Monday, April 2, 2018

सार्वजनिक वितरण जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठकीत चर्चा
     शिधापत्रिका आधार जोडणीच्या कामाला गती द्यावी
                            -जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 2 : शिधापत्रिकाधारकांच्या आधार कार्ड जोडणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत पुरवठा अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन माहिती घेवून त्या दूर कराव्यात तसेच कुणीही गरजू व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
                    
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे एस.एच.पतंगे, अशासकीय सदस्य गंगाताई खारकर, प्रभाताई आकरे, विनोद तानवैस, शिरिष मढावी, पवनकुमार वसू आदी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, आधार पडताळणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर प्रत्यक्ष भेटी देऊन तात्काळ तोडगा काढावा, जेणेकरुन गरजू व्यक्ती धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये. सर्व गावांमध्ये देखरेख समित्यांची स्थापना झाली पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करावेत व या कामाची यादी सादर करावी.  समित्यांच्या बैठका नियमित व्हाव्यात. तूरडाळ वाटपाचे परिमाण मागणी तेवढा पुरवठा असे निश्चित केले आहे. त्यामुळे तूरडाळ सर्वत्र उपलब्ध असण्याची दक्षता घ्यावी. गॅस स्टॅम्पिंगची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी. उज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस जोडण्यांची वितरकनिहाय आकडेवारी सादर करावी. आवश्यक तेथे गोदामाची दुरुस्ती करुन घ्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएलमधे या तिन्ही गटात एफसीआयकडून 100 टक्के उचल होत असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री. टाकसाळे म्हणाले की, जिल्ह्यात 1 हजार 84 दक्षता समित्या स्थापन झाल्या असून फेब्रुवारीत 308 बैठका घेण्यात आल्या. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केरोसिन परवानाधारकांच्या 327 तपासण्या करण्यात आल्या. 2 दोषी परवानाधारकांवर कारवाई करुन 18 हजार दंड वसूल करण्यात आला.
लोकशाही दिन सभेत 4 प्रकरणांवर सुनावणी
लोकशाही दिन सभेत 2 नवीन व 2 प्रलंबित तक्रारींची सुनावणी घेण्यात आली. दोन तक्रारी जिल्हापरिषदेशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरले. नव्याने प्राप्त 10 प्रकरणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी स्वीकारली. या निवेदनांवर कार्यालय प्रमुखांनी तातडीने कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. महसूल विभागाशी संबंधित 3 पैकी 1 प्रकरण निकाली व 2 प्रलंबित ठेवण्यात आले. नांदगाव खंडेश्वर नगर परिषद व महावितरण यांच्याशी संबंधित प्रत्येकी 1 प्रकरण निकाली काढण्यात आले.                                           
00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...