Sunday, February 8, 2026

DIO NEWS AMRAVATI 08-02-2026

    





























                                                     धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त

*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती

अमरावती, दि. 8 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे धारणी येथे आज महाविधी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्यांनी संविधानाला अभिप्रेत असलेला शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. धारणीतील महाशिबिरही न्यायप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी घेण्यात आला आहे, असे मत व्यक्त केले. यासोबतच 36 स्टॉलवर शासकीय विभागांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, तर मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती प्रविण पाटील उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले, नगराध्यक्ष सुनील चौथमल, धारणी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेमलाल कोगेकर, दत्तात्रय वमणे उपस्थित होते.

न्यायमूर्ती श्री. किलोर यांनी शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलो आहेत. शिबिराचे हे ध्येय असून न्याय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून मदत होणार आहे. संबंधिताला अधिकार आहेत, याची जाणीव करून देणे आणि त्याला माहिती देणे यासाठी शिबिर महत्वाचे ठरणार आहे. या परिसरात असलेल्या जमिनीचा प्रश्न, उच्च शिक्षणाची सोय, यासोबतच न्यायालयांसाठी जागा आदींबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील. या भागात पॉस्कोच्या तक्रारी जादा असल्याने याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळे खटल्यांची संख्या कमी होऊन अन्याय दूर होण्यास मदत होईल, असे सांगितले

न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत न्यायाचा संदेश पोहोचविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे न्याय अधिकाराबाबत जनजागृती करणे हाच या शिबिरामागील उद्देश आहे. समाजामध्ये शोषणाविरुद्ध मौन बाळगल्यास असे करणाऱ्या व्यक्तीला बळ मिळत असल्याने या शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबतच नागरिकांना आवश्यक असणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आणि न्यायव्यवस्था यांच्या सहकार्यातून मजबूत लोकतंत्र तयार होणार आहे. नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता न्याय मागण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी या शिबिरामुळे न्यायाची संकल्पना दुर्गम भागात पोहोचवली जाणार आहे. विधी सेवा हा सेतू म्हणून कार्य करीत असल्याने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. या माध्यमातून मदतीचे कर्तव्य बजाविल्या जाणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी धारणीमध्ये दुसऱ्यांदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी अकराशे नागरिकांना वनपट्टे वाटप करण्यात आले आहे. वर्ग एक जमीन करण्याबाबत काही अडचणी येत असल्यास विशेष शिबिर घेऊन प्रश्न मार्गी काढण्यात येतील. न्यायालयासाठी धारणी उपविभागीय कार्यालयातील जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज तातडीने सुरू होईल, असे सांगितले.

कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंचायत समिती, तहसील कार्यालय, वनविभाग, पोलीस स्टेशन, मोटार अपघात प्राधिकरण, महिला व बाल विकास आणि भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने विविध लाभाचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. धारणी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रेमलाल कोगेकर यांनी प्रास्ताविक केले. ॲड. धर्मेंद्र पंडित यांनी आभार मानले.

साद्राबाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील फ्रंट वर्कर्स यांनी बालविवाह, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर पथनाट्य सादर केले. चिखलदरा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात विधी सेवा प्राधिकरणाच्या नालसा आणि मालसा गीताने करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोपट्यांना पाणी देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्दिष्टांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 08-02-2026

                                                           धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त *विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम *36 स्...