विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
अमरावती, दि. 28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात मंगळवार, दि. 28 जुलै रोजी 'विधी जनजागृती आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर' उत्साहात पार पडले.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. नंदकिशोर के. रामटेके उपस्थित होते.
न्यायरक्षक कार्यालयाचे सहायक अधिवक्ता अॅड. श्री अंकुश इंगळे यांनी नाल्सा योजनेंतर्गत जागरूकता, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपायांवर मार्गदर्शन केले. श्री. सहारे यांनी पर्यायी वाद निवारण पद्धती, त्याचे फायदे आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. देशमुख यांनी कायदेविषयक जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल अधिवक्ता अॅड. सपना काळे-विधळे यांनी सूत्रसंचालन केले. विधी स्वयंसेवक अमोल पोकळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्री. मालवीय, प्रा. लोखंडे आदी उपस्थित होते.
00000
29 आणि 30 जुलै रोजी कामगार विभागाची सरळसेवा परीक्षा
* उमेदवारांना सतर्कतेचे आवाहन
अमरावती, दि. 28 : कामगार विभागाअंतर्गत माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक या पदांसाठीची सरळसेवा परीक्षा गट-क २०२६ दि. 29 आणि 30 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. परीक्षेच्या निमित्ताने उमेदवारांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या 8 जिल्ह्यांमधील 22 केंद्रांवर घेतली जाणार आहे. सुरळीत आणि पारदर्शक परीक्षेसाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन व इतर सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहेत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही ऑनलाइन परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमीटेडमार्फत पारदर्शकपणे पार पडणार आहे.
परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळल्यास किंवा कोणीही व्यक्ती, संस्था गैरमार्ग, अमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्यास, अशा कोणत्याही गैरप्रकाराला उमेदवारांनी बळी पडू नये. तसेच कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास उमेदवारांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपायुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.
000000
शनिवारी माजी सैनिक संपर्क कार्यक्रम
अमरावती, दि. 28 : उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब-एरिया मुख्यालय यांच्या माजी सैनिक शाखेतर्फे माजी सैनिक संपर्क कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सीएसडी कॅन्टीनजवळील एनसीसी ग्रुप मुख्यालयात पार पडणार आहे.
कार्यक्रमात सर्व माजी सैनिक व त्यांच्या आश्रितांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी, प्रश्न व अडचणींचे जागेवरच निवारण करण्यात येणार आहे. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या समस्यांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यात डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, पीपीओ आणि इतर संबंधित कागदपत्रे यांचा समावेश आहे.
सर्व आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
00000

No comments:
Post a Comment