4 कोटी वृक्षलागवड अभियानाची पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात
| |
लोकसहभागातून 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण होईल
- पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
| |
- जिल्ह्यात आठवडाभरात लावणार साडेआठ लाख झाडे
- वृक्षलागवड कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 हून अधिक यंत्रणांचा सहभाग
- जिल्ह्यात 22 लाख रोपे उपलब्ध
- जिल्ह्यात सुमारे 30 हजारापेक्षा अधिक लोकांची हरित सेना नोंदणी पूर्ण
| |
अमरावती, दि. 1 : वन विभागाने गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत 2 कोटींहून अधिक झाडे लावण्याचे कार्य लोकसहभागातून पूर्ण झाले. त्यामुळे यंदा 4 कोटी झाडे लावण्याचा निर्धार शासनाने केला व त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा राज्यात चार कोटींहून अधिक वृक्षारोपण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
वनविभागातर्फे चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वडाळी राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपणाद्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, मुख्य वनसंरक्षक डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी –कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनिश्चित पर्जन्यमान, प्रदूषण, वन्यजीवांनी जंगल सोडून शहरात शिरणे अशा विपरीत गोष्टींवर वनांच्या निर्मितीतून मात करता येईल. त्यासाठी वनविभागाकडून चांगले प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी या कार्यात अधिकाधिक योगदान दिले पाहिजे.
श्री. अडसूळ म्हणाले की, शासनाच्या गतवर्षीच्या अभियानातील वृक्षलागवडीतील 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली. अभियानातून मोठे वनक्षेत्र निर्माण होत आहे, हे सुचिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन घरोघरी गॅस उपलब्ध करुन देण्यासारखे अनेकानेक लोकहिताचे व पर्यावरणपूरक निर्णय घेत आहे.
जनतेच्या मनात वृक्षलागवड करण्याची मानसिकता निर्माण करणे व ती जीवनपद्धतीचा भाग बनविणे, हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे, असे श्री. बांगर यांनी सांगितले. उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण वनसंरक्षक रवींद्र वानखडे, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनराईचे विश्वस्त मधुभाऊ घारड, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
उत्कृष्ट कर्मचा-यांचा सत्कार
जंगलात पाण्यासाठी फिरणारी बिबट्याची मादी व दोन बछड्यांसाठी स्वयंप्रयत्नातून पाणवठा निर्माण करणा-या वन कर्मचारी श्री. कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचारी नरेंद्र कछुवाह यांचाही सत्कार झाला.
जिल्ह्यात दि. 7 जुलैपर्यंत सुमारे साडेआठ लाखांहून अधिक झाडे लावण्यास सुरुवात झाली असून, त्यानुसार खड्डे, रोपवाटप आदी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विभागाकडे 22 लाख रोपे उपलब्ध असून, यंदा 10 लाख रोपे लागवडीसाठी देण्यात येत आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रात 25 हेक्टर जागेत 27500 झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे.
| |
शिवटेकडीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
| |
महापालिकेच्या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते शिवटेकडीवर वृक्षारोपणाद्वारे झाली. यावेळी खासदार श्री. अडसूळ, आयुक्त श्री. पवार आदी उपस्थित होते.
| |
00000
| |
15 Attachments






















































