Wednesday, May 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.05.2026

 


स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार

*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक उपविभागीय अधिकारीस्तरावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी जाहीर करण्यात आलेला कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता राहणार असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार, प्रचार करणारे व्यक्ती आणि निवडणुकीशी संबंधितांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मंत्री आणि लोक प्रतिनिधी यांच्यासाठी वाहनाचा वापर किंवा प्रचारासाठी नियम ठरवून देण्यात आले आहे. तसेच प्रचार साहित्य तपासून देण्यासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती नेमण्यात आली असल्याचे सांगितले.

राजकीय पक्षांना मतदारांची ड्राफ्ट यादी देण्यात येणार असून यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्यात याव्यात. सात दिवसानंतर या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असून याद्या मतदानकेंद्रनिहाय पुरविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000000

--

Tuesday, May 19, 2026

DIO NEWS AMRAVATI 19-05-2026

                                आर्चरी वर्ल्ड कपमध्ये 'सुवर्ण' भेद करणाऱ्या

कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

अमरावती, दि. 19 (जिमाका): नुकत्याच शांघाय, चीन येथे पार पडलेल्या 'वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशिप' स्टेज 2 स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते कुमकुमचा शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जागतिक स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना 4-4 असा बरोबरीने सुटला होता. त्यानंतरच्या 'शूट-ऑफ'मध्ये कुमकुमने अचूक लक्ष्यभेद करीत चीनला पराभूत केले. या कामगिरीने भारतीय महिला संघाने 5 वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक पटकाविले. उपांत्य फेरीतही भारतीय संघाने 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत केले. या सुवर्णविजेत्या भारतीय संघात कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि 4 वेळची ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता.

कुमकुम ही गेल्या 9 वर्षांपासून अमरावती जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, 'खेलो इंडिया' आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या फॉर्मात असून, तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज 03, स्पेन (माद्रिद) येथील वर्ल्ड कप स्टेज 4 आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुमकुमसोबतच अमरावतीचा यशदीप भोगे याची देखील आशियाई गेम्ससाठी निवड झाली आहे.

कुमकुमच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कुमकुमची लहान वयातील ही कामगिरी पाहता, ती 2028 मध्ये लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाचे नाव लौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, क्रीडा मार्गदर्शक. प्रफुल्ल डांगे उपस्थित होते.

0000000

अमरावतीत दि. 22 मे रोजी मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रम

अमरावती, दि. 19 (जिमाका): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रमांतर्गत अमरावती येथे विशेष ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 22 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी रोडवरील गुणवंत लॉन येथे होणार आहे.

या मेळाव्यात आकर्षक व सुलभ कर्ज योजनांची विशेष माहिती देण्यासाठी रिटेल क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, एज्युकेशन कर्ज, इतर किरकोळ कर्ज सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, तात्काळ सल्ला आणि ऑन-द-स्पॉट प्राथमिक मंजुरीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच यावेळी इनप्रिन्सिपल सॅन्शन व चेक वितरण होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून रिजनल प्रबंधक उपस्थित राहतील.

याबाबत अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.

0000000

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

अमरावती, दि. 19 (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण दि. 19 मे पासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची रीतसर तपासणी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रती आणणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्राची प्रत, महाटेट परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत, डी. टी. एड. किंवा बी. एड. उत्तीर्ण गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र, या कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

0000000

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

52 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 19 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने आज, 19 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता घेण्यात आला. मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतींमधून 52 नोकरी इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

उद्घाटक म्हणून कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे उपस्थित होते. सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख उद्योजक म्हणून जाधव गियर्सचे प्रतिनिधी रोहित प्रांजळे, जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. चे  प्रतिक इंगोले, प्रेसिजन मेपिंगचे सचिन निचले, टॅलेन्टकॉर्प सोल्यूशन प्रा. ली. नागपूरच्या  करिष्मा पासवान आणि शिखर एज्युकेअर अमरावतीचे आयुष अग्रवाल उपस्थित होते.

उपायुक्त श्री. ठाकरे यांनी युवकांनी केवळ रोजगार मिळविणारे न होता, स्वतःचे उद्योग सुरू करून रोजगार देणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे महत्त्व पटवून दिले. ही योजना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये प्रवेश मिळविण्याची सुवर्णसंधी आणि एक उत्तम मार्ग असल्याचे सांगितले.

मेळाव्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून 164 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 124 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर मुलाखती दिल्या. सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांची योग्यता तपासून 52 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. सोनाली भोगे यांनी सूत्रसंचालन केले, पंकज कचरे यांनी आभार मानले.

0000000

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

अमरावती, दि. 19 (जिमाका) : अखिल भारतीय औषधी विजेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषधविक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहे.

बंदच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडीत व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केली आहे. सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्र औषध दुकाने, तसेच 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकानांनी समन्वय साधण्यात येत आहे. यात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले ओ. अन व औषध प्रशासन, अमरावती कार्यालया हेल्पलाईन क्रमांक - गजानन घीरके, सहायक आयुक्त (औषधे) वाशिम, अमरावती-९८५०१५०६८७, मनिष गोतमारे, औषध निरीक्षक, वाशिम, अमरावती ९५५२५७४४९५, तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पन्नाईन क्रमांक - अमरावती शहर - प्रविण देशमुख 9422158409, संजय बोबडे 9422157615, सौरभ मालानी 9423812345, मनोज डफळे 9823205250, राजा नानवाणी 9822643226 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) करण्यात मि. कृ. काळेश्वरकर यांनी केले आहे.

0000000


माझी लाडकी बहिण योजनेत ई-केवायसीसाठी

कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश नाही

अमरावती, दि. 19 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी करू शकले नाही अशा महिलांना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाही.

या बातमीमुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. बातमीमुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शहर व तालुकास्तर कार्यालयात महिलांचा जमाव होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांचे माहे फेब्रुवारी 2026चा हप्ता दि. 28 मार्च व दि. 29 मार्च 2026 रोजी जमा झालेला आहे. मार्च 2026चा हप्ता लवकरात लवकर जमा होणार असल्याने लाभार्थींनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.

00000

Monday, May 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18-05-2026




                                               मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा

-मंत्री डॉ. अशोक उईके

अमरावती, दि. 18 (जिमाका) : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहूल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्‍यामुळे या भागाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मुलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळेच त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.

मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्रपणेचर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या क्षेत्रातील सिकलसेल आणि कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कुपोषणमुक्तीसाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री डॉ. उईके यांनी, आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे. शासनाची कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत. त्यासोबतच नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची यादी अनिवार्यपणे लावण्यात यावी.

बिरसा मुंडा कृषी योजनेत शेतकऱ्यांना विहिरीसोबतच सोलार सिस्टीम, पाईपलाईन, स्प्रिंकलर आणि मोटार पंपही देण्यात यावेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळू शकेल. कृषी विद्यालयातील रिक्त पदे आणि इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय आश्रम शाळांतील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. खारी आश्रमशाळा येथे वीज कनेक्शन आणि कमी दाबाच्या विजेची समस्या जाणवत आहे. याबाबत आश्रमशाळा आणि वसतिगृहांना स्वतंत्र डीपी बसविण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले. तसेच तारूबांदा गावात वाढीव वीज पोल तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

रायपूर येथील आश्रमशाळेला जाण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता देऊन रस्ता मंजूर करण्यात यावा. १५ जूनपूर्वी सर्व आश्रमशाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि त्यासाठी पक्का जोडरस्ता तयार करण्यात यावा, असेही डॉ. उईके यांनी सूचविले.

यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनिल चौथमल, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक तसंगतुषार वारे, रमेश मावसकर उपस्थित होते. बैठकीपूर्वी डॉ. उईके यांचे धारणी येथील विश्रामगृह येथे आदिवासी परंपरेनुसार गदली सुसुन नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी डॉ. उईके यांनी सकाळी तारूबांदा येथील कांद्रीबाबा हनुमान मंदिर भेट दिली.

00000000

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

अमरावती, दि. 18 (जिमाका): मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे सोमवार, दि. 25 मे रोजी सकाळी 10 वाजता भव्य शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संस्थेच्या एनएसएस हॉलमध्ये पार पडणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण, तसेच सध्या अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. यात फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक व्हेइकल, वायरमन, इलेक्ट्रीशियन, आरएसी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील.

या भरती प्रक्रियेसाठी नागपूर आणि पुणे येथील कंपन्या उपस्थित राहणार आहे. उमेदवारांनी मेळाव्याला येताना आपला अद्ययावत बायोडाटा आणि सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण आणि अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी याच लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.

0000000




स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान

*जिल्ह्यात आचारसंहिता लागू


अमरावती, दि. 18 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करणे, १ जून रोजी नामांकने (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची अंतिम तारीख, २ जून रोजी नामांकनांची छाननी, ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान, २२ जून रोजी मतमोजणी, २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.

0000000

--

 

 

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 17-05-2026







जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा 
विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
समन्वयातून विकासकामे गतिमान करण्यावर भर

अमरावती : 16 मे 
      
      मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषद अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
      यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.
        
      बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, विकासकामांच्या प्रगतीचा, प्रलंबित विषयांचा तसेच आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना कामकाज अधिक प्रभावी, गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री महोदय यांनी दिलेत 
   
    बैठकीत पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, लघु सिंचन, ग्रामपंचायत, बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करावे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

   उमेद अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांना बळकटी देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. स्वच्छ भारत मिशन मध्ये पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसह आसपासच्या गावांचा क्लस्टर तयार करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा आणी प्रकल्पांतर्गत सेंद्रिय खत निर्मिती करून ते स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. 

    कृषी विभागाने भरारी पथक स्थापन करून कार्यान्वित करावे, महिला व बालविकास विभागाला पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून नागपूर मॉडेलच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. 

   लघु सिंचन विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून मृत बंधारे पुनर्जीवित करावे, गॅबियन बंधारे तयार करावे आणी सि एस आर निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर ग्रामपंचायत विभागाला टप्प्याटप्प्याने स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले. 
    
    सामान्य प्रशासन विभागाच्या आढाव्यात जिल्ह्यातील गट विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री महोदय म्हणालेत. आरोग्य विभागाला नागपूर मॉडेलप्रमाणे "मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र" विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात २५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

      शिक्षण विभागाने पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डिजिटल शाळा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दूरवरून शाळेत येणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

   पाणीपुरवठा विभागाला जुन्या योजनांची दुरुस्ती, रिचार्ज शाफ्ट उभारणी करण्याचे सूचित करून पाणीटंचाई निधी तातडीने वितरित केला जाईल असेही सांगण्यात आले. 
      
    वाचन संस्कृतीला बाळकट करण्यासाठी जिल्ह्यातील  १०० गावात "मॉडेल वाचनालये" तयार करण्यात येणार असून त्यासाठी वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचा उपयोग करावा असे निर्देश मा. मंत्री महोदय यांनी दिलेत.  

     एल निनो च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रत्येक गावात नाला खोलीकरण, शेततळे आणि इतर उपाययोजना हाती घेण्यावर भर देण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सिंचन, घरकुल दिवाबत्ती आणि सौर ऊर्जा या विषयांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी  बैठकीत दिले. याशिवाय, यावर्षी कोणत्याही निधीतून अनावश्यक सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत आणि गावांतील पथदिवे सौर ऊर्जेवर रूपांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

                           00000


 

Saturday, May 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026












 

 महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

* कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई करणार

अमरावती, दि. 16 (जिमाका) : रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा जोतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे एक हजार हेक्टर सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026 ची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, केवलराम काळे, प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. देशस्तरावर सेंद्रिय शेतीबाबत जनमत तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरवातीला उत्पादकता कमी होत असली तरी रासायनिक खतांचा खर्च कमी होत असल्याने आणि शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कृषि विभागाने कृषि सहायकापासून तालुका कृषि अधिकारी स्तरापर्यंत उद्दीष्ट देऊन जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत सकारात्मक वातावरण तयार करावे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांची रासायनिक खतांवरील अवलंबितता कमी होण्यास मदत मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून कृषि निविष्ठांमध्ये लिंकिंगच्या तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी किवा स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर लिंकिंग होणार नाही, यासाठी कृषि विभागाने भरारी पथकामार्फत कारवाई करावी. आवश्यकता भासल्यास विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत लिंकिंगचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. येत्या काळात दुकानात लिंकिंगचे साहित्य ठेवता येणार नाही. त्यामुळे लिंकिंगवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक खते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांना ताकिद देण्यात यावी. खरीपासाठी 1650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप करावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कृषि कर्जवाटप करण्यासाठी बँकांना कॅम्प लावण्यासाठी सूचना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अल निनीच्या प्रभावामुळे जलसाठे प्रभावित होणार असल्याने जिल्ह्यात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जलसंधारण आणि जलसंपदा विभागावर पाणी साठविण्याची जबाबदारी राहणार असल्याने याचे नियोजन करण्यात यावे. नाले आणि तलावातून गाळ काढण्यासाठी पुढाकार घेवून पाणी साठविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यासोबतच रिचार्ज शाफ्टची कामे हाती घेण्यात यावे. यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध करून कामे करण्यात यावी. जिल्ह्यात पांदण रस्त्यांबाबत चांगले काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन आणि मातोश्री योजना मिळून पांदण रस्यासाठी निधी मिळत आहे. यासर्व निधीचा चांगली उपयोग करण्यात यावा. या कामांना लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात. या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची नोंदणी करावी. चारा उपलब्ध होण्यासाठी बचतगटांना महसूली जागा देऊन याठिकाणी चारा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालिकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.


00000000





मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

अमरावती, दि. 16 (जिमाका): वडाळी उद्यान परिसरात भव्य ‘वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक’ उभारण्याबाबत चर्चा

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व दिमाखदार असे स्मारक उभारण्यात यावे, तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरूनही सदर स्मारक स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले. हे स्मारक अमरावती शहराची ओळख ठरणारे व नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा व स्मारक उभारणी संदर्भातील सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण प्रस्ताव अंतिम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून विकास कामांना चालना देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. वडाळी तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत व स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याबाबत उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.

0000000






15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा

घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात आता बॅटरी संचालित घंटागाड्या धावणार आहेत.

             आज जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.

            घराघरातून कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला या वाहनांमुळे गती मिळणार असून ग्रामीण स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. पारंपरिक डिझेल वाहनांच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे.

            घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यासाठी पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येकी ३ लाख रुपये किंमतीच्या या वाहनांसाठी एकूण 78 लाख रुपयांचा निधी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

             ही वाहने लवकरच संबंधित ग्रामपंचायतींच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्याद्वारे स्वच्छ भारत मिशन अभियानाला नवी गती मिळणार आहे.

 

या गावांचा समावेश:

                अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर व लोणटेक, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे व खानमपूर पांढरी, भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा शंभू, चांदूर बाजार तालुक्यातील कुर्हा, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व कवठा कडू, दर्यापूर तालुक्यातील पिंपलोद व थिलोरी, मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ व धानोरा गुरव, तिवसा तालुक्यातील शिरजगाव मो, वरुड तालुक्यातील हातुर्णा व शहापूर, धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट बु., धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोडा व काटकुंभ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

000000






















मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

-        पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक

*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी

*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली

 

अमरावती,दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना असून याव्दारे शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी व शेत मालाची ने-आण करण्यासाठी बारामाही रस्ता उपलब्ध करुन दिला जातो. यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रभावी नियोजन करुन येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा ‍जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज दिले.

दर्यापूर उपविभागीय  कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महसूल कामकाजांचा आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  माजी आमदार श्री. बुंदीले यांच्यासह  शासकीय  विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रश्न, तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांकडून प्राप्त 85 निवेदने स्विकारुन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामाध्यमातून सामान्य नागरिकांचे महसूल व अन्य महत्वाच्या विभागाशी निगडीत प्रश्न व तक्रारी एकाच जागेवरच सोडविण्यात येत आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

                                                                                                                                                                                 पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा महसूल कामांचा सविस्तर आढावा संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अन्य यंत्रणांचे प्रमुख यांच्याकडून घेतला. यानुषंगाने निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना, अकृषक परवानगी, सनद तसेच अकृषक आकारणी बदं करणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान टप्पा क्रमांक एक अंमलबजावणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसूली तंटामुक्त गाव अभियान, ई-पीक पाहणी, ई फेरफार, जिवंत 7/12 मोहिम आदी महत्वाच्या बाबीं संदर्भात पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा आढावा घेतला. उपरोक्त सर्व महत्वाच्या योजनांच्या संदर्भात नियोजित व प्रस्तावित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना यावेळी दिले.

3 नोव्हेंबर 2025 च्या शासन अधिसूचनेनुसार जनतेची मागणी लक्षात घेऊन अनाधिकृत तुकडा / गुठ्यांची मानीव नियमितीकरण करण्याची सुलभ कार्यपध्दती तयार केलेली आहे. तुकडे बंदी विषयक 7/12 अभिलेखात नोंदी घेणे आणि तुकडे बंदीमुळे नोंदणीकृत न झालेले व्यवहाराचे खरेदीदस्त नोंदविणे यानुषंगाने तरतूदी करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी टंचाई उपाययोजना, जलसंधारणाची कामे, जलसंचयन उपाययोजना, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, वीज पुरवठा आदी शासकीय विभागांचा प्रलंबित व नियोजित कामे याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी

दर्यापूर दौऱ्या दरम्यान पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजने अंतर्गत भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश वानखडे, गजानन लवटे यांच्यासह महसूल, कृषी, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000




DIO NEWS AMRAVATI 20.05.2026

  स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार *राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती अमरावती, दि. 20 (जिमाक...