Wednesday, December 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                             रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत

अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येते, रब्बी हंगाम पिक स्पर्धा 2025 मध्ये शेतकऱ्यांना सहभागीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

पिक स्पर्धेमध्ये रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांचा समावेश आहे. पिकासाठी 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. राज्यस्तरावर पिकस्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येणार आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस रु. 5 हजार, दुसरे बक्षिस 3 हजार व तिसरे बक्षिस 2 हजार रूपये आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे बक्षिस 7 हजार व तिसरे बक्षिस 5 हजार रूपये स्वरुप आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे बक्षिस 40 हजार व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण आणि आदिवासी गट राहणार आहे. प्रवेश शुल्क हे पिकनिहाय 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी krush.maharashtra.gov.in किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

0000000

ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 03 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती  ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 14 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

00000

Tuesday, December 2, 2025

DIO NEWS AMRAVATI 02-12-2025



                                     महसूल विभागाची अवैध गौण खनिज वाहतूकीवर धडक कारवाई

*5 हायवांवर जप्त,

अमरावती, दि. 2 (जिमाका) : महसूल विभागाने अमरावती तालूक्यातील अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूकीवर सोमवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पाच हायवांवर कारवाई करण्यात आली. पाचही हायवा जप्त करून नवीन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.

अवैध गौण खनिज वाहतूकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. दि. 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणीता चापले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांचे पथक गस्तीवर होते. अमरावती-डवरगाव रस्त्यावर वाहन तपासणी दरम्यान एमएच 27 डीटी 9366, एमएच 27 डीटी 6494, एमएच 27 डीटी 4555, एमएच 27 डीएल 6494, एमएच 27 डीटी 1480 क्रमांकाचे हायवा अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पाचही ट्रक पथकाद्वारे मुद्देमालासह जप्त केले. सदर हायवा पुढील कार्यवाहीकरीता अमरावती तहसील कार्यालय  येथे लावण्यात आले आहे.

सदर कारवाईत मंडळ अधिकारी सुनील उगले, गजानन हिवसे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल भगत, हेमंत गावंडे, रामकृष्ण इंगळे, पवन बोंडे, रामदास गोडे आणि पोलीस यांनी सहभाग घेतला.

                                                                          0000    

Monday, December 1, 2025

DIO NEWS AMRAVATI 01-12-2025

 








                                        हिंद दी चादर कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा

*मान्यवरांचे आवाहन

अमरावती, दि. 1 (जिमाका) : हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महंत जितेंद्रजी महाराज, राज्यस्तरीय समितीचे सदस्य किसन राठोड, सदाशिव चव्हाण, नंदू पवार, डॉ. निख्खू खालसा, रवींद्रसिंग सलुजा, अनिता पवार , छाया राठोड, बबीता राठोड,  ॲड. नवलानी, वासुदेव महाराज, दिनेश सचदेव आदी उपस्थित होते.

जितेंद्र महाराज यांनी सर्व समाजाच्या वतीने शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एक बलिदानाची आठवण व्हावी, तसेच आपल्या संस्कृतीची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आपली संस्कृती जपली जाणार आहे. गुरु तेग बहादुर यांनी धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांचा त्याग पुढील काळातही माहिती होण्यास या कार्यक्रमामुळे मदत मिळणार आहे.

राज्यस्तरीय समिती सदस्य किसन राठोड यांनी कार्यक्रमामागील सरकारची भूमिका सांगितली. गुरु तेग बहादुर यांची शहादत ही संपूर्ण मानवतेसाठी होती. त्यांच्या बलिदानामुळेच देश टिकून आहे. त्यांचे स्मरण व्हावे, तसेच आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती समाजाला होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. शासनाने एक चांगला उपक्रम हाती घेतला असून राज्यभरात तीन कार्यक्रम होणार आहे. यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. प्रचार आणि प्रसारासाठी गाव, तांड्यामध्ये चित्ररथ फिरविण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या भेटी घेण्यात येत आहे. शाळांमधून गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखविण्यात येत आहे.

या सर्व माध्यमातून समाजाच्या मनाचा विकास होणे आवश्यक आहे. महान व्यक्तींचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या कार्यामधून समाज प्रभावित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने सेवक होऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. शासनाने कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देश घडविण्यासाठी नागपूर येथील कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे  नियोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत लोकसभागातून चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अमरावती ते नागपूर मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. निख्खू खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच उपस्थित त्यांच्या प्रश्नांचचे निराकरण करण्यात आले.

000000

 

 

नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी

अमरावती, दि. 1 (जिमाका): आगामी नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, मतदानाच्या दिवशी, म्हणजेच उद्या, 2 डिसेंबर 2025 रोजी, सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी किंवा कामाच्या वेळेत विशेष सवलत देणे आस्थापनांना बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार, निवडणूक असलेल्या क्षेत्रातील मतदार असलेले आणि उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना (उदा. कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खासगी कंपन्या, आयटी कंपन्या, मॉल्स इत्यादी) या नियमांचे पालन करतील.

विशेषतः, कामासाठी निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांनाही ही सुट्टी मिळणार आहे.

 धोकादायक किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये (उदा. आपत्कालीन सेवा) पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित कामगारांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे आवश्यक आहे.

आस्थापना मालकांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सुट्टी न मिळाल्याच्या तक्रारी आल्यास कठोर कारवाई केली जाईल ,असे आवाहन कामगार उप आयुक्त अधीक्षक नि. रा. सरोदे यांनी केले आहे.

0000000

राष्ट्रीय लोक अदालत 13 डिसेंबर रोजी

अमरावती, दि. 1 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

               त्यात दाखल व 'दाखलपूर्व' अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. या आयोजनाची विशेष बाब म्हणून त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही व प्रकरणाचा अंतिम निकाल होतो.

तडजोडपात्र प्रलंबित खटले 'राष्ट्रीय लोकअदालत'मध्ये ठेवून तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच 13 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.

000000

अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना 2 डिसेंबर रोजी स्थानिक सु‌ट्टी जाहीर

अमरावती, दि. 1 (जिमाका) : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक 2025 साठी जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदुर रेल्वे, दर्यापुर, धामणगाव रेल्वे, धारणी,  मोर्शी,  नांदगावखंडेश्वर तसेच वरूड येथील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुक उदया मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.

 जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता जिल्ह्यातील सर्व न्यायालये तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या अपीलीय दिवाणी फौजदारी न्यायालयांना मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी स्थानिक सु‌ट्टी जाहीर करण्यात आली आहे.

00000

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर

अमरावती, दि. 1 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 579 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा निवड समितीमार्फत त्यापैकी एकूण 77 लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

  त्यापैकी जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रातील 57 लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नगरपालिका क्षेत्रातील 20 लाभार्थ्यांची यादी आचारसंहितेनंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव यांनी दिली आहे .

000000

Sunday, November 30, 2025

DIO NEWS AMRAVATI 30-11-2025

 जिल्ह्यात एक नगराध्यक्ष, पाच  नगरपरिषदेतील आठ सदस्य निवडणुकीला स्थगिती

अमरावती, दि.30 (जिमाका) : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अध्यक्ष आणि इतर नगरपालिका, नगरपंचायत मधील आठ जागांवर सदस्यपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी दाखल केलेले अपील 22 नोव्हेंबर 2025 नंतर निकाली निघाले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

सदर सूचनेनुसार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपरिषदेतील जागा क्रमांक 2 अ, अचलपुर नगरपरिषदेच्या जागा क्र. 10 अ, जागा क्र. 19 ब, वरुड नगरपरिषदेच्या जागा क्र. 12 अ, अंजनगाव (सुर्जी) नगरपरिषदेच्या जागा क्र. 6 अ, जागा क्र. 7 ब, धारणी नगरपंचायतच्या प्रभाग क्र. 14, प्रभाग क्र. 16 आणि अंजनगाव (सुर्जी) नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासह सदस्य पदाच्या सर्व जागांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. येथील निवडणूक प्रक्रिया सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिष यांनी कळविले आहे.

000000

Friday, November 28, 2025

DIO NEWS AMRAVATI 28-11-2025

 


महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट

डॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन
अमरावती दि. 28 : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते 68 वर्षांचे होते.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ' मिर्झा एक्सप्रेस ' या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा,अभियंता मुलगा रमीज,महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत.त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या 'मिर्झा एक्सप्रेस ' या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण केले आहे.
गेल्या काही दिवसापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते.त्यांच्यावर अमरावती येथे ईलाज सुरू होते.वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबर 1957 चा त्यांचा जन्म.1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ, मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले.वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले.त्यांचा 'मिर्झाजी कहीन ' हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता.त्यांचे २० काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता.शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.
विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. विदर्भातील नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मराठी, वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली.राजधानी दिल्ली पासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत.
मुसलमान असूनही येते मला मराठी
ठोकू नका माई पाठ याच्यासाठी
जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा
पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा
अशा शब्दात त्यांचे काव्य लेखन असायचे.धर्मभेदाची अतिशय सोपी त्यांची व्याख्या होती. त्यामुळे ते सर्वधर्मीयांच्या गळ्यातील ताईत होते.
हिंदू मुसलमानात काय आहे फरक
हा म्हणते हटजा तो म्हणते सरक
काथा संग जसा चुना असते पानात
हिंदू संग मुसलमान तसा हिंदुस्थानात
अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत. ते लोककवी होते.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत.त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुप्रसिद्ध कवि, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे.
20 हून अधिक काव्यसंग्रह आणि 6000 वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुद्धा प्रचंड गाजले. कालौघात त्यांनी नवीन माध्यमाचाही तितक्याच सहजतेने स्वीकार केला. शेती आणि माती हा त्यांच्या काव्यलेखनाचा गाभा होता. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्यासारखे होते. मराठी आणि त्यातही वऱ्हाडी भाषेवर त्यांनी निस्सीम प्रेम केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
0000








डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

अमरावती, दि. 28 : पात्र नागरिकांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. सदर कार्ड काढण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड महत्वाचे असल्याने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणीसंबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मानच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी 20 रूपये तर वितरणासाठी 10 रूपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा. यासाठी येत्या दोन दिवसांत आशा सेविकांचे लॉगइन आयडी सक्रीय करावे. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे. यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने डिसेंबर महिन्यात मोहिम घेण्यात येणार आहे. या योजनेत रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील 51 रूग्णालये अंगीकृत असून नि:शुल्क उपचार करण्यात येतात. यासाठी नोंदणीला गती देण्यात येणार आहे. शिधा पत्रिकेवर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नाव नसल्यास शिधापत्रिका अद्ययावत करावी. त्यानंतर 60 दिवसात लाभार्थ्यांचे नाव यादीत येणार आहे.

यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सिमा सोनोने, गिता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनिता चौरकर यांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

00000 


Thursday, November 27, 2025

DIO NEWS AMRAVATI 27-11-2025

 हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

अमरावती, दि. 27 (जिमाका) : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी चित्ररथाचे जिल्ह्यात आगमन झाले. या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आज सकाळी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्त डिजिटल चित्ररथाचे उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांची यावरील चित्रफितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या चित्ररथाला हिरवी झेंदी दाखविली. हा चित्ररथ जिल्हाभरात फिरून नागपूर येथील कार्यक्रमाबाबत जनजागृती करणार आहे.

0000000







हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागम

नागपूर येथील कार्यक्रमासाठी सर्वोतोपरी सहकार्य

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

अमरावती, दि. 27 (जिमाका): हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य केल्या जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नागपूर येथील कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी राज्य शासनाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात नागपूरसह नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहिदी समागमाचे शिख समाजात विशेष महत्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणावर जातील. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल. इतर जिल्ह्यामधून नागपूर येथे जाताना नागरिकांना वैद्यकीय आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात होर्डींग आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 डिसेंबर रोजी 400 नागरिकांचा जत्था येणार आहे. यानिमित्ताने वाहतुकीसाठी कोणतीही अडचण होणार नाही. यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे समाजाने यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.

नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

00000

अमरावती कोषागार कार्यालयात 'संकल्पातून पेन्शन मेळावा' उत्साहात संपन्न

               अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती कोषागार कार्यालयामार्फत ‘संकल्पातून पेन्शन मेळावा’ वरीष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांचे संकल्पनेतून नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन धारकास डीजी लॉकर वापराबाबत व त्यामध्ये ई-पीपीओ, जीपीओ, सीपीओ ही सर्व कागदपत्रे कशाप्रकारे जमा करावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

 तसेच निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतन वाहिनीवरील आणि तक्रार निवारण प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्यासंबंधी निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी प्रशिक्षण दिले. तसेच मेळाव्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले व हयातीच्या दाखल्याबाबत माहिती देण्यात आली.

या मेळाव्यात उपस्थित झालेल्या 85 वयापेक्षा जास्त निवृत्तीवेतन धारकांचे कोषागार कार्यालयामार्फत शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना माहे नोव्हेंबर 2025 ला द्यावयाचे हयातीचे दाखले सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्तीवेतन धारकांना बँकेत जाऊन आपले नावासमोर स्वाक्षरी करावी अथवा जीवन प्रमाण या केंद्रशासनाच्या साईटवर जाऊन ऑनलाईन जीवन प्रमाण पत्र कसे अपलोड करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

000000

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

              अमरावती, दि. 27 (जिमाका) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 28 नोव्हेंबर ते  12 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्र. पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  शाम घुगे  यांनी कळविले आहे.

00000

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना

1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

अमरावती, दि. 27 (जिमाका): अमरावती जिल्ह्यात आगामी नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे, मतदान अधिकारी/कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार असलेल्या सोमवार, दिनांक  1 डिसेंबर 2025 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

00000

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर:  3 हजार 910 शेतकऱ्यांच्या

खात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

 अमरावती, दि. 27 (जिमाका): प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेत  सुमारे 4 हजार  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, परंतु हवामान धोके (ट्रिगर) लागू करण्याबाबत शासन निर्णयातील कमाल व किमान तापमानाची स्पष्टता नसल्यामुळे युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कंपनीने केळी पिकासाठी 12 महसूल मंडळांत, मोसंबीसाठी 10 महसूल मंडळांत आणि संत्रा पिकासाठी 45 महसूल मंडळांत अखेर हवामान धोके मंजूर केले.

यामध्ये, 138 केळी उत्पादकांना 91.39 लक्ष रुपये, 46 मोसंबी उत्पादकांना 11.62 लक्ष रुपये, तर 3 हजार 726 संत्रा उत्पादकांना 17.27 कोटी रुपये असे एकूण 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम लवकरच अर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली असून, प्रलंबित दावे मंजूर झाल्यामुळे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शेतकऱ्यांना आंबिया बहार 2025-26 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000000

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

अमरावती, दि. 27 (जिमाका):  कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात  'सत्यमेव जयते फार्मर कप' स्पर्धेसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' या राज्यव्यापी उपक्रमासाठी सज्ज करणे तसेच पाणी फाउंडेशन व फार्मर कप स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी प्राजक्ता तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲपची माहिती देवून शेतकऱ्यांकडून ते डाउनलोड करून नोंदणी करून घेतली. पाणी फाउंडेशन टीममधील प्रशिक्षक जयकुमार सोनुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  तर प्रफुल्ल कोल्हे यांनी गट शेती तसेच गटांमधील शेतकऱ्यांनी  घ्यावयाच्या पिकांबद्दल बाबत माहिती दिली.  

प्रशिक्षणात पुढे होणाऱ्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची माहितीही देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटी पाणी फाउंडेशन टीमने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.  प्रशिक्षक रेणुका पोहोकार व प्रशांत देवरे यांनी निवासी प्रशिक्षणाची नोंदणी यावेळी करून घेतली. या प्रशिक्षणास कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोकरा गावातील कृषी ताई तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी  प्रशांत गुल्हाने यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रुपाली चौधरी यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी  नीतिमान व्यवहारे यांनी मानले.

000000

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...