Sunday, August 2, 2020

कृषी विभागाकडून शेतमजूरांना कौशल्याधारित प्रशिक्षण

कृषी विभागाकडून शेतमजूरांना कौशल्याधारित प्रशिक्षण


जिल्ह्यात सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत

        -  पालकमंत्री यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 20:  शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून राज्यातील सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाकडून ठेवण्यात आले आहे. त्याचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतमजूर बांधवाना लाभ मिळण्यासाठी सर्वदूर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

          पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्याने कपाशी आदी प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण  शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आहे. त्याची सर्वत्र  अंमलबजावणी व्हावी. प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र देखील देण्याची तरतूद आहे.

 

सद्यस्थितीमध्ये कापूस व मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठया प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाऱ्या मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरुन किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाणार आहे.

 

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सुक्ष्म सिंचनाची देखभाल दुरूस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  

शेतमजूरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापुर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 

शेतीशाळा व विविध माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यासाठी नियोजन करण्यात त्यात आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली. प्रशिक्षणाबाबत  जिल्हयातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या समन्वयातून  प्रशिक्षण कार्यक्रम सर्वत्र घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 28.07.2026

  विधी जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर     अमरावती, दि. 28 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण या...