पहिल्या टप्यातील जनगणना कामात
तिवसा नगरपंचायत, दर्यापूर तहसिल अव्वल
*100 टक्के घरयादी, गटयादीचे कार्य पूर्ण
*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार
अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यात जनगणनेच्या कामकाजाला सुरवात करण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यात तिवसा नगरपंचायती आणि दर्यापूर तहसिलने प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालयाने मुदतीआधीच पहिल्या टप्प्यातील कार्य 100 टक्के पूर्ण केले आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे आणि दर्यापूरचे तहसिलदार रविंद्र कानडजे यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जनगणना 2027 मधील पहिला टप्प्याचे कामकाज यशस्वीरित्या पुर्ण करणारे तिवसा नगरपंचायत हे जिल्ह्यातील प्रथम शहर चार्ज कार्यालय ठरले आहे. यानिमित्ताने तिवसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे, कार्यालय अधिक्षक रोहन राठोड, जनगणना लिपीक सुधीर विघ्ने, तांत्रिक सहायक निलकमल बोके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वीरित्या कामकाज करणारे दर्यापूर तहसील हे जिल्ह्यातील प्रथम ग्रामीण चार्ज कार्यालय ठरल्याने दर्यापूर तहसीलचे तहसीलदार रविंद्र कानडजे, नायब तहसीलदार प्रमोद काळे, जनगणना लिपीक इमरान देशमुख, तांत्रिक सहायक अपेक्षा हिवराळे यांचा सत्कार करण्यात आला.
जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात घरीयादी, गटयादी बनविण्यात येत आहे. हा टप्पा दि. 16 मे ते 14 जून या कालमर्यादेमध्ये करण्यात येत आहे. मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार कालमर्यादेप्रमाणे दि. 10 जूनपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व एचएलबीचे काम 100 टक्के पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र तिवसा नगरपंचायतीने दि. 4 जून 2026 रोजीच त्यांच्या शहर चार्जमधील सर्व एचएलबीचे काम पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे नगरपंचायत तिवसा हे जिल्ह्यासह अमरावती विभागातील 100 टक्के काम पूर्ण करणारे प्रथम कार्यालय ठरले आहे. तसेच ग्रामीण चार्ज कार्यालय दर्यापूर तहसील यांनी दि. 7 जून 2026 रोजी त्यांच्या चार्जमधील सर्व एचएलबीचे 100 टक्के काम पूर्ण केले आहे.
जिल्ह्यातील एकूण 14 शहर चार्ज कार्यालयापैकी 9 चार्ज कार्यालयांनी 100 टक्के काम पूर्ण केले असून उर्वरित 5 कार्यालयांचे कामकाज 85 टक्केपर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच 14 ग्रामीण चार्ज कार्यालयापैकी एका चार्ज कार्यालयाचे 100 टक्के काम पूर्ण झालेले असून 11 ग्रामीण चार्ज कार्यालयाचे काम 90 टक्केपेक्षा जास्त झालेले आहे.
0000000
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
*ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 8 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर 125 वी जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, अमरावती' येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थिनींना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षात अमरावती शहरातील महाविद्यालयांमध्ये किंवा संस्थांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे, त्या अर्ज करण्यास पात्र आहेत. यात अकरावी, पदवी, पदविका, आयटीआय प्रवेश घेतलेल्यांना प्रवेश मिळणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत निवास, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत भोजन व्यवस्था, स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता, शैक्षणिक सहल आणि प्रोजेक्ट्स (प्रकल्प) खर्च, या सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या जाणार आहेत.
अर्ज करताना विद्यार्थिनींनी उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची झेरॉक्स प्रत, जात प्रमाणपत्र, ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.
00000
सुधारित बातमी
जिल्ह्यात 90 टक्के मतदार मॅपिंग पूर्ण
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे
अमरावती, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे अचूक सक्षमीकरण आणि मतदार मॅपिंग मोहिमेने वेग घेतला आहे. 6 जून 2026 पर्यंत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 89.72 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात दर्यापूर विधानसभा मतदार संघ 95.69 टक्क्यांसह सर्वात पुढे आहे.
जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघांपैकी दर्यापूर मतदारसंघ 95.69 टक्के मॅपिंगसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ धामणगाव रेल्वे 94.88 टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघही 80.06 टक्के मॅपिंगसह प्रगती करीत आहे. जिल्ह्यातील एकूण 25 लाख 58 हजार 364 मतदारांपैकी 22 लाख 95 हजार 319 मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहेत. उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.
नगरपालिका क्षेत्रात सरासरी 85.19 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात भातकुली नगरपालिका 95.57 टक्केसह सर्वात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील मॅपिंगच्या प्रक्रियेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 17 मार्च रोजी जिल्ह्याचे मॅपिंग 46.37 टक्के होते. यात आता जिल्हा आता 89.72 टक्केवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रगती अमरावती मतदारसंघात झाली असून, तिथली टक्केवारी 28.03 टक्क्यांवरून 80.06 टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. मतदारांनीही मॅपिंगच्या कार्यात सहकार्य करावे, बीएलओंकडून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
0000000
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा कृषि आउटरीच कॅम्पमध्ये 19 कोटींचे कर्जवाटपअमरावती, दि. 8 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे शनिवार, दि. 6 जून रोजी दर्यापुर येथील माहेश्वरी भवन येथे मेगा कृषि ऋण मेळावा घेण्यात आला. यात 19 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
नाबार्डच्या डीडीएम रश्मिता पंचाले अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगर विकासचे सहआयुक्त डॉ. विकास खंडारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.
श्री. पाण्डेय यांनी बँक विविध कृषि योजनामार्फत कृषि विकासासाठी कार्यरत आहे, देशातील कृषि उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनाची माहिती विनय वैश यांनी दिली. श्रीकांत पडवल यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.
.jpeg)
.jpeg)
