Thursday, December 26, 2019

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अमरावती जिल्ह्याचा गौरव








रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर  
मनरेगांतर्गत रोजगारनिर्मितीची दखल
अमरावती, दि. 26 :  रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवून अचूक नियोजन व अंमलबजावणीमुळे गत वर्षात मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता आदी मुलभूत सुविधांची शेकडो कामे पूर्ण झाली. जिल्ह्याच्या या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.    
दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानातील उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने, तर अमरावती जिल्ह्याला मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.
            नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शैलेश नवाल, धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड आणि जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  माया वानखडे यांनी स्वीकारला. मनरेगाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जिल्ह्यात मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
            जिल्ह्यात स्थलांतर रोखणे व मुलभूत सुविधांची उभारणी डोळ्यासमोर ठेवून 2018-19 या वर्षात जिल्ह्यात 78.81 लक्ष मनुष्यदिन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. प्रत्यक्षात हे प्रमाण 84.84 लक्ष रोजगारनिर्मितीपर्यंत पोहोचून उद्दिष्टाच्या 108 टक्के पूर्ण झाले. 25 हजार 950 कुटुंबांना 100 दिवस रोजगार मिळाला.
            मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुके मध्यप्रदेश सीमेलगत असून, दरवर्षी दिवाळीनंतर स्थलांतराचे प्रमाण मोठे असते. या परिसरात कुपोषणाची समस्येचे निर्मूलन करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. तथापि, स्थलांतरामुळे तेथील नागरिक व बालके पोषण आहार योजनांचा सलग लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी मेळघाटावर अधिक फोकस ठेवण्यात आला. मेळघाटात उद्दिष्टाच्या 111. 92 टक्के रोजगारनिर्मिती झाली. मेळघाटात 41 हजार 174 , तर जिल्ह्यात 1 लाख 46 हजार 326 जॉबकार्ड वाटण्यात आले. या वर्षात स्वच्छतागृह निर्मितीसह ग्रामीण स्वच्छता उपक्रमात 721, दुष्काळ निवारणाची 1 हजार 12 व आवास योजनेत 1855 कामे पूर्ण झाली.
            कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत समन्वयक माया वानखडे म्हणाल्या की, ही कामे पूर्ण करताना वेळेत वेतनवितरण करण्यासह कंत्राटी तांत्रिक व अतांत्रिक मनुष्यबळाची सांगड घालण्याचे आव्हान होते. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षणातून सक्षम करण्यात आले. अंमलबजावणीच्या कामांत वैविध्य राखले. तांत्रिक सक्षमता निर्माण करून वेतन मिळण्यातला विलंब दूर केला. इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंटचा वापर केला गेला. आवश्यक संपर्कासाठी कुशल मनुष्यबळाधारे माहिती- शिक्षण-संवादाचे सूत्र वापरले. अधिका-यांनी आवश्यक तिथे वेळोवेळी फिल्ड व्हिजीट केल्या.  रोजगाराचे वेतनही गतीने वेळेत वितरीत करण्यात आले. प्रत्येक कामाच्या नोंदी घेऊन संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. रोजगारदिन कार्यक्रमात नरेगा कार्ड, आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र आदींचे वितरण, आरोग्य शिबिरे यांचे आयोजन करण्यात आले. योजनेतील कामांची तज्ज्ञांकडून वेळोवेळी गुणवत्ता तपासण्यात आली. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण केले गेले. या सर्वांचा एकसंध परिमाण होऊन उद्दिष्टाहून अधिक रोजगार निर्मिती साध्य झाली.
            रोजगारनिर्मितीतून मुलभूत सुविधांचे निर्माण झाले. जलसंधारणाची अनेक कामे झाली. विहिरी व विविध जलस्त्रोत, भूजलाची पातळी वाढून पेयजलाची उपलब्धता वाढली. वृक्षारोपण, रेशीम उद्योग अशी अनेक कामे झाली. कु-हा गावात फळझाडे लावण्याचे प्रयोग ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवून देणारा ठरला.   
पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. जिल्हाधिकारी श्री. नवाल, तत्कालीन मु. का. अधिकारी श्रीमती खत्री, श्रीमती वानखडे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी वर्गाचे  अभिनंदन होत आहे.
                                    00   

Wednesday, December 11, 2019

विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश




अमरावती, दि. 11 – जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे सर्वेक्षणात सुधारणेसह प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, पेयजल योजना आदी विविध योजनांची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विहित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश आज विविध आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले.  
            विधीमंडळ अधिवेशनात होणा-या जिल्हा बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, सुलभाताई खोडके, रवी राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी संजय पवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अतिवृष्टी परिस्थितीच्या प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा व्हाव्यात. अवकाळी, अवेळी व सतत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणताही भाग वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री. भुयार यांनी दिले.  कृषी अधिका-यांनी तालुका क्षेत्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश श्री. राणा यांनी दिले.  अमरावती जिल्ह्यात पुनर्वसनाची कोणती कामे शिल्लक आहेत, त्याची बैठक घेऊन आढावा घ्यावा, तसेच ती पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची माहिती सादर करावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. 
प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेत यंदाचे 24 हजार 581 घरांचे उद्दिष्ट असून, अद्याप 797 घरे पूर्ण आहेत. उद्दिष्ट पाहता ही कामे मिशनमोडवर पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 2012 च्या सर्वेक्षणानुसार 840 गावे हगणदारीमुक्त झाली, तथापि, यातून सुटलेले पाडे, वाड्यावस्‌त्या यांच्यासाठी यंदा अभियानात 30 हजार 960 उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी 18 कोटी 63 लाख निधीची आवश्यकता असून, त्याची मागणी करण्यात आली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
70 गावे पाणीपुरवठा योजनेत बांधकाम, पंपदुरुस्ती आदींसाठी 5.43 कोटी निधी मंजूर आहे. 22 गावांनी ठराव दिले आहेत. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. सर्व विभागांनी समन्वय ठेवून हे काम पूर्णत्वास न्यावे, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पोलीस गृहनिर्माण योजनेत नांदगावपेठ वसाहतीचाही समावेश व्हावा, अशीही सूचना त्यांनी केली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत 532 गावे समाविष्ट असून, 285 गावात ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापण्यात आल्या आहेत. योजनेत पंप, पाईप, बीजोत्पादन, पशुधन आदी विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेत 3 कोटी 14 लाख निधी वितरीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही वेळेत करण्याचे निर्देश श्रीमती खोडके यांनी दिले.
रब्बीतील हरभरा या महत्वाच्या पिकाच्या उत्पादनवाढीसाठी  ब्रॉड बेस फ्लोर ही पद्धती रुजविण्याचा प्रयत्न होत आहे. पारंपरिक पेरणीऐवजी दोन ओळींत काही अंतर राखून पेरणी केल्याने मशागत करणे सुलभ होऊन उत्पादनात वाढ होते. हरभरा पेरणीपूर्वी बुरशीनाशकात टाकून पाण्यात भिजवला व नंतर पेरणी केली की उगवण लवकर होते व कीड लागत नाही, अशी माहिती कृषी अधिका-यांनी दिली. याबाबत यशस्वी प्रयोगांची माहिती नागरिकांसमोर आणण्याचे निर्देश श्री. अडसड यांनी दिले. मेळघाटातील करंजखेड- हतनूर- रायपूर व इतर दोन रस्ते कोअर क्षेत्रातील असल्याने सेंट्रल एमपॉवरमेंट कमिटीची परवानगी लागते. ही परवानगी अद्याप प्राप्त नाही.  आदिवासी क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने ही कामे पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. पटेल यांनी दिले.
शेंडगाव या संत गाडगेबाबा यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १८ कोटी रूपये निधी मंजूर आहे. त्यापैकी ३ कोटी ७३ लक्ष अनुदान प्राप्त आहे. ही कामे तातडीने सुरू करावीत, असे निर्देश श्री. वानखडे यांनी दिले.
जलसंपदा विभागाकडून ४२ लघुप्रकल्पांचे काम सुरू असून, यंदा २३६ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे. त्या तुलनेत अद्यापपर्यंत पुरेशी कामे झाली नाहीत. या कामांना वेग द्यावा. आचारसंहिता व पावसाळ्यामुळे प्रलंबित जिल्हा मार्गांची कामे पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. पवार यांनी दिले. महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर, खांब उभारणी आदी कामे वेळेत व्हावीत. भारनियमनाची वेळाही नागरिकांसाठी अनुकुल असाव्यात. त्यादृष्टीने वेळेत आवश्यक बदलांसाठी पाठपुराव्याचे निर्देश देण्यात आले.
उपवनसंरक्षक शिवा बाला, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुलकर्णी, माया वानखडे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
                                    000 

Monday, December 2, 2019

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा दोन महिन्यात आठ हजार शिधापत्रिकांचे वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे


अमरावती, दि. 2 -जिल्ह्यातील शिधापत्रिका वाटपाचे काम गतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सेतुमार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गत दोन महिन्यात आठ हजारहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी आज येथे दिली.
            जिल्ह्यातील ग्राहकहिताच्या दृष्टीने राबवावयाच्या उपायांबाबत सविस्तर चर्चा आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य डॉ. अजय गाडे, पंकज मेश्राम, रा. ज. वावरे, अनिल माधोगढिया, मनोहर बारसे, मंगेश मनोहरे, रंजनाताई मामर्डे, अशोककुमार राठी, राजू बसवनाथे, छाया दंडाळे, एस. एम. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सहायक जि. पुरवठा अधिकारी समाधान सोळंके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, महावितरणचे उप कार्य अभियंता सुनील नाईक, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, करवसुली अधिकारी विजय गावंडे, पोलीस निरीक्षक आर. एस. टाले, पालिकेच्या पशुवैद्यक विभागाचे गुणसागर गवई, वैधमापन विभागाचे ध. कृ. राठोड आदी उपस्थित होते.  
शिधापत्रिका वाटप प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने  सेतु केंद्रात येणा-या अर्जांचा ऑनलाईन डेटा निर्माण होणार असून, त्यामुळे शिधापत्रिकांचे अचूक तपशील मिळायला मदत होणार आहे. वरूड, दर्यापूर तालुक्यात त्याचे कामही सुरू झाले आहे. अर्ज ऑनलाईन तपासताना त्रुटी आढळल्यास तत्काळ अर्ज सेतुकडे परत जाईल व सेतूकडून अर्जदारास कळवून पूर्तता केली जाईल. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, असे श्री. सोळंके यांनी यावेळी सांगितले.
            पुरवठा विभागाने केरोसिन वाटप थांबवल्याने गरीब नागरिकांना अडचणी येऊ शकतात, असे श्रीमती मामर्डे यांनी सांगितले. त्याबाबत श्री. टाकसाळे म्हणाले की, उज्ज्वला योजनेसह पं. दीनदयाळ उपाध्याय योजनेत मेळघाटसह सर्व जिल्ह्यात गॅस वाटपाचे अभियान राबविण्यात आले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून केरोसिन वाटप यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. गॅसवाटप योजनेत  केशरी पत्रिकाधारकासह सर्वांनाच लाभ मिळतो. कमी किमतीचे छोटे गॅस सिलेंडरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
                           रिक्षांची तपासणी होणे आवश्यक
तथापि, रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होते किंवा कसे, हे तपासणे आवश्यक असल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. श्री. मेश्राम म्हणाले की, शहरात सकाळी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिक्षांचा वापर होतो. रिक्षाचालकांकडून इंधनात भेसळ होत असल्यास प्रदुषण वाढते. या प्रदुषणाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रिक्षातील इंधनात भेसळ होते का, हे वाहतूक पोलीस व आरटीओ यांनी तपासावे. प्रदुषण नियंत्रण कार्यक्रमाबाबत जनजागृतीची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
                        मोकाट जनावरांबाबत कारवाई होणे आवश्यक
शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना उपद्रव होतो. याबाबत तक्रारी करूनही महापालिकेकडून उत्तर मिळत नाही, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.  फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्याचा त्रास नागरिकांना होतो. कंपोस्ट डेपोचे निकष काय आहेत, हे तपासले पाहिजे. त्याशिवाय, महापालिकेकडून वेळेत माहिती मिळावी, अशीही मागणी सदस्यांनी केली. ग्राहक पंचायतीच्या कार्यालयालगत कचरा टाकला जातो. त्याबाबत तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याची नाराजीही सदस्यांनी व्यक्त केली.
                                  महिला प्रसाधनगृहांबाबत माहिती द्यावी
शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत. याबाबत पालिकेकडून काय कार्यवाही झाली, अशी विचारणा श्री. मेश्राम यांनी केली. त्यावर अशी 28 प्रसाधनगृहे प्रस्तावित असून, 10 पूर्ण झाली आहेत, अशी माहिती आरोग्याधिका-यांनी दिली. या ठिकाणांची माहिती सादर करण्याचे निर्देश सदस्यांनी दिले.
                                    नायलॉन मांजावर निर्बंध
पुढील महिन्यातील मकरसंक्रांत व पतंगोत्सव लक्षात घेता पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यावर निर्बंध आहे. त्यामुळे जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे श्री. मेश्राम यांनी सांगितले.  जिल्ह्यात गतकाळात घडलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेचा तपास करून संशयितांना अटक केल्याबद्दल सायबर पोलीसांचे अभिनंदन समितीच्या सदस्यांनी केले.
                                    फूटपाथवर राहणा-यांसाठी शेल्टर
रस्त्याच्या कडेला झोपणारे, फुटपाथवर राहणा-या नागरिकांच्या निवा-यासाठी बडनेरा रेल्वेस्थानकावर शेल्टर सुरू आहे. कुणाच्याही निदर्शनास अशा व्यक्ती आल्यास त्यांना शेल्टरबाबत माहिती द्यावी. या निवारा केंद्रामार्फत संबंधित नागरिकाच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते, असे आवाहन श्री. बसवनाथे यांनी बैठकीत केले.

Saturday, November 30, 2019

आरटीओ कार्यालयाच्या ‘महावॉकेथॉन’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग





अमरावती, दि. 30 – वाहतूक सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीतर्फे आज शहरात आयोजित महावॉकेथॉन मध्ये अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कॅम्पमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. कर वसुली विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सहभागींकडून फलकावर रस्ता सुरक्षेबाबत विविध संदेश प्रदर्शित करण्यात आले.  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गर्ल्स हायस्कूल चौक व पुन्हा परिवहन कार्यालयाकडे असा वॉकेथॉनचा मार्ग होता.   
राष्ट्रीय सेवा योजना, ड्रायव्हिंग स्कूलचे कर्मचारी, परिवहन अधिकारी व कर्मचा-यांसह नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  

Friday, November 29, 2019

अचलपूरमध्ये महिला चावडी मेळाव्याला मोठा प्रतिसाद महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल







अचलपूर, दि. २९ : कुटुंबात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांमध्ये सामाजिक, आर्थिक व्यवहारातही अग्रेसर राहण्याचे सामर्थ्य आहे. आपली ही ताकद  ओळखून महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन धोरणांतर्गत 'स्टेट बँक ऑफ इंडिया'तर्फे महिलांसाठी चावडी मेळावा अचलपूर येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे उपमहाव्यवस्थापक रतन बॅनर्जी, क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश शिवप्रिय, तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे विभागीय सल्लागार एच. एम. चौबे, जिल्हा प्रबंधक सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, स्त्री ही कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या लीलया पार पाडते. तिने आपले सामर्थ्य ओळखून व्यवसायात पाऊल ठेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे.जिल्ह्यात बचत गटांकडून चांगले काम होत आहे. ते अधिक विस्तारले पाहिजे. बँकेने कर्जवाटपाचे प्रमाण वाढवावे.
विविध सामाजिक लाभाच्या योजनांतून ग्रामीण महिलांमधील बँकिंगचे प्रमाण वाढून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाने आर्थिक समावेशन धोरण लागू केले आहे. त्यानुसार 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने देशातील २०० जिल्ह्यांची निवड केली असून अमरावती जिल्ह्याचा त्यात समावेश आहे, असे श्री. बॅनर्जी यांनी सांगितले.
बचत गटांच्या सदस्यांना  कर्जवाटपाचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले. विविध बँका व लघुउद्योग, व्यवसाय, बचत गट यांच्या सुमारे ५० दालनांचा मेळाव्यात समावेश होता. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो महिलांची उपस्थिती होती.
00000

गावागावांत पांदणरस्त्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पांदणरस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात गती

*अचलपूर तालुक्यात कामांची पाहणी
अमरावती, दि . 29 – जिल्ह्यात गावोगाव चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. गावकरी बांधवांनीही गावासाठी चांगले पांदणरस्ते निर्मिण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर पूर्णा येथे केले.
          जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर, कुष्ठा आदी गावांतील कामांची पाहणी केली व गावक-यांशी संवाद साधला. सावळापूरच्या सरपंच वैशालीताई सगणे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
सावळापूर या गावानजिक पांदणवाटेत पाणी असल्याने शेतात जाणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे येथे गावाच्या सहभागातून अडीच किलोमीटरचा पांदणरस्ता तयार होत आहे. या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे, मालवाहतूक आदी कामे सुलभ होतील, असे समाधान गावक-यांनी यावेळी व्यक्त केले.
पांदणरस्त्याचे काम दर्जेदार करावे. आवश्यक तिथे भराव घालावेत. जिथे नदीचे खोलीकरण करणे शक्य आहे, तिथे ते करून तिथला गाळा, इतर राडारोडा भरावासाठी वापरता येतो का, ते पहावे. उपविभागीय अधिका-यांनी या कामात काही अडचणी आल्यास त्या तत्काळ सोडवून काम पूर्णत्वास जाण्यासाठी मदत करावी. मोठी झाडे तोडू नयेत, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी मोर्शी तालुक्यातील गावांचीही नुकतीच पाहणी केली.
                             000

Thursday, November 28, 2019

उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेची स्थापना अभियानात प्राध्यापक-विद्यार्थ्यांना लोकजीवनात मिसळण्याची संधी - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर



·       राज्यपालांच्या हस्ते 20 डिसेंबरला शुभारंभ
        अमरावती, दि. 28 – ग्रामीण लोकजीवनात मिसळण्याची, तेथील समस्या जाणून घेण्याची व त्यावर उपाय सुचविण्याची संधी उन्नत भारत अभियानाद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळाली आहे.  या अभियानातील समन्वय संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत होणार असून, तो यशस्वी होण्यासाठी नियुक्त सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे,  असे निर्देश विभागीय समन्वय संस्थेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज येथे दिले.
        उन्नत भारत अभियानात विभागीय समन्वय संस्थेचे उद्घाटन व मार्गदर्शिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि. 20 डिसेंबरला दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित बैठकीत कुलगुरू डॉ. चांदेकर बोलत होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे, डॉ. हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. डी. टी. इंगोले, डॉ. प्रणव कोलते, विभागीय सहसमन्वयक प्रा. के. सी. मोरे, डॉ. पी. बी. शिंगवेकर यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
        डॉ. चांदेकर म्हणाले की,  समन्वय संस्थेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्यपाल महोदयांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या दृष्टीने समन्वय समिती, स्वागत व व्यवस्था, प्रसिद्धी व तांत्रिक समित्यांचे गठण करण्यात आले आहे.  शासनाच्या विविध विभागांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे. सर्वांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
                        ०००

जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
                







·       राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच  
अमरावती, दि. 28 – जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती, साहस, चिकाटी व उमदेपण या गुणांची गरज असते. खेळांतून हे गुण विकसित होतात. त्यामुळे सर्वांनीच खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज श्री. नवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देवनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ. नितीन चव्हाळे उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतून 16 संघाचे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातून निवड झालेल्या संघांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळणार असून, राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच मिळाला आहे. ही स्पर्धा जानेवारीत होईल.
खेळाडूंना खेळताना प्रतिस्पर्ध्यांचा खेळ पाहून तातडीने निर्णय घेणे व वेगवान हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे खेळणा-या मुलांमध्ये शारीरिक बळाबरोबर निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता विकासही होतो, असे श्रीमती देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथसंचलन व मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले. निवड समितीचे सदस्य प्रशांत पवार, गुरुदत्त चव्हाण, योगेश शिर्के, प्रा. विलास दलाल, संजय कथलकर, भास्कर घटाळे, अनिल बोरवार, संतोष विघ्ने, उमेश बडवे, संदेश गिरी, नितीन चवाळे, महेश अलोणे आदी उपस्थित होते.
                            000

Wednesday, November 27, 2019

पणन महासंघाने विविध प्रयोगांसाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पहिल्या दिवशी 216. 55क्विंटल खरेदी
                शासकीय कापूस खरेदीचा जिल्ह्यात शुभारंभ
              






अमरावती, दि. 27 - पणन महासंघाने कापूस खरेदीच्या कामाप्रमाणेच शेतकरी बांधवांसाठी इतरही उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. कापूस वेचणी यंत्र आदी साहित्य पुरविण्यासारखे वेगवेगळे प्रयोग करता येणे शक्य आहे. अशा कामांसाठी जिल्हा प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
 राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामासाठी शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. वलगाव येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे हा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, संचालक उषाताई शिंदे, प्रसेनजीत पाटील, सुरेशराव देशमुख,सुरेश चिंचोळकर, शिरीष धोत्रे, नामदेवराव केशवे, ययाती नाईक, भरत चामले, नरेंद्र ठाकरे, शिवाजीराव दसपुते  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  खरेदीच्या पहिल्याच दिवशी 216.55 क्विंटल खरेदी झाली आहे.
          श्री. नवाल म्हणाले की,  पणन महासंघ कापूस हमीभावाने खरेदी करत आहे. आता महासंघाने शेतक-यांच्या लाभासाठी शक्य ते सर्व प्रयोग करावेत. शेतक-यांचे सातबारा ऑनलाईन करण्यात आले आहेत.  तथापि, त्यावर पीकांची नोंद बरोबर आहे किंवा कसे, हे तपासून घ्यावे. तांत्रिक चूक राहू नये जेणेकरून विमा व इतर योजनांचा लाभ घेताना काहीही अडचण येणार नाही.  ग्रामीण परिसरासाठी पांदणरस्त्यांची योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
  यावेळी महासंघाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
                                       000

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी






अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000

Tuesday, November 19, 2019

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





        अमरावतीदि. : 19-  माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.  

राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची   शपथ घेण्यात आली.
00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...