Friday, July 3, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
#शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare #Maharashtra

DIO NEWS AMRAVATI 03.07.2026






 पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीने तक्रार निवारणासह जनजागृतीवर भर द्यावा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

अमरावती, दि. 3 (जिमाका) : मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व हा तिहेरी संगम सुरक्षित रहावा, यासाठी पॉश कायद्याची अंमलबजावणी चोख व्हावी, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. त्यादृष्टीने पॉश कायद्यांतर्गत आस्थापनांमध्ये स्थापित तक्रार निवारण समित्यांनी अधिक जागरूक राहून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच याबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज येथे केले.

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (पॉश ऍक्ट) कायद्याबाबत कार्यशाळा श्रीमती रहाटकर यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

            जिल्हाधिकारी आशिष येरेकर, यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, विधी सचिव श्री. सहारे, महिला आयोगाचे उपसंचालक रामावतार सिंह, नंदिता प्रधान आदी उपस्थित होते.

श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, महाराष्ट्र हे संवेदनशील राज्य आहे. महिलांसाठी प्रत्येक कामाचे ठिकाण हे सुरक्षितता, सन्मान आणि समान संधी देणारे असले पाहिजे. महिलांना सुरक्षित आणि भेदभावमुक्त कामाचे वातावरण मिळावे यासाठी ‘पॉश’कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचे नियमित ऑडिट होण्याची गरज आहे. राष्ट्रीय महिला आयोगामार्फत महिलांच्या विविध विषयांवर वेगवेगळे संशोधन सातत्याने सुरू असतात. या संशोधनातून स्त्रियांसाठी आवश्यक कायदे, त्यांचे अधिकार  यावर निर्णय घेण्यास मदत होते.

सरकारी, खासगी, संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील प्रत्येक स्थळी  कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण  कायद्याच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी. महिलांसाठी सुरक्षित, सर्वसमावेशक आणि लिंग-संवेदनशील कार्य वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात यावा. कायद्याने महिलांना संरक्षण दिले आहे. यासाठी अंतर्गत तक्रार समित्या  प्रभावीपणे कार्यरत राहून कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी.  तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता असावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

            निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रास्ताविक केले. विविध आस्थापनांमधील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य,महिला कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

      यादरम्यान श्रीमती रहाटकर यांनी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले.

यावेळी प्रभारी प्राचार्य संगीता इंगोले, कॉलेज कौन्सिलिंगच्या जे. डी. थोटे, डीबीटी समन्वयक डी. डी. खेडकर आदी उपस्थित होते.

00000000




58 तक्रारींवर राष्ट्रीय महिला आयोगाची जनसुनावणी

अमरावती, दि. 3 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. यात 58 तक्रारी विचारात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे उपस्थित सर्व तक्रारदारांशी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्तिश: भेट दिली आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले.

जनसुनावणीच्या वेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यासह आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

जनसुनावणीसाठी आलेल्यांची नोंदणी करून त्यांना टोकन क्रमांक देण्यात आले. नियोजन भवनात दोन पॅनेल करून उपस्थित महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर संवेदनशील प्रकरणी आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रहाटकर यांनी तक्रारदारांशी व्यक्तीश: संवाद साधला. जनसुनावणीत प्रामुख्याने पॉश, नातेसंबंधातील तडजोडीची प्रकरणे, घरगुती हिंसाचार आदी प्रकरणे समोर आली. काही प्रकरणी तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन श्रीमती रहाटकर यांनी पोलिसांना तात्काळ गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांची प्रत सादर करण्यास सांगितले. तडजोडीच्या प्रकरणात काहींनी एकत्र राहण्याचे मान्य केले.

जनसुनावणीत आली प्रकरणे ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या प्रकरणांचा मागोवा घेतला जाणार आहे. यातून पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गुन्हा नोंदविल्यानंतर चार्जशिट दाखल करण्यापर्यंत प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे. आयोगाच्या आखत्यारीत येऊ शकणार नाही, अशा प्रकरणी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारी योग्य प्राधिकरणाकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या राज्यातील विविध भागात जनसुनावण्यामुळे महिलांसाठी असलेल्या यंत्रणांबाबत जनजागृती वाढण्यास मदत होत असल्याचे श्रीमती राहटकर यांनी सांगितले.

0000000




कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

अमरावती, दि . 3 ( जिमाका):कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या महिला केंद्रित योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले आहे.

 येथील महसूल भवन येथे आयोजित  बैठकीत त्यांनी महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

 याप्रसंगी बोलताना श्रीमती रहाटकर यांनी सर्व शासकीय विभागांना एका महिन्याच्या आत आपल्या कार्यालयांमध्ये 'पॉश' म्हणजेच लैंगिक छळ प्रतिबंधक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समित्या स्थापन करून त्याचा सविस्तर अहवाल संबंधित जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आढावा बैठकीला विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी तसेच वन विभागाच्या मुख्य वन संरक्षक जयोती बॅनर्जी, वनसंरक्षक अर्जुना के आर यांच्यासह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व समित्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी येत्या चार महिन्यांचा एक सुनियोजित कार्यक्रम तयार करून राबविण्यात यावा. महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पीडित महिलांना तातडीने आणि अत्यंत संवेदनशीलतेने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कामाच्या ठिकाणी महिलांसाठी अत्यंत सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे ही सर्वच शासकीय यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.

 संकटकाळात सापडलेल्या किंवा पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक मदत देणाऱ्या 'वन स्टॉप सेंटर' या योजनेबाबत जनजागृती करण्यात यावी, तसेच तेथील सेवांची  वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारात योग्य स्थान मिळावे आणि या वस्तू आपल्या जिल्ह्याची एक स्वतंत्र ओळख 'ब्रॅन्ड ' म्हणून पुढे याव्यात, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती रहाटकर यांनी यावेळी केले.

0000000

सोमवारी अचलपूर येथे निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा

अमरावती, दि. 03 (जिमाका): लेखा व कोषागारे विभागातर्फे अचलपूर तालुक्यातील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाउपलब्धी ॲपद्वारे निवृत्तीवेतनासंबधात माहिती व सेवांची माहिती देण्यात येणार आहे.

सदर मेळावा अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्ती वेतनाबाबत वरीष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला निवृत्ती वेतनधारक तथा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवृत्त वेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केले आहे.

000000

'स्वाधार' योजनेतील त्रृटी पूर्ण करण्यासाठी 7 जुलैपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 03 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या, परंतु कागदपत्रातील त्रुटींमुळे कार्यालयस्तरावर प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्रृटी पूर्ण करण्यासाठी दि. 7 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अकरावी, बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट आर्थिक मदत देण्यासाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना' सुरू केली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, त्यांच्यापैकी काही अर्ज कागदपत्रातील त्रृटींमुळे कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता केलेली नाही, ज्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

त्रृटींमुळे प्रलंबित असलेल्या अर्जाचा पुर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे कार्यालयात संबंधित शाखेकडे जमा करावीत. या मुदतीत त्रुटी पूर्ण केली नसल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची राहणार आहे. तसेच दि. 7 जुलै 2026 या कालावधीत दुपारी 3 ते 5 यावेळेत स्वत: उपस्थित राहून त्रृटी पूर्तता करून घेण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्रृटी पुर्ततेबाबत अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661261 वर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात माजी सैनिकांना नोकरीची संधी

अमरावती, दि. 03 (जिमाका) : अमरावती येथील सैनिकी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह येथे माजी सैनिक आणि इतरांना नोकरीच संधी आहे. यासाठी दि. 13 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशासकीय पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेचा कालावधी संपुष्टात येत या जागा रिक्त होत आहेत. यात सहायक वसतिगृह अधीक्षक 2, चौकीदार 1, माळी 2, सफाई कर्मचारी 2, स्वयंपाकी महिला 4 ही पदे आहेत. ही पदे माजी सैनिक संर्वगातून भरण्यात येणार आहे. सदर पद ही अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिक, इतर नागरिकांना सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथे सहायक वसतिगृह अधीक्षक आणि चौकीदार पदासाठी निवासी रहावयाचे आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, माजी सैनिक पाल्य, इतर नागरिकांनी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावेत.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0721-2661126 वर संपर्क साधावा, तसेच माजी सैनिक संर्वगातून उमेदवार प्राप्त झाले नसल्यास इतर नागरिकांना संधी देण्यात येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी कळविले आहे.

0000000

त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाइन सादर करावेत

*जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे आवाहन

अमरावती दि. 03 (जिमाका):  खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजना विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योग आणि आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणे) कायद्यान्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

जून 2026 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक कालावधीकरिता ई-आर-1 ची प्रणाली माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाचे आहे. तसेच, त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे.

ऑनलाइन ई-आर 1 सादर करताना अडचणी आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 उपलब्ध आहे. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. या मुदतीत ई-आर 1 ऑनलाइन सादर करू शकले नसल्यास संबंधित आस्थापनांवर विहित नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.

00000000

Thursday, July 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.07.2026

 जिल्हा कोषागार कार्यालय येथे नवीन सेवार्थ प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर संपन्न

अमरावती, दि. 02 (जिमाका):  शासनाच्या डिजिटल कार्यप्रणालीला अधिक सक्षम, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती तर्फे ‘नवीन सेवार्थ प्रणाली (ई-वेतन) कामकाज मार्गदर्शिका’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर जिजाऊ सभागृह येथे नुकतेच संपन्न झाले. या शिबिरामध्ये अमरावती शहरासह चांदूर रेल्वे, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, धामणगाव व नांदगाव या उपकोषागार कार्यालयांतर्गत येणारे आहरण व संवितरण अधिकारी सहभागी होते. यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ,  अप्पर कोषागार अधिकारी  जयश्री उताणे, कोषागार अधिकारी अमोल इथापे आदी उपस्थित होते.

जयश्री उताणे यांनी प्रास्ताविकातून डिजिटल कार्यप्रणालीचे महत्त्व आणि शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. कोषागार अधिकारी श्री.  इथापे यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली  आणि 'ग्रास'  या प्रणालींच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना कामकाजात पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.  विजय जवंजाळ यांनी नवीन प्रणालीमध्ये 'डेटा मायग्रेशन' करताना घ्यावयाची काळजी, माहितीची अचूकता आणि त्रुटी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर भर दिला. डेटा मायग्रेशन ही प्रणालीच्या यशाची गुरुकिल्ली असून ती काळजीपूर्वक पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षक  पवन पचाजे, व नमिता हांडे यांनी सेवार्थ प्रणालीतील विविध मॉड्युल्स, कर्मचारी माहिती अद्ययावतीकरण आणि ई-वेतन प्रक्रियेचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. उपस्थितांनी या डिजिटल उपक्रमाचे स्वागत करत, हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कामकाजासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

000000000

फळपीक विमा योजना 2026: संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ

उत्पादक शेतकऱ्यांना मुदतवाढ; कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका): राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 (मृग बहार) अंतर्गत अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, लिंबू आणि सीताफळ या प्रमुख फळपिकांसाठी विमा उतरवण्यास मंजुरी दिली असून, शेतकऱ्यांना यात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, लिंबू, संत्रा व मोसंबी या फळपिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर सीताफळ पिकासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे  फळबागांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांना स्थैर्य देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'अॅग्रीस्टॅक' अंतर्गत शेतकरी ओळखपत्र असणे आणि 'ई-पिक पाहणी' पोर्टलवर पिकाची नोंद असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणीत विसंगती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच (संत्री, मोसंबी व सीताफळसाठी किमान वय 3 वर्षे आणि लिंबूसाठी 4 वर्षे) हे विमा संरक्षण कवच मिळेल. प्रति शेतकरी किमान 20 गुंठे ते कमाल 4 हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा निश्चित आहे.

विमा संरक्षणाचा विचार करता, संत्रा व मोसंबीसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये (शेतकरी हिस्सा 5 हजार रुपये), लिंबूसाठी 80 हजार रुपये (शेतकरी हिस्सा ४ हजार रुपये) आणि सीताफळासाठी 70 हजार रुपये (शेतकरी हिस्सा 3 हजार 500 रुपये) विमा हप्ता निश्चित केला आहे.

अमरावती जिल्ह्यात 'इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी'मार्फत ही योजना राबविली जात आहे. हवामानाचा धोका उद्भवल्यास नुकसान भरपाई थेट आधार लिंक बँक खात्यात जमा होईल. तरी जिल्ह्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत किंवा 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन विहित मुदतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले  केले आहे.

00000000

अचलपूर येथे 6 जुलै रोजी 'नवीन सेवार्थ प्रणाली' प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती, दि. 02 (जिमाका): शासनाच्या नवीन सेवार्थ प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी, पारदर्शक आणि सुरळीत अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने जिल्हा कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवीन प्रशासकीय इमारत, उपविभागीय कार्यालय, अचलपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रशिक्षणासाठी अचलपूर, दर्यापूर, चिखलदरा, धारणी आणि अंजनगाव सुर्जी या पाच तालुक्यांतील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधित कार्यालयांतील सेवार्थ प्रणाली हाताळणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन सेवार्थ प्रणालीची नेमकी कार्यपद्धती, वेतन देयके अचूकपणे तयार करण्याची प्रक्रिया, प्रणालीतील विविध मॉड्यूल्सचा वापर, आवश्यक दुरुस्त्या आणि नवीन तांत्रिक बदलांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, एनपीएस वेळेत जमा करण्याची पद्धत आणि 'ग्रास' प्रणालीचा वापर करून शासकीय खात्यात महसूल भरण्याची प्रक्रिया याविषयी प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली जाईल. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व लेखाविषयक कामात सुसूत्रता आणि गतिशीलता आणण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार असून, यात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. तरी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

00000000

'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना: ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण;

31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 02 (जिमाका):ओबीसी, ईबीसी  आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 11 वी पर्यंत उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  

‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या https://scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम पोर्टलवर 'New Registration' करावे व मिळालेला Application ID व पासवर्ड वापरून 'Fresh Login (AY २०२६-27)' अंतर्गत अर्ज भरावा. अर्जात वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक खात्याचा तपशील भरून जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न 12.5 लाखांपर्यंत), गुणपत्रक, प्रवेश प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे PDF/JPEG स्वरूपात अपलोड करावीत. अंतिम सबमिशन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी, कारण एकदा 'Final Submit' केल्यावर अर्जात बदल करता येत नाही. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट काढून आपल्या शाळेत संपर्क साधावा, जेणेकरून शाळेचे 'Institute Nodal Officer' (INO) तो अर्ज ऑनलाईन पडताळू शकतील. वेळापत्रकानुसार विद्यार्थी अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत खुली असली, तरी शाळा स्तरावरील पडताळणी 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत व जिल्हा, राज्य स्तरावरील पडताळणी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. अर्ज करताना मोबाईल व ईमेल सक्रिय असणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो; याकरिता शाळांच्या मुख्याध्यापकांनी तातडीने कार्यवाही करावी.

00000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना2026 #महाराष्ट्रशासन #शेतकरी #Maharashtra

Wednesday, July 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.07.2026

 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

विजया रहाटकर शुक्रवारी अमरावतीत

*नियोजन भवनात दुपारी 12 वाजता जनसुनावणी

अमरावती, दि. 1 (जिमाका) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या महिला जन सुनावणी घेणे, महिलाभिमुख उपक्रमांचा आढावा घेणे, संस्थात्मक यंत्रणा बळकट करणे आणि महिलांची सुरक्षा व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधणे यासाठी दि. 3 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान श्रीमती रहाटकर दुपारी 12 वाजता जनसुनावणी घेणार आहे.

श्रीमती रहाटकर यांच्या दि. 3 जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्यामध्ये विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश राहणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कार्यस्थळे अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टीने आयोजित 'पॉश'-लैंगिक छळ प्रतिबंध प्रशिक्षण कार्यशाळेने होईल. तसेच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील 'यशोदा एआय' कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहे. नवे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये महिलांची जागरूकता आणि सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले जाईल.

श्रीमती विजया रहाटकर अमरावती विभागातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. या बैठकीत महिला कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था यंत्रणा आणि महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच्या उपाययोजनांचे मूल्यमापन केले जाईल. याव्यतिरिक्त, त्या दि. 3 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 'महिला जन सुनावणी' घेतील. यात पूर्वनोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या जातील. यामुळे महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे त्यावर वेळेत हस्तक्षेप आणि निवारण करणे शक्य होईल. संबंधित क्षेत्रातील महिलांचे हक्क आणि कल्याणासाठीच्या सहकार्यात्मक प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीने या दौऱ्याची सांगता होईल.

00000000



जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

अमरावती, दि. 01 (जिमाका) : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली.

0000000

 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहिती पुस्तिकेचे विमोचन

अमरावती, दि. 01 (जिमाका): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या व्यापक प्रसिद्धीसाठी अमरावती राज्यसेवा हक्क आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या विशेष माहिती पुस्तिकेचे आज महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयात विमोचन करण्यात आले. मुख्य राज्यसेवा हक्क आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्याला राज्यसेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग, चित्रा कुलकर्णी, संदीप देशमुख,श्री. शिंदे तसेच आयोगाच्या सचिव श्रीमती वैशाली चव्हाण व इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरुण डोंगरे यांनी प्रास्ताविक करून पुस्तिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. तर कार्यक्रमाच्या शेवटी अमरावती राज्य सेवा हक्क कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, सर्व आयुक्त, विशेष कार्य अधिकारी श्री. शिंदे आणि सचिव श्रीमती चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार मानले. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत व पारदर्शकपणे मिळवून देण्यासाठी ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

0000000

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी मेळाव्यात 264 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 01 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती आणि पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच 'मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा' संपन्न झाला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे, कनिष्ठ मार्गदर्शन अधिकारी सुभाष गुल्हाने, संदीप यादव उपस्थित होते.

यावेळी पोलीस अधीक्षक निकेतन कदम म्हणाले की, पोलीस विभागाच्या शिस्तीसोबतच 'पोलीस मित्र' म्हणून प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी आहे. तरुणांनी या संधीचे सोने करून समाजात पोलीस विभागाची प्रतिमा सन्मानाने उंच करावी. तसेच उपायुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी, या प्रशिक्षणातून मिळणारे शिस्तीचे धडे आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. अत्यंत महत्त्वाच्या विभागासोबत काम करण्याची ही संधी आनंदाने स्वीकारावी, असे प्रांजली बारस्कर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संपदा डाखरे यांनी तर आभार पंकज कचरे यांनी मानले.

00000000

चिखलदरा मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळवली

 अमरावती, दि.01 (जिमाका) : चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून आजूबाजूचे जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात चिखलदरा येथे येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा-चिखलदार मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी जारी केले आहे.

याकारणास्तव 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी त्याचप्रमाणे शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत नंतरचे दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडा वरून चिखलदरा जाणारी वाहतुक ही परतवाडा वरून धामणगांव गढी मार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल तसेच चिखलदरा वरून परतवाडा परत येणारी वाहतुक ही चिखलदरा वरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावातील स्थानिक नागरिकांना रस्ते वाहतुक वळविण्याच्या आदेशात सुट देण्यात येत आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

0000000

शुक्रवारी शेतकरी, ग्रामीण उद्योजकांसाठी

'एनपीएस संचय' जनजागृती कार्यक्रम

अमरावती, दि. 1 (जिमाका) : अग्रणी जिल्हा बँक सेल - सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवार, दि. 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विशेष ‘एनपीएस संचय आउटरीच प्रोग्राम’ हॉटेल गौरी इन येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रामुख्याने शेती, संलग्न क्षेत्रे आणि ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग घटकांवर केंद्रित असणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशानुसार या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील असंघटित आणि वंचित घटकांपर्यंत, विशेषतः शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्थांचे सदस्य, ग्रामीण कारागीर, शेतमजूर आणि लहान उद्योजकांपर्यंत पेन्शन योजनेचा लाभ पोहोचवणे हा या 'एनपीएस संचय' योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागात नियमित बचतीची सवय वाढीस लागेल.

आउटरीच कार्यक्रमाचा मुख्य हेतू राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबद्दल व्यापक जनजागृती आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणे आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख घटकांना एकत्र आणून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या घटकांना हक्काची दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभाग आणि संस्थांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, एफपीओ फेडरेशन, जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बँक सखी, तसेच धन फाउंडेशन आणि क्रिसिल फाउंडेशनच्या क्षेत्रीय चमूसह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 150 हून अधिक प्रमुख प्रतिनिधींना पेन्शन योजनेची माहिती आणि महत्व पटवून दिले जाणार आहे. हे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन योजनेचा प्रसार करणार आहे.

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #Gover...