पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि.
8 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. 9 मे, रोजी जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार
पालकमंत्री श्री. बावनकुळे हे दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण
करतील. दुपारी 4.30 ते 6.30 वाजता जिल्हा परिषद कार्यालय, अमरावती येथे राखीव. सायंकाळी
7 वाजता मोटारीने अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
000000
जलयुक्त शिवार अभियान 2.0: अमरावती
जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती;
597 कामांना प्रशासकीय मान्यता
अमरावती, दि. 8 (जिमाका):पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि जिल्ह्याची
सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'जलयुक्त शिवार अभियान
2.0' अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पावसाचे पाणी
अडवणे, भूजल पातळी वाढवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि जमिनीचा पोत सुधारणे
या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत असून या उन्हाळ्यात विविध यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावर
कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
विशेष निधीतून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना 597 कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान
करण्यात आली आहे. यामध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत 603 कामांसाठी 5 कोटी 15 लाख
रुपये, मृद व जलसंधारण विभाग (जिल्हा परिषद) अंतर्गत 11 कामांसाठी 1 कोटी 69 लाख रुपये,
तर मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर अंतर्गत 4 कामांसाठी 1 कोटी 28 लाख रुपयांच्या
कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी अभियानाला अतिरिक्त प्रोत्साहन देऊन जास्तीत
जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पाणी साठवणुकीच्या
नवीन सुविधा निर्माण झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून, याचा थेट फायदा जिल्ह्यातील
शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी
अमरावती जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग पूर्ण तत्परतेने हे अभियान राबवित आहेत.
000000
चिखलदरा तालुक्यातील विकासकामांचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा;
मडकी येथे पर्यटन विकासासह जलसंधारणावर
भर
अमरावती, दि. ८ (जिमाका):जिल्हाधिकारी
आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी
केली. नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा दर्जा तपासून
सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. मडकी (ता. चिखलदरा)
येथे जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपाययोजना अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट नाला बांधकामाची
पाहणी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केली. यावेळी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण
झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा योजनांची सविस्तर
माहिती घेतली. मडकी येथील भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी
संवाद साधताना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. जलसंधारणाची कामे केवळ पाणी साठवण्यापुरती
मर्यादित न ठेवता, त्यांचा उपयोग पर्यटन वाढीसाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी करावा,
जेणेकरून पर्यटकांना आकर्षित करून स्थानिक रोजगार वाढवता येईल, असे त्यांनी यावेळी
सांगितले.
तसेच यावेळी मौजे कोहाणा येथे मृद व जलसंधारण
विभागामार्फत सुरू असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या (K.T. Weir) कामाचीही
पाहणी करण्यात आली. हे काम तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी
यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, सर्व विकासकामे ही नियोजनबद्ध
आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन असावीत. जलसंधारणाच्या दर्जेदार कामांमुळे भूजल पातळीत
वाढ होऊन त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी होईल. पाणीटंचाई दूर करण्यासोबतच
ही ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाल्यास परिसराचा आर्थिक कायापालट होण्यास मदत
होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनातील
विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
0000000
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 10 उमेदवारांची अंतिम निवड
अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक
जिल्हा कार्यालयात 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' संपन्न झाला. या मेळाव्यात
180 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन 10 जणांची अंतिम, तर 46 उमेदवारांची प्राथमिक
निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी कौशल्य विकास अधिकारी
अभिषेक ठाकरे, सुभाष गुल्हाने, कृपा अर्गुलेवर, संदीप यादव, पंकज कचरे उपस्थित होते.
मेळाव्यात प्रेसिजन मॅपिंग, आशिष एंटरप्रायजेस, श्रीराम लाईफ इन्शुरन्स, हैदराबाद सिक्युरिटी,
एच.आर. जाधव मेअर्स आणि एल.आय.सी. या सहा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या मेळाव्यातील एकूण 84 रिक्त पदांसाठी 210 उमेदवारांनी
नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या 180 उमेदवारांच्या कंपनी
प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. मुलाखतीअंती पात्रतेनुसार 46 उमेदवारांची प्राथमिक तर
10 उमेदवारांची विविध पदांवर थेट अंतिम नियुक्ती करण्यात आली.
0000000
मोथा येथे गावकऱ्यांच्या सुविधेसाठी शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन;
ग्रामपंचायतीकडून पारंपारिक जलस्रोतांचे जतन व सक्षमतेवर भर
अमरावती, दि. 8 (जिमाका): दुर्गम भागातील नागरिकांना
शुद्ध पाणीपुरवठा व्हावा आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी मोथा ग्रामपंचायत
व स्थानिक प्रशासनामार्फत विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. चिखलदरा तालुक्यातील
मोथा येथे गावकऱ्यांची सोय व स्थानिक भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा अधिक
लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
मोथा गावामध्ये सद्यस्थितीत गाव तलावातील विहिरीवरून
पाण्याच्या टाकीद्वारे घरोघरी नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याचे नियमित
क्लोरिनेशन करून ते निर्जंतुक केले जाते. मात्र, मुख्य विहीर तलावामध्ये असल्याने पावसाळ्यात
किंवा नैसर्गिक कारणांमुळे पाणी गढूळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन, गावकरी हे पाणी
पिण्याव्यतिरिक्त इतर घरगुती वापरासाठी प्राधान्याने वापरत आहेत.
गावकऱ्यांचे
आरोग्य निरोगी राहण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी गावालगत असणाऱ्या दुसऱ्या
विहिरीचे स्वच्छ पाणी वापरण्याची येथील नागरिकांची पूर्वापार परंपरा आहे. ही विहीर
स्वच्छ पेयजलाचा एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरली आहे. सद्यस्थितीत या दुसऱ्या विहिरीची
पाणी साठवण क्षमता संपूर्ण गावाला नळ जोडणीद्वारे पुरवण्याइतकी पुरेशी नसली, तरी गावकऱ्यांची
पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी हा पारंपरिक जलस्रोत अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
लोकभावनांचा आदर करत आणि गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवून त्यांना गावातच
सुरक्षित पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहे.
000000
- जिल्हाधिकारी आशिष येरेकर
कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर
आणि
मालकी हक्क मिळण्यास मदत होणार
अमरावती, दि. 8 (जिमाका) : अमरावती महानगरपालिकेच्या
हद्दीतील शासकीय जमिनीवरील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या निवासी अतिक्रमणांना
नियमित करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महानगरपालिका
क्षेत्रातील मारुती नगर (पेठ अमरावती), सातुर्णा (जुने गावठाण) आणि महाजनपुरा या भागांतील
एकूण 77 कच्चे बांधकाम असलेल्या घरकुलांचे मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याचा मार्ग
आता मोकळा झाला असल्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे
अनेक वर्षांपासून कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर
आणि मालकी हक्क मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 25 मार्च
2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील शासकीय जमिनींवरील दि. 1 जानेवारी
2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे काही विशिष्ट अटींवर नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय
घेण्यात आला आहे. याच धोरणाची अंमलबजावणी आता अमरावती महानगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने
सुरू करण्यात येत आहे.
शासकीय नियमांनुसार, ज्या नागरिकांनी 1 जानेवारी
2011 पूर्वी शासकीय जमिनीवर निवासी उद्देशाने अतिक्रमण केले आहे, तेच या योजनेसाठी
पात्र ठरतील. यामध्ये कमाल 1500 चौ. फूट क्षेत्रापर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार
असून, त्यातील 500 चौ. फुटांपर्यंतचे क्षेत्र नागरिकांना पूर्णपणे मोफत (विनामूल्य)
दिले जाणार आहे. त्यावरील अतिरिक्त क्षेत्रासाठी शासनाने ठरवून दिलेले विहित शुल्क
(कब्जेहक्क रक्कम) भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर संबंधित पती-पत्नीच्या संयुक्त नावाने
'भोगवटादार वर्ग-2' म्हणून अधिकृत मालकी हक्काचे आदेश प्रशासनाकडून निर्गमित केले जातील.
या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि सुरक्षिततेचा
विचार करून काही कडक निकषही लावण्यात आले आहेत. नदीपात्र, नाले, रस्ते, पुराची निळी
किंवा लाल रेषा, वन जमीन, विविध कारणांसाठी आरक्षित ठेवलेल्या जागा आणि प्रतिबंधित
क्षेत्रातील कोणत्याही अतिक्रमणांना या योजनेअंतर्गत नियमित केले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी
श्री. येरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेताना नागरिकांची
फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे
की, या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जात आहे. कोणत्याही नागरिकाने पट्टे
मिळवण्यासाठी किंवा मंजुरीसाठी कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नये. अधिकृत व अचूक
माहितीसाठी थेट अमरावती महानगरपालिकेच्या मुख्यालय स्तरावरील 'सहाय्यक संचालक नगर रचना
विभाग' अथवा संबंधित झोन स्तरावरील 'सहाय्यक आयुक्त' यांच्याशी थेट संपर्क साधावा.
00000
अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती
मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ
अमराती दिनांक
8: राज्य सेवाहक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून म्हाडाचे सेवानिवृत्त
मुख्य अधिकारी तथा वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून राज्यपालांच्या वतीने आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार
श्रीवास्तव मंगळवार दिनांक 12 मे रोजी राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची
शपथ देणार आहेत.
मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअर अँड री कन्स्ट्रक्शन
बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची
सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय
मिळावा या सामाजिक बांधीलकीने त्यांनी काम केले असून, शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा,
अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती
तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहे.
अमरावती महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण
विकासासोबतच ऑनलाइन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला
घर बांधणीसाठी सुलभपणे परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस व अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. यशवंत
पंचायतराज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी
या पदावर काम करताना जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली.
या योजनेचा
राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्याधिकारी
तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडामध्ये
मुख्याधिकारी असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा हक्क अबाधित राहावा,
त्यांना वेळेत भाडे मिळावे व इमारतीचे नियोजित वेळेत बांधकाम करून पुनर्वसन करण्यासंदर्भातील
महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांच्या कार्यकाळात निर्गमित करण्यात आला. त्यांच्या प्रभावी
व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून
नियुक्ती केली आहे.




.jpeg)


No comments:
Post a Comment