Tuesday, March 24, 2020

संत्रा तोडणीच्या कामास प्रतिबंध नाही


दक्षता घेऊन काम करण्यास मान्यता

अमरावती, दि. 24 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 नुसार निर्बंध लागू करण्यात आले असले तरी फळे, भाजीपाला, किराणा, औषधे आदी जीवनावश्यक वस्तू त्यातून वगळण्यात आल्या आहेत.  संत्रा हे फळ जीवनावश्यक वस्तूंतर्गत येत असल्याने संत्रा काढणीच्या कामाला प्रतिबंध नाही. तथापि, आवश्यक दक्षता घेऊन हे काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. 
  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही याबाबत दखल घेऊन तत्काळ कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीद्वारे दिले होते.  जिल्ह्यात मृगबहराचा संत्रा झाडावर शिल्लक असल्याने तोड होणे आवश्यक आहे. त्यामुळे हे काम करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राज्य संत्रा उत्पादक संघातर्फेही करण्यात आली होती. जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू केला असला तरी अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे संत्रा तोडणीच्या कामाला परवानगी आहे. मात्र, ही कामे करताना मजूरांच्या आरोग्याच्या रक्षणाचीही काळजी घ्यावी. काम करताना विशिष्ट अंतर राखणे, स्वच्छता साधने उपलब्ध असणे आदी दक्षतेचे पालन व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत कार्यवाहीसंदर्भात उपविभागीय अधिका-यांनाही निर्देश देण्यात आले आहेत.
                                    000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...