जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा
अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी आज रोजगार मेळावा पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी अनुकंपा नियुक्ती ही शासनाची सहानुभूतीपूर्ण प्रक्रिया आहे. पात्र उमेदवारांना याचा निश्चितच लाभ मिळेल. अनुकंपा हा प्राधान्याचा असून हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावे, अशा सूचना केल्या.
अनुकंपाधारकांच्या अडचणी जाणून शासन निर्णय काढला आहे. संपूर्ण राज्यामध्ये १५ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अनुकंपाधारक व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक असलेल्या पदाचे ऑप्शन विचारपूर्वक द्यावे. रिक्त पदानुसार ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांना १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मेळाव्यामध्ये गट-क सामाईक प्रतीक्षा यादीतील एकूण १५० उमेदवारांपैकी ११६ उमेदवार उपस्थित होते. या उमेदवारांकडून शासकीय सेवेत नियुक्तीसाठी पसंतीक्रम भरून घेण्यात आला.
विविध विभागांतील रिक्त असलेल्या एकूण ४५ पदांवर नियुक्ती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला.
अंतिम शिफारसपत्र प्राप्त उमेदवारांना संबंधित विभागांमार्फत एकत्रितपणे नियुक्तीपत्र देण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजन भवन येथे मेळावा घेण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध विभागांतील अधिकारी, उमेदवार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल
अमरावती, दि. ४ : अमरावती शहरात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.
ट्रान्सपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांसाठी वाहतूक एका बाजूने (वन-वे) सुरू राहील.
चित्रा चौक ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौकमार्गे वळविण्यात येतील.
हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक महाजनपुरा मार्गे वळवण्यात येईल.
जवाहर गेट ते टांगा पडाव: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक सराफा-गांधी चौक-जयस्तंभ मार्गे वळवण्यात येईल.
लालखडी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद असून इतर हलक्या वाहनांची वाहतूक लालखडी रिंग रोड मार्गे वळवण्यात येतील.
या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
मराठी भाषा विद्यापीठाचा आप पहिला वर्धापन दिन
अमरावती, दि. ४ : रिद्धपूर येथे स्थापन केलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिन शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर भूषवणार आहेत.
यावेळी आचार्य श्री. करंजेकर बाबा, डॉ. गिरीश गांधी, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, अमर काळे आणि आमदार चंदू यावलकर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात विद्यापीठातर्फे देण्यात येणारे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि व्याकरणकार प्रा. यास्मीन शेख यांना पहिला 'मराठी भाषा गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोक आणि ज्योती काकडे यांना 'समाजभूषण गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment