Saturday, March 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28-03-2026

 











वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

           अमरावती, दि. 28 (जिमाका):माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने जपला आहे.  त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेल्या कार्य कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे कार्य आणि अनुभव आजच्या तरुण पिढीसाठी एका दीपस्तंभासारखा प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

          सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल वसुधाताई देशमुख यांना श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित सोहळ्यात 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार जयंत पाटील, सुलभा खोडके, संजय खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी मंत्री अनिल देशमुख, विलास इंगोले यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास आणि महिला सक्षमीकरण हे वसुधाताईंच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले असून हा पुरस्कार त्यांच्या तपोनिष्ठ सेवेची समाजाने घेतलेली दखल आहे. ताईंच्या प्रेरणेमुळे आज विदर्भातील महिलाआत्मनिर्भर होऊन काम करीत आहेत. वसुधाताईंचे कर्तव्यदक्ष , दिशा देणारे विचार, उत्तम वैचारिक भूमिका इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.त्यांची विदर्भाच्या प्रश्नाबाबतची जाण सखोल आहे. ते समजून घेण्यासाठी लवकरच मी त्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून घेणार आहे व पालकमंत्री म्हणून त्या विषयावर कार्य करणार आहे.

        विदर्भाचे विकासासाठी वसुधाताई आयुष्यभर झटल्यात. वसुधाताईंनी विदर्भाच्या विकासासाठी रचलेल्या पायाचा कळस पूर्ण करण्याचे कार्य मी पूर्ण करेल. त्यांचे अमरावतीच्या विकासासाठी अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करतो. विदर्भाच्या विकासासाठी त्यांची तळमळ वाया जाणार नाही. तो विकास पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे  पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले .

         पुरस्काराला उत्तर देताना वसुधाताई देशमुख म्हणाल्या, हा 'जीवनगौरव' पुरस्कार म्हणजे केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून, गेल्या अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या सामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक जीवनात काम करताना समाजाचे ऋण फेडणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना मिळणारे समाधान सर्वात मोठे होते.

 हा प्रवास कठीण होता, पण लोकांच्या प्रेमामुळे तो सुखकर झाला. माझ्या कामावर विश्वास ठेवून मला सदैव सहकार्य करणारे, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या जनतेचा हा पुरस्कार आहे . शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेचे हे व्रत आपण अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहयांद्री गावातील 'रुक्मिणी' या मुलींच्या नवीन वसतीगृह इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा. नवनीत देशमुख लिखित वसुधाताईंच्या जीवनप्रवासावर आधारित 'वसुधा' या कादंबरीचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाचे  संचालन शिप्रा मानकर यांनी केले तर प्रा. विनय वसुले यांनी आभार मानले.

******







पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा

- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती, दि. २८ (जिमाका): ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस पाटीलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारा पोलीस पाटील खऱ्या अर्थाने प्रशासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी  येथे आयोजित 'पोलीस पाटील परिषदे'त पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.   खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 ग्रामीण स्तरावर 'पोलीस पाटील' हे प्रशासनाचे डोळे आणि कान म्हणून काम करतात. गुन्हेगारी नियंत्रण आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो. त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. पोलीस पाटीलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक आयोजित करण्यात येईल. पोलीस पाटीलांच्या समस्या शासनस्तरावर मार्गी लावण्याचे आश्वासन  पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

प्रशासनात पोलीस पाटीलांचे स्थान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण स्तरावर होणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटील महत्त्वाची भूमिका बजावतात. गावपातळीवर वाद मिटवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे, अशा बहुआयामी जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत.

ग्रामीण भागातील सुरक्षिततेसाठी पोलीस पाटीलांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री श्री. बावनकुळे काढले. उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस पाटलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी तीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच आमदार राजेश वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी त्यांना सपत्नीक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.

 पोलीस पाटील परिषदेला जिल्ह्यातील पोलीस पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

       ***










अमरावतीत ऑक्टोबरमध्ये भव्य पुस्तक महोत्सव घेणार

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

*जिल्हा ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण

*गाव तिथे ग्रंथालय उभारणार

*स्पर्धा परीक्षेसाठी ई लायब्ररी उपक्रम

 

अमरावती, दि. 28 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा भव्य पुस्तक महोत्सव अमरावतीत येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्यात येईल. या ठिकाणी पश्चिम विदर्भातील सर्व नागरिक येतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. तसेच येथे आलेल्या नागरिकांनी एक तरी पुस्तक विकत घ्यावे, यासाठी दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी, सहायक संचालक राजेश पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, मनुष्याच्या जीवनात पुस्तकांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पुस्तकांमुळे समाज प्रगल्भ होऊन अनेक क्रांती घडल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. यासाठी गावात असलेल्या विनावापर इमारतींची दुरुस्ती करून येथे वाचनालय सुरू करण्यात येतील. यामुळे प्रत्येक गावात वाचनाची चळवळ उभी राहण्यास मदत होईल.

नव्याने निर्माण झालेली जिल्हा ग्रंथालयाची इमारतीमध्ये वाचन चळवळ निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवतील. त्यासोबतच ग्रंथालयाचे आधुनिकीकरण करून या ठिकाणी डिजिटल लायब्ररी निर्माण करण्यात येतील. प्रामुख्याने या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीचा उपयोग होईल. यासोबतच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर घेण्यात येतील. यासोबतच मॉड्यूलर अभ्यासिका उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

सुरुवातीला श्री बावनकुळे यांनी जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले. श्री. मडावी यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यांनी आभार मानले.

00000








 

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू

-         पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती, 28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निकाली निघाला आहे. केवळ कर्जमाफी करून चालणार नसून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीवर निर्भर करून उभे करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचे आयोजन केले. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखेडे, महापौर श्रीचंद तेजवानी, बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये कार्य करीत असताना सर्व भेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी विविध 31 योजना दिल्या आहेत. या योजना परिणामकारकरित्या राबविण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम बँक करीत आहे. शेतकरी जगला तरच देश जगू शकणार असल्याने शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

अमरावती जिल्हा बँकेने 1400 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाचा गैरवापर होणार नाही, यासाठी संचालकांनी कार्य करावे, सहकारी बँका बुडाल्यास सर्वाधिक वेदना शेतकऱ्यांना होतात, याची जाण ठेवावी. त्यामुळे या बँकांचा विकासासाठी पूर्ण सहकार्य आणि मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विविध निर्णय घेण्यात येत आहे. प्रामुख्याने शेतामध्ये जाणारे रस्ते अडवल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तसेच 2011 पूर्वी सरकारी जागेवर निवासी अतिक्रमण असलेल्या जागांना पंधराशे फुटांचे पट्टेवाटप करण्यात येणार असून एक हजार रुपयात नोंदणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री कडू आणि उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश बकाळ यांनी आभार मानले.

0000

 









विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 28 : मार्डी रोडवरील विपश्यना केंद्र आणि सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सांस्कृतिक भवनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

लोकार्पण कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, नगरसेविका सुरेखा लुंगारे आदी उपस्थित होते. सुरुवातीला श्री. बावनकुळे यांनी बुद्ध वंदेनेत सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विपश्यना केंद्राची पाहणी केली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शासनाने बांधलेले हे सांस्कृतिक भवन सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहावे. या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांसाठी मदत करण्यासाठी केंद्र उभारावे. तसेच आधुनिक सुविधांनी युक्त इ-लायब्ररी, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे केंद्र उभे करावे. यासोबतच कौशल्य विकासासाठीही प्रयत्न करण्यात यावेत. संस्थेने उभारलेल्या कार्यासाठी सर्वोत्तरी मदत करण्यात येईल.

चांगले जीवनमान घडविण्यासाठी विपश्यना हा सर्वात चांगला मार्ग आहे. संस्कारमय जीवन आणि शांतीसाठी विपश्यनेशिवाय पर्याय नाही. जनतेचे कल्याण करण्याची शक्ती विपश्यनेमध्ये आहे. विपश्यना केल्याने मोठी शक्ती मिळते. यातून समाज विकासाचे कार्य घडण्यास मदत होत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

 

 अमरावतीत इंधन तुटवड्याची अफवा;

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना शांततेचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरासह जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील अग्रसेन पेट्रोल पंप, (आयटीआय कॉलेज समोरील पंप ) तसेच राजेश आणि विदर्भ गॅस एजन्सी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व ठिकाणी साठा पुरेसा असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गॅस एजन्सीवर पिण्याचे पाणी, ग्राहकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, सावलीसाठी शेड उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तासाला पेट्रोल पंपावरील उपलब्ध साठ्याची माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधन पुरवठा साखळी सुरळीत असून तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे 'पॅनिक बाइंग' (गरजेपेक्षा जास्त खरेदी) टाळावी, कारण यामुळेच विनाकारण गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

0000000

 

 

 





Friday, March 27, 2026

DIO NEWS AMRAVATI 27-03-2026

 


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

            अमरावती, दि. 27 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवार दि. 28 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.

            दौऱ्यानुसार] श्री. बावनकुळे शनिवार, 28 मार्च रोजी सकाळी 12.30 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांचा जीवन गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्टेडीयम स्पोर्ट व वाणिज्य संकुल, नवसारी येथे पोलीस पाटील परिषद व अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता बसस्टॅंड ते रेल्वे स्टेशन रोड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण आणि ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे भेट देतील. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता सध्दम्म बुध्द विहार, मार्डी रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्राचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील. सोयीने सायंकाळी 5 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000000


जिल्हा ग्रंथोत्सवाला आजपासून सुरवात

*पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि. 27 (जिमाका): जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे शनिवार दि. 28 मार्चपासून दोन दिवसांच्या अमरावती ग्रंथोत्सव - 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात होणार असून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

हा ग्रंथोत्सव शनिवार, दि. 28 ते रविवार, दि. 29 मार्च 2026 दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, विक्री तसेच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी राहणार आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनाला महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित राहतील. खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी राहतील. खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, उपस्थित राहतील. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र उपस्थित राहतील.

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत 'ज्ञानाच्या वाटेवर वाचन संस्कृतीचा पूर्ण जागर' या परिसंवादाच्या आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे अध्यक्ष मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे राहतील. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत प्रवीण तिखे हे 'हास्याचे तिखे बोल' कार्यक्रम सादर करतील.

ग्रंथोत्सवात दुसऱ्या दिवशी रविवार, दि. 29 मार्चला दुपारी 11 ते 2 वाजता या कालावधीत 'ग्रंथाचा उत्सव, आरोग्याचा महोत्सव' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे राहतील. तसेच दुपारी 2 ते 4 या वेळेत कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.त्यानंतर दुपारी 4.30 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येईल.

नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री आणि ग्रंथोत्सव समारंभाला भेट द्यावी, तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय सहायक संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी यांनी केले आहे.

00000


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या

नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

            अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वैभवात भर टाकणाऱ्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित राहतील. खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी   राहतील. खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, उपस्थित राहतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र उपस्थित राहतील.

या सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय सहायक संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी, उपअभियंता श्रीकृष्ण गोमकाळे यांनी केले आहे.

00000000


हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यात 'डिजिटल शेतीशाळा';

1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन

अमरावती, दि. 27 (जिमाका): मागील काही वर्षांत हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली पावसाची अनिश्चितता, पावसातील खंड, मान्सूनचे उशिरा आगमन आणि गारपीट यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू केलेल्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0' (PoCRA) अंतर्गत, अमरावती जिल्ह्यासह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये 'हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने येत्या एप्रिल 2026 मध्ये विशेष 'डिजिटल शेतीशाळा' आयोजित करण्यात आल्या आहेत.

पाणी फाउंडेशनद्वारे संचालित ही डिजिटल शेतीशाळा झूम आणि यूट्यूब यांसारख्या ऑनलाईन माध्यमांतून चालविली जाणार आहे, जिथे तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना पीकनिहाय शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळेल. या नियोजित शेतीशाळांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सर्व सत्रे सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील. यामध्ये प्रामुख्याने 1 एप्रिल रोजी पेरणीपूर्व तंत्रज्ञान, बेड तयार करणे आणि बीज प्रक्रिया यावर चर्चा होईल. त्यानंतर 8 एप्रिल रोजी बीजामृत, जीवामृत व दशपर्णी अर्क यांसारख्या जैविक निविष्ठा उत्पादनाचे धडे दिले जातील, तर 15 एप्रिल रोजी एकात्मिक कीड व्यवस्थापन, सापळा पिके आणि मित्रकिडींचा वापर या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या प्रगत तंत्रज्ञान शिकता येणार असून, खते आणि कीडनाशकांचा खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. हवामानानुसार पेरणीचे अचूक नियोजन आणि तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे प्रकल्प संचालकांनी नमूद केले आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांनी या डिजिटल शेतीशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'आत्मा' प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

0000000


शहरात प्रतिबंधात्मक कलम 37  (1)  (3) लागू

अमरावती, दि. 27 (जिमाका) : शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37  (1)  (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 28 मार्च  ते  दि. 11 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कळविले आहे.

00000


अमरावती विभागात 200 तरुणांना 'टूरिस्ट गाइड' बनण्याची संधी;

पर्यटन संचालनालयातर्फे 7 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण

अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती विभागातील पर्यटन स्थळांचा विकास आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. 'नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना' अंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पाचही जिल्ह्यांतील इच्छुक युवक-युवतींसाठी 'टूरिस्ट गाइड ट्रेनिंग' आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव यांनी दिली आहे.

या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने पर्यटन स्थळांवर प्रभावी मार्गदर्शन करणे, आदरातिथ्य सेवा आणि पर्यटन संबंधित तांत्रिक कौशल्यांचे धडे दिले जाणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांची शास्त्रोक्त माहिती मिळावी, या उद्देशाने हे 'पर्यटन सुलभ मार्गदर्शक' तयार केले जात आहेत. विशेष म्हणजे, ग्वाल्हेर येथील नामांकित 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट'  आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे तज्ज्ञ प्रशिक्षक हे प्रशिक्षण देणार आहेत.

या प्रशिक्षणासाठी एकूण 200 उमेदवारांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल. अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि त्याचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयाचे अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, सिंहस्थ कालावधीत 'टूर गाइड' म्हणून अधिकृतपणे काम करण्यासाठी विशेष ओळखपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी  30 मार्च 2026  रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे (https://forms.gle/M६gq९JgMiFfB७Efv७) आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार प्रादेशिक पर्यटन कार्यालय, अमरावती येथील दूरध्वनी क्रमांक  0721-2990457 वर संपर्क साधू शकतात. पर्यटन क्षेत्रात करिअर करण्याची आणि फिरण्याची आवड असलेल्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

0000000


जिल्हात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


जिल्हात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध



जिल्हात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध

 

जिले में पर्याप्त इंधन, अफवाहों पर विश्वास न रखें - जिल्हाधिकारी येरेकर


 

जिले में पर्याप्त इंधन, अफवाहों पर विश्वास न रखें  - जिल्हाधिकारी येरेकर

निवडणूक आयोगाद्वारे ‘SIR मॅपिंग’ प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.



 निवडणूक आयोगाद्वारे ‘SIR मॅपिंग’ प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

✅ काय करावे?
१. ‘ECINET’ ॲप वापरून २००२ च्या मतदार यादीतील तुमचे नाव शोधा.
२. तुमचा मतदारसंघ क्रमांक (AC No.), मतदान केंद्र आणि अनुक्रमांक ही माहिती मिळवा.
३. ही माहिती आपल्या मतदान केंद्रावरील BLO (Booth Level Officer) यांच्याकडे जमा करून मॅपिंग पूर्ण करा.
भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आजच आपली नोंदणी तपासा!
🌐 अधिक माहितीसाठी: ceomaharashtra.gov.in

DIO NEWS AMRAVATI 28-03-2026

  वसुधाताईंचे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यां...