमवार, दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे आपल्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  मेजर आनंद पाथरकर यांनी केले आहे.

0000

Thursday, June 11, 2026

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 



मेडिसिटीद्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

·         एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी

 

क्लीव्हलँड, ओहायो | 10 : मेडिसिटीही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या हील इन इंडियाया दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी मित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले."

भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आलेली नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत सुमारे 250 एकर क्षेत्रावर विकसित केली जाणार आहे.

प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल. या प्रकल्पातून सुमारे 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि 10,000 हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

 

एनएमआयएमसीची संकल्पना केवळ आरोग्य सेवा पुरविण्यापुरती मर्यादित नाही. या परिसंस्थेमध्ये जागतिक दर्जाची रुग्णालये, वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षण संस्था, क्लिनिकल संशोधन केंद्रे, जैवतंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आरोग्य सेवा नवोन्मेष, वेलनेस पायाभूत सुविधा आणि संबंधित आरोग्य सेवा एकाच सहयोगी कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार आहेत.

मेडिसिटीभोवती विकसित होणाऱ्या व्यापक नवोन्मेष परिसंस्थेचा भाग म्हणून, लक्ष्मी एन. मित्तल यांनी स्थापन केलेल्या एलएनएमआयआयटी, जयपूरने क्लीव्हलँड क्लिनिक आणि एनएमआयएमसीसोबत संशोधन पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान क्षमता आणि शैक्षणिक कौशल्य उपलब्ध करून अत्याधुनिक आरोग्य सेवा नवोन्मेष, ट्रान्सलेशनल रिसर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रिसिजन मेडिसिन उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

क्लीव्हलँड क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. टॉम मिहाल्जेविक म्हणाले, "क्लीव्हलँड क्लिनिक जगभरातील धोरणात्मक भागीदारीद्वारे रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहे. एनएमआयएमसी हा भविष्यातील रुग्ण, आरोग्य व्यावसायिक आणि संशोधकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या दूरदर्शी आरोग्य परिसंस्थेत आमचे कौशल्य योगदान देण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासन, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भारतात क्लिनिकल उत्कृष्टता, नवोन्मेष आणि शिक्षणासाठी जागतिक दर्जाचे व्यासपीठ उभारण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे."

ब्रुकफिल्डचे व्यवस्थापकीय भागीदार आणि आशिया पॅसिफिक विभागाचे रिअल इस्टेट प्रमुख अंकुर गुप्ता म्हणाले, "नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिणाम घडवून आणणारी पायाभूत सुविधा उभारण्याची एक अद्वितीय संधी आहे. महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यासोबत भविष्यातील अनेक पिढ्यांना लाभदायी ठरणारे जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे."

आरोधन हेल्थ सिटीच्या संस्थापक आणि संचालक डॉ. सलोनी पटवर्धन म्हणाल्या, "जगातील सर्वोत्तम संस्थांना एकत्र आणून एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आजचा हा टप्पा आम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन गेला असून नवी मुंबईमध्ये जागतिक आरोग्य सेवा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे."

महाराष्ट्र शासन या भागीदारीसाठी आवश्यक सहकार्य करेल तसेच लागू असलेल्या धोरणे आणि नियमांनुसार आवश्यक मंजुरी आणि परवानग्या मिळविण्यासाठी या समूहाला मदत करेल.

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विषयी

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी हा महाराष्ट्र शासन विकसित करत असलेला एक परिवर्तनकारी आरोग्य आणि जीवन विज्ञान उपक्रम आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक म्हणून विकसित होणारा हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत उभारला जाणार आहे. जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदाते, संशोधक, शिक्षक, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणून क्लिनिकल उत्कृष्टता, संशोधन, नवोन्मेष आणि वैद्यकीय शिक्षणावर आधारित जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक आरोग्य सेवा केंद्र निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

००००

DIO NEWS AMRAVATI 11.06.2026


                        'सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम;

सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम

अमरावती, दि. 11 (जिमाका): मराठा, कुणबी व कुणबी-मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या 'सारथी' संस्थेच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकताच हा उपक्रम पार पडला. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आणि शाहू महाराजांच्या लोककल्याणाचा विचार पुढे नेणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेत अमरावती विभागांतर्गत चिखलदरा येथील गाविलगड आणि अकोला येथील असदगड किल्ल्यावर 'सारथी'च्या संशोधन अधिछात्रवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गाविलगड येथे उपव्यवस्थापकीय संचालक सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी शंकर गोरे, रूपेश पडघन, सदाशिव आरसोड, योगेश भोयर, पवन मापारी आणि कर्मचारी किरण चाफाले, देवानंद सोळंके व कुलदीप सूरकर यांनी परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रजातींच्या बिया, माती, शेण व बाविस्टीन पावडरचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले 'सिडबॉल' चिखलदरा परिसरात टाकले, जेणेकरून पावसाळ्यात उत्तम वृक्षनिर्मिती होईल.

तसेच, अकोला येथील असदगड किल्ल्यावर अक्षय बांगर, अनिरुद्ध दळवी, अमोल धोत्रे, अजय काळे, सूरज पारस्कर आणि प्रिया शेटे या संशोधक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीतील गड-किल्ल्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले असून, नागरिकांनी या वास्तूंचे पावित्र्य राखावे व स्वच्छता ठेवावी, असे आवाहन 'सारथी' संस्थेने केले आहे.

000000000



मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज;

मालखेड तलावावर रंगीत तालीम संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने  मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

 

            निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव येथे जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉकड्रिल) पार पडली.  या रंगीत तालीमीदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे आणि पूर परिस्थितीमुळे घरांची पडझड किंवा इतर आपत्ती ओढवल्यास शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून जीवितहानी कशी टाळायची, याचे थेट सादरीकरण करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती स्थानिक पातळीवर कशी हाताळावी, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील तज्ज्ञांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे दिले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत चांदूर रेल्वे तालुक्यातील महसूल विभाग, गटविकास अधिकारी, संबंधित कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेने सक्रिय सहभाग घेतला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार अनिल चौरे, पोलीस निरीक्षक श्री. मिश्रा, पोलीस निरीक्षक श्री. यादव, एनडीआरएफ नागपूरचे डॉ. झा, मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग कचोरी, महसूल अधिकारी प्रमोद शिरसाठ, तलाठी दीपक चव्हाण, आरोग्य यंत्रणेचे डॉ. अविनाश पवार, प्रीती पवार, सौरव पाठक, मनोज माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन धरमकर, विशाल लिमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य, सुमित बांबल, प्रतिक कडू, नारायण दवंगे, अशोक निंबरते तसेच 'आपला मित्र' संस्थेचे तुषार गोंडाणे व अमोल गोंडाणे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून शौर्यपूर्ण बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले.

00000000

Wednesday, June 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

 शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन

अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ही समस्या ती सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे नागरिकांमध्ये सजगता आणण्यासाठी 12 जुन रोजी जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस साजरा करण्यात येतो.

जिल्ह्यात सन 2021 ते सन 2026 पर्यंत 58 धाडसत्राचे करण्यात आले. यात 181 आस्थापनांना भेटी देऊन 25 बालक, बालकामगार मुक्त केले आहेत. यामध्ये 14 वर्षाचे आतील 10 बालकामगार आहे. तसेच 14 वर्षावरील 15 बालक आहे. बालकामगार कामावर ठेवलेल्या 8 मालकावर बालकामगार अधिनियम, 1986 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. मुक्त केलेल्या बालकामगारांच्या शैक्षणिक पुनर्वसनाकरीता शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व महापालिका यांच्‍यामार्फत 14 वर्षाखालील बालकामगाराचे पुनर्वसन करण्यात येते. बालकामगार या अनिष्ठ प्रथेतून राज्य मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाची बैठक घेण्यात येते.

तसेच केंद्र शासनाच्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय, प्रक्रियेत कामावर ठेवणे, तसेच 14 वर्ष पुर्ण परंतू 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने, नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार ते 50 हजार  रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मुलभूत अधिकारी आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले असून 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध जबर शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनाधारक, उद्योजकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

00000000

सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे.


सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व प्रगतीमुळे देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला असून, कार्बन उत्सर्जनात घट, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. From 21,801 km of electrified railway tracks in 2014 to 69,873+ km in 2026, India’s rail network has witnessed a remarkable transformation. This rapid expansion is enhancing connectivity, reducing carbon emissions, improving operational efficiency. #LongestServingElectedPMModi
 

दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे. . .


 दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे.

. . From ₹86,647 in 2014 to ₹2,43,180 in 2026, India's journey reflects a strong commitment to financial inclusion, economic growth, and improved opportunities for every citizen. #LongestServingElectedPMModi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. . . In 4,399 days, PM Modi's vision accelerated India's clean energy journey. #LongestServingElectedPMModi

 

DIO NEWS AMRAVATI 12.06.2026

  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा तिवसा तालुक्यात 'गावमुक्काम'; नागरिकांशी साधला थेट संवाद अमरावती, दि. 12 (जिमाका) :जिल्हाधिकारी आशि...