Friday, May 3, 2024

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार; मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रत्येकांचे योगदान- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 










लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार;

मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रत्येकांचे योगदान- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

        अमरावती, दि. 3 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणारे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थाच्या प्रयत्नाने अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद केली आहे. ही बाब निश्चितच अमरावती जिल्हा प्रशासनाला व ही कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाचा टक्का वाढविणाऱ्या शिलेदारांचा सत्कार सभारंभात केले.

 

           लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत स्विप अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था व कार्यालये यांच्या कार्यगौरव सोहळाचे जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, स्विपचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, जिल्हा परिषदचे मुख्य लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे, केबीसी विजेता बबीता ताडे, राजेश मित्तल तसेच तालुक्यातील सर्व स्विप नोडल अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, लोकसभा निवडणूक निर्भयपणे व निष्पक्षपणे पार पडावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा काम करित होती. सोबतच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरु होते. स्विपअंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये शहरी व ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविले. सर्वांच्या प्रयत्नानेच यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीपेक्षा या निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत विक्रमी वाढ झाली आहे. ही बाब सर्वांसाठी भूषणावह असल्याचे श्री. कटियार यांनी सांगितले.

 

                लोकसभा निवडणूकीत केलेला कामाचा सर्वांना अनुभव आला आहे. याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी शंभर टक्के पर्यंत नेण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न प्रशासन, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी करावेत, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले. तसेच स्विप अंतर्गत केलेल्या कामांचा सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

 

              लोकसभा निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली स्विप उपक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके व तालुका नोडल अधिकारी व त्यांच्या चमूने अत्यंत काटेकोर व सूत्रबद्ध नियोजन करून प्रत्येक मतदारांशी घरोघरी संपर्क साधून, त्यांना मतदाना करीता प्रवृत्त करून व त्यांचे प्रत्यक्ष मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले.  यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती, संस्था व संघटनांचा कार्यगौरव सोहळा नियोजन भवन येथे पार पडला. यावेळी प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा, महाविद्यालयाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, पत्रकार, पिंक फोर्सचे सदस्यांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

 

         लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्विप उपक्रमाअंतर्गत केलेल्या कार्यक्रमाची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. घोडके यांनी प्रास्ताविकेतून दिले. तर आभार जिल्हा परिषदचे संजय राठी यांनी मानले.

0000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...