ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू
ग्रामीण भागात कलम ३७ नुसार प्रतिबंधक आदेश लागू
अमरावती, दि. १६ : अमरावती शहरातील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश लागू करण्यात येत आहे. हा आदेश १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ डिसेंबरपर्यंत लागू राहील.
अप्पर जिल्हा दंडाधिकारी आशिष बिजवल यांनी हा आदेश जारी केला. त्यानुसार शस्त्र, तसेच तलवार, चाकू, लाठी व जिवित हानी होऊ शकणारे शस्त्र बाळगणे, विस्फोटके व तत्सम कच्च्या मालाची वाहतूक, दगड, विटा आदी क्षेपणास्त्राचा वापर करणे (गोळा करणे), जमाव एकत्रीकरण, पुतळ्याचे प्रदर्शन करण्यास, जाहीररीत्या ओरडणे, गाणे संगीत वाजवणे, बिभत्स चाळे करणे, अंगविक्षेप करणे, चित्रविचित्र हालचाली, तसेच कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे.
शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हा आदेश लागू होणार नाही. अंत्ययात्रेच्या व्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुकांसाठी पोलीस ठाणे अधिका-यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
०००
Comments
Post a Comment