पुनर्वसित
भागातील नागरी सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात 92 लाखांचा निधी वितरीत
पुढच्या
टप्प्यातील निधीही वेळेत मिळवून देऊ
- पालकमंत्री ॲड. यशोमती
ठाकूर यांची ग्वाही
अमरावती,
दि. 6 : अमरावती व दर्यापूर तालुक्यांतील गावठाणातील पूर पुनर्वसित भागात नागरी
सुविधांसाठी सुमारे 92 लाख 14 हजार रूपये निधी वितरणास महसूल व वने विभागाने
मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्याला हा निधी मिळून लवकरच ही कामे सुरू होतील.
कामाच्या प्रगतीनुसार पुढील टप्प्यातील निधीही वेळेत उपलब्ध करून दिला जाईल, अशी
ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.
यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
२००७
मधील अतिवृष्टी व पेढी नदीला पुरामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन, विविध
नागरी सुविधांबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी
केली. त्यानंतर त्यांना याबाबत बैठकांद्वारे आढावाही घेतला. या गावांना वेळेत निधी
मिळून कामांना चालना मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पहिल्या
टप्प्यात 92 लाखांहून अधिक निधी जिल्ह्याला मिळून पुनर्वसित भागातील कामे मार्गी
लागणार आहेत.
अमरावती
तालुक्यातील देवरी, रेवसा, पुसदा व देवरा या गावठाणातील पूर पुनर्वसित भागात
रस्ते, नाली बांधकाम व विविध नागरी सुविधांसाठी प्रशासकीय मान्यता यापूर्वीच
प्राप्त आहे. या सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात 37 लाख 14 हजार रूपये निधी
वितरीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, दर्यापूर तालुक्यातील बाभळी भाग-1, बाभळी
भाग-2, बाभळी भाग- 3, दर्यापूर भाग-1, सांगोवा खु., कान्होली येथे रस्ते
बांधकामासाठी 55 लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
दर्यापूर
तालुक्यात बाभळी भाग-1, बाभळी भाग- 2 व बाभळी भाग -3 या पुनर्वसित गावांत 30 लक्ष
25 हजार रूपये निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
दर्यापूर भाग- 1 या पुनर्वसित भागात दोन लाख निधीतून अंतर्गत खडीच्या रस्त्यांचे
बांधकाम होणार आहे. सांगवा खुर्द येथे 11 लक्ष 50 हजार निधीतून व कान्होली येथे 11
लक्ष 25 हजार निधीतून अंतर्गत खडीरस्ते बांधकाम होणार आहे.
अमरावती
तालुक्यात देवरी गावठाणातील पुनर्वसित भागात 9 लक्ष 55 हजार निधीतून अंतर्गत रस्ते
व नाली बांधकाम, रेवसा येथे 12 लक्ष 21 हजार निधीतून अंतर्गत रस्ते व नाली
बांधकाम, पुसदा येथे 11 लक्ष 15 हजार रुपये, तर देवरा येथे 4 लक्ष 23 हजार निधीतून
रस्ते व नाली बांधकाम होणार आहे.
पुनर्वसनासाठी
२ कोटी ४० लक्ष निधीची मागणी केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त
झाला आहे. प्राप्त निधीनुसार कामांना वेळीच चालना द्यावी. पुनर्वसित भागातील नागरी
सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ती विहित वेळेत पूर्ण करावीत. कामांच्या
प्रगतीबाबत वेळोवेळी माहिती सादर करावी. पुढील टप्प्यातील निधीही वेळेत उपलब्ध
करून दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यंत्रणेला दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment