Wednesday, September 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16.09.2026

                       भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : आज उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात

 

अमरावती  विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 16 (जिमाका) : अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय टास्क फोर्स गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती  विभाग दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती  विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि  जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी केले आहे.

 

             राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी  तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

 

              विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात  प्रत्यक्ष  तसेच  ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यापूर्वीच मागविण्यात आले होते.

 

                जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती  विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी  यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

०००००



                   गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान

 

आजपासून अमरावती जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात

 

अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अमरावती  आजपासून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ करीत आहे.

 

         राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, या प्रमुख उद्देशाने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 

     

       जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात अमरावती शहरातील बुधवारा येथील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून होत आहे. या मंडळात 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अमरावती यांच्या तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

    कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना आदीबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

 

000000


सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 16 (जिमाका): नागरिकांच्या सोयीसाठी आणि गरजूंना लाभ देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे अभियान एक महिनाभर राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, अशा योजना या अभियानात राबविण्यात यावा, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यात प्रामुख्याने वन हक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम धारणी आणि चिखलदरा तालुक्यात प्राधान्याने राबविण्याचे निर्देश दिले. दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक गावात सभा घेऊन वनपट्टे वाटप निश्चित करावे. त्यानंतर दि. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाई करावी. ग्रामसभा, उपविभाग आणि जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन या अभियानात पट्टेवाटप अंतिम करण्यात यावे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला सात ई आणि बारा ईबाबत कार्यवाही करण्यात यावी.

 

अभियानात राशनबाबत कार्यवाही करण्यात यावी. यात लाभार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक नसलेल्या नागरिकांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात यावे. धान्य नको असलेल्या नागरिकांकडून लेखी घ्यावे, तसेच गरजूंची नावे समाविष्ठ करण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड आणि वयोवंदन योजनेत प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मेळघाटात प्रामुख्याने ही शिबीरे आयोजित करण्यात येतील.

 

युवकांसाठी 29 सप्टेंबर रोजी सर्व तालुक्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यात 1800 जागा भरण्यात येणार असून यासाठी 56 कंपन्यांनी नोंद केली आहे. आतापर्यंत 5 हजार युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यासोबतच समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात करीअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कामगार विभागातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, विमा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बँकेत पगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

अभियान विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांची जबाबदारीने कार्यक्रमाचे नियोजन करून राबवावे, तसेच याचा अहवाल सादर दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

000000

राज्य कामगार विमा योजना अतंर्गत सेवा संकल्प अभियानाचे आयोजन

 

             अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत सर्व सेवा दवाखान्यामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी उपचार, जनजागृती तसेच विविध आजाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

               यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान व अवयवदान जागरुकता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान शिबिर, स्वच्छता शिबिर, व्यसनमुक्त भारत जनजागृती शिबिर, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण व ॲनिमिया जनजागृती शिबिर, बालरोग शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश या सेवा संकल्प अभियानामध्ये आहे.

 

            वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. प्रिती काटे, प्रशासन अधिकारी डॉ.राजनारायण गोमासे, सर्व सेवा दवाखान्यातील प्रभारी विमा वैद्यकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातील श्रीमती स्नेहा बारसागडे (अधिपरिचारीका), श्री. योगेश कोल्हे (वरिष्ठ लिपिक) व इतर कर्मचारी या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन पार पाडणार आहेत. सदर सेवा संकल्प अभियानाचा लाभ सर्व विमाकामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.

 

०००००


भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात अमरावती विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन



भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात
अमरावती विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 16 (जिमाका) : अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय टास्क फोर्स गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती विभाग दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात प्रत्यक्ष तसेच ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यापूर्वीच मागविण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
०००००

 

विशेष लेख - सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

 


विशेष लेख

 

सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

 

‘सेवा परमो धर्मः’ ही केवळ एक उक्ती नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची भावना आहे. शासनाच्या योजना तयार होतात, निर्णय घेतले जातात; मात्र त्यांचा खरा अर्थ तेव्हा अधोरेखित होतो, जेव्हा त्या योजनांचा लाभ गावातील सामान्य कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतो. प्रशासन १७ सप्टेंबरपासून अशाच एका लोकाभिमुख अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या सहभागाचे कौतुक करणे आणि शासन नागरिकांच्या पाठीशी असल्याची भावना दृढ करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.हे अभियान म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नाही. सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा हा प्रयत्न आहे.

 

 कार्यालयाच्या फेऱ्या कमी होणार

 

गावातील एखाद्या नागरिकाला प्रमाणपत्र हवे असते, शेतकऱ्याला जमिनीची नोंद अद्ययावत करायची असते किंवा एखाद्या कुटुंबाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. अशा वेळी अनेकदा विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. सेवा संकल्प अभियानात ही प्रक्रिया शक्य तितकी सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे.

प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा निर्माण होणार आहे.

 शिबिरांच्या माध्यमातून कामांना गती

 

या शिबिरांमध्ये फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळजोडणी, वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच ७/१२ आणि ८-अ नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर—ज्या सेवेसाठी नागरिकाला वारंवार कार्यालयात जावे लागते, ती सेवा शक्य तितकी त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.

 

 गावात सेवा, गावातच समाधान

 

सेवा संकल्प अभियानाचा विशेष भर ग्रामीण भागावरही आहे. प्रत्येक गावात आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसार ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. गाव स्वच्छ ठेवणे, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे, आरोग्य तपासणी शिबिर घेणे, प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणे, जलसंधारण करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, रस्ते सुरक्षेबाबत जागृती करणे अशा अनेक उपक्रमांना या माध्यमातून चालना मिळणार आहे.

 

 शासनाची सेवा, समाजाचा सहभाग

 

याचा अर्थ एकच—शासनाची सेवा आणि समाजाचा सहभाग एकत्र आला, तर गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जमीन आणि महसूल विषयक कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. फेरफार नोंदी, ७/१२, ८-अ, स्वामित्व सनद, वनहक्क दावे यांसारख्या बाबी अनेकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत. वनहक्क दाव्यांच्या बाबतीत नवीन दावे स्वीकारणे, जुन्या दाव्यांमधील दुरुस्ती करणे आणि पात्र दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अभियानाच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणूनच सेवा संकल्प अभियानाचा लाभ गावातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजांशी जोडून पाहणे महत्त्वाचे आहे.

 

 

 

 अंगणवाडीतही सेवा उत्सव

 

लहान मुले आणि त्यांच्या मातांसाठीही या अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘अंगणवाडी उत्सव’ अंतर्गत अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य आणि पोषणविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, फळे व मिठाईचे वाटप आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची तरतूद आहे. ग्रामीण कुटुंबाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी आई आणि बालकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंगणवाडी उत्सव हा केवळ एक कार्यक्रम न राहता आई, बालक आणि पोषण यांना जोडणारा उपक्रम ठरतो.

 

 गावातील तरुणांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ

 

आज ग्रामीण भागातील तरुणांकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत. शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत ते नवे प्रयोग करू शकतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर या कल्पना मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतात.सेवा संकल्प अभियानात राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स आणि ग्रामीण भागात नवे प्रभावी उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींना जोडण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांना तज्ज्ञांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

 

 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा

 

देशाचे भविष्य वर्गखोल्यांमध्ये घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात आले आहे. ‘विकसित भारत’ आणि ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे विकसित भारताची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना भविष्यातील भारताच्या उभारणीशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

 

 लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ‘आशीर्वादाचा दिवा ’

 

शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रमही या अभियानात आहे. विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सरकारची योजना कागदावर असते; पण तिचा लाभ जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या घरात पोहोचतो, तेव्हा त्या योजनेला खरा अर्थ प्राप्त होतो. त्या समाधानाच्या क्षणाला जोडणारा हा उपक्रम आहे.

 

 बदलाची गोष्ट आता गावागावातून

 

एखाद्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळाल्याने शेतीत बदल झाला, एखाद्या महिलेला बचत गटामुळे आर्थिक आधार मिळाला, एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळाली किंवा एखाद्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले, तर ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट राहत नाही. ती इतरांसाठीही प्रेरणा बनते.

म्हणूनच ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समाजासमोर आणला जाणार आहे. त्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून संकलन करण्यात येणार आहे.

 

 सेवा संकल्पाची खरी दिशा

 

सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमामागे वेगवेगळी उद्दिष्टे असली, तरी त्यामागची भावना एकच आहे—सामान्य नागरिकाला सेवा मिळविण्यासाठी अधिक सोपे, सुलभ आणि जवळचे वातावरण निर्माण करणे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद व लोकसहभाग वाढविणारा ठरणार आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, शासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘माहितीअभावी पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये’, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद त्याच्या यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

 

प्रवीण टाके

उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय,

छत्रपती संभाजीनगर

९७०२८५८७७७

 

****

Tuesday, September 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.09.2026

                                जिल्हाधिकाऱ्यांकडून मोर्शी तालुक्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी

 

अमरावती, दि.15 (जिमाका): मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई महसूल मंडळातील नेर भाग-2 परिसरात  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन खरीप हंगामातील विविध पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. या दौऱ्या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून पिकांच्या वाढीबाबत सविस्तर माहिती घेतली.

 

             दौऱ्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी बाळा कीर्तकर यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली. या परिसरात पडलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे यावेळी दिसून आले. त्यानंतर रखमाबाई संभे आणि सुखदेव खवले यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली.या शेतांमध्ये सोयाबीनला शेंगांचे प्रमाण तुलनेने कमी असून, काही शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नसल्याचे चित्र समोर आले.रमेश खवले यांच्या शेतातील बागायती कपाशीची पाहणी केली असता, हे पीक मात्र समाधानकारक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले.

 

              पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध पर्जन्यमान, पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेले तांत्रिक मार्गदर्शन याबाबींची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत, त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

००००

बोर्डीनाला मध्यम प्रकल्पावर मच्छिमार संस्था नोंदणीला सुरुवात ; ३० दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 15 (जिमाका):  चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्प (152.27 हे.)  तलावावर नवीन सहकारी संस्था नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि महिला मच्छिमारांना येत्या 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे.

 

            या नोंदणी प्रक्रियेद्वारे बोर्डीनाला तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि महिला मच्छिमारांना रोजगाराची आणि व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

     

        तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि मच्छिमार महिला या संस्था नोंदणीसाठी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था),अमरावती यांचे कार्यालयात अर्ज करू शकतात. 30 दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.स्थानिक पातळीवर मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छिमार बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. तरी इच्छुकांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4 हजारावर प्रकरणांचा निपटारा

 

14.48 कोटींहून अधिक रक्कमेची  तडजोड

 

अमरावती, दि. 15 (जिमाका) : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  दाखलपूर्व प्रकरणातील 2 हजार 460 प्रकरणे आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 2 हजार 131 अशा एकूण 4 हजार 591 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये  14 कोटी  48 लाख 73 हजार 991 रुपयांची तडजोड झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आणि अमरावतीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा  उज्वला एम. नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली 12 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील विविध तालुका न्यायालयांमध्ये 'राष्ट्रीय लोक अदालत' आयोजित करण्यात आली.

 

जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती  प्रविण एस. पाटील यांनी  या निमित्ताने जिल्ह्यातील विविध न्यायालयांना भेटी दिल्या. त्यांनी चांदुर बाजार येथील राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी न्यायिक अधिकारी, वकील आणि पक्षकारांशी संवाद साधून तडजोडीसाठी प्रोत्साहन दिले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश  उज्वला एम. नंदेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

56 लाखांची उल्लेखनीय तडजोड आणि 'विशेष मोहीम'

 

अमरावती जिल्हा मुख्यालयातील लोक अदालतीमध्ये मोटर अपघात नुकसानभरपाई (एमएसीपी) संदर्भातील एका प्रकरणात उल्लेखनीय यश आले. पक्षकारांमधील सामोपचारानंतर विमा कंपनीने 56 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. ही तडजोड जिल्हा न्यायाधीश-1  ए. जी. जोशी, प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) हरीश शेंडे आणि जिल्हा न्यायाधीश-8 गिरीश देशमुख यांच्या पॅनेलसमोर झाली.

 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 7 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेत 1 हजार 307 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, ज्यामुळे लोक अदालतीला मोठी  गती मिळाली.

000000

जिल्ह्यात तडीपारीच्या 163 प्रकरणांचा निपटारा;

10 प्रलंबित प्रकरणांवर आज सुनावणी

 

            अमरावती, दि. 15 (जिमाका): जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि उपविभागीय दंडाधिकारी प्रशासनाकडून वेगाने कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे. विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण 163 तडीपारीची प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 10 प्रलंबित प्रकरणांवर बुधवारी, 16 सप्टेंबर रोजी याबाबत अंतिम आदेश जारी होणार आहे.

 

यासंदर्भात पोलीस विभागने जारी केलेल्या अहवालानुसार, कलम 163(2) अंतर्गत एकूण 105 प्रकरणे प्राप्त झाली होती, ती सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर कलम 56 अंतर्गत एकूण 60 प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यापैकी 54 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

 

              दर्यापूर उपविभागाअंतर्गत कलम 163 अंतर्गत 10 आणि कलम 56 अंतर्गत 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. दर्यापूर मधील 2 प्रकरणे खारिज करण्यात आली असून कलम १६३ अंतर्गत प्रलंबित 10 प्रकरणांवर आज, 16 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम आदेश होणार आहेत.

 

अचलपूर उपविभागात कलम 56 अंतर्गत 38 प्रकरणे प्राप्त झाली होती, यातील 36 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून २ प्रकरणे प्रलंबित आहेत. चांदुर रेल्वे उपविभागात कलम 56 अंतर्गत 5 पैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 1 प्रकरण प्रलंबित आहे. झाडा (ता. धामणगाव रेल्वे) येथील एक प्रकरण फेरचौकशी अहवालासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी चांदुर रेल्वे यांच्याकडे प्रलंबित आहे.

 

 मोर्शी येथे कलम 163 अंतर्गत 7 आणि कलम 56 अंतर्गत 8 प्रकरणे पूर्णपणे निकाली काढण्यात आली आहेत. धारणी उपविभागात कलम 56 अंतर्गत दाखल एक प्रकरण निकाली काढण्यात आले. तिवसा आणि भातकुली  येथे कलम 163 अंतर्गत सर्व 88 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर कलम 56 अंतर्गत प्राप्त 2 प्रकरणांपैकी 1 निकाली काढण्यात आले असून, प्रलंबित 1 प्रकरणावर आज, 16 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

 

०००००

टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार संवाद

 

 भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार.भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी संवाद साधणार.

#भरती #परीक्षा

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी अमरावतीत



भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आहे.या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.
 

Monday, September 14, 2026

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी #अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय पाठविण्याचे प्रशासनाकडून आवाहन

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सक्रिय सहभागी व्हावे .

#भरती 
#महाराष्ट्रशासन

DIO NEWS AMRAVATI 16.09.2026

                       भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : आज उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात   अमरावती  विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदवि...