Wednesday, September 4, 2019

कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी


अमरावती, दि. 4 : शेतकरी व शेतमजुरांनी किटकनाशकांच्या फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना कृषी विभागाव्दारे जारी करण्यात आल्या आहे.
किटनाशकांची फवारणी करतांना सर्वप्रथम लेबलमधील दिशानिर्देश काळजीपूर्वक वाचावे आणि त्याचे अनुकरण करावे. लेबलवरील चेतावणी व सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे. कीटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हा कडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह अथवा खून असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. कीटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दूर ठेवावीत. कीटकनाशके नेहमी त्यांच्या मुळ डब्यात साठवावी. आणि कधीही खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये. कीटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादींचा पुनर्वापर करू नये. फवारणी करिता गळक्या फवारणी यंत्राचा वापर करू नये.
कीटकनाशके हाताळतांना सुरक्षीततेच्या दृष्टीने रबरी हातमोजे, लांब पॅन्ट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत तसेच पायात बुट, नाक व तोंडावर माक्स अथवा रेस्पायरेटरचा वापर करावा. कीटकनाशके वापरल्यानंतर लगेच कपडे बदलुन हात धुवावेत. फवारणीसाठी वापरायची कपडे स्वतंत्र ठेवावीत तसेच ती वेळोवेळी स्वच्छ धुवावीत. कीटकनाशके विहिर किंवा इतर जलस्त्रोतांच्या जवळपास कधीही मिसळू नयेत अथवा त्याठिकाणी कीटकनाशके वापरलेली भांडी स्वच्छ करू नये. उघड्या हातांनी कीटकनाशके कधीही ढवळू नये. याकरिता काठीचा वापर करावा तसेच कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे. कीटकनाशकांचे शिल्लक द्रावण पडीक जमिनीत खड्डा करुन पुरुन टाकावे.
बंद पडलेल्या नोझल स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून थुंकू नये त्यासाठी तार किंवा काडी किंवा टाचणीचा वापर करावा. रिकाम्या पोटी फवारणी करू नये. कीटकनाशके वापरतांना खाऊ-पिऊ किंवा धूम्रपान करू नये. खाण्यापिण्याच्या पूर्वी हात आणि चेहरा साबनाने स्वच्छ धुवावा. कीटकनाशक फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावे.  कीटकनाशके शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तीने कीटकनाशके हाताळू नये. फवारणी करून आल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती विजय चवाळे यांनी सर्व शेतकरी बंधूंना केले आहे.
000000

प्लास्टिक निर्मूलनासाठी शासकीय कार्यालयांनी पाऊल उचलावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
         

अमरावती, दि. 3 : प्लास्टिक निर्मूलन ही काळाची गरज असून, त्यासाठी विविध शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी  कार्यालयातील आपल्या दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटवावे व पर्यायी वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
            प्लास्टिक कच-याच्या निर्मूलनासाठी व प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.  प्लास्टिक कच-यापासून उपयुक्त विविध वस्तू तयार करून त्याचा शहर सौंदर्यीकरणासाठी किंवा इतर सुविधांसाठी वापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी अभ्यास करून अंदाजित खर्चासह प्रकल्प अहवाल सादर आदेशही जिल्हाधिका-यांनी अभियांत्रिकी तज्ज्ञांना नुकतेच दिले आहेत. त्याचप्रमाणे, शासकीय, निमशासकीय कार्यालयांनीही दैनंदिन वापरातून प्लास्टिक हटविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 विविध कार्यालयांत कार्यक्रम, सभा, बैठकांसाठी प्लास्टिक बाटलीबंद पाणी मागवले जाते. त्यानंतर या बाटल्यांचा प्लास्टिक कचरा निर्माण होतो. अशा वेळी पाणी जार किंवा पर्यायी वस्तूंच्या माध्यमातून वापरता येणे शक्य आहे. चहा, नाश्ता, जेवणासाठी चिनीमाती, स्टील किंवा पर्यायी कप, कागदी प्लेटस् वापरता येणे शक्य आहे. अनेक वर्षांची सवय एकदम थांबणार नसली तरी त्याची सुरुवात आपल्या सर्व कार्यालयांनी करणे आवश्यक आहे. कार्यालयाप्रमुखाने आपल्या अधिकारी- कर्मचा-यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत सांगावे, त्यांना प्रोत्साहित करावे. आपण सर्वांनी प्लास्टिकला नकार दिला तरच हळूहळू का होईना इतरत्रही प्लास्टिकचा वापर कमी- कमी होत जाईल. यामुळे प्लास्टिक कच-याची समस्या काही प्रमाणात निश्चित दूर होईल व त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
 महापालिकेकडून प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. त्या कच-यापासून पेव्हिंग ब्लॉक, व्हर्टिकल गार्डनसाठी उपयुक्त बाबींच्या निर्मितीसह रस्ता बांधकामातही वापर शक्य आहे. यासाठी अभियांत्रिकी तज्ज्ञ, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून नव्या संकल्पनांवर आधारित प्रकल्प अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यापूर्वी बैठकीत दिले आहेत. 
                                                                        000

Tuesday, September 3, 2019

आकाशवाणीवर ‘हॅलो इन’मध्ये कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा संवाद


·         शनिवार-रविवारी होणार प्रसारण
अमरावती, दि. 3 :  महाराष्ट्रातील कृषीजीवन, पारंपरिक व आधुनिक शेती पद्धती, आव्हाने व उपाय, शासनाच्या योजना व उपक्रम याबाबत माहिती देणारी  राज्याचे कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मुलाखत अमरावती आकाशवाणीच्या ‘हॅलो इन’ या लोकप्रिय कार्यक्रमात शनिवारी व रविवारी ( 7 व 8 सप्टेंबर)  प्रसारित होणार आहे.  
            आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचे कार्यक्रमप्रमुख एकनाथ नाडगे यांनी ही मुलाखत घेतली आहे. बदलत्या पर्यावरणातही कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न, महापूर, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, कृषी संजीवनी, पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महाकर्जमाफी, जलसंवर्धन, सूक्ष्म सिंचन, जैविक शेती आदी विविध योजना व उपक्रमांबद्दल विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली आहेत.
            कृषी क्षेत्रातील बदल, विकास व दीर्घकालीन उपाययोजना याबाबत उपयुक्त माहिती देणारी ही मुलाखत शनिवार व रविवारी सकाळी 10.05 वाजता दोन भागांत प्रसारित होणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामजीवनाचे वर्णन करणारी कृषी मंत्र्यांना आवडणारी अनेक सुंदर गाणीही या कार्यक्रमातून ऐकायला मिळणार आहेत. ही कार्यक्रम श्रोत्यांना निश्चित आवडेल, असा विश्वास श्री. नाडगे यांनी व्यक्त केला.   
                                                                        000

Monday, September 2, 2019

वनकर्मचा-यांनी ई- 1 वाघिणीला केले जेरबंद वाघिणीची रवानगी गोरेवाडी प्राणीसंग्रहालयात






अमरावती, दि. 2 : मानवी जिवितास असलेला धोका लक्षात घेऊन वनअधिकारी- कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न करून ई-1 या वाघिणीला जेरबंद केले आहे. आता तिची रवानगी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात केली जाणार आहे. 
यापूर्वी ही वाघिण ब्रम्हपुरी विभागातील वनक्षेत्रात वावरत होती. तिला मेअखेरीस जेरबंद करण्यात आले होते. तिच्या पुनर्वसनासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोलार या गाभा क्षेत्रात मुक्त करण्यात आले. मात्र, मेळघाटातही तिचा लोकवस्तीनजिकच वावर राहिल्याने व तिच्यापासून धोका असल्याने या वाघिणीला प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या आदेशानुसार काल रविवारी सायंकाळी बंदिस्त करण्यात आले.
गाभा क्षेत्रात ही वाघिण दोन महिने मुक्तपणे वावरत होती. गाभा क्षेत्रात असतानाही या वाघिणीने लोकवस्तीनजिकच्या जंगलात राहणे पसंत केले. या वाघिणीने 30 ऑगस्ट रोजी दादरा येथील रहिवाशी शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला केला. दुर्देवाने त्यात त्यांचे निधन झाले. त्यानंतर मृतकाच्या शोधार्थ गेलेल्या दिलीप चव्हाण यांच्यावरही वाघिणीने हल्ला करून जखमी केले. वनविभागाद्वारे शासकीय रुग्णालयाद्वारे दिलीप चव्हाण यांच्यावर उपचार होत आहेत.
केकदाखेडा येथील सात वर्षांच्या बालिकेवरही या वाघिणीने 2 जुलैला हल्ला केला होता. वाघिणीकडून झालेली मनुष्यहानी व संभाव्य जिवितहानी लक्षात घेऊन तिला जेरबंद करण्याची परवानगी वन्यजीव कार्यालयाकडून मिळाली. त्यानुसार वनविभागाने तत्काळ हालचाली करून पथक नियुक्त केले. हे पथक उपग्रह संकेत व प्रत्यक्ष अँटेनाकडून मिळणा-या माहितीनुसार तिचा मागोवा घेत होते. 31 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता गोलाई गावाजवळ हे श्वापद वावरत असल्याची माहिती मिळाली. 
त्यानुसार 1 सप्टेंबरला सकाळपासून पशुवैद्यकीय अधिकारी, जलद बचाव कृती दल, ळघाट व गुगामल अभयारण्याचे पथक जंगलात तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. जंगलात सुरक्षितपणे शोध घेण्यासाठी हत्तीही तैनात करण्यात आले. जनावर बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन व आवश्यक उपकरणे घेऊन निघालेल्या या पथकाला दुपारपर्यंत तिचे अचूक स्थान कळले. त्यानुसार सर्वांनी तातडीने हालचाली करून वाघिणीला गाठले व तिला बेशुद्ध करण्यात आले. ही बेशुद्ध वाघिण तत्काळ पिंज-यात बंद करण्यात आली. जेरबंद झालेली ही वाघिण आता सुखरूप आहे. आज तिला गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाकडे पाठविण्यात येत आहे.
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी,  विभागीय वनाधिकारी एच. एस. वाघमोडे, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मोहिमेसाठी मार्गदर्शन केले. हिरालाल चौधरी, एस. बी. मोरे, डॉ. रश्मी गोखले,  डॉ. सुबोध नंदगवळी, डॉ. चेतन पातोंडे, डॉ. शरद पलखाडे, संतोष कासदेकर, अमोल गावनेर, राजेश धिकार, मंगेश मावस्कर, मनीराम चतुरकर, तुलसीराम कासदेकर, जीवन दहिकर, संजय धिकार, श्रीकांत गवई, वैभव गुरव, फिरोज खान, आसिफ पठाण, मुकेश जावरकर, अनिल चिमोटे आदींनी मोहिम यशस्वी केली.

Sunday, September 1, 2019

वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन 35 हजार मेगावॅट वहनक्षमतेच्या ग्रीडची निर्मिती - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे





   'महापारेषण'च्या 'प्रकाश सरिता' इमारतीचे उद्घाटन

                                           

               अमरावती, दि. 1 : भविष्यात वीजेची वाढती मागणी लक्षात अधिक वीज निर्मिती व 35 हजार मेगावॅट वहनक्षमतेच्या ग्रीड निर्मितीचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. वीज सेवेतील गत चार वर्षांतील लोककल्याणकारी सुधारणांप्रमाणेच हे कामही यशस्वीपणे पूर्ण करू, असे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.
        येथील पॉवर हाऊस परिसरात महापारेषण कंपनीच्या 'प्रकाश सरिता' या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार नवनीत राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, सुरेखा लुंगारे, कंपनीचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत व सतीश अणे, महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वीज अभियंता बेरोजगारांच्या बारा आठवड्याच्या प्रशिक्षणाचा शुभारंभही यावेळी झाला. 
श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वीज, रस्ते, पीकाला चांगला भाव व रोजगाराची उपलब्धता असावी या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार ऊर्जा विभागाने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले. पूर्वी शेतकरी बांधवांना वीज जोडणी मिळण्यात अडथळे येत होते. ही प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात आली. त्यामुळे गत चार वर्षांत राज्यात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली.  
अमरावती विभागाचे काम राज्यात अव्वल आहे. अमरावती विभागात महावितरणने 34 उपकेंद्रे उभी केली आहेत. सुमारे 700 कोटी रुपयांची कामे झाली. त्यामुळे वीजपुरवठ्याची प्रक्रिया भक्कम झाली व  टेक्सटाईल पार्कसह विविध उद्योगांना चालना मिळाली. मेळघाटात मध्य प्रदेशातून वीज आणली. अजून 24 गावांत वीज पोहोचायची आहे. सध्या तिथे सौर ऊर्जा यंत्रणा पुरविण्यात आली आहे. लवकरच तिथे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण करण्यात येईल. गव्हाणकुंडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, त्याद्वारे 18 हजार शेतक-यांना वीज मिळणार आहे. लाँड्री व्यावसायिकांसाठी वीजेचा दर 12 रूपयांहून 5 रु. 70 पैश्यांपर्यत कमी केल्याचेही त्यांनी सांगितले.  
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात 12 कोटी नागरिक असून, 25 हजार मेगावॅट वीज खर्च होते. उत्तरप्रदेशात लोकसंख्या अधिक असूनही तेथील वीजवापराचे प्रमाण कमी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा व अपारंपरिक उर्जेला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र वीजेवर चालणारी वाहने असावीत, असेही त्यांनी म्हटले आहे. उद्योगांच्या विकासासह भविष्यात वीजेची गरजही वाढणार आहे. सध्या 25 हजार मेगावॅट वहनक्षमतेचे ग्रीड आहेत. ही क्षमता 35 हजार मेगावॅटवर नेण्यात येईल.     
सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा सौर पंप केवळ 16 हजार रू. दरात शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिला. सौभाग्य योजनेत 100 टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून कंत्राट परवाना प्रक्रिया सुलभ केली. परवाना देण्याचे अधिकार जिल्ह्यांना दिले. विदर्भ व मराठवाड्यात इलेक्ट्रिक ड्युटी माफ करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.  
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, विदर्भ- मराठवाड्यात गत चार वर्षांत अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. वीज खात्याचे त्यात मोठे योगदान आहे. सौर पंपाची उपयुक्तता पाहता या योजनेचा विस्तार व्हावा. वीजेच्या ओव्हरहेड लाईन्स या वस्तीच्या क्षेत्रात भूमिगत करण्यात याव्यात. वीजविषयक कामे- कंत्राट मिळवण्यासाठी लागणारी अर्हता प्रशिक्षणामुळे बेरोजगार अभियंत्यांना प्राप्त होणार आहे. त्यामुळे ते व्यवसाय करण्यासाठी सक्षम होतील, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले.
            कार्यक्रमाला अधिकारी- कर्मचारी यांच्यासह वीज अभियंते व नागरिक उपस्थित होते.

पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी योगदान द्यावे - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे आवाहन

पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन




पुढची पिढी सशक्त झाली तर देश सशक्त होईल. पोषण अभियानात अमरावती जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून यंदा तो पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले.

 महिला व बालविकास विभागातर्फे वरुड येथील दीनदयाळ उपाध्याय सभागृहात केंद्र शासन पुरस्कृत पोषण अभियानात पोषण माह उपक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,गजाननराव खडसे, विजयभाऊ श्रीराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, पोषण अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वदूर जागृती व्हावी. अंगणवाडी सेविकांकडून चांगली कामगिरी होत आहे. वरूडमधील चार अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या अभियानातही सर्वांनी उत्तम योगदान द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने महिला व बालकल्याणासाठी अनेक योजनांना चालना दिली आहे. अमरावती स्त्री रुग्णालयात मिल्क बँक सुरू करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उपक्रम ठिकठिकाणी राबवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.


श्रीमती बोंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व नागरिकांनी पोषण जागृतीची शपथ घेतली. श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले.  साधना पांडे यांनी स्वागतगीत सादर केले. 
    ०००

दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक उपकरणे मिळणार समाजातील सर्व स्तरांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

दिव्यांगांची तपासणी व उपकरण नोंदणी शिबीर





अमरावती, दि.१ : समाजातील कुठलाही घटक वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  दिव्यांग बांधवांसाठी शासनाने अनेक हितकारक निर्णय घेतले आहेत, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे सांगितले.

 जिल्हा परिषदेतर्फे  वरुड येथील दीनदयाळ उपाध्याय सभागृहात दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात,गजाननराव खडसे, विजयभाऊ श्रीराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     या शिबिरात वरुड व मोर्शी तालुक्यातील दिव्यांग बांधव सहभागी झाले. त्यांची तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली व उपकरणासाठी मोजमाप घेण्यात आले. दिव्यांग बांधवाना 'अलिम्को'कडून आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. 
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, समाजाच्या सर्व स्तरांची दखल घेत देशभरात नव्या योजना व उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चालना दिली. राज्यातही अनेक निर्णय झाले. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेत मानधन वाढविण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी तीन टक्के निधो दिव्यांग कल्याणासाठी वापरण्याची तरतूद करण्यात आली आहे.
श्री. थोरात यांनी प्रास्ताविक केले.  

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...