शासकीय बालगृहातील बालक 'सारंग सलीम'च्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 3 (जिमाका) : येथील रुक्मिणीनगरात स्थित शासकीय वरिष्ठ मुलांच्या बालगृहात प्रवेशित असलेल्या सारंग सलीम या बालकाच्या घरचा पत्ता व कुटुंबीयांची ओळख पटविण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन अमरावतीमार्फत शोधमोहीम सुरू आहे. या बालकास किंवा त्याच्या आई-वडील, भाऊ-बहिणी व कुटुंबीयांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती (संपर्क क्रमांक 9021358816) तसेच चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक (संपर्क क्रमांक 9922604308) या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. बालकाच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास त्याची ओळख पटवून पुढील कायदेशीर व पुनर्वसनात्मक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.
बालकाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईचे नाव नीतू, भाऊ निलेश व नीलू आणि बहिणी शितल व खुशी अशी नावे आहेत. बालकाने पूर्वीचा पत्ता मनपा शाळा क्रमांक 2, मसानगंज, अमरावती असा सांगितला आहे. त्याची आई अमरावती येथे 'संगीता' नावाच्या महिलेच्या भाजीच्या दुकानातून भाजी घेत असल्याचेही बालकाने सांगितले आहे.
बालकाचा शोध यापूर्वीही संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आला होता. तसेच जुलै 2026 मध्ये बालकास अमरावती येथे आणून त्याने सांगितलेल्या परिसरात प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली मात्र कुटुंबीयांचा ठोस पत्ता मिळू शकला नाही.
०००००००
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा रविवार पासून तीन दिवसांचा अमरावती जिल्हा दौरा
अमरावती, दि.(जिमाका): बालगृहांची पाहणी व तपासणी, बालकांच्या हक्कांच्या अनुषंगाने विविध बाबींचा आढावा, तसेच संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोगाचा अमरावती जिल्हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी कळविले आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार ६ सप्टेंबर रोजी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य अमरावती जिल्ह्यातील बालगृहांना भेटी देणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० वा. दरम्यान विविध प्रकरणांची सुनावणी घेण्यात येणार आहे. तर दुपारी १२.३० ते २ वा. पर्यंत आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ ते सायं ६ वा. दरम्यान जिल्ह्यातील बालगृहास भेटी देणार आहे. ८ सप्टेंबर रोजी मेळघाट क्षेत्रास आयोग भेट देणार असून प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अमरावती व मेळघाट तसेच इतर बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहे.
आयोगाच्या दौऱ्यात बालगृहांमध्ये बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, निवास व भोजन व्यवस्था, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, समुपदेशन व पुनर्वसनाची कार्यवाही तसेच बालकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी याबाबत पाहणी करण्यात येणार आहे. तसेच, बाल हक्क संरक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात येणार असून, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून विविध विषयांचा आढावा घेण्यात येणार आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आयोगाकडून मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत.
०००००
जुना बायपास मार्गावर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी: पोलीस प्रशासनाची अंतिम अधिसूचना जारी
अमरावती, दि. ३ (जिमाका ): शहरात वाढती लोकसंख्या, वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील बाजारपेठ असलेले महत्वाचे मार्ग तसेच वेलकम पाँईट ते अलमास गेट बडनेरापर्यंत असलेला जुना बायपास आदी प्रमुख मार्गांवर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्याबाबतची अंतिम अधिसूचना पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांनी बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केली आहे.
हलके व जड वहानांना प्रवेशबंदी संदर्भात १७ नोव्हेंबर २०२० च्या अंतिम आदेशात अंशत: बदल करणे आवश्यक असल्याने शहरात प्रवेशबंदी संबंधाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम अधिसुचना जारी करण्यात आली होती.त्यावर आक्षेप प्राप्त झाले. आक्षेप तसेच सामान्य नागरिकांच्या संरक्षणाचा सर्वांगीण विचार करून जडवाहन प्रवेशबंदी संबंधाने २ सप्टेंबर रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
वाहनांमध्ये मालविरहित (खाली गाडी) वजन २,००० किग्रॅ (२ टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलकी व जड व्यावसायिक वाहने सुपर एक्सप्रेस हायवेचा वापर न करता जुना बायपास मार्गाचा तसेच शहरातील गर्दी असलेल्या मार्गाचा अवलंब करीत असल्याने या मार्गांवर वाहनांची वर्दळ अधिक होऊन किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरात सन २०२४ ते जुलै २०२६ या काळात एकूण १,१०८ अपघात झाले आहेत. यातील २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २४६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून ९१३ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रात सांगण्यात आले आहे.
दररोज सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत वाहनांना शहरात प्रतिबंध असणार असून या वाहनांमध्ये मालविरहित (खाली गाडी) वजन २,००० किग्रॅ (२ टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलकी व जड व्यावसायिक वाहने. ज्या वाहनांची भारसहित वहन क्षमता २ टनांपेक्षा जास्त आहे अशी सर्व वाहने. सर्व प्रकारच्या अति अवजड (मल्टी-ॲक्सल) वाहनांचा समावेश आहे.
यावेळेत शहरातील जे मार्ग बंद राहतील यामध्ये मुख्य चौक व बायपास मार्ग : गौरी इन वा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गद्रे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अलमास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाय पॉइंट यांचा समावेश असेल. तसेच नाका व अंतर्गत मार्गांमध्ये राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इर्विन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या मार्गांमध्ये आर.टी.ओ. कार्यालय, शेगाव नाका, कठोरा नाका, पोते पाटील चौक, रहाटगाव बस स्टॉप, विभागीय आयुक्त कार्यालय मार्ग तसेच एम.आय.डी.सी. परिसराचा समावेश आहे. कायमस्वरूपी बंद राहणाऱ्या मार्गांमध्ये गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग. तसेच बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज. गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक. शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा समावेश आहे.
प्रवेशबंदीतून सूट आणि वेळ (अपवाद)अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात पेट्रोल, डिझेल, गॅस, शासकीय धान्य वितरण वाहने, महापालिका कचरा संकलन, अतिक्रमण विभाग, पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेशबंदीतून पूर्ण सूट असेल. तसेच या वाहनांना ताशी २० किमीची वेग मर्यादा पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्नधान्य व कृषी माल वाहतूकीला सूट देण्यात आली असून याअंतर्गत दररोज दुपारी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गांवरून जसे की रेल्वे मालधक्का बडनेरा, एमआयडीसी, कृषी उत्पन्न बाजार समिती या भागात वाहतुकीस परवानगी राहील.
गौण खनिज वाहतूकीसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या असून यानुसार दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तसेच सर्व रविवारी सकाळी ६.०० ते ११.०० आणि दुपारी २.०० ते४.०० या कालावधित विशिष्ट निर्धारित मार्गांवरून वाहतुकीस सूट देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.
००००००
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल काढणी युनीट करिता अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 3 (जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा घटकांतर्गत तेल काढणी युनीट करिता शेतकरी, शासकीय किंवा खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ),सहकारी संस्था, तेलावर प्रक्रिया करणाऱ्या नोंदणीकृत नवीन कंपनी तसेच या योजनेंतर्गत निवडलेले मुल्यसाखळी भागीदार यांना येत्या ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
या राष्ट्रीय अभियानांतर्गत बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १० टन क्षमतेचे तेल काढणी युनीट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री व उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया युनीट करिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल किंवा ९ लाख ९० हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.
काढणी युनीट करिता खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी तसेच याकरिता इच्छूक भागदाराने बँकेकडे कर्ज मंजुरी करिता प्रकल्प सादर करावा लागणार आहे.बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार या योजनेच्या लाभास पात्र राहणार असून ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांना संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
अमरावती, दि. 3 (जिमाका) : कडधान्य आत्मनिर्भर अभियानांतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीनंतरची पायभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनीट उभारण्याकरिता २५ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) ,क्लस्टर स्तर महासंघ (सीएलएफ), प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) तसेच इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रक्रिया युनीट उभारण्यासाठी अनुदान लाभ घेण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. या लाभासाठी अनुसूचित जाती व जमाती,महिला,डोंगराळ क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या योजनेच्या लाभासाठी एफपीओ , सीएलएफ, पीएसीएस हे किमान मागील दोन वर्षांपासून नोंदणीकृत व कार्यरत असणे गरजेचे आहे.तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची क्षमता असावी. वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक असून एका कुटुंबातील एका व्यक्तीलाचा हा लाभ अनुज्ञेय असणार आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची त्या व्यक्तीची क्षमता असावी.
प्रक्रिया युनीट उभारणीकरिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा कमाल २५ लाख प्रति युनीट अनुदान हे केवळ यंत्रसामग्री खरेदी तसेच इमारत,गोदाम,साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाच्या जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या ३० टक्के पर्यंत राहणार आहे. अनुज्ञेय राहणार आहे.
नवीन प्रक्रिया युनीटची किमान क्षमता ३०० कि.ग्रॅ.असावी. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी. लाभार्थीने युनीट उभारणीच्या दिनांकापासून किमान ३ वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकाराक राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधता येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र
कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार
अमरावती,दि. 3 (जिमाका) :आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया गुरुवार ३ सप्टेंबर पासून सुरू झाली असून शनिवार ५ सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून राज्यातील १६०० पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून यात अमरावती विभागातील २९२ उमेदवारांचा समावेश आहे.
शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या २४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक- ९२७, माध्यमिक शिक्षक-४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक- २५२ अशा एकूण १६०० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील ११४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबधित उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पात्र ५८८ उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६उमेदवार तर अमरावती विभागात २९२ उमेदवार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले.
संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.
पेसा क्षेत्रातील १९६ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक , १६ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ९४ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक आणि १५१ उच्च माध्यमिक शिक्षक भरती करण्यात येणार आहे. तर नॉनपेसा क्षेत्रातील ५९३ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, १२२ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ३०२ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २३ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक आणि १०१ उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.
००००००


.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)