Tuesday, September 24, 2024

DIO AMRAVATI NEWS 24.09.2024

 

प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानामधून

आदिवासी बहुल गावांच्या विकासात पडणार भर

अमरावती, दि. 24 (जिमाका): केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाने नुकतीच प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला मान्यता दिली. या अभियानाव्दारे संपूर्ण देशभरातील 30 राज्ये केंद्रशाशित प्रदेशातील 549 जिल्ह्यांमधील 2 हजार 740 तालुक्यातील 63 हजार 843 आदिवासीबहुल गावांचा विकास साधला जाणार आहे. या अभियानांतर्गत या गावांमध्ये 79 हजार 256 कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार असून, यामध्ये 56 हजार 333 कोटी रुपये एवढा केंद्राचा वाटा असून, 22 हजार 823 कोटी रुपये एवढा राज्याचा वाटा असणार आहे.

या अभियानांतर्गत 17 मंत्रालयीन विभागांना 25 प्रकारच्या योजना राबविण्यासाठी अनुसूचित जमातीसाठी विकास कृती आराखडा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून 5 वर्षाच्या कालावधीत आपल्याला ठरवून दिलेली साध्ये प्राप्त करावयाची आहेत. या अभियानांतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, उर्जा मंत्रालय, नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, पेट्रोलिअम व नैसर्गिक वायु मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आयुष मंत्रालय, दुरसंचार विभाग, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मत्स्य मंत्रालय, पशुसंवर्धन व डोंगरी विभाग, पंचायतराज मंत्रालय, पर्यटन मंत्रालय या मंत्रालय व विभागांचा समावेश असणार आहे.

या विभागामार्फत आदिवासी बहुल गावांमध्ये पक्की घरे (प्रधानमंत्री आवास योजना), रस्ते (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना), पाणी पुरवठा (जल जीवन मिशन), घरांचे विद्युतीकरण, नवीन सौरउर्जा योजना, फिरती आरोग्य पथक (राष्ट्रीय आरोग्य अभियान), आयुष्यमान भारत कार्ड (प्रधानमंत्री जनआरोग्य योजना), एलपीजी कनेक्शन्स (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना), अंगणवाडी केंद्राची स्थापना (पोषण अभियान), वसतिगृहांची स्थापना (समग्र शिक्षा अभियान), पोषण वाटीका (राष्ट्रीय आयुष अभियान), भारतनेट, स्किल इंडिया मिशन, शाश्वत शेती प्रसिद्धी, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, राष्ट्रीय पशुधन मोहीम, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ट्रायबल होम स्टे (स्वदेश दर्शन), प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबरोबरच ट्रायबल मल्टिपर्पज मार्केटिंग सेंटर्स, वनहक्क धारकांसाठी शाश्वत उपजीविका, सिकल सेल आजारासाठी  क्षमता केंद्रे, आश्रमशाळा, वस‌तिगृहे येथील पायाभूत सुविधा विकास यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान’ जिल्ह्यातील अमरावतीसह अचलपुर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरुड या 9 तालुक्यामधील 321 आदिवासीबहुल गावांमध्ये राबविले जाणार असल्याचे सांगितले. धारणीच्या सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प़, प्रियंवदा म्हाडदळकर  यांनी  ‘प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान’ जिल्ह्यातील सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या सहभागातून राबवून या 321 गावांचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस व्यक्त केला.

000

जिल्हा खनिकर्म विभागाचे रेतीघाटबाबत आवाहन

अमरावती, दि. 24 (जिमाका): वाळू रेती निर्गती सुधारित धोरण, वाळू, रेती उत्खनन मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी निर्गमित झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार जिल्ह्यातील रेतीघाटांचे  सर्वेक्षण करून एकूण 33 रेतीघाट तालुकास्तरीय संनियंत्रण समितीने रेती उत्खननासाठी योग्य असल्याचे अहवाल जिल्हा खनिकर्म कार्यालयास सादर केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील रेती उत्खननासाठी योग्य असलेल्या रेतीघाटांचे तपशिलाचा समावेश करुन वर्ष 2024-25 च्या सुधारणेसह अद्यावत करण्यात आलेला आहे.  जिल्हा सर्वेक्षण अहवालाची सुधारित आवृत्ती सर्व जनतेचे अवलोकनार्थ तसेच अभिप्राय/सूचना (Comment) प्राप्तीसाठी www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपले अभिप्राय,/सूचना/आक्षेप//तक्रार/निवेदन ठराव इत्यादी असल्यास त्या लेखी स्वरुपात जिल्हा वाळू संनियंत्रण समिती खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किंवा dmoamravati1@gmail.com या ई-मेल आयडीवर सदर जाहीर सूचनेच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत  सादर करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.

00000

शिष्यवृत्तीचे अर्ज  तातडीने निकाली काढल्याचे आवाहन

         अमरावती, दि. 24 (जिमाका):सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण की परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन ब नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे.

 

परंतु, सदर वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सन 2023-24 वर्षातील अर्ज निकाली काढणे आवश्यक आहे. दि.19 सप्टेंबर, 2024  रोजीच्या महाडीबीटी डॅशबोर्डनुसार विद्यार्थी स्तरावर 1 हजार 47 तर महाविद्यालयस्तरावर 789 अर्ज महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित मुदतीत जिल्हा कार्यालयाकडे पाठविणे अपेक्षित असते. असे असतानाही जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी ही बाब गांर्भीयाने घेतली नाही. सदर अर्ज मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000

 

 अमरावती शासकीय औे‌द्योगिक प्रशिक्षण संस्था येथे

 येत्या गुरुवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अमरावती, दि. 24 (जिमाका): शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, एनएसएस हॉल, अमरावती येथे गुरुवार, दि. 26 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळावामध्ये नागपूर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भरती मेळाव्यासाठी जास्तीत-जास्त आयटीआय मोटर मेकॅनिक, डीजल मेकॅनिक आणि इलेक्ट्रि‌शियन व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांनी सहभागी होवून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तसेच सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे. प्रशिक्षणार्थी यांनी बायोडाटा व मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.

 0000

अंजनगाव सूर्जी आयटीआयमध्ये

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा येत्या गुरुवारी

      अमरावती, दि. 24 (जिमाका):  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गुरुवार, दि. 26 सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंजनगाव सूर्जी येथे सकाळी 11 वाजता प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा व इंटर्नशिप मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ 12 वी ,आयटीआय, पदविका, पदवीधर उत्तीर्ण  विद्यार्थ्यांनी घ्यावा.

       योजनेचे स्वरुप : युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य शासनाव्दारे सुरू केली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 5 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविल्यानुसार संबंधित आस्थापनांना त्याप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.

प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अर्हतेनुसार 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय, पदविका उत्तीर्णांना 8 हजार व पदवीधर, पदव्युत्तर यांना 10 हजार रुपये शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असून प्रशिक्षणार्थ्यांचे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील असावा. या योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व मार्गदर्शक सूचनांनुसार आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

             आवश्यक कागदपत्रे : उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा, उमेदवारांची आधार नोंदणी असावी, उमेदवारांचे बँक खाते आधार संलग्न असावे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तलयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा, उमेदवारांने अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणासाठी अर्ज सादर करावा. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधीत उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.  उमेदवाराचे ज्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नेमणूक केली जाईल, ते मुख्यालय सोडता येणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे संस्थेचे प्राचार्य आर. टी. शेगोकार यांनी कळविले आहे.

0000




 वलगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अमरावती, दि. 24 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत वलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 102 रुग्णांपैकी 34 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र वलगाव डॉ. दक्षायणी अनवाने, पी. एस. शहा, एच. एल. एल. मिलिंद गजभिये, गिरिश उघडे, रूग्णवाहिका चालक दिपक शर्मा, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.

0000

Monday, September 23, 2024

DIO AMRAVATI NEWS 23.09.2024

 

असाक्षर महिला व पुरूष साक्षर होण्यासाठी

नवभारत साक्षरता कार्यक्रमात अमरावती जिल्हा अव्वल

 

अमरावती, दि. 23 (जिमाका): समाजामध्ये आजही बरीचशी लोक आहेत की, ज्यांना अजूनही अक्षर ओळख झाली नाही. अशा असाक्षर महिला व पुरुष तसेच तरुणांना साक्षर करण्याचे कार्य शिक्षण संचालनालय (योजना ) या विभागाने हाती घेतले आहे. केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम’ सन 2022 ते सन 2027 या कालावधीत वय वर्ष 15 व त्यापुढील असाक्षर असणाऱ्या व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्रामार्फत राज्याच्या मदतीने राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने राज्यभर ‘वारी साक्षरतेची’ हा उपक्रम घेण्यात आला होता. श्री क्षेत्र पंढरपूर वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची असाक्षरतेच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने साक्षरतेचा संदेश देण्यात येत आहे. जिल्ह्यातही ज्या-ज्या ठिकाणी वारकरी मिळतील, त्या ठिकाणी जाऊन साक्षरतेच्या संदर्भात जनजागृती व वारकऱ्यांच्या भेटी घेण्यात आलेल्या आहेत.

शिक्षणाधिकारी (योजना) या कार्यालयामार्फत गणेशोत्सवाचे औचित्य साधून साक्षरतेचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. सन 2030 पर्यंत शंभर टक्के साक्षर करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. गावागावांमध्ये कार्यक्रम राबविण्यात संदर्भात पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार 2030 पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वाना शंभर टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणे अपेक्षित आहे. शासन निर्णय दि. 14 ऑक्टोबर 2022 अन्वये केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते सन 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालनालय योजना, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती या यंत्रणांमार्फत होत आहेत.

या कार्यासाठी महत्त्वाच्या समित्या स्थापन केल्या असून त्यामध्ये राज्यस्तर, जिल्हास्तर, गटस्तर व शाळास्तर अशा समित्या आहेत. जिल्हास्तर समितीसाठी नियामक परिषदचे जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. ‘प्रौढ शिक्षण’ या ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण" म्हणून हा उपक्रम राबविल्या जात आहे. शाळा हे या योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे एकक आहे. लाभार्थी आणि स्वयंसेवक यांचे सर्वेक्षण शाळांकडून केले जाते. यामध्ये शासकीय अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षकांव्यतिरिक्त शिक्षक पदांचे शिक्षण घेणारे, उच्च शिक्षण संस्थामधील विद्यार्थी, पंचायतराज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच एनएसएस, एनसीसी यांचाही स्वयंसेवक म्हणून सहभाग आहे. असाक्षरांची नोंद उल्लास ॲप वर केली जाते. स्वयंसेविकामार्फत ऑफलाइन अध्यापन केले जाते.

पायाभूत साक्षरता (वाचन लेखन) व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेतली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर साक्षरता प्रमाणपत्र दिले जाते. मागील शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये अमरावती जिल्ह्याची उल्लास ॲपवर नोंदणी एकूण 30 हजार 556 इतके असाक्षर होते. त्यापैकी 25 हजार 582 इतके परीक्षेला बसले, त्यापैकी 25 हजार 316 इतके उत्तीर्ण झाले. सत्र 2024-25 साठी  11 हजार 556 इतके लाभार्थी आहेत. त्यांना साक्षरतेचे धडे देण्यात येतील. सध्या महाराष्ट्रात अमरावती जिल्हा अव्वल  आहे.

00000

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा पात्र ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा

अमरावती, दि. 23 (जिमाका): देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही अनेक तीर्थस्थळे आहेत. जेथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची ज्येष्ठांची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी ­­­‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेचे लाभार्थी पात्रता निकष :

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.  वय वर्षे 60 व त्यावरील जेष्ठ नागरिक, लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला त्या व्यतिरिक्त लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी लाभार्थ्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चार पैकी कोणतीही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड ग्राह्य धरले जाईल. लाभार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक व त्यांचे प्रमाणपत्र, तसेच सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे लाभार्थ्यांचे हमीपत्र व नातेवाईकांची हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील 60 वर्षावरील जेष्ठ नागरीकांनी परीपूर्ण अर्ज भरुन तालुका स्तरावर तहसिल कार्यालय, पंचायत समिती तसेच जिल्हास्तरावर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे. तसेच ज्या लाभार्थ्यांनी या आधी अर्ज भरलेले आहेत, त्यांनी सुधारित अर्ज भरण्यासाठी व अर्जामधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणे करुन सर्वांचे अर्ज पात्र करता येतील, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले.

0000

 

Friday, September 20, 2024

DIO AMRAVATI NEWS 20.09.2024

 





प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे ई-भूमिपूजन

नांदगाव पेठ पार्क क्रांतिकारी पाऊल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अमरावती, दि. 20 (जिमाका) : अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे. याठिकाणी तीन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. टेक्सटाईल पार्कमुळे याठिकाणी आमुलाग्र बदल होणार आहेत. या भागाच्या औद्योगिक क्रांतीसाठी हे क्रांतीकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन करण्यात आले.

नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, डिगर गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा बाजारे, पिंपर विहीरच्या सरपंच मुक्ता ठाकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, सहायक पो‍लिस आयुक्त सागर पाटील, के. एम. पुंडकर, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर, वस्त्रोद्योग उप वस्त्रोद्योग अभियंता सुधीर अमृतकर, तहसीलदार वैशाली पाथरे, उप अभियंता संजय विधळे, उप अभियंता श्री. राठोड, क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते.

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क ही वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती आणणारी योजना आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क येथे जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे थेट शेतातून विदेशात निर्यात होणारे कापड निर्मितीकरीता संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रात 1 हजार हेक्टर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क उभारण्यात येणार आहे. येथे 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. निर्यात क्षमता वाढीसाठी फाईव्ह एफ व्हिजन ठेवण्यात आले आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन ते फॉरेन अशा पद्धतीने कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीचे नाव देशाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेक्सटाईल पार्कमुळे औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा बदलला आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्यास मदत झाली आहे. याठिकाणी तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याने या भागाची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. देशातील सात टेक्सटाईल पार्कपैकी एक विदर्भात मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टेक्सटाईल पार्क अमरावती येथे दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यामुळे देशाचा जीडीपी वाढविण्यासाठी राज्याच्या वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांना येथे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील अर्थकारणास वेग येणार आहे. याठिकाणी नविन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टेक्सटाईल पार्क मंजूर होणे ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे विकासाच्या वाटा निर्माण होतील. टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

00000






जिल्ह्यातील 13 कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन


        अमरावती, दि. 20 (जिमाका) : राज्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्धा येथून करण्यात आले. यात जिल्ह्यातील 13 केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

            शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत पुसदेकर, सदस्य सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. दिनेश खेडकर, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

श्री. पुसदेकर यांनी केंद्राचे उद्घाटन करीत असल्याचे जाहिर केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासासाठी दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यात वेब डिझाईन आणि इंस्ट्रुमेंटेशन प्रोग्रामचा समावेश असल्याचे सांगितले. या दोन्ही अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संस्थेचे नाव मोठे करावे, असे आवाहन केले. श्री. खेळकर यांनी कौशल्य विकास केंद्रातील सर्व प्रकियांची माहिती दिली. अभ्यासक्रम हे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त असल्याने याचे महत्व असल्याचे सांगितले. यात मर्यादीत प्रवेश दिला जाणार आहे, तसेच जाणीवपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी यात आवड असल्यास प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

            कार्यक्रमाच्या सुरवातीला दिप प्रज्ज्वलन करून गाडगे महाराज आणि पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा. रेखा मग्गीरवार यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश खेडकर यांनी आभार मानले.

अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, महिला महाविद्यालय, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, बडनेरा येथील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वरुड येथील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जी. एस. टोम्पे कॉलेज, चिखलदरा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, तिवसा येथील वायडीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग येथील केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

00000

 


Thursday, September 19, 2024

DIO AMRAVATI NEWS 19.09.2024

 

शनिवारी राज्यस्तरीय विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

       अमरावती, दि. 19 (जिमाका) : राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकत्ता व नॅशनल कौन्सिल ऑफ सायंस म्युझियम यांच्यातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी, दि. 21 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजी विज्ञान महा‍विद्यालयात या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता - संभाव्यता व आवाहने या विषयावर हा मेळावा होणार आहे.

यावेळी उद्घाटक म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. जी ठाकरे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी प्रत्येक विभागातून दोन विद्यार्थी याप्रमाणे सोळा विद्यार्थी दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी सर सी. व्ही रमन सभागृह, शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथील स्पर्धेत सहभागी होतील. यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी शंभर गुणांचे मुल्याकन राहणार आहे. या सोळा विद्यार्थ्यापैकी  गुणानुक्रमे एका विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

समारोप कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे उपस्थित राहतील.

            राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक 3 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र, सहा उत्तेजनार्थ प्रति विद्यार्थी 1 हजार 500 रूपये ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बुराडे यांनी कळविले आहे.    

0000





स्वच्छताही सेवा अभियानाला सुरवात

अमरावती, दि. 19 (जिमाका) : नेहरु युवा केंद्रातर्फे स्वच्छताही सेवा या स्वच्छता अभियानाला सुरवात झाली आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर अभियान दि. 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक घर, मोहल्ला, गाव, शहर आणि तलाव नदी. नाले यातील प्लास्टीक गोळा करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत निशनच्या 10 व्या वर्षानिमित्त माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय या विभागांतर्गत स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता या थीमसह स्वच्छ भारत मिशन - नया संकल्प है देशव्यापी अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे उदि्दष्ट एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टीकच्या पर्यावरण आणि आरोग्यावरील परिणामाबद्दल शिक्षित आणि जागरुकता निर्माण करणे आणि स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी समुदायाच्या सहभागाद्वारे पुन्हा वापरता येण्याजोग्या उत्पादनांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात युवक मंडळाच्या माध्यमाने राबविण्यात येणार आहे. यासाठी युवकांनी सार्वजनिक ठिकाणी येवून गाव, परिसराची स्वच्छता करुन विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युवकांनी केरकचरा, प्लास्टीकपासून गावाची मुक्तता करावी, तसेच माय भारत पोर्टलपर नाव नोंदणी करावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी असे केले आहे.

000000

करजगाव, देवरा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

अमरावती, दि. 19 (जिमाका) : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत करजगाव आणि देवरा (शहिद) येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 86 रूग्णांपैकी 19 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ. श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ. सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, समुदाय आरोग्य अधिकारी गीता दराके, आरोग्य सहाय्यक श्री. पतंगराव, रूग्णवाहिका चालक आबाराव खंडारे, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.

0000




मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांनी साधला

धनगर बेडा येथील समाज बांधवांशी संवाद

अमरावती दि. 19 (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांचे आज अमरावती विश्रामगृह येथे सकाळी आगमन झाले.  यावेळी त्यांना पोलीस विभागामार्फत सलामी देऊन मानवंदना देण्यात आली . पद्मश्री डॉ. विकास महात्मे, धनगर विकासमंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय उपायुक्त संजय पवार, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार तसेच चांदुर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे, तहसीलदार पूजा माटोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

             त्यानंतर राज्यपाल श्री. विजयाशंकर त्यांनी  चांदुर रेल्वे तालुक्यातील धनगर बेडा येथे भेट दिली. यावेळी धनगर समाज बांधवांचे दैवत श्री. खंडोबा यांच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. धनगर बेडा समाज बांधवांनी राज्यपाल श्री. विजयाशंकर यांचा पारंपारिक पद्धतीने घोंगडी श्रीफळ देवून सत्कार केला . तसेच स्त्री-पुरुषांनी पारंपारिक नृत्य यावेळी सादर केले. राज्यपाल महोदय यांनी धनगर समाज बांधवांशी संवाद साधला.

भटकंती करणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बेड्यावरील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निवडक प्रतिनिधींसह सुनियोजित दिवशी मुंबई येथील राजभवन येथे यावे .मी तेथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या समोर आपल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मी निश्चित प्रयत्न करेल. पाड्यावरील सर्व बांधवांना शासकीय योजनेअंतर्गत घर बांधणे, पाड्यांपर्यंत रस्ते बांधकाम, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. वन विभागामार्फत धनगर समाज बांधवांना सहकार्य मिळेल. तसेच पाड्यावर  राहणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अशी शासकीय कागदपत्रे तयार करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास राज्यपाल श्री. विजयाशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर राज्यपाल यांनी  नागपूरकडे  प्रयाण केले .

00000

पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ई-भूमिपूजन

अमरावती दि. 19 (जिमाअ) :  नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे उद्या शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे ई-भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क येथे करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाला जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर यांनी केले आहे.

            पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रीजन्स ॲड अपेरल (पीएम मित्रा )पार्क अमरावती या प्रकल्पाची किंमत 703.23 कोटी रुपये एवढी आहे. या टेक्स्टाईल पार्कला विकसित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत विकास भांडवल अर्थसहाय्य 200 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा प्रकल्प 1076.80 हेक्टर जमिनीवर विकसित झालेल्या अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे सदर पार्क निर्माण होणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये जलद गतीने उद्योग स्थापन होण्यासाठी प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी प्रति पार्क 300 कोटी रुपयांची तरतूद आहे. एकात्मिक टेक्सटाईल पार्कच्या स्वरूपात विशेषतः महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होतील. या प्रकल्पातून 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे तसेच एक लाखांपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती होणार आहे.

00000

Wednesday, September 18, 2024

DIO AMRAVATI NEWS 18.09.2024

 शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 18 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर कलम दि. 2 ऑक्‍टोबर 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कलमाचा भंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

00000

सण-उत्सवाच्या काळात जमावबंदी आदेश जारी

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यात येत्या काळात सण उत्सव साजरे होणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

सदर आदेशाची अंमलबजाणी करण्यासाठी सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 36 मधील पोटकलमानुसार कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

            रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असल्यास किंवा अडथळ्यांचा संभव असल्यास अडथळा होऊ देऊ नये, मिरवणूकांचे मार्ग विहित करणे, मोर्चे, निदर्शने, सभा, पदयात्रा, वाद्यांबाबत नियम आणि नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

0000

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

अमरावती, दि. 18 (जिमाका) : कौशल्य विकास या संकल्पनेचा लाभ युवकांना व्हावा, यासाठी नामांकित महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. यात जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, वरुड, जी. एस. टोम्पे कॉलेज, चांदूर बाजार, अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चिखलदरा, वाय डीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, तिवसा, राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, अमरावती, महिला महाविद्यालय, अमरावती, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग, तिवसा, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, अमरावती केंद्रांचा समावेश आहे.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रागंणात करण्यात येणार आहेत. यावेळी अन्य जिल्ह्यातील कौशल्य विकास केंद्राचे दूरदृष्यप्रणालीद्वारे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात उमेदवारांनी नोंदणी करावी, तसेच महाविद्यालयातील कार्यक्रमात उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.

0000

Tuesday, September 17, 2024

DIO AMRAVATI NEWS 17.09.2024

 मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर यांचा दौरा

अमरावती दि. 17 (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयाशंकर दि. 19 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा कार्यक्रमानुसार, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता अमरावती विश्रामगृह येथे आगमन होईल. दुपारी 12 वाजता अमरावती विश्रामगृह येथून धनगर बेडा येथे निघून दुपारी 12.30 वाजता धनगर बेडा येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 2.30 वाजता अमरावती येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे  प्रयाण करतील.

000000



आरोग्य विभागामुळे मेळघाटातील साथ आटोक्यात

अमरावती, दि. 17 (जिमाका)  : मेळघाटातील जामली येथे अतिसाराची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त झाली. आरोग्य विभागाने केलेल्या तातडीच्या प्रतिसादाने येथील साथ आटोक्यात आली आहे.

स्थानिक मोहन गायन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्ब्रुसोंडाच्या अंतर्गत जामली उपकेंद्रातील जामली गावामध्ये अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याचे निदर्शनास येताच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या जिल्हास्तरीय शिघ्र प्रतिसाद पथकातील  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी  आणि पथकातील सदस्यांनी गावाला तातडीने भेट दिली. तसेच सखोल चौकशी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या.

गावात दोन सार्वजनिक विहिरी असून एका विहिरीच्या आजुबाजूला नाली असल्याने पाणी साचून ते पाणी विहिरीत झिरपते. तसेच दुसरी विहिर नदीकाठी असून नदीचे गढुळ पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. या विहिरीचे पाणी नमुने दुषित आढळुन आलेले आहे. गावात 2 पाण्याच्या टाक्या असून 1 टाकी 50 हजार लिटर, तर दुसरी 30 हजार लिटर क्षमतेची आहे. नळ योजनेमार्फत घरोघरी पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु गावामध्ये ठिकठिकाणी नळजोडणी फुटल्याचे आढळून आले आहे. गावात खताचे ढिगारे, तुडुंब भरलेल्या नाल्या, तसेच सर्वत्र अस्वच्छता असल्याने डासांच्या घनतेत वाढ झाली आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णात वाढ झाली आहे.

जामली येथील जिल्हा परिषद शाळेत रुग्णांसाठी उपचारार्थ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. याठिकाणी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी दोन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी 436 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

गावात 9 चमूकडून घरोघरी साथरोग सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज पाणी नमुन्यांची ओटी चाचणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य पथकाद्वारे दररोज किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. गावात डासनाशक औषधांद्वारे धुरफवारणी करण्यात आली आहे.  नाल्यांमध्ये टेमीफोस अॅक्टीव्हीटी राबविण्यात आली. डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आले आहे. घरोघरी पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी मेडीक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपायायोजनांमुळे याठिकाणीच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्षातील अधिकारी जामली येथे नियमित भेटी देत आहे. तसेच तेथील परिस्थतीचा नियमित आढावा घेत आहे. सध्या साथरोग परिस्थिती नियंत्रणात आहे.

0000000

आजपासून माय भारत पोर्टलवर युवकांची नोंदणी

*विविध उपक्रमाचे होणार आयोजन

 

अमरावती, दि. 17 (जिमाका) : केंद्र शासनातर्फे युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. ही नोंदणी बुधवार, दि. 18 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. यासाठी युवकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा विभागा मार्फत दि. 18 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर दरम्यान युवकांच्या सहभागाने युवांची नोंदणी, अनुभवात्मक शिक्षण, सेवाकार्य, स्वच्छता, फिट इंडिया उपक्रम, पंधरवाडा अंतर्गत विविध उपक्रमाची नोंदणी माय भारत पोर्टलवर करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काउट गाईड आणि प्रशिक्षणार्थ्यांनी mybharat.gov.in या संकेतस्थळावर 25 सप्टेंबर नोंदणी करावी लागणार आहे. 15 ते 29 वयोगटातील युवकांनी यात नोंदणी करावी. तसेच दि. 18 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोंबर या कालावधीत विविध उपक्रमांची नोंदणी करावी लागणार आहे.

सामाजिक कार्य, अनुभवनात्मक शिक्षण, कौशल्याच्या संधी, नवीन संकल्पना, आरोग्य, सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, पोलिस स्वयंसेवक, कौशल्य विकासात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी करता येणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, क्रीडा मंडळांनी माय भारत पोर्टलवर उपक्रमाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

0000000

कंत्राटी वाहनासाठी निविदा आमंत्रित

अमरावती, दि. 17 (जिमाका) : अमरावती येथील राज्य वस्तू व सेवा कर कार्यालयासाठी 2 कंत्राटी वाहने 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घ्यावयाचे आहे. यासाठी इच्छुकांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कंत्राटी वाहनांच्या निविदा दरपत्रक बंद पाकिटामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत राज्य वस्तू व सेवाकर कार्यालय, विभागीय आयुक्त कर्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती 444602 येथे पाठविण्यात यावे. याबाबत अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आल्या आहेत.

00000


जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी


     अमरावती, दि. 17: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार,आणि साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.


      निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार प्रशांत पडघम, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.







भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...