विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी
शाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी
अमरावती, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांच्या खात्यात अद्याप पुरस्काराची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलबद्दल 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ अर्जात चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड नमूद केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे.
याबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. परंतू महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे अचूक बँक तपशील समाज कल्याण कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम त्वरित जमा व्हावी, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दुरुस्त करून 31 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून ते जमा करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
00000000
उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित
*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणीपाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 95.50 किमीपर्यंत आणि डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसचित नदी, नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ या तत्वानुसार सिंचन करण्यात येणार आहे.
खरीप हंगामात दि. 1 जुलै ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून दि. 31 जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मीटर पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या ऊस, कापूस, केळी व फळबाग या नगदी पिकांसाठी पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू राहणार आहे. यासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000
उर्ध्व वर्धा जलाशयजवळील जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.
ही गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी आणि एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
00000000
मतदारयाद्यांचे मॅपिंग तातडीने पूर्ण करावे
अमरावती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन
अमरावती, दि. 26 (जिमाका) : मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहेत. या अंतर्गत नागरिकांची 2002 मधील मतदारयादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित बीएलओंना भेटून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
38 - अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही 24 टक्के मतदारांचे मॅपिंग होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या मतदारांचे बीएलओंकडून मॅपिंग पूर्ण झाले आहे, त्यांची 'एसआयआर' प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार आहे. मात्र, ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल, अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील. हा त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे.
अनेक मतदारांची नावे मतदारयादीत दोन ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे, तेथील नाव कायम ठेवावे. तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित बीएलओंकडे 'नमुना अर्ज क्र. 7' सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या बीएलओंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच दुबार नावांच्या सुधारणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment