Sunday, December 6, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

 





महापरिनिर्वाणदिनानिमित्त कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

 

संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करूया

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 6 : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवतेची महान मूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहेत. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

            महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,  एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसा निश्चय व निर्धार नागरिक म्हणून आपण सर्वांनी करूया.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, किशोर बोरकर, अशोक दहिकर, ज्येष्ठ पत्रकार ऍड. दिलीप एडतकर, नाना नागमुखे, उमेश घुरडे, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, राजकुमार मून, कमलताई कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

00000

Saturday, December 5, 2020

मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री यशोमती ठाकूर

जागतिक मृदा दिन कार्यक्रम



मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी

- पालकमंत्री यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 5 : मृदेचे कृषी क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असून, कृषी व पर्यावरणाच्या जपणुकीसाठी मृदसंवर्धन ही लोकचळवळ व्हावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रम तालुका बीज गुणन केंद्र,धानोरा गुरव (ता नांदगाव खंडेश्वर) येथे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.  दर्यापूरचे आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे , किटकशास्त्रज्ञ पी. सिंग,  अनिल ठाकूर, अनिल खर्चान ,श्रीमती प्रीती रोडगे,उपविभागीय कृषी अधिकारी,राहुल माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मृदसंवर्धन दिन हा केवळ औचित्य म्हणून साजरा न करता त्याची लोकचळवळ झाली पाहिजे. रासायनिक खतांचा संतुलित वापर व सेंद्रिय शेतीपद्धतीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. कृषी विभागाने गावोगाव प्रचार व प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले .

गावातील व परिसरातील प्रगतीशील शेतकरी व महिला गटाच्या शेतकरी सदस्या  उपस्थित होत्या.  मृद तपासणी व जमीन आरोग्य पत्रिका बाबत घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यशाळेत कृषी शास्त्रज्ञांनी  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चवाळे यांनी, सूत्रसंचालन सीमा देशमुख यांनी केले. प्रीती रोडगे यांनी आभार मानले .

 

00000


महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे













महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

अमरावती, दि. ५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा देशातील या प्रकारचा सर्वोत्तम महामार्ग ठरेल. या महामार्गाची कामे गतीने होत असून, येत्या सहा महिन्यात शिर्डीपर्यंत हा मार्ग खुला होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज अमरावती जिल्हयातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी  केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड,  माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज  सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती   महामार्गाची अमरावती जिल्ह्यातील लांबी सुमारे ७४ कि. मी. असून, मुख्यमंत्री  ठाकरे यांनी पूर्ण झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करून पाहणी केली व कामाचा दर्जा, गुणवत्ता व वेग याबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प आहे. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट मार्ग ठरेल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत येत्या १ मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षात संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतूक मुंबईपर्यंत सुरळीत होईल.

राज्यातील इतर रस्त्यांच्या बांधकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रकल्प संचालक संगीता जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले.

समृद्धी महामार्गावर उतरले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूरनजिक समृद्धी महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर सकाळी साडेअकराच्या दरम्यानमुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचे  हेलिकॉप्टरने आगमन झाले. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. वन मंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

00000

 

 


Wednesday, December 2, 2020

 









शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

विलासनगरातील गोदामात मतमोजणी

अधिकारी व कर्मचारी याना आज पुन्हा प्रशिक्षण

 

अमरावती, दि. 2 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही मतमोजणी होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेचे संपूर्ण प्रशिक्षण व विविध सूचना यावेळी देण्यात आल्या.

शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी विलासनगरातील गोदामात होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी कर्मचारी-अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणीची सुरवात सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. सुरवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येतील. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येतील. एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशी क्रमश: पसंतीची मते मोजण्यात येतील.

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, माध्यम कक्ष, भोजन कक्ष, सुरक्षा कक्ष आदी विविध बाबींची तयारी आज पूर्ण करण्यात आली आहे.

00000

 

Tuesday, December 1, 2020

अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर खबरदारी


अचलपूरमध्ये कोविड रूग्णाने बजावला मतदानाचा हक्क

 

अमरावती, दि. 1 : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 77 केंद्रांवर आरोग्य तपासणी पथकांसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती. कोविड-19 ची लक्षणे आढळलेल्या किंवा पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टोकन देऊन दुपारी 4 ते 5 ची वेळ मतदानासाठी देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर विलगीकरण कक्षाचीही सोय करण्यात आली होती. त्यानुसार विभागात एकूण कोविड-19 संशयित आढळलेल्या आठ मतदारांनी दुपारी चार ते पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य पथकाकडून पुरेशी काळजी घेऊन या मतदारांना त्यांचे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात आले. आवश्यक तिथे पीपीईही कीटही उपलब्ध करून देण्यात आले.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील मतदान केंद्रावर मतदार असलेल‌्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णालाही टोकन प्राप्त करून देण्यात आले व दुपारच्या निर्धारित वेळेत येऊन या मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य व मतदान पथकांनी पुरेशी खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

                                   00000

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 82.91 टक्के मतदान

 












शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी 82.91 टक्के मतदान

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज झालेल्या मतदानाची अंदाजित आकडेवारी 82.91 टक्के अशी आहे. त्यानुसार सायंकाळी पाचपर्यंत  एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 29 हजार 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 77 मतदान केंद्रावर मतदान झाले. निवडणुकीसाठी 27 उमेदवार रिंगणात होते. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रावर आरोग्य तपासणी पथके नियुक्त करण्यात आली होती. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमीटर व आवश्यकता पडल्यास पीपीई कीट आणि  विलगीकरण कक्षाची व्यवस्थाही सर्व केंद्रांवर करण्यात आली होती.

विभागातील पाचही जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केली होती. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या रांगांत व्यक्ती-व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्किंग करण्यात आले होते.

मतदान आकडेवारीनुसार, सकाळी दहा वाजेपर्यंत 10.11 टक्के, दुपारी 12 वाजेपर्यंत 25.11 टक्के, दोन वाजेपर्यंत 46.71 टक्के, तर सायंकाळी चार वाजेपर्यंत 68.65 टक्के मतदान झाले. अमरावती विभागात एकूण 35 हजार 622 मतदारांपैकी 26 हजार 60 पुरूष तर 9 हजार 562 स्त्री मतदार आहेत. त्यातील 21 हजार 865 पुरूष, तर 7 हजार 669 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी पाचपर्यंत अमरावती जिल्ह्यातील 10 हजार 386 मतदारापैकी 5 हजार 813 पुरूष आणि 2 हजार 601 स्त्री अशा 8 हजार 414 मतदारांनी मतदान केले. अकोला जिल्ह्यातील 6 हजार 480 मतदारांपैकी 3 हजार 625 पुरूष आणि 1 हजार 751 स्त्री अशा 5 हजार 346 मतदारांनी मतदान केले. वाशिम जिल्ह्यातील 3 हजार 813 मतदारांपैकी 2 हजार 755 पुरूष आणि 560 स्त्री अशा 3 हजार 315 मतदारांनी मतदान केले. बुलडाणा जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारांपैकी 4 हजार 801 पुरूष आणि 1 हजार 286 स्त्री अशा 6 हजार 87 मतदारांनी मतदान केले. यवतमाळ जिल्ह्यातील 7 हजार 459 मतदारांपैकी 4 हजार 871 पुरूष आणि 1 हजार 501 महिला अशा 6 हजार 372 मतदारांनी मतदान केले.

 

सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी  पुढीलप्रमाणे आहे.    अमरावती – 81.01 टक्के, अकोला - 82.50 टक्के, वाशिम – 86.94 टक्के, बुलडाणा – 81.33 टक्के, यवतमाळ – 85.43 टक्के.

 

00000

नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

कुष्ठरूग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाला प्रारंभ


नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे

-   जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 1 : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती, रुग्णांचा शोध व उपचार यासाठी संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाचा प्रारंभ आजपासून झाला. जिल्ह्यात हे अभियान 16 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून, साडेचार लाखांहून अधिक गृहभेटी देण्यात येणार आहेत.

            समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी या संयुक्त अभियानात आरोग्य पथकांकडून घरोघर जाऊन कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पथकाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी केले आहे.

           जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांना लवकरात लवकर शोधून त्वरित उपचार देणे, संसर्गाची साखळी खंडित करणे, जनजागृती करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात घरोघर जाऊन 22 लाख 62 हजार 7  नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक महिला व एक पुरूष कर्मचारी असलेल्या 1 हजार 551 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांचे पर्यवेक्षण 310 पर्यवेक्षक करतील. या सर्वांनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. येडगे यांनी दिले.

            आरोग्य उपसंचालक एम. एस. फारूखी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. के. एस. वासनिक, डॉ. दिलीप निकोसे, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक च-हाटे, विनोद प्रधान, दीपक गडलिंग आदी उपस्थित होते.

 

          000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...