Tuesday, August 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.8.2026

                        मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या लाभासाठी सोमठाना खुर्दच्या

लाभार्थ्यांना मोबदल्यासाठी आवाहन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सोमठाना खुर्द येथील 42 शेतमुल्यांकनधारक, 21 वनहक्कधारक आणि 112 घरमुल्यांकनधारकांकरिता निधी उपलब्ध झाला असून काही लाभार्थ्यांना मोबदला रक्कम वितरीत करण्यात आली आहे. आवश्यक दस्तऐवजा अभावी उर्वरित लाभार्थ्यांना मुल्यांकन रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे, अशा लाभार्थ्यांना अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे तातडीने दस्तऐवज सादर करण्याचे आवाहन, अकोट वन्यजीव विभागाचे  उपवनसंरक्षक आर.एस.टोलिया यांनी केले आहे.

 

            वर्ष 2012 च्या शासन निर्णयानुसार सोमठाना खुर्द या गावाचे वर्ष 2013-14 मध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावातील  शेतमुल्यांकनधारक आणि वनहक्कधारकांना मुल्यांकनाची 4 पट रक्कम देय असून यातील 1 पट मुल्यांकन रक्कम व त्यावरील 30 टक्के दिलासा रक्कम वजा करून उर्वरीत मोबदला रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु काही शेतमुल्यांकनधारक, वनहक्कधारक आणि  घरमुल्यांकनधारकांनी आवश्यक दस्तऐवज सादर नकेल्याने त्यांना मोबदला अदा करण्यात अडचण येत आहे. या सर्व शेतमुल्यांकनधारक आणि वनमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,शेतीचा 7/12 आणि शेतमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तसेच घरमुल्यांकनधारकांनी 100 रुपयांच्या स्टँपपेपर वर अर्ज, बँक खात्याची छायाप्रत,नमुना 8, घरमुल्यांकनधारक मयत असल्यास त्यांचे वारसप्रमाणपत्र व वारसाच्या खात्याची छायाप्रत तातडीने अकोट वन्यजीव विभाग अकोट येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमठाना खुर्द येथील लाभार्थ्यांची नाव निहाय यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

सण-उत्सव काळात ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य गाणे

वाजविण्यासंदर्भात मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): ईद-ए-मिलाद, कावड यात्रा, श्रीकृष्ण जन्माष्टमी,दहिहांडी,पोळा,गणपती उत्सव कालावधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चिन्हीत व आक्षेपार्ह गाणे व भडकाऊ भाषणांच्या क्लिप्स वाजविण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0000000

 

ग्रामीण भागासाठी सोशल मिडीयावर आक्षेपाहार्य पोस्ट

प्रसारीत करण्यास प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  सण-उत्सवादरम्यान विविध सोशल मिडीयावरून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आक्षेपाहार्य पोस्ट प्रसारीत करण्यास अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.  24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.         

                                                                   000000


ग्रामीण भागासाठी सण-उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): येत्या काळात विविध धर्मीय सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक  शांतता, पर्यावरण व  सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होऊ नये याकरिता जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित धार्मिक कार्यक्रमांदरम्यान डॉल्बी सिस्टीम लावून मिरवणुका काढण्यास डॉल्बी सिस्टीम मालक व चालकांसाठी अपर पोलीस अधिक्षक दत्ता तोटेवाड यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2026 पर्यंत हा आदेश लागू राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

000000

कृषी पर्यटन केंद्र संचालकांची "मामाचं वावर" येथे

एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

अमरावती, दि. 25 (जिमाका): पर्यटन संचालनालय प्रादेशिक, अमरावती अंतर्गत अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी "मामाचं वावर" कृषी पर्यटन केंद्र, मौजे वळती, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेले कृषी पर्यटन केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, शाश्वत विकास केंद्र (अमरावती) चे गणेश चौधरी, कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष लहू अवताडे आणि कॅनव्हास फाउंडेशन, द चॅरिटेबल ट्रस्ट (अमरावती) चे आशिष शेरेकर उपस्थित होते.

 

या कार्यशाळेत उपसंचालक विजय जाधव यांनी महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024 अंतर्गत कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, प्रोत्साहन, होमस्टे, पर्यटन व्हिला, व्हॅकेशन होम अशा अधिकृत नोंदणी प्रक्रिया आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात ए.आय चा वापर कसा करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला. गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकासाची कास कशी धरावी आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबद्दल तांत्रिक व व्यावहारिक माहिती दिली.

 

अध्यक्ष लहू अवताडे यांनी राज्यातील कृषी पर्यटनासमोरील आव्हाने, संचालकांचे संघटन आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, यावर आपले अनुभव अभ्यासपूर्ण रितीने मांडले. तसेच शाळेच्या सहली व शासनाच्या विविध विभागांशी कसा समन्वय साधता येईल यावर मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी अमरावती विभागातील विजय श्रीराव (महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरुड), सुनील वारे (वनश्री कृषी पर्यटन केंद्र, उदखेड) तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील मातोश्री कृषी पर्यटन केंद्र (अंबड) आणि श्री गोकुळ कृषी पर्यटन केंद्र (जालना) येथील संचालकांनी आपले अनुभव सांगितले.

 

या एक दिवसीय कार्यशाळेमुळे अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांना केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन नियमावली समजून घेण्यास व नवनवीन संकल्पना राबवण्यास मोठी दिशा मिळाली आहे. "मामाचं वावर" चे संचालक मोहन तेजराव जगताप यांच्या सहकार्याने सर्व संचालकांनी निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'पर्यटन मित्र' शिवाजी गायकवाड यांनी केले, तर प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे उपलेखापाल राजेश मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0000000

गुणनियंत्रण विश्लेषणात जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांचे 189 नमुने अप्रमाणित

बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीविरोध जिल्ह्यातून 2 हजारांवर तक्रारी;

 

कंपनी विरोधात एफआयआर दाखल

 

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : सोयाबीन बियाण्यांच्या विश्लेषणासाठी जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून 17 ऑगस्ट पर्यंत यातील 189 नमुने अप्रमाणित आढले आहेत. यासंदर्भात बियाणे उत्पादक कंपनीवर कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांची दखल घेण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांच्या एकूण 3 हजार 157 प्राप्त तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

            विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच कंपन्यांवर कार्यवाही करण्याविषयी वृत्तपत्रांमध्ये विविध वृत्त प्रसारित झाले होते. याची कृषी विभागाने गंभीर दखल घेत जिल्ह्यात पुरवठा झालेल्या सोयाबीन बियाण्यांचे वितरकनिहाय,वाणनिहाय,लॉट निहाय माहिती आदी सादर करण्याचे आदेश बियाणे उत्पादक कंपन्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची पाहणी विहित वेळेत होण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आल्या. या समित्यांमार्फत प्रातिनिधिक स्वरुपात कंपनीनिहाय आणि लॉटनिहाय तक्रारींची पाहणी सुरु असून उर्वरीत तक्रारींची पाहणी उपसमित्यांद्वारे करण्यात येत आहे. 17 ऑगस्ट पर्यंत  घेतलेल्या जिल्ह्यातील 464 नमुन्यांपैकी 385 नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाले असून यातील 196 नमुने प्रमाणित तर 189 नमुने अप्रमाणि आढले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्यांवर बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

            एकूण प्राप्त झालेल्या 3 हजार 157 तक्रारींपैकी 2 हजार 326 तक्रारी छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या असून अमरावतीच्या  गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये 11 ऑॅगस्ट 2026 रोजी कंपनी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये येथील बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी व इतर कंपनींविरुद्ध एकूण 41 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनी विरुद्ध 10 गुन्हे तर ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीवर 5, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीवर ५, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 2, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक 1, रवि सिड्स ७, एस. के. बी सिड्स 2, ग्रिन ॲग्री रिव्होल्युशन 2, व्हिगर बायोटेक 2, अंकुर सिंड्स 2, ईगल सिड्स 1, श्री. ओसवाल सिड्स 1 आणि उत्तम सिड्सवर 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागाकडून तपास सुरु आहे.

 

             सोयाबीन बियाण्यांच्या तालुका स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने 17 ऑगस्‍ट 2026 पर्यंत ईनोव्हेज ॲग्रो,इंदोर कंपनीच्या 273, पार्श्व जेनेटीक्स, इंदोर कंपनीच्या 119, श्री. सिड्स, खंडवा कंपनी 103, ग्रिन गोल्ड ॲग्रीटेक कंपनीच्या 671, रवि सिड्स कंपनीच्या 182, एस. के. बी सिड्सच्या 45 तक्रारी प्राप्त झाल्या असून या कंपन्यांचे बियाणे विक्री  परवान्यांवर  बियाणे कंपनी कायदा 1966 आणि बियाणे अधिनियम 1968 अंतर्गत कायदेशिर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव निविष्ठा व गुण नियंत्रक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.

0000000

खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सुरळीत ;

 

34 हजार 462 मेट्रीक टन युरीयाचा पुरवठा खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात एकही लेखी तक्रार नाही

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  खरीप हंगामासाठी जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत झाला असून 12 ऑगस्ट 2026 पर्यंत 34 हजार 462 मेट्रीकटन (मे.ट.) युरिया, 10 हजार 270 मे. ट. डिएपी, 5 हजार 374 मे.ट. एमओपी, 45 हजार 799 मे.ट. संयुक्त खते आणि 20 हजार 526 मे. ट. एसएसपी खतांचा पुरवठा झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले असून युरीया  व  डिएपी खतांच्या तुटवडयाबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित वृत्तांबाबत  अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. खरीप हंगामात खतांच्या अनधिकृत दरवाढीबाबत जिल्ह्यात आजपर्यंत कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

            जिल्ह्यात एप्रिल महिन्यात खतांच्या रॅक लागण्यास विलंब झाला मात्र लवकरच पुरवठा सुरळीत करण्यात आला. रासायणीक खतांच्या किमंतीत कोणतीही वाढ झाली नाही. विशेषत: केंद्र  शासन युरीयाच्या किंमती नियंत्रीत करीत असल्याने त्याच्या किंमतीत दरवाढ झालेली नाही. तसेच डिएपीच्या किमंतीत वाढ नाही. फोस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या बाबतीत केंद्र शासनाचे पोषणतत्व आधारीत अनुदान लागू असल्याने किंमतीत वाढ झाली नाही. संयुक्त खतांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सर्व रासायणीक खतांच्या किंमतीत सरसकट प्रति बॅग 125 ते 300 रुपयांनी वाढ झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

  खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्‍ठा रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा स्तरीय भरारी पथक स्थापन करुन कृषी सेवा केंद्रांची नियमीत तपासणी करण्यात आली. लिंकींग व तत्सम तक्रारींबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तक्रार निवारणासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये क्यु.आर.कोड आणि बियाणे,खते व किटकनाशक संदर्भातील तक्रारींकरिता व्हाट्सॲप लावण्यात आला.

 

https://adozpamravati.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-O-padding.html  ब्लॉगवर जिल्ह्यातील कृषी केंद्र निहाय उपलब्ध खत साठा बघण्याची सोय करून देण्यात आली.  

             

0000000

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माय भारत केंद्राकडून  विविध उपक्रमांचे आयोजन

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) :  माय भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट रोजी  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

       पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 27 ऑगस्ट रोजी देशभरातील 1600 ठिकाणी सहभागी होणाऱ्या आठ लाखांहून अधिक युवकांना आभाशी माध्यमातून संबोधन करणार आहे. याद्वारे देशभरातील युवक आभासी माध्यमातून एकत्र जुळणार आहेत. पंतप्रधानांच्या संबोधनानंतर येथील पोटे पाटील महाविद्यालय आणि बियाणी महाविद्यालयात प्रवेश सकाळी 10 वाजता कार्यक्रम होणार आहे. या अंतर्गत युवक संवाद व विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

 

        माय भारत स्वयंसेवक आणि स्थानिक खेळाडू यांच्यात विशेष युवा संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासात झालेल्या परिवर्तनावर चर्चा करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील युवक, माय भारत स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्र, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

      जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा युवक अधिकारी अक्षय निपाणे यांनी केले आहे.

00000000



मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमनाबाबत व्यापक मोहिम हाती घेणार

 

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा स्त्री रूग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचविण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दर महिन्याला देण्यात यावे. तसेच ही यंत्रणा संबंधित आस्थापनांना सोपविताना जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जोखमीच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा स्वयंचलित मोडमध्ये ठेवण्यात यावी. तसेच याची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करण्यावर भर देण्यात यावा. यात प्रामुख्याने स्वयंचलित यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करावी. अग्निशमन यंत्र वापराबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात यावे. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी याचे प्रात्यक्षिक घेण्यात यावे. यातील सुरक्षा विषयक कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.

 

रूग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार फायर सिलींडर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात 50 आणि ग्रामीण भागात 50 टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

00000000

Monday, August 24, 2026

DIO NEWS AMRAVATI 24.8.2026








                        जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

*आठ दिवसात ही समिती अहवाल देईल

*दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार

 

अमरावती, दि. 24 (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 3 नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात ही समिती अहवाल सादर करणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिली.

 

जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दुर्घटना घडलेल्या एनआयसीयूला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार सुलभा खोडके, महापौर श्री. चंद तेजवानी, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

 

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आहे. यातून घटनेची भीषणता दिसून आली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. दोन वर्षांपूर्वीच हे नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे संपूर्ण अद्ययावत सोयीसुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडायलाच नको होती. या घटनेचे नेमके कारण शोधून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंते, एम्सचे वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असणार आहे. येत्या आठ दिवसात घटनेचा सखोल तपास करून प्रत्यक्ष जबाबदार असलेल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

 

ही समिती समस्येच्या खोलवर जाऊन कारणे शोधणार आहे. व्हेंटिलेटर, वीज यंत्रणेतील दोष, फायर ऑडिट, तसेच अन्य अनियमितता यांची सखोल तपासणी करेल. या दुर्दैवी घटनेतून यंत्रणेलाही शिकावे लागेल. ज्या त्रुट्या आढळून येतील त्या दुरुस्त करण्यासाठी शासन संपूर्ण प्रयत्न करेल. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नवजात बालकांच्या पालकांना शासनातर्फे पाच लाख रूपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच जखमी बालकांवर उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल. आजच्या घटनेने गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट नियमानुसार व नियमीत होण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येईल. तसेच आवश्यक सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या दुर्घटनेतील नवजात बालकांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

00000000



संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;

लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

 

अमरावती, दि.24 (जिमाका) : संजय गांधी  निराधार योजना व  श्रावणबाळ  योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अर्थात हयात प्रमाणपत्र (डिएलसी) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमरावती तहसील कार्यालयाने 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विशेष शिबिर आयोजित  केले आहे. सर्व लाभार्थ्यांना विना विलंब हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने  बेनिफीशरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून   हयात  डिजीटल लाईफ सर्टिफीकेट (डिएलसी) काढून आपण हयात असल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा शासकीय लाभ  सुरु राहील. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती शहर संजय गांधी तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर  आयोजित करण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी विना विलंब हे प्रमाणपत्र काढावे असे तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

लाभार्थी  मोबाईलवर संबंधित अ‍ॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

00000000

Sunday, August 23, 2026

🌱💧 तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!

 


🌱💧 तुमची रील फक्त रील न राहता… माती आणि पाण्यासाठीचा आवाज बनू द्या!

🎥 ‘मृद व जलसंधारण रील्स स्पर्धा’ मध्ये सहभागी व्हा आणि माती व पाणी संवर्धनाचा संदेश आपल्या क्रिएटिव्ह रीलमधून द्या.


🌾 माती वाचवा

💧 पाणी जपा

🌱 सुरक्षित भविष्य घडवा !

Saturday, August 22, 2026

‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

 


‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त अमरावती महसूल विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांत एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम
अमरावती, दि. २२ ऑगस्ट २०२६ : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने अमरावती महसूल विभागातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘ज्ञान माऊली’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अमरावती विभागाअंतर्गत अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक साहित्यनिर्मिती, अध्यात्मिक विचार आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनावर अमीट ठसा उमटविला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यांच्या समतावादी, मानवतावादी आणि भक्तिमार्गाच्या विचारांचा वारसा आजही समाजाला प्रेरणा देत आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकार्याचा, अध्यात्मिक विचारांचा आणि संतपरंपरेतील योगदानाचा परिचय जनसामान्यांना करून देण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संतविचार, भक्तीपरंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन रसिकांना घडणार आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, संतांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जनमानसात व्यापक ओळख निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
अमरावती महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजित करून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि संतपरंपरेचा व्यापक प्रसार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना संत ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाशी जोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
‘ज्ञान माऊली’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून, अमरावती विभागाअंतर्गत अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

#SaveSoil
#savewater
#SecureTomorrow
#रील्सस्पर्धा

 

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ



मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

#SaveSoil
#savewater
#SecureTomorrow
#रील्सस्पर्धा

 

Friday, August 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.8.2026












                                 देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी अभियंत्यांनी  योगदान द्यावे-

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात केले आवाहन

 

40 कोटीतून मेळघाटातील दुर्गम भागातील 22 गावांमध्ये वीज पोचली

 

अमरावती, दि. 21 ( जिमाका): महाराष्ट्र व देशातील अभियंत्याची देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका राहिली आहे. आता 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. अंधारात राहणाऱ्या मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागात अभियंत्यांच्या मेहनतीमुळे वीज पोचली असून अंतिम 22 गावांमध्ये 40 कोटी निधीतून सोलर लाईन टाकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

             येथील अभियंता भवनात दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अमरावती  सेंटरच्या वतीने आयोजित '41व्या राष्ट्रीय विद्युत अभियांत्रिकी अधिवेशनात' ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

            पालकमंत्री श्री .बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र व देशाच्या उर्जा क्षेत्र विकासातही अभियंत्यांनी महत्वाची भूमिका वठविली आहे. दीर्घकाळ अंधारात असलेल्या एलिफंटा येथील ऐतिहासिक घारापुरी लेण्यांमध्ये  7 किमीच्या समुद्रातून केबल प्लेट टाकून राज्य शासनाच्या महावितरण आणि पारेषण कंपन्यांच्या अभियंत्यांनी अभूतपूर्व कार्य केले आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेत कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी  मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना प्रांरभिक अंमलबजवणी काळात अभियंत्यांच्या योगदानामुळे मिळालेल्या यशावर त्यांनी प्रकाश टाकला.

 

            मेळघाटातील आदिवासी दुर्गम भागातील अंधारात राहणाऱ्या 300 गांवामध्ये वीज पोचविण्यात अभियंत्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.यातील शेवटच्या 22 गावांमध्ये 40 कोटींच्या निधीतून सोलर लाईनच्या माध्यमातून वीज पोचविण्योच शिवधनुष्यही अभियंत्यांनी उचलल्याचे त्यांनी सांगितले. सौर पंपाद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात महारष्ट्राने देशात अग्रस्थान मिळविले आहे व त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. अभियंत्यांनी  विकसित भारताचे लक्ष पूर्ण करण्यातही महत्वाचे योगदान द्यावे असेही ते म्हणाले.

            विद्युत क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते  महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार, एनआयटी इटानगरचे (अरुणाचल प्रदेश) संचालक डॉ. मोहन आवारे आणि मराठवाड्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रताप पवार या अभियंत्यांचा  इमिनंट इंजिनियर पुरस्काराने तर डॉ एस. हेमवती, डॉ.एस.जयंती आणि प्रियम जैन या अभियंत्यांचा यंग इंजिनिअर पुरस्काराने गौरव करण्यात आला. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून इंजिनियर फिटनेस सेंटरचे उद्घाटन झाले. दि. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचे संयोजक आनंद जवंजाळ यांनी प्रास्ताविक केले.

 

            कृत्रिम बुद्धिमत्ता व हरित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे 2047 पर्यंत विकसित भारत  घडविण्यासाठी देशात विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने या दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

०००००००

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : ईद-ए-मिलाद,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी, दहीहंडी, कावड यात्रा  व इतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 

      प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून सदर आदेश  दि. 25 ऑगस्ट  ते  8 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत मेळावे, मिरवणुका आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी करण्यात आली आहे. शासकीय- निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अंत्ययात्रा, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हे आदेश लागू राहणार नाहीत. या आदेशाचा भंग करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.

000000






‘महा वॉकेथॉनमध्ये युवकांचा उत्साहात सहभाग

*71 हजार रूपयांच्या बक्षीसाचे लकी ड्रॉद्वारे वितरण

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : नागरिकांमध्ये जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आज शहरात ‘महा वॉकेथॉन : ‘वॉक फॉर वॉटर उपक्रम पार पडला. सकाळी शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर एकत्र येत युवकांनी वॉकेथॉनमध्ये उत्साहात सहभाग घेतला. यावेळी लकी ड्रॉद्वारे दहा सहभागींना पारितोषिके देण्यात आली.

 

जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश वॉकेथॉनमधून देण्यात आला. या वॉकेथॉनला श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयापासून सुरुवात झाली. विभागीय आयुक्त नयना गुंडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हषवर्धन देशमुख यांनी वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक अभियंता दिलीप निपाने, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, श्री. पाटील, जलसंधारणाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, श्रीकांत उमप, सोनाली काकडे, मुख्याधिकारी विकास खंडारे, शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य गावंडे आदी उपस्थित होते. सुरवातीला विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आली. तसेच उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली.

 

पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, जिल्हा कोषागार कार्यालय आणि सिंचन भवन या मार्गे वॉकेथॉन शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर पाहोचली. याठिकाणी वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला, तसेच वॉकेथॉनमध्ये सहभागींना पारितोषिके वितरीत करण्यात आली. यात प्रथम तनुजा मेश्राम, द्वितीय कस्तुरी बहुरूपी, तृतीय आयुष मुंढे, तर राजू मुंढे, अंजू कासदेकर, आचल वानखडे, विंजोथ केनॉय, खुशी नवखार, प्रचिती पाटील, अविनाश साऊरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

या उपक्रमात प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागींसाठी महावॉकेथॉन झुंबाचे आयोजन करण्यात आले.

0000000





युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

 

मेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी

 

         अमरावती, दि. 21 (जिमाका) : युवा पिढीला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्य आत्मसात करता यावे  तसेच  त्यांना गती असणाऱ्या क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे  प्रतिपादन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

              नवराष्ट्र युथ फाऊंडेशनच्या वतीने येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवशीय ‘अमरावती युवा महोत्सवाचे आज उद्घाटन पालकमंत्री  श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

 

            पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, युवा महोत्सवाच्या माध्यमातून  जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशिलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. अमरावती व विदर्भाच्या मातीचे संस्कार त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतील. यासोबतच ज्ञान, तंत्रज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीतही हे युवा आपले योगदान देणार आहेत. राज्य शासनाने एआय बेस तंत्रज्ञानावर भर दिला असून युवकांना या क्षेत्रात पुढे जाण्याकरिता पोषक  वातावरण तयार करण्यात  येत आहे. अमरावती व राज्यातील युवकांनी यादृष्टीने पुढाकार घ्यावा त्यास राज्यशासन पूर्ण सहकार्य करेल असे सांगत एआयच्या सद्उपयोगावर भर देत दुरुपयोगापासून लांब रहावे असेही त्यांनी सांगितले. येत्या 25 डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यकरण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

     नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी प्रास्ताविक केले. 23 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवामध्ये दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 दरम्यान शिक्षणतज्ञांचे व्याख्यान, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्सगो स्पर्धा, अमरावती गॉट टॅलेंट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

००००००

पालकमंत्र्यांनी दाखविली नवीन वाहनांना हिरवी झेंडी

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन नविन वाहनांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिरवी झेंडी दाखविली.

 

यावेळी आमदार प्रविण पोटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस आयुक्त राकेश ओला आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने आज तहसिलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना वितरीत करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. तसेच संबंधितांना वाहने सुपूर्द केली.

000000


जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांची जयंती साजरी

 

अमरावती, दि. 21 (जिमाका) : जलक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांची  जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

 

यावेळी  आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी - कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000000

रविवारी राखी मेल सुविधा उपलब्ध राहणार

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): राखी पर्वानिमित्त नागरिकांना राखी मेल बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी अमरावती विभागातील निवडक डाक कार्यालयात सुविधा उपलब्ध राहणार आहे.

 

अमरावती मुख्य डाकघर, परतवाडा मुख्य डाकघर, अमरावती उपकॅम्प डाकघर, अचलपूर उप डाकघर, बडनेरा उप डाकघर, अंजनगाव उप डाकघर, चांदूर रेल्वे उप डाकघर, चांदूर बाजार उप डाकघर, धामणगाव रेल्वे उप डाकघर, धारणी उप डाकघर, मोर्शी उप डाकघर, व्हीएमव्ही उप डाक, रूख्मिणी नगर उप डाकघर, शिवाजीनगर उप डाकघर, राजापेठ उप डाकघर, वरूड उप डाकघर, साईनगर उप डाकघर, वलगाव उप डाकघर तसेच  दर्यापूर उप डाकघर या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध राहणार आहे, असे अमरावती विभागाचे प्रवर डाक अधीक्षक श्री. गेडाम यांनी कळविले आहे.  

000000

DIO NEWS AMRAVATI 25.8.2026

                        मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या लाभासाठी सोमठाना खुर्दच्या लाभार्थ्यांना मोबदल्यासाठी आवाहन   अमरावती, द...