Thursday, November 30, 2017

एड्सग्रस्तांचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश
बाधित मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित
          अमरावती, दि. 30 : तपासणी, योग्य उपचार व स्वयंसेवी संस्थांचे भक्कम सहकार्य यामुळे एचआयव्हीबाधित रुग्णांचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. सतत देखरेख व उपचार यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या बाधित 109 गर्भवती मातांची अपत्ये संक्रमणापासून सुरक्षित राहू शकली.  
 ‘राईट टू हेल्थ’ असे ब्रीद घेऊन एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिक जोरकसपणे राबवला जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, 2014-15 मध्ये तपासणी केलेल्या 83,501 रुग्णांपैकी 442, 2015-16 मध्ये 1 लाख 10 हजार 686 पैकी 390, 2016- 17 मध्ये 1, 14, 682 पैकी 381 रुग्ण बाधित असल्याचे आढळले. एप्रिल 2017 पासून आतापर्यंत तपासणी केलेल्या 68 हजार 912 रुग्णांपैकी 241 रुग्ण बाधित असल्याचे आढळले.
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सर्व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, 39 खासगी दवाखाने व 5 रक्तपेढी यांच्या वतीने एड्सविषयी माहिती व तपासणीची विनामूल्य सुविधा देण्यात येते. जिल्हा रुग्णालयासह मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, धारणी, वरुड, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, तिवसा येथे उपचार दिले जातात.  या वर्षात 21 बाधित मातांची शासकीय रुग्णालयांत यशस्वी प्रसुती करुन बाळाच्या सुरक्षिततेसाठी नेव्हीरॅपिन औषध देण्यात आले. ही सर्व मुले संक्रमणापासून सुरक्षित आहेत. 
          सीडी-4 या चाचणीवरुन रुग्णाची  प्रतिकारशक्ती व रोगाचे प्रमाण कळते. त्याविषयी बोलताना डॉ. सुयोगा देशपांडे म्हणाल्या की, पूर्वी या चाचणीत ठराविक प्रमाणानंतरच उपचार व्हायचे. आता मात्र सर्वांनाच उपचार केले जातात. बाधित रुग्णांना क्षयाचा धोका जास्त असतो. त्यामुळे ती तपासणीही तत्काळ होते. 
स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य
 स्वयंसेवी संस्थांचे भक्कम सहकार्य हा एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा महत्वाचा आधार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले. ते म्हणाले की, भाग्योदय बहुउद्देशीय संस्था स्थलांतरित कामगारांसाठी, मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळातर्फे 100 गावांत तपासणी व समुपदेशन, ‘आधार’तर्फे एचआयव्हीबाधितांना सामाजिक, मानसिक व आर्थिक सहकार्य, श्रीशिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ट्रकचालकांसाठी जागृती व तपासणी, तसेच ‘समर्पण’तर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी जागृती, तपासणी व उपचारासाठी मदत केली जाते.


अतिजोखमीच्या क्षेत्रावर लक्ष
ट्रकड्रायव्हर, संत्रातोड कामगार, विशिष्ट काळासाठी स्थलांतरित होणा-या व्यक्ती यासह जोखमीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जात आहे. अशा क्षेत्रात कॅम्प घेणे श्रेयस्कर ठरते. हे लक्षात घेऊन मोर्शी- वरुड परिसरात लवकरच मोठ्या तपासणी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती  कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले.
रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी टोकन सिस्टीम
जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रात रुग्णांची गोपनीयता राखण्यासाठी टोकन सिस्टीम कार्यान्वित केली जात आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन उद्या (दि.1) सकाळी 11 वाजता होईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली. त्याशिवाय, उद्या समाजकल्याण कार्यालयात 100 रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार, दुपारी 3 वाजता समर्पणतर्फे प्रश्नमंजुषा, घोषवाक्य स्पर्धा,  राजकमल चौकात सायंकाळी 7 वाजता महारांगोळी व कलापथक होणार आहे.
दि. 2 डिसेंबरला रॅली  व विविध कार्यक्रम, दि. 3 ला समर्पणच्या कार्यालयात समलिंगी व्यक्तींसाठी डिफरन्ट ॲक्टिव्हिटी  कार्यक्रम होईल.  दि. 4 ला मोझरी येथे बाधित व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांच्या माहितीचा खास कार्यक्रम व स्नेहसंमेलन अनेक होणार आहे. दि. 6 ला विहानतर्फे बाधितांसाठी स्नेहसंमेलन व दि. 7 ला घरकामगारांसाठी भाग्योदयतर्फे चर्चासत्र होईल. त्याशिवाय, इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाभर केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ढोले कुटुंबियांकडून 3 लाख रुपयांची देणगी
वरुड ग्रामीण रुग्णालयासाठी डॉ. सोनाली ढोले व त्यांच्या कुटुंबियांकडून 3 लाख रुपयांच्या देणगीतून 20 फाऊलर बेड भेट देण्यात आले. त्याबद्दल श्री. निकम यांनी डॉ. ढोले कुटुंबाचे सत्कार केला.


00000


Monday, November 27, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
संविधान उद्देशिकेचे वाचन
अमरावती, दि. 27: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत संविधान दिवसा निमित्त संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री.बांगर यांनी संविधान दिनाची माहिती दिली त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मोर्शी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
00000

Wednesday, November 22, 2017

मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
अमरावती दि.22 : जिल्ह्यातील जानेवारी- फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. तसे पत्र  उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तहसीलदारांना पाठवले आहे.
            जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणी या तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे.
            निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : तहसीलदार 24 नोव्हेंबरला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी 5 ते 11 डिसेंबर 2017 असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबरला होईल. नामनिर्देशन 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्यानंतर याचदिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची यादी व चिन्हे जाहीर करण्यात येतील.  आवश्यक असल्यास 26 डिसेंबरला मतदान होईल. 27 डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल 28 ते 30 डिसेंबरदरम्यान जाहीर होईल.
00000
शहरातील विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा 
कामांना गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी

अमरावती राज्यात अव्वल ठरेल -  पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

अमरावती, दि. 22 : शहराची भविष्यातील लोकसंख्या व वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन शासनाने विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. विमानतळ, रस्तेविकास, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी योजना, विविध स्थळांचे सौंदर्यीकरण यामुळे अमरावती शहर व जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री पोटे- पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केले.  
श्री. पोटे- पाटील यांनी अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात  घेतला. मुख्यमंत्र्यांचे    अपर मुख्य सचिव  प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, अमरावती मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बेलोरा विमानतळा करीता 15 कोटी  यावर्षी मिळणार असून, 60 कोटी रुपये पुढील आर्थिक वर्षात ‍मिळणार आहेत.  या निधीचा प्रस्ताव  मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच  मांडणार असल्याचे अपर मुख्यसचिव प्रविणसिंह परदेशी यांनी बैठकीत सांगीतले. 
पूरग्रस्तांचे पुर्नवसन होण्याकरीता तात्काळ ब्लू ‍ लाईन  हटविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश  पुनर्वसन विभागाला देण्यात आले.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 3561 घरांच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्याचे  निर्देश नगरविकास विभागाला यावेळी देण्यात आले. .जिल्हयातील 9 नगरपालिका व 1 नगरपंचायतला  प्रत्येकी 1 ते 1.50 कोटींचा निधी देण्यासाठी लवकरच नगरविकास सचीव यांची बैठक  आयोजीत करण्यात आली  आहे, तसेच  ब्रिटीशकालीन उडडाण पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम  सचिवांना    निर्देश देण्यात आले.

    अमरावतीतील बेलोरा विमानतळ, दादासाहेब गवई स्मारक, स्मार्ट सिटी प्रकल्प, नगरोत्थान योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शिवटेकडी व भीमटेकडी सौंदर्यीकरण, राजापेठ उड्डाण पूल, अकोली रिंग रोड, शहरातील रस्त्यांचा विकास, छत्री व वडाळी तलाव विकास  आणि जिल्ह्यातील उद्योग आदी विविध विषयांवर आढावा बैठकीत सांगोपांग चर्चा झाली. सर्व कामांचा तात्काळ  निकाली काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे सचिव  प्रवीणसिंह परदेशी यांनी  दिले.

या कामांमुळे अमरावती शहर व जिल्ह्याच्या विकासाला दिशा मिळणार आहे, पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  
गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा. कों. धनावडे, नगरपरिषद प्रशासनाचे उपसंचालक डी. पी. मोरे, सहसचिव पां. जो. जाधव, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, शहर अभियंता जीवन सदार आदी उपस्थित होते.  

00000

Monday, November 20, 2017

‘ग्रंथोत्सव 2017’परिवर्तनाला अनुकूल  समाजमन तयार
करण्याचे कार्य कवितेतून
-        ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके
अमरावती, दि. 20 : चांगले विचार पोहोचवत राहणे आणि  परिवर्तनाला अनुकूल समाजमन तयार करण्याचे काम कविता करत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी येथे केले.
जिल्हा ग्रंथालय कार्यालय, शिक्षण विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्सव 2017’मध्ये आज श्री. डहाके यांची मुलाखत डॉ. रमेश अंधारे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. डहाके यांनी कविता, समीक्षा, दृश्यकला व कलांविषयी मनमोकळेपणे उत्तरे दिली.  या मुलाखतीला शहर व जिल्ह्यातून वाचक-रसिक, विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            श्री. डहाके म्हणाले की, कुठलीही क्रांती ताबडतोब होत नाही. कविता चांगले विचार सतत मांडून बदलाला अनुकुल अशी मनोभूमी तयार करत असते. कवीच्या म्हणण्याखेरीज इतरही अनेक कलांतून हे विचार पोहोचत असतात. कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ हे परिवर्तनाला चालना देणा-या पुस्तकाचे उदाहरण आहे. जनमानसात अस्वस्थता निर्माण करण्याबरोबरच मानसिक शांतता प्रदान करण्याचे कामही कविता करत असते. अमूक एक कविता श्रेष्ठ असे मी मानत नाही. समाज वेगवेगळ्या प्रवृत्तींचा असतो. तसे कवीही विविध प्रकारे लिहिणारे असतात.
ते पुढे म्हणाले की, शोषणव्यवस्थेविरुद्ध लिहिलेली प्रत्येक कलाकृती राजकीयच असते. मराठीत शरच्चंद्र माधव मुक्तिबोध यांची कविता व मर्ढेकर यांची ‘पाणी’ ही कादंबरी परिपूर्ण राजकीय जाणिवेची कृती आहे. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येची समूळ कारणे शोधत त्यावर एक भव्य पट असलेली कादंबरी लिहिता येणे शक्य आहे.  
ते पुढे म्हणाले की, वास्तव एकटे नसते. त्याला इतर अनेक पदर असू शकतात. ही जाणिव साहित्याइतकीच चित्रांतूनही प्रत्ययकारीपणे येते. सुधीर पटवर्धनांसारखे चित्रकार हे मांडत असतात. कलेच्या विविध प्रकारांतून अभिव्यक्ती होत असते. हे संचित लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा.
साठोत्तरी साहित्य व लघुअनियतकालिकांच्या चळवळीने वाङमयाला वळण दिले. आताही खेळ, नवाक्षरदर्शन, अतिरिक्त, ऐवजी अशी अनियकालिके उत्तमरीत्या निघत असतात. वाङमयीन पर्यावरणासाठी अशी नियतकालिके निघत राहणे गरजेचे आहे. हिंदीत तुलनेने अधिक पृष्ठसंख्येची दमदार नियतकालिके निघत असतात, असेही ते म्हणाले. मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी सादर केलेल्या ‘प्रश्न’ या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बन्सोड यांनी आभार मानले.
00000


Thursday, November 9, 2017

जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान
योजना अधिक व्यापक करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा
-जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे
अमरावती, दि. 9 :  दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान वरदान ठरले आहे. यंदा अपु-या पर्जन्यमानाची झळ कमी करण्यात योजनेतील कामे महत्वपूर्ण ठरली. हे अभियान यापुढेही अधिक व्यापकपणे राबविण्यासाठी व लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या बंधारे आदी कामांचे जलपूजन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डी. आर. काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभसेटवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, प्रताप अडसड, धानो-याच्या सरपंच भारती नरसेकर, चंद्रमणी गजभिये यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  
श्री. शिंदे म्हणाले की,  जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळण्यास मदत होत असून, कृषी उत्पादकतेत भर पडली आहे. हे अभियान यापुढे अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल.  योजनेतील कामांचा लाभ घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शेतक-यांना सतत प्रोत्साहित केले पाहिजे.  योजनेतील कामांचा गुणात्मक दर्जा कायम राहिला पाहिजे. त्यामुळे कामातील गुणवत्ता न राखणा-या कंत्राटदारांवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 धानोरा (म्हाली), रांजणा व नेकनामपूर या गावांतील साठवण बंधा-यांच्या कामांचे जलपूजन झाल्यानंतर  मंत्री महोदयांनी गावक-यांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
धानोरा येथील बंधा-याची साठवण क्षमता 83 टीसीएम असून त्याचा गावातील शेतीला मोठा लाभ होणार आहे. विहीरींचे पुनर्भरण होऊन पेयजलाची उपलब्धताही राहणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे देण्यात आली.  कार्यक्रमाला विविध विभागांच्या अधिकारी- कर्मचा-यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000









Saturday, November 4, 2017

पालकमंत्र्यांकडून विविध विभागांच्या कामाचा आढावा
प्रलंबित कामांबद्दल जबाबदार अधिका-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढा
   पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 4 : शेतक-यांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या चांगल्या निर्णयांची अंमलबजावणी न करणा-या अधिकारी- कर्मचा-यांना कठोर कारवाई करण्यात येईल. सोयाबीनचे यापूर्वी जाहीर केलेले 200 रुपये अनुदान अद्याप मिळत नसल्याबाबत तक्रारी येत आहेत. या अनुदानवाटपाची कार्यवाही तत्काळ करावी व विलंबासाठी जबाबदार व्यक्तींना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
सोयाबीन, उदीड, मूग आदी पीक अनुदान, खरेदी व इतर विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
       श्री. प्रवीण पोटे- पाटील म्हणाले की, सोयाबीन, मूग, उडीद पीक खरेदीची प्रक्रिया गतीने राबवावी. खरेदी केंद्रावर अधिक काटे उपलब्ध करावेत. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. शासनाकडून अनुदान जाहीर झाल्यावर ते शेतक-यांपर्यंत वेळेत पोहोचले पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा करुन काम पूर्ण केले पाहिजे. यावेळी वारंवार सूचना देऊनही कामे होणार नसतील तर कठोर कारवाई करू. कुणाचीही गय केली जाणार नाही.
                  ई- पॉस कार्यप्रणालीबाबत कृषीमंत्र्यांशी चर्चा
रासायनिक खतांची विक्री डीबीटी थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून करण्यासाठी 908 कृषी सेवा केंद्रांना ई- पॉस यंत्रणा देण्यात आली आहे. मेळघाटातील काही ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे या प्रणालीच्या वापरात अडथळे येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी व्ही-सॅटचा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न यावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे- पाटील दिले. तत्पूर्वी त्यांनी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व प्रधान सचिव (कृषी) यांच्याशी चर्चा करुन ही अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली.  कीटकनाशक फवारणीतून दुर्घटना घडू नयेत, यासाठी विक्रेत्यांकडून सेफ्टी कीट, मास्क आदी पुरवले जाते किंवा कसे, हे वेळोवेळी तपासले पाहिजे, असेही ते म्हणाले.  
                              राष्ट्रीयीकृत बँकांत खाती हवीत
   कल्याणकारी योजनांच्या लाभवितरणासाठी खासगी बँकांमध्ये नव्हे, तर राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते उघ़डले पाहिजे, असेही ते म्हणाले. याबाबत शासन निर्णयाद्वारेही निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी दिली.  
                  महिला व बालकल्याण कार्यालयाने सुस्पष्ट अहवाल द्यावा
महिला व बालकल्याण विभागाकडून शिवणकाम, संगणक प्रशिक्षणाबाबत गतवर्षी केलेल्या कार्यवाहीचा व यावर्षी राबवावयाच्या कार्यक्रमाचा लाभार्थ्यांच्या यादीसह अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले. योजनांच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी माहिती प्रसारित करुन पारदर्शकता ठेवावी जेणेकरुन नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होणार नाही, असेही निर्देश त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत गावोगावी होणा-या कामांबाबतही तक्रारी प्राप्त होत असतात. ही कामे योग्य रीतीने पूर्ण होतात किंवा कसे, हे स्वत: जाऊन तपासावे. या कामांत नियमबाह्य काही झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश श्री. पोटे- पाटील यांनी  मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले.
‘ई- लर्निंग’अंतर्गत डिजीटल स्कूलसाठी टीव्ही खरेदी प्रक्रियेबाबत सुस्पष्ट माहिती मिळणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया नियमानुसार झाली किंवा कसे, हे तपासावे व तसे न झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.  
                                                                       00000

Wednesday, November 1, 2017

ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अमरावतीत अवयवदान शक्य
अमरावती, दि. 05 :  येथील ब्रेन डेड म्हणून घोषित झालेल्या एका व्यक्तीचे अवयवदान करण्याचा त्याच्या कुटुंबीयांनी केलेला संकल्प आज ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकला.
          हमालपुरा येथील रहिवाशी मनोज गुप्ता यांना प्रारंभी जिल्हा सामान्य रुग्णालयात व तद्नंतर डॉ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तथापि, ते ब्रेन डेड झाल्याने डॉ. चौधरी यांनी  गुप्ता यांच्या परिवाराला अवयवदान प्रक्रियेविषयी माहिती दिली. सामाजिक भान जोपासत गुप्ता कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे स्व. गुप्ता यांची किडनी, यकृत व डोळे हे अवयव गरजू रुग्णांना मिळू शकतील.     
ब्रेनडेड अवस्थेतील मनोज गुप्ता यांचे यकृत व मूत्रपिंड बुधवारी  एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला पाठविण्यात आले व नेत्रपटल सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मुंबई व नागपूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार  ही शस्त्रक्रिया पार पडली. अवयव मुंबईला पाठविण्यासाठी खापर्डे बगिचा येथील चौधरी रुग्णालयापासून ते विमानतळापर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला.  शस्त्रक्रियेनंतर एअर ॲम्ब्युलन्सने स्व. गुप्ता यांचे यकृत ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल, तर मूत्रपिंड मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
मुंबई येथील डॉ. गौरव चौबे, नागपूरचे डॉ. सुशीलकुमार दुबे व डॉ. पिंकी थापर, डॉ. सोमनाथ चट्टोपाध्याय आदींनी शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. अवयवदान हे सामाजिक हितासाठी महत्वाचा निर्णय असून, गुप्ता कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श ठेवला असल्याची प्रतिक्रिया डॉ.  अविनाश चौधरी यांनी व्यक्त केली.
00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...