सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’;
सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप
अमरावती, दि. 3 (जिमाका):शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शनिवार, दि. 6 जून 2026 रोजी अमरावती जिल्ह्यात भव्य ‘मेगा कृषी ऋण आउटरीच कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे सकाळी 11 वाजता या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित राहणार असून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, अमरावतीचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
हा कॅम्प केवळ एकाच ठिकाणी मर्यादित नसून अमरावती जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व 45 शाखांमध्ये एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या मेळाव्यामध्ये शेती आणि पूरक व्यवसायांना गती देणाऱ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्ड , कृषी पायाभूत सुविधा निधी, ग्रामीण गोदाम भंडारण, कोल्ड स्टोरेज (शीतगृह) आणि महिला बचत गट यांसारख्या शासकीय व बँक योजनांचा समावेश आहे. या कॅम्पमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून जागेवरच मंजुरी पत्र आणि थेट कर्जवाटप केले जाणार आहे.
हा कृषी मेळावा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेष संधी निर्माण करणारा आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कृषी उद्योजकांनी शनिवार, दि. 6 जून रोजी आपल्या जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत किंवा दर्यापूर येथील मुख्य कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहून या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावतीचे अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.
00000
जिल्ह्यातील सर्व 840 ग्रामपंचायतींचा ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’
अभियानात उत्स्फूर्त सहभाग
अमरावती, दि. 3 (जिमाका): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची सुदृढ आरोग्याकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात सध्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान प्रभावीपणे राबविले जात असून, जिल्ह्यातील एकूण 840 ग्रामपंचायतींपैकी सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात शंभर टक्के सहभाग नोंदविला आहे. संपूर्ण जिल्हा आता स्वच्छता आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देत असून, ग्रामीण भागात या निमित्ताने एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व ग्रामपंचायती आणि स्थानिक आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अभियानांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यवाहीच्या जोरावर ‘सुदृढ विजेता’ म्हणून घोषित होण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये आता एक निरोगी स्पर्धा सुरू झाली आहे. गावागावात स्वच्छता आणि आरोग्य सुविधा बळकट करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
या संपूर्ण मोहिमेचे चोख नियोजन व उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व ग्रामपंचायतींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून वेळोवेळी मार्गदर्शन व आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे, ज्यामुळे या मोहिमेला मोठी गती मिळाली आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून अमरावती जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि आरोग्य यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.
000000
वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण
अमरावती, दि. 3 (जिमाका): सिंदेवाही परिक्षेत्र (ब्रह्मपुरी प्रादेशिक वनविभाग) येथील 'T२' नामांकित वाघिणीच्या शावकासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारी आहे. या चुकीच्या बातम्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे आणि वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गैरसमजाचे वातावरण निर्माण होत असल्याचे वन विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबतची खरी वस्तुस्थिती अशी की, सिंदेवाही परिक्षेत्रातील 'T२' वाघीण मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण करत असल्यामुळे, वन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून तिला तिच्या शावकांसह सुरक्षितपणे पकडले आहे. मात्र, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याप्रमाणे 'T२' वाघिणीला परतवाडा येथे हलवलेले नसून, तिच्या शावकांपैकी एका शावकाला (T२ Cub १) पुढील आवश्यक व्यवस्थापन, सुरक्षितता आणि वैद्यकीय देखरेखीच्या दृष्टीने परतवाडा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या शावकाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याच्या अफवा देखील पसरत आहेत, परंतु सद्यस्थितीत या 'T२ Cub १' शावकास मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सोडण्याचा किंवा मुक्त अधिवासात पुनर्स्थापित करण्याचा कोणताही निर्णय अथवा योजना वन विभागाच्या विचाराधीन नाही. शावकाला केवळ सुरक्षित वातावरणात वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक निगा उपलब्ध करून देणे हाच या स्थलांतराचा प्रमुख उद्देश आहे. प्रसारमाध्यमांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही यासाठी वस्तुस्थितीवर आधारित आणि वन विभागाकडून पडताळणी केलेली अचूक माहिती प्रसारित करावी, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment