Wednesday, November 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025


                                             'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान!

शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या 'अमृत दुर्गोत्सव 2025' या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी अमृतच्या पुणे मुख्यालयातील समारंभात  'मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम' या श्रेणीतील विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि संस्कृती रक्षण या गुणांना उजाळा देत समाजमन घडविणे आणि महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. याअंतर्गत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत किंवा शाळेत तयार करून, त्यासोबतचा फोटो 'अमृत दुर्गोत्सव 2025' च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विजय जोशी यांच्या नियोजनामुळे आणि अमृत कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा शासकीय उपक्रम न राहता त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील राज्ये, अमेरिका, इंग्लंड आणि आखाती देशातूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत घेतलेल्या फोटोंची संख्या विक्रमी झाली.

प्रमाणपत्र प्रदान करताना, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पंच प्रवीण पटेल यांनी या विश्वविक्रमाच्या कठीण तपासणी प्रक्रियेची माहिती दिली. योग्य चित्रे निवडणे, अस्पष्ट व दुबार चित्रे बाद करणे अशा अनेक दिवसांच्या क्लिष्ट तपासणीनंतर हा विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या यशाबद्दल विजय जोशी यांनी सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक नेतृत्व, दुर्गप्रेमी, विद्यार्थी आणि सर्व शिवप्रेमी तसेच अमृत कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सहभागी झालेल्या प्रत्येकास मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र मिळणार आहे.

0000000

शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी 14 नोव्हेंबरला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्ज शिबिर;

जागेवरच कर्ज मंजुरी!

अमरावती, दि. 12 (जिमाका): 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय अमरावती यांच्या वतीने गुरुवार,  दि. 14 नोव्हेंबर रोजी विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे शेतकरी आणि गरजू वर्गाला बँकिंग सुविधा व कर्ज योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.

हे शिबिर अमरावती परिसरात  कविटकर लॉन, पथ्रोट, नानाजी देशमुख सभागृह, शिरजगाव बंड आणि पंचायत समिती सभागृह, मोर्शी येथे आयोजित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बँकेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांमध्येही हे विशेष शिबिर होणार आहे. या शिबिराचा उद्देश शेतकरी, स्वयंसहायता समूह आणि समाजातील इतर गरजू वर्गाला विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे आहे.

येथे किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुटपालन, दुग्धशाळा, खाद्य प्रक्रिया, कृषी यांत्रिकीकरण आणि बचत गटांना कर्ज यांसारख्या कृषी आणि संलग्न सुविधांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन मिळेल.शिबिरात नवीन कर्ज प्रकरणे त्वरित स्वीकृत केली जातील, पात्र प्रकरणांना जागेवरच मंजुरी दिली जाईल आणि त्याच दिवशी कर्ज वितरण सुद्धा करण्यात येणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने परिसरातील सर्व सन्माननीय शेतकरी वर्ग, कृषी उद्योजक आणि कृषी संलग्न कामांशी संबंधित व्यक्तींना या शिबिरात उपस्थित राहून त्वरित कर्ज सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

00000

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा  रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे.

 टेट परीक्षेच्या कार्यवाहीबाबतची सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येत आहे. मात्र, अलीकडे युट्युब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि प्रसार माध्यमांद्वारे परीक्षेसंबंधी अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी अशा कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये.

उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या सर्व सूचना आणि माहितीसाठी केवळ www.mscepune.in तसेच http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांचेच वेळोवेळी अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे नुकसान झाल्यास, त्याला ते स्वतः जबाबदार असतील,  असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

000000

Tuesday, November 11, 2025

DIO NEWS AMRAVATI 11-11-2025

 

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन

*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता युनिटी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून या रॅलीला सुरवात होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेना, राष्‍ट्रीय सेवा योजना, आरोग्य, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मेरा युवा भारत, केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘सरदार @ १५०’ एकता अभियान जिल्हास्तर युनिटी मार्च, पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा विमलाबाई देशमुख सभागृहातून निघून पंचवटी चौक, इर्विन चौक येथे येणार आहे. इर्विन चौकात पथनाट्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ही पदयात्रा गर्ल्स हायस्कूल चौक येथून निघून विमलाबाई देशमुख सभागृहात समारोप होणार आहे. पादयात्रेत सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांची परवानगी घेण्यात यावी. तसेच पोलिस विभागाने पदयात्रेसाठी सहकार्य करावे. महापालिकेने पदयात्रेच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पदयात्रेदरम्यान आरोग्य पथक तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. पदयात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असल्याने पदयात्रा आयोजनात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

0000

                                           बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या समन्वयाने कारवाई करावी

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 11 (जिमाका): बोगस डॉक्टरांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. याबाबत सखोल तपासासाठी आरोग्य यंत्रणांकडे आलेल्या तक्रारी पोलिसांनाही देण्यात याव्यात. यामुळे भविष्यातही कारवाई करता येईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय समिततीची सभा पार पडली. यावेळी पोलिस उपअधिक्षक राजेश भुयार, पोलिस निरीक्षक सिमा दाताळकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. विजय अजमिरे, पवन टेकाळे, डॉ. अनिल माणिकराव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, नागरिकांच्या तक्रारीसोबतच प्रसारमाध्यमांमधील आलेल्या बातम्यांनुसार बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी. ही कारवाई करताना पोलिस विभागाला याची माहिती देण्यात यावी. पोलिसांना माहिती दिल्यास नंतरच्या काळात इतरत्र व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यात प्रामुख्याने चांदूरबाजार परिसरात बोगस डॉक्टरांच्या तक्रारी अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे या भागात लक्ष देण्यात यावे.

पोलिस आणि आरोग्य विभागाकडे आलेल्या तक्रारीवर तातडीने कारवाई करावी. कारवाई करताना पोलिसांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण कमी असले तरी आलेल्या तक्रारीवर कारवाई होणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात होणारा अपघात टाळल्या जाऊ शकेल. नागरिकांनीही परिसरात बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याचे आढळल्यास तातडीने पोलिस आणि आरोग्य विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.

00000

ज्येष्ठ नागरिकांसाठी 'एल्डर लाईन' (14567): राष्ट्रीय हेल्प लाईन सेवा

अमरावती, दि. 11 (जिमाका): सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 राष्ट्रीय हेल्प लाईन सेवा देशभरातील सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे.

 ‘सून खाऊ घालत नाही आणि पोरगाही बघत नाही’, ‘घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे’, ‘नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय’ किंवा ‘कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही’ अशा असंख्य व्यथा, वेदना आणि तक्रारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक "एल्डर लाईन" 14567 हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत.

महाराष्ट्रातही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्यामार्फत ही सेवा राबवली जाते. "मानवसेवा हीच ईश्वर सेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौन्डेशन, पुणे गेली 37 वर्षांपासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पाद्वारे गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, गरीब मुले, मुली आणि महिला यांची सेवा करीत आहे. जनसेवा फाउंडेशनला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे. महाराष्ट्रात, ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवांमध्ये माहिती (आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर याबाबत माहिती), मार्गदर्शन (कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007), भावनिक आधार (मानसिक आजार व चिंता, ताण, राग इत्यादी व्यवस्थापन), तसेच बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबियांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व समुपदेशन यांचा समावेश आहे.

 "एल्डर लाईन 14567" ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

'कुष्ठरुग्ण शोध अभियान' 17 नोव्हेंबरपासून सुरू

अमरावती, दि. 11  (जिमाका): संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या नियोजनासाठी अमरावती जिल्ह्याची जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपन्न झाली.

या सभेमध्ये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबद्दलची सद्यस्थिती आणि या अभियानाचे विस्तृत नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लवकरात लवकर कुष्ठरुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यासाठी  सर्व उपस्थित अधिकारी तसेच  नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 श्रीमती महापात्र यांनी समाजातून कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. व्यापक प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून कुष्ठरोग संसर्गाची साखळी समाजातून खंडित होईल आणि सन 2030 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय आपण जिल्हास्तरावर साध्य करू शकू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे तसेच संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

0000000

परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी  नवीन

वाहन मालिका सुरू करण्याबाबत आवाहन

अमरावती, दि. 11 (जिमाका): परिवहनेत्तर ( दुचाकी) संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. इच्छुक अर्जदारांनी  गुरूवार, दि. 13 नोव्हेंबर 2025  रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहित शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती, खिडकी क्रमांक -25 येथे जमा करावेत. वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांच्या पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावे. तसेच अर्जामध्ये वाहन ज्या व्यक्तीच्या नावे आहे, त्या व्यक्तीचा आधारकार्डला संलग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अमरावती, कॅम्प ब्रांच, ट्रेझरी ब्रांच कोड नं 003866 साठी  देय असावा.

 

एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल, त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील, त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी   वाजता कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंती क्रमांकांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशाच अर्जदारांनी दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत त्या क्रमांकासाठी पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सीलबंद करून खिडकी क्रमांक -25 वर जमा करावे.

एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अर्ज प्राप्त होऊन सीलबंद लिफाफ्यात सादर केलेल्या जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट धारकांनी दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहावे. लिलावासाठी उपस्थित राहणा-या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे. कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल, त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदारांना परत देण्यात येईल. तसेच, विहित वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी., असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी  यांनी केले आहे.

00000

पाणी फाउंडेशनच्या 'फार्मर कप'द्वारे 50 हजार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले;

जिल्ह्यात अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका): सन 2022 पासून पाणी फाउंडेशनने "सत्यमेव जयते फार्मर कप" या उपक्रमाद्वारे संघटन आणि ज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य सुरू केले आहे. या उपक्रमाचा परिणाम 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांवर झाला असून त्यातील निम्म्या संस्था महिला शेतकऱ्यांच्या आहेत, त्यामुळे हे व्यासपीठ महिला सशक्तीकरणासाठीही प्रभावी ठरले आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि गावात याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतीतील संघटनेसाठी जनचळवळ उभी राहील आणि ग्रामीण समृद्धी साधता येईल. पाणी फाउंडेशन या उपक्रमाद्वारे केवळ जलसंधारणच नव्हे, तर शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प बळकट करत आहे. त्याअनुषंगाने, पाणी फाउंडेशन मार्फत घेण्यात येत असलेल्या 'फार्मर कप'साठी शेतकरी तसेच अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे कृषी चिकित्सालय, येरला, मोर्शी येथे मोर्शी व तिवसा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, अमरावती येथे अमरावती व भातकुली, तसेच दि. 3 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव खंडेश्वर येथे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पाणी फाउंडेशन यांच्या समन्वयाने एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते  यांनी 'फार्मर कप' उपक्रमाचे उद्दिष्ट, शाश्वत जलव्यवस्थापनाचे महत्त्व, गट शेती, पाणी बचत आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी गट बांधणी या विषयावर मार्गदर्शन केले.

000000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

              अमरावती, दि. 11 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 13 नोव्हेंबर ते  27 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.

00000


Monday, November 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 10-11-2025











                                                 विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 10 (जिमाका) : एकविसावे शतक भारताचे आहे. त्यामुळे जगाला दिशा देऊ शकणारे युवक घडविणे आवश्यक आहे. 2047 मधील विकसित भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी संस्कारक्षम पिढी तयार करणे आवश्यक आहे. विपश्यना केंद्राच्या माध्यमातून या कामाला गती मिळणार आहे. त्यासाठी विपश्यना केंद्राने संस्कारक्षम पिढी तयार करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या कोंडेश्वर रोड येथील बोधीभुमि संस्कार केंद्राचा आज पायाभरणी सोहळा आज पार पडला. यावेळी आमदार रवि राणा, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कमलताई गवई, किर्ती गवई, रविराज देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, पुढील पिढी घडविण्यासाठी संस्कार केंद्र उभे राहणे आवश्यक आहे. संस्कारामुळे प्रगल्भ व्यक्ती तयार होऊन एक मजबूत पिढी तयार होईल. विपश्यना केंद्राच्या योगदानातून समाज निर्माण होणार आहे, तसेच समाजाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे केंद्र हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल व्हावे. तथागत गौतम बुद्धांनी जगाचे कल्याण करणारी शिकवण दिली आहे. ही शिकवण पुढे नेण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत आहे.

कोंडेश्वर येथील केंद्र उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याठिकाणी विपश्यना केंद्रासह गौतम बुद्धांची मुर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, वसतिगृह, वाचनालय करण्यावर भर देण्यात येणार आहे. केंद्राचा विकास करताना आराखडा तयार करावा. केंद्राच्या संस्थेने आवश्यक असणाऱ्या बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. यासोबतच ईर्विन चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार रवि राणा यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला उपस्थितांनी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर श्री. बावनकुळे यांनी कुदळ मारून विपश्यना केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष कलावती भटकर, कोषाध्यक्ष अन्नपूर्णा दामले, सचिव अश्विनी भटकर, वैदर्भी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील यश मिळविलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

00000

 अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये बदल

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती  शहरात नोव्हेंबर महिन्यात दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

नोव्हेंबर  महिन्यातील 16 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर  रोजी सकाळी 6 ते 8 वाजता वेलकम टी पॉईट कडून बियाणी चौकाकडे येणार एकतर्फी मार्ग सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            वेलकम टी पॉईट ते पंचवटी चौकपासून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्ग वरील वाहतूक नियमन रूग्णवाहिका, अग्नीशामक वाहन, कायाद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातुन नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

            ही अधिसूचना माहे नोव्हेंबर 2025 मधील दर रविवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत प्रायोगिक तत्वावर अंमलात राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत सुरु,

अफवांना बळी  न पडण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका): मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी अलीकडील काही दिवसांपासून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नकारात्मक व निराधार अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहे.

महामंडळामार्फत जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत मोठ्या संख्येने कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. दि. 10 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, वेब प्रणालीचे सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत, कर्ज व बँक मंजुरी या दोन सेवा 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात देण्यासाठी आवश्यक ते बदल करणे सुरु आहे. मध्यस्थांमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी, महामंडळाने सीएसआर केंद्राद्वारे फक्त 10 रुपयांत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सामंजस्य करार केला आहे, त्यास अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये बदल करण्याचे काम सुरु आहे. लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे देता याव्यात म्हणून मोबाईल ॲप विकसित होत आहे.

महामंडळामार्फत  लाभार्थ्यांना सुरळीत व सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. लाभार्थ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी चॅटजीपीटी  प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महामंडळ समाजाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे, तरी सर्वसामान्य नागरिकांना आणि लाभार्थ्यांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये. महामंडळाचे सर्व कामकाज सुरु असून, वेब प्रणालीचे अद्ययावतीकरण हे समाजहिताचे व लाभार्थ्यांच्या सोयीसाठीचे आहे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे  यांनी केले आहे.

000000

 

हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार

अमरावती, दि. 10 ( जिमाका): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2025-26 मध्ये केंद्र सरकारने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असून, खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने या पिकांसाठी आधारभूत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार,  मूग 8 हजार 768 रुपयेउडीद 7 हजार 800 रुपये आणि सोयाबीन 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केले आहेत.

खरेदी प्रक्रियेसाठी राज्य शासनाने दोन केंद्रीय नोडल एजंन्सींची नियुक्ती केली आहे. यामध्ये नाफेडकडे (Nafed) अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिमसह एकूण 22 जिल्ह्यांची जबाबदारी असेल, तर एनसीसीएफकडे (NCCF) नागपूर, चंद्रपूर, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली या एकूण 6 जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावाजवळील नाफेड,किंवा  एनसीसीएफच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँकेचे पासबुक, चालू वर्षाचा 7/12 उतारा आणि पीकपेरा या कागदपत्रांसह शेतकऱ्यांची केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. नोंदणीनंतर एसएमएस प्राप्त झाल्यावरच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर घेऊन यावा, असे आवाहन पणन महासंघाच्या संचालक मंडळाने केले आहे.

00000000


स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे:

दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

अमरावती, दि. 10 (जिमाका): स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी  केवळ अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन देखील करावे, कारण ते यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत विभागीय आयुक्त कार्यालयतील अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी व्यक्त केले. शासकीय विभागीय ग्रंथालय, अमरावती येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे नुकतेच  उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. येथे विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी  आदी उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालयात 1 लाख 25 हजारहून अधिक विविध विषयांवरील ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी दररोज या सेवेचा लाभ घेतात. तसेच, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अधिकाधिक नागरिकांनी  ग्रंथालय सेवेचा लाभ घेण्यासाठी या दिवाळी अंक प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. सूरज मडावी  यांनी  केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुरवाडे यांनी तर शेषराव भिरडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे अमरावतीत आयोजन

अमरावती, दि. 10 नोव्हेंबर (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांनी वेस्टर्न फुटबॉल असोसिएशन, महाराष्ट्र आणि अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने अमरावती येथे राज्यस्तरीय शालेय फुटबॉल (14 वर्षांखालील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. दि. 13 ते 15 नोव्हेंबर 2025 या दरम्यान जिल्हा परिषद सायन्सकोर मैदान आणि पोलीस फुटबॉल मैदान, अमरावती येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, लातूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, अमरावती आणि नागपूर या आठ विभागांतून एकूण 16 संघ सहभागी होत असून, यामध्ये सुमारे 400 पंच, अधिकारी आणि खेळाडू यांचा समावेश असेल.

 या स्पर्धेतून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी  महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे, जो मध्य प्रदेश आणि झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून, खेळाडूंची निवास व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्यातील सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

000000

पोस्टवूमन ते 'यूपीएससी' अधिकारी!

अमरावतीच्या रसिका मुळे यांनी मिळवले देशात ८७ वे स्थान!

अमरावती, दि. 10 (जिमाका): अमरावती प्रधान डाकघरात 'पोस्टवूमन' म्हणून कार्यरत असलेल्या  रसिका राजेश मुळे यांनी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा-2024 उत्तीर्ण केली आहे. राखीव यादीतून त्यांची निवड झाली असून, त्यांनी संपूर्ण देशातून 87 वी रँक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

या यशाबद्दल प्रधान डाकघर अमरावती येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रवर डाकपाल सुजितकुमार लांडगे यांच्या हस्ते रसिका मुळे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. रसिका मुळे यांचे हे यश संघर्ष करणाऱ्या हजारो तरुणांसाठी मोठे प्रेरणास्थान ठरले आहे

यावेळी श्री. लांडगे यांनी रसिका मुळे यांच्या परिश्रमाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभास उपडाकपाल, सर्व सहायक डाकपाल तसेच प्रधान डाकघरातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

000000

'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर व्याख्यान

अमरावती, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत नुकतेच अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल गवई, हे प्रमुख व्याख्याते होते. डॉ. गवई यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या बोधपर उदाहरणे व गोष्टींच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आयुष्याचे महत्त्व पटवून देत, अंमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहन मिळाले.समाज कल्याण अधिकारी,  संत गाडगेबाबा विद्यापीठाचे  गृहपाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000000

जिल्ह्यातील वाळूघाट लिलावास मोठा प्रतिसाद

*1 कोटीच्या बदल्यात सर्वोच्च 7 कोटी किंमत

अमरावती, दि. 10 (जिमाका) : महसूल व वनविभागाने वाळू निर्गती धोरण जाहिर केले आहे. वाळू लिलाव धोरणातील तरतुदीनुसार सन 2025-26 या वर्षाकरीता  जिल्ह्यातील 33 वाळूघाटांकरीता ई-निविदा व ई-लिलावाच्या प्रथम फेरीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी लिलावामध्ये 33 पैकी तांत्रिकदृष्ट्या पात्र 8 वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये 8 वाळू घाटांची हातची किंमत ही केवळ 1 कोटी असतानाही लिलावामध्ये एकुण 7 कोटी सर्वोच्च किंमत  प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकारेपणे अंमलबजावणी करुन कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यात महसूल यंत्रणेमार्फत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीच्या 264 कारवाया करुन दंडाची कारवाई केली आहे. सदर लिलावाची घाटनिहाय प्रक्रिया राबविल्यामुळे व परराज्यातुन येणारी वाळुची वाहतुक बंद केल्यामुळे सदर वाळू लिलावास सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून शासकीय वसुली वाढण्यास मोलाची भर पडली आहे.

एकुण 33 वाळू घाटांपैकी लिलाव झालेले 8 वाळूगट वगळता उर्वरित 25 वाळूघाटांची लिलावाची दुसरी फेरीची प्रक्रिया ऑनलाईनरित्या mahatender.gov.in या शासन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर प्रक्रिया ही दि. 10/11/2025 या कालावधीपासून ते दि. 20/11/2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. सदर लिलाव प्रक्रियेमध्ये निविदाधारक दि. 10 नोव्हेंबर ते दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा अर्ज दाखल करु शकतील. दि. 20 नोव्हेबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्षरित्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. यातही सकारात्मकदृष्ट्या विचार करुन व कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन इच्छुक लिलावधारकांनी लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

00000

DIO NEWS AMRAVATI 12-11-2025

                                                         'अमृत दुर्गोत्सव 2025'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली ...