Wednesday, April 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026





                                         अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर;

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवाद

            अमरावती, दि. 08 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती मार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रम (2025-26)अंतर्गत सुरू असलेल्या ‘फॅशन डिझायनर' या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. अंजनगाव सुर्जी येथील रोशनी महिला विकास संस्थेद्वारे संचलित या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग प्राप्त होतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

               या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, "या योजनेचा उद्देश केवळ प्रशिक्षण पूर्ण करणे हा उद्देश नसून, प्राप्त कौशल्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्त्वाचे आहे. रोशनी रेडीमेड गारमेंट फाउंडेशन, एमआयडीसी, अंजनगाव सुर्जी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या फेब्रिक क्लस्टरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी मिळवाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे होवून सक्षम व्हावे, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            महिलांनी केवळ वस्तूंची निर्मिती करून न थांबता, त्यांच्या मार्केटिंगवर  विशेष लक्ष केंद्रित करावे. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बाजारपेठेची मागणी ओळखून नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. विविध शासकीय योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा आणि सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

             या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी नोंदवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

             हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्णतः मोफत राबविला जात आहे. जिल्हा उद्योग केंद्र,अमरावती यांचे निधीतून उभे राहिलेल्या स्थानिक एमआयडीसीमधील फेब्रिक क्लस्टरमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.फॅशन डिझायनिंग सारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. . जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील गरजू तरुणांना आणि महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत.

            या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे  ,तहसीलदार पुष्पा दाबेराव, संस्थेच्या संचालिका शोभा सुने, आशिष सुने, केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

0000000

 

भारतीय डाक विभागात विमा एजंट पदासाठी 21 एप्रिलला मुलाखती

अमरावती, दि. 08 (जिमाका): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच उमेदवार किमान इयत्ता दहावी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून सुरुवातीला तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. भारतीय डाक विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसह दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 08 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत सन 2025-26 या वर्षातील नवीन अर्ज भरण्यासाठी, तसेच सन 2023-24 व 2024-25 मधील अर्जांची त्रुटीपूर्तता  करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती अशा विविध योजना राबविल्या जातात.

            सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून तात्काळ त्रुटींची पूर्तता करून घेऊन ते अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांनी नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, 'Re-Apply' करण्यासाठी आणि प्रलंबित अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

0000000

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 8 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांतील अर्जांची त्रुटीपूर्तता (Re-apply) करण्यासाठी आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा फी प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अशा पाच महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

            विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घ्यावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नवीन अर्ज भरण्याची व प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000000

Tuesday, April 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-04-2026

                                        ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 07 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता भातकुली येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा ज्योतीबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली येथे आयोजित रोजगार मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 1.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज पाहतील.

000000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 07 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 16 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

 ‘अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी 'परिवार सर्वेक्षण' मोहीम;

25एप्रिल पर्यंत नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. 07 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत 'परिवार सर्वेक्षण' अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भविष्यात नवनवीन लोककल्याणकारी योजनांची आखणी करणे हा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

'अमृत' संस्था प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य यांसारख्या 25 जातींमधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करते. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबविले जाणार असून, या काळात अमृत संस्थेचे प्रतिनिधी थेट लक्षित गटातील कुटुंबांशी संपर्क साधतील. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही प्रातिनिधिक स्वरूपात माहिती संकलित केली जाणार आहे. स्थानिक संसाधने आणि तरुणांच्या कौशल्यानुसार नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लक्षित गटातील ज्या कुटुंबांना किंवा संस्थांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची नोंदणी करावी. या नोंदणीमुळे भविष्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन 'अमृत' संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  अमरावती जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी  तसेच amrut.amravatidm@gmail.com या संकेतस्थळावर किंवा ९७३०१५१४५०  आणि ९११२२२६१५४  यावर संपर्क साधवा.

000000

जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह';

विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. 07 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

या सप्ताहाची सुरुवात 8 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभाने होणार असून 9 एप्रिलला जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर महत्त्वाच्या योजनांचे प्रबोधन केले जाईल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम होतील. 12 एप्रिल रोजी 'संविधान जागर' अंतर्गत भारतीय संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक कार्य अधोरेखित केले जाईल.

सप्ताहाच्या उत्तरार्धात 13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. विशेष म्हणजे, या सप्ताहात 'अॅट्रॉसिटी' कायद्यांतर्गत वारसांना नियुक्ती आदेश देणे, दादासाहेब गायकवाड योजनेतून जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप, 'बार्टी'च्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000000







महिलांनी अर्थकारणाला गती द्यावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 7 (जिमाका) : महिला बचतगटांसाठी एक लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. हा निधी शासनाला परत करावा लागणार नाही. त्यामुळे महिलांनी या निधीचा उपयोग उद्योगाच्या विकासासाठी करावी. यामुळे अर्थकारणाला गती मिळणार असून इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरुषांचा जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेल म्हणून सुधारक सन्मान पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या शुभ हस्ते आज देण्यात आला. तसेच बचतगटांना एक लाख रूपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय गट, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषीकेश घ्यार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, विना परतावा देण्यात आलेल्या निधीचा बचतगटांनी निट उपयोग करावा. उद्योगासाठी ही पायाभरणी असून ही मोलाची रक्कम राहणार आहे. या निधीचा चांगला उपयोग करून यशकथा निर्माण कराव्यात. महिला बचतटांसाठी विविध स्टार्टअप कार्य करीत असून त्यांच्याशी जुळावे. यामुळे मार्केटींगची मदत होणार आहे. जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेतील लाभार्थींची पतसंस्था सुरू करण्यात आली आहे. तसेच महिलांची विविध कार्यकारी सहकारी संस्था सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले.

डॉ. वानखडे यांनी प्रास्ताविक केले. पुनम सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. घ्यार यांनी आभार मानले. यावेळी जनाराव खंडारे, माधान, ता. चांदूर बाजार, दत्ता कडूकर, तिवरा, ता. धामणगाव, निलेश कोहळे, सुरळी, ता. वरुड यांनी जेंडर सेंसीटिव्ह रोल मॉडेलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच शक्ती महिला बचतगट, भिलटेक, ता. चांदूर रेल्वे, स्वामी समर्थ महिला बचतगट, शिराळा, ता. अमरावती, आदर्श महिला बचतगट, पूर्णानगर, ता. भातकुली या बचतगटांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

0000000

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत तरुणांसाठी नामवंत कंपन्यांत विद्यावेतनासह प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 07 (जिमाका): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026' अंतर्गत आता देशातील पहिल्या 500 नामवंत कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा तिसरा टप्पा आता अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्रधारक, पॉलिटेक्निक डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आता पदव्युत्तर आणि एमबीए पूर्ण केलेले विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

निवड झालेल्या उमेदवारांना विद्यावेतन  दरमहा 9 हजार रुपये मिळणार आहे. यापैकी 8 हजार 100 रुपये सरकारकडून थेट बँक खात्यात जमा होतील, तर 900 रुपये संबंधित कंपनीकडून दिले जातील. याशिवाय, रुजू होताना 6 हजार रुपयांचे एकरकमी सानुग्रह अनुदान देखील दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 ते 9 महिन्यांचा असेल, ज्यानंतर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी आहे, ते या योजनेसाठी पात्र नसतील. तसेच, आयआयटी, आयआयएम यांसारख्या उच्च संस्थांमधील पदवीधर या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. इच्छुकांनी आपली नोंदणी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर pminternship.mca.gov.in येथे पूर्ण करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

0000000

Monday, April 6, 2026

DIO NEWS AMRAVATI 06-04-2026

                                    ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 06 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार दि. 8 एप्रिल आणि गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 8 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 3 वाजता विश्रामगृह, अचलपूर येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडीसंबंधी बैठक व चर्चा. दुपारी 4 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. सायंकाळी 7 वाजता चिखलदरा विश्रामगृह मुक्काम.

गुरूवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता धारणी विश्रामगृह येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत बैठक व चर्चा, तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे समवेत आदिवासी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत बैठक व चर्चा करतील. दुपारी 1.30 वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट देतील.

000000000

कौशल्य विकास केंद्राचा अमरावती येथे रोजगार मेळावा

येत्या शुक्रवारी

            अमरावती, दि. 06 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली, जि. अमरावती  येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये नागपूर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/8983419799/8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली जि. अमरावती येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी

30 एप्रिलपर्यंत संधी

अमरावती, दि. 06 (जिमाका): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी  संधी देण्यात आली आहे. ज्या पात्र महिलांनी अर्ज भरताना कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी किंवा निवृत्तीवेतनाबाबत नजरचुकीने चुकीची माहिती निवडली होती, त्यांना आता ही चूक सुधारण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

योजनेच्या निकषानुसार, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी (नियमित किंवा कंत्राटी) नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेणारा नसावा, अशी अट आहे. मात्र, 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अनेक लाभार्थ्यांकडून या पर्यायाबाबत चुकीची नोंद झाली होती. अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाइन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ज्या पात्र महिलांच्या अर्जामध्ये अशा तांत्रिक त्रुटी आहेत, त्यांनी विहित मुदतीत म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत आपली माहिती ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अपडेट करावी. या दुरुस्तीमुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात येणारे अडथळे दूर होणार असून, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होण्यास मदत होईल.

0000000

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी 9 व 10 एप्रिलला बंद;

नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे मजीप्राचे आवाहन

अमरावती, दि. 06 (जिमाका): महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत (मजीप्रा) येणाऱ्या 125 गावे विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आगामी  गुरुवार, दि. 9 एप्रिल आणि शुक्रवार, दि. 10 एप्रिल 2026  रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मजीप्रामार्फत करण्यात आले आहे.

विश्रोळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 600 मिमी व्यासाच्या मुख्य पाईप लाईनवर 'अल्ट्रा सोनिक जलमापक' बसविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, वाढीव 105 गावे पाणी पुरवठा योजनेच्या अशुद्ध जलवाहिनीचे  कामही याच काळात पूर्ण केले जाणार आहे. या तांत्रिक कामांच्या दृष्टीने दि. 9 आणि 10 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण दिवसभर या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या योजनेत समावेश असलेल्या सर्व 105 गावातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

00000000

                                               महिला सक्षमीकरणासाठी पुरुषांचा पुढाकार;

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 'सुधारक सन्मान­’ सोहळ्याचे आज आयोजन

अमरावती, दि. 06 (जिमाका): नवतेजास्विनी कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणाऱ्या आणि गावपातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुषांचा उद्या, मंगळवार, दि. 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांच्या हस्ते संपन्न होईल. 'जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल'म्हणून निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील तीन पुरुषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी 'सुधारक सन्मान' देऊन गौरविण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने 'नवतेजास्विनी' कार्यक्रमांतर्गत जेंडर व न्युट्रिशन या घटकासाठी वर्ष 2025-26 चे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मूळ हेतू गावस्तरावर महिलांसाठी सक्षम व पूरक वातावरण निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे आणि समाजात संवेदनशील पुरुष रोल मॉडेल घडविणे हा आहे.

महिलांच्या प्रगतीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अंतिम 3 पुरुषांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिलांच्या प्रगतीत पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

0000000

Wednesday, April 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01-04-2026

 




राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा दौरा

अमरावती, दि. 01 (जिमाका): राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा शुक्रवार दि. 3 एप्रिल  रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

दौऱ्यानुसार श्री. भोयर शुक्रवार, 03 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता  वर्धा येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता काँग्रेस नगर येथे आगमन व माजी मंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, येथे अमरावती विभागीय शिक्षण मेळाव्यास तसेच सत्कार समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सिटी लँड अमरावती येथे साधना सहकारी बँक लि. च्या नविन शाखेचे उद्घाटनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने वरूडकडे प्रयाण करतील.

0000000







अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन अमरावती, दि. 01 (जिमाका): अमरावती शहरात श्री क्षेत्र चांगापूर हनुमान मंदीर, चांगापूर अमरावती येथे दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भावीकांची गर्दी असते. दि. 02 एप्रिल 2026 गुरूवार, सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे. सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांकरीता प्रवेश बंदी राहील. वाहतूकीस पर्यायी मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर रेल्वे अंडर बायपास या मार्गे फक्त दर्शनाकरीता जाणार दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. हनुमान मंदीर चांगापूर येथे दर्शन घेवून परतणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मंदीरा पासून बाहेर निघणार मार्ग- अयोध्या नगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाचा अवलंब करावा. पार्कीग व्यवस्था- मंदीर परिसरात वाहन पार्कींग फलक लावले असल्या त्याच ठिकाणीच वाहन धारकांनी वाहने पार्क करावे. वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000



मुख्यमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रमात जिल्ह्याची भरारी

*1 हजाराहून अधिक प्रकरणांना मंजुरी

*राज्याच्या अग्रगण्य जिल्ह्यात स्थान

अमरावती, दि. 1 (जिमाका): मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या कामगिरीमुळे राज्याच्या प्रगती अहवालात जिल्ह्याचा ठसा उमटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 1 हजार 55 प्रकरणांना मंजुरी देऊन जळगाव, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली यासारख्या जिल्ह्याच्या पंगतीत स्थान मिळविले आहे.

जिल्ह्यात योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. यात एकूण 4 हजार 184 अर्ज प्राप्त झाले. अर्जाची छाननी करून 3,691 प्रकरणे बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आली. यातील 1 हजार 55 प्रकरणे मंजूर करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी प्रगतीमध्ये क्षेत्रनिहाय प्रगतीचा विचार करता, ग्रामीण भागातून 669 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे, तर शहरी भागातील 386 तरुणांना योजनेचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागात अधिक प्रकरणे मंजूर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे.

योजना राबविताना महत्त्वाच्या पैलूवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. प्रामुख्याने महिला सक्षमीकरणात महिला उद्योजकांवर विशेष भर देण्यात आला. यासाठी एकूण 633 महिलांची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यातून महिला आणि ग्रामीण युवकांना प्राधान्य देण्यात आले. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमात कापड उद्योग क्षेत्रातील 306 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अधिकाधिक कर्जप्रकरणे मंजूर व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रयत्न केले. यात दर महिन्याला बँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या बँकांच्या शाखेला भेट देऊन प्रक्रियेविषयी माहिती घेतली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थानिक उद्योगांना चालना देणे, स्वयंरोजगार निर्मिती, बँकांमार्फत सुलभ कर्ज प्रक्रिया आणि विशेषतः युवक व महिलांना प्राधान्य देणे या चतुःसूत्रीवर भर देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रभावी नियोजनामुळे जिल्ह्यातील बेरोजगारी कमी होण्यास आणि उद्योजकतेला नवी दिशा देण्यास मदत होत आहे. या मोहिमेत स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी प्रामुख्याने सक्रिय सहभाग नोंदविला.

00000000

पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल

            अमरावती, दि. 01 (जिमाका): पश्च‍िम विदर्भातील उर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्म‍ित सिंचन क्षमता ही 85,002 हेक्टर, तर जलासाठा 564.05 दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक्यामध्ये कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीत अव्वल स्थान पटकाविले आहे.

सन 2025-26 या वर्षा करीता सिंचनासाठी 2.164 कोटी रुपये वसुली करण्याचे उद्द‍िष्ट विभागाला  देण्यात आले होते. सन 2016 मध्ये उर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाचे रुपांतरण  सिंचन पाटबंधारे विभागामध्ये करण्यात आले. कामाचे नियोजन व सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे थकित लाभधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे या विभागाने सुमारे 0.76 कोटी रुपये वसुली केली आहे.

             तसेच या प्रकल्पामधून बिगर सिंचनासाठी पाणी उचल करणाऱ्या सर्व यंत्रणांना मार्च 2026 पुर्वी  थकबाकीचा भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बिगर सिंचनासाठी 40 कोटी उद्द‍िष्टांपैकी 50.75 कोटी रुपयांचा विक्रमी वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी मिळून सुमारे 51.51 कोटी रुपये सर्वाधिक वसुलीच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतिहासामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सिंचन पाणीपट्टी वसुली झाली आहे.

उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी अधिक्षक अभियंता मनिष राजभोज यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे उद्द‍िष्टाच्या 122.17 टक्के उद्द‍िष्ट गाठले आहे. सर्व वसुलीच्या मोहीमेमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीचे योगदान महत्वाचे आहे. या मोहीमेत सहभागी सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कालवा निरिक्षक, मोजणीदार, दप्तर कारकुन व तसेच सर्व क्षेत्रीय तथा विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

00000000

जिल्ह्यात 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांवर बंदी

*नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे कारावास

अमरावती, दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2026-27ची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. कापूस लागवडीसाठी शासनाची मान्यता नसलेल्या बीजी-3 (एचटीबीटी) बियाण्यांचा वापर टाळावा, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कारावास आणि एक लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शासनाने केवळ बीजी-1 आणि बीजी-2 या वाणांच्या कापूस बियाण्यांना मान्यता दिली आहे. 'राउंडअप बीटी', 'चोर बीटी', 'वीडगार्ड' किंवा एचटीबीटी यासारखी बियाणे बेकायदेशीर असून ती पर्यावरणास घातक आहेत. या बियाण्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बियाणे केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. त्यात पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव असल्याची खात्री करावी. पॅकेटवर सरकारमान्य अधिकृत चिन्ह तपासावे. बीजी-2 (बोलगार्ड 2) वाणाची किंमत 901 रूपये आहे. बियाणे पाकीट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावी. पाकीटावरील बियाणे उगवणीची अंतिम मुदत तपासून पहावी. सर्व वाणांमध्ये बीजी-2 तंत्रज्ञान सारखेच असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करू नये, पूर्व हंगामी लागवड टाळावी. विक्रेत्याने पक्के बिल देण्यास नकार दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा.

बेकायदेशीर बियाणे विनापावती आणि चढ्या दराने विकले जातात. त्यांच्या पाकीटावर गुणवत्तेचे विवरण, तंत्रज्ञान किंवा कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा कोणताही उल्लेख नसतो. जिल्ह्यात जर अशा बोगस बियाण्यांची विक्री किंवा लागवड करताना आढळल्यास, तात्काळ कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना कळवावे. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी कळविले आहे.

0000000


DIO NEWS AMRAVATI 08-04-2026

                                                    अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थे...