Monday, April 13, 2026

DIO NEWS AMRAVATI 13-04-2026

 शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दि. 14 एप्रिल रोजी असल्याने यादिवशी मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त श्याम घुगे यांनी कळविली आहे.

 तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे मार्ग बंद असतील

इर्विन चौक ते खापर्डे बगीचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. गर्ल्स हायस्कुल चौक ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासाठी बंद राहील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. मर्च्युरी टी पॉईंटकडून इर्विन चौकाकडे येणारा मार्ग  सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. इर्विन चौक ते मालविय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. तसेच मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक तसेच ट्रॅफिक फि,  इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

 

हे असतील पर्यायी मार्ग

 

इर्विन चौक ते खापर्डे बगिचा या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एस. टी. बसस्थानक मार्गाचा अवलंब करावा.  गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गाने वाहतूक करणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलास नगर रोड या मार्गाचा अवलंब करतील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप या मार्गाचा अवलंब करावा. रेल्वे स्टेशन चौक ते मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वाहतूक करणारी वाहने रेल्वेस्थानक ते एस. टी. स्थानक व जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक या मार्गांचा अवलंब करतील. मालविय चौक ते इर्विन चौकाकडे येणाऱ्या वाहनानी मालविय चौक, जयस्तंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाचा अवलंब करतील.

            वरील वाहतूक नियम  रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही.

00000000

 

 

 

जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून 13.17 कोटींचा महसूल; महसूल वसुलीत मोठी झेप

अमरावती, दि. 13 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्रशासकीय पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात आलेल्या रेतीघाट लिलाव प्रक्रियेला मोठे यश मिळाले असून, याद्वारे शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाइन महाटेंडर प्रणालीद्वारे जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त एकूण 53 रेतीघाटांच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत 33 रेतीघाटांचा यशस्वी लिलाव झाला असून, त्यातून प्रशासनाला 12.17 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

जिल्ह्याच्या महसूल वाढीचा आलेख केवळ रेती लिलावापुरता मर्यादित नसून, गौणखनिज वसुलीमध्येही जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अमरावती जिल्ह्याला 140 कोटी रुपयांचे गौणखनिज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत 92.35 कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, ही वसुली मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 23.63 कोटी रुपयांनी अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेली कार्यक्षम लिलाव पद्धत आणि गौणखनिजांच्या अवैध उपशावर ठेवलेले नियंत्रण यामुळे महसूल वाढीस मोठी चालना मिळाली आहे. 

00000000

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया सुरू; खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी

अमरावती, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी निवासी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पात्र आणि गुणवत्ताधारक खेळाडूंना 24 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. ही मोहीम केवळ प्रवेशापुरती मर्यादित नसून, राज्यातील कानाकोपऱ्यातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना जागतिक दर्जाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या मार्गदर्शनाखाली पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, अकोला, गडचिरोली आणि ठाणे अशा नऊ महत्त्वाच्या केंद्रांवर या प्रबोधिनी कार्यरत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना शासनातर्फे निवास, सकस भोजन, दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक क्रीडा सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटिंग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, फुटबॉल, ट्रायथलॉन आणि सायकलिंग अशा एकूण 16 क्रीडा प्रकारांचा समावेश असून, तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून नियमित सराव करून घेतला जाणार आहे.

प्रवेशाची ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. ज्या खेळाडूंनी राज्य पदक प्राप्त केले आहे किंवा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे, त्यांना थेट निवडीची संधी उपलब्ध असेल. मात्र, इतर खेळाडूंना आपल्या कौशल्याची सिद्धता करण्यासाठी विभागीय स्तरावर होणाऱ्या चाचण्यांना सामोरे जावे लागेल. या चाचण्या 27 ते ३० एप्रिल दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. निवडीसाठी केवळ अर्ज करणे पुरेसे नसून खेळाडूची तांत्रिक समज, शारीरिक तंदुरुस्ती आणि कामगिरीतील सातत्य या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

00000000

भातकुली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 100 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 13 (जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्थानिक महाविद्यालयाच्या प्रांगणात 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या पाल्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात अशा मेळाव्यांतून रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जमदाडे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांनी रोजगारासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे धाडस करावे. तरुणांनी घराबाहेर पडून संधी शोधल्यास प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. या मेळाव्यामुळे मेळघाट आणि ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचा हातभार लागेल,  असे श्रीमती बारस्कर म्हणाल्या.

 मेळाव्यात एकूण 10 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. 200 हून अधिक रिक्त पदांसाठी सुमारे 234 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 180 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या असून, मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या 100 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

00000000

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे लाभार्थ्यांना मिळणार

'डिजिटल मार्केटिंग', 'ई-कॉमर्स'ची साथ

अमरावती, दि. 13 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य देण्यासोबतच लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.यासाठी डिजिटल प्रशिक्षण उपक्रम व मार्केटींग टॅब या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे.

स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ मिळावी, यासाठी महामंडळातर्फे मार्केटींग टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. लघू उद्योजकांकडील दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने अधिकृत पोर्टलवर व्यवसाय वर्धन हा मार्केटींग टॅब विकसित केला आहे. सदर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स फ्लीपकार्ट, ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत, संपर्क तपशील व व्यवसायाचा पत्ता अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या या प्लॅटफॉर्मवर 27 हजार 500 पेक्षा अधिक व्यवसायांची नोंद करण्यात आली आहे.

यात व्यवसाय श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका याप्रमाणे सर्च सुविधा देण्यात आली आहे. भविष्यातील लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पेमेंट गेटवे बाबतही महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. महामंडळाने वेबीनार, यूट्यूब, पॉडकॉस्टच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यात व्यवसाय कसा सुरू करावा, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक हाताळणी आणि आर्थिक नियोजनाची माहिती तज्ञ व्यक्तींकडून देण्यात येते. प्रशिक्षणाचे व्हिडिओ अधिकृत यूट्यूब आणि फेसबुल चॅनेलवर उपलब्ध आहेत,

महामंडळाने डीजी लॉकर सेवा स्वतःच्या प्रणालीमध्ये समाविष्ट केली आहे. भविष्यात महा-आयडी व आधार कार्डबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

0000000

Friday, April 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10-04-2026






डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन वाहने दाखल;

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 10 (जिमाका): शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३० नवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अमरावती शहर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे.  ही नवीन अत्याधुनिक वाहने यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आज पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. अमरावती शहर पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या ३० नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे आणि गस्त घालणे अधिक सुलभ होणार आहे.

 या सोहळ्याला आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, अमरावती शहर हे शिक्षणाचे, संस्कृतीचे केंद्र आहे. येथे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण अमरावतीत सीसीटीव्ही सर्वेलन्सचे जाळे विणले जाईल. यामुळे अवैध धंदे करणारे समाजकंटकांवर चाप बसणार आहे.

            पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे विशेष बंदोबस्त ठेवावा. तसेच, 'पोलीस मित्र' संकल्पना राबवून सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. महामार्गावर गोवंश तस्करी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे आणि रात्रीच्या वेळी दुचाकीवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. प्रसारमाध्यांमध्ये प्रसारीत होणाऱ्या बातम्यांवर त्वरित कार्यवाही करा. बातम्यांवर केलेल्या कार्यवाहीची  माहिती प्रसारमाध्यमांना द्या, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे त्यांनी यावेळी दिले.

              पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी तर आभार पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मानले.

00000000

उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास भाडे रकमेत हंगामी भाडेवाढ;

अमरावती विभागाकडून साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के वाढ

अमरावती, दि. 10 (जिमाका): उन्हाळी सुट्ट्या, सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसच्या भाड्यात 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला गर्दीच्या काळात 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली आहे, त्याअंतर्गत अमरावती विभागाचे सक्षम प्राधिकारी यांनी ही 10 टक्के दरवाढ मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे साध्या बसचा सध्याचा 10.05 रुपये प्रति टप्पा दर आता 11.05 रुपये इतका होईल. अमरावती येथून विविध महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सुधारित दरपत्रकानुसार, अमरावती ते नागपूर प्रवासासाठी आता 290 रुपये (आधी 262), अमरावती ते धारणी 268 रुपये (आधी 242) आणि अमरावती ते अकोला 191 रुपये (आधी 172) मोजावे लागतील. तसेच परतवाडा, दर्यापूर आणि मोर्शी या मार्गांसाठी 91 रुपयांऐवजी 102 रुपये भाडे आकारले जाईल.

महत्त्वाची बाब म्हणजे ही भाडेवाढ केवळ 'साध्या बस' प्रकारासाठीच लागू असून, महामंडळाच्या इतर प्रगत सेवांचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर राहणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन अमरावती विभागाचे नियंत्रक सचिन डफळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांना सेवा देण्यासाठी ही दरवाढ आवश्यक असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

000000







समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

‘समता सप्ताह सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांना वितरण

अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या निधीतून विशेष तरतूद केली जाते. या लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित 'समता सप्ताह' अंतर्गत विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार आणि लाभ वितरण सामाजिक न्याय भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

              आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील,  जिल्हाधिकारी आशिष येरेकर ,प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, भारतीय संविधानामुळे आज 140 कोटी भारतीय एकत्रित आहे. ही संविधानाची ताकद आहे. 'समता सप्ताह' सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. शहरातील इर्वीन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष स्मारक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शैक्षणिक सुविधेअभावी एकही विद्यार्थी मागे पडू नये याची दक्षता घ्यावी.  नागपूरच्या धर्तीवर अमरावतीमध्येही समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अभ्यासिका आणि ई-लायब्ररी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत नोकरीचे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप  करण्यात आले.  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात आणि अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती तसेच इतर विविध योजनांच्या लाभांचे वितरणही यावेळी करण्यात आले.

 

सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांच्या माहिती पुस्तिकेचे यावेळी विमोचन करण्यात आले. समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आणि आभार श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

0000000





भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

अमरावती, दि. 10 (जिमाका): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी  आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले,नियोजित भूमापन मोजणीचा कालावधी कमी करून तो पंधरा दिवसांवर आणावा. त्यासाठी मोजणी साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आले आहे. यापूर्वी नियमित मोजणीसाठी 90 दिवस तसेच द्रुगतीसाठी 30 दिवस असा कालावधी होता. हा कालावधी कमी करण्यात यावा. जिल्ह्यात या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मनुष्यबळाची भरती करण्यात यावी. नगर भूमापनचे काम भू -नक्शा या प्रकल्पाखाली करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या स्तरावर जिल्ह्यातही प्रकल्प राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.

00000000

गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण, कुस्ती मॅट वितरण

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका) : गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी सन 1914 मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचे गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने नामफलकाचे लोकार्पण, तसेच कुस्ती मॅट वितरण सोहळा शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी पार पडला. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन, तसेच कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार प्रविण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.

प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे आणि आशीष हटेकर यांनी सूत्रसंचालन केले.

00000000

 

Thursday, April 9, 2026

DIO NEWS AMRAVATI 09-04-2026

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

अमरावती, दि. 9 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौऱ्यानुसार, दुपारी 2 वाजता श्री. बावनकुळे हे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेल्या नवीन शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त समाज कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम, तसेच सायंकाळी 5 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असोसिएशनतर्फे आयोजित गजलनवाज भिमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव व नागरी सत्काराला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरूवर्य अंबादासपंत वैद्य मार्गाचे नामकरण आणि कुस्ती मॅटचे उद्घाटन करतील.

श्री. बावनकुळे हे सायंकाळी 7 वाजेनंतर डॉ. सुनील देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 09 : जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रामुख्याने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यात येवदा, वडनेर गंगा येथे आरोग्य सुविधांसाठी यंत्रणांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. तसेच रूग्णांच्या तपासण्यांसाठी सॅम्पल अमरावती येथे पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांची अडचण होते. त्यामुळे या सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सकारात्मकतेने काम करावे. दर्यापूर तालुका अल्पसंख्याकमध्ये येत असल्याने त्यांच्यासाठी असलेल्या योजनांमधून आरोग्य विषयक सुविधा उभारण्यावर भर द्यावा. तसेच ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागांचा शोध घेण्यात यावा. गरजूंना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी.

वन विभागातर्फे नमो उद्यान आणि वड उद्यान तयार करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. तसेच ही उद्याने तयार करताना याठिकाणी झाडांची संख्या अधिक असावी. तसेच अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या पुढाकाराने शहरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. तसेच सर्वांना घरे ही शासनाची भूमिका असल्याने पट्टेवाटप करण्यात यावे. खेलो इंडियामध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 14 प्रस्ताव पाठविण्यात यावे. तसेच यावली शहिद येथील शहिद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

00000






मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;

महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती, दि. 9 (जिमाका): अमरावती मतदारसंघातील मतदार नोंदणी आणि 'एस आय आर' (SIR) मॅपिंगच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी आज तहसील कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी सर्व नगरसेवक आणि बीएलओ  सुपरवायझर यांना मतदारांच्या समस्या सोडवून मॅपिंग प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्रामध्ये अद्याप मुख्य 'एस आय आर' प्रोग्राम सुरू झाला नसून सध्या केवळ प्री-मॅपिंगचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा त्रस्त होऊ नये. मतदारांनी आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ज्या प्रभागांमध्ये मॅपिंगची टक्केवारी कमी आहे, तेथील लोकप्रतिनिधी आणि सुपरवायझर यांना अधिक सक्रिय होण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मॅपिंगच्या कामाला गती देण्यासाठी येत्या 11 आणि 12 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'विशेष कॅम्प' आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून नागरिकांना सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदारांनी घाबरून न जाता या दोन दिवसांच्या शिबिरात आपले नाव आणि मॅपिंगची खातरजमा करून घ्यावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार सुनील रासेकर, राजेश धवणे (निवडणूक विभाग), कृष्णा गाडेकर, महसूल सहाय्यक भारत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांनी बीएलओंच्या कामात पूर्णतः सहाय्य करावे, जेणेकरून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत होईल, असा विश्वास महापौर श्री. तेजवानी यावेळी व्यक्त केला.

00000

खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1

सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 09 (जिमाका) : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधांसाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक व आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारे) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (1) व कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.

          मार्च-2026 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाईन या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यामातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. ऑनलाईन ई-आर-1 सादर करतांना काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल-2026 आहे. ई-आर-1 ऑनलाईन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

 

DIO NEWS AMRAVATI 13-04-2026

  शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन अमरावती ,   दि.  13 (जिमाका) :   डॉ. बाबासाह...