Wednesday, July 24, 2019

खरीप हंगाम: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 29 जुलै पर्यंन्त मुदतवाढ - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे



मुंबई, दि. 24: खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होता यावे यासाठी दि. 29 जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती  कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिली.
       योजनेत सहभागी होण्यासाठी  बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी  विहित मुदतीपुर्वी नजिकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.
याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.
00000

Tuesday, July 23, 2019

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर येथील जागा निश्चित - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे



मुंबई, दि. 23 : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असून कोंडेश्वर येथील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.बोंडे बोलत होते.
`अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोंडेश्वर येथील जागा निश्चित झाली असून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देशही डॉ.बोंडे यांनी दिले.

वाळलेल्या संत्रा झाडांना अनुदान

ज्या शेतकऱ्यांचे संत्र्यांचे झाड पाण्याअभावी वाळून गेले असेल अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत मदत देण्यात येणार आहे, असेही डॉ.बोंडे यांनी सांगितले.
यावेळी सर्वश्री आमदार रवी राणा, रमेश बुंदिले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव कि.म. जकाते, अर्थतज्ज्ञ मनीष घोटे आणि अमरावती येथून किरण पातूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.

00000

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी एका आठवड्यात समिती गठीत करा - कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे



मुंबई, दि. २३ :- अमरावती येथील मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापठाची स्थापना करण्यासाठी एका आठवड्यात समिती गठीत करा, असे निर्देश कृषिमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी दिले.
मंत्रालयात आज रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव धकाते, अखिल भारतीय महानुभाव महामंडळाच्या अध्यक्षा अॅड तृप्ती बोरकुटे, उपाध्यक्ष रमेश आमदारे, महासचिव उमेश ठाकरे त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना पालकमंत्री डॉ बोंडे म्हणाले, रिद्धपुरमध्ये मराठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी गठीत केलेली समिती रिद्धपुर येथे भेट देऊन उपलब्ध जागा व मान्यतेसाठी आवश्यक इतर बाबींची पूर्तता करून अहवाल सादर करणार आहे. मागील वर्षी उच्च तंत्र शिक्षण सचिव स्तरीय समितीने रिद्धपुरमध्ये भेट देऊन अहवाल तयार केला होता. त्या समितीचा प्राप्त अहवाल ग्राह्य धरून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.  मराठी विद्यापीठ स्थापनेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
00000

Monday, July 22, 2019

'जय महाराष्ट्र' व दिलखुलास' मध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे


मुंबई,दि 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रव 'दिलखुलासकार्यक्रमात 'आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध शेती'या विषयावर कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि. 23 जुलै रोजी संध्याकाळी 7.30वाजता प्रसारित होणार आहे. तसेच 'दिलखुलास'  या कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर  बुधवार दि.24, गुरूवार दि.25 व  शुक्रवार दि. 26 जुलै 2019 रोजी सकाळी 7:25 ते 7 :40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खरीप हंगाम पेरणीपीक कर्जपुरवठा बाबत माहितीखरीप हंगामासाठी बी-बियाणेखताबाबत  नियोजनशेतीशाळांचा उपक्रमकृषी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच कृषी विभागामार्फत खतेबियाणेशेतीचं  यांत्रिकीकरणपीक विमा योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.बोंडे यांनी 'जय महाराष्ट्रव  'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

राज्यातील पहिल्या स्फुरद समृद्ध खत निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन एका वर्षात उत्पादन सुरू करावे - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे








अमरावती, दि. २२ : प्रॉम खत निर्मिती कारखान्यामुळे जैविक खत निर्मितीसह पर्यावरणही जपले जाईल व रोजगारालाही चालना मिळेल. एका वर्षात हा कारखान्यातून उत्पादन सुरू व्हावे, असे निर्देश  राज्याचे कृषी मंत्री तथा राज्य कृषी उद्योग महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आज मायवाडी येथे दिले.

मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे संत्रा प्रक्रिया केंद्रात महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कृषी उद्योग प्रॉम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर) व निंबोळी अर्क/ पेंड प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम , श्रीमती वसुधाताई बोंडे, महामंडळाचे संचालक पियूष कारंजकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राह्मणकर   , उद्योजक संजय जाधव  आदी उपस्थित होते.   प्रारंभी कृषी मंत्र्यांनी ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिक पाहणी केली. 

डॉ. बोंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली. हा केवळ माझा नसून मोर्शी वरुडमधल्या जनतेचा बहुमान आहे. कृषी क्षेत्रातील विविध बाबींच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आदी शेतकरी हिताचे अनेक निर्णय राबविण्यात येत आहेत. 

संत्रा प्रक्रिया उद्योग ठाणाठूनी येथे उभारण्यात आला असून लवकरच तिथे उत्पादन सुरू होऊन त्यासाठी ३०० टन संत्रा वापरला जाणार आहे. संत्रा उत्पादक  शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिसरात मत्स्य विज्ञान महाविद्यालय लवकरच सुरू होत आहे. कृषी आणि फलोत्पादन विज्ञान महाविद्यालय आणण्याचा प्रयत्न आहे. गव्हाण कुंडला सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. 
शासनाकडून सिंचनाचे प्रमाण वाढविणे, ते पाणी शेतापर्यंत नेणे आणि ठिबक आदी अद्यावत सिंचन प्रणालीद्वारे पाणी पिकाला देणे व पिकाची उत्पादकता वाढवणे आदी समग्र विचार करून विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत, असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, खतांच्या अतिरिक्त वापराने जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे जैविक खते वापरणे हा चांगला उपाय आहे. प्रोम हे खत केवळ ६५० रुपयात दिले जाईल. पर्यावरणाला पूरक अशी निर्मिती आहे. यापुढे असे कारखाने ठिकठिकाणी उभारण्यात येतील. 
निंबोलीपासून अर्क, तेल काढण्याचा आणि त्यापासून कीटनाशकाचा कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 


प्रगतीशील शेतकरी बांधवांचा सत्कार यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते झाला.

कृषी उद्योग महामंडळाचा राज्यातील पहिला स्फुरदसमृद्ध सेंद्रिय खत (प्रॉम) कारखाना मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे सुरू होणार आहे. 

            कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत राज्य कृषी उद्योग महामंडळातर्फे हा कारखाना उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतक-यांना जैविक खतांचा वापर करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या दृष्टीने स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे.

            प्रॉम या सेंद्रिय खतामध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म मुलद्रव्यांसह जमीनीतील जीवाणूंना आवश्यक असणारे सेंद्रिय कार्बन असतो. प्रॉम खतामुळे अल्कधर्मी व आम्लधर्मी अशा दोन्ही प्रकारच्या सामूचा (पीएच) समतोल (न्यूट्रलायझेशन) साधला जातो. त्यामुळे या खतनिर्मितीचा कारखाना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उद्योग महामंडळाची 1965 पासून दर्जेदार उत्पादनांची मालिका आहे. प्रॉम खताच्या निर्मितीमुळे या मालिकेत भर पडणार आहे.
---------
**प्रॉम वैशिष्ट्य
 
- हे खत नियमन अध्यादेशानुसार मान्यताप्राप्त
-जैविक, भौतिक व रासायनिक सुपीकता वाढते.
-अन्नद्रव्यांसह सेंद्रिय कर्ब हा घटकही असतो.
-खत व त्यातील तत्वांचे जमिनीत विरघळण्याचे १०० टक्के प्रमाण
- जमिनीत सामुचे योग्य प्रमाण राखले जाते.

Saturday, July 20, 2019

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाची भेट

            मुंबई, दि. 20 :- भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रिय  कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी देखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात अर्जेंटिनाचे कृषीउद्योग सचिव डॉ. ल्युईस ईचलव्हेअर यांच्या समवेत पाच जणांच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
            ते म्हणाले, भारतात रासायनिक कीटकनाशकासाठी उत्तम पर्याय म्हणून कडुनिंबाचा वापर करण्यात येतो. त्याचा अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण दोन्ही देशातील शेतीशी निगडित विविध पद्धतींचे अवलोकन करून त्यांची देवाणघेवाण केली तर त्याचा दोन्ही देशांना नक्कीच फायदा होईल.
दोन्ही देशातील हंगामी शेती उत्पादन वेगवेगळ्या कालावधीत होते. जेव्हा एखादा हंगाम संपतो त्यावेळी निर्यातीच्या माध्यमातून दोन्ही देशात दर्जेदार हंगामी फळे, अन्नधान्य,तेलबिया, बियाणे उपलब्ध होऊ शकतात. या माध्यमातून दोन्ही देशातील शेती व्यवसायास चालना मिळेल व हंगामी फळे व इतर उत्पादन वर्षभर उपलब्ध होतील, असा विश्वास अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केला. अशा शेती उत्पादनांची यादी बनवून आपण याबाबत लवकरच प्रस्ताव सादर करू व राज्यातील आंबा, केळी व डाळींब या फळांच्या निर्यातीबाबत आपण सकारात्मक असल्याचेही शिष्टमंडळाच्या सदस्यांनी सांगितले.
या भेटी दरम्यान अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने शेती उत्पादन साठविण्याच्या पद्धती, उत्कृष्ट दर्जाच्या बियाणांची उपलब्धता, सेंद्रिय कीटकनाशके व दोन्ही देशांचे हंगामी उत्पादन याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण केली. व त्यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित सामंजस्य करार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत ही चर्चा केली. या माध्यमातून दोन्ही देशातील कृषी व्यवसायास चालना मिळण्यास मदत होईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयाम, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, महानंद डेअरीचे महाव्यस्थापक एम व्ही चौधरी, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक जी सी मंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे (राजशिष्टाचार) श्रीधर देशमुख त्याचबरोबर कृषि व पदुम विभाग, दुग्धव्यवसाय,मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Thursday, July 18, 2019

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे


कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.
            येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांची कृषी विषयक योजनांची सविस्तर आढावा बैठक कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी आज घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
            विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे यांनी संगणकीय सादरीकरण करून विविध योजनांची माहिती दिली. कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले, जिल्ह्यातील जमिनींची प्रत टिकवू
न ठेवण्यासाठी मृद संधारणाचे काम हाती घ्यावे. कृषी विद्यापीठ,कृषी विभाग, साखर आयुक्तालय, साखर कारखाने या सर्वांनी एकत्र येवून मृद संधारणाचा आराखडा तयार करावा. यामध्ये100 टक्के ठिबकवर शेती, शेतीचा फेरपालट, जमिनीत कर्ब कायम ठेवण्यासाठी उपाययोजनांचा समावेश करा. हा आराखडा कृषी मंत्रालयाला सादर करा.
            विषमुक्त अन्न निर्माण करण्याच शासनाच धोरण आहे. त्यासाठी जे शेतकरी सेंद्रीय पध्दतीत शेती करतील अशांना निश्चितपणे शासन पाठबळ देणार आहे असून डॉ. बोंडे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खते पुरवणाऱ्या कंपन्यांविरोधात जे शेतकरी ग्राहक न्यायालयात गेले आहेत अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा. विविध योजनांचा लाभ विशेषत: पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून द्यावेत त्यासाठी विमा कंपन्यांकडे प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांबाबत पाठपुरावा करावा. सहकारी साखर कारखाने,इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यावा. जनतेच्या आणि देशाच्या दृष्टिने फायदेशीर आहे.
            कृषी सहाय्यकांनी ग्रामपंचायतीमध्ये बसाव. अशा निर्देशाचं ग्राम विकास सचिवांचे चार वर्षापूर्वीचे पत्र आहे. कृषी सहाय्यक याच पालन करतायत की नाही, तो गावात भेटी देतो की नाही याबाबत अहवाल सादर करावा. ग्रामपंचायतीमध्ये बसणाऱ्या कृषी सहाय्यकाचा सत्कार करू असेही ते शेवटी म्हणाले.
            क्षारपड झालेल्या जमिनींसाठी कार्यक्रम घ्यावा आणि कृषी औजार बँकेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार महाडिक यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सहनिबंधक अरूण काकडे यांनी माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी स्वागत तर विभागीय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...