जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 16: स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार, परिश्रम, शिस्त व चिकाटी यांची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षांत जिल्ह्याचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे नियमित मार्गदर्शनासह सर्व सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने करिअर मार्गदर्शन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ आज येथील नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी आयएएस अधिकारी वर्षा मीना यांचे विशेष व्याख्यान यावेळी झाले. स्पर्धेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल राजेश पाटील, उपक्रमाचे समन्वयक अंशुल चवरे, नेहा पाटील आदी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिन्याच्या तिस-या शनिवारी तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शन, संवाद व शंकानिरसन करण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास कार्यक्रम महिन्यातूनही दोनवेळा घेता येईल. विद्यार्थ्यांकडून होणारे प्रयत्न अचूक व योग्य दिशेने व्हावेत, यासाठी मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. याच उपक्रमात गावोगाव अभ्यासिका निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे. कुठल्याही परीक्षेची तयारी वाया जात नसते. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात उभे राहायला मदत होते.
सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समजावून घेऊन एकसंध नोटस् निर्माण करणे व त्या नोटस् मध्ये महत्वाच्या पुस्तकातील माहितीची भर घालणे आवश्यक असते. या नोटस् ची वारंवार उजळणी करावी. भाराभार साहित्य वाचू नये. एनसीईआरटीची पुस्तके वाचावीत. त्याची मांडणी चांगली असते. प्रत्येक परीक्षेचे काही टप्पे असतात. मात्र, विद्यार्थ्याने ही सगळी प्रक्रिया एकसंधपणे पाहून त्यानुसार तयारी ठेवली पाहिजे. पुढील परीक्षांचेही अभ्यास व नियोजन त्याने केलेले असावे. यावेळी श्री. मीना यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
श्री. चवरे, श्रीमती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
00000
Comments
Post a Comment