Wednesday, December 30, 2020

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

 




31
 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

                                                नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 30 : कोविड  -19 मुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत घरीच राहून अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

            आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंध कायद्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात 31 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 पासून ते सकाळी सहापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने उद्या (31 डिसेंबर) रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

            31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी  बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.

             नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

                                    000

Tuesday, December 29, 2020

नामनिर्देशन पत्रे आता पारंपारिक पध्दतीने स्विकारणार






ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020

नामनिर्देशन पत्रे आता पारंपारिक पध्दतीने स्विकारणार

निवडणूक शाखेची माहिती

अमरावती, दि. 29 : ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पध्दतीने ऑफलाईन स्विकारण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची वेळ देखील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नामनिर्देशन व घोषणापत्रे यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना संबंधित कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येतील. पारंपारिक पध्दतीने स्विकारण्यात आलेले नामनिर्देशन पत्रे छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशन पत्रे संगणक चालकाच्या मदतीने आरओ लॉगीन मधून भरुन देण्यात येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.

जात पडताळणीसाठीचे प्रस्तावही ऑफलाईन पध्दतीने छाननीच्या दिनांकापर्यंत स्विकारण्यात येत आहे, असेही कळविण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदाराची संख्या लक्षात घेता कार्यालय पूर्ण वेळ व सर्व अर्जदारांचे अर्ज स्विकारेपर्यंत सुरु ठेवावी, असे निर्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने जात पडताळणी समित्यांना दिले आहे.

 

0000

 

प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पथके - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

  





15 ते 30 जानेवारीदरम्यान जनजागृती पंधरवडा

प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पथके

                                                -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

 

अमरावती, दि. 29 :  जनावराची अवैध वाहतूक आदी नियमभंग करणाऱ्या बाबी निदर्शनास येताच तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहर व ग्रामीण स्तरावर पथके (स्कॉड) निर्माण करावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले. या कायद्याबाबत जनजागृतीसाठी 15 ते 30 जानेवारीदरम्यान पंधरवडा साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे अशासकीय सदस्य नंदकिशोर गांधी, महेश देवळे, चंद्रशेखर कडू, डॉ. सुनील सूर्यवंशी, अभिषेक मुरके, विजय शर्मा, अजित जोशी, श्रीमती सुरेखा पांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राधेश्याम बहादुरे, महापालीका उपायुक्त डॉ. सचिन बोंद्रे, उपवनसंरक्षक यांचे प्रतिनिधी प्र. ज्ञा. डंबाले, प्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी, सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे आदी उपस्थित होते.  

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहर व ग्रामीण स्तरावर स्वतंत्र पथके निर्माण करावीत. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग होऊ नये यासाठी या पथकांनी वेळोवेळी तपासणी व कारवाई करणे आवश्यक आहे. गोवंश कत्तल रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक काम करावे. शहर व ग्रामीण जनावरांची खरेदी- विक्री होताना आधारकार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. प्रशासनाकडून तसे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले.

प्राणी वाहतूक करण्यासाठी शहरी भागात महानगरपालिका तसेच ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याने तशी व्यापक जनजागृती पशुमालकांमध्ये करावी. त्यासाठी संबंधित विभागांनी आपले संपर्क क्रमांक जाहीर करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

                                    राज्य सीमा भागात चेकपोस्ट

मध्यप्रदेशातून सीमेलगतच्या परिसरातून कत्तलीसाठी जनावरे जिल्ह्यात येत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यामुळे पोलीस विभागाने सीमेवर चेकपोस्ट निर्माण करुन त्याद्वारे तपासणी करुन वेळीच अशा प्रकारांना आळा घालावा. तसेच यासंबंधी पशुसंवर्धन व गोशाळा पदाधिकाऱ्यांशी  तत्काळ संपर्क साधावा. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांत अपेक्षित तपास आदी कार्यवाही न करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत निर्देशही डॉ. व्यवहारे यांनी दिले.

महाराष्ट्र गोवंश कायदा व प्राणी वाहतूक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.   प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसेल व जागृतीही होईल. पोलीसांनी यात अधिक काटेकोर होत कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी मांडले.

 जिल्ह्यातील डॉग ब्रिडिंग सेंटर, बर्ड ब्रिडिंग सेंटर नोंदणी होणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व ब्रिडिंग सेंटरची नोंदणी संबंधित यंत्रणांनी तत्काळ करुन घ्यावी. त्यांच्याव्दारे नियमांचे पालन होते किंवा कसे, याबाबत नियमित तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

0000

 

 

 

सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय पुनर्वसनाच्या कामांनाही गती मिळणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 


जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धासह विविध प्रकल्पाच्या कामांना नियामक मंडळाची मान्यता

सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

पुनर्वसनाच्या कामांनाही गती मिळणार

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावतीदि. १ : जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धानिम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतीलअसे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.

 

गुरुकुंज मोझरीपाथरगाव,  सिंचन योजनेच्या समावेशासह कौंडण्यपूर धारवाडा पुलासाठी ७५ लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्णत्वास जाऊन सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. पुनवर्सनाच्या कामाबाबतही पालकमंत्र्यांनी विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याबाबत शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्याने अनेक प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार आहे.

 

गुरुकुंजपाथरगावचा समावेश

 

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या १ हजार ६३४.७२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या निधीला मंडळाकडून मान्यता देण्यात आली. गुरुकुंज मोझरीपाथरगाव सिंचन योजनेचा चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेत समावेश आहे. जून २०२२ पूर्वी कामे करण्याचे प्रस्तावित आहे.

 

          निम्न पेढी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील अळणगावकुंड खुर्दकुंड सर्जापूरगोपगव्हाणहातुरणा या  गावांचे स्थलांतर होईपर्यंत वीज जोडणी व वीज देयकाच्या रकमेसाठी ५०. ६१ लक्ष निधीला मान्यता मिळाली. चंद्रभागा बॅरेज बृहत लघु प्रकल्पात नवीन पुनर्वसन गावठाण असदपूर व शहापूर येथील जमिनीच्या खाली अंदाजे ६ ते ७ फूट खोल काळ्या मातीचा स्तर असल्याने अशा जमिनीवरील भूखंडावर घर बांधकामासाठी विशेष बाब म्हणून प्रति खातेदार १ लाख रुपये प्रमाणे ५३५ कुटूंबांसाठी ५ कोटी ३५ लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाच्या निधीलाही मान्यता देण्यात आली.

निम्न पेढी प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे मातीकामसांडवा आदी कामासाठी ३१.६१ कोटीचांदस वाथोडा प्रकल्पाच्या १३६.२३ कोटी निधी मान्यतेसह सपन मध्यम प्रकल्पाच्या संपादित जमिनीवरील १.२ हे जागा ८३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला देण्यासही मान्यता देण्यात आली. दर्यापूर तालुक्यातील वाघाडी बॅरेजचंद्रभागा बॅरेज आदींच्या प्रस्तावांबाबतही मान्यता देण्यात आली. इतर प्रलंबित कामांबाबतही सतत पाठपुरावा करण्यात येईल.

याबाबत पुनर्वसनाच्या कामांना गती येण्यासाठी संबंधित प्रकल्प कार्यालयांनीही वेळोवेळी माहिती देऊन नियोजनपूर्वक कामे पूर्णत्वास न्यावीतअसे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला व सर्व प्रकल्प कार्यालयांना दिले आहेत.

 

00000


Monday, December 28, 2020

पालकमंत्र्यांकडून केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण मंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन

 


पालकमंत्र्यांकडून केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण मंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन

आधारभूत खरेदी योजनेत मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून मिळावे

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : आधारभूत खरेदी योजनेपासून जिल्ह्यातील मका पीक उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केली आहे.

अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच्या मका पीकाची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी बांधवांचा मका खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा एक मोठा वर्ग यापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या परिस्थितीचा विचार करता मका पीकाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी विनंती पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. गोयल यांना पत्रान्वये केली आहे.

केंद्रीय उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही पालकमंत्र्यांनी याबाबत निवेदन पाठविले आहे. राज्य शासनानेही केंद्र शासनाला विनंती करण्याबाबत पत्रही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना पाठवले आहे.

कोरोना संकटकाळामुळे कृषी क्षेत्रात अनेक अडचणी आल्या. त्यासाठी शासनाकडून या काळात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील धान्य उत्पादक शेतकरी बांधव आधारभूत खरेदी योजनेपासून वंचित राहू नयेत 

यासाठी उद्दिष्ट वाढवणे गरजेचे आहे. तरी उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केली आहे.

 

00000

 

--

Sunday, December 27, 2020

मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन




































मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन

हजारो लोकांच्या उपस्थितीत शहिद कैलास दहिकर यांना भावपूर्ण निरोप

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

 

अमरावती, दि. 27 : हिमाचलात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या कैलास दहिकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे  व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहिद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहिद दहिकर यांना सलामी देण्यात आली.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहिद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली.

अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शिमला- चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपूराहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले. शहिद दहिकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. अचलपूर व परिसरातील गावांतून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा भारतमातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. 'भारतमाता की जय', 'शहिद कैलास दहिकर अमर रहे' अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते.

सैन्यदलाच्या वाहनात शहिद दहिकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यावेळी कुटूंबीय व आप्त यांचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले. सैन्यदल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. शहिद दहिकर यांच्या वीरपत्नी बबलीताई कैलास दहिकर यांना  सैन्यदलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला. शहिद दहिकर यांचे बंधू केवल यांनी दहिकर यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले.

 

भूमीचा गौरव वाढवणारा वीर - पालकमंत्री ऍड. ठाकूर

 

शहिद कैलास दहिकर यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. भारतमातेच्या या सुपुत्राने येथील भूमीचा गौरव वाढवला आहे. दहिकर परिवाराची जबाबदारी ही आमची जबाबदारी आहे. आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करू, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

सातपुड्याच्या कुशीत वाढलेला मेळघाटच्या शूर सुपुत्राला हिमालयाच्या कुशीत वीरमरण आले. शहिद कैलास दहिकर   यांचा त्याग व बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे आहे, अशी भावना राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केली.खासदार श्रीमती राणा, गावाचे सरपंच गजानन येवले आदींनीही यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

 

00000

  

Thursday, December 24, 2020

'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी

 










'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी

गरीब व गरजू रुग्णांसाठी सुविधा

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

                अमरावती, दि. 24 : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना हृदयरोग, कर्करोग सारख्या मोठ्या आजारावर तत्काळ वैद्यकीय उपचार सुविधा मिळावी यासाठी जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग व कर्करोगासंबंधी निदान व उपचारासाठी ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.

             शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील श्री गजानन महाराज व साई महाराज मंदिरामागील परिसरात स्थापित कर्करोग व हृदयरोग ओपीडीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण सोनवणे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. वैभव चौधरी यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

                श्री. नवाल म्हणाले की, हृदयरोग व कर्करोगसारख्या मोठ्या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना नागपूर, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते. आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठीचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नसतो. अशा रुग्णांना जिल्ह्यातच तपासणी व उपचार सुविधा मिळाली तर ते त्यांना सोईचे होते. यासाठी शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त हृदयरोग व कर्करोग आजाराची ओपीडी सुरु करण्यात आली आहे.  रुग्णांनी या ठिकाणी सेवा देणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार आदी घ्यावेत. गोरगरीब रुग्णांना आवश्यक उपचार करण्यासाठी महात्मा जोतीराव जीवनदायी योजनेचा लाभ सुध्दा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करण्यात या बाहृय रुग्ण विभागाला हृदयरोग आजारासंबंधी डॉ. भूषण सोनवणे तपासणी करणार असून दर सोमवारी व गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ओपीडी सुरु राहील. कर्करोग आजारासंबधी डॉ. वैभव चौधरी तपासणी करणार असून त्यांची ओपीडी दर महिन्याच्या तीसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहतील. जिल्ह्यातील हृदयरोग व कर्करोग आजाराच्या रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाव्दारे करण्यात आले आहे.

                या आरोग्य केंद्रात कर्करोगावर वैद्यकीय उपचार युनिट हे मागील तीन वर्षापासून कार्यरत आहे. याठिकाणी आता नव्याने हृदयरोग संबंधी ओपीडी सुरु झाल्याने अनेक रुग्णांना उपचार घेणे सोईचे होणार आहे. या दोन्ही ओपीडी यंत्र सामुग्री व औषधीनी सुसज्ज असून अधिपरिचारिका हरिष काटकर, सौ. सुषमा मोहिते, सौ. पल्लवी पेठे, डाटा एन्ट्री ऑपरेटर अमित देशमुख व इतर कर्मचारी याठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा-सुविधा पुरवितात.

00000

Wednesday, December 23, 2020

अल्पसंख्याक तरूणांना पोलीस भरती पूर्वप्रशिक्षण

 

 



अल्पसंख्याक तरूणांना पोलीस भरती पूर्वप्रशिक्षण

                                      जिल्ह्यातील अधिकाधिक तरूणांनी लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी शैलेश नवाल

*सहा जानेवारीला ‘एचव्हीपीएम’ परिसरात निवड चाचणी

अमरावती, दि. 23 : जिल्ह्यातील अल्पसंख्याक तरूणांना पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून अधिकाधिक पात्र तरूणांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

          जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छूक उमेदवारांना हे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण 50 दिवसांचे असेल. त्यात रोज तीन तास वर्ग प्रशिक्षण व दोन तास मैदानी प्रशिक्षण असेल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान दीड हजार रूपये विद्यावेतन देण्यात येईल, तसेच प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्याला गणवेश, बूट आदी गणवेश साहित्यासाठी एक हजार रूपये एकरकमी अनुदान दिले जाईल. निवासाची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांना स्वत: करावी लागेल.

उमेदवार बारावी उत्तीर्ण, शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम, तसेच 18 ते 28 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. पुरूष उमेदवारांची उंची 165 सें. मी. व छाती 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी) असावी. शैक्षणिक अर्हता, आधारकार्ड आदी कागदपत्रे देणे आवश्यक राहील. उमेदवाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याचा पुरावा, अल्पसंख्याक असल्याचा पुरावाही जोडणे आवश्यक आहे. महिला उमेदवाराची उंची 155 सें. मी. असणे आवश्यक आहे. 

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात खुल्या स्टेडिअम मैदानासमोर प्रेरणास्थळ येथे सहा जानेवारीला सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवड चाचणी होणार आहे.  यावेळी इच्छूक उमेदवारांनी अर्ज व सर्व कागदपत्रांच्या प्रतींसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.

00000

Tuesday, December 22, 2020

पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता अमरावती शहरात रात्र संचारबंदी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 



ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार

पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता

अमरावती शहरात रात्र संचारबंदी

- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

            अमरावती, दि. 21: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.  अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात 22 डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 वाजतापासून सकाळी सहा वाजतापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

 

            ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे.  कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून यापूर्वीच संचारबंदी लागू होती. तथापि, व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी मिशन बिगिन अगेन धोरणांतर्गत दक्षता नियमांचे पालन करण्याच्या अटीसह टप्प्याटप्प्याने शिथीलता आणण्यात आली. त्यावेळी पारित केलेले सर्व आदेश व सूचना 31 डिसेंबरपर्यंत कायम आहेत. त्याचप्रमाणे, शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  या आदेशाचा भंग करणा-याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 नुसार कारवाई करण्याचे निर्देशही  जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

 

नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क व हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे

 

००००

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...