Thursday, November 17, 2022

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी

 शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन 


        अमरावती, दि. 17 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हंगाम 2022-23 मध्ये मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मूग 7 हजार 755 रूपये, उडीद 6 हजार 600 रूपये व सोयाबीन 4 हजार 300 रूपये प्रती क्विंटल भाव शासनाने निश्चित केले आहेत.  

      नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेल्या तलाठ्याचे सही, शिक्क्यानिशी ऑनलाइन सात-बारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई मार्फत नोंदणी सुरू आहे. 

      वरील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

000000

‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर








 ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ अभियान प्रभावीपणे राबवा

 

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

       अमरावती, दि. 17 : ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा, तालुका तसेच सर्व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासनाने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव ‘बालविवाहमुक्त गाव’ म्हणून घोषित व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्हा महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

            बालविवाहमुक्त जिल्हा अभियान राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावरील प्रशासकीय यंत्रणांना प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, पोलीस विभाग, ग्राम विकास विभाग तसेच आरोग्य विभाग या विभागांना प्रशिक्षण देण्यात येईल. गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविकायांनी गावात होणारे बालविवाह टाळण्यासाठी गावकऱ्यांना समुपदेशन करावे. ‘आमच्या गावात एकही बालविवाह होणार नाही’, असा ठराव ग्रामसभेमध्ये सर्वानुमते मंजूर करुन घेण्यात यावा, जेणेकरुन कोणत्याही गावात बालविवाह होणार असल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळेल आणि प्रशासन यावर कारवाई करु शकेल, अशी माहिती श्रीमती कौर यांनी यावेळी दिली.

            टास्क फोर्स बैठकींतर्गत कोविड काळामध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सद्य:स्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. कोविडमध्ये एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 477, तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 19 आहे. या 19 पैकी 15 बालकांना केंद्र शासनामार्फत 10 लक्ष रुपये तर राज्य शासनामार्फत 5 लक्ष रुपये अशी एकूण 15 लक्ष रुपयांची मदत करण्यात आलेली आहे. या मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती अजय डबले यांनी यावेळी दिली.

            बालकांच्या संरक्षणासाठी 1098 या हेल्पलाईन क्रमांकाला सर्वत्र प्रसिद्धी देण्यात यावी. पोलीस विभागांच्या गाड्यांवर हा हेल्पलाईन क्रमांक लावण्यात यावा तसेच प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात या क्रमांकाची प्रसिद्धी करण्यात यावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना गरजेच्यावेळी हा क्रमांक लक्षात राहील.

            बाल कल्याण समितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. अल्पवयीन अविवाहित गरोदर मुलींचा निवाऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो, अशावेळी या मुलींना प्रसुती होईपर्यंत वन स्टॉप सेंटरला ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.

            जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत दि. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दत्तक विधान सप्ताह राबविण्यात येत आहे. यासाठी www.cara.nic.in (टोल फ्रि क्रमांक 1800111311) या संकेतस्थळावर नोंदणी करुन इच्छुक पालक कायदेशीररित्या मुल दत्तक घेऊ शकतात. अवैध पद्धतीने मुल दत्तक घेतल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतच्या भित्तीपत्रकाचे यावेळी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

00000

Wednesday, November 9, 2022

विधी सेवा प्राधिकरणामार्फत रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

विधी सेवा प्राधिकरणामार्फत  रविवारी नियोजनभवनात महाशिबिर

 

अमरावती, दि. 9 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने

 ‘विधी सेवा महाशिबिर’  रविवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित असतील. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.पी. पाटकर अध्यक्षस्थानी असतील.

            ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाव्दारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि हक हमारा भी तो है 75’ या विषयावर हे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शोएब  खान यांनी केले आहे.

00000 

उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

 

उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो

विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

 

 














अमरावती, दि. ९ : मतदार जागृतीसाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांच्या सहभागात आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सायकल रॅली काढण्यात आली.मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात निरंतर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने याचदिवशी सकाळी शहरात सायकल रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीला हिरवी झेंडी शुभारंभ करण्यात आला.

रॅलीच्या अग्रस्थानी मतदार जागृतीच्या संदेशाने सुशोभित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांसह अनेक अधिकारी, अमरावती सायकलिंग असोसिएशन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

‘उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणांनी वातावरणात उत्साह निर्माण केला.  ‘ओ भाऊ, मी मतदार नोंदणी केली तुमी पण मतदार नोंदणी करा’ असे संदेशफलक घेऊन सहभागींनी शहरभर जनजागृती केली.  जिल्हाधिकारी कार्यालय येथून एस. बी. आय. चौक, वेलकम पॉईंट, पंचवटी चौक, इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, बसस्थानक, सुंदरलाल चौक मार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. 

मतदारांना मतदार नोंदणीचे महत्व कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.  ताणतणावाच्या व धावपळीच्या आजच्या युगात सायकलिंग निरामय आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मतदार जागृतीबरोबरच फिटनेस व आरोग्य जागृतीचा संदेशही या रॅलीतून साधला गेला, असे विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

 

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, तहसीलदार संतोष काकडे, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नायब तहसीलदार श्याम देशमुख, अरविंद माळवे, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे श्री. कुलकर्णी, श्री. कळमकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील, अमित चेडे, चंदू धकिते, आशिष ढवळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

000

Tuesday, November 8, 2022

माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 















माझा एक दिवस बळीराजासाठी

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 

अमरावती, दि. ७ : कृषी विभागाच्या माझा एक दिवस बळीराजा या उपक्रमात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी देवरा येथे शेतकरी बांधवाच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आज संवाद साधला. देवरा येथील शेतकरी बांधवांच्या अडचणी  जाणून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपक्रमात अशोकराव कडू यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी त्यांच्याशी कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना येणा-या अडचणी जाणून घेतल्या, तसेच, पीकपद्धती, उत्पन्न, पशुधन आदी बाबींची माहिती घेतली. शेतकरी बांधवांना येणा-या अडचणींचा तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. तसेच बीजप्रक्रियेबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 गावाच्या सरपंच मनीषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी,  जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कळसकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गावातील सभागृहात जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शेतकरी बांधवांशी बोलताना श्रीमती कौर म्हणाल्या की, शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गावात गोदाम निर्माण करण्याची मागणी होत आहे. देवरा हे गाव पोकरा योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. गावानजिक पेढी नदीचे आवश्यक तिथे खोलीकरण करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी बंधाराही निर्माण करण्यात येईल. अवजार बँकेसारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. गावक-यांच्या मागणीनुसार रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खारपाणपट्ट्यातील तूर व हरभरा डाळ वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत. विविध योजनांद्वारे गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू होण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके यांनी प्रास्ताविक केले. तंत्र व्यवस्थापक रूपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

Friday, November 4, 2022

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रवेश घेण्याऱ्यांसाठी सूचना

 

                अमरावती दि.4 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या व मे-जून 2023 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यत) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. दि. 7 नोव्हेंबर (रात्री 11.59 वाजेपर्यंत) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 18 नोव्हेंबपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात सादर करावे.

उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-scc.ac.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासंबंधीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव उल्हास गरड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती आणि मतदार नोंदणी करा पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ

 



अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

 

9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती आणि मतदार नोंदणी करा

 

पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ

 

अमरावती, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दि. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.

तथापि, याच कार्यक्रमांतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर  दि. 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्विकारण्यात येणार असून या काळामध्ये सुध्दा पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.

           दि. 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही, निरंतर मतदार नोंदणी             ( Continuous Updation) निवडणूकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी करता येईल. त्यानुसार सर्व पात्र पदवीधर मतदारांनी उक्त कालावधीमध्ये मतदार नोंदणी करावी, असे विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी कळविले आहे.

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...