गावागावांत पांदणरस्त्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
पांदणरस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात गती
*अचलपूर तालुक्यात कामांची पाहणी
अमरावती, दि . 29 – जिल्ह्यात गावोगाव चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. गावकरी बांधवांनीही गावासाठी चांगले पांदणरस्ते निर्मिण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर पूर्णा येथे केले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर, कुष्ठा आदी गावांतील कामांची पाहणी केली व गावक-यांशी संवाद साधला. सावळापूरच्या सरपंच वैशालीताई सगणे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.
सावळापूर या गावानजिक पांदणवाटेत पाणी असल्याने शेतात जाणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे येथे गावाच्या सहभागातून अडीच किलोमीटरचा पांदणरस्ता तयार होत आहे. या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे, मालवाहतूक आदी कामे सुलभ होतील, असे समाधान गावक-यांनी यावेळी व्यक्त केले.
पांदणरस्त्याचे काम दर्जेदार करावे. आवश्यक तिथे भराव घालावेत. जिथे नदीचे खोलीकरण करणे शक्य आहे, तिथे ते करून तिथला गाळा, इतर राडारोडा भरावासाठी वापरता येतो का, ते पहावे. उपविभागीय अधिका-यांनी या कामात काही अडचणी आल्यास त्या तत्काळ सोडवून काम पूर्णत्वास जाण्यासाठी मदत करावी. मोठी झाडे तोडू नयेत, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी मोर्शी तालुक्यातील गावांचीही नुकतीच पाहणी केली.
000
Comments
Post a Comment