Monday, April 20, 2026

विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी


 

विशेष लेख :

पर्यटन क्षेत्रात महिला राज!

'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी

   पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष पंचसुत्री आणि सवलती जाहीर करण्यात आल्या असून, अमरावती जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १६० महिलांनी हॉटेल, रेस्टॉरंट, होमस्टे आणि वेलनेस सेंटर्स यांसारख्या विविध व्यवसायांसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.

    या धोरणाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे महिला उद्योजकांना मिळणारा आर्थिक आधार. पर्यटन व्यवसायाच्या उभारणीसाठी महिलांनी मान्यताप्राप्त बँकांकडून १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास, त्यावरील १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालयामार्फत थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतो. हा लाभ कर्ज परतफेड होईपर्यंत, किंवा ७ वर्षांच्या कालावधीसाठी, किंवा व्याजाची रक्कम ५ लाख रुपये पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) लागू राहते.

     या योजनेअंतर्गत सुमारे ३० प्रकारचे व्यवसाय पात्र ठरवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने होम स्टे, हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन (जमीन, हवा, जल), ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर, आयुर्वेद व योग केंद्र, वेलनेस सेंटर, हस्तकला दुकाने आणि आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा अस्तित्वातील व्यवसायाची व्याप्ती वाढवू इच्छिणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा.

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा आणि त्याची मालकी पूर्णपणे महिलेकडे असणे अनिवार्य आहे. तसेच, महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे. याशिवाय, व्यवसायासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या प्राप्त असाव्यात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे.

इच्छुक महिला उद्योजकांनी पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtratourism.gov.in) ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत ५० रुपये प्रक्रिया शुल्क भरल्याची पावती, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, व्यवसायाच्या जागेचा पुरावा (७/१२ उतारा किंवा भाडे करार), आणि ५०० शब्दांत प्रकल्पाची संक्षिप्त माहिती अशी कागदपत्रे अपलोड करावी. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विभागाकडून 'सशर्त हेतू पत्र' दिले जाईल, ज्याच्या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घेता येईल.

या क्रांतीकारी धोरणामुळे राज्यातील महिलांना केवळ रोजगाराच्या संधीच मिळत नाही, तर पर्यटन क्षेत्राच्या विकासात त्यांचा सक्रिय वाटा राहत आहे. अधिक माहितीसाठी महिला उद्योजकांनी अमरावती येथील पर्यटन उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधावा व पर्यटन धोरणातून उद्योजिका बनण्याच्या स्वप्नांना गवसणी घालावी !

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

0000

जिल्ह्यातील शाळा सकाळी 10 वाजेपर्यंतच भरणार

अमरावती, दि. 20 (जिमाका) : विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्मालाटेचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आता दहा वाजेपर्यंत भरणार आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी आता केवळ सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरतील. हा आदेश 21 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत लागू राहील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सकाळी १० नंतरच्या उर्वरित तासिका ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. हा आदेश सर्व अनुदानित, विनाअनुदानित तसेच खासगी शाळांसाठी बंधनकारक असेल.

वाढत्या उष्म्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी हा खबरदारीचा उपाय योजण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सकाळी 10 नंतर शाळा सुरू ठेवता येणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था आणि उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

000000

DIO NEWS AMRAVATI 20.04.2026


                        जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक हिमोफिलिया दिन' साजरा

*28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

अमरावती, दि. 20 (जिमाका) : रक्ताशी संबंधित असलेल्या हिमोफिलिया आजाराविषयी समाजामध्ये जनजागृती व्हावी आणि या आजाराचे वेळेत निदान व्हावे, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे 'हिमॅटोलॉजी डे केअर सेंटर' येथे जागतिक हिमोफिलिया दिन साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यातील 28 रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

हिमोफिलियाच्या रुग्णांना रक्तातील संबंधित 'फॅक्टर' द्यावे लागतात. मात्र, 5 ते 10 टक्के रुग्णांमध्ये ठराविक काळानंतर या फॅक्टरचा परिणाम दिसून येत नाही. त्यांच्या शरीरात फॅक्टरच्या विरोधात 'इन्हीबिटर' तयार होतात. ही बाब लक्षात घेऊन, जागतिक हिमोफिलिया दिनाचे औचित्य साधून शिबिरातील 28 रुग्णांची मोफत 'इन्हीबिटर' चाचणी करण्यात आली.

शिबिरात तज्ज्ञांनी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आजाराची सखोल माहिती दिली. हिमोफिलियासोबत आयुष्य सुरक्षितपणे करून जगावे, वेदना कशाप्रकारे कमी कराव्यात आणि नियमित उपचार कसे घ्यावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. सोळंके आणि अधिसेविका श्रीमती अटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कार्यक्रमासाठी डे केअर युनिटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव, डॉ. प्रिती वासनकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. नेहा कांबळे, समन्वयक त्रिशिला इंगोले, समुपदेशक मनोज सहारे, अधिपरिचारिका अनामिका चव्हाण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ललिता अग्रवाल, समुपदेशक मनोज पाटील आणि डॉ. बेलसरे यांनी पुढाकार घेतला.

00000

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

अमरावती, दि. 20 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य, महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खासगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. निबंधाच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतील. या गटाला ८०० ते १ हजार २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमाकावर संपर्क करू शकतील. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000000

मंगळवारी कौशल्य विकास केंद्राचा रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेचे मंगळवार, दि. 21 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो, रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटरतर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. मेळाव्यात योजनेसाठी विविध आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा

अमरावती, दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत मंगळवार, दि. 21 एप्रिलपासून दि. 8 मेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा रोजगार मेळावा होणार आहे.

मेळाव्यामध्ये हैद्राबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. कंपनीला आवश्यक असलेल्या पात्रतेच्या पदासाठी सदर कंपनीचे प्रतिनिधी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतील.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

0000000

              शहर परेड मैदानावर महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा होणार

       अमरावती, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा होणार आहे. यावर्षीचा साजरा होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या शहर परेड मैदानावर होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे.

000000

महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अंमलात असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती घ्या...



महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अंमलात असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती घ्या... #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan #empoweringwoman #NariShakti #GovernmentSchemes

 

Sunday, April 19, 2026

महिला व बाल विकास विभागाच्या १० योजना आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध..


महिला व बाल विकास विभागाच्या १० योजना आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध.. #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan #empoweringwoman #NariShakti

 

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाची #लेक_लाडकी_योजना #womenempowerment



मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाची #लेक_लाडकी_योजना


 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत... महिला करत आहेत चववळीचे नेतृत्व...


 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत... महिला करत आहेत चववळीचे नेतृत्व... #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan #empoweringwoman #NariShakti

Saturday, April 18, 2026

नारी शक्ती हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या बळावर आज महिला राष्ट्र उभारणीतील प्रमुख शक्ती बनत आहेत. सशक्त महिला म्हणजे सुदृढ आणि समृद्ध देश.

 



नारी शक्ती हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या बळावर आज महिला राष्ट्र उभारणीतील प्रमुख शक्ती बनत आहेत. सशक्त महिला म्हणजे सुदृढ आणि समृद्ध देश. #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #NariShaktiVandan #empoweringwoman #NariShakti

विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी

  विशेष लेख : पर्यटन क्षेत्रात महिला राज! 'आई' धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी    पर्यटन क्षेत्रात मह...