Tuesday, October 10, 2023

‘महिला आयोग आपल्या दारी’ पीडित महिलेच्या आर्थिक सक्षमतेसाठी आराखडा तयार करा - रुपाली चाकणकर







 ‘महिला आयोग आपल्या दारी’

 

पीडित महिलेच्या आर्थिक सक्षमतेसाठी आराखडा तयार करा

 

- रुपाली चाकणकर

 

अमरावती, दि. 10 (जिमाका): महिलांवरील अन्याय, अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तसेच त्यांना तक्रारी दाखल करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आयोगामार्फत जनसुनावणीचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पीडित महिलेला आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत एकत्रित आराखडा तयार करण्यात यावा. या प्रकल्पाची शिफारस राज्य महिला आयोगामार्फत राज्य शासनाला करण्यात येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले.

‘महिला आयोग आपल्या दारी’, या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारींची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज घेतली. त्यांनतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे विविध शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्या आभा पांडे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महिला आयोगातर्फे ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची सुनावणी घेण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रारी वर्ग करण्यात आल्या असून या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिले.

बाल विवाह रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी. ज्या ग्रामपंचायत हद्दीत बाल विवाह होईल व तेथे त्यांच्या वयाची खोटी नोंद आढळून आल्यास तेथील सरपंच, नोंदणी अधिकारी, लग्नाची पत्रिका छापणारे प्रिंटर, लग्न सभागृह तसेच लग्न समारंभाच्या आयोजन कार्यात सहकार्य करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील. याबाबत कठोर पावले उचलल्यास बाल विवाहावर आळा बसेल. विवाह नोंदणीसाठी नियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही आपापल्या भागात बाल विवाह होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बाल विवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गर्भलिंग निदान चाचणी होऊ नये यासाठी आरोग्य विभागामार्फत कठोर कार्यवाही करण्यात यावी. बरेचदा महिला भावनिकतेला बळी पडून मानवी तस्करीमध्ये गुरफटल्या जातात. अशावेळी पालक आणि मुलांचा संवाद वाढणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शालेय स्तरावर शिक्षक, पालक संघटनेच्या माध्यमातून

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. यासाठी सामाजिक संस्थांचीही मदत घ्या. जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, ही बाब गंभीर आहे. यावर लवकरच कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.

जिल्हा परिषद अमरावती मार्फत जिल्ह्यामध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमातंर्गत विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये प्राथमिकच्या 711 शाळा व माध्यमिकच्या 44 अशा एकूण 755 शाळांचा समावेश आहे. याबाबत श्रीमती चाकणकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कार्य चांगले असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, परिवहन, दामिनी पथक, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, पोलीस दीदी अशा विविध विभागांचा आढावा घेतला. कौटुंबिक तक्रारी सोडविण्यासाठी भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन आवश्यक आहे. आजकाल विभक्त कुटुंब पध्दतीमुळे पाल्यांशी संवाद कमी होत आहे. यासाठी घरातील वातावरण संवादी असावे. यासाठी पालकांनीही लक्ष द्यावे. तसेच स्पर्धेच्या युगामुळे आपल्या जोडीदाराविषयी विवाहेच्छुकांच्या अपेक्षा बदलत आहे. यासाठी लग्नापूर्वी समुपदेशन होणे आवश्यक असल्याचे श्रीमती चाकणकर यावेळी म्हणाल्या. 

श्रीमती चाकणकर यांनी काल (दि. 9) धारणी तालुक्यातील कढाव गावाला भेट दिली. तेथे त्यांनी विविध कुटुंबांना भेटी दिल्या. शालेय विद्यार्थी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापित बचत गटांना भेटी दिल्या. माविममार्फत मिळालेल्या कृषी औजार बँकेलाही भेट दिली. येथे तेजस्वी अर्थसहाय्य योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून अपंग महिलेने शिलाई मशीन घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. या महिलेशी त्यांनी संवाद साधला. तसेच वलगाव, अमरावती येथील अंगणवाडी केंद्र 706 येथे भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी बालकांसह अंगणवाडी सेविकांसमवेत संवाद साधला.

0000000


‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी प्राप्त सुनावणीत दांम्पत्याचे मनोमिलन

 





‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीमध्ये 95 तक्रारी प्राप्त

सुनावणीत दांम्पत्याचे मनोमिलन

 

            अमरावती, दि. 10 (जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाकडे तक्रारी वर्ग करण्यात आल्या असून या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी यावेळी दिले.

सुनावणी दरम्यान दहा वर्षापासून कौटुंबिक वितुष्ट असणारे दांम्पत्य आले होते. या सुनावणी दरम्यान त्यांचे समुपदेश करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपसी सहमतीने आपल्या अपत्यांसाठी एकत्र होण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्या दांम्पत्याचा श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तक्रारींमध्ये वैवाहिक, कौटुंबिक 71, सामाजिक 4, आर्थिक, मालमत्ताविषयक 2, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या छळाविषयी 4, कामाच्या ठिकाणी छळ 1 तर इतर 13 अशा एकूण 95 तक्रारी सुनावणीसाठी प्राप्त झाल्या.

यावेळी आमदार सुलभा खोडके, राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महिला व बालविकास विभागीय उपायुक्त विलास मरसाळे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर पाटील, विक्रम साळी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर. पाटील, उपमुख्य कायकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

मतदार नोंदणी जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 











मतदार नोंदणी जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 

         अमरावती, दि. 10 :  मतदार नोंदणी  अभियानाच्या जनजागृतीसाठी अमरावती विधानसभा मतदार संघ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आज  रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून आज सकाळी रॅली सुरु झाली. यामध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे प्राध्यापक व विद्यर्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मतदार नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. ही रॅली मालवीय चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ मार्गे भारतीय महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. रॅली दरम्यान समाजकार्य महाविद्यालय बडनेरा व ब्रिजलाल बियाणी सायन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदार नोंदणीचा संदेश दिला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अनिल भटकर यांनी तर आभार तहसीलदार विजय लोखंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार सुनील रासेकर, नायब तहसीलदार टिना चव्हाण, डॉ. वैभव जिचकार, डॉ. अंबादास घुले, डॉ. भगत, सत्यजित थोरात, भारत कांबळे यांनी  परिश्रम घेतले.

00000

महाबॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाव्दारे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 महाबॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाव्दारे व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 

          अमरावती, दि. 10: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), अमरावती यांच्या वतीने 30 दिवसाचे दोन चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थींना विविध योजना, वित्तपुरवठा व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

 

             टू व्हिलर दुरुस्ती प्रशिक्षण दि. 11 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आले. प्रशिक्षण निशुल्क असून निवासी स्वरूपाचे होते. यामध्ये दुचाकीच्या विविध भागांची ओळख, सेवा, दुरूस्तीसाठी वापरावयाची साधने, वाहनांच्या सर्व्हिसिंग, दुरूस्तीसाठी वापरण्यात येणारी साधने इत्यादीचे मुलभूत व आधुनिक प्रशिक्षण थेअरी, डेमो आणि प्राक्टिकल प्रशिक्षण कृष्णा चव्हाण यांच्याकडून देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत पांडे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयरोजगाराचे प्रकार, जिल्हा उद्योग केंद्र राबवित असणाऱ्य योजना, प्रकल्प अहवाल व वित्तपुरवठाबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थाचे संचालक निखिल भस्मे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिपक माहुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता अनिता तरारे, धनंजय पांडे, शैलेश वानखडे व गजेंद्र बोबडे व यांचे सहकार्य लाभले.

00000

 

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात व्यावसायिक

अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु; 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 10: सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी  विभागीयस्तर, जिल्हा व तालुकास्तरावरील वसतीगृहात प्रवेशासाठी सोमवार दि. 30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

  जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासर्वग आणि आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोई-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2023-24 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश अर्ज  विभागीय स्तरावरील संत गाडगेमहाराज मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा, अमरावती येथे प्रवेश अर्ज स्विकारले जातील. तसेच मुलींच्या वसतिगृहामध्ये व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कॅम्प रोड, अमरावती येथे स्विकाराले जातील. तर तालुका स्तरावरील मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्येच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशअर्ज स्विकारले जातील.

 संबंधित तालुका व जिल्हास्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत संबंधित गृहपाल/गृहप्रमुख यांचेकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 5 नवीन रास्त भाव दुकान संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

 नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 5 नवीन रास्त भाव दुकान

संस्थांनी अर्ज करण्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 10 : अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाच गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने सुरू करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानांसाठी इच्छुक संस्था व गटांनी 27 ऑक्टोबरपूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांनी केले आहे. 

  

नवीन दुकानांची क्षेत्रे

 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जसापूर, बोरगाव, भगुरा, पिंप्री पोच्छा, निंभोरा लाहे  या 5 गावांमध्ये रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

निवडीचा प्राथम्यक्रम

 

नवीन रास्तभाव दुकानांसाठी संस्थेची निवड करताना ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा न्यास यांना अर्ज करता येईल. याच प्राथम्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदयाव्दारे करणे आवश्यक राहिल.

 

अर्जाची प्रक्रिया

 

इच्छुक संस्था, गटांना विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिल  कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी  10 ते सायंकाळी  6 वाजेदरम्यान प्राप्त होऊन दाखल करता येतील. अर्जाची विक्री व स्वीकृत करण्याची मुदत  दि. 27 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. रास्त भाव दुकानाचा परवाना मंजूर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. रास्त भाव दुकानाचे अर्ज 100 रू. चलानाव्दारे लेखाशीर्ष 4408 व्दारे भरणा करून संबंधित तहसिल कार्यालयामधून प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

00000

 

सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा

 सर्व खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी

ई-आर 1 सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा

 

अमरावती, दि.10 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाइन मिळणार असून त्यासाठी  www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार कायदा 1959 व नियमावनी 1960 कलम 5(1) व कलम 5(2) अन्वये त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

 

 सप्टेंबर- 2023 अखेर संपणाऱ्या  त्रैमासिक करिता ई-आर 1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी उद्योजक, आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाइन ई-आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनावर विहित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रांजली बारस्कर यांनी कळविले आहे.

00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...