जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिक्षक निलेख खटके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000
जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस
अमरावती, दि. 23 (जिमाका) : धारणी तालुक्यातील राणीघाटामध्ये झालेल्या अपघातातील पाच जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट घेऊन अपघात आणि प्रकृतीची माहिती घेतली. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते.
अपघातामधील अर्चना दारासिंगे, रा. कंजोली, गेरुबाई देवळे, रा. मोठेखेडे, रिता राठोड, रा. सिनंबद, देवा धांडे, रा. कंजोली, मुनी दहीकर, रा. कंजोली, विकेश दहीकर, सालाई, सर्व ता. धारणी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील रिता राठोड यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुरवातीला अपघात कक्षातील जखमी भुनी दहीकर यांना भेट दिली. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली. अपघात कशाप्रकारे घडला, वाहनात किती नागरिक होते, अपघाताचे कारण आदींची माहित घेण्यात आली. त्यानंतर अपघातातील अर्चना दारसिंगे या गर्भवती महिलेची भेट घेतली. अपघातामुळे माता व बाळ दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी उपचार करावेत. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच रूग्णालयातून सुट्टी द्यावी, अशा सुचना केल्या. शल्यचिकित्सा कक्षात दोन जणांवर शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. याठिकाणीही श्री. येरेकर यांनी भेट देऊन जखमींच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली.
राणीघाटातील अपघाताला वाहनचालक कारणीभूत आहेत. वाहनचालकाने वाहन सुस्थितीत नसताना माल आणि प्रवासी जादा प्रमाणात भरले. तसेच धावत्या वाहनामध्येच बिघाड झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील जमखींची विशेष उपचार देऊन मृत्यू होऊ नये, याची काळजी घ्यावी. अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे जखमींनी पूर्ण उपचार घेऊन घरी जावे. जखमींवर योग्य उपचार करावेत. आवश्यकता भासल्यास खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यात यावी. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उपचारासाठी सहकार्य करावे, असे श्री. येरेकर यांनी सांगितले.
मेळघाटमध्ये झालेल्या अपघातातील वाहनचालकांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्या.
00000
दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार
*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली
अमरावती, दि. 23 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन 2025-26 या वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामांमध्ये बदल करून विकासकामे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळणार आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत सांडपाणी निचऱ्यासाठी नाली, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, एलईडी लाईट आणि पेविंग ब्लॉक बसवणे यांसारख्या 670 कामांची निवड करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचे प्रमाण जास्त असल्याने ही कामे बदलविण्याची सूचना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केली होती. तसेच सांडपाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्था आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गट विकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील 112 कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे आता 670 विकासकामे सुरू होणार आहे.
या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकऐवजी आता आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये गटारे, पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. सर्व कामांचे जिओ टॅगिंग आणि छायाचित्र पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. बदललेल्या 112 कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव, प्रमाणपत्रे आणि अंदाजपत्रकासह तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment