Friday, July 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17.07.2026















 उगवणक्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विक्री केल्यासंबंधी संबंधित बियाणे कंपन्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवा

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*  जिल्हा नियोजन समितीतील 2026 -27 या आर्थिक वर्षातील सर्व प्रशासकीय मान्यता 15 सप्टेंबरपर्यंत घ्याव्यात

*लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा

            अमरावती, दि. 17 (जिमाका): उगवणक्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विक्री केल्यासंबंधी संबंधित कंपन्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवा. कृषी अधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यात आजच पाचही बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. चौदाही  तालुक्यात हे गुन्हे दाखल करण्यात यावे.  पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन तात्काळ  या गुन्ह्यांची नोंद करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

      जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली,  त्यावेळी ते बोलत होते. 

खासदार बळवंत वानखडे, अमर काळे, डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, प्रवीण पोटे-पाटील, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, सुलभा खोडके, रवी राणा, प्रतापदादा अडसड, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त मंगेश गोंदवले, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  पोलीस अधीक्षक निकेतन कदम, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी यावेळी उपस्थित होते.

       पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान सरकार हे आपले उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक करणाऱ्या बूस्टर कंपनी, इनोवेज कंपनी, रवी सीड्स, पार्श्व कंपनी, श्री श्री सीड्स तसेच ग्रीन गोल्ड या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवा. त्या गुन्ह्यांची प्रत उद्या जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करा. पोलीस अधीक्षकांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत पोलीस विभागाला निर्देश द्यावे. तसेच या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना माफी मिळणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

कृषी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी भेटू शेतकऱ्यांची परिस्थिती वेळीच अवगत करणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून विकास कामे करण्यात यावी. सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. सध्याची परिस्थिती तसेच पुढील वर्षीचा विचार करता दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शिवकालीन बंधारे मजबूत करण्यात यावे. जुन्या विहिरी, ब्रिटिश तलाव पुनर्जीवित करण्यात यावे. जिल्हा नियोजन समितीचा प्रस्ताव सादर करताना यंदा एकही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करू नये. जलसंधारणाच्या कामावर भर द्यावा, जल साठे वाढविणे, जमिनीत पाणी मुरविणे यासह मृदा संधारण सामाजिक वनीकरण यावर द्यावा. आवश्यकता असल्यासच शेत रस्त्यासाठी डांबरीकरण किंवा खडीकरण करण्यात यावे. सर्वांनी बचतीचे धोरण अवलंबावे. महावितरणाची वीज न वापरता सौर उर्जेचा वापरावर भर द्यावा. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावावे. सर्व संबंधित विभागांनी क्षेत्रीय भेटीवर भर द्यावा. लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्रित येऊन लोकाभिमुख प्रशासन राबविण्यावर भर द्यावा,  असे पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.

             या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा आणि खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील विविध योजनांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर ५२७ कोटी रुपये आणि विशेष घटक योजनेचे १०२ कोटी रुपये १०० टक्के वितरित झाले आहेत. तसेच आदिवासी उपयोजनेचा १२१.५३ कोटींपैकी ९९.९९ टक्के निधी वितरित करण्यात आला असून, प्रशासकीय मंजुरीनंतर या तिन्ही योजनांचा निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले.

यासोबतच चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या नियोजनावरही चर्चा झाली. नवीन वर्षासाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत ६०५ कोटी रुपये, विशेष घटक योजनेसाठी १०० कोटी रुपये तर आदिवासी उपयोजनेसाठी १३३.२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जून २०२६ अखेरपर्यंत या नवीन निधीमधील आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३९.३५ कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष खर्च झाला आहे, तर इतर योजनांच्या प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी जिल्ह्याचा विकास वेगाने साधण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उपलब्ध निधीचा वापर वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने करावा, अशा सूचना दिल्या.

 

यावेळी शहरातील शाळा, रस्ते, क्रीडांगण, शहरातील वाढीव पाणीपुरवठा, वन्यप्राण्यांचा त्रास, अवैध बांधकाम, आरोग्य व्यवस्था शहरातील न्याय व सुरक्षा व्यवस्था याबाबत आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले.

            जिल्ह्यातील नागरिकांचे रक्षण करणे आणि नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे या संविधानाने प्रशासनाला दिलेल्या  प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही एआयच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अचूक करण्यात येणार आहे .ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोणत्याही विभागाचे खाजगी बँकेत खाते नसावे, केवळ लीड बँकेतच खाते असावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेतकऱ्यांचे शेतीमालांनी भरलेले ट्रॅक्टर, ट्रक अडवू नये. विमुक्त जाती  आणि भटक्या जमाती यांच्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांना त्वरित लाभ मिळवून देण्यात यावा, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

            सुरवातीला जिल्हा नियोजन समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधी अंतर्गत मंजूर पोर्टेबल टॉयलेट व रेनकोट या साहित्याचे पोलीस विभागास वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आधुनिक व्यायाम शाळेचे ई-उद्घाटन करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य कार्यक्रमामार्फत पोलिसांसोबत प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळणाऱ्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रामार्फत धनुर्विद्येमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबाबत खेळाडू कुमकुम अनिल मोहोड हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

00000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पूर्वीची मर्यादा ₹५०,००० आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील
लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
पूर्वीची मर्यादा ₹५०,०००
आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती

#कर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
 

Thursday, July 16, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

DIO NEWS AMRAVATI 16.07.2026


                                                     पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

             अमरावती, दि. 16 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या, शुक्रवार, दि. 17 जुलै, रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            दौऱ्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे हे सकाळी 10 वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती.

 दुपारी 4.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीव्दारा मंजूर निधी अंतर्गत पोर्टेबल टॉयलेट व रेनकोट तसेच जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आधुनिक व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 5 वाजता टाईप 4, ऑफीसर क्वार्टर, मालटेकडी येथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन क्वार्टरचे उद्घाटनास उपस्थिती. सांयकाळी 5.30 वाजता अभियंता भवन, शेगाव नाका चौक, गाडगेनगर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी, 12 वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सांयकाळी 7 वाजता अमरावती येथून मोझरीकडे प्रयाण करतील. तेथे खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार रात्री 8 वाजता मोटारीने अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000

क्रीडा ई-प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, घरबसल्या मिळणार डिजिटल प्रमाणपत्र

अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल, तसेच माहिती जुळल्यास अवघ्या 24 तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल खेळाडूंना उपलब्ध होणार आहे.

            विशेष म्हणजे आगामी काळातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनाही यापुढे नवीन भरतीसाठी या प्रणालीद्वारे नवीन प्रमाणपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पात्र खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://sports.maharashtra.gov.in/) भेट देऊन 'आमच्या सेवा' (Our Services) मधील '5% Reservation' या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी (One-Time Registration) पूर्ण करावी. नोंदणीसाठी खेळाडूंनी आपला आधार-संलग्न मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्डची पीडीएफ आणि क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्राची पीडीएफ फाईल तयार ठेवावी. सध्या कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (2025 ची स्पर्धा), ज्युडो (2024 ची स्पर्धा) आणि कुराश (2017-18 व 2024-25) या खेळांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध असून याच खेळाडूंचे अर्ज स्वीकारले जात आहेत. तर इतर खेळांच्या खेळाडूंनी केवळ नोंदणी करून ठेवावी, त्यांचे अभिलेख अपलोड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्या खेळाडूंची माहिती किंवा प्रमाणपत्रे प्रणालीवर दिसत नसतील, त्यांनी आवश्यक तपशीलासह support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

000000

 

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोबाईल ॲपचे प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा 21 जुलै रोजी

अमरावती, दि. 16 (जिमाका): राज्यातील सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनशी संबंधित विविध सेवा अधिक सुलभ, जलद आणि घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी संचालनालय, लेखा व कोषागारे यांच्या वतीने 'Maha-UPLABDHI' हे अद्ययावत मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. या नवीन ॲपची सविस्तर माहिती पोहोचवण्यासाठी आणि पेन्शनधारकांना या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्यासाठी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा माहिती व प्रशिक्षण मेळावा मंगळवार, दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या ॲपच्या सुविधेमुळे आता पेन्शनधारकांना विविध कामांसाठी कोषागार कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तरी अमरावती कोषागार अंतर्गत येणाऱ्या सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या विशेष सत्राला विहित वेळेत उपस्थित राहून डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी केले आहे.

00000000

अमरावतीत विशेष लोकअदालत 18 जुलै रोजी; कलम 138 च्या

प्रलंबित प्रकरणांचा होणार जलद निपटारा

अमरावती, दि. 16 (जिमाका): न्यायप्रक्रियेत सामान्य नागरिकांचा सहभाग वाढवून 'न्याय आपल्या दारी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या वतीने शनिवार, दिनांक 18 जुलै 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आयोजित या लोकअदालतीमध्ये परकाम्य संलेख अधिनियम, कलम 138 (N.I. Act 138 - चेक बाऊन्स प्रकरणे) अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून पक्षकारांना वेळेत दिलासा मिळावा आणि परस्पर संमतीने व सलोख्याने हे वाद तात्काळ मिटवता यावेत, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे.

            या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा आणि आपापसांतील प्रलंबित प्रकरणांचे सलोख्याने निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर यांनी केले आहे.

 

0000000

 

 

टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी 24 जुलै रोजी अमरावतीत ‘पेन्शन अदालत’;

23 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 16 (जिमाका): प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग यांच्या वतीने टपाल विभागाच्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी शुक्रवार, दिनांक 24 जुलै 2026 रोजी सकाळी  11 वाजता विशेष 'डाक पेन्शन अदालत' चे आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत अमरावती येथील प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

पेन्शन अदालतमध्ये टपाल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाईल, ज्यांची महाराष्ट्र आणि गोवा राज्य स्तरावर 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही, मात्र वारसा प्रमाणपत्र, वेतनश्रेणी वाढवणे, धोरणात्मक बाबी तसेच शिस्तभंग आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेल्या पूर्णपणे कायदेशीर प्रकरणांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारकांनी आपली तक्रार केवळ वैयक्तिकरित्या (एकत्रित स्वरूपात किंवा इतरांच्या वतीने नसावी) विहित नमुन्यातील अर्जाच्या तीन प्रतींसह प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती (444602) या पत्त्यावर दिनांक 23 जुलै 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी; मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही, असे डाक विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000000

Wednesday, July 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.07.2026

 आदिवासी सुशिक्षित तरुणांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी;

विद्यावेतनासह मिळणार पुस्तक संच

अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अचलपूर येथील 'आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र' यांच्या वतीने विविध सरकारी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी साडेतीन महिन्यांचे विशेष मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा 1 हजार  रुपये विद्यावेतन आणि मोफत अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, हे साडेतीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना पुढील अभ्यासासाठी पुस्तकांचा संचही मोफत दिला जाणार आहे.

या प्रशिक्षण सत्राचा कालावधी 1 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2026 असा असेल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 23 जुलै 2026, सायंकाळी 6 वाजेपर्यंत लालपूल जवळील जयस्तंभ रोड, अचलपूर कॅम्प, परतवाडा येथील कार्यालयात सादर करावे. प्रवेश अर्ज वाटप आज 15 जुलैपासून सुरू झाले आहे. या प्रवेशासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील किमान 10 वी उत्तीर्ण आणि 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र ठरतील. तसेच उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.

अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखत 24 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता संबंधित कार्यालयात घेतली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने सर्व मूळ कागदपत्रांसह (शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, 10 वीचे गुणपत्रक, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक व रोजगार नोंदणी कार्ड) उपस्थित राहावे. निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन फलकावर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7709432024 किंवा 9359976243 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000000

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान; कृषी विभागाचे अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 15 (जिमाका) : राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन संच खरेदी करण्यासाठी शासनामार्फत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध शासकीय योजनांच्या समन्वयातून या प्रवर्गातील शेतकऱ्यांना आता तब्बल शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाणीबचत करून पिकांची उत्पादकता वाढवणे आणि वंचित घटकांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये आणखी भर घालत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारकांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते. याशिवाय, उर्वरित रक्कम जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून (अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी 10 टक्के आणि इतरांसाठी 15 टक्के) पूरक अनुदान  असे एकूण 90 टक्के म्हणून दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नसून त्यांना एकूण 100 टक्के अनुदान प्राप्त होईल.

या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकी हक्काचा चालू 7/12 उतारा, 8-अ उतारा असणे तसेच शेतात ओलीताची (पाण्याची) शाश्वत सोय असणे बंधनकारक आहे. पात्र व गरजू शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर (mahadbt.maharashtra.gov.in) जाऊन ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज सादर करावेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपले शेती उत्पादन वाढवावे, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

00000000

'मिशन लक्षवेध' अंतर्गत आर्चरी व बॅडमिंटन खेळाडूंसाठी सुवर्णसंधी;

21 व 22 जुलै रोजी निवड चाचणी

अमरावती, दि. 15 (जिमाका): ऑलिम्पिक स्तरावर महाराष्ट्राचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करण्यासाठी राज्य शासनामार्फत 'मिशन लक्षवेध' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यात 'जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र' सुरू करण्यात येत असून, आर्चरी (तिरंदाजी) आणि बॅडमिंटन या दोन खेळांसाठी प्रत्येकी 20 गुणवंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या विशेष अनिवासी प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंची निवड चाचणी 21 आणि 22 जुलै 2026 रोजी अमरावतीत आयोजित करण्यात आली आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या खेळाडूंचा पूरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रवास खर्च, प्रशिक्षक आणि वैद्यकीय विम्यासह सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. या चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडूचे वय 21 वर्षांखालील असावे आणि त्याने शालेय किंवा अधिकृत संघटनेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये किमान राज्य स्तरावर सहभाग किंवा पदक मिळवलेले असावे. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि क्रीडा कामगिरीच्या प्रमाणपत्रांसह 20 जुलै 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

निवड चाचणी 21 व 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. यामध्ये आर्चरीची चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड (तपोवन गेटजवळ) येथे, तर बॅडमिंटनची चाचणी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे घेतली जाईल. ही निवड प्रक्रिया क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती ममता कोळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन चाचणीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000000

राजापेठ-अंबादेवी मंदिर रस्ता 16 जुलैपासून वाहतुकीसाठी बंद;

सौंदर्यीकरण आणि प्रवेशद्वाराच्या बांधकामामुळे प्रशासनाचा निर्णय

अमरावती,दि. 15 (जिमाका): शहरातील राजापेठ परिसरातील अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था 16 जुलै ते 3 ऑगस्ट 2026 या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या भागातील 'एच अँड एफ' (H&F) शोरूमसमोर भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील टप्प्यातील सौंदर्यीकरणाचे काम सुरू असताना कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊ नये, या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

या कालावधीत अंबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी व नागरिकांसाठी दोन मुख्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार, नवाथे नगरकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनधारकांनी 'कुशल ऑटो'कडून भूतेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. तसेच, कंवर नगर परिसराकडून येणाऱ्या नागरिकांनी 'मोनालिसा कॉम्प्लेक्स' जवळील रस्त्याचा वापर करावा. या पर्यायी मार्गांमुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.

हा वाहतूक बदल 3 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत वाहनचालक, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घातलेल्या नियमांचे व निबंधांचे काटेकोरपणे पालन करावे. बांधकाम वेळेत व सुरक्षितपणे पूर्ण होण्यासाठी सर्व नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता विनोद बोरसे यांनी केले आहे.

000000

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भातील संपूर्ण माहिती आता एका स्कॅनमध्ये उपलब्ध!


 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भातील संपूर्ण माहिती आता एका स्कॅनमध्ये उपलब्ध! #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरी #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #MahaDGIPR #GovernmentScheme

DIO NEWS AMRAVATI 17.07.2026

  उगवणक्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विक्री केल्यासंबंधी संबंधित बियाणे कंपन्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे *  जिल...