Monday, February 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09-02-2026

 भूमी अभिलेखचा तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम

*नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' राबवण्यात येत आहे. यासाठी 'तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार 20 फेब्रुवारीपासून अभियान राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक तक्रारी, विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. या दिवशी तहसीलस्तरावर जिल्हा परिषद तसेच संबंधित तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती राहणार आहे.

तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमासाठी समन्वयक अधिकारी प्रशासनाने तालुकानिहाय जबाबदारी सोपवली असून उपस्थितीत तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यासाठी खालीलप्रमाणे घेण्यात आले आहेत.

सकाळी 10 ते 2 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अमरावती येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख भातकुली येथे दि. 02 मार्च, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख मोर्शी  येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख वरूड  येथे दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चांदुर बाजार  येथे दि. 23 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 10 ते 1.30 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख दर्यापूर येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 3 ते 6 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख अंजनगाव येथे दि. 26 फेब्रुवारी, 2026 रोजी, सकाळी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख चिलखदरा येथे दि. 27 फेब्रुवारी, 2026 रोजी, दुपारी 12 ते 3 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख धारणी  येथे दि. 06 मार्च, 2026 रोजी कार्यक्रम घेण्यात यईल.

जिल्हा परिषद, तसेच संबंधित तालुक्यातील इतर सर्व विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव, कृषी सहायक यांचे उपस्थितीत तालुक्यातील जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे महेशकुमार शिंदे  यांनी केले आहे.

00000000

कर्ज निवारण योजनेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू

*शेतकऱ्यांना सचिवांकडे कागदपत्रे देण्याचे आवाहन

अमरावती, दि. 09 (जिमाका): जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नसल्यास या सर्व शेतकरी सभासदांनी तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती मागविली आहे. याअनुषंगाने थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर सुरु आहे.

त्यानुसार सेवा सहकारी संस्थांचे थकीत सभासदांचे कर्ज खाते आणि इतर अनुषांगिक माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरु आहे. सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवाशी संपर्क करुन त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही, त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित संस्थेचे सचिव, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरीत संपर्क करुन आधारकार्ड आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार यांनी केले आहे.

0000000

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 9 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता तामसवाडी फाटा, ता. दर्यापूर येथे शिवछत्रपती शंकरपट कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 4.30 वाजता वडाळगव्हाण, ता. दर्यापूर येथे देवेश अशोक वडाळ यांचे शेतामध्ये कापूस काढणी यंत्राची पाहणी करतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

0000



जिल्ह्यात महारेशीम अभियानाचा शुभारंभ

*800 एकरवर रेशीम लागवडीचे उद्दिष्ट

अमरावती, दि. 9 (जिमाका): जिल्हाधिकारी आशिष येरेकार यांच्या हस्ते आज ‘महारेशीम अभियान २०२६चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम रथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच रेशीम उद्योगाची माहिती जाणून घेतली.

सन २०२६-२७ या वर्षात जिल्ह्यात एकूण ८०० एकर क्षेत्रावर रेशीम शेती लागवडीचे उद्दीष्ट आहे. यात कृषि विभागातर्फे ३०० एकर, रेशीमतर्फे विभाग: २५० एकर, आणि जिल्हा परिषदेतर्फे २५० एकर रेशीम लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जून २०२६ मध्ये तुती लागवडीसाठी ४ फेब्रुवारी ते ५ मार्चपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी 'आपले सरकार' पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने करून त्याची प्रत जिल्हा रेशीम कार्यालयात जमा करावी लागणार आहे. यासाठी प्रति एकर ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे.

शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत जॉब कार्डधारक असावा आणि त्याच्याकडे सिंचनाची सोय असावी. एका गावातून किमान पाच लाभार्थी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने सातबारा, ८-अ उतारा, चतुःसिमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

मग्रारोहयो अंतर्गत या योजनेतून शेतकऱ्यांना तीन वर्षांसाठी मजुरी आणि साहित्यासाठी एकूण ४ लाख ३२ हजार २४० रुपये दिले जाणार आहे. सिल्क समग्र-२ योजनेतून  जे शेतकरी अल्पभूधारक नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना असून यात प्रवर्गांनुसार अनुदान दिले जाणार आहे. यात १ एकरसाठी ३ लाख ७५ हजार रुपये इमावसाठी ते ४ लाख ५० हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार आहे. २ एकरसाठी ५ लाख ६२ हजार ५०० रुपये इमावसाठी ते ६ लाख ७५ हजार रुपये अनुसूचित जाती, जमातीसाठी दिले जाणार अहो.

नोंदणी, तसेच अधिक माहितीसाठी अमरावती, तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जीसाठी डी. एच. नागोलकर, संपर्क ९५२७९३४५७३, मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वेसाठी एस. बी. भोयर, संपर्क ९३७२७९१६२६, तर नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली, चिखलदरा, धारणीसाठी एस. एम. देठे ८८३०५९३४५९ या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000



शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार देणारे व्हावे

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्नेहमेळावा' उत्साहात

42 उमेदवारांची प्राथमिक निवड

            अमरावती, दि. 9 (जिमाका) : सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात राहू नये. आपल्यामधील कौशल्यांनी युवकांनी रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्नेहमेळावा' आज पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

         जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, उमेदवारांनी केवळ पदवीवर अवलंबून राहू नये. युवकांनी आता कौशल्यावर भर देणे आवश्यक आहे. सुरुवातीला पगारापेक्षा अनुभवाचा विचार करावा. आपल्यातील कौशल्य वाढवून युवकांनी स्वत:चा रोजगार उभारावा. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योगाचे स्वरूप वाढावे, असे आवाहन केले.

आजच्या रोजगार मेळाव्यात लेक्साकेम ओर्गानिक, जाधव गियर्स, अर्थ वे टेक्नॉलॉजी यांसारख्या 6 नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. यात 63 रिक्त पदांसाठी 126 उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 42 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील 8 उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. स्नेहमेळाव्यात 103 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

यावेळी जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीमध्ये यश मिळवणारे आदर्श लिहारे, निशा बंड, शशांक लोखंडे आणि विराज पुसदकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कंपन्यांमध्ये रुजू झालेल्या उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.

              यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, रेडियंट हॉस्पिटलच्या संचालक डॉ. माधुरी अग्रवाल, ईसीईचे संचालक समीर काळे, गोल्डन फायबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. प्रसाद आदी उपस्थित होते. श्री. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविक केले, प्राजक्ता राऊत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

0000000

Sunday, February 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-02-2026

    





























                                                     धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त

*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती

अमरावती, दि. 8 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे धारणी येथे आज महाविधी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्यांनी संविधानाला अभिप्रेत असलेला शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. धारणीतील महाशिबिरही न्यायप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी घेण्यात आला आहे, असे मत व्यक्त केले. यासोबतच 36 स्टॉलवर शासकीय विभागांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, तर मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती प्रविण पाटील उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले, नगराध्यक्ष सुनील चौथमल, धारणी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेमलाल कोगेकर, दत्तात्रय वमणे उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. किलोर यांनी शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो आहेत. शिबिराचे हे ध्येय असून न्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून मदत होणार आहे. संबंधिताला अधिकार आहेत, याची जाणीव करून देणे आणि त्याला माहिती देणे यासाठी शिबिर महत्वाचे ठरणार आहे. या परिसरात असलेल्या जमिनीचा प्रश्न, उच्च शिक्षणाची सोय, यासोबतच न्यायालयांसाठी जागा आदींबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील. या भागात पॉस्कोच्या तक्रारी जादा असल्याने याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे खटल्यांची संख्या कमी होऊन अन्याय दूर होण्यास मदत होईल, असे सांगितले

न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्यायाचा संदेश पोहोचविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे न्याय अधिकाराबाबत जनजागृती करणे हाच या शिबिरामागील उद्देश आहे. समाजामध्ये शोषणाविरुद्ध मौन बाळगल्यास असे करणाऱ्या व्यक्तीला बळ मिळत असल्याने या शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबतच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आणि न्यायव्यवस्था यांच्या सहकार्यातून मजबूत लोकतंत्र तयार होणार आहे. नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता न्याय मागण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या शिबिरामुळे न्यायाची संकल्पना दुर्गम भागात पोहोचवली जाणार आहे. विधी सेवा हा सेतू म्हणून कार्य करीत असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. या माध्यमातून मदतीचे कर्तव्य बजाविल्या जाणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी धारणीमध्ये दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी अकराशे नागरिकांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहे. वर्ग एक जमीन करण्याबाबत काही अडचणी येत असल्यास विशेष शिबिर घेऊन प्रश्न मार्गी काढण्यात येतील. न्यायालयासाठी धारणी उपविभागीय कार्यालयातील जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज तातडीने सुरू होईल, असे सांगितले.

कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वनविभाग, पोलीस स्टेशन, मोटार अपघात प्राधिकरण, महिला व बाल विकास आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने विविध लाभाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. धारणी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेमलाल कोगेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. धर्मेंद्र पंडित यांनी आभार मानले.

साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रंट वर्कर्स यांनी बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर पथनाट्य सादर केले. चिखलदरा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात विधी सेवा प्राधिकरणाच्या नालसा आणि मालसा गीताने करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्दिष्टांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

0000000

Saturday, February 7, 2026

DIO NEWS AMRAVATI 07-02-2026

                सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम उत्साहात

अमरावती, दि. 7 (जिमाका) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अमरावती क्षेत्रीय कार्यालयातर्फे एमएसएमई क्रेडिट आऊटरिच कार्यक्रम पार पडला.

एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक हेमंत शर्मा, अभिनंदन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी देठे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून सीए आणि एमएसएमई सबसिडी विशेषज्ञ पंकज अग्रवाल उपस्थित होते. यावेळी एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी नेत्रदीप चौधरी, सुरेश जैन इंडस्ट्रीजचे संचालक सुरेश जैन, आरोग्यम् हॉस्पिटलचे संचालक किरण हातगावकर उपस्थित होते.

हेमंत शर्मा यांनी सेंट्रल बँक ग्राहकासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. शिवाजी देठे यांनी बँक एमएसएमई क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे असे सांगितले. किरण पातूरकर यांनी अमरावती वेगाने प्रगती करत असलेले शहर असून भविष्यात अमरावतीमध्ये येणारे विविध उद्योगाबद्दल  माहिती दिली. बँक आपल्या दारी आली असून सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

पंकज अग्रवाल यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध व्यवसाय योजना आणि त्या मध्ये मिळणारे अनुदान याबाबत चर्चा करून प्रश्नाची उत्तरे दिली.

यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि एमआयडीसी असोसिएशन अमरावती यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कॅम्पमध्ये बँकेतर्फे 27 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडेय यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या सुविधा, तसेच सायबर गुन्ह्यापासून  वाचण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सावधानीबाबत मार्गदर्शन केले.

निलेश मुंदेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

00000





मेळघाटाच्या डोंगरदऱ्यांत रंगला जिल्हा प्रशासनाचा 'ट्रेकिंग' अनुभव

*ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज, दि. 7 फेब्रुवारी रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी आणि पदभ्रमंती केली. त्यासोबतच जिल्हाधिकारी यांनी मोझरी पाँईट येथून गाविलगड किल्ला पायी चढण्याचा अनुभव घेतला. त्यांनी सुमारे सहा किलोमीटर ट्रेकिंग करत दरीतून चढण्याचा थरारक अनुभव घेतला.

जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी या विशेष 'ट्रेकिंग' मोहिम घेण्यात आली. निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय प्रवास असलेला 'मेळघाट ट्रेकिंग अनुभव' या मोहिमेत सहभागी झालेल्यांना मेळघाटातील घनदाट जंगले आणि हिरव्यागार दऱ्यांचा थरार जवळून अनुभवता आला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट निसर्गाशी नाते जोडणे आणि दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळवणे असा होता.

आज सकाळी 6 वाजता मोझरी गावातून पदभ्रमंतीला सुरुवात करण्यात आली. सहभागी पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता किल्ल्यावर पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरकराव, उपवनसंरक्षक अग्रिम सैनी, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर, अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन सहारे, जिल्हा प्रशासन अधिकारी विकास खंडारे, चिखलदराचे नायब तहसीलदार सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघाटे, चिखलदरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धीरज गोहाळ, सहायक वनसंरक्षक अक्षय तळपे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. युवनाते, वनपाल विनोद कासदेकर, वनरक्षक मयूर सानप, श्री. मलवार, श्री. बोरकर, मनीष ढाकुलकर उपस्थित यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला. या मोहिमेचे नियोजन विभागीय वन अधिकारी अनंत डिगोळे यांनी केले.

मेळघाटच्या कुशीत हरवायला, निसर्गाशी नाते जुळवायला आणि आठवणींचा ठेवा जमवायला हा एक सुवर्णक्षण असल्याची भावना सहभागींनी नोंदविली. यावेळी शिवा काळे यांनी गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, महत्त्व व संरक्षणाची गरज याबाबत सविस्तर माहिती दिली. ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.

0000000

DIO NEWS AMRAVATI 09-02-2026

  भूमी अभिलेखचा तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रम *नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन अमरावती, दि. 09 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्...