डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण
अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३० नवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अमरावती शहर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. ही नवीन अत्याधुनिक वाहने यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आज पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. अमरावती शहर पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या ३० नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे आणि गस्त घालणे अधिक सुलभ होणार आहे.
या सोहळ्याला आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, अमरावती शहर हे शिक्षणाचे, संस्कृतीचे केंद्र आहे. येथे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण अमरावतीत सीसीटीव्ही सर्वेलन्सचे जाळे विणले जाईल. यामुळे अवैध धंदे करणारे समाजकंटकांवर चाप बसणार आहे.
पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे विशेष बंदोबस्त ठेवावा. तसेच, 'पोलीस मित्र' संकल्पना राबवून सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. महामार्गावर गोवंश तस्करी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे आणि रात्रीच्या वेळी दुचाकीवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. प्रसारमाध्यांमध्ये प्रसारीत होणाऱ्या बातम्यांवर त्वरित कार्यवाही करा. बातम्यांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती प्रसारमाध्यमांना द्या, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे त्यांनी यावेळी दिले.
पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी तर आभार पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मानले.
00000000
उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ;
अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ
अमरावती, दि. 10 (जिमाका): उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे, त्याअंतर्गत अमरावती विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी ही 10 टक्के दरवाढ मंजूर केली आहे.
या निर्णयामुळे साध्या बसचा सध्याचा 10.05 रुपये प्रति टप्पा दर आता 11.05 रुपये इतका होईल. अमरावती येथून विविध महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुधारित दरपत्रकानुसार, अमरावती ते नागपूर प्रवासासाठी आता 290 रुपये (आधी 262), अमरावती ते धारणी 268 रुपये (आधी 242) आणि अमरावती ते अकोला 191 रुपये (आधी 172) मोजावे लागतील. तसेच परतवाडा, दर्यापूर आणि मोर्शी या मार्गांसाठी 91 रुपयांऐवजी 102 रुपये भाडे आकारले जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे ही भाडेवाढ केवळ 'साध्या बस' प्रकारासाठीच लागू असून, महामंडळाच्या इतर प्रगत सेवांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे नियंत्रक सचिन डफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
000000
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
‘समता सप्ताह’ सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण
अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निधीतून विशेष तरतूद केली जाते. या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित 'समता सप्ताह' अंतर्गत विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि लाभ वितरण सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर ,प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज 140 कोटी भारतीय एकत्रित आहे. ही संविधानाची ताकद आहे. 'समता सप्ताह' सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शहरातील इर्वीन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्मारक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक सुविधेअभावी एकही विद्यार्थी मागे पडू नये याची दक्षता घ्यावी. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीमध्येही समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका आणि ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने’अंतर्गत लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती तसेच इतर विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार श्रीकृष्ण पखाले यांनी केले.
0000000
भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप
अमरावती, दि. 10 (जिमाका): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले,नियोजित भूमापन मोजणीचा कालावधी कमी करून तो पंधरा दिवसांवर आणावा. त्यासाठी मोजणी साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आले आहे. यापूर्वी नियमित मोजणीसाठी 90 दिवस तसेच द्रुगतीसाठी 30 दिवस असा कालावधी होता. हा कालावधी कमी करण्यात यावा. जिल्ह्यात या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मनुष्यबळाची भरती करण्यात यावी. नगर भूमापनचे काम भू -नक्शा या प्रकल्पाखाली करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या स्तरावर जिल्ह्यातही प्रकल्प राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.
00000000
गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण, कुस्ती मॅट वितरण
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बावनकुळे
अमरावती, दि. 10 (जिमाका) : गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी सन 1914 मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचे गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने नामफलकाचे लोकार्पण, तसेच कुस्ती मॅट वितरण सोहळा शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी पार पडला. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन, तसेच कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार प्रविण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.
प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे आणि आशीष हटेकर यांनी सूत्रसंचालन केले.
00000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)