उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेची स्थापना अभियानात प्राध्यापक-विद्यार्थ्यांना लोकजीवनात मिसळण्याची संधी - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर
· राज्यपालांच्या हस्ते 20 डिसेंबरला शुभारंभ
अमरावती, दि. 28 – ग्रामीण लोकजीवनात मिसळण्याची, तेथील समस्या जाणून घेण्याची व त्यावर उपाय सुचविण्याची संधी उन्नत भारत अभियानाद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या अभियानातील समन्वय संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत होणार असून, तो यशस्वी होण्यासाठी नियुक्त सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय समन्वय संस्थेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज येथे दिले.
उन्नत भारत अभियानात विभागीय समन्वय संस्थेचे उद्घाटन व मार्गदर्शिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि. 20 डिसेंबरला दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित बैठकीत कुलगुरू डॉ. चांदेकर बोलत होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे, डॉ. हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. डी. टी. इंगोले, डॉ. प्रणव कोलते, विभागीय सहसमन्वयक प्रा. के. सी. मोरे, डॉ. पी. बी. शिंगवेकर यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
डॉ. चांदेकर म्हणाले की, समन्वय संस्थेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला राज्यपाल महोदयांसह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या दृष्टीने समन्वय समिती, स्वागत व व्यवस्था, प्रसिद्धी व तांत्रिक समित्यांचे गठण करण्यात आले आहे. शासनाच्या विविध विभागांचाही सहभाग या कार्यक्रमात आहे. सर्वांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.
०००
Comments
Post a Comment