Thursday, July 30, 2026

DIO NEWS AMRAVATI 30.07.2026

 जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

अमरावती, दि. 30 (जिमाका) :ऑगस्ट महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार,दि.3ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000000

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर

*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन*

अमरावती, दि. 30 (जिमाका ): कृषी विभागाने खरीप हंगाम 2026 साठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन केले आहे. यात मूग आणि उडीदसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून, इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

पिक स्पर्धेच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्याच्या कृषी उत्पादकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 प्रमुख पिकांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटाला प्रति पीक 300 रुपये तर आदिवासी गटाला 150 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे आणि इतर पिकांसाठी 40 गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.

ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली जाईल आणि विजेत्यांना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर पहिले, दुसरे आणि तिसरे रोख बक्षिसे दिली जातील. तालुका पातळीवर 5 हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार रुपये, तर राज्य पातळीवर 50 हजार रुपयांचे पहिले बक्षीस मिळेल.

इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, सातबारा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, पिकाच्या क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत या कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पीक स्पर्धा नोंदणी येथे अर्ज करावा किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे.
◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा.
◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा.
◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

आपले सरकार वर ई-केवायसी करा...जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांच्या प्रशासनाला सूचना कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिध्द करा...


 आपले सरकार वर ई-केवायसी करा...जिल्हाधिकारी #आशिष_येरेकर यांच्या प्रशासनाला सूचना

कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिध्द करा...

Wednesday, July 29, 2026

DIO NEWS AMRAVATI 29.07.2026

 




शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी

-         जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 29 : राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंद घालण्यात यावीत, तसेच शहरात जड वाहतूक प्रवेशाच्या ठिकाणी चेकपोस्ट उभाराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील अपघाताबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघातानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदने प्राप्त झाली आहे. त्यानुसार शहरातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरात जड वाहने प्रवेश करीत असलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. ही कार्यवाही आजपासूनच सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले. शहरात सकाळी सहा ते रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहतुकीस बंदी आहे. याबाबत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या वेळेत शहरात येणाऱ्या जड वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करावी.

 

शहरातील उड्डाणपूलावर पूल संपताच काही वाहने उजवीकडे वळण्यासाठी जागा आहे. मात्र यामुळे अपघाताचा धोका असल्यामुळे याठिकाणी दुभाजक निर्माण करण्यात यावे. तसेच पुलावर तातडीने दुभाजकाची व्यवस्था करण्यात यावी. रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी रस्ता सुरक्षेचा निधी उपयोगात आणावा किंवा आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजनमधून निधीची मागणी करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

00000






शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहिर
पात्र शेतकऱ्यांची यादी गावात प्रसिद्ध करावी
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

     अमरावती, दि. 29 : राज्‍य शासनाने शेतकऱ्यांची दोन लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी जाहिर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 142 शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहे. यातील 76 हजार 976 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहिर करण्यात आली आहे. ही यादी गावपातळीवर प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, राज्य शासनाने शेतकऱ्यांची दोन लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन लाख रूपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे, तर राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदारांना बँकेतर्फे कर्ज राईटऑफची सवलत मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदारांना दोन लाख रूपयांहून अधिक कर्जमाफीची सुविधा मिळणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद बँकांनी केली आहे. 

     कर्जमाफीची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जदार असलेल्यांना ई-केवायसी करीत असताना राईट ऑफची रक्कम वजा जाता शासनाकडून दिली जाणारी रक्कम दिसत असल्याने शेतकरी सहमती दर्शवित नसल्याचे दिसून येत आहे. ही एक प्रकारची व्यवस्था असली तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दोन लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळणार असल्याने त्यांना संपूर्ण दोन लाख रूपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. 

    कर्जमाफीची गती वाढविण्यासाठी आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करावी लागणार असल्याने ही केंद्रे सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच कर्जमाफीच्या ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शुल्क आकारल्यास आपले सरकार केंद्राची मान्यता रद्द करण्यात योणार आहे. त्यासोबतच कर्जमाफीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, याठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँक, तलाठी कार्यालयात लावण्यात याव्यात. तसेच यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम नमूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
000000





मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर


अमरावती, २९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे अमरावती मध्यवर्ती कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी कारागृहातील बंद्यांना प्ली बार्गेनिंग म्हजेच शिक्षा किंवा आरोप कमी करून घेण्यासाठी आरोपीने न्यायालयात अथवा फिर्यादीसोबत केलेला गुन्हा कबूल करण्याचा करार, वाटाघाटी करण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. न्यायरक्षक कार्यालयाचे मुख्य अधिवक्ता ॲड. जितेंद्र देशमुख यांनी उपस्थितांना कायदेविषयक विविध हक्क आणि स्पृहा योजनेबद्दल मार्गदर्शन केले.

 

कारागृह उपअधिक्षक प्रदिप इंगळे यांनी प्रास्ताविक केले. न्यायरक्षक कार्यालयातील सहायक अधिवक्ता ॲड. प्राजक्ता वरुडकर यांनी सूत्रसंचालन केले. सहायक अधिवक्ता ॲड. सृष्टी शिरभाते यांनी आभार मानले.

00000


राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली.


राज्याचे सहकार आयुक्त आणि निबंधक (सहकारी संस्था) दीपक तावरे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ संदर्भातील सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून दिली. #शेतकरीकर्जमुक्ती #महाकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR

 

Tuesday, July 28, 2026

DIO NEWS AMRAVATI 28.07.2026




 विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

 

 

अमरावती, दि. 28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मंगळवार, दि. 28 जुलै रोजी 'विधी जनजागृती आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर' उत्साहात पार पडले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. नंदकिशोर के. रामटेके उपस्थित होते.

 

न्यायरक्षक कार्यालयाचे सहायक अधिवक्ता अॅड. श्री अंकुश इंगळे यांनी नाल्सा योजनेंतर्गत जागरूकता, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपायांवर मार्गदर्शन केले. श्री. सहारे यांनी पर्यायी वाद निवारण पद्धती, त्याचे फायदे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल अधिवक्ता अॅड. सपना काळे-विधळे यांनी सूत्रसंचालन केले. विधी स्वयंसेवक अमोल पोकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्री. मालवीय, प्रा. लोखंडे आदी उपस्थित होते.

 

00000

 


29 आणि 30 जुलै रोजी कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा

* उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन

 

अमरावती, दि. 28 : कामगार विभागाअंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठीची सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ दि. 29 आणि 30 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षेच्या निमित्ताने उमेदवारांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या 8 जिल्ह्यांमधील 22 केंद्रांवर घेतली जाणार आहे. सुरळीत आणि पारदर्शक परीक्षेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही ऑनलाइन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमीटेडमार्फत पारदर्शकपणे पार पडणार आहे.

 

परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळल्यास किंवा कोणीही व्यक्ती, संस्था गैरमार्ग, अमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्यास, अशा कोणत्याही गैरप्रकाराला उमेदवारांनी बळी पडू नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.

 

000000

--

शनिवारी माजी सैनिक संपर्क कार्यक्रम

 

अमरावती, दि. 28 : उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब-एरिया मुख्यालय यांच्या माजी सैनिक शाखेतर्फे माजी सैनिक संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सीएसडी कॅन्टीनजवळील एनसीसी ग्रुप मुख्यालयात पार पडणार आहे.

 

कार्यक्रमात सर्व माजी सैनिक व त्यांच्या आश्रितांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी, प्रश्न व अडचणींचे जागेवरच निवारण करण्यात येणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या समस्यांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यात डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, पीपीओ आणि इतर संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.

 

सर्व आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

00000

शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.



 शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
📲आजच नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा.

#AgriStack
#FarmerRegistration
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
#शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#कर्जमुक्ती
#MahaDGIPR
#FarmerWelfare
#DBT

DIO NEWS AMRAVATI 30.07.2026

  जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 30 (जिमाका) :ऑगस्ट महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन सोमवार,दि.3ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा...