Wednesday, March 18, 2020

रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी नाही


                गर्दी टाळण्यासाठी टोकन देऊन नियोजित वेळेत वाटप करावे
                        -जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 18 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रिक पडताळणी न करता धान्य वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना ई- पॉस उपकरणांवर अंगठा, बोट लावण्याची गरज राहणार नाही व विषाणूचा संसर्ग टाळता येईल. त्यादृष्टीने अन्न व पुरवठा विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन सर्व रास्त भाव दुकानदारांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.  
शिधा वस्तूंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्त भाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून वाटप करता येणार आहे.  त्याचप्रमाणे, रास्त भाव दुकानांवर गर्दी होणार नाही, यासाठी लाभार्थ्यांना टोकन देऊन नियोजित वेळी दुकानावर येण्याच्या सूचना द्याव्यात. धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेवून रांगेत उभे राहतील, याचीही दक्षता घ्यावी. ही दक्षता घेत असताना कोणताही लाभार्थी अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याचीही काळजी घ्यावी. धान्यवाटप करताना धान्याचा अपहार, अनियमितता होता कामा नये. वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. ही सुविधा 31 मार्चपर्यंतच लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कल्याणकारी संस्थांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातून देण्यात येणारे धान्य वाटप करताना सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवूनच ई-पॉस उपकरणे हाताळावीत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
                                                000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार