Friday, June 3, 2022

प्लास्टिकच्या पर्यायी साधनांबाबत अधिकाधिक जनजागृती करा - आरडीसी आशिष बिजवल

 




प्लास्टिक कचरा निर्मूलनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

प्लास्टिकच्या पर्यायी साधनांबाबत अधिकाधिक जनजागृती करा

                                    - आरडीसी आशिष बिजवल

 

अमरावती, दि. 3 : प्लास्टिक कच-याच्या निर्मूलनासाठी दंडात्मक कारवायांचे प्रमाण वाढवतानाच प्लास्टिकला पर्याय ठरू शकतील अशा साधनांच्या वापराबद्दल अधिकाधिक जनजागृती करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे दिले.

            ‘सिंगल युज प्लास्टिक बॅनच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहूल बनसोड यांच्यासह महापालिका, विविध नगरपालिका, पंचायत समित्या यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल म्हणाले की, सार्वजनिक ठिकाणी, तसेच इतरत्रही प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात विखुरलेला दिसून येतो. पावसाळा जवळ आला असून सफाईच्या दृष्टीने प्लास्टिक निर्मूलन नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे. ठिकठिकाणी विखुरलेल्या प्लास्टिकमुळे नाल्या तुंबण्याचे प्रकार घडतात. त्याशिवाय जनावरांकडून नकळतपणे हा कचरा गिळंकृत होत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची हानी होते.  अधिनियमाद्वारे सुस्पष्टपणे बंदी घातलेली असतानाही कुठे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई करण्यात यावी. कारवाईचे प्रमाण वाढवतानाच पर्यायी साधनांच्या वापराबाबत जनजागृतीही प्रभावीपणे झाली पाहिजे.

श्रीमती पाटील म्हणाल्या की, सिंगल युज प्लास्टिकच्या उत्पादन व साठवणूकीवरील बंदीबाबत  नियमांत  सुस्पष्टपणे तरतुदी करण्यात आल्या आहेत. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याचे काटेकोर पालन करावे. कारवाईत जप्त करण्यात आलेले प्लास्टिक अधिकृत 'रिसायकलर'कडूनच नष्ट झाले पाहिजे. त्याचे नियम पाळून कार्यवाही करावी.  केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळाने अद्ययावत पोर्टल सुरु केले असून, त्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

00000

 

 

 

 

 

सुलभ व जलदरीत्या पीक कर्ज मिळण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’करणार मदत - कृषीविकास अधिकारी गोपाळराव देशमुख

 

सुलभ व जलदरीत्या पीक कर्ज मिळण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्रकरणार मदत

-   कृषीविकास अधिकारी गोपाळराव देशमुख

 

अमरावती, दि. 3 : ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी कर्ज मित्र ही योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना सुलभ व जलदरीत्या पीक कर्ज मिळवून देण्यासाठी कृषी कर्ज मित्र सहाय्यकारी ठरेल, असे जि. प. कृषी विकास अधिकारी देशमुख यांनी सांगितले.

शेतक-यांनी खरीप व रब्बीसाठी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी, तसेच खासगी बँकांमार्फत कर्जपुरवठा होतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शेतक-यांचा अधिक कल दिसून येतो. सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसासट्यांमार्फत कर्जवितरण होते. कर्ज मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना सातबारा उता-यांपासून बँकेची नाहरकत प्रमाणपत्रे आदी अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. त्यात बराच वेळ जातो. कधीकधी हंगामही संपून जातो. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कर्ज मिळत नाही. नाईलाजाने त्याला सावकाराकडून अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागते. हे टाळण्यासाठी कृषी कर्ज मित्र ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण लागवडीखालील क्षेत्र व पीक कर्ज वितरण पाहता त्यात तफावत आढळून येते.  ज्या शेतक-यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, ते केवळ कर्जप्रक्रियेच्या अज्ञान व वेळेच्या अभावामुळे वंचित राहतात. अशा इच्छूक पात्र शेतक-यांना कृषी कर्ज सुलभतेने मिळण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या योजनेतून कृषी कर्ज मित्रांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कृषी कर्ज मित्र काय करतील?

कृषी कर्ज मित्र ज्या शेतकरी बांधवांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे, त्यांना भेटून कर्जप्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देतील. कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतक-याच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करतील व मंजुरीसाठी बँकेकडे सादर करण्यास मदत करतील. कृषी कर्ज मित्र हा बँक आणि शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ नव्हे, तर मदतनीस आणि सल्लागाराची भूमिका बजावेल. शेतकरी बांधवांना पारदर्शी व प्रामाणिकपणे मदत व सल्ला देण्याची कृषी कर्ज मित्राची जबाबदारी असेल. तसे बंधपत्र त्याला द्यावे लागेल.

 

 

 

 

निवड प्रक्रिया अशी असेल

कृषी कर्ज मित्रांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. कृषी कर्ज मित्र म्हणून काम करू इच्छिणा-या व्यक्तींनी आपले अर्ज पंचायत समितीत कृषी विभागाकडे तत्काळ सादर करावेत. पंचायत समितीकडून छाननी होऊन हे अर्ज जि. प. स्तरावर येतील व निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. एका तालुक्यात साधारणत: दहा किंवा आवश्यकतेनुसार नियुक्त्या होतील.

तालुकास्तरीय समितीही गठित

कृषी कर्ज मित्रांना सेवाशुल्क अदा करण्यासाठी व कामाच्या संनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येत आहे. तालुक्याचे गटविकास अधिकारी समितीचे अध्यक्ष व पं. स. सामान्य कृषी अधिकारी सदस्य सचिव असतील. सहायक सहकारी संस्था निबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी आदी सदस्य असतील. कृषी कर्ज मित्रांना अल्पमुदतीच्या कर्जांतर्गत प्रथम कर्ज प्रकरणी प्रतिप्रकरण दीडशे रूपये सेवाशुल्क मिळेल. मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जांतर्गत नवीन कर्ज प्रकरणी अडीचशे रूपये व कर्ज प्रकरणाचे नूतनीकरण असल्यास दोनशे रूपये सेवा शुल्क मिळेल.

कृषी कर्ज मित्र शेतक-याच्या शिफारसीसह सेवाशुल्काची मागणी बँकेकडे सादर करेल व बँकेकडून त्याची शहानिशा होऊन पंचायत समितीला शुल्क अदा करण्यासाठी सादर करण्यात येईल. या योजनेत इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन जि. प. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अविश्यांत पंडा यांच्यासह कृषी अधिका-यांनी केले आहे.

 

000

 

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत होणार ‘आयकॉनिक वीक’ समारंभाचे उद्घाटन प्राप्तीकर कार्यालयातर्फे अमरावतीत सोमवारी सीएभवनात कार्यक्रम

 

आझादी का अमृत महोत्सव

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत होणार ‘आयकॉनिक वीक’ समारंभाचे उद्घाटन

प्राप्तीकर कार्यालयातर्फे अमरावतीत सोमवारी सीएभवनात कार्यक्रम

 

अमरावती, दि. 3 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात आयकॉनिक वीक समारंभाचे उद्घाटन सोमवारी (6 जून) नवी दिल्लीत विज्ञानभवनात होईल. त्यानिमित्त यादिवशी प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त कार्यालयातर्फे अमरावती येथील सातुर्णा औद्योगिक वसाहत परिसरातील सीएभवनात सकाळी 10 वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राप्तीकर उपायुक्त प्रमोद शाहाकार यांनी दिली.

दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या समारंभाचे थेट प्रसारण देशातील 75 प्रमुख शहरांत होणार असून, त्यात अमरावतीचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयांतर्गत विविध प्रशासकीय सुधारणा, त्याची देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे दर्शन या कार्यक्रमात घडेल. यावेळी डिजीटल प्रदर्शनाचा शुभारंभ व विविध मूल्यांच्या पाच नाण्यांच्या विशेष आवृत्तीचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरणा-या जन-समर्थ पोर्टलचा शुभारंभ यावेळी होईल. ‘मनी फ्लोज, नेशन ग्रोज’ हा लघुपटही यावेळी दाखवला जाईल.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वित्तीय सेवा विभाग, महालेखानियंत्रक, अरूण जेटली राष्ट्रीय वित्तीय प्रबंधन संस्था, अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे 6 ते 11 जूनदरम्यान अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि येथील संस्कृतीचा, महापुरूषांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे श्री. शाहाकार यांनी सांगितले.

 

000

Thursday, June 2, 2022

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा

 



पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा

             अमरावती, दि.2: राज्याचा महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा उद्या (दिनांक 3 जुन 2022) रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:

          सकाळी 5.50 वाजता बडनेरा रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 5.55 वाजता बडनेरा रेल्वे स्थानक येथून वाहनाने अमरावती निवासस्थान कडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

00000

अमरावती-अकोला दरम्यान महामार्गावर होणार काँक्रिटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मिती

 

अमरावती-अकोला दरम्यान महामार्गावर होणार

काँक्रिटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मिती

 

अमरावती दि. 02 (विमाका): ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त राष्ट्रीय महामार्गावर बिटुमिनस कॉक्रिटच्या सर्वात लांब, रस्त्याची अखंडपणे निर्मिती या श्रेणीअंतर्गत माना कॅम्प, अमरावती, छ. 193+100, तहसिल-मूर्तिजापूर, जिल्हा- अकोला, येत्या 3 ते 7 जूनदरम्यान सलग 72 तास काम करुन 80 किलोमिटर लेंथचे काम करण्याची योजना आखण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर (पूर्वीचा क्रमांक सहा) अमरावती ते चिखलीदरम्यान चार टप्प्यात काम सुरु आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI) अमरावती-चिखली विभागात, लोणी गावाजवळ, रस्त्याची अखंडपणे निर्मिती करुन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. तर्फे शुक्रवार 3 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजता सुरु होईल आणि मंगळवार 7 जून, 2022 पर्यंत अखंड सुरु राहील.

त्यामुळे अमरावती-अकोल्यादरम्यान कमी वेळात अधिक काम करण्याची योजना कंत्राटदार कंपनीने आखली आहे. त्यानुसार दि. 3 जून रोजी सकाळी सात वाजाता या कामाला सुरुवात होणार आहे. दि. 7 जूनपर्यंत सलग कॉक्रिटीकरणाचे काम करुन 70 ते 80 किलोमिटर लेंथचे काम करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

000000

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास आता 15 जूनपर्यंत मुदतवाढ

 

 अमरावती, दि.2: माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021 -2022 वर्षासाठी  महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, व विजाभज, इमाव व विमाप्र  प्रवर्गासाठी  नवीन अर्ज व नुतनीकरणाचे  अर्ज भरण्यासाठी आता  दिनांक 15 जून 2022  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संस्था व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना सूचित करण्यात येते की, नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत

भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे. नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या सेंड बँक केलेल्या अर्जांची संबधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटीपूर्तता करुन जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरून घेण्याची  जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहील.

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्हयातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज
रिअप्लाय करण्यासाठी आणि सेंड बँक
  केलेल्या अर्जांची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी केले आहे.

 

00000


विविध 100 पदांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा 7 जूनला

 विविध 100 पदांसाठी

शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा 7 जूनला

·        शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजन

 

 

            अमरावती, दि.2: अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार, दिनांक 7 जून 2022 रोजी एन.एन.एस. हॉल येथे सकाळी 9 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

भरती मेळाव्यात अमरावतीसह नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. विविध कंपन्यातील सुमारे 100 पदांवर योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी आयटीआय उत्तीर्ण, तसेच एमसीव्हीसी ऑटोमोबाईल सेक्टरच्या इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे व वैयक्तिक माहितीसह उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्य श्रीमती एम. डी. देशमुख यांनी केले आहे.

नाशिक येथील फॅबेक्स इंजिनिअरिंग प्रा. लि., अमरावती येथील टेक्नोक्रॉफ्ट इंडस्ट्रीज, औरंगाबाद येथील रुचा इंजिनिअरिंग प्रा. लि., पुणे येथील आयएफबी इंडस्ट्रीज लि. तर औरंगाबाद येथील इपीटोम कंपोनेट्स  या कंपन्यांच्या विविध 100 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी मागील सत्रातील गुणपत्रिका, टी.सी., दोन पासपोर्ट साईज फोटोज, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, बँक पासबुक ही महत्त्वाची कागदपत्रे सोबत आणावी, असे कळविण्यात आले आहे.

                                                         000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...