Saturday, August 31, 2019

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक शेतीची गरज - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

 कृषी मंत्र्यांचा श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद
                   




अमरावती, दि. 31 :  रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत घसरून उत्पादनक्षमता कमी होत आहे. त्यामुळे जैविक शेतीचा अवलंब होण्याची गरज आहे, असे पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी हातुर्णा येथे सांगितले.
  महर्षी अरविंद फौंडेशन व इथिक सायन्स फौंडेशनतर्फे हातुर्णा येथे श्रीलंकेतील 27 शेतकरी बांधवांसाठी पारंपरिक व जैविक शेतीपद्धती कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्याला उपस्थित राहून कृषी मंत्र्यांनी श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद साधला. श्रीलंकेतील कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्रीमती सुजीवा, फौंडेशनचे अध्यक्ष गज अरविंदजी, श्रीमती वसुधाताई बोंडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक कीटकनाशके, बियाण्याचा मोठा वापर झाला. त्याची परिणती जमिनीचा पोत घसरण्यात झाली. त्यामुळे उत्पादनक्षमताही कमी झाली. ही स्थिती सुधारण्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत पीक काढल्यानंतर घरी बियाणे काढून ठेवले जायचे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातही अनेक ठिकाणी अजूनही घरी उत्पादित  बियाणे वापरले जाते. जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणे व निसर्गाला अनुकूल पीकपद्धतीसाठी जैविक शेतीचा अवलंब व्हावा.
प्रा. सुजीवा म्हणाल्या की, भारत व श्रीलंकेतील सौहार्दपूर्ण संबंध प्राचीन आहेत. दोन्ही संस्कृतींत मोठे साम्य आहे. हे संबंध दृढ करण्याठी दोन्ही देशांनी जैविक शेतीसाठी संयुक्त शेतीविषयक कार्यशाळा घ्यावी. पृथ्वीतलावरील समस्त सजीवांसाठी जैविक शेतीचा अवलंब आवश्यक आहे.
यावेळी परिसरातूनही अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

फळपीकासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले वाणच लावावे - कृषी विभागाचे आवाहन




अमरावती, दि. 31 : फळपीकाची लागवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणाचीच लागवड व्हावी. अन्य वाण लावल्यास फळधारणा न होण्याचा धोका होऊ शकतो, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चांगल्या उत्पन्नाचा स्त्रेात म्हणू राज्यात शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे मोठया प्रमाणावरवळत आहेत. तथापि, सुरुवातीच्या 3-5 वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागत असुन जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत खात्री नसते.
        राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधुन कृषि विद्यापीठांनी शिफारस  केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अवास्तव स्वरुपाचीप्रचार प्रसिद्धी करुन खरेदीची भुरळ घातली जात आहे.   कृषि विदयापीठांनी शिफारस केली नसल्यास अशावाणांच्या गुणवत्तेबाबत साशंकता असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागूशकते.
        या पार्श्वभुमीवर, सीताफळ तसेच इतर सर्व फळपिकाकरिता कृषि विदयापीठांनी शिफारस केलेल्यावाणांचाच वापर करावा. द्य:स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या ज्या फळपिक वाणाची कृषिविदयापीठांनी शिफारस केलेली नाही अशा वाणांचा शेतकरी बांधवानी वापर करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                000

प्रशिक्षणाबरोबर कर्जपुरवठा व विपणनासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

 ‘महाबँके’तर्फे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

               





अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात स्वयंरोजगारनिर्मितीसाठी शासन व बँकांच्या समन्वयातून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना चालना देण्यात आली आहे. हे काम केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याद्वारे उद्योग-व्यवसायाला कर्जपुरवठा व विपणनासाठी साह्य करण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरूड येथे केले.
            बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शासनाच्या सहकार्याने रोशनखेडा येथे मोटर रिवाइंडिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आला. त्यानिमित्त वरुडमध्ये दीनदयाळ उपाध्याय सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, मोर्शीचे नगराध्यक्ष अप्पासाहेब गेडाम, माजी नगराध्यक्ष पिंटुभाऊ सावरकर, विशाल सावरकर, अजय येते, क्षेत्रीय व्यवस्थापक नीतिन घारड आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, स्वयंरोजगार निर्मितीसाठी  केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमांना चालना दिली आहे. यात प्रशिक्षित झालेल्या नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला कर्जपुरवठा करणे, त्याच्या मालाचे मार्केटिंग करण्यासाठी साह्य करणे ही कामेही झाली पाहिजेत. त्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बँकेतर्फे व्यवसायासाठी मंजूर प्रकरणांच्या धनादेशांचे वाटपही करण्यात आले.  अरुणकुमार आठवले यांनी सूत्रसंचालन केले.
                                                000

Friday, August 30, 2019

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वरुडमध्ये पोळा साजरा शेतकरी-शेतमजूर बांधवांचा कृषी मंत्र्यांचा मनमोकळा संवाद


          अमरावती, दि. 30 : कृषी संस्कृतीत महन्मंगल मानला गेलेल्या पोळ्यानिमित्त आज कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वरुडनगरीचे ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात आयोजित पोळा उत्सवात उपस्थित राहून शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधला व सर्वांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
          वरुड येथील पोळा उत्सवाला मोठी परंपरा आहे. श्रीमती डॉ. वसुधाताई बोंडे, केदारेश्वर मंदिराचे सचिव श्रीपाद चांगदे, नंदकिशोर पनपालीया, निळकंठ आंडे, भाजप शहराध्यक्ष राजू सुपळे, पत्रकार गिरीधर देशमुख, पोलीस ठाणेदार मगन मेहत्रे, युवराज आंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          शंभरहून अधिक बैलजोड्यांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत तोरण तोडून उत्सवाचा आरंभ झाला. शेतकरी बांधवांनी विविध प्रकारची सजावट करुन बैल आणले होते. शेतकरी बांधवांत व नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. बैल सजावटीसाठी कृष्णराव वानखडे व तुषार बेलसरे यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. दुसरे पारितोषिक पंकज खेरडे व तिसरे राजूभाऊ ढोरे यांना देण्यात आले.
          यावेळी शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधत पालकमंत्री डॉ.बोंडे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सांगली, कोल्हापूर परिसरात महापुराचे नैसर्गिक संकट उद्भवले. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविरत काम करून शेतक व नागरिकांना दिलासा दिला. कृषी विकासासह पायाभूत सुविधांची अनेक कामे जिल्ह्यात होत आहेत. सध्या पावसाची स्थिती बरी असून सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झाल्यास धरणातील पाणी साठा निश्चित वाढेल. त्यामुळे भविष्यातही वरुण राज्याची कृपा व्हावी अशी प्रार्थनाही कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.   

गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत सुधारित प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे रेल्वेला निर्देश


अमरावती, दि. 31: गोपाळनगराजवळील भुयारी मार्गाबाबत रेल्वे अधिका-यांनी सुधारित प्रस्ताव दहा दिवसांत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.
            महापालिकेतर्फे गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत बैठक आज नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांच्यासह महापालिकेचे अनेक पदाधिकारी व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात स्थानिक रहिवासी यांची घरे व दुकाने प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे नकाशात बदल होण्याची मागणी आमदार श्री. राणा यांनी केली. या ठिकाणी यु टर्न मार्गाची रचना शक्य आहे. त्यानुसार स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन भुयारी मार्गाच्या नकाशात बदल करून घ्यावा व 10 दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   
जुनी वस्ती उड्डाणपूलानजिकच्या रेल्वे क्रॉसिंग व भुयारी मार्गाबाबत माहिती रेल्वे अधिका-यांनी सादर केली. 
                                                000

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




          अमरावती, दि. 30 : लोकशाहीर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडलाचे अध्यक्ष मधुकर कांबळे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहीत्य क्षेत्रात अतुलनीय काम केले आहे. त्यांचे हे काम समाजातील नागरिकांना पर्यंत पोहचण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्यासाठी स्मारक होणे आवश्यक आहे. 
          जिल्ह्यातील विद्यापीठ, तपोवन व  ए म आय डी सी च्या जागेवर स्मारक होऊ शकते, त्यामुळे या तीन जागेपैकी एक जागा कृती समितीने निश्चित करून परिपूर्ण प्रस्ताव शा सना ला सादर करावा असे डॉ. बोन्डे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून पुनर्वसनाचा आढावा




          अमरावती, दि 30 : प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित  पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार, (दि. 29 ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी निकषानुसार कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी दिले. ते म्हणाले की, निमन पेढी प्रकल्पात पाच गावातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पात्र कुटुंबाना घरे देण्याची कार्यवाही झाली आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित पाठपुरावा करू. त्यासाठी प्रस्ताव सादर करू. 
          निमन पेढी प्रकल्पात पुनर्वसनासाठी निकषाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. वासनी, सापन, निमन वर्धा आदी विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...