Saturday, January 18, 2020

पालक मंत्र्यांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी शाळेतर्फे हृद्य सत्कार









शाळेच्या संस्काराचा वसा घेऊन विविध क्षेत्रात यश मिळवा
                                     -  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 18 : कामाप्रती सकारात्मकता, चांगुलपण, कष्टातील प्रामाणिकता व  सातत्य यांच्या आधारे कुठल्याही क्षेत्रात यश मिळवता येते. या संस्काराची शिदोरी आम्हाला या शाळेने दिली. संस्काराचा हा वसा घेऊन आपणही विविध क्षेत्रांत यश मिळवा, अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज होलिक्रॉस हायस्कुलच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. 
येथील होलिक्रॉस इंग्लिश हायस्कुलच्या माजी विद्यार्थीनी असलेल्या श्रीमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य पुष्पा थॉमस यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होता. 
शाळेच्या विविध आठवणी जागवत श्रीमती ठाकूर यांनी विद्यार्थीनिंशी दिलखुलास संवाद साधला. त्या म्हणाल्या की,  शालेय जीवनात विविध कौशल्य मिळवण्याची संधी असते. विद्यार्थिनींनी प्रत्येक कौशल्य शिकून घेतले पाहिजे. 
शाळेची माजी विद्यार्थिनी मंत्री झाल्याबद्दल शाळेतर्फे  गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थीनीसह शाळेतील प्रार्थनाही गायिली. 
यावेळी संस्थेच्या बालगृहाला भेट देऊन तेथील बालकांशी त्यांनी संवाद साधला. 

Wednesday, January 15, 2020

मोझरी येथून गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ - केंद्रीय जहाज बांधणी, रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय






महात्मा गांधीजी यांच्या विचारांची ताकद नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संकल्प पदयात्रा मोलाची ठरेल, असे केंद्रीय जहाज बांधणी, रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज येथे सांगितले.
गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत से राष्ट्रपिता - मोझरी ते सेवाग्राम गांधी संकल्प पदयात्रेचा शुभारंभ श्री. मांडवीय यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे,जि. प. सदस्य गौरी देशमुख, शरद वानखडे, मोझरीचे सरपंच बबलू मकरमपुरे,संतोष महात्मे, गुरुदेव सेवा आश्रमाचे प्रकाश वाघ, जनार्दन बोथे, डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, बालाजी पवार, सुरेखाताई ठाकरे, रघुनाथ वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. मांडवीय म्हणाले की, देशाला ग्रामगीतेतून ग्रामस्वराज्याचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भूमीतून गांधीविचाराचा प्रसार करण्यासाठी पदयात्रा सुरू होत आहे, ही महत्वपूर्ण बाब आहे.
गाव समृद्ध होईल तर राष्ट्र समृद्ध होईल. स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन याबाबत गांधीजी यांनी दिलेली शिकवण आजही पथदर्शक आहे. ही शिकवण तरुणाईच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे. या कार्यात पदयात्रेचा उपक्रम मोलाचा ठरेल.
गांधी विचाराच्या प्रसारासाठी आपण यापूर्वी पदयात्रा आयोजित केल्या. त्यातून प्रेरणा मिळून अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या. आज त्या भगिनी मोठ्या पदावर पोहोचल्या आहेत. पदयात्रेसह अनेक विधायक उपक्रमात योगदान देत आहेत, असेही ते म्हणाले.
महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने जात देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या तत्वांपासून प्रेरणा घेऊन ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.श्रीमती ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मंत्री महोदयांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून व

Monday, January 13, 2020

गृहमंत्री करणार मूकबधिर 'वर्षा'चे कन्यादान वझ्झर येथील बालगृहाला गृहमंत्र्यांची भेट








अमरावती, दि. १३ : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली व या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे यावेळी सांगितले.
गृहमंत्र्यांनी आज सायंकाळी या बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व विचारपूस केली.
 यावेळी त्यांनी तेथील मुलांना स्वतः चुलीवर चहा तयार करून पाजला,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षा तेथील मुलगा समीर याच्याशी विवाह ठरला असून, वर्षाचे कन्यादान गृहमंत्री यांनी करावे, असे श्री. पापळकर यांनी सांगताच गृह मंत्री श्री. देशमुख यांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू, असे सांगितले. 
या वेळी वर्षा व समीर या दोहोंचे आज साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोहोंचेही अभिनंदन केले.वर्षा ही मुलगी एक दिवसाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली होती. या आश्रमात तिचे पालनपोषण झाले. ती आता २२ वर्षांची आहे.
श्री. पापळकर बाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.या आश्रमात १२३ विकलांग मुले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण  झाली की नियमानुसार विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. या मागणी बाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे यावेळी गृह मंत्र्यांनी सांगितले.

00000


राज्यात लवकरच पोलीस भरती - गृह मंत्री अनिल देशमुख








अमरावती, दि. १३ : गृह खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती केली  जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज दर्यापूर येथे सांगितले.
          लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त  दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
      विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, जि. प. सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.
गृह मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
ते पुढे म्हणाले की, अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्ट नुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांनी  दर्यापूर परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  बालमजुरी रोखण्यासाठी व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम राबविण्यात येईल. बालके ही उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सकारात्मक निर्मितीकडे वळविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. 
आमदार श्री. वानखडे, श्री. तसरे, श्री. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कांचनमाला गावंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मंत्री महोदयांनी स्व. सांगळूदकर यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000


Saturday, January 11, 2020

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

 
Ø  गारपीटग्रस्त भागाचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश
 
अमरावती, दि. 11 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्ह्यातील गारपीटग्रस्त परिसराची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरीव मदत होण्याच्या दृष्टीकोनातून  शेतीच्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई, वाघोली आदी गावांना भेट देऊन शेतीची पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी या दौऱ्यात नेरपिंगळाई येथे लक्ष्मण महादू झोडगे, प्रवीण कोहळे, अतुल चांडक, वाघोली येथील ओंकार माणिकराव चांगोले आदी शेतक-यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पीकांची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी संत्रा बागांसह गहू, कापूस आणि हरभरा पिकांची पाहणी त्यांनी केली. गारपिटीने बाधित झालेल्या गावांची आणि पिकांच्या क्षेत्राची त्यांनी कृषी अधिकारी श्री. चवाळे यांच्याकडून माहिती घेतली.
जिल्ह्यात झालेला अवेळी पाऊस आणि जानेवारी महिन्यात पडलेल्या गारपीटीने जिल्ह्यातील कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी दोन दिवसांत नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी कृषि विभागाला दिले.
शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.   आवश्यक मदतीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा करण्यात येईल, असे श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. सार्सी, नेर पिंगळाई, राजुरवाडी आदी विविध गावांतील ग्रामस्थांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीला पाणी पुरवठा, शेत मालाला हमीभाव, पिकांचे नुकसान झाल्यास तातडीची नुकसान भरपाई आदी बाबी आवश्यक आहेत. त्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्यातील 70 गावे पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येईल. मनरेगामध्ये होणाऱ्या विकास कामात सुसूत्रता ठेवावी. मजुरांचे व्यवस्थित हजेरीपट ठेवून वेळेत मजुरी अदा करावी, असे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले.  
  

विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रादेशिक मध्यस्थी परिषद

मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावण्यासाठी विचारमंथन व्हावे 

- मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग 

 

अमरावतीदि. 11 – वादनिवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्यतांचा शोध घेणे आवश्यक असते. वादी- प्रतिवादींचे म्हणणे व परिस्थिती यांच्या सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या व समान वितरणाच्या शक्यता सापडतात. मध्यस्थीतून वादनिवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावेअसे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज येथे केले.

 महाराष्ट्र सेवा विधी प्राधिकरणमुंबई येथील मुख्य मध्यस्थ केंद्र व जिल्हा सेवा विधी प्राधिकरण यांच्या समन्वयाने हॉटेल ग्रँड महफिल येथे  ‘क्षमता निर्मिती व मध्यस्थीच्या क्रियाकलांपाचे मूल्यांकन’ या विषयावर आयोजित प्रादेशिक मध्यस्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थ संनियंत्रण समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी,  नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडेनागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती व अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एस. बी. शुक्रेनागपूर खंडपीठाच्या मुख्य मध्यस्थ संनियंत्रण उपसमितीचे सदस्य न्यायमूर्ती झेड. ए. हक आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

मुख्य न्यायमूर्ती श्री. नंद्राजोग म्हणाले कीमध्यस्थी ही वाद निवारणाची परिणामकारक पद्धत आहे. पंचायतीच्या स्वरूपात ती पूर्वीपासून अस्तित्वात होती. महायुद्धोत्तर काळात जागतिक स्तरावर तिची आवश्यकता ठळक मानली गेली.  स्त्री जशी एकाचवेळी आईपत्नीकन्यासूनआजी अशा विविध भूमिका वठवत कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये सौहार्द राखतेतशी भूमिका मध्यस्थाची असली पाहिजे.

मुख्य न्यायमूर्ती श्री. नंद्राजोग पुढे म्हणाले की,  न्यायाधीशांवर न्यायपूर्ण व तटस्थ निर्णयप्रक्रियेची जबाबदारी असते. प्रत्येक प्रकरणात समान वितरणाच्या शक्यता असतात. मध्यस्थाची भूमिका बजावताना दोन्ही बाजूंचे मत व स्थितीचे अवलोकन करून अशा शक्यतांचा शोध घेतला पाहिजे. या शक्यता तपासून  वितरणाचा सुवर्णमध्य गाठता येतो. त्यासाठी या परिषदेतून मंथन व्हावे.   

            न्यायवितरणासह वादनिवारण हेही न्यायालयाचे कर्तव्य असते. मध्यस्थीतून वादनिवारण लोकहित व समाजासाठी लाभकारक असूनत्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योगदान द्यावेअसे आवाहन न्यायमूर्ती श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी केले.  

 

मध्यस्थीचे फायदेमध्यस्थ व्यक्तीचे अनुभवमध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणा-या समस्या व त्यावरील उपाययोजना या विषयांवर चार सत्रांमध्ये परिषद झाली. या सत्रांतून न्यायमूर्तींनी मध्यस्थीसंदर्भात विविध विषयांवर उपस्थित न्यायाधीश व अधिवक्ता यांना मार्गदर्शन केले.  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला एस. जोशी- फलके यांनी आभार मानले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. संतानी यांनी संयोजन केले.

 

मध्यस्थी परिषदेत विदर्भातील 11 जिल्ह्यातील सुमारे 500 न्यायाधीश महोदय, 50 प्रशिक्षित मध्यस्थ अधिवक्ता व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Friday, January 10, 2020

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2020 असा आहे.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...