Thursday, September 30, 2021

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी

 







जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी

अमरावती, दि. 30 : संत्रा हे जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच संत्रा फळपीक मूल्यवृद्धी व निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न व्हावेत. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज वरूड तालुक्याचा दौरा करून फळपीक शेतीची पाहणी व कृषी प्रकल्पांना भेटी दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिका-यांनी आज बेनोडा, जरूड, वरूड आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी गटामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी व ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतला. बेनोडा येथे संत्रा उत्पादक शेतक-यांनी खडका धरण येथून पाईपलाईन आणून फुलवलेल्या संत्रा बागेचीही पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. मनरेगाअंतर्गत वृक्षलागवड व नर्सरीला भेट देऊन त्यांनी मनरेगाअंतर्गत अधिकाधिक विकासकामे राबविण्याचे निर्देश दिले.

                        वरूड येथील संत्रा मंडई येथे संत्रा मूल्यवृद्धीसाठी गटातर्फे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. या प्रकल्पाद्वारे संत्र्यांची आकारनिहाय वर्गवारी, व्हॅक्सिनेशन, निर्यातीच्या दृष्टीने मूल्यवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक असून, यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा व विविध विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            वरूड येथे पानी फौंडेशनतर्फे जलसंवर्धन उपक्रमात सहभागी 20 गावांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  वरूड येथील तहसील कार्यालयात विविध कामकाजाचा आढावाही जिल्हाधिका-यांनी घेतला.

00000

 

 

 

जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम

 







‘आझादी का अमृत महोत्सवा’चे औचित्य

जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम

विविध संस्था व नागरिकांचा सहभाग मिळवावा

-          निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल

 

अमरावती, दि. 30 : केंद्रिय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे  ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विविध संस्थांच्या सहभागासह ‘क्लीन इंडिया’अंतर्गत जिल्ह्यात गावोगाव सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विविध संस्था व नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे केले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सहायक रोजगार संचालक प्रफुल्ल शेळके, जिल्हा रूग्णालयाचे डॉ. अमोल नरोटे, नेहरू युवा केंद्राचे सदस्य शरद गढीकर, जयंत डेहणकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वय अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, आयटीआयच्या प्राचार्य मंगलाताई देशमुख, खादी ग्रामोद्योग मंडळाचे मंगेश वानखडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, प्रदीप सूर्यवंशी, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.

या मोहिमेत स्वच्छतेबरोबरच प्लास्टिक निर्मूलनावर भर देण्यात येणार आहे. पर्यटनस्थळे, शैक्षणिक परिसर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, महामार्ग, धार्मिक स्थळे, रुग्णालये, जलस्त्रोत, ऐतिहासिक स्थळे आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गावांचे सौंदर्यीकरणही मोहिमेतून साधले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मोहिम राबवण्यात येईल. घरोघरी जाऊन कचरा- विशेषत: प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. तसेच गावागावातील  युवक तसेच महिला मंडळ व स्वयंसेवी संस्थांमार्फत स्वच्छता करण्यात येईल. नेहरू युवा केंद्राच्या युवक युवतींचा त्यात सक्रिय सहभाग असेल.

या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवावा व सर्व विभागांनी समन्वयाने ही मोहिम राबवावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिका-यांनी दिले.

                        000

 

 

 

 

 

 

 

उधवस्त झालेल्यांचा आधार व्हा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

 








उधवस्त झालेल्यांचा आधार व्हा

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

 

अमरावती, दि. 30 : राज्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सौहार्दाचे, आपुलकीची आणि न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

      अमरावती येथील महिला प्रबोधिनी येथे महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महिला आणि बालविकास विभागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या  अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच  राज्यातील नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांच वर्तन जनतेप्रती कशी मुजोर पणाची होती याचा किस्सा सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच प्रशिक्षण मिळालं नाही तर त्यांची वागणूक कशी होते याचे उदाहरण दिले.

 त्यामुळे संघर्ष करून आलेल्या अधिकाऱ्यांनी जनतेचा संघर्ष कमी व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. लोकांच्या हिताची धोरणे आखली पाहिजेत आणि ती प्रभावीपणे अमलात आणली पाहिजेत. यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन ठाकूर यांनी यावेळी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना केले

 

00000

Tuesday, September 28, 2021

जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी

कोरोना प्रतिबंधक, तसेच इतर आरोग्य उपाययोजनांच्या अनुषंगाने तिवसा ग्रामीण रुग्णालय, मोझरी येथील रुग्णालय आदी ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज केली.       
यावेळी त्यांनी आरोग्य सुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे-देशमुख आदी उपस्थित होते. साथरोग नियंत्रणासाठी उपचार सुविधा व आवश्यक औषध साठा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.       
मोझरी विकास आराखड्यातील कामांची, तसेच शिवणगाव रोपवाटिकेची पाहणीही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी  केली व तहसील कार्यालयातही विविध कामांचा आढावा घेतला.        
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शिवणगाव रोपवाटिका विकसित करण्यात आली आहे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे राबवावीत.  आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत,  असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.०००

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी चार कोटी 71 लाख रु. निधी जिल्ह्याला प्राप्त- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जुलैमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अमरावती जिल्ह्यासाठी 4 कोटी 71 लाख 98 हजार रूपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आले आहेत. याबाबत उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल. एकही बाधित व्यक्ती वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.         
 अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आली आहे. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: गावोगाव दौरे करूनमि पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते व याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला. यानंतरही आवश्यक निधी मिळवून दिला जाईल. महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधव व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  जिल्हाधिका-यांकडून तालुक्यांना निधी वितरणाचा आदेश जारी        
 जिल्हा प्रशासनाकडून निधीचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले असून, त्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सर्व तहसीलदारांना जारी केला. सर्व संबंधितांना गतीने निधीचे वाटप करावे. निधी वितरणानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले आहेत.       
   नैसर्गिक आपत्तीत क्षतिग्रस्त घरे, मृत जनावरे, पूर्णत: नष्ट, अंशत: पडझड झालेली घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी अनुदान, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अर्थसाह्य आदींसाठी हे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.         
 निधी वितरण करताना तांत्रिक त्रुटी टाळाव्यात.  बँकांनीही या बाबींची पूरेपूर काळजी घ्यावी. सर्व तालुक्यांमध्ये बाधितांना वेळेत मदतीचे वाटप व्हावे. त्याबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.000

Wednesday, September 15, 2021

दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 


श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

अमरावती, दि. १५ : वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वर्धा नदीत बुडून उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 सप्टेंबर रोजी अकरा व्यक्ती नदीमध्ये बुडाल्या. त्यापैकी तीन व्यक्तींचे मृतदेह शोध बचाव पथकाने शोधून काढले असून उर्वरित व्यक्तींचा आपत्ती निवारण दल व जिल्हा पथकाद्वारे शोध घेणे चालू आहे. सदर घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद प्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोतच तरी या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या, तसेच सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत मिळावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपद्ग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

 ०००

 

 

 

Tuesday, September 14, 2021

वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु

 


वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले

प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु

 

अमरावती दि, 14 : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध बचाव पथकामार्फत युद्धपातळीवर सुरु आहे.

            वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद ठाण्यांतर्गत झुंज धबधबा येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असतांना नाव उलटल्याची घटना घडली. गाडेगांव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज सकाळी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. सकाळी दहाच्या सुमारास एका नावेतून महादेव मंदिराकडे जात असतांना नाव नदीपात्रात उलटली. नावेमध्ये 11 व्यक्ती होत्या. यामध्ये बहीण, भाऊ, जावई तसेच त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यापैकी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील तारासावंगा गावातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये अतुल गणेश वाघमारे (वय 25 वर्षे), वृषाली अतुल वाघमारे (वय 20 वर्षे), अदिती सुखदेवराव खंडाते (वय 10 वर्षे), मोना सुखदेवराव खंडाते (वय 12 वर्षे) तर आशु अमर खंडाते (वय 21 वर्षे) या व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

            प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरु असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याचे भीती व्यक्ती केली जात आहे.  अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या 20 जणांची चमू घटनास्थळी दाखल असून शोध कार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच  राज्य आपत्ती निवारण दलाचे चमू तेथे दाखल झाली असून बुडालेल्या व्यक्तींचा शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.

            घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे घटनास्थळी दाखल असून पोलीस, तहसिलदार, घोडेस्वार, ग्रामसेवक, तलाठी तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी शोध व बचाव कार्यासाठी मदत करीत आहेत. तसेच स्थानिकांच्या मदतीनेही इतरांचा शोध घेणे सुरु आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांन आज दिली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहे.

00000

दुर्गवाडा, धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

  


           






             निम्न वर्धा पुनर्वसितांना न्याय मिळवून द्यावा
दुर्गवाडा
धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा

-         पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

 

अमरावतीदि. १४ : निम्न वर्धा प्रकल्पाच्या दुर्गवाडाधारवाडा या गावांचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करून तिथे अधिकाधिक  सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नागपूर येथे दिले.

या गावांच्या पुनवर्सनाबाबत बैठक नागपूर येथील सिंचनभवनात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालीत्यावेळी त्या बोलत होत्या. व्हीआयडीसीचे राजेंद्र मोहिते यांच्यासह अभियंता अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या कीदुर्गवाडाधारवाड्यात १० वर्षांपूर्वी नागरी सुविधात काही सुविधा झाल्या. मात्र योग्य देखभाल झाली नाही. त्यामुळे या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे आवश्यक सुविधा उभाराव्यात.या दोन्ही गावांत पक्के रस्ते निर्माण करावेत.धारवाडा गावातील पाणी पुरवठा योजना बॅक वॉटरमध्ये असल्याने तिचे स्थलांतर व्हावे. दोन्ही गावांमध्ये शाळासमाजमंदिर परिसराला आवारभिंत बांधून द्यावीदुर्गवाडा येथे स्वतंत्र क्रीडांगणआरोग्य उपकेंद्राची इमारत उभारावीअसे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

धारवाडा गावातील नाली ओव्हर फ्लो झाल्याने घरात पाणी शिरते. तिथे तत्काळ संरक्षक भिंत उभारावी. धारवाडा गावासाठी वेगळे ग्रामपंचायत भवन उभारण्यात यावे. श्री क्षेत्र धारेश्वर मंदिर परिसराचा विकास करून तिथे रस्ता व पूल उभारावा. दोन्ही गावांत पथदिवे चांगले नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ते त्वरित बदलून एलईडी लाईट बसविण्यात यावे व रस्त्याच्या कडेला असणारी ११ केव्ही  लाईट तार अंडरग्राऊंड करण्यात यावी. ही कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीअसे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

दुर्गवाडा धारवाडा गावातील  संदीप ठाकरे उपसरपंच दुर्गवाडा ग्रामपंचायत सचिन भाऊ सोटेप्रफुलभाऊ धंधर उमेश भाऊ ठाकरे आदी उपस्थित होते

00000

 

स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत - राज्यमंत्री बच्चू कडू

                                             


                                                 







स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने

चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत

-राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती, दि. 14 : चिखलदऱ्यातील स्काय वॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांत वाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व विभागांनी येथील विकासकामे करावीत, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदारा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रक्लप अधिकारी वैभव वाघमारे, धारणीचे तहसिलदार वैभव पाटोळे, चिखलदऱ्याच्या तहसिलदार श्रीमती माने आदी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले, चिखलदऱ्या उभारण्यात येत असलेला स्काय वॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्काय वॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पुर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रासाठी दिलेली जमीन अधिग्रहित करावी किंवा इतर पर्याय तपासून पहावे. जमिन अधिग्रहण आवश्यक असल्यास त्यासाठी किती जमिन अधिग्रहित करावी लागणार आहे, हे तपासून थेट खरेदीने जमिन खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. विकास प्रकल्प पुर्ण झाल्यास येथील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने जमिन अधिग्रहणासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे.

स्काय वॉकचे काम पूर्णत्वास येत आहे. केबलचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याचा पाठपुरावा करून परवानगी वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. स्काय वॉकवर जाण्यासाठी आवश्यक असलेली जागा कोणत्या प्रकारे उपलब्ध होईल, याची तपासणी करावी. चिखलदारा येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी येथील पर्यटक आणि रहिवाशी यांना लागणारा पाणीसाठी याची माहिती घेण्यात यावी.

स्काय वॉकमधून निश्चित उत्पन्न मिळण्याबाबत सिडको साशंक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिखलदऱ्यातील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्काय वॉक हा पर्यटकांचे आकर्षण असण्यासोबतच देशातील एकमेव स्काय वॉक असणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञही याठिकाणी भेटी देणार आहे. स्काय वॉकसाठी लागणारा खर्च, त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती सिडकोला दिल्यास त्यांच्याकडून गतीने काम होण्यास मदत मिळेल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.

०००००

Saturday, September 11, 2021

कोविडकाळात कुटुंबातील कर्ता गमावलेल्या महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

 












'माविम','ग्रीव्ह इंडिया','सहयाद्री फाउंडेशन' 'लाईफ फर्स्ट' यांच्या वतीने 'एक हात मदतीचा'

कोविडकाळात कुटुंबातील कर्ता गमावलेल्या महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

अमरावती, दि. १२ : कोविड  प्रादुर्भावात जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांनी प्रमुख कर्ता व्यक्ती गमावला. अनेक कुटुंबांचा आधार तुटलेला आहे. या महिलांना सर्व संकटांना पेलून आपल्या मुलाबाळांसाठी एक नवी सुरुवात करावी लागणार आहे. माविमच्या माध्यमातून या महिलांना रोजगार, स्वयंरोजगार, प्रक्रिया उद्योगाचा आधार मिळणार आहे, असे सांगून उपस्थित महिलांचे मनोबल राज्याच्या बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी वाढविले.

ग्रीव्ह इंडिया, सहयाद्री फाउंडेशन व लाईफ फर्स्ट यांच्यावतीने 'एक हात मदतीचा' कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला. कोविडमुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.

माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे, गोंदिया येथील माविमचे जिल्हा समन्वयक संजय संगईकर जिल्हा उद्योग केंद्राचे सांगोळे, लाईफ फर्स्ट फाउंडेशनचे संचालक विजय क्षीरसागर, कौशल्य विकास योजनेचे प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.

सातारगाव,धामणगाव,लेहगाव,मोर्शी,खोपडा,पुसदा,चांदुर रेल्वे,नांदगाव खंडेश्वर,बेनोडा,शेंदुर्जना घाट, अंजनगाव सुर्जी, शिराळा आदी गावातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना धनादेशचे  वाटप श्रीमती ठाकूर यांनी केले.

00000

पालकमंत्र्यांनी सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या

 


 






शासकीय दूध संकलनात खंड पडू नये 

      - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर


पालकमंत्र्यांनी
 सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या

 

अमरावती दि 11: शासकीय दूध योजना कार्यालयाने जिल्ह्यातील संस्थांकडून नियमित दूध संकलित करावे. दूध संकलनात खंड पडू नये. दूध संकलनाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  आज जिल्ह्यातील दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत बैठक घेण्यात आली.बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, दुग्ध व्यवसाय अधिकारी  गिरीष सोनवणे, प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाचे विकास तावडे आदी उपस्थित होते

दुधाची रोजची गरज पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी प्रत्येकी 50 लिटर दुधाचा शासकीय दूध योजना कार्यालयाला पुरवठा करावा. जिल्हयात सक्रिय सात संस्था शासकीय दुध योजना कार्यालयात दूध पुरवठा करतात. दूध पुरवठा करण्यात नियमीतता असावी. दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. असे श्रीमती ठाकूर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी दूध उत्पादक शेतकरी सुरेश पडोळे, शशिकांत फुलझेले, रोशन गुप्ता, वसंत सातारकर, रंजित राऊत, विनोद चौधरी, आबा वऱ्हाडे उपस्थित होते.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...