Friday, September 4, 2026

DIO NEWS AMRAVATI 04.09.2026








रस्ते, घरकुल, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवाव्यात

*खासदार बळवंत वानखडे यांचे निर्देश

 

अमरावती, दि. 4 : केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. या निधीचा योग्य विनियोग करून ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करावे. यात प्रामुख्याने पांदण रस्ते, घरकुल, आरोग्य यासोबतच पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले.

 

जिल्हा नियोजन भवनात श्री. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, गजानन लवटे, प्रविण तायडे, अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. चांगल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील काही मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने या कामांना गती देण्यात यावी. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याला प्राधान्य देण्यात यावे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते महत्वाचे आहेत. यासाठी पांदण रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना खासदार श्री. वानखडे यांनी केल्या.

 

गरजूंना आर्थिक सहाय्याच्या योजना महत्वाच्या आहेत. प्रामुख्याने दिव्यांगांना देण्यात येणारी मदत थांबविण्यात येऊ नये. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावर शिबीरे घेऊन यूडीआयडी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात याव्यात. ग्रामीण भागातील घरकुलांचा प्रश्न महत्वाचा आहे. घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधितास पाच ब्रास रेतीचे वाटप करण्यासाठी पास देण्यात यावा. तसेच जवळपास असलेल्या रेतीच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात यावी. तसेच टप्पेनिहाय अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत.

 

आरोग्य ही महत्वाची बाब असून यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. रूग्णवाहिकांना इंधनाचा नियमित पुरवठा होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मेळघाटात आरोग्याचे प्रश्न असल्याने याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध राहिल, याची दक्षता घेण्यात यावी. आरोग्यासोबतच पाणी पुरवठा महत्वाचे आहे. जलजीवन मिशनमधून पूर्ण करण्यात येणारी कामे तातडीने पूर्ण करावीत. गावात प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू होईल, यासाठी कामे तातडीने पूर्ण करावीत. यामुळे साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

 

युवकांसाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात यावे. येत्या 29 सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. त्यांना प्रशिक्षण आणि बँकांकडून कर्ज मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत. हे उद्योग कायमस्वरूपी सुरू राहावेत, यासाठी प्रयत्न करावेत. कंत्राटी तत्वावर कार्यरत कामगारांना पूर्ण वेतन मिळावे, यासाठी कामगार विभागाने जागृती करावी. क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट खेळाडू घडावेत, यासाठी विद्यापीठाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना खासदार श्री. वानखडे यांनी केल्या.

 

000000

 

  


‘इंडिया स्किल्सस्पर्धेसाठी उमेदवारांना १५ सप्टेंबर पर्यंत

अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.४ (जिमाका) :  ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७साठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक उमेदवारांना  १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

 

      इंडिया स्किल्स स्पर्धेच्या माध्यमातून २३  वर्षांखालील उमेदवारांना जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.

 

        या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  वयोमर्यादा हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. वैयक्तीक सहभागासाठी ५६ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स,काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क, लँडस्केप गार्डनिंग  या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा. सायबर सिक्युरिटी,इंडस्ट्री ४.०,मॅकॅट्रोनिक्स,रोबोट सिस्टिम इंटीग्रेशन या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म   १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.

 

        शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),पॉलेटेक्निक,इंजिनियरींग कॉलेज,खाजगी शाळा,विद्यापीठ,प्रशिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

      या स्पर्धेत सहभागासाठी  इच्छुक उमेदवारांना skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

         ०००००


दत्तक विधानात जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी

एकाच दिवसात ९ बालकांना हक्काचा 'कुटुंबाधारित' निवारा!

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संवेदनशीलतेमुळे दत्तक प्रक्रियेला वेग

 

पालकत्व मिळाल्याने पालकांच्या जीवनात आनंदाची पहाट

 

अमरावती, दि. 4 (जिमाका) : प्रत्येक बालकाला प्रेम, माया, सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधार मिळावा, या उदात्त उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान प्रक्रियेत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी एकाच दिवशी तब्बल 9 दत्तक प्रकरणांमध्ये आदेश पारित करून या बालकांच्या आयुष्यात नवीन आशा आणि आनंदाचा अध्याय प्रारंभ केला आहे. तसेच पालकत्व मिळाल्याने पालकांच्या जीवनात आनंदाची पहाट उगविली आहे.एकाच दिवशी जिल्ह्यातील बाल संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण बाब असून, प्रशासनाची संवेदनशीलता, तत्परता आणि बालकांच्या सर्वोत्तम हितासाठी असलेली बांधिलकी याचे हे उत्तम उदाहरण ठरल्याची भावना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी व्यक्त केली आहेत.

 

     ‘प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंबामध्ये वाढण्याचा अधिकार आहे. दत्तक विधान प्रक्रिया ही केवळ एका कायदेशीर आदेशापुरती मर्यादित नसून ती एका बालकाच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा देणारी प्रक्रिया आहे. बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पात्र दत्तक प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे ही निश्चितच समाधानाची बाब असून, यामुळे या बालकांना नवीन कुटुंब,नवीन नाती आणि उज्ज्वल भविष्याची संधी प्राप्त झाल्याचे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सांगितले.

 

      बालकांचे संस्थात्मक संगोपन करण्यापेक्षा शक्य असेल तेथे त्यांना कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. दत्तक प्रक्रियेद्वारे बालकाला केवळ निवारा मिळत नाही, तर त्याला आपलेपण, भावनिक आधार, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण मिळते. त्यासोबतच पालकांना बाल संगोपनाची जबाबदारी मिळाली आहे.

 

     बालकांचे हित, संभाव्य दत्तक पालकांची पात्रता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच कायदेशीर प्रक्रियेची पडताळणी व सर्व बाबींचा सखोल विचार करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी 9 प्रकरणांमध्ये दत्तक आदेश पारित केले. पालकांच्या संगोपनापासून वंचित राहिलेल्या बालकांना कायमस्वरूपी प्रेमळ कुटुंब मिळवून देण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि स्थिर कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 

     दत्तक विधान प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, तसेच बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

बालकांच्या संरक्षण, पुनर्वसन आणि कुटुंबाधारित संगोपनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष दत्तक संस्था आणि संबंधित यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय साधण्यात आला. पात्र बालकांच्या दत्तक प्रक्रियेतील आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.दत्तक विधान प्रक्रियेत बालकांचे सर्वोत्तम हित, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, संबंधित यंत्रणांशी समन्वय आणि प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी बाल संरक्षण अधिकारी भूषण  कावरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी शक्य तेथे कुटुंबाधारित संगोपन उपलब्ध करून देणे, तसेच बालकांच्या पुनर्वसनासाठी कायदेशीर व सुरक्षित मार्गाने कार्यवाही करणे यासाठी बाल संरक्षण यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे.

 

'बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे'- अजय डबले

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत सांगितले, ‘बालकाला कुटुंबाचा आधार मिळणे ही त्याच्या भावनिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दत्तक विधान प्रक्रियेमध्ये प्रत्येक प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जाते. संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष सातत्याने प्रयत्नशील आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकरणांना गती मिळाली असून, एकाच दिवशी 9 दत्तक आदेश पारित होणे, ही बाल संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय उपलब्धी आहे.’

 

        दत्तक प्रक्रिया ही समाजातील संवेदनशील आणि जबाबदार नागरिकांनी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कायदेशीर प्रक्रियेतून दत्तक घेतलेल्या बालकाला कुटुंबाचा आधार देणे हे अत्यंत मोठे सामाजिक योगदान आहे. पात्र आणि इच्छुक पालकांनी अधिकृत प्रक्रियेची माहिती घेऊन कायदेशीर मार्गाने दत्तक विधान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला. जिल्ह्याच्या बाल संरक्षण व्यवस्थेतील ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आणि उल्लेखनीय ठरत आहे.

000000



नागरिकांच्या समस्या निवारणासाठी दररोज वेळ राखीव

*अभ्यागतांसाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत भेटी अनिवार्य

 

अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील सर्व शासकीय व महसूल विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी नागरिकांच्या अडचणी व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत अभ्यागतांना भेटणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दररोज दुपारी ३ ते ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. राखीव वेळेत विभाग प्रमुखांनी शक्यतो स्वतः उपस्थित राहून नागरिकांची निवेदने, तक्रारी ऐकून त्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी लागणार आहे. ज्या प्रकरणांचे तात्काळ निवारण शक्य नाही, त्यांची नोंद घेऊन विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

 

अत्यावश्यक शासकीय बैठका किंवा अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे विभाग प्रमुख उपस्थित राहू शकत नसल्यास, त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे. नागरिकांना विनाकारण ताटकळत राहावे लागू नये आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुरळीत व परिणामकारक व्हावे, यासाठी या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

00000


सेमाडोह येथे १३ नालसा योजनांची प्रभावी अंमलबजावणी

 

अमरावती, दि. ४ (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) मेगा ड्राईव्ह अंतर्गत चिखलदरा तालुक्याच्या सेमाडोह गावातील नागरिकांच्या दारापर्यंत विधी सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन व विविध शासकीय योजना अशा एकूण १३ नालसा योजनांचा लाभ पोहचविण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साह असून, त्यांच्या दारापर्यंत विधी सेवा आणि शासनाच्या योजनांची माहिती व लाभ पोहोचत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

नालसाच्या  निर्देशानुसार देशभरातील नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत विधी सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये नालसा मेगा ड्राईव्ह-१ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे  या उपक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम व सामाजिक-आर्थिकदृष्ट्या गरजू भागाचा विचार करून चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावाची निवड करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष  उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  प्राधिकरणाचे  सचिव   संजय  सहारे यांच्या समन्वयातून २५ ऑगस्ट २०२६ पासून मेगा ड्राईव्हची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा मेगा ड्राईव्ह  २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.

सेमाडोह येथे नालसा मेगा ड्राईव्ह टप्पा १ अंतर्गत १३ नालसा योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे सचिव, कार्यालयीन कर्मचारी तसेच पॅरा-लीगल स्वयंसेवक सेमाडोह गावास वारंवार भेटी देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. घरभेटी, सर्वेक्षण, कायदेविषयक जनजागृती, पात्र लाभार्थ्यांची ओळख वप्रकरणांची नोंद तसेच आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. गावातील नागरिकांची माहिती संकलित करून पात्र लाभार्थ्यांची ओळख करण्यात येत आहे.

नागरिकांना त्यांच्या हक्कांची, विधी सेवांची तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देऊन आवश्यकतेनुसार विधी सहाय्य व संबंधित विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विशेष उपक्रमास ग्रामस्थ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि चिखलदरा तालुका प्रशासनाचे सहकार्य प्राप्त होत आहे.

                              ०००००००

 


Thursday, September 3, 2026

DIO NEWS AMRAVATI 03.09.2026


               शासकीय बालगृहातील बालक 'सारंग सलीम'च्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 3 (जिमाका) :  येथील रुक्मिणीनगरात स्थित  शासकीय वरिष्ठ मुलांच्या बालगृहात प्रवेशित असलेल्या सारंग सलीम या बालकाच्या घरचा पत्ता व कुटुंबीयांची ओळख पटविण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन अमरावतीमार्फत शोधमोहीम सुरू आहे. या बालकास किंवा त्याच्या आई-वडील, भाऊ-बहिणी व कुटुंबीयांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती (संपर्क क्रमांक 9021358816) तसेच चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक (संपर्क क्रमांक 9922604308) या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. बालकाच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास त्याची ओळख पटवून पुढील कायदेशीर व पुनर्वसनात्मक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.

 

बालकाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईचे नाव नीतू, भाऊ निलेश व नीलू आणि बहिणी शितल व खुशी अशी नावे आहेत. बालकाने पूर्वीचा पत्ता मनपा शाळा क्रमांक 2, मसानगंज, अमरावती असा सांगितला आहे. त्याची आई अमरावती येथे 'संगीता' नावाच्या महिलेच्या भाजीच्या दुकानातून भाजी घेत असल्याचेही बालकाने सांगितले आहे.

 

बालकाचा शोध यापूर्वीही संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आला होता. तसेच जुलै 2026 मध्ये बालकास अमरावती येथे आणून त्याने सांगितलेल्या परिसरात प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली मात्र कुटुंबीयांचा ठोस पत्ता मिळू शकला नाही.

०००००००


 

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा रविवार पासून तीन दिवसांचा अमरावती जिल्हा दौरा

 

अमरावती, दि.(जिमाका): बालगृहांची पाहणी व तपासणी, बालकांच्या हक्कांच्या अनुषंगाने विविध बाबींचा आढावा, तसेच संबंधित प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली ६ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोगाचा अमरावती जिल्हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी कळविले आहे.

 

             नियोजित कार्यक्रमानुसार ६ सप्टेंबर रोजी आयोगाचे अध्यक्ष व सदस्य अमरावती जिल्ह्यातील बालगृहांना भेटी देणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते  दुपारी १२.३० वा. दरम्यान विविध प्रकरणांची सुनावणी घेण्यात येणार आहे. तर दुपारी १२.३० ते २ वा. पर्यंत आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ ते सायं ६ वा. दरम्यान जिल्ह्यातील बालगृहास भेटी देणार आहे. ८ सप्टेंबर रोजी मेळघाट क्षेत्रास आयोग भेट देणार असून प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग अमरावती व मेळघाट तसेच इतर बहुजन कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहे.

 

आयोगाच्या दौऱ्यात बालगृहांमध्ये बालकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, निवास व भोजन व्यवस्था, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा, बालकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना, समुपदेशन व पुनर्वसनाची कार्यवाही तसेच बालकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी याबाबत पाहणी करण्यात येणार आहे. तसेच, बाल हक्क संरक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात येणार असून, संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकडून विविध विषयांचा आढावा घेण्यात  येणार आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आयोगाकडून मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत.

०००००

जुना बायपास मार्गावर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी: पोलीस प्रशासनाची अंतिम अधिसूचना जारी

 

अमरावती, दि. ३ (जिमाका ):  शहरात वाढती लोकसंख्या, वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने शहरातील बाजारपेठ असलेले महत्वाचे मार्ग तसेच वेलकम पाँईट ते अलमास गेट बडनेरापर्यंत असलेला जुना बायपास आदी प्रमुख मार्गांवर हलक्या व जड मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी घालण्याबाबतची  अंतिम अधिसूचना पोलीस उपायुक्त (मुख्यालय) प्रांजली सोनवणे यांनी बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केली आहे. 

 

हलके व जड वहानांना प्रवेशबंदी संदर्भात १७ नोव्हेंबर २०२० च्या अंतिम आदेशात अंशत: बदल करणे आवश्यक असल्याने शहरात प्रवेशबंदी संबंधाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम अधिसुचना जारी करण्यात आली होती.त्यावर आक्षेप प्राप्त झाले. आक्षेप तसेच सामान्य नागरिकांच्या संरक्षणाचा सर्वांगीण विचार करून जडवाहन प्रवेशबंदी संबंधाने २ सप्टेंबर  रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

 

वाहनांमध्ये  मालविरहित (खाली गाडी) वजन २,००० किग्रॅ (२ टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलकी व जड व्यावसायिक वाहने सुपर एक्सप्रेस हायवेचा वापर न करता जुना बायपास मार्गाचा तसेच शहरातील गर्दी असलेल्या मार्गाचा अवलंब करीत असल्याने या मार्गांवर वाहनांची वर्दळ अधिक होऊन किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  शहरात सन २०२४ ते जुलै २०२६ या काळात एकूण १,१०८ अपघात झाले आहेत. यातील २१२ प्राणघातक अपघातांमध्ये २४६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून ९१३ व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रात सांगण्यात आले  आहे.

 

             दररोज सकाळी ६.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत वाहनांना शहरात  प्रतिबंध असणार असून या वाहनांमध्ये  मालविरहित (खाली गाडी) वजन २,००० किग्रॅ (२ टन) पेक्षा जास्त असणारी सर्व हलकी व जड व्यावसायिक वाहने.  ज्या वाहनांची भारसहित वहन क्षमता २ टनांपेक्षा जास्त आहे अशी सर्व वाहने.  सर्व प्रकारच्या अति अवजड (मल्टी-ॲक्सल) वाहनांचा समावेश आहे. 

 

यावेळेत शहरातील जे मार्ग बंद राहतील  यामध्ये  मुख्य चौक व बायपास मार्ग : गौरी इन वा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गद्रे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अलमास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाय पॉइंट यांचा समावेश असेल. तसेच  नाका व अंतर्गत मार्गांमध्ये  राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इर्विन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गांचा समावेश आहे.

 

             इतर महत्त्वाच्या मार्गांमध्ये  आर.टी.ओ. कार्यालय, शेगाव नाका, कठोरा नाका, पोते पाटील चौक, रहाटगाव बस स्टॉप, विभागीय आयुक्त कार्यालय मार्ग तसेच एम.आय.डी.सी. परिसराचा समावेश आहे.  कायमस्वरूपी बंद राहणाऱ्या मार्गांमध्ये  गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग. तसेच  बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज.  गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक.  शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा समावेश आहे.

 

            प्रवेशबंदीतून सूट आणि वेळ (अपवाद)अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. यात पेट्रोल, डिझेल, गॅस, शासकीय धान्य वितरण वाहने, महापालिका कचरा संकलन, अतिक्रमण विभाग, पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेशबंदीतून पूर्ण सूट असेल. तसेच या वाहनांना ताशी २० किमीची वेग मर्यादा पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अन्नधान्य व कृषी माल वाहतूकीला सूट देण्यात आली असून याअंतर्गत  दररोज दुपारी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेदरम्यान ठरवून दिलेल्या मार्गांवरून  जसे की  रेल्वे मालधक्का बडनेरा, एमआयडीसी, कृषी उत्पन्न बाजार समिती या भागात वाहतुकीस परवानगी राहील.

 

            गौण खनिज वाहतूकीसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या असून यानुसार  दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तसेच सर्व रविवारी सकाळी ६.०० ते ११.०० आणि दुपारी २.०० ते४.००  या कालावधित विशिष्ट निर्धारित मार्गांवरून वाहतुकीस सूट देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

००००००

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत तेल काढणी युनीट करिता अर्ज करण्याचे आवाहन

 

 

अमरावती, दि. 3 (जिमाका) : राष्ट्रीय  खाद्यतेल अभियान-तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत काढणी पश्चात पायाभूत सुविधा घटकांतर्गत तेल काढणी युनीट करिता शेतकरी, शासकीय किंवा खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ),सहकारी संस्था, तेलावर प्रक्रिया करणाऱ्या नोंदणीकृत नवीन कंपनी तसेच या योजनेंतर्गत निवडलेले मुल्यसाखळी भागीदार यांना येत्या ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत  अर्ज करण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

 

            या राष्ट्रीय अभियानांतर्गत बियाणे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी १० टन क्षमतेचे तेल काढणी युनीट आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री व उपकरणे तसेच तेलबिया प्रक्रिया युनीट करिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के कमाल  किंवा ९ लाख ९० हजार रूपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.

 

           

काढणी युनीट करिता खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी तसेच याकरिता इच्छूक भागदाराने बँकेकडे कर्ज मंजुरी करिता प्रकल्प सादर करावा लागणार आहे.बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार या योजनेच्या लाभास पात्र राहणार असून ३१ सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांना संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

                                                            ००००००

           कडधान्य प्रक्रिया युनीट उभारणीसाठी 25 लाखांपर्यंत अनुदान; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 3 (जिमाका) : कडधान्य आत्मनिर्भर अभियानांतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने काढणीनंतरची पायभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनीट उभारण्याकरिता २५ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) ,क्लस्टर स्तर महासंघ (सीएलएफ), प्राथमिक कृषी पतसंस्था (पीएसीएस) तसेच इच्छुक व्यक्ती व संस्थांना प्रक्रिया युनीट  उभारण्यासाठी अनुदान लाभ घेण्याचे आवाहन,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे. या लाभासाठी अनुसूचित जाती व जमाती,महिला,डोंगराळ क्षेत्रांना प्राधान्य  देण्यात येणार आहे.

 

 

            या योजनेच्या लाभासाठी  एफपीओ , सीएलएफ, पीएसीएस हे किमान मागील दोन वर्षांपासून नोंदणीकृत व कार्यरत असणे गरजेचे आहे.तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची क्षमता असावी. वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक असून एका कुटुंबातील एका व्यक्तीलाचा हा लाभ अनुज्ञेय असणार आहे. तसेच प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम व कार्यभांडवलासाठी मार्जीन मनी स्वत: उभारण्याची त्या व्यक्तीची क्षमता असावी.

 

 

प्रक्रिया युनीट उभारणीकरिता प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के  किंवा कमाल २५  लाख  प्रति युनीट अनुदान हे केवळ यंत्रसामग्री खरेदी  तसेच इमारत,गोदाम,साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी अनुदानाच्या जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या ३० टक्के पर्यंत राहणार आहे. अनुज्ञेय राहणार आहे.

 

 

            नवीन प्रक्रिया युनीटची किमान क्षमता ३०० कि.ग्रॅ.असावी. खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री भारतीय मानक ब्युरो किंवा सक्षम गुणवत्ता मानकाचे पालन करणारी असावी. लाभार्थीने युनीट उभारणीच्या दिनांकापासून किमान ३ वर्षे सदर मालमत्ता जतन करणे बंधनकाराक राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधता येणार आहे.                 

                                                                    ००००००

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी अमरावती विभागातील २९२ उमेदवार पात्र

 

कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार

 

       अमरावती,दि. 3 (जिमाका) :आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया गुरुवार ३ सप्टेंबर पासून सुरू झाली असून शनिवार ५ सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून राज्यातील १६०० पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून यात अमरावती विभागातील २९२ उमेदवारांचा समावेश आहे.

  

            शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांनी निर्धारित केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी विकास  आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे. 

 

शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या २४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक- ९२७, माध्यमिक शिक्षक-४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक- २५२ अशा एकूण १६०० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील ११४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबधित उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पात्र ५८८ उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६उमेदवार तर अमरावती विभागात २९२ उमेदवार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले.

 

संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

                                    संवर्गनिहाय पदसंख्या

 

पेसा क्षेत्रातील १९६ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक , १६ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ९४ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक आणि १५१ उच्च माध्यमिक शिक्षक भरती करण्यात येणार आहे. तर नॉनपेसा क्षेत्रातील ५९३ मराठी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, १२२ इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक शिक्षक, ३०२ मराठी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक, २३ इंग्रजी माध्यमाचे माध्यमिक शिक्षक  आणि  १०१ उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

००००००

 

 

Wednesday, September 2, 2026

DIO NEWS AMRAVATI 02.09.2026







                           सुधारित बातमी

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा डोमा आश्रमशाळेत मुक्काम

 

आदिवासी समुदाय लढवैय्याच, अंद्धश्रद्धेला जीवनात थारा देऊ नका-

 

जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांना संदेश

 

        अमरावती, दि. 2 (जिमाका): भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल अशा लढवय्ये व क्रांतिकारी पुरुषांची मोठी परंपरा लाभलेला आदिवासी समुदाय आणि प्रसंगी मेळघाटात वाघ व अस्वलांशी दोन हात करायला न घाबरणारा हा समुदाय आहे. आपली ही लढवय्यी प्रवृत्ती न विसरता अंधश्रद्धेला दूर सारून शिक्षणाची कास व वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विद्यार्थ्यांनी पुढे जावे, असा मोलाचा संदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डोमा येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आश्रमशाळेत दिला. तसेच सनदी अधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला भीक न घालता आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याची स्वप्न बघून ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा, असा मौलिक सल्ला दिला.

 

          चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोमवारी, दि. 1 सप्टेंबर रोजीच्या भेटीद्वारे एक अनोखा कार्यक्रम पार पडला. सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाराच्या पलीकडे जाऊन एका पालकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी रात्रभर संवाद साधत प्रगल्भ विचाराचे दर्शन घडविले. याद्वारे अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी संवेदनशील प्रशासनाचे हे एक अत्यंत धाडसी व भूषणावह पाऊल ठरले.

 

       आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,  पोलीस अधीक्षक निकेतन कदम,  सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांनी संपूर्ण तालुका प्रशासनासह आश्रमशाळेला भेट दिली.

 

आम्हीही घडलो तुम्हीही घडा

 

         विद्यार्थ्यांसोबत भोजन केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मित्रांगत कट्टयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रंगतदार व खुमासदार प्रश्नांनी अनौपचारिक चर्चेतून भविष्यातील ध्येय गाठण्याचे विचार हे यातून पुढे आले. तुम्ही आयएएस आणि आयपीएस कसे झालात हे आपसूक आलेले प्रश्न व त्यांना या अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर खास आकर्षण होते. हा संवाद आम्ही घडलो आणि तुम्हीही घडा असाच ठरला.

 

 

 

       शालेय जीवनातच एका आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीने प्रभावित होऊन आयएएस होण्याचा बांधलेला चंग जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि आपण विद्यार्थी दशेतच  काय बनायचं हे ठरवलं, ते तुम्हीही करू शकता, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

      सत्यम गांधी आणि सिद्धार्थ शुक्ला यांनी बीएची पदवी घेतली असली तरी आपण आयएएस घडलो असल्याचा प्रवास केवळ दुर्दम इच्छाशक्तीने आणि मेहनतीने पूर्ण होऊ शकला. ते आपणही करू शकतात, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

 

       आश्रमशाळेत कथित भूत असल्याच्या दाव्याविरुद्ध विज्ञानाची कास धरत अंधश्रद्धेला विरोध करण्याचे व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी या हितगुजावेळी केले. त्यांना भविष्यातील विविध शैक्षणिक वाटचालींसाठी मार्गदर्शन केले.

 

       तत्पूर्वी, प्रसिद्ध खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांनी अंधश्रद्धेविरुद्ध सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना प्रबोधन केले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून भोजन केले. भोजन करतानाच अनौपचारिक गप्पाही मारल्या. यावेळी आश्रमशाळेत मुलींसाठी बांधण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाची पाहणी व उद्घाटनही करण्यात आले.

-------------------

            जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी असे जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला उद्बोधन केले. आमच्या मनातील भिती दूर केली. आम्हाला विश्वास दिला. मनावर ताबा ठेवून त्याला चांगले वळण लावल्यास आपणही मोठे अधिकारी होऊ शकतो, हा त्यांनी दिलेला संदेश आम्हाला आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत, अशा भावना शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोमाची अकरावी विज्ञानची विद्यार्थिनी कल्याणी गोपीचंद जावरकरने व्यक्त केल्या.

00000000 

परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी

 

 नवीन वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): परिवहनेत्तर ( चारचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  बुधवार, दि. 8 ऑक्टोबर 2026  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत,असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

 

        वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी  4 वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी 9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

 

      एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सिलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी  9 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.

 

      कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

0000000

व्यावसायिक व  बिगर  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

 

शासकीय वसतिगृह प्रवेशास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 2 (जिमाका): इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org  या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनिवार्य आहे.

 

                इतर मागास  बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना  मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील 12 वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर  येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज  आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी  इतर मागास  बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती  येथे  तर मुलींनी  बहुजन कल्याण मुलींचे  शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

 

         ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज  भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह वरील दिलेल्या दिनांकापर्यंत सादर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी  सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.

००००००








पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी गाव  व ग्रामीण भाग समजून घ्यावा – माहिती संचालक डॉ. गणेश मुळे

 

आयआयएमसीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ. मुळे यांच्या हस्ते प्रकाशन

 

अमरावती, दि. 2 (जिमाका) : पत्रकारितेत बातमी, फिचर,लेख, संपादन आदी बाबी अधिक चांगल्या आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गाव  व तेथील संस्कृती, समाजकारण अशा सर्व बाबी समजून ग्रामीण भागाचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले.

 

           येथील भारतीय जनसंचार संस्थेत (आयआयएमसी) डॉ.मुळे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. आयआयएमसीचे क्षेत्रिय संचालक डॉ. राजेशसिंह कुशवाह, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी रितेश भुयार, आयआयएमसीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनोद निताळे, शैक्षणिक सहशिक्षण सहयोगी जयंत सोनोने आणि रोहण तायडे यावेळी उपस्थित होते.

 

             संचालक डॉ. मुळे म्हणाले, गाव हा देश व विकासाचा केंद्र  बिंदू आहे. त्यामुळे गावाचा परिसर तेथील संस्कृती, समस्या, पर्यावरण त्याला जोडून तेथील समाजकारण आणि राजकारण अशा सर्व बाबी पत्रकारितेचे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. गाव व ग्रामीण भागाचा चांगला अभ्यास केल्यानंतर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश समजू शकतो व पत्रकारितेतील बातमी, फिचर, लेख, संपादन आदी विषय समजू शकतात. वाचन, मनन आणि चिंतनाच्या त्रिसुत्रीचे महत्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. प्रभावी शासकीय जनसंपर्क, त्याची विविध साधने आणि बदलत्या काळातील जनसंपर्क त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सौदाहरण उत्तरे दिली.

 

         तत्पूर्वी, इंग्रजी पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘द पब्लिक एँगलया प्रायोगिक वृत्तपत्राचे डॉ.मुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर  जिल्हा मराठी पत्रकार संघ, श्रमीक पत्रकार संघाला भेट देवून त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.     

०००००


DIO NEWS AMRAVATI 04.09.2026

रस्ते, घरकुल, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवाव्यात *खासदार बळवंत वानखडे यांचे निर्देश   अमरावती, दि. 4 : केंद्र शासनाच्या माध्य...