Friday, June 30, 2017

चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शनिवारी प्रारंभ
वृक्षदिंडीत मोठा प्रतिसाद; नागरिकांनी केला वृक्षसंवर्धनाचा निर्धार
             अमरावती, दि. 30 :  शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवड अभियानाला उद्यापासून (दि. 1 जुलै) प्रारंभ होत असून, त्यानिमित्त आज वनविभागातर्फे शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला.   
जिल्हाधिकारी कार्यालयापासून या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. प्रारंभी महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतरदापोरी येथील संत तुकडोजी महाराज भजन मंडळीच्या कार्यकर्त्यांनी गायिलेल्या भजनाच्या तालासुरावर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली.          
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचाही सहभाग
इर्विन चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील हेही दिंडीत सहभागी झाले. पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढवला. ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’अशा घोषणा देत ही दिंडी पुढे रेल्वेस्थानक चौकात आली. त्यानंतर आणखी नागरिक दिंडीत सहभागी होत वातावरण अधिक उल्हसित झाले.
 मोर्शी येथील विद्याधर कोरे यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत चित्ररथावर आरुढ होऊन वृक्षप्रेमाचा संदेश दिला. वृक्षदिंडीत ज्ञानमाता विद्यालय, शिवाजी मराठा विद्यालय, आरडीआयके शाळा, मणिभाई गुजराती शाळा, शासकीय तंत्रनिकतेन आदी शाळांचे विद्यार्थी उत्साहात घोषणा देत वृक्षसंगोपनाचा संदेश देत होते. पुढे बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक असा दिंडीचा मार्ग होता. तिथून सगळे वृक्षप्रेमी बचतभवनाजवळ येऊन दिंडीचा समारोप झाला.  वनसंरक्षक हेमंतकुमार मीना,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, वनसंरक्षक रवींद्र वानखडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पडगव्हाणकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, प्रा. राजेश चिधडी आदी यावेळी उपस्थित होते.
00000 



















Wednesday, June 28, 2017

वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे
             वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद   
             
           अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे!
वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.  
          विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते.
मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयापासून मोठ्या उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली. रोपटी व फुलांनी सुशोभित चित्ररथ व त्यापाठोपाठ सायकलस्वार अधिकारी- कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी असे या रॅलीचे स्वरुप होते. पोलीस आयुक्त शहर कार्यालय – मालटेकडी- बसस्थानक- रेल्वेस्थानक- राजकमल चौक- जयस्तंभ चौक- इर्विन चौक- गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गे रॅली बचतभवनात येऊन तिचा समारोप झाला. 
अनेक शाळा, महाविद्यालये, अशासकीय व सामाजिक संघटनांच्या एकत्रित सहभागातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, असे श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.वनसंरक्षक रवींद्र वानखडे, श्री. कळसकर, सहायक वनसंरक्षक श्री. कविटकर, श्री. पडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                       शुक्रवारी वृक्षदिंडी व वृक्षपूजन
       अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे शुक्रवार, दि. 30 जूनला सकाळी नऊला वृक्ष दिंडी व वृक्ष पूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.  वृक्षदिंडीची जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन ती इर्विन चौक- रेल्वेस्थानक चौक बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जाऊन बचतभवनात समारोप होणार आहे. 
                                     000000









Monday, June 26, 2017

 उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी
   अमरावती दि.26: जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्या आहेत. शहरातील उड्डाण पूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.    
शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाण पूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकास कामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा व भविष्यातील विकासाच्या शक्यता पडताळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या कामांची पाहणी केली आहे. या पाहणीत सर्वांच्या संकल्पना जाणून घेतल्या व शक्य तिथे विकास कामांत त्यांचा समावेशही केला जाईल.  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या ज्या विभागांच्या नव्याने इमारती उभारल्या जात आहेत,  त्या विभागांच्या अधिका-यांच्या संकल्पना जाणून घेऊन इमारतींना आकार देण्यात येत आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
  विमानतळावरील एअर स्ट्रीपची लांबी 1800 मीटरहून 2200 मीटर पर्यंत वाढविल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. पोटे- पाटील यांनी यावेळी सांगितले. ही मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे खासदार श्री. अडसूळ म्हणाले. विमानतळाच्या कुंपण भिंतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ते काम सुरु होणार आहे.


महापालिकेसाठी नवीन इमारत
यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ही जागा तपोवन परिसरात महामार्गालगत असून लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुल
 जिल्हा क्रीडा संकुलासाठी प्रस्तावित 7 एकर जागेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी आर्चरी रेंज, बॅडमिंटन, ज्युडो हॉल, तरणतलाव आदी  सुविधा उभारण्यात येणार आहेत.  या जागेची तत्काळ मोजणी करून घ्यावी व कामाला गती द्यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
                             वडाळी गार्डन तलावाचे सौंदर्यीकरण
वडाळी गार्डन येथील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तलावाची स्वच्छता करुन त्या भोवती चांगल्या दर्जाचे कुंपण उभारावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत, प्रादेशिक न्यास सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन या तिन्ही इमारतींच्या प्रत्येक कक्षाची पाहणी केली. चित्रा चौक ते मालवीय पुल, राजापेठ उड्डाणपूल येथील कामांची पाहणी करुन या कामांना तत्काळ गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  या प्रकल्पांमुळे नागरी सुविधांत भर पडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                              00000








DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...