Monday, January 28, 2019

इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून उद्याचे वैज्ञानिक घडतील - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील





            अमरावती, दि. २८ :  विद्यार्थ्यांच्या मनावर ज्ञानविज्ञानाचे महत्व बिंबवून त्यांना शास्त्र व तंत्र अवगत होण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड व विज्ञान प्रदर्शन उपयुक्त आहे. अशा उपक्रमांतून उद्याचे वैज्ञानिक घडतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.  
प्रादेशिक विद्या प्राधिकरण व शिक्षण विभागातर्फे अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन व  जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ येथील पी. आर. पोटे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद प्रेक्षागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. शिक्षण सभापती जयंतराव देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, माध्यमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, दिलीप निंभोरकर, मुख्याध्यापक संघाचे रवींद्र कोकाटे, पी. आर. पोटे महाविद्यालयाचे प्राचार्य जी. डी. वाकडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. खेरडे, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष गजानन बुरघाटे, श्री. बुरंगे, श्री. चोपडे आदी उपस्थित होते.            श्री. पोटे पाटील म्हणाले की, मानवी जीवन प्रगत करण्यात विज्ञानाचे मोठे योगदान आहे. इन्स्पायर अवॉर्ड व विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून सतत असे उपक्रम व्हावेत व अधिकाधिक शाळांनी अशा स्पर्धा, उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.  मार्च महिन्यात संस्थेतर्फे असा भव्य कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले की, तिन्ही जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांचे ४०० चमू या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत, हे आश्वासक आहे. नव्या पिढीला विज्ञानाकडे वळविण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. विशाल वाघमारे, प्रवीण दिवे, वीरेंद्र रोडे, संगीता शिंदे, प्रा. श्रीमती नायर, विनायक ताथोड आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या २९ जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
 

Sunday, January 27, 2019

जिल्हा कृषी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

          नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करावे
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

-  हजारो शेतक-यांच्या उपस्थितीत प्रारंभ
- प्रयोगशील शेतक-यांचा गौरव
- महोत्सवात मिळणार प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण
- नानाविध फळे, फुले व पीकांचे प्रदर्शन
- कृषी महाविद्यालयाकडून किचन गार्डनची प्रतिकृती सादर
- अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचे अनेक कक्ष

अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात शेतीविकासाची मोठी शक्यता लक्षात घेऊन शासनाकडून अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार नवे तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी यंत्रणा व विविध घटकांनी काम करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.

कृषी विभागातर्फे अमरावती जिल्हा कृषी महोत्सवाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात व हजारो शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत प्रारंभ आज येथील सायन्सकोर मैदानावर झाला. त्यावेळी ते बोलत होते.  जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपसंचालक अनिल खर्चान, जिल्हा कृषीविकास अधिकारी कुर्बान तडवी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा समितीचे जयंत आमले, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

                   पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शासनाकडून जलयुक्त शिवार योजना, शेततळे, धडक सिंचन विहिरी, कृषीपंप वितरण आदी योजनांतून सिंचनक्षमता व कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. त्याला गती देण्यासाठी शेतकरी बांधवांना नव्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रयोग व पूरक व्यवसायाकडे वळविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महोत्सवात पीक व्यवस्थापन, मार्केटिंग, बियाणे निर्मिती, पूरक उद्योग याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, प्रयोगशील शेतक-यांचा गौरव व प्रेरणादायी अनुभवकथन आदींचा समावेश केला आहे. त्याचा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना निश्चितच लाभ होईल.
          ते  पुढे म्हणाले की, निरनिराळ्या पदव्या मिळवलेले ग्रामीण तरूण नोकरी न करता प्रायोगिक शेतीकडे वळत आहेत, हे निश्चित आश्वासक आहे. शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी त्यांनी शेतीसोबत रेशीम उत्पादन, मधमाशीपालन, बांबूलागवड, बांध वृक्षलागवड असे विविध पूरक व्यवसाय केले पाहिजेत.  सकारात्मक दृष्टीने नव्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. त्यातून निश्चित यश मिळते. रेशीम उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळविणा-या श्री. खडसे या शेतकरी बांधवाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सहाय्य करू, असेही ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले की, शेतीत उत्पादनवाढीसह विपणन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.  महोत्सवातही त्याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा.  श्री. नागरे, श्री. नळकांडे  यांनीही मनोगत  व्यक्त केले.
                                       विविध कक्षांना भेटी
                   महोत्सवातील विविध कक्षांना भेटी देऊन तेथील अधिका-यांकडून माहिती जाणून घेतली व महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला.                                                         प्रयोगशील शेतक-यांचा सन्मान
मेळघाटातील डोंगराळ भागात यशस्वी शेती करणारे भुलोरीचे दादू जामुनकर, शेततळ्यात यशस्वी मत्स्यपालन करणारे टिटंबा (ता. धारणी) येथील रामगोपाल मावस्कर यांच्यासह अनेक प्रयोगशील शेतक-यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रयोगशील शेतक-यांशी संवाद साधून त्यांनी माहिती जाणून घेतली व त्यांचे कौतुक केले.
                                     
महोत्सवात विविध योजनांची माहिती देणारी शासकीय दालने, कृषी निविष्ठा कक्ष, कृषी तंत्रज्ञान व सिंचन कक्ष, धान्यमहोत्सव, गृहोपयोगी वस्तू आदी 200 कक्षांचा समावेश आहे. शासकीय विभागांबरोबरच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध कंपन्या यांचे कक्ष असून, प्रात्यक्षिकातून माहिती दिली जात आहे.  ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दि. 31 जानेवारीपर्यंत दररोज मिळणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने लक्षात घेऊन संत्रा पीकाविषयी रोग व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन याबाबत स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले आहे. कापूस पीकाविषयी नफ्याची शेती, कृषी क्षेत्रात निर्यातीच्या संधी, कुक्कुटपालन, शेळीपालन, औषधी वनस्पती, मत्स्यपालन, पाणलोट व्यवस्थापन व रेशीम उद्योग आदी विविध विषयांवर अनेक मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय शेतक-यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणा-या यशोगाथांचे सादरीकरण व अनुभवकथन हा महोत्सवाचा केंद्रबिंदू आहे, असे श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री. खर्चान यांनी आभार मानले.






Friday, January 4, 2019

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
कुशल मनुष्यबळासाठी कौशल्याधारित शिक्षणावर भर
- शिक्षणमंत्री विनोद तावडे
विद्यार्थ्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन त्या विषयात पारंगत केल्यास ते अधिक परिणामकारपणे व प्रभावीपणे काम करतील. हे लक्षात घेऊन कौशल्याधारित शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्यासह प्राध्यापकगण व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, राज्यात ‘थ्री इडियटस्’मधल्या घोकंपट्टीवाल्या चतुरलिंगमऐवजी ‘रँचो’ निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त असेल तर रोजगार निश्चित मिळतो. हे लक्षात घेऊन तशी अभ्यासक्रमाची रचना केली. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, संगीत, कला, विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात रुची असलेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या क्षेत्रात प्रगती करता यावी असा उपयुक्त कौशल्याधारित अभ्यासक्रम रचना करण्यात आली आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचूक यासारख्या मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. विविध प्रकारचे 605 अभ्यासक्रमांच्या रचनेतून विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय खुले केले. त्याशिवाय, ओपन एसएससी बोर्डाची निर्मिती करण्यात येईल.
शालेय अभ्यासक्रमात पाचवी व आठवीला परीक्षा घेतली जाईल, तसेच प्राध्यापक भरतीही होणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या परिसरातील विद्यार्थ्यांना सवलती लागू करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी सुरु आहे. जिथे अद्यापही अंमलबजावणी झाली नाही, तिथे तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना श्री. तावडे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात श्री. तावडे यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात त्यांनी स्टेजवरून खाली उतरून विद्यार्थ्यांत मिसळून श्री. तावडे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आपला कल जाणून त्यानुसार कौशल्ये प्राप्त करा. तसे शिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. महाविद्यालयात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी श्री. तावडे यांच्यासह सेल्फीही घेतली.
वादविवाद स्पर्धेत मार्गदर्शन
या कार्यक्रमानंतर शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व.मानिकराव धवळे स्मृती वादविवाद स्पर्धेलाही श्री. तावडे यांनी भेट दिली. चांगला वक्ता घडण्यासाठी चांगले वाचन व सामाजिक प्रश्नांचे भान असले पाहिजे. ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी खेळाडू गौरव चांदणे व तेजस्विनी दहिकर यांचा गौरव करण्यात आला.



DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...