Thursday, April 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, दुपारी 2 वाजता श्री. बावनकुळे हे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेल्या नवीन शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त समाज कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम, तसेच सायंकाळी 5 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असोसिएशनतर्फे आयोजित गजलनवाज भिमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव व नागरी सत्काराला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरूवर्य अंबादासपंत वैद्य मार्गाचे नामकरण आणि कुस्ती मॅटचे उद्घाटन करतील.

श्री. बावनकुळे हे सायंकाळी 7 वाजेनंतर डॉ. सुनील देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 09 : जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात येवदा, वडनेर गंगा येथे आरोग्य सुविधांसाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. तसेच रूग्णांच्या तपासण्यांसाठी सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. दर्यापूर तालुका अल्पसंख्याकमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागांचा शोध घेण्यात यावा. गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वन विभागातर्फे नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

00000






मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;

महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका): अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि 'एस आय आर' (SIR) मॅपिंगच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ  सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या सोडवून मॅपिंग प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रामध्ये अद्याप मुख्य 'एस आय आर' प्रोग्राम सुरू झाला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा त्रस्त होऊ नये. मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ज्या प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'विशेष कॅम्प' आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदारांनी घाबरून न जाता या दोन दिवसांच्या शिबिरात आपले नाव आणि मॅपिंगची खातरजमा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, राजेश धवणे (निवडणूक विभाग), कृष्णा गाडेकर, महसूल सहाय्यक भारत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांनी बीएलओंच्या कामात पूर्णतः सहाय्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होईल, असा विश्वास महापौर श्री. तेजवानी यावेळी व्यक्त केला.

00000

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1

सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

          मार्च-2026 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल-2026 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

 

Wednesday, April 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026





                                         अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर;

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवाद

            अमरावती, दि. 08 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती मार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रम (2025-26)अंतर्गत सुरू असलेल्या ‘फॅशन डिझायनर' या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. अंजनगाव सुर्जी येथील रोशनी महिला विकास संस्थेद्वारे संचलित या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग प्राप्त होतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

               या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, "या योजनेचा उद्देश केवळ प्रशिक्षण पूर्ण करणे हा उद्देश नसून, प्राप्त कौशल्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्त्वाचे आहे. रोशनी रेडीमेड गारमेंट फाउंडेशन, एमआयडीसी, अंजनगाव सुर्जी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या फेब्रिक क्लस्टरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी मिळवाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे होवून सक्षम व्हावे, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            महिलांनी केवळ वस्तूंची निर्मिती करून न थांबता, त्यांच्या मार्केटिंगवर  विशेष लक्ष केंद्रित करावे. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बाजारपेठेची मागणी ओळखून नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. विविध शासकीय योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा आणि सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

             या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी नोंदवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

             हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्णतः मोफत राबविला जात आहे. जिल्हा उद्योग केंद्र,अमरावती यांचे निधीतून उभे राहिलेल्या स्थानिक एमआयडीसीमधील फेब्रिक क्लस्टरमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.फॅशन डिझायनिंग सारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. . जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील गरजू तरुणांना आणि महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत.

            या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे  ,तहसीलदार पुष्पा दाबेराव, संस्थेच्या संचालिका शोभा सुने, आशिष सुने, केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

0000000

 

भारतीय डाक विभागात विमा एजंट पदासाठी 21 एप्रिलला मुलाखती

अमरावती, दि. 08 (जिमाका): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच उमेदवार किमान इयत्ता दहावी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून सुरुवातीला तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. भारतीय डाक विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसह दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 08 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत सन 2025-26 या वर्षातील नवीन अर्ज भरण्यासाठी, तसेच सन 2023-24 व 2024-25 मधील अर्जांची त्रुटीपूर्तता  करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती अशा विविध योजना राबविल्या जातात.

            सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून तात्काळ त्रुटींची पूर्तता करून घेऊन ते अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांनी नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, 'Re-Apply' करण्यासाठी आणि प्रलंबित अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

0000000

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 8 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांतील अर्जांची त्रुटीपूर्तता (Re-apply) करण्यासाठी आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा फी प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अशा पाच महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

            विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घ्यावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नवीन अर्ज भरण्याची व प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000000

Tuesday, April 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-04-2026

                                        ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 07 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता भातकुली येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतीबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली येथे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज पाहतील.

000000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 07 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 16 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

 ‘अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी 'परिवार सर्वेक्षण' मोहीम;

25एप्रिल पर्यंत नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. 07 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत 'परिवार सर्वेक्षण' अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भविष्यात नवनवीन लोककल्याणकारी योजनांची आखणी करणे हा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

'अमृत' संस्था प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य यांसारख्या 25 जातींमधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करते. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबविले जाणार असून, या काळात अमृत संस्थेचे प्रतिनिधी थेट लक्षित गटातील कुटुंबांशी संपर्क साधतील. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही प्रातिनिधिक स्वरूपात माहिती संकलित केली जाणार आहे. स्थानिक संसाधने आणि तरुणांच्या कौशल्यानुसार नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लक्षित गटातील ज्या कुटुंबांना किंवा संस्थांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची नोंदणी करावी. या नोंदणीमुळे भविष्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन 'अमृत' संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  अमरावती जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी  तसेच amrut.amravatidm@gmail.com या संकेतस्थळावर किंवा ९७३०१५१४५०  आणि ९११२२२६१५४  यावर संपर्क साधवा.

000000

जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह';

विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. 07 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

या सप्ताहाची सुरुवात 8 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभाने होणार असून 9 एप्रिलला जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर महत्त्वाच्या योजनांचे प्रबोधन केले जाईल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम होतील. 12 एप्रिल रोजी 'संविधान जागर' अंतर्गत भारतीय संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक कार्य अधोरेखित केले जाईल.

सप्ताहाच्या उत्तरार्धात 13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. विशेष म्हणजे, या सप्ताहात 'अॅट्रॉसिटी' कायद्यांतर्गत वारसांना नियुक्ती आदेश देणे, दादासाहेब गायकवाड योजनेतून जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप, 'बार्टी'च्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000







महिलांनी अर्थकारणाला गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 7 (जिमाका) : महिला बचतगटांसाठी एक लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. हा निधी शासनाला परत करावा लागणार नाही. त्यामुळे महिलांनी या निधीचा उपयोग उद्योगाच्या विकासासाठी करावी. यामुळे अर्थकारणाला गती मिळणार असून इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांचा जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेल म्हणून सुधारक सन्मान पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आज देण्यात आला. तसेच बचतगटांना एक लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषीकेश घ्यार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, विना परतावा देण्यात आलेल्या निधीचा बचतगटांनी निट उपयोग करावा. उद्योगासाठी ही पायाभरणी असून ही मोलाची रक्कम राहणार आहे. या निधीचा चांगला उपयोग करून यशकथा निर्माण कराव्यात. महिला बचतटांसाठी विविध स्टार्टअप कार्य करीत असून त्यांच्याशी जुळावे. यामुळे मार्केटींगची मदत होणार आहे. जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींची पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. तसेच महिलांची विविध कार्यकारी सहकारी संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले.

डॉ. वानखडे यांनी प्रास्ताविक केले. पुनम सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. घ्यार यांनी आभार मानले. यावेळी जनाराव खंडारे, माधान, ता. चांदूर बाजार, दत्ता कडूकर, तिवरा, ता. धामणगाव, निलेश कोहळे, सुरळी, ता. वरुड यांनी जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शक्ती महिला बचतगट, भिलटेक, ता. चांदूर रेल्वे, स्वामी समर्थ महिला बचतगट, शिराळा, ता. अमरावती, आदर्श महिला बचतगट, पूर्णानगर, ता. भातकुली या बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत तरुणांसाठी नामवंत कंपन्यांत विद्यावेतनासह प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 07 (जिमाका): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026' अंतर्गत आता देशातील पहिल्या 500 नामवंत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता पदव्युत्तर आणि एमबीए पूर्ण केलेले विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन  दरमहा 9 हजार रुपये मिळणार आहे. यापैकी 8 हजार 100 रुपये सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होतील, तर 900 रुपये संबंधित कंपनीकडून दिले जातील. याशिवाय, रुजू होताना 6 हजार रुपयांचे एकरकमी सानुग्रह अनुदान देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 9 महिन्यांचा असेल, ज्यानंतर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी आहे, ते या योजनेसाठी पात्र नसतील. तसेच, आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्च संस्थांमधील पदवीधर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. इच्छुकांनी आपली नोंदणी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर pminternship.mca.gov.in येथे पूर्ण करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

0000000

Monday, April 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-04-2026

                                    ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 06 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार दि. 8 एप्रिल आणि गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 3 वाजता विश्रामगृह, अचलपूर येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडीसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 4 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायंकाळी 7 वाजता चिखलदरा विश्रामगृह मुक्काम.

गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता धारणी विश्रामगृह येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत बैठक व चर्चा, तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे समवेत आदिवासी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत बैठक व चर्चा करतील. दुपारी 1.30 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट देतील.

000000000

कौशल्य विकास केंद्राचा अमरावती येथे रोजगार मेळावा

येत्या शुक्रवारी

            अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली, जि. अमरावती  येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये नागपूर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/8983419799/8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली जि. अमरावती येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी

30 एप्रिलपर्यंत संधी

अमरावती, दि. 06 (जिमाका): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी  संधी देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांनी अर्ज भरताना कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत नजरचुकीने चुकीची माहिती निवडली होती, त्यांना आता ही चूक सुधारण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

योजनेच्या निकषानुसार, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी (नियमित किंवा कंत्राटी) नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा, अशी अट आहे. मात्र, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थ्यांकडून या पर्यायाबाबत चुकीची नोंद झाली होती. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या पात्र महिलांच्या अर्जामध्ये अशा तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली माहिती ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अपडेट करावी. या दुरुस्तीमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात येणारे अडथळे दूर होणार असून, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

0000000

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी 9 व 10 एप्रिलला बंद;

नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे मजीप्राचे आवाहन

अमरावती, दि. 06 (जिमाका): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत (मजीप्रा) येणाऱ्या 125 गावे विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आगामी  गुरुवार, दि. 9 एप्रिल आणि शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026  रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रामार्फत करण्यात आले आहे.

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 600 मिमी व्यासाच्या मुख्य पाईप लाईनवर 'अल्ट्रा सोनिक जलमापक' बसविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, वाढीव 105 गावे पाणी पुरवठा योजनेच्या अशुद्ध जलवाहिनीचे  कामही याच काळात पूर्ण केले जाणार आहे. या तांत्रिक कामांच्या दृष्टीने दि. 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण दिवसभर या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या योजनेत समावेश असलेल्या सर्व 105 गावातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

00000000

                                               महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा पुढाकार;

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'सुधारक सन्मान­’ सोहळ्याचे आज आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका): नवतेजास्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणाऱ्या आणि गावपातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुषांचा उद्या, मंगळवार, दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न होईल. 'जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल'म्हणून निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील तीन पुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी 'सुधारक सन्मान' देऊन गौरविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने 'नवतेजास्विनी' कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्युट्रिशन या घटकासाठी वर्ष 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मूळ हेतू गावस्तरावर महिलांसाठी सक्षम व पूरक वातावरण निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे आणि समाजात संवेदनशील पुरुष रोल मॉडेल घडविणे हा आहे.

महिलांच्या प्रगतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अंतिम 3 पुरुषांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या प्रगतीत पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

0000000

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर...