Friday, April 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10-04-2026






डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३० नवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अमरावती शहर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे.  ही नवीन अत्याधुनिक वाहने यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आज पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. अमरावती शहर पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या ३० नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे आणि गस्त घालणे अधिक सुलभ होणार आहे.

 या सोहळ्याला आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, अमरावती शहर हे शिक्षणाचे, संस्कृतीचे केंद्र आहे. येथे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण अमरावतीत सीसीटीव्ही सर्वेलन्सचे जाळे विणले जाईल. यामुळे अवैध धंदे करणारे समाजकंटकांवर चाप बसणार आहे.

            पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे विशेष बंदोबस्त ठेवावा. तसेच, 'पोलीस मित्र' संकल्पना राबवून सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. महामार्गावर गोवंश तस्करी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे आणि रात्रीच्या वेळी दुचाकीवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. प्रसारमाध्यांमध्ये प्रसारीत होणाऱ्या बातम्यांवर त्वरित कार्यवाही करा. बातम्यांवर केलेल्या कार्यवाहीची  माहिती प्रसारमाध्यमांना द्या, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे त्यांनी यावेळी दिले.

              पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी तर आभार पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मानले.

00000000

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ;

अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

अमरावती, दि. 10 (जिमाका): उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे, त्याअंतर्गत अमरावती विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी ही 10 टक्के दरवाढ मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे साध्या बसचा सध्याचा 10.05 रुपये प्रति टप्पा दर आता 11.05 रुपये इतका होईल. अमरावती येथून विविध महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुधारित दरपत्रकानुसार, अमरावती ते नागपूर प्रवासासाठी आता 290 रुपये (आधी 262), अमरावती ते धारणी 268 रुपये (आधी 242) आणि अमरावती ते अकोला 191 रुपये (आधी 172) मोजावे लागतील. तसेच परतवाडा, दर्यापूर आणि मोर्शी या मार्गांसाठी 91 रुपयांऐवजी 102 रुपये भाडे आकारले जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे ही भाडेवाढ केवळ 'साध्या बस' प्रकारासाठीच लागू असून, महामंडळाच्या इतर प्रगत सेवांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे नियंत्रक सचिन डफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

000000







समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

‘समता सप्ताह सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण

अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निधीतून विशेष तरतूद केली जाते. या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित 'समता सप्ताह' अंतर्गत विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि लाभ वितरण सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

              आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील,  जिल्हाधिकारी आशिष येरेकर ,प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज 140 कोटी भारतीय एकत्रित आहे. ही संविधानाची ताकद आहे. 'समता सप्ताह' सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शहरातील इर्वीन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्मारक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक सुविधेअभावी एकही विद्यार्थी मागे पडू नये याची दक्षता घ्यावी.  नागपूरच्या धर्तीवर अमरावतीमध्येही समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका आणि ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप  करण्यात आले.  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती तसेच इतर विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

 

सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

0000000





भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

अमरावती, दि. 10 (जिमाका): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी  आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले,नियोजित भूमापन मोजणीचा कालावधी कमी करून तो पंधरा दिवसांवर आणावा. त्यासाठी मोजणी साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आले आहे. यापूर्वी नियमित मोजणीसाठी 90 दिवस तसेच द्रुगतीसाठी 30 दिवस असा कालावधी होता. हा कालावधी कमी करण्यात यावा. जिल्ह्यात या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मनुष्यबळाची भरती करण्यात यावी. नगर भूमापनचे काम भू -नक्शा या प्रकल्पाखाली करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या स्तरावर जिल्ह्यातही प्रकल्प राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.

00000000

गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण, कुस्ती मॅट वितरण

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका) : गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी सन 1914 मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचे गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने नामफलकाचे लोकार्पण, तसेच कुस्ती मॅट वितरण सोहळा शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी पार पडला. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन, तसेच कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार प्रविण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.

प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे आणि आशीष हटेकर यांनी सूत्रसंचालन केले.

00000000

 

Thursday, April 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, दुपारी 2 वाजता श्री. बावनकुळे हे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेल्या नवीन शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त समाज कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम, तसेच सायंकाळी 5 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असोसिएशनतर्फे आयोजित गजलनवाज भिमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव व नागरी सत्काराला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरूवर्य अंबादासपंत वैद्य मार्गाचे नामकरण आणि कुस्ती मॅटचे उद्घाटन करतील.

श्री. बावनकुळे हे सायंकाळी 7 वाजेनंतर डॉ. सुनील देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 09 : जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात येवदा, वडनेर गंगा येथे आरोग्य सुविधांसाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. तसेच रूग्णांच्या तपासण्यांसाठी सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. दर्यापूर तालुका अल्पसंख्याकमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागांचा शोध घेण्यात यावा. गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वन विभागातर्फे नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

00000






मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;

महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका): अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि 'एस आय आर' (SIR) मॅपिंगच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ  सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या सोडवून मॅपिंग प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रामध्ये अद्याप मुख्य 'एस आय आर' प्रोग्राम सुरू झाला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा त्रस्त होऊ नये. मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ज्या प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'विशेष कॅम्प' आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदारांनी घाबरून न जाता या दोन दिवसांच्या शिबिरात आपले नाव आणि मॅपिंगची खातरजमा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, राजेश धवणे (निवडणूक विभाग), कृष्णा गाडेकर, महसूल सहाय्यक भारत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांनी बीएलओंच्या कामात पूर्णतः सहाय्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होईल, असा विश्वास महापौर श्री. तेजवानी यावेळी व्यक्त केला.

00000

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1

सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

          मार्च-2026 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल-2026 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

 

Wednesday, April 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-04-2026





                                         अंजनगावसुर्जीच्या महिला होणार आत्मनिर्भर;

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी थेट संवाद

            अमरावती, दि. 08 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती मार्फत आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रम (2025-26)अंतर्गत सुरू असलेल्या ‘फॅशन डिझायनर' या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षण बॅचला आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. अंजनगाव सुर्जी येथील रोशनी महिला विकास संस्थेद्वारे संचलित या प्रशिक्षणार्थीसोबत त्यांनी थेट संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणातून स्वावलंबी होण्याचा मार्ग प्राप्त होतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

               या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, "या योजनेचा उद्देश केवळ प्रशिक्षण पूर्ण करणे हा उद्देश नसून, प्राप्त कौशल्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे महत्त्वाचे आहे. रोशनी रेडीमेड गारमेंट फाउंडेशन, एमआयडीसी, अंजनगाव सुर्जी येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या फेब्रिक क्लस्टरमध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी रोजगाराच्या संधी मिळवाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे होवून सक्षम व्हावे, असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            महिलांनी केवळ वस्तूंची निर्मिती करून न थांबता, त्यांच्या मार्केटिंगवर  विशेष लक्ष केंद्रित करावे. व्यवसायाचे विस्तारीकरण करण्यासाठी बाजारपेठेची मागणी ओळखून नाविन्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींनी केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. विविध शासकीय योजनांतर्गत उपलब्ध असलेल्या निधीचा आणि सवलतीच्या कर्ज योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले.

             या विशेष प्रशिक्षण उपक्रमात अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी नोंदवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील सर्व स्तरांतील महिला मुख्य प्रवाहात येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

             हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्णतः मोफत राबविला जात आहे. जिल्हा उद्योग केंद्र,अमरावती यांचे निधीतून उभे राहिलेल्या स्थानिक एमआयडीसीमधील फेब्रिक क्लस्टरमध्ये किमान कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.फॅशन डिझायनिंग सारख्या रोजगाराभिमुख कोर्सेसमुळे ग्रामीण भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. . जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अंजनगाव सुर्जी परिसरातील गरजू तरुणांना आणि महिलांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहेत.

            या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे  ,तहसीलदार पुष्पा दाबेराव, संस्थेच्या संचालिका शोभा सुने, आशिष सुने, केंद्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

0000000

 

भारतीय डाक विभागात विमा एजंट पदासाठी 21 एप्रिलला मुलाखती

अमरावती, दि. 08 (जिमाका): भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी विमा एजंट नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी 18 वर्षांपेक्षा कमी नसावे तसेच उमेदवार किमान इयत्ता दहावी किंवा बोर्डाची समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, जीवन विम्याबाबतचे ज्ञान आणि मुलाखतीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून एनएससी किंवा केव्हीपीच्या स्वरूपात ठेवावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून सुरुवातीला तात्पुरता परवाना देण्यात येईल. हा परवाना आयआरडीए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. ही परीक्षा नियुक्तीनंतर 3 वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. ही नियुक्ती पूर्णपणे कमिशन तत्त्वावर असेल. भारतीय डाक विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत.

इच्छुक उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोसह दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत 'प्रवर अधीक्षक कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 08 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या अंतर्गत सन 2025-26 या वर्षातील नवीन अर्ज भरण्यासाठी, तसेच सन 2023-24 व 2024-25 मधील अर्जांची त्रुटीपूर्तता  करण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा फी योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या इतर मागासवर्गीय मुलींसाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती अशा विविध योजना राबविल्या जातात.

            सर्व संस्था आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नूतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' करण्यात आले आहेत, त्यांच्याकडून तात्काळ त्रुटींची पूर्तता करून घेऊन ते अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठवावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे.

             अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी व महाविद्यालयांनी नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, 'Re-Apply' करण्यासाठी आणि प्रलंबित अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

0000000

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 30 जूनपर्यंत मुदत

            अमरावती, दि. 8 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चे नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी, तसेच 2023-24 व 2024-25 या वर्षांतील अर्जांची त्रुटीपूर्तता (Re-apply) करण्यासाठी आता 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

              या विभागामार्फत प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण व परीक्षा फी प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अशा पाच महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

            विद्यार्थ्यांच्या लॉगिनला त्रुटीपूर्ततेसाठी 'Send Back' केलेले अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तातडीने विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घ्यावेत. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी नवीन अर्ज भरण्याची व प्रलंबित अर्जांची त्रुटीपूर्तता करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000000

DIO NEWS AMRAVATI 10-04-2026

डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे *अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३...