Friday, February 7, 2020

तूर खरेदी केंद्राचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ

बेलोरा, शिरजगाव बंड येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद







अमरावती, दि. 7 : चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत आज राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांनी तूर खासगी व्यापाऱ्यांना न विकता नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर नोंदणी करुन तूर विक्री करावी, असे आवाहन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिश बोंडे, उपसभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, माजी सभापती मंगेश देशमुख, संचालक सुभाष मसराम, विनोद जवंजाळ, मनोज नांगलिया, सचिव मनीष भारंबे यांच्यासह नाफेडचे अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कडू यांच्या दौरा प्रसंगी, बेलज येथील सेंद्रीय गुळ उद्योग केंद्राला त्यांनी सदिच्छा भेट दिली. तेथील गुळ निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना गुळ निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राहुटीच्या माध्यमातून गोरगरीबांना दिलासा

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत राहुटी आज चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा व शिरजगाव बंड येथे आयोजित करण्यात आली होती. गोरगरीब जनतेचे प्रश्न, तक्रारी, शासकीय विभागाशी निगडीत कामे आदींचा निपटारा गावातच एका ठिकाणी व्हावा, या उदात्त हेतूने राहुटी हा उपक्रम जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीबांची कामे होऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.
चांदुरबाजार तालुक्यातील बेलोरा ग्राम पंचायत परिसर आणि शिरजगाव बंड येथील श्री. शिवाजी हायस्कुलच्या प्रांगणात राहुटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बेलोरा व शिरजगाव बंड येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
 यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. आज आयोजित राहुटीत बहुसंख्य दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांचे सानुग्रह मदतीचे अर्ज भरुन घेण्यात आले. त्यांना येत्या पंधरा दिवसात मदत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
00000

Thursday, February 6, 2020

आसेगावपूर्णा, तळवेल येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद


राहुटीच्या माध्यमातून अडीच लाख तक्रारींचा निपटारा
-         जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 
 सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम
अमरावती, दि. 6 : सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे राहुटीच्या माध्यमातून होत आहेत. सन 2005 पासून ते आतापर्यंत सुमारे अडीच लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही राज्यमंत्र्यांनी सांगितले.
चांदुरबाजार तालुक्यातील आसेगावपूर्णा येथील ग्राम पंचायतीच्या आवारात आणि त्यानंतर तळवेल येथील आठवडी बाजार चौकात राहुटी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नांदेडचे आमदार संभाजी पवार त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती पवार तसेच शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की,  सर्वसामान्यांचे महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे एकाच ठिकाणी तत्काळ होण्यासाठी राहुटी उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण राहुटीतून करण्यात येत आहे. गावागावांत राबविण्यात येणाऱ्या राहुटीच्या माध्यमातून राज्यमंत्री श्री. कडू आमदार असतांना, वर्ष 2005 पासून ते आतापर्यंत सुमारे अडीच लाख तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत.
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील आसेगावपूर्णा व त्यानंतर तळवेल येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तेथील ग्रामस्थांनी व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत: शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. आज आयोजित राहुटीत अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी शाळेत होत असलेल्या कॉपीचा प्रकार बंद करण्यासंबंधीचे निवेदन राज्यमंत्र्यांना सादर केले. यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कडू यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांच्या राहुटी उपक्रमाला आर्वजून उपस्थित राहिलेले नांदेडचे आमदार संभाजी पवार व सौ. पवार यांनी अश्या प्रकारचा राहुटी उपक्रम आपल्या मतदार संघात राबविणार असल्याचे
सांगितले.
दोन्ही ठिकाणच्या राहुटीत अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
राहुटीच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला.
00000










Tuesday, February 4, 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना


पोर्टलवर माहिती अपलोड करण्याच्या प्रक्रियेला वेग
उर्वरित कामे दोन दिवसात पूर्ण करा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 3 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रियेने गती घेतली असून अनेक बँकांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बँकांनी येत्या दोन दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी काल महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत बँकर्सची बैठक घेऊन माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बँकांकडून प्रक्रियेला वेग देत कामे पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पुन्हा सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, आदी उपस्थित होते.
            श्री. नवाल म्हणाले की, बँकांकडून सरासरी 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. आंध्रा बँक, बडोदा बँक, विजया बँक, देना बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक आदी विविध बँकांची कामे उद्यापर्यंत पूर्ण होतील. उर्वरित बँकांनीही तातडीने माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया यांनी आधार लिंकबाबत स्पेशल ड्राईव्ह घेणे आवश्यक आहे.
            शेतकऱ्यांची माहिती नोंदविण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत कालावधी असला तरी सात फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती व्यवस्थित भरावी, यातून कोणताही पात्र लाभार्थी सुटू नये, याची खबरदारी बँकांनी घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
000000

उद्योग केंद्रातर्फे ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ कार्यशाळेला मोठा प्रतिसाद






व्यवसाय सुलभतेचा उद्योजकांनी लाभ घ्यावा
-         तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल
            अमरावती, दि. 3 :  शासकीय कामकाजात विविध स्तरावर सुधारणांच्या दृष्टीने उद्योग संचालनालयातर्फे व्यवसाय सुलभता  निर्माण करण्यात आली असून उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई येथील तज्ज्ञ सल्लागार किर्ती अग्रवाल यांनी केले.
             जिल्हा उद्योग केंद्रातर्फे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या सीए भवन येथे इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यशाळा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, मुंबईचे तज्ज्ञ सल्लागार कुणाल शहा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय बांगर, संस्थेचे अध्यक्ष डी.डी. खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.
              या कार्यशाळेत व्यवसाय सुलभता व मैत्री कक्षाबाबत तज्ज्ञ व्याख्यात्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.  श्रीमती अग्रवाल म्हणाल्या की, व्यवसाय सुलभतेच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या परिमाणानुसार अनेकविध सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उद्योगासाठी परवानग्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. वीज, पाणी आदी मिळण्याबाबत प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची जागतिक क्रमवारीतील क्रम सुधारला असून आता तो 63 वर आहे. महाराष्ट्र शासनाकडून भरीव प्रयत्न करण्यात आले असून ते गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम स्थान बनले आहे. या परिवर्तनाचा लाभ उद्योजकांनी घ्यावा.
मैत्री हे एक खिडकी योजना असलेले सुलभ परवानगी प्रक्रियेसाठीचे पोर्टल आहे. त्याचा लाभ उद्योजकांनी घेण्याचे आवाहन श्री. शहा यांनी केले. 
00000

ग्रामपरिवर्तन अभियानातून गावांचा शाश्वत विकास साधावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 4 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे राज्यातील सुमारे एक हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी गावातील मुलभूत गरजा ओळखून त्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानांतर्गत झालेल्या विकास कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. खोज स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी पुर्निमा उपाध्याय यांचेसह गावचे ग्रामपरिवर्तक व इतर शासकीय यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, अभियानाच्या अनुषंगाने गावात झालेली विधायक कामे व त्याविषयीची माहिती प्राथम्याने ‘परिवेश’ पोर्टलवर अपलोड करावी. गावातील नादुरुस्त रस्त्यांची दूरुस्ती मनरेगातून करण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजने अंतर्गत मंजूर लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. मेळघाटातील गावांत वीज जोडणी, पाणी पुरवठा योजना, आरोग्य सुविधा, शाळा, अंगणवाडी आदी संदर्भातील मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात याव्यात. गावात पाण्याची मुबलकता राहण्यासाठी वनतलावांची निर्मिती शास्त्रोत्क पध्दतीने करण्यात यावी.
फेब्रुवारी अखेरपर्यंत अभियानांतर्गत असणाऱ्या प्रलंबित मागण्या व विकास कामे पूर्ण करण्यात यावीत. वीज चोरी रोखण्यासाठी सौर दिव्यांची उपलब्धता करुन देण्यात यावी. तसेच ग्रामस्थांचे मन परिवर्तन करुन प्रबोधन करावे. आदिवासीबहूल गावांचा विकास करण्यासाठी पाच टक्के आदिवासी उपयोजनातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन दिला जातो. विकास कामे करतांना सर्व योजनेच्या निधीच्या अभिसरणातून कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही श्री. नवाल यांनी सांगितले.
00000

Monday, February 3, 2020

कुरळपूर्णा- हिरूळपूर्णा येथे राहुटी उपक्रमाला मोठा प्रतिसाद









       सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या तत्काळ निराकरणासाठी राहुटी उपक्रम
                                              -जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 

अमरावती, दि. 3 : सर्वसामान्य नागरिकांची महसूल व अन्य शासकीय विभागाशी निगडीत कामे वेळेत पूर्ण व्हावी, जलसंपदा, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून राहुटी उपक्रम जिल्ह्यात विविध गावांत राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात हा पहिला उपक्रम सेवा हमी कायद्यांतर्गत राबविण्यात येत असून, आज चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा व त्यानंतर हिरुळ पूर्णा येथे आयोजित राहुटी उपक्रमाचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी किंवा निवेदने स्वीकारून त्या तत्काळ निकाली काढण्यात येत आहेत. यावेळी राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वत:  शिबिरात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या तत्काळ निपटा-याबाबत अधिका-यांना निर्देश दिले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्यमंत्री श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अनेक नागरिकांना शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पावसामुळे घर पडझड झालेल्या नागरिकांना मदतीचे वाटप व अपंग नागरिकांना सायकल, स्टिक आदी साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले.
सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन,  आरोग्य, कामगार कल्याण आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
                                    लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा                               
दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला. आधारकार्डाबाबत अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आला. 
राहुटीत नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्ज वाटप कक्ष यासह छायाचित्र, झेरॉक्स आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांना योग्य मार्गदर्शनासह त्यांच्या प्रश्नांचा तत्काळ निपटाराही होत आहे.  

     ०००

Saturday, February 1, 2020

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून चांदूरबाजार व अचलपूर एमआयडीसी जागेची पाहणी









अमरावती, दि. 1 : ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांचा विकास होणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध्‍ होण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सांगितले.
चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील एमआयडीसी जागेची पाहणी राज्यमंत्री श्री. कडू यांनी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह भूमि अभिलेख कार्यालयाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांना कुशल, अकुशल कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने तालुकास्तरावरील औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडावर उद्योग उभारणे आवश्यक आहे. तेथील जागेवर सर्व सोयी सुविधांची उपलब्धता करुन संपूर्ण विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजक त्याठिकाणी उद्योग, कारखाने उभारण्यासाठी पुढे येतील.
चांदूर बाजार तालुक्यातील मोर्शी- चांदुर बाजार- अचलपूर या राष्ट्रीय महामार्ग तसेच नगर परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या नागरी सुविधांची पाहणी राज्यमंत्र्यांनी दौरा प्रसंगी केली. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेऊन रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे. नागरी वस्तीतील विजेचे पोल, नाल्या व दुकाने आदी सुनियोजित ठिकाणी बसविण्यात यावे, अशा सूचना श्री. कडू यांनी दिल्या.
शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला भेट
शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी पाच लाख रुपये निधी देणार – बच्चूभाऊ कडू
शिरजगाव बंड येथील उरुजे मिल्लत उर्दु हायस्कुलला  शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज सदिच्छा भेट दिली. तेथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी शाळेचे अनन्यसाधारण महत्व आहे. शाळेत शिकल्याने मुलांमध्ये लहानपणापासून चांगले संस्कार घडतात. त्यांच्यातूनच उद्याची पिढी घडली जाते. खासगी शाळेसोबतच शासकीय शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे.
शिक्षकांनी मुलांना घडविण्यासाठी शिक्षणावर भर दिला पाहिजे. स्वयं अर्थ सहाय्य योजनेतून उर्दु शाळा चालविली जात आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. याबद्दल शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांचे कौतुक त्यांनी केले. सदर शाळेचा सर्वांगिण विकास व्हावा, शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी पाच लाख रुपयाचा निधी आमदार निधीतून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. शालेय विद्यार्थ्यांव्दारे बहारदार कव्वालीचे सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या वतीने राज्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अलफलाह मायनोरिटी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शे. अफजल शे. मुस्तफा, सरपंच अरुणाताई मानापुरे, उपसरपंच किशोर खवले यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...