Thursday, June 13, 2019

प्रशासनाकडून ऑनलाईन सेवांचा विस्तार प्रमाणपत्रांसाठीच्या 12 हजार अर्जांवर तत्काळ प्रक्रिया



अमरावती, दि. 13 : नागरिकांना आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळवून देण्यासाठी  प्रशासनाने विविध प्रमाणपत्रांच्या ऑनलाईन सेवांचा विस्तार केला असून, त्यामुळे नागरिकांना अनेक प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळवणे शक्य झाले आहे. या उपक्रमांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, दि. 1 जूनपासूनची आकडेवारी पाहता 12 दिवसांत (12 जूनपर्यंत) सुमारे 12 हजार अर्जांवर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 
ऑनलाईन सेवांसाठी सुलभ असे आपले सरकार वेबपोर्टल, तसेच आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप शासनाकडून सुरु करण्यात आले. ही प्रक्रिया जिल्ह्यातील कार्यालयांनी अधिकाधिक सेवांसाठी वापरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय कार्यालये व तहसील कार्यालयांना दिले. त्यानुसार प्रशासनाकडून विविध कार्यालयांत सेवांचा विस्तार करण्यात आला आहे.
वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमीहीन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्रासह नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र व नुतनीकरण, रहिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विविध प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. सेतू, तसेच जन सेवा केंद्राद्वारे विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दाखल केल्यानंतर प्रमाणपत्रे दिली जातात. तथापि, ही प्रक्रिया गतिमान व्हावी या उद्देशाने आता प्रशासनाने ऑनलाईन सेवांचा विस्तार केला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली.  
   जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया असताना पूर्वी नागरिकांचा वेळ जात होता. मात्र, आता ऑनलाईन झाल्याने नागरिकांना घरबसल्या प्रमाणपत्र मिळविण्याची सोय झाली आहे.  त्यामुळे नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत, असे अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी सांगितले. 

Wednesday, June 12, 2019

जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान बालमजुरीविरोधात सातत्याने काम होणे आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





अमरावती, दि. 12 : केवळ जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातर्फे जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान व चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिका-यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, प्रकल्प संचालक प्रविण येवतीकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी, प्रकल्पातील स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिका-यांनी चित्ररथावरील संदेशफलकावर बालमजुरीविरोधी संदेश लिहून स्वाक्षरी केली. सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांनीही संदेशलेखन व स्वाक्षरी केली. यावेळी बालमजुरीविरोधी पथनाट्याचे सादरीकरणही करण्यात आले.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाकडून हे अभियान बसस्थानक चौक, राजापेठ चौक, गांधी चौक व पंचवटी चौकात राबविण्यात आले. ठिकठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. काशिराम चाळ, सुफी प्लॉट, रायपुरा, मोमिनपुरा, विलायतपुरा, बियाबानी, सिंधी कँप, आनंदनगर, अलीमनगर, औरंगपुरा, लालखडी, अजिजपुरा आदी विविध ठिकाणांहून स्वयंसेवक जमले होते. नागरिकांनीही या स्वाक्षरी अभियानाला मोठा प्रतिसाद दिला.

जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचा प्रयोग पाण्याची उपलब्धता वाढेल - जिल्हाधिकारी शैलेश नवाल








अमरावती, दि. 12 : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात नदी नांगरण्याचे प्रयोग होत असून, त्याद्वारे नदीचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल व जलस्तर उंचावून परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज व्यक्त केला.
            जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी अचलपूर तालुक्यातील गावांचा दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार निर्भय जैन यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
            अचलपूर तालुक्यातील जलालपूर, देवगाव परिसरातील चंद्रभागा नदीत जेसीबी आदी यंत्राद्वारे नदी नांगरण्याचा प्रयोग होत आहे. नदीच्या पात्राची जमीन सखोल नांगरली जात आहे.  नदीच्या दोन्ही काठांदरम्यानचा भाग संपूर्ण सखोल नांगरल्यामुळे पुराचे पाणी वाहून न जाता भूमीत मुरेल. त्यामुळे जलस्तर उंचावून पाणीटंचाईपासून दिलासा मिळेल.नदीलगतच्या विविध गावांना, शेतशिवाराला त्याचा फायदा होईल व कृषी उत्पादकताही वाढेल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
            जिल्ह्यात इतरही ठिकाणी जिथे पुराच्या शक्यता आहेत किंवा पाणी वाहून जाण्याचे मोठे प्रमाण आहे, तिथे अशी कामे विनाविलंब चालू करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अनेक ठिकाणी गाळ साचून नदीचे पात्र उथळ होते. पुराचे प्रमाण वाढते. अशाठिकाणी ही कामे तत्काळ करावीत. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
            राजुरा शिवार, नारायणपूर परिसरात जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट नाला बांधाच्या कामांची पाहणी श्री. नवाल यांनी केली. या बंधा-यामुळे 139 हेक्टर जमीनीला लाभ मिळणार आहे. यावेळी श्री. नवाल यांनी गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. परिसरातील काही गावे पोकरामध्ये समाविष्ट आहेत. तेथील कामांचीही माहिती त्यांनी घेतली. बोरगावपेठ या गावाला भेट देऊन त्यांनी खरीप कर्ज वितरण, विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत माहिती घेतली व तेथील गावक-यांशी संवाद साधला. 

Tuesday, June 11, 2019

उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना अपंगत्वावर मात करून शेतमजुराने उभारला डाळ मिलचा व्यवसाय

      








अमरावती, दि. 11 : शेतमजूर असलेल्या गणेश मानकर या युवकाने अपंगत्वावर मात करून भातकुली येथे डाळ मिलचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे.  
गणेश मानकर हे मूळ सायतचे रहिवाशी असून, त्यांच्या कुटुंबात आई- वडलांसह 2 भाऊ आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. बालपणीच पोलिओमुळे त्यांना अपंगत्व आले. गणेश यांच्या घरी केवळ पाच एकर जमीन आहे. त्यामुळे घरची परिस्थिती साधारणच होती. दहावीनंतर गणेश हे शेतमजुरी करू लागले. पुढे काही वर्षांनंतर लग्न झाले. कौटुंबिक जबाबदा-या वाढल्या. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी दिपीका यांनीही आपल्या पतीला पूर्ण पाठबळ दिले. 
परिसरात तूर, हरबरा, उडीद, मूग आदी कडधान्याचे मोठे उत्पादन होते. त्यामुळे गणेश यांनी भातकुली येथे डाळ मिल उभारण्याचा संकल्प केला. डाळ मिलसाठी आवश्यक यंत्रणेची माहितीही त्यांनी जाणून घेतली. डाळ मिलसाठी आवश्यक यंत्रणा सुमारे पावणेचार लाख रूपयांची होती. गणेश यांची आर्थिक स्थिती जेमतेम व हातावर पोट असल्याने फारशी बचत नव्हती. जी काही बचत होती, त्यात काही नातेवाईक व मित्रांनी मदतीची भर घातली.  दरम्यान,  गणेश यांना शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेअंतर्गत कृषी सहायकांकडून माहिती मिळाली.  या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी कृषी कार्यालयाकडे अर्ज केला.
गणेश यांची व्यवसायाची तयारी, जिद्द पाहून कृषी कार्यालयाकडून त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. डाळ मिल खरेदीपोटी त्यांना चाळीस टक्के अनुदान मिळाले. शासनाकडून 1 लाख 40 हजार रूपयांचे अनुदान मिळाल्याने गणेश यांची रसिका डाळ मिल भातकुली येथे उभी राहिली. विविध कडधान्याची डाळ बनविण्याचे काम त्यांनी सुरु केले.
धान्यापासून डाळ बनविण्यासाठी विविध प्रक्रिया कराव्या लागतात. धान्य स्वच्छ करणे, धुणे, वाळवणे, दोन-तीन वेळा यंत्रातून काढणे या सगळ्या कामांत गणेश यांच्यासह त्यांची पत्नी दिपीकाही राबू लागल्या. पुढे धान्यापासून डाळ करून देण्याचे काम वाढत गेले.  गणेश यांना शेतमजुरी करण्याची गरज उरली नाही व डाळ मिलचे काम वाढल्यामुळे त्यांनी काही व्यक्तींनाही आपल्या उद्योगात रोजगार मिळवून दिला.   
फेब्रुवारी ते एप्रिल हा साधारणत: डाळनिर्मितीचा हंगाम असतो. प्रतिदिन सात क्विंटल डाळ निर्मिती त्यांच्या उद्योगातून होऊ लागली आहे. पहिल्या वर्षी त्यांना सव्वा लाख रूपयांहून अधिक निव्वळ उत्पन्न मिळाले. डाळ मिलसह हरभरा डाळ स्वच्छ करण्यासाठी शेलर, ग्रेडर मशिन, पॉलिशर, गहू साफ करण्याचे ग्रेडर मशिनही त्यांनी आणले आहे.  दुस-या वर्षी त्यांच्या उत्पन्नात चांगली भर पडली आहे. आता गणेश यांनी शेवया बनविण्याची मशिन आणली आहे. रव्याचा पापडा बनविण्याची मशिनही ते लवकरच घेणार आहेत.
कृषीमंडळ अधिकारी प्रमोद खर्चान, कृषी सहायक अनिल खलारे यांनी गणेश यांना या प्रकल्पासाठी गणेश यांना माहिती दिली.  जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल इंगळे, अनिल खर्चान यांनी मार्गदर्शन केले. जिद्द,  चिकाटी व कष्ट याद्वारे अपंगत्वावरही मात करता करून यशस्वी व्यवसाय उभारता येतो, हे गणेश यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.

Sunday, June 9, 2019

एमआयडीसी कार्यालयात वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग जलपुनर्भरणाच्या कार्यात उद्योगांनी सहभागी व्हावे -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील









 अमरावती, दि. 9 : रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत कमी खर्चात करता येत असून, हा प्रयोग जलपुनर्भरणासाठी उपयुक्त आहे. विविध उद्योगांनीही जलपुनर्भरणाच्या या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआ़यडीसी) कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहूल बन्सोड, प्रादेशिक अधिकारी सुधीर फुके यांच्यासह विविध उद्योजक व सियाराम, श्याम इंडोफॅब आदी विविध उद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिं करणे लाभदायी ठरते. त्यानुसार विविध कारखाने, उद्योगांच्या इमारतींवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या विषयात महत्वाचे कार्य केले आहे. आता आपणही आपल्या उद्योग, आस्थापनांच्या इमारतींवर, तसेच घरोघरी पाण्याचे पुनर्भरण करून आत्मनिर्भर होऊया, असे आवाहन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी केले.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी आपल्या अमरावतीतील निवासस्थानी छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी यशस्वी प्रयोग केला. त्याच धर्तीवर औद्योगिक विकास महामंडळांतर्गत विविध उद्योगांनाही जलपुनर्भरणासाठी आवाहन करण्यात आले आहे.  इमारतींवर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी हा प्रयोग प्लास्टिक ड्रम, पाईप, खड्डा याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने करता येतो. त्याला केवळ सोळाशे रूपये खर्च येतो. या प्रयोगामुळे पाण्याचे पुनर्भरण वेगाने आणि खोलवर होते आणि मोठा जलसंचय होतो. बाथरुम, बेसिन, किचनचे पाणी शोषखड्ड्यात सोडल्यास पुनर्भरणासाठी फायदेशीर ठरते. 
00000

Thursday, June 6, 2019

महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन


अमरावती, दि.6 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000

Sunday, June 2, 2019

महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान जिल्हाधिकाऱ्यांकडून मेळघाटातील प्रकल्पांची पाहणी





अमरावती, दि. 2 :  महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे  मेळघाटातील विविध गावांत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल शनिवारी पाहणी केली.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी धारणी तालुक्यातील बोड, बेदरबल्ला, भूलोरी आदी गावांना भेट दिली. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे या गावात परसातील कुक्कुटपालन, ग्राम उद्योग केंद्र, महिला बचत गट, जलसंधारण आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत . त्यांची पाहणी श्री. नवाल यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक गतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भूलोरी येथील आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. नागरिकांकडून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या व  त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

DIO NEWS AMRAVATI 29.07.2026

  शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी -          जिल्हाधिकारी आशिष येरेकर   अमरावती, दि. 29 : राजापेठ उड्डाणपूलावरील झालेल्या अपघाताच्या प...