Thursday, January 2, 2020

‘आयटीआय’मध्ये क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ तणावमुक्तीसाठी नियमित खेळ आवश्यक - प्राचार्य अंजली ठाकरे








अमरावतीदि. 2 – धकाधकीच्या आजच्या जीवनात तणावांपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दैनंदिन वेळापत्रकात व्यायामखेळांचा समावेश असला पाहिजे. खेळांतून शरीर सुदृढ होण्यासह मानसिक सक्षमता व खिलाडू वृत्तीचा विकास होतोअसे श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात क्रीडा स्पर्धातंत्र प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सव 2020 चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अस्पा बंडसन्स ऑटोचे संचालक उद्योजक रणजीत बंडजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळेसहायक संचालक नरेंद्र येतेप्राचार्य मंगला देशमुखउपप्राचार्य आर. जी. चुलेटश्रीमती एम. आर. गुढेपी. जी. कुमरेनिदेशक बोधराज काळे आदी यावेळी उपस्थित होते.
                   श्री. बंड म्हणाले कीखेळांत हारजीत होतच असते पण प्रत्येकवेळी जिंकण्याच्या निर्धाराने खेळायचे असते. विद्यार्थ्यांत विजिगिषु वृत्तीचा विकास खेळांतून होतो.
स्पर्धेत व्हॉलीबॉलकबड्डीक्रिकेट आदी क्रीडा प्रकारांत जिल्ह्यातील 14 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्याशिवाय खो- खो व लांब उडीउंच उडीधावणे आदी वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले. उद्या (3 जानेवारी) तंत्र प्रदर्शनाचा शुभारंभ होणार असूनत्यात विविध तंत्र शाखांचे अभिनव अविष्कार सादर केले जाणार आहेतअशी माहिती प्राचार्य श्रीमती देशमुख यांनी दिली.
संस्थेचे शिल्प निदेशक रवींद्र दांडगेअनिल रेड्डीवारएस. एस. गोरेएस. एल. वानखडेएस. एस. पाटबागेए. एम. मेश्रामवाय. बी. देशपांडेजी. पी. मसरामव्ही. आर. पडोळेएन. आर. कथलेके. डी. फुटाणेआर. जे. नेमाडेजे. आर. झेगेकरजी. व्ही. चोपडेएम. आर. गुढेडी. एच. गुरव आदी उपस्थित होते. सुमेधा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुमरे यांनी आभार मानले.
00000

Wednesday, January 1, 2020

राज्यमंत्री बच्चू कडू यांची जिल्हा रूग्णालयाला भेट



अमरावती, दि. 1 – राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन रूग्णालयाची पाहणी केली व रूग्णांची विचारपूस केली. त्यांनी आज बालगृह व वृद्धाश्रमालाही भेट दिली.
राज्यमंत्री श्री. कडू यांचे आज शासकीय विश्रामगृहात आगमन झाल्यावर स्थानिक विविध संस्था, कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. कडू यांनी इर्विन चौक स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी शहीद स्मारकालाही भेट देऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यांनी होलिक्रॉस संस्थेच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. वृद्ध नागरिकांना पुरणपोळी खाऊ घालून मनमोकळा संवाद साधला. त्यांनी बालगृहालाही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले. बालगृहाच्या अधिष्ठाता सिस्टर कॅथरिन, सिस्टर सुरेखा, प्राचार्य सिस्टर निलन, सिस्टर रेवल, सिस्टर करूणा, सिस्टर रोशनी, सिस्टर निती जोरा यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
            राज्यमंत्री श्री. कडू यांनी जिल्हा रूग्णालयात विविध वॉर्डांची पाहणी केली व रूग्णांशी संवाद साधला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कडू यांनी रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधत त्यांना पुरणपोळीही खाऊ घातली. रुग्णालयाच्या डिजीटल एक्सरे मशीनचा शुभारंभही यावेळी झाला. 
                                                            00000

गतिमान कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा ऑनलाईन ‘संवाद’





                                            नववर्षानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचा उपक्रम
नागरिकांना वेळेत सेवा मिळावी म्हणून गतिमान व पारदर्शक कामकाजासाठी नववर्षानिमित्त ‘संवाद’ हे व्यासपीठ माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. नववर्षानिमित्त जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणींचे गतीने निराकरण करणे शक्य होणार आहे.
सुशासनासाठी ‘ग्रीव्हन्स रिड्रेसल अगेन्स्ट अ सर्व्हिस’चे उद्दिष्ट स्वीकारून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून हे ऑनलाईन व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. नागरिकांना आपले म्हणणे, तक्रारी, निवेदन मांडण्यासाठी संवाद (www.sanvad.in) हे वेबपोर्टल अमरावती जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. त्याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी 1800 2336 396 हा हेल्पलाईन क्रमांक सार्वजनिक वेळेत उपलब्ध करून देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत प्रायोगिक तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा या पोर्टलशी जोडण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व शाखा जोडण्यात येतील. जिल्ह्यातील आरोग्य व इतरही सेवांचे हेल्पलाईन क्रमांकही या पोर्टलवर उपलब्ध असतील.
या उपक्रमात जिल्हास्तरीय संवाद कक्ष स्थापन करण्यात येत असून, तो सेंट्रल कॉल सेंटर म्हणून कार्य करेल. नागरिकांचे प्रश्न, अडचणी व शासकीय सेवेसंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संवाद कक्ष सहाय्य करेल. सुशासनासाठी आवश्यक असलेल्या भक्कम सेवा व वितरण प्रणाली, पारदर्शकता व सुस्पष्टता आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.
डिजीटल इंडियाअंतर्गत जलद व गतिमान सेवा देण्यासाठी हा प्रयत्न आहे. नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निवारण होण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल. प्रत्येक कामाच्या नोंदी या माध्यमातून घेता येणार आहेत. सर्व शाखांचा समावेश यात होणार असल्यामुळे एकसंध सुशासन साधता येईल. हा उपक्रम सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु केला तरी, भविष्यात तो सर्व शाखांतून पूर्णवेळ चालवला जाईल. त्याचा जिल्ह्यातील नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास श्री. नवाल यांनी व्यक्त केला.
या पोर्टलवर नागरिकांना आपला मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करता येईल. त्याचप्रमाणे, निवेदनाचे स्टेटसही तपासता येणार आहे.

आधार जोडणी नसलेल्या खात्यांची यादी 7 जानेवारीपूर्वी प्रसिद्ध करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
                        

अमरावती, दि. 1 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्जखात्याला आधार जोडणी नसलेल्या शेतक-यांची मराठी यादी तयार करून 7 जानेवारीपूर्वी प्रसिद्ध करावी. त्यानंतर लाभार्थ्यांना बँक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवाहन करून जोडणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
            महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह अग्रणी बँक व विविध बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट कर्जखात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार असून, बँकांकडून संगणकीय संस्करण झाल्यानंतर थेट लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा होईल. ही प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.
योजनेची गतीने अंमलबजावणीसाठी कर्ज खातेदारांचा तपशील पडताळून ज्या कर्जखात्याला आधार जोडणी झालेली नाही अशा कर्जदारांची यादी मराठीमध्ये तयार करावी व सदर यादी बँक शाखेच्या, विकास संस्थेच्या, तसेच अधिनस्त ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करुन शेतक-यांना आधार जोडणी करण्याबाबत आवाहन करावे. ही कार्यवाही सात जानेवारीपूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.
            योजनेची भरीव अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विहित मुदतीत काम व्हावे, या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
                                    ०००

Thursday, December 26, 2019

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अमरावती जिल्ह्याचा गौरव








रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर  
मनरेगांतर्गत रोजगारनिर्मितीची दखल
अमरावती, दि. 26 :  रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवून अचूक नियोजन व अंमलबजावणीमुळे गत वर्षात मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता आदी मुलभूत सुविधांची शेकडो कामे पूर्ण झाली. जिल्ह्याच्या या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.    
दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानातील उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने, तर अमरावती जिल्ह्याला मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
            नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शैलेश नवाल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड आणि जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  माया वानखडे यांनी स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्ह्यात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
            जिल्ह्यात स्थलांतर रोखणे व मुलभूत सुविधांची उभारणी डोळ्यासमोर ठेवून 2018-19 या वर्षात जिल्ह्यात 78.81 लक्ष मनुष्यदिन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रत्यक्षात हे प्रमाण 84.84 लक्ष रोजगारनिर्मितीपर्यंत पोहोचून उद्दिष्टाच्या 108 टक्के पूर्ण झाले. 25 हजार 950 कुटुंबांना 100 दिवस रोजगार मिळाला.
            मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुके मध्यप्रदेश सीमेलगत असून, दरवर्षी दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण मोठे असते. या परिसरात कुपोषणाची समस्येचे निर्मूलन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि, स्थलांतरामुळे तेथील नागरिक व बालके पोषण आहार योजनांचा सलग लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी मेळघाटावर अधिक फोकस ठेवण्यात आला. मेळघाटात उद्दिष्टाच्या 111. 92 टक्के रोजगारनिर्मिती झाली. मेळघाटात 41 हजार 174 , तर जिल्ह्यात 1 लाख 46 हजार 326 जॉबकार्ड वाटण्यात आले. या वर्षात स्वच्छतागृह निर्मितीसह ग्रामीण स्वच्छता उपक्रमात 721, दुष्काळ निवारणाची 1 हजार 12 व आवास योजनेत 1855 कामे पूर्ण झाली.
            कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत समन्वयक माया वानखडे म्हणाल्या की, ही कामे पूर्ण करताना वेळेत वेतनवितरण करण्यासह कंत्राटी तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळाची सांगड घालण्याचे आव्हान होते. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षणातून सक्षम करण्यात आले. अंमलबजावणीच्या कामांत वैविध्य राखले. तांत्रिक सक्षमता निर्माण करून वेतन मिळण्यातला विलंब दूर केला. इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंटचा वापर केला गेला. आवश्यक संपर्कासाठी कुशल मनुष्यबळाधारे माहिती- शिक्षण-संवादाचे सूत्र वापरले. अधिका-यांनी आवश्यक तिथे वेळोवेळी फिल्ड व्हिजीट केल्या.  रोजगाराचे वेतनही गतीने वेळेत वितरीत करण्यात आले. प्रत्येक कामाच्या नोंदी घेऊन संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. रोजगारदिन कार्यक्रमात नरेगा कार्ड, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींचे वितरण, आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले. योजनेतील कामांची तज्ज्ञांकडून वेळोवेळी गुणवत्ता तपासण्यात आली. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण केले गेले. या सर्वांचा एकसंध परिमाण होऊन उद्दिष्टाहून अधिक रोजगार निर्मिती साध्य झाली.
            रोजगारनिर्मितीतून मुलभूत सुविधांचे निर्माण झाले. जलसंधारणाची अनेक कामे झाली. विहिरी व विविध जलस्त्रोत, भूजलाची पातळी वाढून पेयजलाची उपलब्धता वाढली. वृक्षारोपण, रेशीम उद्योग अशी अनेक कामे झाली. कु-हा गावात फळझाडे लावण्याचे प्रयोग ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवून देणारा ठरला.   
पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. जिल्हाधिकारी श्री. नवाल, तत्कालीन मु. का. अधिकारी श्रीमती खत्री, श्रीमती वानखडे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी वर्गाचे  अभिनंदन होत आहे.
                                    00   

Wednesday, December 11, 2019

विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश




अमरावती, दि. 11 – जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे सर्वेक्षणात सुधारणेसह प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, पेयजल योजना आदी विविध योजनांची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विहित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश आज विविध आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले.  
            विधीमंडळ अधिवेशनात होणा-या जिल्हा बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, सुलभाताई खोडके, रवी राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी संजय पवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टी परिस्थितीच्या प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा व्हाव्यात. अवकाळी, अवेळी व सतत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणताही भाग वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री. भुयार यांनी दिले.  कृषी अधिका-यांनी तालुका क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश श्री. राणा यांनी दिले.  अमरावती जिल्ह्यात पुनर्वसनाची कोणती कामे शिल्लक आहेत, त्याची बैठक घेऊन आढावा घ्यावा, तसेच ती पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची माहिती सादर करावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. 
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेत यंदाचे 24 हजार 581 घरांचे उद्दिष्ट असून, अद्याप 797 घरे पूर्ण आहेत. उद्दिष्ट पाहता ही कामे मिशनमोडवर पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 2012 च्या सर्वेक्षणानुसार 840 गावे हगणदारीमुक्त झाली, तथापि, यातून सुटलेले पाडे, वाड्यावस्‌त्या यांच्यासाठी यंदा अभियानात 30 हजार 960 उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 18 कोटी 63 लाख निधीची आवश्यकता असून, त्याची मागणी करण्यात आली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
70 गावे पाणीपुरवठा योजनेत बांधकाम, पंपदुरुस्ती आदींसाठी 5.43 कोटी निधी मंजूर आहे. 22 गावांनी ठराव दिले आहेत. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेवून हे काम पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पोलीस गृहनिर्माण योजनेत नांदगावपेठ वसाहतीचाही समावेश व्हावा, अशीही सूचना त्यांनी केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत 532 गावे समाविष्ट असून, 285 गावात ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापण्यात आल्या आहेत. योजनेत पंप, पाईप, बीजोत्पादन, पशुधन आदी विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेत 3 कोटी 14 लाख निधी वितरीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही वेळेत करण्याचे निर्देश श्रीमती खोडके यांनी दिले.
रब्बीतील हरभरा या महत्वाच्या पिकाच्या उत्पादनवाढीसाठी  ब्रॉड बेस फ्लोर ही पद्धती रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. पारंपरिक पेरणीऐवजी दोन ओळींत काही अंतर राखून पेरणी केल्याने मशागत करणे सुलभ होऊन उत्पादनात वाढ होते. हरभरा पेरणीपूर्वी बुरशीनाशकात टाकून पाण्यात भिजवला व नंतर पेरणी केली की उगवण लवकर होते व कीड लागत नाही, अशी माहिती कृषी अधिका-यांनी दिली. याबाबत यशस्वी प्रयोगांची माहिती नागरिकांसमोर आणण्याचे निर्देश श्री. अडसड यांनी दिले. मेळघाटातील करंजखेड- हतनूर- रायपूर व इतर दोन रस्ते कोअर क्षेत्रातील असल्याने सेंट्रल एमपॉवरमेंट कमिटीची परवानगी लागते. ही परवानगी अद्याप प्राप्त नाही.  आदिवासी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. पटेल यांनी दिले.
शेंडगाव या संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १८ कोटी रूपये निधी मंजूर आहे. त्यापैकी ३ कोटी ७३ लक्ष अनुदान प्राप्त आहे. ही कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश श्री. वानखडे यांनी दिले.
जलसंपदा विभागाकडून ४२ लघुप्रकल्पांचे काम सुरू असून, यंदा २३६ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत अद्यापपर्यंत पुरेशी कामे झाली नाहीत. या कामांना वेग द्यावा. आचारसंहिता व पावसाळ्यामुळे प्रलंबित जिल्हा मार्गांची कामे पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी दिले. महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर, खांब उभारणी आदी कामे वेळेत व्हावीत. भारनियमनाची वेळाही नागरिकांसाठी अनुकुल असाव्यात. त्यादृष्टीने वेळेत आवश्यक बदलांसाठी पाठपुराव्याचे निर्देश देण्यात आले.
उपवनसंरक्षक शिवा बाला, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुलकर्णी, माया वानखडे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
                                    000 

Monday, December 2, 2019

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा दोन महिन्यात आठ हजार शिधापत्रिकांचे वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे


अमरावती, दि. 2 -जिल्ह्यातील शिधापत्रिका वाटपाचे काम गतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सेतुमार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गत दोन महिन्यात आठ हजारहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी आज येथे दिली.
            जिल्ह्यातील ग्राहकहिताच्या दृष्टीने राबवावयाच्या उपायांबाबत सविस्तर चर्चा आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य डॉ. अजय गाडे, पंकज मेश्राम, रा. ज. वावरे, अनिल माधोगढिया, मनोहर बारसे, मंगेश मनोहरे, रंजनाताई मामर्डे, अशोककुमार राठी, राजू बसवनाथे, छाया दंडाळे, एस. एम. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सहायक जि. पुरवठा अधिकारी समाधान सोळंके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, महावितरणचे उप कार्य अभियंता सुनील नाईक, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, करवसुली अधिकारी विजय गावंडे, पोलीस निरीक्षक आर. एस. टाले, पालिकेच्या पशुवैद्यक विभागाचे गुणसागर गवई, वैधमापन विभागाचे ध. कृ. राठोड आदी उपस्थित होते.  
शिधापत्रिका वाटप प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने  सेतु केंद्रात येणा-या अर्जांचा ऑनलाईन डेटा निर्माण होणार असून, त्यामुळे शिधापत्रिकांचे अचूक तपशील मिळायला मदत होणार आहे. वरूड, दर्यापूर तालुक्यात त्याचे कामही सुरू झाले आहे. अर्ज ऑनलाईन तपासताना त्रुटी आढळल्यास तत्काळ अर्ज सेतुकडे परत जाईल व सेतूकडून अर्जदारास कळवून पूर्तता केली जाईल. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, असे श्री. सोळंके यांनी यावेळी सांगितले.
            पुरवठा विभागाने केरोसिन वाटप थांबवल्याने गरीब नागरिकांना अडचणी येऊ शकतात, असे श्रीमती मामर्डे यांनी सांगितले. त्याबाबत श्री. टाकसाळे म्हणाले की, उज्ज्वला योजनेसह पं. दीनदयाळ उपाध्याय योजनेत मेळघाटसह सर्व जिल्ह्यात गॅस वाटपाचे अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून केरोसिन वाटप यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. गॅसवाटप योजनेत  केशरी पत्रिकाधारकासह सर्वांनाच लाभ मिळतो. कमी किमतीचे छोटे गॅस सिलेंडरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
                           रिक्षांची तपासणी होणे आवश्यक
तथापि, रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होते किंवा कसे, हे तपासणे आवश्यक असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. श्री. मेश्राम म्हणाले की, शहरात सकाळी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर होतो. रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होत असल्यास प्रदुषण वाढते. या प्रदुषणाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिक्षातील इंधनात भेसळ होते का, हे वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी तपासावे. प्रदुषण नियंत्रण कार्यक्रमाबाबत जनजागृतीची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
                        मोकाट जनावरांबाबत कारवाई होणे आवश्यक
शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. याबाबत तक्रारी करूनही महापालिकेकडून उत्तर मिळत नाही, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.  फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याचा त्रास नागरिकांना होतो. कंपोस्ट डेपोचे निकष काय आहेत, हे तपासले पाहिजे. त्याशिवाय, महापालिकेकडून वेळेत माहिती मिळावी, अशीही मागणी सदस्यांनी केली. ग्राहक पंचायतीच्या कार्यालयालगत कचरा टाकला जातो. त्याबाबत तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याची नाराजीही सदस्यांनी व्यक्त केली.
                                  महिला प्रसाधनगृहांबाबत माहिती द्यावी
शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. याबाबत पालिकेकडून काय कार्यवाही झाली, अशी विचारणा श्री. मेश्राम यांनी केली. त्यावर अशी 28 प्रसाधनगृहे प्रस्तावित असून, 10 पूर्ण झाली आहेत, अशी माहिती आरोग्याधिका-यांनी दिली. या ठिकाणांची माहिती सादर करण्याचे निर्देश सदस्यांनी दिले.
                                    नायलॉन मांजावर निर्बंध
पुढील महिन्यातील मकरसंक्रांत व पतंगोत्सव लक्षात घेता पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्बंध आहे. त्यामुळे जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे श्री. मेश्राम यांनी सांगितले.  जिल्ह्यात गतकाळात घडलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेचा तपास करून संशयितांना अटक केल्याबद्दल सायबर पोलीसांचे अभिनंदन समितीच्या सदस्यांनी केले.
                                    फूटपाथवर राहणा-यांसाठी शेल्टर
रस्त्याच्या कडेला झोपणारे, फुटपाथवर राहणा-या नागरिकांच्या निवा-यासाठी बडनेरा रेल्वेस्थानकावर शेल्टर सुरू आहे. कुणाच्याही निदर्शनास अशा व्यक्ती आल्यास त्यांना शेल्टरबाबत माहिती द्यावी. या निवारा केंद्रामार्फत संबंधित नागरिकाच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते, असे आवाहन श्री. बसवनाथे यांनी बैठकीत केले.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...