Wednesday, March 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25-03-2026


                                जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध

अफवांवर विश्वास ठेऊ नये : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

इंधन टंचाईबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडून घाबरून जाऊ नये. केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. तसेच नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. इंधनाची साठवणूक करण्यात येऊ नये. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

इंधन कंपन्यांच्या आजच्या सद्यस्थितीनुसार इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नायरा या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा विनाअडथळा सुरू आहे. भारत पेट्रोलियमकडे पेट्रोल 400 केएल, डिझेल 450 केएल, हिंदुस्थान पेट्रोलियमकडे पेट्रोल 320 केएल, डिझेल 284 केएल, इंडियन ऑईलकडे पेट्रोल 500 केएल, डिझेल 550 केएल, नायराकडे पेट्रोल 385 केएल, डिझेल 275 केएल इंधनसाठा आहे.

इंधनाबाबत काही अडचण असल्यास संपर्क अधिकारी जाहिर करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियमसाठी रवी चव्हाण 8879656582, हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी अंकित पटेल 9589257260, इंडियन ऑईलसाठी विलास डिग्रसे 9423585411, नायरासाठी आकाश मिश्रा 8530758369 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

यासोबतच पेट्रोल 533 केएल आणि डिझेल 742 केएल इंधन मार्गावर असून त्याचा पुरवठा देखील वेळेत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

0000000

जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी ‘टीबी मुक्त भारत अभियान’ टप्पा 2 चा शुभारंभ

अमरावती, दि. 25 (जिमाका): जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यात 'टीबी मुक्त भारत अभियान टप्पा 2' चा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य व कुटुंब कल्याण व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजनावर भर देण्याचे आवाहन केले.

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल सिरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. जोत्सना पोटपिटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.

जगभरात २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागाने अभियानाचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमती महापात्र म्हणाल्या, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून क्षयरोगाचे निर्मूलन करणे हे आपले ध्येय असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.  

डॉ. रमेश बनसोड यांनी प्रास्ताविकेतून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची रूपरेषा मांडली. या टप्प्यात जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेणे, त्यांना वेळेवर औषधोपचार उपलब्ध करून देणे आणि 'निक्षय मित्र' योजनेच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल धांडे यांनी तर आभार पुरुषोत्तम खडसे यांनी मानले.  यावेळी आरोग्य विभागातील विविध अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवक उपस्थित होते. जिल्ह्याला टीबीमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.

0000000

सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध;

11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी

अमरावती, दि. 25 (जिमाका): अमरावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठीचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार, या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहणार आहे. या प्रक्रियेत वैयक्तिक अर्जांचा विचार केला जाणार नसून, केवळ नोंदणीकृत संस्था आणि बचत गटांनाच संधी मिळणार आहे.

या जाहीरनाम्यानुसार, ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमअंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था आणि सार्वजनिक संस्था किंवा ट्रस्ट यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र अर्जांची निवड करताना बचतगटांच्या बाबतीत त्यांचे आर्थिक व्यवहार, पारदर्शकता आणि किमान 80 टक्के कर्ज परतफेडीचे प्रमाण विचारात घेतले जाईल. विशेष म्हणजे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णयापूर्वी हा प्रस्ताव संबंधित 'महिला ग्रामसभे'कडे शिफारशीसाठी पाठवणार आहे.

इच्छुक संस्थांना रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रुपयांच्या चलनाद्वारे अमरावती तहसील कार्यालयातून प्राप्त करून घेता येतील. अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया 11 एप्रिल 2026 पर्यंत आहे. कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय बंद राहील. अर्जासोबत मागील तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट (2023 ते 2026), बँक पासबुक, जागेचा 7/12 किंवा भाडेकरार आणि सर्व सदस्यांचे एकत्रित प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

00000000


चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवड

आदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

              अमरावती, दि. 25 (जिमाका): मेळघाटच्या दुर्गम भागातील तरुणांमध्ये  जिद्द आहे. या तरुणांनी आता केवळ स्थानिक रोजगारावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारासाठी सज्ज व्हावे. प्रशासकीय यंत्रणा  तुमच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार केवल कुमार काळे यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि सिपना कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच चिखलदरा येथे संपन्न झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी श्री. काळे बोलत होते.

यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर,  प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर, सुभाष गुल्हाने, प्रा. कान्हू , पंकज कचरे तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

या मेळाव्यात बी.व्ही.जी. इंडिया, नवभारत फर्टिलायझर, सनलाईट सोलर आणि प्रेसिजन मार्चिग यांसारख्या ८ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 255 रिक्त पदांसाठी 346 उमेदवारांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 142 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 2  उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात धारणी आणि चिखलदरा भागातील उमेदवारांसाठी रोजगार मेळावे घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कान्हू  यांनी तर आभार  प्रा. ढगे यांनी मानले.

00000000

धारणी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न;

मेळघाटच्या विकासासाठी रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण असल्याचे

आमदार केवलराम काळे यांचे प्रतिपादन

अमरावती, दि. 25 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि व्हिजन एज्युकेशन अकादमी, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच  मातोश्री इंदिरा महाविद्यालयाच्या रंग भवन सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार केवलराम काळे आणि धारणीचे प्रकल्प संचालक सिद्धार्थ शुक्ला यांच्या हस्ते  करण्यात आले.

 यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार केवलराम काळे म्हणाले की, मेळघाटमध्ये मोठ्या स्वरूपाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. या दुर्गम आणि आदिवासी भागाचा खऱ्या अर्थाने विकास हा तरुणांना रोजगार मिळाल्यानेच होऊ शकतो. त्यामुळे विविध कंपन्यांनी या भागातील उमेदवारांना संधी देऊन मेळघाटच्या प्रगतीला हातभार लावावा.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत धारणी आणि चिखलदरा सारख्या आदिवासी पट्ट्यात यापुढेही रोजगार मेळावे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्यात स्विगी, नवभारत फर्टिलायझर, जावील सर्किट, टी.एस.पी.एल. यांसारख्या एकूण 20 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. 355 रिक्त पदांसाठी 514 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. 5 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हिजन अकादमीचे राजकिशोर मालवीय होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल मालवीय, सुभाष गुल्हाने आणि महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आकांशा प्रभे यांनी तर आभार  प्रा. सोनकर यांनी मानले.

0000000


 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार

मेळाव्यात 38 उमेदवारांना मिळाली संधी

अमरावती, दि. 25 (जिमाका): संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' संपन्न झाला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एच. आर. देशमुख आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही तर खचून जाऊ नका, उलट नव्या जिद्दीने पुन्हा सुरुवात करण्याचा संदेश दिला. डॉ. कोळी यांनी तरुणांना केवळ नोकरी मिळवणारे न होता, नोकरी देणारे (उद्योजक) बनण्याचे आवाहन केले.

या मेळाव्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी होती.  प्रास्ताविक करताना डॉ. राजीव बोरकर यांनी सांगितले की, टीसीएस मध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, जे पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या मेळाव्यात 200 रिक्त पदांसाठी एकूण 288 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. निवड प्रक्रियेअंती 112 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 38 उमेदवारांना अंतिम निवडीचे पत्र देण्यात आले. सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.

000000

'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' उपक्रमांतर्गत

दिव्यांग नोंदणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती, दि. 25 (जिमाका): दिव्यांग तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन नुकतेच करण्यात आले. 'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्ह्यातील तीन

 केंद्रांवर ही सत्रे पार पडली. यामध्ये डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय (चपराशीपुरा), सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था (मासोद) आणि राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (मार्डी रोड) यांचा समावेश होता. या तिन्ही केंद्रांवर मिळून एकूण २५० दिव्यांग उमेदवारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली.

या शिबिरात केंद्र शासनाच्या 'नॅशनल करिअर सर्विस' पोर्टलवर उमेदवारांची जागीच नोंदणी करण्यात आली. यामुळे या तरुणांना आता स्थानिक पातळीसोबतच देशपातळीवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी उपस्थित उमेदवारांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्यायांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 डॉ. नयना कडू, कौशल्य विकास अधिकारी संदीप यादव, मुख्याध्यापक महापात्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांनी आत्मविश्वासाने स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

0000000

अमरावती मुख्य पोस्ट ऑफिसच्या वेळेत वाढ

आता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!

अमरावती, दि. 25 (जिमाका):भारतीय डाक विभागाने अमरावतीकरांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, श्याम चौक येथील प्रधान डाकघराच्या कामकाजाच्या वेळेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 मार्च 2026 पासून आता नागरिकांना रात्री 7.30 वाजेपर्यंत आपली आर्थिक कामे पूर्ण करता येतील. नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कार्यालयीन वेळेतील अडचण ओळखून डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे यांच्या मार्गदर्शनात ही 'नाईट पोस्ट' सुविधा सुरू करण्यात आली आहे.

या विस्तारित वेळेत बचत खात्यातील व्यवहार, नवीन खाते उघडणे आणि पोस्टाच्या सर्व बचत योजनांशी संबंधित कामे होतील. आज प्रवर अधीक्षक गेडाम आणि सुजितकुमार लांडगे यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. कामावरून घरी परतताना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000000

सन 2025 च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत

अमरावती, दि. 25 (जिमाका): शेती आणि पूरक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध कृषी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025 सालाकरिता या पुरस्कारांसाठी पात्र शेतकरी, महिला, संस्था आणि कृषी क्षेत्रातील व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव मागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिली आहे.

या पुरस्कारांमध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण (महिलांसाठी), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडित, आणि युवा शेतकरी पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण आणि विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. हे सर्व सन्मान महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रदान केले जातात.

निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) असलेल्या ‘Agri Award’ टॅबद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत असून, विहित नमुन्यातील अटी व शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

पेट्रोल आणि डिझेल साठ्याबाबत महत्त्वाची माहिती व आवाहन...


 


पेट्रोल आणि डिझेल साठ्याबाबत महत्त्वाची माहिती व आवाहन

Tuesday, March 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24-03-2026


                                             ग्राहकांनी हक्कांबाबत सजगता बाळगावी

-अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज

*जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : देशात ग्राहकांचे हित जोपाण्यासाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजगता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केले.

जिल्हा पुरवठा कार्यालयातर्फे आज बचत भवन येथे जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अन्न व औषधचे सहायक आयुक्त विनायक चव्हाण, वजन व मापे विभागाचे श्री. रिठे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री डॉ. अजय गाडे, अखिल भारतीय ग्राहक मंचचे जिल्हाध्यक्ष अशोक हांडे उपस्थित होते.

श्री. दानेज यांनी ग्राहकांना चांगल्या सेवा आणि वस्तू मिळाव्यात यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे. तसेच दाद मागण्यासाठी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवस्था उभारण्यात आली आहे. ग्राहकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी ही तक्रार निवारणाची सोय करण्यात आली आहे. यासोबतच होलमार्क, आयएसआय मार्क यासारख्या गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला पुरावे सादर करावे लागतात. यात संबंधित वस्तूचे देयक हे महत्वाचे असते. बियाणांमध्ये फसवणूक झाल्यास बियाणांची पिशवी आणि त्यातील थोडे बियाणे राखून ठेवणे आवश्यक आहे. यातून त्या बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. ग्राहकांच्या हक्कांविषयी चळवळ उभी राहिली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सेवा आणि वस्तू मिळण्यास मदत होत आहे.

यावेळी शिवांश मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ग्राहकांच्या हक्क आणि सुविधांविषयी पथपाट्य सादर केले.

0000000


मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार

*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

अमरावती, दि. 24 (जिमाका) : मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मेळघाटातील विविध समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

शासनाने दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी तगादा लावू नये. यासाठी अग्रणी बँकेनी इतर बँकांसोबत संपर्क साधून सूचना द्याव्यात. मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी दहा गावांचे एकत्रितरित्या पाच वर्षांचे नियोजन करून कामे करण्यात यावी. तसेच इंटरनेट सेवा नसलेल्या गावासाठी हजेरी नोंदणीसाठी पर्यायी उपाययोजना करण्यात यावी. मनरेगा अंतर्गत मिळणारे वेतन विनाविलंब मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

मेळघाटात प्रामुख्याने वन क्षेत्र असल्याने याठिकाणी होणारे रस्ते सुधारण्यासाठी वन विभागाची परवानगी गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाने यासाठी पुढाकार घेऊन रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मेळघाटात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यास येथील स्थलांतरण होणार नाही. तसेच शेतीमधील पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मेळघाटातील 22 गावाच्या पारंपारीक विजेच्या प्रश्नाबाबत राज्याकडून केंद्रीय वन्यजीव मंडळाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंडळाची परवानगी प्राप्त झाल्यानंतरच या ठिकाणी विजेची कामे होण्यास मदत मिळणार आहे.

आरोग्य सुविधा पुरविण्यासोबतच याठिकाणी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय होण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. तसेच उपकेंद्र स्तरावर रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच एकशिक्षक असणाऱ्या शाळांमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. सार्वजनिक दळणवळणाची सुविधा परिणामकारक होण्यासाठी सेमाडोह येथून बसची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.

00000000


Monday, March 23, 2026

DIO NEWS AMRAVATI 23-03-2026


                                             जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन

अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे गायन उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी केले.

00000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

अमरावती, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 27  मार्च 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी  आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

0000000

अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;

30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

अमरावती, दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) आणि लघुलेखन परीक्षेचा निकाल 10 मार्च 2026 रोजी जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 'अमृत' संस्थेने परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू केली असून, पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व  प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ प्रामुख्याने अमृतच्या लक्षित गटातील  (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) यांसारख्या विविध समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) भेट द्यावी.

अर्जदारांकडे सन 2025-26 किंवा 2026-27 या आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र , जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा (उदा. टी.सी., निर्गम उतारा), जानेवारी 2026 चे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि बँक खात्याचा तपशील (पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश) ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून विहित मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

0000000



गुरुकुंज मोझरी येथे 'मेरा युवा भारत' तर्फे शहीद दिन साजरा

अमरावती, दि. 23 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाच्या स्मृतीनिमित्त 'मेरा युवा भारत' तर्फे आज गुरुकुंज मोझरी येथे 'शहीद दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.

 भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या 'मेरा युवा भारत' अमरावती कार्यालयाच्या वतीने श्रीगुरुदेव अध्यात्म केंद्र, गुरुकुंज मोझरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला, तसेच ­‘भगतसिंग अमर रहे’ अशा घोषणा देत पदयात्रा काढली.

या कार्यक्रमाप्रसंगी श्रीगुरुदेव अध्यात्म केंद्र गुरुकुलचे संचालक रविदादा मानव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले, तर प्रास्ताविक प्रा. अंकुश मानकर यांनी केले. शहीद दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.  विद्यार्थ्यांनी वीर शहिदांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.

00000000

जिल्ह्यात एल.पी.जी. गॅसचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

तक्रारीसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक  जाहीर

अमरावती, दि. 23  (जिमाका): मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या  बीपीसीएल (BPCL), एचपीसीएल  (HPCL), व आयओसीएल (IOCL) या तिन्ही कंपन्यांच्या एल.पी.जी. गॅस सिलेंडर वितरकांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंगनंतर लवकरात लवकर 'फर्स्ट इन फस्ट आउट' (FIFO) ऑर्डरनुसार सिलेंडर उपलब्ध होईल. तसेच गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये, यासाठी टोकन सिस्टीम लागू करावी. तसेच बुकिंगनंतर ८ दिवसांचे आत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपन्या मिळून जिल्ह्यातील एल.पी.जी. गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध राहील याबाबत कटीबद्ध आहेत. त्यामुळे गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल.

सिलेंडरच्या वितरणात काही अडचणी उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित तालुकानिहाय नियुक्त केलेल्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यामध्ये जिल्हा हेल्पलाईन क्रमांक ७२१९१११४२४ असून, अमरावती शहरासाठी प्रविण राऊत (९६७३१६१९७५), मोर्शी तालुक्यासाठी  सागर बगाडे (८६००८५६४३१), नांदगाव खंडेश्वर तालुक्यासाठी  शीतल राठोड (९४२१८६९९९५), वरुड तालुक्यासाठी निखील नलावडे (९८२२५०८४०३), अंजनगाव सुर्जी तालुक्यासाठी रणजीत रामाघरे (९५११७१५१९२), तिवसा व अमरावती ग्रामीण तालुक्यासाठी  शीतल आंबटकर (९०११३४१२८७), भातकुली तालुक्यासाठी  मोनाली भोवरे (९५५२८७१५७२), धामणगाव रेल्वे तालुक्यासाठी  प्रवीण भागवत (७०३८६०६३८५), अचलपूर तालुक्यासाठी राहुल केदारे (९६६५७४४८४९), चांदुर रेल्वे तालुक्यासाठी  विश्वनाथ पखाले (९६७३५६१९६४), धारणी तालुक्यासाठी  रमेश वाढवे (९४०३५३२१९०), चिखलदरा तालुक्यासाठी  गणेश इंगळे (७५०७९५३५५५), दर्यापूर तालुक्यासाठी वैभव महाजन (९४०४२०७६०२) आणि चांदूर बाजार तालुक्यासाठी  जितेंद्र पाटील (९३५६७४२५२८) यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

00000000

Friday, March 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20-03-2026

 जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर

अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करावेत

*पशूसंवर्धन विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती अंतर्गत अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे रिक्त पदांवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी दि. 2 एप्रिलपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीच्या तरतुदीनुसार आणि नियम 2001 मधील निकषांनुसार, प्राणी क्लेश व्यवस्थापकीय समितीवरील सदस्य, गौशाळा किंवा पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष, प्राणी विषयावर कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्ती, मानवहित किंवा प्राणीमात्रांवर प्रेम करणाऱ्या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतील.

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 2 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे. सदर अर्ज जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा सदस्य सचिव, जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती, अमरावती या ठिकाणी स्विकारण्यात येतील. जिल्ह्यातील प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन पशूसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. एस. एम. कावरे यांनी केले आहे.

000000

मॅग्नेट' प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र अँग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र भेटी दि. 16 ते 18 मार्च कालावधीत पार पडल्या. प्रकल्पाच्या 'बाजार विकास व प्रोत्साहन' घटकांतर्गत दौऱ्यात 32 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

या दौऱ्यात शेतकऱ्यांना शेतमाल प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांनी चिखली येथील 'आभाळमाया शेतकरी उत्पादक कंपनी'ला भेट दिली. येथे भाजीपाला व फळे प्रक्रिया उद्योग, निर्यातीच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन फळबाग व्यवस्थापना विषयी माहिती घेतली. सिन्नर येथील कृषक मित्र ॲग्रो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे भेट देऊन परदेशातील निर्यात संधींची माहिती घेतली. त्यानंतर सह्याद्री फार्म्सला भेट देऊन शेतकरी बळकटीकरण, मूल्यवर्धन आणि मोठ्या प्रमाणावरील निर्यात साखळीचे प्रात्यक्षिक पाहिले. तसेच जैन हिल्स, जळगाव येथील टिश्यू कल्चर कंपनीला भेट देऊन केळीच्या महिला बळकटीकरण, नवीन जाती आणि दर्जेदार रोपांविषयी माहिती घेतली. जैन इरिगेशनमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याची माहिती घेऊन जैन फूड पार्कमधील प्रक्रिया केंद्राला भेट दिली.

दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेशी जोडले गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रकल्प उपसंचालक अरुण नादरे यांनी व्यक्त केला. सदर अभ्यास दौरा प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. दौऱ्यासाठी कृषि व्यवसाय तज्‍ज्ञ अक्षय गणेशपुरे आणि विद्या पुंड यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

0000000

दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग कार्ड जमा करावे

*जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन यूडीआयडी कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप ऑनलाईन यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन ते प्राप्त करून घ्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत ऑनलाईन प्रमाणपत्र वितरणाचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. लाभार्थ्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्यांनी कार्डची झेरॉक्स प्रत गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग येथे दि. 25 मार्च 2026 पूर्वी जमा करणे आवश्यक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.

0000000

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रांतील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 30 मार्चपर्यंत त्रृटी पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रांतील कमतरतेमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप त्रुटी पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. तसेच दि. 23 ते 30 मार्च 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रुटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१२६१ वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000000

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : आर्थिक वर्षाच्या शेवटी मालमत्ता खरेदी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 26 मार्चपासून सलग ही कार्यालये सुरू राहतील.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांत नियंत्रक यांच्या निर्देशानुसार, इष्टांक पूर्तीच्या दृष्टीने दि. 26 मार्च, दि. 28 मार्च, दि. 29 मार्च आणि दि. 31 मार्च या चार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये चालू राहतील. तसेच ज्या कार्यालयांची साप्ताहिक सुट्टी ही शनिवार आणि रविवार सोडून अन्य दिवशी आहे. ती कार्यालये त्यांच्या दोन साप्ताहिक सुट्ट्यांपैकी एक दिवस चालू ठेवावीत. उपरोक्त दिवसांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी तसेच अभिनिर्णय व कमी पडलेले मुद्रांक शुल्क इत्यादी कामकाज विहीत वेळेत पूर्ण होण्यासाठी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये देखील कार्यरत राहणार आहे.

सुट्टीच्या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालय आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय चालू राहणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या दस्तांची नोंदणी मुद्रांक शुल्क भरुन करावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब घोंगडे यांनी केले आहे.

000000

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी टीसीएस प्लेसमेंट ड्राईव्ह

अमरावती, दि. 20 (जिमाका) : सुशिक्षित बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवनात मंगळवार, दि. 24 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या नामांकित आयटी कंपनीमार्फत बीपीएस पदासाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून शैक्षणिक पात्रता बीए, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीव्हीओसी, बीएससी जनरल आहे. यात 2023 आणि 2024 यावर्षात उत्तीर्ण, तसेच एमए, एमकॉम 2024 आणि 2025 उत्तीर्ण पात्रता निकष राहणार आहे.

निवड प्रक्रिया ही कागदपत्र पडताळणी, योग्यता परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखतीतून होणार आहे. नोंदणीसाठी surl.li/lxxjb लिंक वरूनही नोंदणी करता येणार आहे. अधिक महितीसाठी विभागीय रोजगार मेळावा कक्ष प्रमुख अजय चव्हाण (8983419799) तसेच विभागीय कौशल्य विकास सहायक अक्षय डोईजड (7972755787) यांच्याशी संपर्क साधावा.

रोजगार मेळाव्यात उमेदवारांनी सहभागी होऊन टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, विभागीय उप आयुक्त द. ल. ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 25-03-2026

                                        जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन अमरावती, दि. 25 (ज...