Thursday, August 29, 2019

गणपती विसर्जनासाठी शहरात 50 कृत्रिम तलाव



              पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
            अमरावती, दि. 29 : छत्री तलाव, वडाळी तलाव येथे गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरात प्रमुख चौकांत गणपती विसर्जनासाठी 50 कृत्रिम तलाव तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एन. चव्हाण, एस. ए. उमाळे डॉ. अरुण लोहकपुरे, अन्न व औषधे सहायक आयुक्त स. दे. केदारे, पोलीस निरीक्षक निलिमा आरज आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवात माती, शाडूच्या मूर्तीचा वापर होण्याबाबत महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेकडून नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करावे. यासाठी महापालिकेच्या कचरा संकलन गाड्यांवरील ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणेही शक्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा र्‌हास होतो. त्यामुळे माती व शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जागृती व्हावी. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूकांच्या मार्गावरील वीजेच्या तारा लोंबकळत असतील तर तत्काळ दुरुस्ती करावी.  सर्व पथदिवे सुरु राहण्याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी. 31 ऑगस्टपूर्वी हे काम झाले पाहिजे.  नादुरुस्त रस्त्यांमुळे मिरवणुकीत अडथळा आल्यास संबंधित यंत्रणा व अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
            मद्यप्राशन करुन वाहने चालविणा-यांवर सक्त कार्यवाही करावी. त्यासाठी चौकाचौकात पथक निर्माण करावे. गणेशोत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
                                                000 

ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन शहर विकासासाठी नव्या उद्योगांना चालना - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 29 : महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, अमरावती शहराच्या विकासासाठी  नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी आज येथे सांगितले.

महापालिकेच्या तारखेडा येथील ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयारपक्षनेता सुनील काळे, गोपाळ धर्माळे, प्रमिलाताई जाधव, आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ट्रक टर्मिनेस व व्यापारी संकुल शहराच्या विकासात योगदान देणारे ठरेल. शहरात टेक्सटाईल पार्कसाठी नव्याने चारशे हेक्टर जागा मिळविण्यात येत असून, नव्या उद्योगांना चालना देण्यात येईल. शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. नागरी आरोग्य सेवेत प्रत्येक झोनमध्ये चांगली रुग्णालये हवीत. शहरात प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत चांगली राबवली जात आहे. डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे अकोली बायपासचे काम होत आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे विदर्भात मोठा निधी मिळाला आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्री. सागर म्हणाले की, ट्रक टर्मिनसचे काम अभिनव व अत्यंत सुंदर झाले आहे. विकासाच्या प्रक्रियेत, अनेक सेवांमध्ये ट्रक चालकांच मोठे योगदान असते. या घटकाची जाणीव ठेवून हे काम केले, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रकारचा ट्रक टर्मिनस इतरत्र मी पाहिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका व इतरही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना इथे पाहणी करण्यासाठी आणण्यात येईल. इतर शहरातही असे टर्मिनस उभारण्यास निश्चित मदत करू, असेही ते म्हणाले.
डॉ. देशमुख म्हणाले की, एकेकाळी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड व मोठे अतिक्रमण होते. शहरात ट्रकचे अनधिकृत पार्किंग होत होते. ट्रक चोरीचे प्रकार घडत होते. आज ट्रक टर्मिनस व व्यापारी संकुल उभे राहिल्यामुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे. विदर्भातील पहिले ट्रक टर्मिनस अमरावतीत आकारास आले आहे.
जिल्ह्यातील इतर शहरातही या प्रमाणे टर्मिनस व  अद्ययावत कचरा निर्मूलन प्रकल्प व्हावेत,अशी अपेक्षा खासदार श्रीमती राणा यांनी व्यक्त केली.
संकुलात 192 गाळे आहेत. वाहनतळासह चालकांसाठी उपाहारगृह, प्रसाधनगृह आदी सुविधा आहेत, असे आयुक्त श्री. निपाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
          000. 

वरुड नप प्रशासकीय इमारत व जलतरण तलावाचे लोकार्पण जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. २९ : उत्तम पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी व वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनाने भर दिल्याने जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन 
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले. 
नगर परिषद वरुड कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा व जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगराध्यक्ष स्वाती आंडे, वसुधाताई बोंडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

         पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, वरुड, मोर्शी व शेंदूरजना घाट या तिन्ही नगरपालिका भविष्यात आदर्श ठराव्यात, अशी आदर्श कामे आकारास येत आहेत.  आदर्श पालिकेचे निकष पूर्ण होत आहेत. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारख्या उपक्रमाचे प्रस्ताव आहेत.

शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. परिसरात कृषी विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रकल्प आकारास येत आहे. ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक रस्ते तयार होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी होऊन संत्रा, शेतीमाल वाशीसारख्या मोठया बाजारपेठेत पोहचवणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

       श्री. सागर म्हणाले की, इमारत व जलतरण तलावाचे काम तीन वर्षात पूर्ण झाले. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात अनेक कामे होत आहेत. नगरविकास विभागाने १५ कोटी रुपये वरुड शहरासाठी दिले आहेत. रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
       वरूडची हद्दवाढ झाल्याने नव्या परिसरात विकासकामांसाठी १२ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे श्रीमती आंडे यांनी सांगितले.
        इमारतीसाठी ५ कोटी व जलतरण तलावासाठी ३ कोटी रू. निधी मिळाला. दोन्ही प्रकल्प वरुड नगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत, असे श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे, विविध बचत गटांना निधी वाटप यावेळी झाले.
        ०००

महाराष्ट्रावर बोलू काही नियोजनभवनात भरली विद्यार्थ्यांची संसद !


                                                




अमरावती, दि. 28 : अनेक विषय, शेकडो मुद्दे, तरूणांची व्यक्त होण्याची चढाओढ व ऊर्जा,  त्यातून होणारे विचारमंथन याची अनुभूती मंगळवारी उपस्थितांना आली. ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी- विद्यार्थिनींची संसदच नियोजनभवनात भरली होती.   
 क्रीडा व शालेय शिक्षण विभागातर्फे युवा सांसद व महाराष्ट्रावर बोलू काही वक्तृत्व स्पर्धा नियोजनभवनात झाली. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. देवीलाल ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता, रस्तेविकास, पीक विमा अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आज उपस्थितांना जिंकून घेतले. युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी युवा छात्र सांसद उपक्रम घेण्यात आला. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम महाविद्यालय स्तरावर, नंतर तालुका स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. तालुका स्तरावर निवड झालेल्या 42 विद्यार्थ्यांनी जिल्हा स्पर्धेत भाग घेतला, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
                                                गायत्री हरणे जिल्ह्यातून प्रथम
या स्पर्धेत अंजनगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई दाभाडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री हरणे हिने पहिला, लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू महाविद्यालयाच्या नेहा परवीन अब्दुल गफ्फार हिने दुसरा व वरुडच्या जागृती महाविद्यालयाच्या निमिषा पारेखने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे दहा, सात व पाच हजार रूपये बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा स्पर्धेत निवड झालेल्या या तिन्ही विद्यार्थ्यांना मुंबईत विधीमंडळात 30 व 31 रोजी होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. डॉ. पी. डब्ल्यू. पानतावणे, डॉ. सुरेश बनसोड, डॉ. एस. व्ही. पडघन यांनी परीक्षण केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. उमेश बडवे, संजय कथळकर, भास्कर घटाळे, संतोष विघ्ने, अनिल बोरवार, शुभम मोहतुरे, शेख अकिल, वैभव पातुर्डे, संजय तांबे यांनी सहकार्य केले.
                                    000

चंदन व औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कोट्यावधींच्या प्रलंबीत अनुदानाचा मार्ग मोकळा केला - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे


केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे कोट्यावधी रूपयांचे अनुदान मागील दोन वर्षांपासून प्रलंबीत राहीले होते. कृषीमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यावर या बाबत माहिती मिळताच कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान वाटपाचे निर्देश दिल्यामुळे हे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री डॉ. बोंडे यांना चंदनाची रोपे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर व वरूडचे सामाजिक कार्यकर्ते बाळू मुरूमकर उपस्थित होते. 

यावेळी कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, राज्यात पान पिंपरी, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच राज्यातील काही भागात चंदनाचे देखील उत्पादन घेतले जाते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.  चंदन व औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी केंद्र शासनाच्या आयुष अभियानांतर्गत प्रति हेक्टरी 58 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.  मात्र दोन वर्षांपासून हे अनुदान प्रलंबित राहीले होते. या शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याचा चंदन व औषधी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चंदनाची व औषधी वनस्पतींची उत्कृष्ट दर्जाची रोपे देखील उपलब्ध होतील असा विश्वास ही कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
अहमदनगर जिल्ह्यतील चंदन व फळझाडे उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर, पत्रकार विनायक गोळे,  श्री विष्णू दरेकर, अमरावती जिल्हयातील शेतकरी सुभाष थोरात, विजय लांडोळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून कृषी मंत्री डॉ. बोंडे यांची याबाबत भेट घेतली होती. याबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांनी आज कृषीमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागृत करण्यासाठी क्रिडा संकुलाची निर्मिती - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन


क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी आठ कोटी
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
अमरावती, दि.29ग्रामीण भागातील मुलांमध्ये विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कणखरता, निडरता व जिद्द आदी गुण असतात. त्यांच्यातील खेळगुणांना वाव देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे, असे कृषीमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
येथील विद्यापीठ परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसळ, आमदार रवि राणा, जि.प.सदस्य संजय गुलाणे, नगरसेविका जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,अधिक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांचेसह क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ. बोंडे म्हणाले की, अमरावतीत विभागीय क्रीडा संकुल अस्तिवात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीतून शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी शासनाव्दारे 16 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून आठ कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाला देण्यात  आला आहे. त्याचा विनियोग झाल्यावर उर्वरित निधी दिला जाईल.
 ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ नेतृत्व समोर येण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आर्चरी रेंज निर्माण करण्यासाठी 5 कोटी 61 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात कबड्डी, खो-खो, धर्नुविद्या, लगोरी यासारख्या पारंपारिक खेळांना पुरस्कृत करण्यासोबतच नवीनतम ज्युदो, कराटे, मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सारख्या खेळांना मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापुढेही खेलो इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक खेळाप्रकाराला प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या अंतर्गत मोर्शीतून कबड्डी, ज्युदोसाठी दर्यापूर, आर्चरीसाठी नांदगावपेठ तर मेळघाटमध्ये ॲथलेटीक्स सारख्या क्रीडाप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात सेमाडोह ते मेळघाट अशी राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुलींना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी स्वयंसिध्दा उपक्रम शाळा-महाविद्यालयातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच हजार मुलींनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून एक लाख मुलींना कराटे, लाठीकाठी व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी पाच कोटी रुपये निधी खर्चुन जिल्हा व तालुकास्तरावर अभ्यासिकांचे निर्मिती करण्यात येणार आहे, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, प्रत्येकाने  विद्यार्थी दशेत असतांना नियमित अभ्यासासोबतच किमान एक तास मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सातत्य व जिद्द यासारखे गुण निर्माण होऊन त्यांचे मानसिक व शारीरिकरीत्या व्यक्तिमत्व विकास होईल. विद्यार्थ्यांनी संगणक, मोबाईलवर ऑनलाईन आभासी खेळ खेळण्यापेक्षा खरोखरचे मैदानी खेळ खेळावे. मुलांनी आभासी दुनियेत न वावरता खरोखरचे जीवनाचे सार जाणून देशावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकमात राज्य शासनाव्दारे पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरणपटू चेतन राऊत, नेटबॉलपटू कु. स्वाती कांडलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अरुण अडसळ व आमदार रवि राणा यांचेही समायोचित भाषणे झालीत.
जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांविषयी  क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. यावेळी शाळा- महाविद्यालयातील स्कॉउट गाईडचे व क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा
संरक्षक भिंत व प्रवेशव्दार, आर्चरी रेंज , जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल, विद्युतीकरण
अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.



Thursday, August 8, 2019

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे




मुंबई, दि 08 : शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात बनावट खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अधिक कडक करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
नमुना तपासणी प्रक्रिया अधिक जलद व सक्षम
खते व कीटकनाशकांचा पहिला नमुना पंधरा दिवसांमध्ये तपासून अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्याचबरोबर पहील्या नमुना गुणवत्तेनुसार अपात्र ठरल्यास दुसरी नमुना तपासणी व अहवाल प्रक्रिया साठ दिवसांमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील. यांमध्ये दोन्ही नमुना तपासणी प्रक्रियांमध्ये निर्देशित टक्केवारीनुसार गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळून आल्यास उत्पादन व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तीवर निरीक्षकाद्वारे (इन्स्पेक्टर) गुन्हा दाखल करण्यात येईल. हा गुन्हा दाखल करण्यासाठी कृषी सहसंचालकांना पंधरा दिवसांच्या आत परवानगी देणे बंधनकारक करण्यात येईल.  नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी व तपासणी प्रक्रिया सुलभ व जलद होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे तसेच कृषी विद्यापीठांना अधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव सादर करा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
डॉ.बोंडे म्हणाले, प्रथम गुणवत्ता नमुना तपासणी शुल्क हा कंपनी परवाना नोंदणीवेळी आकारण्यात येणार आहे. खतांच्या व कीटकनाशकांच्या पाकीटावर नमूद केलेल्या व प्रत्यक्षातील वजनामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विक्रेत्यांना इलेक्ट्रॉनिक वजनकाटा ठेवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. बिगर नोंदणीकृत खते व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.  शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण खते, कीटकनाशके व बी-बियाणे  उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या बैठकीस, कृषी आयुक्त सुहास दिवसे, कृषी सहसचिव गणेश पाटील, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे संचालक श्री घावटे, तसेच कृषी विभागाचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...