Monday, July 4, 2022

अमरावती विभागात पीएम- कुसुम योजनेत 10 हजारहून अधिक नोंदणी - ‘मेडा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे

 अमरावती विभागात पीएम- कुसुम योजनेत 10 हजारहून अधिक नोंदणी

-         ‘मेडा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे

अमरावती, दि. 4 : पीएम- कुसुम योजनेत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत 10 हजार 839 लाभार्थी नोंदणी झाली असून, त्यापैकी 4 हजार 975 पात्र लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले आहे. उर्वरित अर्जांवरील प्रक्रियाही गतीने सुरू आहे, असे ‘महाऊर्जा’चे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.

 

उपक्रमात 3 हजार 610  लाभार्थ्यांना हिस्सा जमा केला असून, 2 हजार 296 ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण केले आहे. प्रत्यक्षात सौर कृषी पंप बसविण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी पारेषणविरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या योजनेसाठी केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसाह्य आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा टक्के आहे. उर्वरित 60 ते 65 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘महाऊर्जाच्या स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर  अर्ज करावा.  अधिक माहितीसाठी ‘मेडा’च्या विभागीय क्रीडा संकुलातील कार्यालयात किंवा  www.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन श्री. तायडे यांनी केले.

त्याचप्रमाणे, या योजनेचा लाभ देण्याचे आमिष दाखवून काही फसव्या संकेतस्थळ व सोशल मीडियाद्वारे शेतकरी बांधवांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बनावट संकेतस्थळांवरील आवाहनाला प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणतेही शुल्क भरू नये, असेही आवाहन त्यांनी केले.

000

समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांत प्रवेशप्रकिया सुरु - समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे

 समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहांत प्रवेशप्रकिया सुरु

-          समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे

अमरावतीदि.4 : समाजकल्याण विभागाच्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 73 शासकीय वसतिगृहां प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलैपर्यंत  व्यासायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केले.  

विभागातील अमरावतीअकोलायवतमाळबुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांत प्रवेशित अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता 10वी व 11वी उत्तीर्ण, तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यासायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणेतालुका स्तरावर मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांत इयत्ता 8वी पासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटण्यात येत आहेत.   
शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलैइयत्ता 10 वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 30 जुलै, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांकरिता प्रथम वर्षाचे पदविका, पदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 24 ऑगस्ट आहे. व्यासायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज देता येईल.

 वसतिगृहात विद्यार्थ्यांना नाश्ताभोजननिवासाची सोयशैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहांत प्रवेश घ्यायचा असेल तेथूनच अर्ज मिळवून आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज करावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले.


0000

अमरावतीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्यापटू घडताहेत - राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक पवन तांबट

 

अमरावतीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्यापटू घडताहेत

-  राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक पवन तांबट

 

अमरावती, दि. 4 : धनुर्विद्या क्रीडा प्रकाराच्या प्रसाराला अमरावतीची क्रीडाभूमी अनुकूल असून, येथील विविध क्रीडा संस्थांच्या प्रशिक्षणातून अनेक धनुर्विद्यापटू घडत आहेत व देशपातळीवर पोहोचत आहेत, असे महसूल सेवेत तलाठी पदावर कार्यरत असलेले, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट यांनी आज सांगितले.

 

          श्री. तांबट यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे होणा-या ‘आर्चरी वर्ल्डकपच्या चौथ्या टप्प्यासाठी भारताचे क्रीडा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. अमरावतीची मधुरा धामणगावकर ही विद्यार्थिनीही याच स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. श्री. तांबट यांनी यापूर्वी 2016 मध्ये थायलंड येथे ‘आशिया कपमध्ये, तर 2019 मध्ये स्पेनमधील माद्रिद येथे जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत भारतातर्फे क्रीडा प्रशिक्षक म्हणून सहभाग घेतला आहे. ते महसूल सेवेत तलाठी  पदावर कार्यरत आहेत.

 

अमरावतीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातून प्रमोद चांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रशिक्षण घेतले असून, राष्ट्रीय पातळीवर 14 व राज्यस्तरावर 35 पदके मिळवली आहेत. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासारख्या नामांकित संस्था, ठिकठिकाणी कार्यरत विविध प्रशिक्षण संस्था, विभागीय क्रीडा संकुल व इतर संकुले यामुळे अमरावतीत धनुर्विद्या क्रीडा प्रसाराला अनुकूल वातावरण आहे. मी स्वत:ही गुरूकुल धनुर्विद्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे, असे श्री. तांबट यांनी सांगितले.

 

            जागतिक स्पर्धेच्या तिस-या टप्प्यात भारताला एक सुवर्णपदक व एक रजतपदक प्राप्त असून, पुढील टप्प्यातही भारत निश्चित प्रथम क्रमांक मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

उर्ध्व वर्धा जलाशयानजिकची जमीन भाडेपट्टीवर देणार

इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

          अमरावती, दि.4: उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडित क्षेत्राच्या काठाभोवतीची सुमारे 1 हजार 187.82 हेक्टर गाळपेर जमीन आगामी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध होऊ शकते. ती कसण्यासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून, इच्छूकांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

           रब्बी हंगामात अमरावती जिल्ह्यातील 298.22 हे. व वर्धा जिल्ह्यातील 30.60 हे. अशी एकूण 328.82 हे. जमीन उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, उन्हाळी हंगामात अमरावती जिल्ह्यात 806 हे. व वर्धा जिल्ह्यातील 53 हे. जमीन उपलब्ध होईल. 

 

प्राधान्यक्रम असा आहे

पुढील अग्रकमाने गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या व्यक्तीची जमिन नविन जलाशय, उत्प्लव बांध, धरण बांधण्यासाठी संपादित केलेली आहे किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहोचलेली आहे अशा व्यक्ती, स्थानिक भूमिहीन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, बहुसंख्य मागासवर्गीय सदस्य आहेत अशा मागासवर्गीय आणि मागास वर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भुमिहीन व्यक्तीच्या सहकारी संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक,  इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत त्या गावाच्या बाहेरील भूमिहीन लोक, त्याव्यतिरिक्त इतर स्थानिक भूमिधारक.

 

 

 

अर्ज येथे करावा

उपलब्ध होणा-या गाळपेर जमिनीचा तपशील, मूळ मालकनिहाय यादी व 100 रू.च्या स्टॅम्पपेपरवर करावयाचा करारनामा व अर्जाचे प्रारूप मोर्शी येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्र. 1 येथे उपविभागीय अभियंता कार्यालयात उपलब्ध आहे. हे प्रारूप मिळवून त्यानुसार अर्ज व करारनामा त्याच कार्यालयात दि. 31 जुलैपूर्वी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 पात्र अर्जदार असलेल्या प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त 1.2 हेक्टर जमिन भाडेपट्टीवर देण्यात येईल. तथापि, कुटूंबप्रमुख सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास त्याला मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 नुसार जास्तीत जास्त 1.6 हे. इतकी जमीन मिळू शकेल. एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति 11 महिन्यासाठी प्रतिहेक्टरी दोन हजार रू. व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी एक हजार रूपये भरणे अनिवार्य राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

 

00000

Friday, July 1, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

 



जिल्हाधिकारी कार्यालयात

वसंतराव नाईक यांना अभिवादन

 

             अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राच्या कृषिक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक उमेश खोडके यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी किशोर चेडे नाझर, अमोल दांडगे, गंगाधर काकडे उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

00000

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे

 


विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचा शुभारंभ

  अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट

-         जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे

 

अमरावती, दि. 1: जिल्ह्यात 1 ते 15 जुलैदरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले असून, त्याचा शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या उपस्थितीत जिल्हा रूग्णालयात झाला. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, घरोघर बालकांना झिंक व ओआरएसचे वाटप करण्यात येणार आहे, असे डॉ. निरवणे यांनी यावेळी सांगितले.

प्र. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत घोडाम, नेत्र तज्ज्ञ डॉ. कांचन जवंजाळ, अधिसेविका ललिता अटाळकर, आहार तज्ज्ञ कविता देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   

अतिसार किंवा डायरिया आजार हा पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. देशातील पाच वर्षांखालील बालकांच्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 7 टक्के मृत्यू अतिसाराने होतात. आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे म्हणून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. कोविड-19 प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून व अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर ठेवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम सर्वदूर राबवला जात आहे.

उपक्रमात अतिसार व्यवस्थापनासाठी जागरूकता निर्माण करणे, ओआरएस- झिंक कॉर्नरची स्थापना, पाच वर्षांखालील मुले असलेल्या कुटुंबांना ओआरएस, झिंकचे वाटप करणे व स्वच्छताविषयक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे डॉ. निरवणे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य परिचारिका कविता ढोबळे यांनी प्रास्ताविक केले. समुपदेशक उद्धव जुकरे यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा वानखडे, प्रकाश वानखडे, संजू डहाळे, संतोष चावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

0000

 

 

 

 

 

वनमहोत्सवानिमित्त वडाळी वनपरिक्षेत्रात वृक्षारोपणाचा शुभारंभ

 


वनमहोत्सवानिमित्त वडाळी  वनपरिक्षेत्रात 

वृक्षारोपणाचा शुभारंभ

 

        अमरावती, दि. 1 : येथील वन प्रादेशिक विभागातर्फे पाच परिक्षेत्रात 2 लाखांहून अधिक वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ वनसंरक्षक (भावसे) जी. के. अनारसे यांच्या हस्ते झाला.

वनविभागातर्फे 1 ते 7 जुलै दरम्यान वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात अमरावती प्रादेशिक कार्यालयांतर्गत वडाळी, मोर्शी, वरूड, परतवाडा, चांदूर रेल्वे या परिक्षेत्रांत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले  आहेत. वडाळी परिक्षेत्रात वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला. वनसंरक्षक श्री. अनारसे यांच्यासह विभागीय वनाधिकारी (दक्षता) व्ही. जी. डेहणकर, सहायक वनसंरक्षक लीना आदे, वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे आदी यावेळी उपस्थित होते.  

वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपणाबरोबरच वनांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रात्यक्षिकांचे कार्यक्रमही घेण्यात येत आहेत. अमरावती प्रादेशिक वनवृत्तातर्फे 239 हेक्टरमध्ये 2 लाख 66 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, कुरण विकास कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे, असे वनसंरक्षक श्री. अनारसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना  प्रात्यक्षिकातून वनांचे महत्व व वनमहोत्सव उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.

वृक्षारोपणात कडूलिंब, पिंपळ, वड, सागवान, बेहडा, शिसव, पापडा, बांबू अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. वनवृत्तातील पाचही परिक्षेत्रात बहुविध वृक्ष प्रजातींचे वनक्षेत्र या उपक्रमातून निर्माण होणार आहे.  या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ई-केवायसी गती वाढवावी - जिल्हाधिकारी  दै. दिव्य मराठी #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट...