Wednesday, March 5, 2025

DIO NEWS AMRAVATI 05-03-2025

 

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 05 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी गुरूवार, दि. 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org  वर उपलब्ध आहे.

परिपूर्ण कागदपत्रासह विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 15 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देयात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँक तपशिल भरून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

 000000

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ

            अमरावती दि. 05 (जिमाका) :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

             सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना राबविण्यात येतात.

            या योजनांचे सन 2024-25 वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकूण 16 हजार 891 नोंदणीकृत अर्जापैकी महाविद्यालयस्तरावर शिष्यवृत्तीचे 4 हजार 33 अर्ज, तर विद्यार्थीस्तरावर 735 अर्ज प्रलंबित आहे. सन 2021-22 मधील महाविद्यालयस्तरावर 276, तर विद्यार्थीस्तरावर 640, सन 2022-23 मध्ये महाविद्यालयस्तरावर 182, तर विद्यार्थीस्तरावर 537, सन 2023-24 मध्ये महाविद्यालयस्तरावर 338, तर विद्यार्थीस्तरावर 719 अर्ज प्रलंबित आहे. संबंधित महाविद्यालयांनी एकही अर्ज मंजूरी करीता जिल्हा कार्यालयाकडे सादर केलेला नाही.

            काशीबाई अग्रवाल, येवदा 24, नगर परिषद, चांदूरबाजार 23, कृषी तंत्र, भिलोना 18, झेपी धारणी 18, नूतन कन्या, अमरावती 16, जनता कनिष्ठ महाविद्यालय, शिंदी बु 14, इग्नीज कनिष्ठ महाविद्यालय, बडनेरा 14, जागृत कनिष्ठ महाविद्यालय, वरूड 14, शहीद स्मारक महाविद्यालय, यावली 12, अभिनव कनिष्ठ महाविद्यालय, वरूड 11 अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित आहेत.

जिल्हातील प्राचार्यांना महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज दि. 15 मार्च 2025 पर्यंत जिल्हा लॉगिनवर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगीनकडे त्रृटी पूर्ततेकरीता परत केलेले अर्ज विद्यार्थ्यांकडून त्रृटी पूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिनवर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

00000

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ !

* 500 रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द

*  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

अमरावती, दि. 05 (जिमाका):   शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.

या निर्णयाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे. कुठल्याही शैक्षणिक कामाकरीता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही. हा निर्णय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल.

साधारणतः दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवतात. प्रत्येक दाखल्यासाठी 500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये यासाठी पालक खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा हा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून तो सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात द्यावा लागेल. त्यानंतर लागलीच दाखले मिळतील.

000

Tuesday, March 4, 2025

DIO NEWS AMRAVATI 04-03-2025


 

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

अमरावती दि 04 (जिमाका) :- मार्च महिन्‍यापासून उन्‍हाच्‍या झळा जाणवतात. त्‍याची तीव्रता मार्चपासून मेपर्यंत वाढते. शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होणे, अशक्‍तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्‍त थकवा जाणवणे, तसेच घामावाटे पोषकद्रव्‍ये शरीराबाहेर टाकली जाण्यास सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्‍या उष्‍णतेमध्‍ये पुरेशी काळजी घेतली नसल्यास उन्‍हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्य सांभाळावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

उन्‍हाळ्यात उद्भवणाऱ्‍या समस्‍यांमध्‍ये प्रामुख्‍याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्‍माघाताचा समावेश असतो. याशिवाय त्‍वचेसंदर्भात समस्‍या देखील उद्भवतात. उघड्यावरील अन्‍न किंवा द्रवपदार्थ खाण्‍यापिण्‍यात आल्याने पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात.

याबाबत नागरिकांनी दोन पद्धतीने काळजी घ्यावी. यात पहिले म्‍हणजे शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होवू देवू नये आणि दुसरे म्‍हणजे विनाकारण उन्‍हामध्‍ये बाहेर जावू नये. कामानिमित्त बाहेर जायचे असल्यास छत्री, टोपी, हेल्‍मेट परिधान करावे. या सुरक्षा कवचामधील सर्वात महत्‍वाचा घटक म्‍हणजे घरातील स्‍वच्‍छ पाणी आहे. बाहेर जाताना पाण्‍याची बाटली घेवून निघावे. त्‍याचबरोबर सैलसर, सुती आणि शक्‍यतो फिकट रंगाचे कपडे घालावे. शरीरातील पाण्‍याचे प्रमाण कमी होण्‍याला डिहायड्रेशन म्‍हणतात, जेव्‍हा शरीरातून द्रव पदार्थ शरीरातून जास्‍त प्रमाणात बाहेर पडतात. तेव्‍हा ही स्थिती उद्भवते. ही स्थिती उन्‍हाळ्यात सामान्‍य असते. आपल्‍या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात गेले नसल्यास तहान वाढवते.

उन्‍हाळ्यात उष्‍माघात ही समस्‍या आहे. तीव्र उष्‍णता असलेल्‍या भागात ही समस्‍या आढळून येते. उन्‍हाच्‍या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्‍था उद्भवू शकते. यामध्‍ये डोकेदुखी, चक्‍कर येणे, नाकातून रक्‍त येणे, पोटात किंवा पायात गोळा येणे, तीव्र परिणाम झाल्‍यास व्‍यक्‍ती बेशुद्ध पडू शकतो ही प्रमुख लक्षणे आहे. ही लक्षणे आढळल्‍यास शरीरातील पाण्‍याच्‍या प्रमाणावर कटाक्षाने लक्ष ठेवावे. पाणी पित राहावे. गरज नसल्‍यास बाहेर पडू नये. सामान्‍य नागरिकांनी आणि व्‍यावसायिकांनी तीव्र उष्‍णतेत शक्‍यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाण्‍यास टाळावे. उन्‍हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्‍त खाणे टाळावे. रात्रीच्‍या जेवनात हलक्‍या आहाराचा समावेश करावा. तीव्र उष्‍णतेमुळे शरीरातील पाण्‍याचे प्रमाण घटत असल्याने दिवसातून 8 ते 10 ग्‍लास पाणी पिणे अत्‍यंत गरजेचे आहे.

उन्‍हाळ्याचे संपूर्ण चार महिने योग्‍य आहार घेणे हे उन्‍हाच्‍या त्रासापासून स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी महत्वाचे आहे.

नागरिकांनी तहान लागली नसली तरीही जेव्‍हा शक्‍य असेल तेव्‍हा पुरेसे पाणी प्‍यावे. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे सूचक आहे. प्रवास करताना पिण्‍याचे पाणी सोबत ठेवावे. ओरल रिहायड्रेशन सोल्‍युशन आणि लिंबू पाणी, बटर मिल्‍क, लस्‍सी यासारखे घरगुती पेये वापरावे, थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्‍यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, उपलब्‍ध फळे आणि भाज्‍या यासारख्‍या उच्‍च पाण्‍याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्‍या खावे.

थेट सूर्यप्रकाशाच्‍या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक वस्‍तू डोके झाकण्‍यासाठी वापरावे. सूर्य प्रकाश, उन्‍हात बाहेर जाताना शूज किंवा चप्‍पल घालावे. स्थानिक हवामानाची माहिती घेऊन काम करावे. शक्‍यतो घर, चांगल्‍या हवेशीर आणि थंड ठिकाणी सावलीत रहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्‍णतेच्‍या लाटांना अडथळा निर्माण करावे. शक्‍यतो घराच्‍या ऊन येणाऱ्या बाजूच्‍या खिडक्‍या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्‍यासाठी त्‍या खिडक्‍या उघडाव्‍यात. घराबाहेर जात असल्‍यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्‍या थंड वेळेत करा. शक्यतो ही कामे सकाळी आणि संध्‍याकाळी करावीत.

दुपारी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावी. अनवाणी बाहेर जाऊ नये. जास्‍त उन्‍हाळ्यात स्‍वयंपाक करणे टाळावे. स्‍वयंपाक क्षेत्र हवेशीर ठेवण्‍यासाठी दरवाजे आणि खिडक्‍या पुरेशा उघडावे. अल्‍कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेये टाळावे. यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्‍त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. उच्‍च प्रथिनेयुक्‍त अन्‍न टाळावे आणि शिळे अन्‍न खाऊ नये. पार्क केलेल्‍या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्‍यांना एकटे सोडू नये. त्यांना वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते. जोखमीच्‍या नागरिकांना इतरांपेक्षा उष्‍णतेचा त्रास आणि उष्‍णतेशी संबंधीत आजाराचा त्रास होऊ शकतो. याबाबत अतिरिक्‍त देण्यात यावे.

एकटे राहणारी वयस्‍कर किंवा आजारी लोकांचे पर्यवेक्षन करावे. त्‍यांच्‍या आरोग्‍याचे दैनंदिन निरीक्षण करावे. घर थंड ठेवावे, पडदे, शटर किंवा सनशेड वापरावे. रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. शरीर थंड करण्‍यासाठी पंखे, स्‍प्रे बाटल्‍या, ओले कापड, बर्फाचा वापर करावा. 20 अंश तापमान असलेल्‍या पाण्‍यात घोट्याच्‍या वरपर्यंत पाय बुडवल्‍याने निर्जलीकरण आणि थर्मल अस्‍वस्‍थता कमी होऊन जलद थंडावा मिळत असल्याने या उपाययोजांची खबरदारी घ्यावी.

उष्‍माघाताच्‍या घटनांसाठी उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. यात प्रत्‍येक प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि त्‍यावरील आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये उष्‍माघात रुग्‍णांच्‍या त्‍वरीत उपचारासाठी कोल्‍ड रुम कार्यान्वित करण्यात आली आहे. उष्‍माघातासाठी आवश्‍यक औषधे, आयव्‍ही फ्लूईड, ओआरएस आदींची उपलब्‍धता तपासण्‍यात आली आहे. आवश्‍यकता भासल्‍यास त्‍वरीत पुरवठा करण्‍यात येणार आहे. उष्‍माघाताचे प्रकार हाताळण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्‍य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. तसेच उष्‍माघात नियंत्रणासाठी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी टास्‍क फोर्स सभा घेऊन मार्गदर्शन केले आहे, असे जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी कळविले आहे.

00000

 

आज निंभारी डेपोतील वाळूचा लिलाव

अमरावती, दि. 4 : निंभारी, ता. अचलपूर येथील वाळूडेपोची मुदत संपुष्टात आली आहे. डेपोतून वाळू विक्रीनंतर शिल्लक असलेला वाळूसाठा 1 हजार 66 ब्रास जप्त करण्यात आला आहे. या वाळूचा बुधवार, दि. 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.

सदर वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देश आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांनी जाहीरनामा काढण्याचे निर्देश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी, अचलपूर यांच्या दालनात लिलाव करण्यात येणार आहे. या जाहीर लिलावात इच्छुक व्यक्ती, संस्था आणि शासकीय विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांनी अर्ज तातडीने सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2011-12 ते 2017-18 कालावधीतील महाईस्कॉल प्रणालीवरील नोंदणीकृत प्रलंबित, तसेच सन 2017-18 वर्षातील ऑफलाईन पद्धतीने स्विकारण्यात आलेल्या अर्जांचा समावेश आहे. अद्यापही महाविद्यालयांनी संबंधित प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास सादर केले नाहीत, अशा महाविद्यालयांना कागदपत्रांसह अर्ज दि. 17 मार्च 2025 पर्यंत सादर करावे लागणार आहे. यात विलंब झाल्यास प्रस्ताव शासनास सादर करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी प्राचार्यांवर राहणार आहे, असे इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी कळविले आहे.

00000

Monday, March 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03-03-2025

 

धारणीत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजनांसाठी निशु:ल्क अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि 3 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्या कार्यक्षेत्रात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2024-25 अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

आदिवासी महिला-पुरुष बचत गटांसाठी दालमिल उभारणे, प्रिंटिंग प्रेस मशिन खरेदी करणे, तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी विविध व्यवसाय सुरू करणे (नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सुतारकाम इत्यादी) आणि सुशिक्षित युवकांसाठी सेतू केंद्र सुरू करणे यांसारख्या योजनांसाठी 85 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

धारणी, चिखलदरा, अंजनगाव आणि अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज धारणी येथील प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. नांदगाव खंडेश्वर, भातकूली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच, मोर्शी, वरुड, तिवसा आणि चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी उप कार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आले आहे.लाभार्थी निवड करताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाईल. अशी माहिती प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिली.

0000

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 'बालस्नेही पुरस्कार' प्रदान

अमरावती, दि. 03 (जिमाका): महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे 'बालस्नेही पुरस्कार 2024' अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना बाल हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मुंबई येथे गौरविण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, मनिषा कायंदे, प्रशांत नारनवरे, पोलिस अपर महासंचालक अश्वती दोरजे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बालकांच्या हक्कांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्यात आल्या आहेत. विशेषतः बालविवाह प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन आणि शिक्षण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पुरस्कारासाठी निवड केली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही भविष्यातही बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. पुरस्काराबद्दल जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले आहे.

00000

 

 

 

Friday, February 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-02-2025


 









अमरावती ग्रंथोत्सवाला आजपासून सुरुवात

*ग्रंथ प्रदर्शन, विक्री व साहित्यिक मेळावा

अमरावती, दि. 28 (जिमाका) : अमरावती ग्रंथोत्सव 2024चे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या हस्ते विभागीय शासकीय ग्रंथालय येथे आज पार पडले.

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीरकुमार महाजन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे, राम देशपांडे, नंदकिशोर बजाज, प्रवीण खांडेकर, ग्रंथालय निरीक्षक गजानन कुरवाडे आदी उपस्थित होते.

आमदार श्री. अडसड यांनी, बुद्धीचा विकास करण्यासाठी वाचनाची सवय आवश्यक आहे. नवयुवकांनी विविध विषयांवरील वाचनावर भर द्यावा. माणसामध्ये प्रगल्भता विकसित होणे, तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. ग्रंथालयाच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. मुलांनी आभासी जगतातून पुस्तकांकडे वळणे आवश्यक आहे. नवकल्पना मिळण्यासाठी, नवसंकल्पना रुजविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. ग्रंथाच्या माध्यमातून व्यवहार कुशलता येत असल्याचे सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने अमरावती ग्रंथोत्सव-2024चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाजवळील विभागीय शासकीय ग्रंथालयात करण्यात आले आहे. ग्रंथोत्सव शनिवार, दि. 1 मार्चपर्यंत ग्रंथविक्री सुरू राहणार आहे.

ॲड. प्रिती रेवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश पाटील यांनी आभार मानले.

00000

गोल्डन कार्डने कुटुंबाला 5 लाखापर्यंत उपचार

        अमरावती, दि. 28 (जिमाका) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. या कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ चांगल्या रूग्णालयामध्ये उपचाराची गरज असते. यामुळे गोल्डन कार्ड काढणे महत्त्वाचे झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार, तसेच मान्यताप्राप्त रूग्णालयात मोफत उपचार करण्यात येते. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नागरिकांना गोल्डन कार्ड देण्यात येत आहे.

            सध्या हे कार्ड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ज्यांनी हे कार्ड काढलेले नाही त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामपंचायत, नगरपरिषद, आरोग्य कर्मचारी, आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा. व लिस्ट चे करून कार्ड काढून घ्यावे.

            लाभ घेण्यासाठी पात्रता: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयानुसार सव अंत्योदय, पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारक असावा.

            जिल्ह्यात विशेष मोहिम: मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या सूचनेनुसार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले  व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शखाली आरोग्य विभाग तसेच इतर विभागाच्या समन्वयाने अमरावती जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढयाची विशेष मोहिम राबविली जात आहे.

गोल्डन कार्डसाठी ऑनलाईन 12 अंकी रेशनकार्ड, आधारकार्ड आणि त्यांच्याशी संलग्नित मोबाईल, स्वत: लाभार्थी, मूळ रेशनकार्ड, आयुष्मान भारत ई-कार्ड, मूळ आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आयुष्मान गोल्डन कार्ड हे आशासेविका, कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार केंद्र, रूग्णालयातील मित्राकडे कार्ड काढू शकतो. लाभार्थीं स्वत: मोबाईलवर पीएमजे ॲप डाऊनलोड करून कार्ड काढू शकतो. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्ड काढू शकतो.

सदर योजनेशी अंगीकृत असलेल्या 34 स्पेशालिटी रूग्णालयात या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेतून 1 हजार 356 गंभीर आजारांवर प्रती कुंटुब 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी गोल्डन कार्ड काढावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी केले आहे.

000000

Thursday, February 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-02-2025

 

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

            अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. यावेळी संबंधितांनी व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

कौशल्य विकास केंद्राचा आज ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

               अमरावती, दि. 26 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्यानुसार शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मदत करण्यात येते. यात आता प्रत्येक महिन्यात ‘जागेवरच निवड’ मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. एम्प्लायमेंटवर क्लिक करावे. जॉब सिकर पर्याय निवडून आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन-इन करावे. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडावे. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे. त्यानंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या ॲप्‍शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल. त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा. आय ॲग्री हा पर्याय निवडा. शेवटी सक्सेसफुली अप्लाईड फॉर द जॉब असा मॅसेज दिसेल. यारितीने ऑनलाईन सहभाग नोंदवावा. रजिट्रेशन स्लिप पीडीएफची प्रिंट काढुन मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा ई-मेल amravatirojgar@gmail.com वर संपर्क करावा. तसेच 28 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 27 (जिमाका) : घरकुलांचे बांधकाम, मनरेगा किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थींची अडवणूक झाल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झाली आहे. सर्व लाभार्थींना मंजूरपत्राचे वाटप करण्यात आले आहे. घरकूल बांधकामासाठी लाभार्थींना पहिल्या हप्ताचे वितरण झाले आहे. लाभार्थींकडून विहित कालावधीत घरकुले बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. ग्रामविकास मंत्री यांनी आवास योजना, मनरेगा कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास संपर्क क्रंमांक 7978504317वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000








आरोग्य कर्मचाऱ्यांचे टेनिसबॉल क्रिकेट संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे टेनिसबॉल क्रिकेट सामने घेण्यात आले. यात सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभागी नोंदविला.

छत्री तलाव येथील मैदानावर दि. 8 ते 23 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या स्पर्धेत 8 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना सुपर स्पेशालिटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती यांनी विजेतेपद पटकालिले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने उपविजेतेपद पटकाविले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या हस्ते विजयी संघाचा कर्णधार रोशन बनारसे यांना विजयी चषक प्रदान करण्यात आला. नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांच्या हस्ते उपविजयी संघाचा कर्णधार कैलाश जूनघरे यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर. एल. फसाटे यांच्याकडून चषक देण्यात आले. यात बेस्ट बॅट्समन - विशाल पवार, बेस्ट बॉलर - डॉ. शशांक, बेस्ट फिल्डर - नितीन पाटेकर, मॅन ऑफ सिरीज - डॉ. आशिष वाघमारे, मॅन ऑफ द मॅच फायनल - विशाल पवार यांना गौरविण्यात आले.

डॉ. दिलीप सोंदळे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मैदानी खेळ खेळावे. खेळामुळे तणावमुक्त होण्यास मदत होते. डॉ. राठोड यांनी आभार मानले.

00000












सुधारित वृत्त

अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब

- मंत्री नरहरी झिरवाळ

अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचा विभागीय आढावा

 

      अमरावती, दि. 27 (जिमाका) : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.

 

      श्री. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी  सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.

 

      श्री. झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता  तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

 

            समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना 'हायजिन रेटिंग' प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ‘इट राईट कॅम्पस’ दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.             सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा. दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील उपायोजनांबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

       समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरीत कार्यवाही करावी. लाभार्थ्यांच्या मोबाईल आधारकार्डशी लिंक झाले नाहीत, यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा. तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'पारधी कॅम्प' आयोजित करावा. विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले.

 

       मंत्री श्री. झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

00000


अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...