Tuesday, November 30, 2021

बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता - पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

 









बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता

- पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर

 

 'महाबॅंके'कडून जिल्ह्यातील 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वाटप

 जिल्ह्यात लवकरच गोट बँक कार्यान्वित होणार

 

अमरावती, दि. 30: बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी आज काढले.

   संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी कर्ज वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

              महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती झोनचे अंचल प्रबंधक राहूल वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जितेंद्रकुमार झा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    महिला बचत गटांना स्वयंपूर्ण बनवून त्यांना सहज भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ केली आहे, असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बचत गटांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. कोविडच्या काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी घरुनच मास्क बनविणे, सॅनिटायझर तसेच खाद्य पदार्थ आदींची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे बचत गटातील महिलांचेही मनोबल वाढले. जागतिक बँकेनेही महिला बचत गटांच्या कार्याची नोंद घेतली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमुळे आज 582 महिला बचत गटांना 8 कोटी 13 लक्ष रुपयांचे कर्ज वितरण करण्यात येत आहे. यापासून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासनामार्फत आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही  त्यांनी यावेळी दिली.

            जिल्ह्यात एकूण 1475 महिला बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या सक्षमतेसाठी लवकरच गोट बँक प्रस्तावित करण्यात येणार आहे. काही ठिकाणी गोट बँक ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्यातही ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास आपोआपच समाजही सक्षम होतो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने स्वयंसहाय्यता गट नव्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र प्रमाणेचे इतर बँकांनीही महिला बचत गटांना सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा. व सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

   महिला बचत गटांना  मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. माहुली जहागीर येथील विठ्ठल स्वयंसहाय्यता बचत गट, मासोद तपोवन येथील अल्मिरा अल्पसंख्यांक बचत गट, राजकमल चौक येथील अलिना महिला बचत गट, लोणी काकडी येथील रुख्मिणी महिला बचत गट, थूगाव पूर्णानगर येथील प्रेरणा महिला बचत गट आदींना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

            जिल्ह्यातील एकही नागरिक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे लसीकरण मोहिम सर्वत्र राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज कार्यक्रमस्थळीही कोविड लसीकरण मोबाईल व्हॅन उपलब्ध करण्यात आली होती. ज्यांचे अद्याप लसीकरण व्हायचे होते, त्यांनी या सेवेचा लाभ घेतला.

              श्रीमती ठाकूर यांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची पाहणी करुन खरेदीही केली. उत्पादित केलेल्या मालाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगून त्यांनी बचत गटातील महिलांचे कौतुक केले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल वाघमारे यांनी केले. तर संचालन निशा राऊत व आभार सुनील सोसे यांनी मानले.

               ***

Wednesday, November 24, 2021

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्यासमाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन

                                 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या

समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन

 

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे

समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

 

अमरावती, दि. 24 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली.

समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले. 

    महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वैभव फरताडे, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी यावेळी उपस्थित होते. 

    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. 

                                                                00000

Monday, November 22, 2021

महिला सक्षमीकरणासाठी समाजात नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


-     






महिला सक्षमीकरणासाठी समाजात

नव उद्योजिका निर्माण होणे गरजेचे

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

* दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रात महिला वसतिगृहाचे उद्घाटन तसेच महिला उद्योजक कार्यशाळा संपन्न

 

अमरावती, दि. 22 : आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. महिला उद्योजक म्हणूनही जिल्ह्यातील अनेक महिलांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील अन्य महिलांनाही प्रोत्साहन देऊन नव उद्योजिका निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील महिला वसतिगृहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला उद्योजक कार्यशाळाही घेण्यात आली.

दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. के.ए. धापके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित प्रगतीशील शेतकरी पुर्निमा सवाई, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, आत्माच्या अर्चना निस्ताने आदी यावेळी उपस्थित होते.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत श्रीमती कौर म्हणाल्या की, कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन उद्योग चालविणाऱ्या महिलांचे उत्पादन अतिशय सुंदर आहे. या उत्पादनाला विक्री व्यवस्थापनाची जोड देणे आवश्यक आहे. यासाठी महिलांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. यादृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. के.ए. धापके म्हणाले की, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रामार्फत विविध प्रशिक्षण देण्यात येते. येथे सुरु करण्यात आलेल्या महिला वसतिगृहामुळे या प्रशिक्षणाला अधिक चालना मिळून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल. आपल्या जिल्ह्यात संत्री मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतात. परंतू संत्री रस साठवून ठेवण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्यासाठी महिला उद्योजकांनी छोट्या स्टॉलवरुन संत्रा रसाची त्वरित विक्री करता येईल अशी व्यवस्था निर्माण केल्यास बाजारपेठेत या पेयाला चांगली मागणी निर्माण होऊ शकते.

अनेक क्षेत्राप्रमाणे शेती व्यवसायातही महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. कृषीवर आधारित उद्योग वाढविण्यासाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याचा लाभ महिला उद्योजकांनी घ्यावा. या योजनांचा लाभ वैयक्तिक किंवा गटाच्या माध्यमातूनही घेता येतो. अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसीडीही उपलब्ध आहे, असे सांगून अनिल खर्चान यांनी उपस्थित महिला उद्योजकांना विविध योजनांची माहिती दिली. महिलांनी वस्तूंच्या विक्रीचे कौशल्य आत्मसात करुन उद्योगाची उभारणी केल्यास उद्योग निश्चितच यशस्वी होईल, असे श्री सोसे यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात बचत गट महिला उत्पादन कंपनीसाठी व्यापारी केंद्र उभारण्याचे शासनस्तरावर प्रस्तावित आहे. त्यातून विक्री व्यवस्था निर्माण झाल्यास उद्योगांना निश्चितच चालना मिळेल, असे श्री देशमुख यावेळी म्हणाले. महिला उद्योजक आरती शेंडे, शोभा डवरे, रुपाली कापसकर, किरण लोहकरे, मनिषा टवलार यांनी आपल्या व्यवसायाची माहिती देऊन या क्षेत्रातील आव्हाने आणि अडचणींबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्रातील साधना रेडिओ, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, माती-पाणी परीक्षण, सेंद्रिय खते निर्मिती केंद्र आदींची जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहाणी केली.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन गृह विज्ञान विषय विशेषज्ञ डॉ. अर्चना काकडे यांनी मानले.

00000

आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण

 

 





आरोग्य पथकांद्वारे मेळघाटात पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण

अमरावती, दि. 22 : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने वेग घेतला आहे. आरोग्य पथके जिल्ह्यात सर्वदूर, तसेच मेळघाटातील पाड्यापाड्यांवर पोहोचून पात्र व्यक्तींचे लसीकरण करत आहेत. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून ठिकठिकाणी पोहोचून शिबिरांची पाहणी करण्यात येत आहे. जिल्हाधिका-यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रांजणा येथे लसीकरण शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.

              विविध योजना, उपक्रमांची सांगड लसीकरणाशी घालून मोहिम व्यापक करण्यात आली आहे. या आठवड्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडण्याची चिन्हे आहेत. अंजनगाव बारी, रांजणा, खिराळा, कु-हा, गणोरी, खडिमल, वलगाव, शिराळा, चंद्रपूर, येवदा, रामतीर्थ, आमला, रेहट्याखेडा अशा अनेक ठिकाणी शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. निरनिराळी कार्यालये, संस्था आदींनाही मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. अंजनगाव सुर्जी बाजार समितीतील सभेला व्यापारी, अडते, हमाल आदींनी हजेरी लावली.

  मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यात आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण कार्यक्रम राबवत आहेत. लोकांचे प्रबोधन करणे, लसीकरणाचे महत्व पटवून देणे व लसीकरण आदी कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहे. दुर्गम भागापर्यंत पायी पोहोचून पथकांकडून मोहिमेची अंमलबजावणी होत आहे. 

 

00000

Saturday, November 20, 2021

लसीकरणाचा वेग वाढला; उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 


प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय परिपूर्ण नियोजनाच्या सूचना

लसीकरणाचा वेग वाढला; उद्दिष्ट गाठण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. २० : जिल्ह्यात आरोग्य व विविध विभाग, अनेक पथकांच्या समन्वयाने लसीकरणाचा वेग वाढला आहे. तथापि, उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी थोड्या प्रयत्नांची गरज आहे. सर्वांनी एकजुटीने व पुढील आठवड्याचे परिपूर्ण नियोजन करून लसीकरण वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

लसीकरण वाढविण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली असून, त्यासाठी सर्व विभागांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, मान्यवर यांचेही योगदान मिळत आहे. सर्वांचे प्रयत्न व योगदान कौतुकास्पद असून, यापुढे अधिक व्यापक व नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

दरम्यान, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना लसीकरणाबाबत सुस्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तालुक्याचे आताच्या उद्दिष्टापेक्षा 25 टक्क्यांनी जास्त  उद्दिष्ट ठेवण्यात यावे व त्यानुसार टीम चे नियोजन करण्यात यावे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्दिष्टापेक्षा काम कमी होत आहे त्यांना जास्त प्रमाणात फोकस करून नियोजन करण्यात यावे.  मागील सात दिवसाचे कामकाज तपासावे. उद्दिष्टपूर्तीकरिता जास्त लोकसंख्येचे गाव निवडून त्या गावांमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी सत्र नियोजित करून शंभर टक्के उद्दिष्ट प्राप्त होईल याची नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी यांनी पुढील सात दिवसाचे लसीकरण सत्रांचे परफेक्ट नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाच्या शिल्लक असलेल्या एन्ट्री तातडीने पूर्ण कराव्यात. मोबाईल लसीकरणाचे वाहनाला एक दिवसाचे कमीत कमी चारशे ते पाचशे उद्दिष्ट द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

 ज्या भागात जास्त प्रमाणात प्रतिसाद कमी आहे त्या भागात मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेऊन त्यांचे सहकार्याने सत्र आयोजित करावे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान हजार इतके उद्दिष्ट द्यावे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल त्या टीम इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला त्‍यांच्‍या सेवा अधिग्रहित कराव्या, अशाही सूचना तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

00000

 

लसीकरण वाहन थेट आपल्या दारी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद





लसीकरण वाहन थेट आपल्या दारी

नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

 

 अमरावती, दि.२० : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे .लसीकरण मोहिमेंतर्गत आता लसीकरण वाहन थेट नागरिकांच्या दारी जात असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात येत आहे .या उपक्रमाला नागरिकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .

    जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या आदेशान्वये तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा आरोग्य कार्यालयातून वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण वाहन मिळाले. जिल्हा परिषद सदस्य गजानन राठोड यांच्या हस्ते या लसीकरण वाहनाचे काल (दिनांक १९ नोव्हेंबर )उद्घाटन करण्यात आले .

  लसीकरण वाहनाच्या सहाय्याने वलगाव येथील वसुपुरा , निर्मळ हॉस्पिटल लढ्ढा गल्ली तसेच सौदागरपुरा येथील ५५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे .लसीकरण चमूमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश पाटील, समुदाय अधिकारी डॉ. प्रिती चव्हाण, आरोग्य सेविका राधिका पखाले, आरोग्य सहायक श्री. नवाथे  उपस्थित होते. आजही या भागामध्ये लसीकरण वाहनाद्वारे लसीकरणाचे कार्य सुरू आहे.

   लसीकरण वाहनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत होत आहे .थेट आपल्या दारी लसीकरण वाहन आल्यामुळे नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरण वाहनामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये जाऊन लसीकरण करणे सहज शक्य होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .दिलीप रणमले यांनी दिली आहे.

    कोरोना लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहू नये यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे . कोरोनाचा  कहर कमी झाला असला तरी दुर्लक्ष करून चालणार नाही .तरी ज्या नागरिकांचा पहिला व दुसरा डोस अदयाप प्रलंबित आहे त्यांनी नजिकच्या लसीकरण केंद्रावर जावून तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

 

0000


Friday, November 19, 2021

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार

 



 

बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित लोकसंचालित साधन केंद्र दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याकरिता सामंजस्य करार

 

            माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी देशाच्या सार्वजनिक बैंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बैंक असलेली बैंक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) यांच्या दरम्यान महिला स्वयं सहाय्य बचत गट (SHG) व संयुक्त दायित्व गट (JLG) यांना कर्जपुरवठा करण्याकारिता आर्थिक सामंजस्य करार मा. ना. अॅड. यशोमतीताई ठाकुर, मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अमरावती जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे करण्यात आला.

            महिला सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाची शिखर संस्था महिला आर्थिक विकास महामंडल (माविम) यांनी अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लोक संचालित साधन केंद्र स्थापित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्याकरीता सदैव प्रयत्नशील असते. त्यामुलेच बँकेनी पुढाकार घेऊन माविम बचत गटांच्या महिलांना उद्योगशील बनविण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार कर्ज पुरवठा त्वरित व्हावा या करीता बैंक ऑफ महाराष्ट्र व माविम अमरावती स्थापित 13 लोकसंचालित साधन केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सावित्रीबाई फुले CMRC चांदूर बाजार, दिशा CMRC चांदूर रेल्वे, जिजाऊ CMRC, दर्यापुर, झेप CMRC मोर्शी, भरारी CMRC धामनगाव रेल्वे, परिवर्तन CMRC भातकुली, प्रेरणा CMRC जरुड, विमलाबाई देशमुख CMRC लोणी टाकली, मेलघाट CMRC धारणी, संजीवनी CMRC अंजनगाव सुर्जी, उन्नती CMRC अचलपुर, सावित्रीबाई फुले CMRC वरुड व संत तुकड़ोजी महाराज CMRC माहुली जहाँगीर या 13 लोक संचालित साधन केंद्राच्या महिला बचत गटांना या कराराचा लाभ होणार आहे. आज झालेल्या MoU  कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्र चे अमरावती अंचल प्रबन्धक श्री राहुल वाघमारे, उप अंचल प्रबन्धक श्री अनिल गिरसावले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री सुनिल सोसे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी श्री. ऋषिकेश घ्यार व CMRC व्यवस्थापक व सहयोगिनी उपस्थित होते.

 

 ०००

 

 

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 



संचारबंदीत सवलत

जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न

यापुढे कायम एकोपा व शांतता राखण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १९ : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे. स्थैर्य व शांतता विकासाला बळ देतात. परिस्थितीत तणाव निर्माण झाला की विकासाला खीळ बसते व सर्वांचेच नुकसान होते. त्यामुळे यापुढे कधीही एकोपा व शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

अमरावती शहरात कायदे व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन काही वेळेसाठी संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, कृषी सेवा केंद्र, विद्यार्थी, बँका यांना काही वेळेसाठी सवलत देण्यात आली होती.

पुढे विविध परीक्षा सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना सोयीसाठी, तसेच नागरिकांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देणे आवश्यक होते. त्यानुसार पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सूट देण्याचा आदेश निर्गमित केला आहे.

त्यानुसार दि. २० नोव्हेंबरपासून रोज सकाळी ९ ते  सायंकाळी ६ दरम्यान सवलत देण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.

गत काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेला तणाव, काही अनुचित घटना लक्षात घेऊन पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी स्वतः शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन शांततेचे आवाहन केले. अनेक मान्यवरांना सोबत घेऊन त्यांनी परिस्थितीचा सातत्यपूर्ण आढावा घेतला व  शांतता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न केले.

अमरावती हे सांस्कृतिक महत्त्व असलेले, तसेच नवनव्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे विकासाकडे झेपावणारे औद्योगिक शहर आहे. विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी शांतता व स्थैर्य कायम राहणे आवश्यक आहे. त्यामुळे

यापुढेही शहरात कायम शांतता नांदावी. यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

०००

 

 

 

 

Tuesday, November 16, 2021

अचलपुरात रात्रीची संचारबंदी

 अचलपुरात रात्रीची संचारबंदी

अमरावती, दि. १६ : अचलपूर, परतवाडा शहर, तसेच ग्रामपंचायत कांडली व देवमाळी परिसरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तसा आदेश उपविभागीय दंडाधिकारी संदीपकुमार अपार यांनी जारी केला. त्यानुसार मंगळवार, दि. १६ नोव्हेंबरपासून रोज रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित गोळा होऊ नये, कोणत्याही प्रकारच्या अफवा, जातीय तणाव, धार्मिक भावना भडकवणारे व्हिडीओ, फोटो प्रसारित करू नये. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे बॅनर, पोस्टर लावू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.   

ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू

 ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू

अमरावती, दि. १६ : अमरावती शहरातील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ डिसेंबरपर्यंत लागू राहील.

अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवल यांनी हा आदेश जारी केला. त्यानुसार शस्त्र, तसेच तलवार, चाकू, लाठी व जिवित हानी होऊ शकणारे शस्त्र बाळगणे, विस्फोटके व तत्सम कच्च्या मालाची वाहतूक, दगड, विटा आदी क्षेपणास्त्राचा वापर करणे (गोळा करणे), जमाव एकत्रीकरण, पुतळ्याचे प्रदर्शन करण्यास, जाहीररीत्या ओरडणे, गाणे संगीत वाजवणे, बिभत्स चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्रविचित्र हालचाली, तसेच कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे.

शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हा आदेश लागू होणार नाही. अंत्ययात्रेच्या व्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुकांसाठी पोलीस ठाणे अधिका-यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.

                        ०००

Monday, November 15, 2021

बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 




बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान राखा

-   जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 15 : कायदा हातात न घेता बंधूभाव ठेवून शांतता प्रस्थापित करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सलोख्यासाठी अनेक नागरिक योगदान देत आहेत. यापुढेही असाच बंधुभाव कायम राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी परतवाड्यात केले.

    

जिल्हाधिकारी  पवनीत कौर यांच्या उपस्थितीत परतवाडा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय राजस्व अधिकारी संदीपकुमार अपार, ठाणेदार संतोष टाले, नायब तहसीलदार अक्षय मांडवे, माजी नगराध्यक्ष रफिक सेठ, रुपेश ढेपे,सल्लुभाई आदी उपस्थित होते.

 

            जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या काही घटनांबाबत समाजमाध्यमांद्वारे प्रसृत होणारे संदेश विश्वासार्ह नसतात. अनेकवेळा असे संदेश समाजकंटकांकडून द्वेष वाढविण्यासाठी प्रसारित केले जातात. त्यामुळे जागरूक राहून बंधुभाव कायम ठेवावा.

 

 त्या पुढे म्हणाल्या की, समाजात अनेक चांगल्या गोष्टीही घडत असतात. मात्र, समाजकंटकांकडून त्या कधीही पुढे आणल्या जात नाहीत. त्यामुळे आपण त्या चांगल्या गोष्टींचा प्रसार केला पाहिजे. लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेमाच्या भावना आहेत. अमरावती शहरातील काही अनुचित घटनांनंतर ग्रामीण भागात व इतर ठिकाणी लोकांनी व प्रशासनाने शांतता राखली हे प्रशंसनीय आहे. सर्व धर्मांच्या नागरिकांमध्ये सलोखा आहे. मुस्लीमांनी शिवमंदिर तर हिंदुनी मशिदीचे संरक्षण केल्याच्या घटना सर्वधर्म समभावाच्या संदेश देणाऱ्या आहेत. गावात कुठलीही अनुचित घटना होण्याआधी आपण प्रत्येकाने समाजापर्यत एकतेचा संदेश देत अनुचित बाबी  टाळाव्यात. कुणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  यावेळी जिल्हाधिका-यांनी धावत्या दौ-यातून परतवाडा -अचलपूर शहरातील विविध ठिकाणांना भेट दिली व विविध मान्यवरांशी संवाद साधला. 

 

00000

 

 

जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 





जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी

पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी       

                                                                                                   पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

               अमरावती, दि. 15 : येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

               आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत योजनांच्या आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता       सु.पा.आडे, उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.अं.सावंत, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            पालकमंत्री म्हणाल्या, पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येण्यासाठी  अपर वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणारे सिंचनाचे पूर्ण क्षेत्रफळ पाणी वापर संस्थाना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण करावी. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या गहू, कापूस, हरभरा इत्यादी पिकांकरिता मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. रब्बी हंगामाचे सिंचन सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निम्न पेढी प्रकल्प अंतर्गत प्राप्त निधी मधून कालवे, बंधारे निर्मितीची नियोजित  सर्व कामे  गतीने पूर्ण करण्यात यावी असे सांगितले.

 

0000000

 

 

 

पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 





पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा

सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 15 : अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून, लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंटस् अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, अतुल कळमकर, गौरीशंकर हेडा, मगनभाई बांठिया, राजेंद्र भन्साली, अनिल खरपे, बकुल कक्कड, ओमप्रकाश चांडक, संतोष बल्दुआ, संजय चोपडा, मोरंदमल बुधवाणी, आशुतोष वाडेकर, शरणपालसिंह अरोरा, सुरेंद्र पोपली, संजय कुकरेजा, पप्पू गगलाणी, मनोज खंडेलवाल, गोविंद सोमाणी, महेश पिंजाणी, सुरेश केवलरामाणी, अर्जुन चांदवाणी, रंजन महाजन, अशोक राठी आदी उपस्थित होते.

            यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानुसार सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत क्रमाक्रमाने  शिथीलता आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली की व्यापार क्षेत्रासह सर्वच घटकांचे नुकसान होते. गत दोन दिवसांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शांतता निर्माण झाली. जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व व्यवहार, सोयीसुविधा पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास दोन तासांची शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही इतर सेवाही पूर्ववत करण्यात येत आहेत. व्यापारी बांधव, विविध क्षेत्रांतील नागरिक यांच्या माहितीसाठी प्रशासनाकडून होणा-या निर्णयांची माहिती पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे प्रसारित केली जाईल.

00000

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...