Thursday, July 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.07.2026

 जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न

अमरावती, दि. 02 (जिमाका):  शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती तर्फे ‘नवीन सेवार्थ प्रणाली (ई-वेतन) कामकाज मार्गदर्शिका’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर जिजाऊ सभागृह येथे नुकतेच संपन्न झाले. या शिबिरामध्ये अमरावती शहरासह चांदूर रेल्वे, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव व नांदगाव या उपकोषागार कार्यालयांतर्गत येणारे आहरण व संवितरण अधिकारी सहभागी होते. यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ,  अप्पर कोषागार अधिकारी  जयश्री उताणे, कोषागार अधिकारी अमोल इथापे आदी उपस्थित होते.

जयश्री उताणे यांनी प्रास्ताविकातून डिजिटल कार्यप्रणालीचे महत्त्व आणि शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कोषागार अधिकारी श्री.  इथापे यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली  आणि 'ग्रास'  या प्रणालींच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना कामकाजात पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.  विजय जवंजाळ यांनी नवीन प्रणालीमध्ये 'डेटा मायग्रेशन' करताना घ्यावयाची काळजी, माहितीची अचूकता आणि त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर भर दिला. डेटा मायग्रेशन ही प्रणालीच्या यशाची गुरुकिल्ली असून ती काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षक  पवन पचाजे, व नमिता हांडे यांनी सेवार्थ प्रणालीतील विविध मॉड्युल्स, कर्मचारी माहिती अद्ययावतीकरण आणि ई-वेतन प्रक्रियेचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. उपस्थितांनी या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत, हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कामकाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

000000000

फळपीक विमा योजना 2026: संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ

उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ; कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका): राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 (मृग बहार) अंतर्गत अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ या प्रमुख फळपिकांसाठी विमा उतरवण्यास मंजुरी दिली असून, शेतकऱ्यांना यात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, लिंबू, संत्रा व मोसंबी या फळपिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सीताफळ पिकासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे  फळबागांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना स्थैर्य देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'अॅग्रीस्टॅक' अंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणे आणि 'ई-पिक पाहणी' पोर्टलवर पिकाची नोंद असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीत विसंगती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच (संत्री, मोसंबी व सीताफळसाठी किमान वय 3 वर्षे आणि लिंबूसाठी 4 वर्षे) हे विमा संरक्षण कवच मिळेल. प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 4 हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा निश्चित आहे.

विमा संरक्षणाचा विचार करता, संत्रा व मोसंबीसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये (शेतकरी हिस्सा 5 हजार रुपये), लिंबूसाठी 80 हजार रुपये (शेतकरी हिस्सा ४ हजार रुपये) आणि सीताफळासाठी 70 हजार रुपये (शेतकरी हिस्सा 3 हजार 500 रुपये) विमा हप्ता निश्चित केला आहे.

अमरावती जिल्ह्यात 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी'मार्फत ही योजना राबविली जात आहे. हवामानाचा धोका उद्भवल्यास नुकसान भरपाई थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल. तरी जिल्ह्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत किंवा 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन विहित मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले  केले आहे.

00000000

अचलपूर येथे 6 जुलै रोजी 'नवीन सेवार्थ प्रणाली' प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 02 (जिमाका): शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी, पारदर्शक आणि सुरळीत अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत, उपविभागीय कार्यालय, अचलपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी अचलपूर, दर्यापूर, चिखलदरा, धारणी आणि अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांतील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित कार्यालयांतील सेवार्थ प्रणाली हाताळणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन सेवार्थ प्रणालीची नेमकी कार्यपद्धती, वेतन देयके अचूकपणे तयार करण्याची प्रक्रिया, प्रणालीतील विविध मॉड्यूल्सचा वापर, आवश्यक दुरुस्त्या आणि नवीन तांत्रिक बदलांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, एनपीएस वेळेत जमा करण्याची पद्धत आणि 'ग्रास' प्रणालीचा वापर करून शासकीय खात्यात महसूल भरण्याची प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व लेखाविषयक कामात सुसूत्रता आणि गतिशीलता आणण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असून, यात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तरी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

00000000

'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना: ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण;

31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका):ओबीसी, ईबीसी  आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 11 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  

‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या https://scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोर्टलवर 'New Registration' करावे व मिळालेला Application ID व पासवर्ड वापरून 'Fresh Login (AY २०२६-27)' अंतर्गत अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याचा तपशील भरून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न 12.5 लाखांपर्यंत), गुणपत्रक, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे PDF/JPEG स्वरूपात अपलोड करावीत. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी, कारण एकदा 'Final Submit' केल्यावर अर्जात बदल करता येत नाही. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट काढून आपल्या शाळेत संपर्क साधावा, जेणेकरून शाळेचे 'Institute Nodal Officer' (INO) तो अर्ज ऑनलाईन पडताळू शकतील. वेळापत्रकानुसार विद्यार्थी अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत खुली असली, तरी शाळा स्तरावरील पडताळणी 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत व जिल्हा, राज्य स्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना मोबाईल व ईमेल सक्रिय असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो; याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने कार्यवाही करावी.

00000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्ट्रशासन #शेतकरी #Maharashtra

Wednesday, July 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.07.2026

 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

विजया रहाटकर शुक्रवारी अमरावतीत

*नियोजन भवनात दुपारी 12 वाजता जनसुनावणी

अमरावती, दि. 1 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या महिला जन सुनावणी घेणे, महिलाभिमुख उपक्रमांचा आढावा घेणे, संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे आणि महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधणे यासाठी दि. 3 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान श्रीमती रहाटकर दुपारी 12 वाजता जनसुनावणी घेणार आहे.

श्रीमती रहाटकर यांच्या दि. 3 जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्यामध्ये विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कार्यस्थळे अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टीने आयोजित 'पॉश'-लैंगिक छळ प्रतिबंध प्रशिक्षण कार्यशाळेने होईल. तसेच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहे. नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

श्रीमती विजया रहाटकर अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. या बैठकीत महिला कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच्या उपाययोजनांचे मूल्यमापन केले जाईल. याव्यतिरिक्त, त्या दि. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 'महिला जन सुनावणी' घेतील. यात पूर्वनोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या जातील. यामुळे महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यावर वेळेत हस्तक्षेप आणि निवारण करणे शक्य होईल. संबंधित क्षेत्रातील महिलांचे हक्क आणि कल्याणासाठीच्या सहकार्यात्मक प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीने या दौऱ्याची सांगता होईल.

00000000



जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

अमरावती, दि. 01 (जिमाका) : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली.

0000000

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहिती पुस्तिकेचे विमोचन

अमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या व्यापक प्रसिद्धीसाठी अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे आज महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात विमोचन करण्यात आले. मुख्य राज्यसेवा हक्क आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्याला राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग, चित्रा कुलकर्णी, संदीप देशमुख,श्री. शिंदे तसेच आयोगाच्या सचिव श्रीमती वैशाली चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविक करून पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाच्या शेवटी अमरावती राज्य सेवा हक्क कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, सर्व आयुक्त, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आणि सचिव श्रीमती चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार मानले. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत व पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

0000000

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी मेळाव्यात 264 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 01 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती आणि पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच 'मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा' संपन्न झाला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे, कनिष्ठ मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक निकेतन कदम म्हणाले की, पोलीस विभागाच्या शिस्तीसोबतच 'पोलीस मित्र' म्हणून प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी आहे. तरुणांनी या संधीचे सोने करून समाजात पोलीस विभागाची प्रतिमा सन्मानाने उंच करावी. तसेच उपायुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी, या प्रशिक्षणातून मिळणारे शिस्तीचे धडे आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. अत्यंत महत्त्वाच्या विभागासोबत काम करण्याची ही संधी आनंदाने स्वीकारावी, असे प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डाखरे यांनी तर आभार पंकज कचरे यांनी मानले.

00000000

चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळवली

 अमरावती, दि.01 (जिमाका) : चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून आजूबाजूचे जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात चिखलदरा येथे येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा-चिखलदार मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी जारी केले आहे.

याकारणास्तव 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत नंतरचे दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडा वरून चिखलदरा जाणारी वाहतुक ही परतवाडा वरून धामणगांव गढी मार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल तसेच चिखलदरा वरून परतवाडा परत येणारी वाहतुक ही चिखलदरा वरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावातील स्थानिक नागरिकांना रस्ते वाहतुक वळविण्याच्या आदेशात सुट देण्यात येत आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

शुक्रवारी शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी

'एनपीएस संचय' जनजागृती कार्यक्रम

अमरावती, दि. 1 (जिमाका) : अग्रणी जिल्हा बँक सेल - सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विशेष ‘एनपीएस संचय आउटरीच प्रोग्राम’ हॉटेल गौरी इन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे आणि ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांवर केंद्रित असणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील असंघटित आणि वंचित घटकांपर्यंत, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लहान उद्योजकांपर्यंत पेन्शन योजनेचा लाभ पोहोचवणे हा या 'एनपीएस संचय' योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय वाढीस लागेल.

आउटरीच कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबद्दल व्यापक जनजागृती आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणे आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख घटकांना एकत्र आणून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या घटकांना हक्काची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभाग आणि संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, एफपीओ फेडरेशन, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बँक सखी, तसेच धन फाउंडेशन आणि क्रिसिल फाउंडेशनच्या क्षेत्रीय चमूसह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 150 हून अधिक प्रमुख प्रतिनिधींना पेन्शन योजनेची माहिती आणि महत्व पटवून दिले जाणार आहे. हे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन योजनेचा प्रसार करणार आहे.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : जाणूनघ्या योजनेची संपूर्ण माहिती


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : जाणूनघ्या योजनेची संपूर्ण माहिती

#कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पात्रतेचे निकष काय आहेत, हे जाणून घ्या. ही अधिकृत माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा.


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि पात्रतेचे निकष काय आहेत, हे जाणून घ्या. ही अधिकृत माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंतही पोहोचवा. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare #Maharashtra
 

Tuesday, June 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.06.2026




                                  बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्जपुरवठा करावा

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 30 (जिमाका) : राज्यातील स्वयंरोजगाराचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनातर्फे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविले जातात. यासाठी बँकांकडे कृषी, जिल्हा उद्योग केंद्रांकडून प्रस्ताव सादर करण्यात येतात. या प्रस्तावांची तातडीने छाननी करून बँकांनी शासकीय योजनांसाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश निकम, कृषी उपसंचालक वरूण देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, गेल्या वर्षातील 419 प्रकरणी अद्यापही कर्ज वितरीत झालेले नाही. या प्रस्तावांची तातडीने छाननी करावी, तसेच निर्णय घेऊन कर्ज वितरणाची प्रक्रिया करण्यात यावी. यात आवश्यकता असल्यास संबंधितांचे प्रशिक्षण पूर्ण करावेत. गेल्या वर्षात या योजनांसाठी चांगल्या प्रकारे पतपुरवठा करण्यात आला आहे. यावर्षीही पाठपुरावा करून कर्ज प्रक्रिया करावी. जुने प्रस्ताव करीत असताना नवीन प्रस्तावाही स्विकारण्यात यावे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वाटप कमी प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे बँकांनी सजग होऊन याकामी मनुष्यबळ नेमून कर्ज वितरणाची गती वाढवावी. राज्य शासनाच्या कर्जमाफीनंतर कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने बँकांनी यासाठी नियोजन करावे. यावर्षी अल-निनोचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समस्या येऊ शकतात. त्याचा सामना बँकांना करावा लागू नये, याची काळजी घ्यावी. येत्या 15 दिवसानंतर पुन्हा या प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याने बँकांनी कर्जप्रक्रिया जलद करावी, असे आवाहन केले.

00000000

शहर वाहतुकीत तात्पुरता बदल

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

अमरावती, दि. 30 (जिमाका) : अमरावती शहरातील बडनेरा-अमरावती राज्य मार्ग क्र. 304 वरील कि. मी. 162/050 या पादचारी उड्डाणपूलाचे विकासकाम सर्वसामान्य नागरिकांचे हिताचे असून सदर स्टिल स्ट्रक्चर निश्चित स्थानावर स्थापीत करतांना कोणताही अनुचित प्रकार घडु नये याकरीता अलामस गेट बडनेरा ते सावता मैदान बडनेरा या दरम्यान मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे.

 हे मार्ग बंद असतील

अलमास गेट ते सावता मैदान बडनेरा पर्यंत मार्ग सर्व प्रकारचे वाहन व पादचारी यांना कालावधी 4 जुलै च्या रात्री 11.30 वाजेपासून दि. 5 जुलै 2026 च्या सकाळी 6  वाजेपर्यंत बंद राहील.

   हे असतील पर्यायी मार्ग

            बडनेरा कडून अलमास गेट कडे येणार सर्व वाहनांनी अकोला वाय पॉइंट येथून सुपर एक्सप्रेस हायवेवर मेघे कॉलेज चौक, कोंडेश्वर टी पॉईटं मार्गे अमरावती. अमरावती कडून अलमास गेट मार्गे बडनेरा कडे जाणाऱ्या वाहनांनी जुना बायपासचा वापर करावा.

            सदर अधिसुचनेचे जो कोणी वाहन चालक उल्लंघन करेल त्यांचे विरूध्द मो. वा. का. 1988 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन अमरावती शहरचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.

00000000

सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू;

सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना 'डीसीएम' अनिवार्य

अमरावती दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 'सहकार व्यवस्थापन पदविका' (DCM) अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे दुरस्थ (पोस्टल) शिक्षण पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

 महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित (पुणे) अंतर्गत अमरावती येथील 'भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र' येथे या सहा महिन्यांच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. हा अभ्यासक्रम 1 जुलै 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीसाठी असणार असून, यामध्ये प्रवेश घेण्याची मुदत 1 जुलै 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांसाठी किमान 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित संस्थेतील 6 महिन्यांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तर खाजगी किंवा थेट उमेदवारांसाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी वेळेत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भातील अधिक माहिती, प्रवेश अर्ज आणि नाव नोंदणीसाठी उमेदवारांनी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी थेट संपर्क साधावा, ज्यासाठी अधिकृत संपर्काकरिता 9881047668 हा भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

000000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक मादकद्रव्य विरोधी दिन साजरा;

व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. 30 (जिमाका): समाजाला, विशेषतः तरुण पिढीला अमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेविरुद्ध व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने 26 जून हा जागतिक मादकद्रव्य विरोधी दिन  नुकताच साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक़ डॉ. विनोद पवार बाह्य संपर्क अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. प्रेषित मढवी, डॉ.  ऋषिकेश घोरपडे यांच्यासह अधिसेविका श्रीमती ललिता अटाळकर, श्रीमती श्रद्धा हरकंचे, सारा बांगड ,सावली परतेती उपस्थित होते.

डॉ. विनोद पवार म्हणाले, मादक द्रव्यांचे सेवन हे मानवी शरीराचा आणि आरोग्याचा पूर्णपणे नाश करते. कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. या गंभीर आजारातून आणि मानसिकतेतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयामार्फत अत्यंत प्रभावी आणि आधुनिक औषधोपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. नरेंद्र सोळंके आणि डॉ. प्रेषित मढवी यांनी उपस्थितांना मादक द्रव्यांच्या सेवनामुळे मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होणारे परिणाम, मानसिक आजार आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला जिल्हा स्त्री रुग्णालय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी, रुग्णालयीन कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सारा बांगड यांनी, तर आभार श्रद्धा हरकंचे यांनी मानले.

000000

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा'; 2 जुलै रोजी अमरावतीत भव्य समारोप

अमरावती, दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागातर्फे 22 जूनपासून संपूर्ण राज्यभरात 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' सुरू करण्यात आली आहे. या संवाद यात्रेचा अमरावती जिल्हास्तरीय कार्यक्रम येत्या 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता शेगाव नाका येथील 'अभियंता भवन' येथे आयोजित करण्यात आला आहे. सलग 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत सुमारे 6 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार असून, राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये याचे संचलन होणार आहे. या यात्रेत राज्यातील हजारहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात 15 हजारांपेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाईल.

रासायनिक शेतीला सक्षम पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन याद्वारे केले जाईल. यासोबतच शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी (सेंद्रिय खते, औषधे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू) समाजात जनजागृती केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, गोशाळा संचालकांच्या आढावा बैठका घेणे आणि पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय साधणे यासाठी ही यात्रा कार्यरत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे, संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कायदेशीर बाबींविषयी समाजाला अवगत करणे, आणि स्थानिक देशी गोवंशाच्या संगोपनासंदर्भात वैज्ञानिक व पारंपरिक पद्धतींची माहिती देणे या प्रमुख वैशिष्ट्यांसह या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गोसेवक, गोरक्षक, शेतकरी, पशुपालक आणि गोशाळा संचालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

वनरक्षक भरती-2023: अमरावती वनवृत्तातील 'पेसा' क्षेत्रातील

माजी सैनिक प्रवर्गाच्या जागांबाबत वनविभागाकडून वस्तूस्थिती स्पष्ट

अमरावती, दि. 30 (जिमाका): वनरक्षक सरळसेवा भरती-2023 अंतर्गत अमरावती वनवृत्तातील 'पेसा' (PESA) क्षेत्रातील माजी सैनिक प्रवर्गाच्या रिक्त जागांवर नियुक्ती देण्याबाबत वनविभागाने प्रचलित शासकीय व कायदेशीर नियमांच्या आधारे वस्तूस्थिती स्पष्ट केली आहे.

यानुसार, अमरावती वनवृत्तांतर्गत वनरक्षक भरती प्रक्रियेची जाहिरात जून 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीसाठी एकूण 230 पदांचा समावेश होता. या भरतीची ऑनलाईन परीक्षा आणि शारीरिक पात्रता चाचणी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी 2024 मध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे अंतिम नियुक्तीची कार्यवाही प्रलंबित होती. मात्र, उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी व रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाच्या विशेष सूचनेनुसार 230 पैकी 193 पात्र उमेदवारांना मानधन तत्त्वावर तात्पुरते नियुक्ती आदेश देण्यात आले होते.

वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार, प्रचलित शासन परिपत्रकातील नियमांन्वये समांतर आरक्षणाची पदे एका सामाजिक प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक प्रवर्गात वर्ग करता येत नाहीत. तसेच, पेसा क्षेत्रातील उमेदवारांना मानधन तत्त्वावर दिलेल्या नियुक्त्या ही एकवेळची विशेष बाब म्हणून केलेली तात्पुरती तरतूद असल्याने, या प्रक्रियेतील रिक्त पदे प्रतीक्षा यादीतून भरणे उचित ठरणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार प्रचलित नियमांच्या अधीन राहूनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे.

00000000

हरित ऊर्जेच्या दिशेने 'अमृत'चे मोठे पाऊल; 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन'

योजनेद्वारे जिल्ह्यातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी

अमरावती, दि. 30 (जिमाका): पर्यावरण संवर्धन, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभर 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेष जनजागृती व लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक, महिला आणि उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे भविष्यात शहरांसह तालुका व ग्रामीण भागातही ईव्ही चार्जिंग स्टेशनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण होणार आहे. या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या मोठया  संधी उपलब्ध होणार असल्याने अमृतने आपल्या लक्षित गटातील युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन भविष्यातील हरित ऊर्जा क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारावा, यासाठी अमृत जिल्हा कार्यालयामार्फत गावपातळीपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन व व्यवस्थापन, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा आणि फ्रँचायझी मॉडेल यासंदर्भात तज्ज्ञांकडून विनामूल्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभही मिळणार असून, यामुळे नवोदित उद्योजकांना आर्थिक दिलासा मिळेल. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि बारावीची गुणपत्रिका ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 'अमृत जिल्हा कार्यालय, आशीर्वाद बिल्डिंग, मालटेकडी रोड, टोपे नगर, अमरावती' येथे किंवा 9112227635/ 7249451152 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

शुक्रवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा दौरा

      अमरावती, दि. 30 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर या शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्‍यावर येत आहेत. दौऱ्या दरम्यान त्या कार्यशाळा, जनसुनावणी आणि आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

    श्रीमती रहाटकर ह्या शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यत जिल्हा नियोजन भवन येथे पोश अॅक्ट अधिनियम 2013 या विषयावरील कार्यशाळेला उपस्थित राहतील. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यत अमरावती येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथे यशोदा एआयबाबत कार्यशाळात सहभागी होतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात दुपारी 12 ते 1.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत विविध विषयावर आढावा बैठक घेतील. तसेच दुपारी 12 वाजल्यापासून जिल्हा नियोजन भवन येथे महिलांच्या तक्रारीबाबत जन सुनावणीला सुरुवात होणार आहे. यात कौटुंबिक हिंसाचार, लैगिक छळ अनैतिक व्यापार, महिलांचे अपहरण, आदी महिलांच्या सुरक्षिततेच्या विषयाबाबत महिलांच्या समस्या व तक्रारी स्विकारण्यात येतील. त्यानंतर दुपारी 3 ते 4.30 या वेळेत जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्‍यांसोबत महिलांच्या सुरक्षितता, संरक्षण तसेच महिला आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयावर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी 5 ते 6 दरम्यान जिल्ह्यातील लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांच्यासोबत महिलांच्या विविध समस्यावर बैठक घेतील.

या कार्यक्रमाला नागरीकांनी उपस्थित राहावे, तसेच समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

0000000


DIO NEWS AMRAVATI 02.07.2026

  जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न अमरावती, दि. 02 (जिमाका):    शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला ...