Saturday, May 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026












 

 महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

* कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई करणार

अमरावती, दि. 16 (जिमाका) : रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ही मोहिम महात्मा जोतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात सुमारे एक हजार हेक्टर सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2026 ची नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, केवलराम काळे, प्रताप अडसड, प्रविण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते.

श्री. बावनकुळे यांनी, सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. देशस्तरावर सेंद्रिय शेतीबाबत जनमत तयार करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरवातीला उत्पादकता कमी होत असली तरी रासायनिक खतांचा खर्च कमी होत असल्याने आणि शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कृषि विभागाने कृषि सहायकापासून तालुका कृषि अधिकारी स्तरापर्यंत उद्दीष्ट देऊन जिल्ह्यात सेंद्रिय शेतीबाबत सकारात्मक वातावरण तयार करावे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांची रासायनिक खतांवरील अवलंबितता कमी होण्यास मदत मिळणार आहे.

खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून कृषि निविष्ठांमध्ये लिंकिंगच्या तक्रारी करण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी किवा स्थानिक विक्रेत्यांच्या स्तरावर लिंकिंग होणार नाही, यासाठी कृषि विभागाने भरारी पथकामार्फत कारवाई करावी. आवश्यकता भासल्यास विक्रेता आणि कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत लिंकिंगचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. येत्या काळात दुकानात लिंकिंगचे साहित्य ठेवता येणार नाही. त्यामुळे लिंकिंगवर अंकुश ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक खते उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासोबतच प्रतिबंधित बियाणे जिल्ह्यात विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांना ताकिद देण्यात यावी. खरीपासाठी 1650 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. प्रामुख्याने राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप करावे यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कृषि कर्जवाटप करण्यासाठी बँकांना कॅम्प लावण्यासाठी सूचना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अल निनीच्या प्रभावामुळे जलसाठे प्रभावित होणार असल्याने जिल्ह्यात प्रामुख्याने जलसंधारणाची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहे. प्रामुख्याने जलसंधारण आणि जलसंपदा विभागावर पाणी साठविण्याची जबाबदारी राहणार असल्याने याचे नियोजन करण्यात यावे. नाले आणि तलावातून गाळ काढण्यासाठी पुढाकार घेवून पाणी साठविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यासोबतच रिचार्ज शाफ्टची कामे हाती घेण्यात यावे. यासाठी सीएसआरचा निधी उपलब्ध करून कामे करण्यात यावी. जिल्ह्यात पांदण रस्त्यांबाबत चांगले काम करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन आणि मातोश्री योजना मिळून पांदण रस्यासाठी निधी मिळत आहे. यासर्व निधीचा चांगली उपयोग करण्यात यावा. या कामांना लोकप्रतिनिधींनी भेटी द्याव्यात. या रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची नोंदणी करावी. चारा उपलब्ध होण्यासाठी बचतगटांना महसूली जागा देऊन याठिकाणी चारा निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालिकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.


00000000





मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी

अमरावती, दि. 16 (जिमाका): वडाळी उद्यान परिसरात भव्य ‘वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक’ उभारण्याबाबत चर्चा

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व दिमाखदार असे स्मारक उभारण्यात यावे, तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरूनही सदर स्मारक स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश दिले. हे स्मारक अमरावती शहराची ओळख ठरणारे व नागरिकांसह पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच वडाळी तलाव परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यटन विकास, प्रकाश व्यवस्था, नागरिकांसाठी सुविधा व स्मारक उभारणी संदर्भातील सर्व बाबींवर शासन स्तरावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असून संपूर्ण प्रस्ताव अंतिम करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून विकास कामांना चालना देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी विविध मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. वडाळी तलाव परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत व स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्याबाबत उपस्थितांमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली.

0000000






15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा

घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून अमरावती जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी बॅटरी ऑपरेटेड ई-रिक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात आता बॅटरी संचालित घंटागाड्या धावणार आहेत.

             आज जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.

            घराघरातून कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला या वाहनांमुळे गती मिळणार असून ग्रामीण स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. पारंपरिक डिझेल वाहनांच्या तुलनेत ही ई-वाहने पर्यावरणपूरक असून इंधन खर्चातही बचत होणार आहे.

            घनकचरा संकलन व व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यासाठी पंचायत विभागाच्या प्रशासकीय मान्यतेने ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येकी ३ लाख रुपये किंमतीच्या या वाहनांसाठी एकूण 78 लाख रुपयांचा निधी 15 व्या वित्त आयोगातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

             ही वाहने लवकरच संबंधित ग्रामपंचायतींच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्याद्वारे स्वच्छ भारत मिशन अभियानाला नवी गती मिळणार आहे.

 

या गावांचा समावेश:

                अमरावती तालुक्यातील ब्राम्हणवाडा गोविंदपूर व लोणटेक, अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर व रासेगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील टाकरखेडा मोरे व खानमपूर पांढरी, भातकुली तालुक्यातील आसरा व टाकरखेडा शंभू, चांदूर बाजार तालुक्यातील कुर्हा, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला व कवठा कडू, दर्यापूर तालुक्यातील पिंपलोद व थिलोरी, मोर्शी तालुक्यातील शिरखेड व खानापूर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ व धानोरा गुरव, तिवसा तालुक्यातील शिरजगाव मो, वरुड तालुक्यातील हातुर्णा व शहापूर, धारणी तालुक्यातील हरिसाल व कुसुमकोट बु., धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी व वडगाव राजदी तसेच चिखलदरा तालुक्यातील टेंभूसोडा व काटकुंभ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

000000






















मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

-        पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक

*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी

*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली

 

अमरावती,दि.१६ : ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना असून याव्दारे शेतकऱ्यांना शेत मशागतीसाठी व शेत मालाची ने-आण करण्यासाठी बारामाही रस्ता उपलब्ध करुन दिला जातो. यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पाणंद रस्त्यांचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रभावी नियोजन करुन येत्या खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणंद रस्ते उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा ‍जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज दिले.

दर्यापूर उपविभागीय  कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील महसूल कामकाजांचा आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लवटे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  माजी आमदार श्री. बुंदीले यांच्यासह  शासकीय  विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी तहसील कार्यालय येथे आयोजित जनता दरबारात सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रश्न, तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांकडून प्राप्त 85 निवेदने स्विकारुन त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यामाध्यमातून सामान्य नागरिकांचे महसूल व अन्य महत्वाच्या विभागाशी निगडीत प्रश्न व तक्रारी एकाच जागेवरच सोडविण्यात येत आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, महसूल विभागाशी संबंधीत प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

                                                                                                                                                                                 पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा महसूल कामांचा सविस्तर आढावा संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच अन्य यंत्रणांचे प्रमुख यांच्याकडून घेतला. यानुषंगाने निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना, अकृषक परवानगी, सनद तसेच अकृषक आकारणी बदं करणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान टप्पा क्रमांक एक अंमलबजावणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसूली तंटामुक्त गाव अभियान, ई-पीक पाहणी, ई फेरफार, जिवंत 7/12 मोहिम आदी महत्वाच्या बाबीं संदर्भात पालकमंत्र्यांनी दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्याचा आढावा घेतला. उपरोक्त सर्व महत्वाच्या योजनांच्या संदर्भात नियोजित व प्रस्तावित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना यावेळी दिले.

3 नोव्हेंबर 2025 च्या शासन अधिसूचनेनुसार जनतेची मागणी लक्षात घेऊन अनाधिकृत तुकडा / गुठ्यांची मानीव नियमितीकरण करण्याची सुलभ कार्यपध्दती तयार केलेली आहे. तुकडे बंदी विषयक 7/12 अभिलेखात नोंदी घेणे आणि तुकडे बंदीमुळे नोंदणीकृत न झालेले व्यवहाराचे खरेदीदस्त नोंदविणे यानुषंगाने तरतूदी करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

तालुक्यातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पाणी टंचाई उपाययोजना, जलसंधारणाची कामे, जलसंचयन उपाययोजना, कृषी विभाग, महिला व बालविकास विभाग, वीज पुरवठा आदी शासकीय विभागांचा प्रलंबित व नियोजित कामे याबाबत सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.

खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी

दर्यापूर दौऱ्या दरम्यान पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजने अंतर्गत भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार राजेश वानखडे, गजानन लवटे यांच्यासह महसूल, कृषी, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000




Friday, May 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15-05-2026

 


जिल्हाधिकाऱ्यांकडून संत्रा बागेतील आधुनिक एआय तंत्रज्ञानाची पाहणी

अमरावती, दि. 15 (जिमाका): कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आधुनिक संत्रा बाग व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी तालुक्यातील एआय आधारित संत्रा प्रात्यक्षिक प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्यांनी सिट्रस इस्टेट उमरखेड अंतर्गत या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांनी जाणून घेतली.

मोर्शी येथील प्रगतशील शेतकरी नवीन पेठे यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खालील तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पात एआय आणि आयओटी सेन्सर्सच्या मदतीने पिकांची रिअल-टाइम माहिती मिळवणे, उपग्रहाद्वारे पिकाच्या वाढीवर आणि ताणावर लक्ष ठेवणे, मातीतील ओलावा, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि रोग-कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचा समावेश आहे.

सिट्रस इस्टेटचे अध्यक्ष तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते आणि 'मॅप माय क्रॉप' कंपनीच्या ऍग्रोनॉमिस्टनी सॅटेलाईट डेटाचा वापर दैनंदिन शेतीकामात कसा होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक दिले. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

बदलत्या हवामानात तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले. आयओटी सेन्सर्समुळे खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल आणि संत्र्याचा दर्जा सुधारेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय तळेगावकर, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदिप पवार, तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषि अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

00000

रस्ते अपघातग्रस्तांसाठी 'पीएम राहत' योजना

*दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार

अमरावती, दि. 15 (जिमाका) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने 'पीएम राहत' ही योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, अपघातग्रस्तांना आता दीड लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

योजनेतून तात्काळ कॅशलेस उपचार केले जातील. यात अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पैशांअभावी उपचार थांबू नये, यासाठी ही योजना राबविण्यात आहे. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. यातील उपचारासाठी होणारा खर्च 'मोटार वाहन अपघात निधी' मधून केला जाणार आहे.

जिल्ह्यातील 40 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी रुग्णालय, पोलीस विभाग, राज्य आरोग्य संस्था आणि आपत्कालीन सेवा यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

0000000


अमरावती जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर;

25.81 लक्ष मतदारांच्या नोंदींची होणार घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी

अमरावती, दि.15 (जिमाका) :भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून, यामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या व्यापक मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सुमारे 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाशी सांगड घालून क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होणार आहे.

या मोहिमेची अंमलबजावणी अत्यंत व्यापक स्वरूपात केली जाणार असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपशिलाची खातरजमा केली जाईल. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या मतदार मॅपिंगच्या सद्यस्थितीचा विचार करता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 3 लक्ष 13 हजार 425 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 91 हजार 784 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 21 हजार 641 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची टक्केवारी 93.1 इतकी आहे. 37-बडनेरा मतदारसंघात 3 लक्ष 78 हजार 292 एकूण मतदारांपैकी 3 लक्ष 1 हजार 517 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 76 हजार 775 अपूर्ण असून टक्केवारी 79.7 आहे. 38-अमरावती मतदारसंघात 3 लक्ष 83 हजार 471 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 82 हजार 437 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 1 लक्ष 1 हजार 34 अपूर्ण असून टक्केवारी 73.65 आहे. 39-तिवसा मतदारसंघात 2 लक्ष 99 हजार 14 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 62 हजार 29 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 985 अपूर्ण असून टक्केवारी 87.63 आहे. 40-दर्यापूर मतदारसंघात 3 लक्ष 7 हजार 851 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 90 हजार 372 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 17 हजार 479 अपूर्ण असून टक्केवारी 94.32 आहे. 41-मेळघाट मतदारसंघात 3 लक्ष 11 हजार 478 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 74 हजार 581 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 36 हजार 897 अपूर्ण असून टक्केवारी 88.15 आहे. 42-अचलपूर मतदारसंघात 2 लक्ष 95 हजार 836 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 48 हजार 218 मतदारांचे मॅपिंग पूर्ण व 47 हजार 618 अपूर्ण असून टक्केवारी 83.9 आहे. तर 43-मोर्शी मतदारसंघात 2 लक्ष 92 हजार 355 एकूण मतदारांपैकी 2 लक्ष 60 हजार 375 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 31 हजार 980 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे आणि येथील टक्केवारी 89.06 आहे. अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यात एकूण 25 लक्ष 81 हजार 722 मतदारांपैकी 22 लक्ष 11 हजार 313 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून 3 लक्ष 70 हजार 409 मतदारांचे मॅपिंग अपूर्ण आहे, ज्याची एकूण सरासरी टक्केवारी 85.65 इतकी आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निवडणूक यंत्रणा व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय आढावा घेतला असता, 36-धामणगाव रेल्वे मतदारसंघात 378 एकूण मतदान केंद्रे, 38 पर्यवेक्षक आणि 378 बीएलओ कार्यरत आहेत. 37-बडनेरा मतदारसंघात 345 मतदान केंद्रे, 29 पर्यवेक्षक आणि 345 बीएलओ आहेत. 38-अमरावती मतदारसंघात 322 मतदान केंद्रे, 31 पर्यवेक्षक आणि 322 बीएलओ आहेत. 39-तिवसा मतदारसंघात 319 मतदान केंद्रे, 33 पर्यवेक्षक आणि 319 बीएलओ आहेत. 40-दर्यापूर मतदारसंघात 342 मतदान केंद्रे, 20 पर्यवेक्षक आणि 342 बीएलओ आहेत. 41-मेळघाट मतदारसंघात 356 मतदान केंद्रे, 23 पर्यवेक्षक आणि 356 बीएलओ आहेत. 42-अचलपूर मतदारसंघात 309 मतदान केंद्रे, 25 पर्यवेक्षक आणि 309 बीएलओ आहेत. तर 43-मोर्शी मतदारसंघात 311 मतदान केंद्रे, 26 पर्यवेक्षक आणि 311 बीएलओ कार्यरत आहेत. संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा विचार करता एकूण 2 हजार 682 मतदान केंद्रे, 225 पर्यवेक्षकांची पदे आणि 2 हजार 682 बीएलओ या प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने या मोहिमेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यानुसार दिनांक 20 ते 29 जून 2026 या कालावधीत सर्व बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करून दिली जाईल. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत निवडणूक यंत्रणा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेईल. या पडताळणीनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत आपल्या दावे व हरकती नोंदवता येतील. सर्व दावे व हरकतींचा निपटारा केल्यानंतर शेवटी 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

माहितीची अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले अधिकृत एजंट (BLA) नियुक्त करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कळविले आहे.

000000

स्वाधार योजनेतील त्रुटी पूर्ततेसाठी ३० मेपर्यंत संधी

अमरावती, दि. 15 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत (सन 2025-26) मधील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीअभावी परत करण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दि. 15 मे ते 30 मे 2026 या कालावधीत आपल्या अर्जातील त्रुटी दूर करणे अनिवार्य आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यास इयत्ता अकरावी, बारावी आणि पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी स्वाधार योजनेंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा हार्डकॉपी सादर केलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना पोर्टलवर संदेश, मोबाईल आणि ई-मेलद्वारे त्रुटींबाबत कळवण्यात आले आहे.

अर्जातील त्रृटी दूर करण्यासाठी दि. 15 ते 30 मे दरम्यान दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, अमरावती येथे उपस्थित राहावे लागणार आहे. विहित मुदतीत त्रुटींची पूर्तता केलेली नसल्यास विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या (2025-26) लाभापासून कायमचा वंचित राहील. अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षातही या योजनेसाठी नवीन अर्ज करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित hmas.mahait.org संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करावीत, अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000

--

Thursday, May 14, 2026

DIO NEWS AMRAVATI 14-05-2026

 जिल्ह्यात लोकसहभागातून शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरणाची कामे; अशासकीय संस्थांकडून अर्ज आमंत्रित

अमरावती, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन  आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समिती निधी यांच्या अभिसरणातून ही कामे केली जाणार आहेत. ही योजना कोणत्याही एजन्सीच्या नफ्यासाठी  नसून, ती पूर्णपणे लोकसहभाग आणि सेवाभावावर आधारित आहे, जेणेकरून कमी खर्चात शेतकरी हिताचे रस्ते निर्माण होतील.

 

जिल्हास्तरावरून या योजनेसाठी प्रति 1 किलोमीटर पांदण रस्त्यासाठी कमाल 9 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये लोकसहभागाची किमान मर्यादा 1.5 लाख रुपये असून, उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिली जाईल. या निधीवर सर्व शासकीय कपाती लागू राहतील. तसेच, पांदण रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर (लोकसहभागातून होणारे मातीकाम वगळून) मोजमापानुसार जिल्हा नियोजन समितीचा निधी वितरित केला जाईल. जे अर्जदार जास्तीत जास्त लोकसहभाग आणि कमीत कमी शासकीय निधीमध्ये काम करण्यास तयार असतील, अशा संस्थांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, यापूर्वी ‘जलयुक्त शिवार’ किंवा तलावातील गाळ काढण्याच्या योजनांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या संस्थांना विशेष प्राधान्य मिळेल.

इच्छुक अशासकीय संस्थांनी आपल्या अर्जासोबत संस्थेचे मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र, अध्यक्ष व सदस्यांची नावे, अनुभव प्रमाणपत्र आणि यापूर्वी केलेल्या कामांची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, अमरावती येथे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी शुक्रवार, दि. 15 मे  ते 22 मे 2026 पर्यंत (सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीमार्फत 25 मे 2026 रोजी केली जाईल. त्यानंतर छाननीमध्ये पात्र ठरलेल्या संस्थांची बैठक व चर्चासत्र 26 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या योजनेबाबत काही अडचणी किंवा अधिक माहिती हवी असल्यास उपजिल्हाधिकारी (रोहयो)  ज्ञानेश्वर घ्यार (9527966064), कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर परळकर (9890144170) यांच्याशी संपर्क साधावा. 

 ******

 




छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 14 (जिमाका) : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, नाझर विजय सांगळे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000

 

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन 

 

अमरावती, दि. 14 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 18 मे, 2026 रोजी सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

औषध विक्रेत्यांचा २० मे रोजी देशव्यापी बंद; जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, नियंत्रण कक्ष स्थापन

 

अमरावती, दि.14 (जिमाका) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमध्ये देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्यांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नागरिकांना आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत आणि अखंडपणे उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असल्याची माहिती अमरावतीचे सहाय्यक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिली आहे.

 मुंबई येथील सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी प्रशासनाने तातडीने समन्वय साधला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित दुकानांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर देखील आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील, यादृष्टीने प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे.

 या आणीबाणीच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांच्या प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

 नागरिकांनी या बंदच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध पुरवठ्याबाबत नागरिकांना कोणतीही अडचण किंवा तातडीची गरज भासल्यास, अमरावती कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक ०७२१-२६६५८९२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jcamrawati2022@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यास प्रशासन पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही डॉ. माणिकराव यांनी दिली आहे.

 00000

अमरावतीत 19 मे रोजी रोजगार मेळावा;

महिंद्र ॲन्ड महिंद्र’ कंपनीत हजार जागांवर प्रधानमंत्री इंटर्नशिपची संधी

 

अमरावती, दि.14 (जिमाका) : : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करियर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19मे 2026 रोजी 'पं. दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिंद्र ॲन्ड महिंद्र, पुणे कंपनीमध्ये शासन मान्यताप्राप्त 'प्रधानमंत्री इंटर्नशिप' करण्याची संधी जिल्ह्यातील उमेदवारांना मिळणार आहे.

 

या मेळाव्याच्या माध्यमातून कंपनीतील हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी 10 वी, 12वी आणि आय.टी.आय. उत्तीर्ण असलेले तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना एकूण 18 हजार 55 रुपये विद्यावेतन दिले जाईल. यामध्ये 9 हजार 55 रुपयांसह प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या भत्त्याचा समावेश आहे. याशिवाय उमेदवारांना कंपनीकडून जेवण आणि बस सुविधा पूर्णपणे मोफत पुरवली जाणार आहे.

 

इच्छुक व गरजू उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दिलेल्या अधिकृत लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 मे रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथील कार्यालयात स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा व पत्त्याचा पुरावा घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 0721-2566066 किंवा 8983419799या क्रमांकावर संपर्क साधावा.

******

 

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026

    महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे * कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई कर...