मुसळखेडा येथे ग्राऊंडवॉटर रिचार्ज शाफ्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जलसंधारण व वृक्षारोपणातून दुष्काळावर मात करु
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 19 : भूजलपातळीत सुधारणा करण्याच्या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणावर जलसंधारण व वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत. शासन, प्रशासन, विविध संस्था- संघटना यांचा समन्वय व लोकसहभाग याद्वारे जिल्ह्यात ही कामे पूर्ण करुन दुष्काळावर मात केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
भूजल सर्वेक्षण यंत्रणेतर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मुसळखेडा येथील भूजल रिचार्ज शाफ्टचे उद्घाटन करताना श्री. पोटे- पाटील बोलत होते. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रिचार्ज शाफ्ट ही योजना भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त असल्याने ती मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. पोटे-पाटील म्हणाले की, या उपाययोजनेद्वारे पहिल्या पावसाकत भूजल पुनर्भरण सुरु होते व परिसरातील पाणी साठ्यात वाढ होते. वरुडसारख्या डार्क झोनमधील तालुक्याला ही योजना निश्चितच उपयुक्त ठरेल.
जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी जमिनीच्या पोटात मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी ही योजना उपयुक्त आहे, असे श्री. बोंडे यांनी सांगितले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी यावेळी रिचार्ज यंत्रणेची माहिती दिली.
000
Comments
Post a Comment