Tuesday, February 19, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांना अभिवादन



अमरावती, दि. 19 :  छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, विधी बोहरा नरेंद्र बोहरा यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचा-यांनीही छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

शासनाकडून करणार संकुलाची देखभाल विभागीय क्रीडा संकुलात सरावापोटी 100 रुपये शुल्क आकारू नये - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निर्देश


अमरावती, दि. 19 - विभागीय क्रीडा संकुलात सकाळी फिरायला येणा-या, सराव करणा-या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रूपये वसूल करण्याचा निर्णय रद्द करावा व शासनाकडूनच संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. या निर्णय अनेक क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्याशी चर्चा करून हे निर्देश दिले. विभागीय क्रीडा संकुलात सरावासाठी येणा-या खेळाडूंसह फिरण्यासाठी येणा-यांकडून विभागीय क्रीडा संकुल समितीकडून 100 रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली. संकुलाच्या रनिंग ट्रॅक आदींच्या देखभालीपोटी असे शुल्क आकारण्याचा निर्णय संकुल समितीने घेतला होता. मात्र, काही संस्था- संघटनांच्या मागणी लक्षात घेऊन असे कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये आणि शासनाकडूनच या संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिले.
विभागीय क्रीडा संकुल मोठे मैदान, रनिंग ट्रॅक व मध्यवर्ती ठिकाण म्हणून अनेक क्रीडाप्रेमी व नागरिकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांकडून या मैदानाचा सराव, जॉगिंग आदींसाठी वापर होतो. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासन  विविध प्रोत्साहनात्मक योजना व उपक्रम राबवत आहे. त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन देखभालीपोटी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय रद्द करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 
00000

पालकमंत्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती, जयंत डेहणकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श प्रशासक, कुशल योद्धा व महान राजा होते. त्यांचे जीवनकार्य प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000

Monday, February 18, 2019

जिल्हा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद विविध योजनांतून मोठी स्वयंरोजगारनिर्मिती - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील








·         मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
·         विविध विभागांचे तीसहून अधिक कक्ष
·         यशस्वितांचा गौरव
·         यशोमुद्राचे प्रकाशन
अमरावती, दि.  18 : देशाची ओळख जगातील संपन्न व स्वयंपूर्ण देश म्हणून व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केंद्र व राज्य शासनाच्या मुद्रा, स्टार्टअप अशा अनेकविध योजनांतून स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे. विकासाचा हा प्रवाह आणखी गतीने पुढे नेण्यासाठी स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून सर्वदूर करण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व मुद्रा लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन येथील नेहरू मैदानावर करण्यात आले. त्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री. पोटे पाटील बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी डॉ. शैलेश नवाल, मनपा स्थायी समिती सभापती विवेक कलोती, जयंतराव डेहणकर, राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी, किरण पातुरकर, जिल्हा सदस्य शरद बंड, सोपान गुडधे, गिरीश शेरेकर, हरीश साऊरकर, विलास राठोड, बादल कुलकर्णी, आशिष राठोड, सुनील चरडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, डॉ. क्रांती काटोले, जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते.
            प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री श्री . पोटे पाटील म्हणाले की, कर्जवितरणाबाबत बँकांनी अधिक सक्रिय व्हावे व छोट्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी  जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रभावीपणे व सकारात्मकपणे कार्यवाही देण्याचे दिले आहेत.   जिल्ह्यात 50 हजारहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळून, अनेक छोटे छोटे व्यवसाय निर्माण होत आहेत. या लोकांवर अवलंबून असणा-या दोन लाख उपजिविकेचे साधन मिळाले आहे. या छोट्या छोट्या व्यवसायांची एक साखळी बनून त्यातून आणखी काही पूरक व्यवसायांना चालना मिळत आहे. केवळ कर्जवितरणाचा उद्देश न ठेवता त्यातून स्वयंरोजगार विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे ध्येयही शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे.
            अलीकडच्या काळात सुरु झालेल्या अद्ययावत सेवा व तंत्रज्ञानाने बाजारपेठेत नव्या व्यवसायांच्या गरजा निर्माण केल्या आहेत. त्या शोधून तशा स्वयंरोजगाराला चालना देणे आणि नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.  पालकमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित लघुव्यावसायिकांशी संवाद साधला. प्रत्येक लघुव्यावसायिकाच्या उत्पादन व सेवेबद्दल जाणून घेत त्यांनी वाखाणणीही त्यांनी केली. नवे तंत्रज्ञान व मार्केटिंगबाबत त्यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शनही केले.
श्री. अडसूळ म्हणाले की, उद्योगांच्या निर्मितीसह पूरक व छोट्या अनेक व्यवसायांना चालना देऊन अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. वंचित घटकाला प्राधान्य देऊन मुद्रासारख्या योजनेतून विनातारण कर्जाची सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ लक्षावधी कुटुंबांना झाला आहे.   
श्री. सूर्यवंशी म्हणाले की, निराशा कधी मनात येऊ देऊ नका. सकारात्मक राहिल्याने सगळ्या संकटांवर मात करता येते. अनेक अडचणींवर मात करून पुढे आलेल्या नागरिकांनी मुद्राच्या सहकार्याने यशस्वी व्यवसाय उभारले. त्यांच्या यशोगाथा प्रेरणादायी आहेत, असे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. मुद्रा बँक योजनेत देशात 5  लाख 71 हजार कोटी रूपयांचे कर्जवाटप झाले आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण योजना असून, नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मकपणे अंमलबजावणीला गती मिळाली पाहिजे, असे श्री. पातुरकर म्हणाले.
                                                यशोमुद्राचे प्रकाशन
मुद्रा योजनेचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या राज्यातील, तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. एक हात गमावल्यानंतरही जिद्दीने मूर्तिकला साकारून यशस्वी व्यवसाय करणा-या अचलपूरच्या उमेश बडोदेंसह स्वप्नील भागवत, प्रफुल भुयार, गजानन मते, सोनु कचवाह, मोहन वसंतराव वानखडे, अजय गिरासे, आशिष गटारी, मनोज वाठ, मुकेश मंडपे, कविता नानीर, अनिकेत विनोद नवघरे, धिरज पानेकर, राजा संगेले, भिमराव गुलाबराव डोळस, भारत प्रमोद डहाके, अमोल वानखडे, विद्या रविंद्र सोमाशे, दिपक मलवार, आशिष रामदास गभणे, मनोहर महादेव भुजाडे, सचिन पुंडलीकराव ढोक, अभिजीत किशोरराव मालखेडे, निखिल फंदे, अकबर शेख, आसियाबानो मो. इरफान, परवेज अहमद गुलाम नबी, रेखाताई बोडखे, रक्षाताई ठाकूर,अनिरुद्ध ढवळे, उमेश राणे, बंडू पारणुजी खडसे, गजानन ठाकरे, निलेश दत्तुराव गुल्हाने, प्रदीप रंगराव सोनोने, कृष्णा भिमराव पिढेकर, सुरेश महादेव राऊत आदींचा गौरव यावेळी करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय, औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था, स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियान, विविध बचत गट यांनी सहभाग घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. अग्रणी बँकेचे श्री. देशमुख यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. येते यांनी आभार मानले.
                                     मेळाव्याला मोठा प्रतिसाद
नेहरू मैदानावरील विस्तीर्ण मंडपात झालेल्या या मेळाव्यात विविध विभागांचे 30 हून अधिक कक्ष सहभागी होते. आयटीआय, अभियांत्रिकी व इतर विविध शाखांचे विद्यार्थी, तसेच अनेक होतकरू तरूण, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात स्वयंरोजगार मार्गदर्शन व कलापथक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सायंकाळपर्यंत सुमारे 10 हजार नागरिकांनी मेळाव्याला हजेरी लावून विविध व्यवसायांविषयी जाणून घेतले. महिला बचत गटांच्या कक्षांमधून विविध पदार्थ, उपयुक्त वस्तूंची मोठी विक्री झाली.

Monday, February 11, 2019

टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



            अमरावती, दि. 11 :  जिल्ह्यातील टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा व अपेक्षित उपाययोजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिले आहेत.
पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून 1 हजार 108 उपाययोजना प्रस्तावित असून, सुमारे 24 कोटी 49 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावांत तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेस, तर लेहगाव व दाढीपेढी येथे पूरक नळ योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून 10 विंधनविहिरी व नऊ कुपनलिकांची कामे होत आहे. ही कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
 टंचाई निवारणाच्या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या नियंत्रणात अधिक्षक राम लंके, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. कोपुलवार, अव्वल कारकून व्ही. आर. उगले, अभिजित पुराणिक, एच. बी. खरवडकर आदींचा कक्ष समितीत समावेश आहे.
00000

Friday, February 8, 2019

अमरावती- अकोला जिल्ह्यात कर्करुग्णांचे चिंताजनक प्रमाण गुटखा विक्रीविरुद्ध धडक मोहिम राबवा - आमदार डॉ. सुनील देशमुख





अमरावती, दि. 8 : अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांतून कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल असून, गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीए यांनी धडक मोहिम राबवावी, असे निर्देश आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज येथे दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अति. पो. अधिक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस. डी. केदारे, बी. के. चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यात घस्याचा व अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश असून, अवैध गुटखा व ओला खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच कारण आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या जाळ्यात असून, एक पिढी या व्यसनातून बरबाद होत आहे. त्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध विभागांचे सहकार्य मिळवत धडक मोहिम राबवावी.
   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गुटखा विक्रेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम 328 नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याचा काहीसा धाक निर्माण झाल्याचे श्री. केदारे म्हणाले. त्याबाबत डॉ. देशमुख म्हणाले की, गुटखाबंदीच्या कारवाईत केवळ गोदाम रखवालदारांना पकडून उपयोग नाही. गुटखा रॅकेट कोण चालवते, ते तपासून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. धाड टाकल्यावर आरोपीला सुटण्याची संधी मिळता कामा नये. गुन्हे दाखल झाल्यावर गुन्हे सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढले पाहिजे.


डुप्लिकेट गुटख्याच्या निर्मितीला प्रतिबंध घाला
शहरात डुप्लिकेट गुटख्याची निर्मिती होत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सडक्या सुपारीला केमिकल लावून असा गुटखा इंदूरहून पाऊच मागवून पॅक होतो. त्यासाठीचे मशिन एक ते दीड लाख रुपयांत मिळत असल्याने अनेक ठिकाणी तो तयार होतो व सर्रास विकला जातो, अशी तक्रार आहे.  हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. तो वेळीच रोखला पाहिजे, असे डॉ. देशमुख म्हणाले.
जिल्ह्यात 16 तंबाखू नियंत्रण कक्ष असून, गत वर्षात 17 हजार 348 तंबाखू खाणा-या नागरिकांनी कक्षाला भेट दिली.  त्यातील 1 हजार 632 नागरिकांनी तंबाखूचे व्यसन सोडले, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. त्याबाबत डॉ. देशमुख म्हणाले की, व्यसनमुक्तीसाठीच्या उपक्रमांचे यशापयश तपासण्यासाठी वर्षनिहाय तपशीलवार आकडेवारी, व्यसनमुक्त व्यक्तींच्या याद्या आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे.
                    हा अत्यंत गंभीर प्रकार असून, येत्या 15 दिवसांत धडक मोहिमेतून गुटखा निर्मिती व विक्रीच्या प्रकाराला आळा घालावा, असे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी एफडीए व पोलीस विभागाला जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
          गुटखाविक्री व निर्मितीचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी कारवाई करताना शासकीय अधिकारी- कर्मचा-यांना पंच करावे, असे श्री. बाविस्कर म्हणाले.
00000

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार गती आमला, नागरवाडीसाठी सुमारे 25 कोटी रु. निधीच्या विकास आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील




अमरावती, दि. 8 : ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यात श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर)साठी 6.79 कोटी  नागरवाडी (ता. चांदूरबाजार) साठी 18 कोटी रुपये रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळणार आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले.
ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुंबईत वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अमरावतीचे पालकमंत्री श्री. पोटे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार बच्चू कडू, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण 6 कोटी 79 लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोच रस्ता, वाहनतळ, स्वयंपाक घर, सभागृह, नदीकाठी संरक्षण भिंत,प्रवासी निवारा, परिसराचे सौंदर्यीकरण याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींच्या कामाचा समावेश आहे. तर नागरवाडी येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 18 कोटीच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली असून या प्रस्तावात काही बदल करून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पुन्हा पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार तत्काळ कार्यवाही केली जाईल.
             संत महात्म्यांच्या वास्तव्याने पावन झालेली तीर्थक्षेत्रे ही महाराष्ट्राची ओळख व्हावीत, यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्राचा परिसर हा स्वच्छ, सुंदर व आकर्षक असावा, यासाठीची कामे विकास आराखड्यातून करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कचरा दिसू नये, सांडपाण्याची सोग्य व्यवस्था व्हावीयासाठी विशेष दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
यावेळी नरसी नामदेव, गणपतीपुळे आदी तीर्थक्षेत्रांबाबतही चर्चा झाली. यावेळी अमरावती व हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून प्रस्तावाची माहिती दिली.

Monday, February 4, 2019

समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा ‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी
-          पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती, दि. 4 :  समृद्धी महामार्ग हा राज्याच्या संपर्कयंत्रणा व विकासासाठी महत्वपूर्ण असून, त्याच्या कामाला गती देऊन हे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजयकुमार निपाणे, उपायुक्त प्रमोद देशमुख यांच्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी सुमारे 73 कि. मी. आहे. रस्त्याची रुंदी 120 मीटर असेल. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील 46 गावांतून हा रस्ता जाईल. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावापासून सुरुवात होऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथपर्यंत जिल्ह्यातील रस्ता आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 91 टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे.
            श्री. पोटे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गाबाबत प्रलंबित परवानग्यांबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी जेणेकरून कामाला गती मिळेल. खनिज उत्खननाची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.  उत्खनन केलेले खनिज वाहून नेताना धूळ आदींमुळे पीकाचे नुकसान होत असल्याच्या गावांतील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर ठोस उपाय अवलंबावा व काम तत्काळ पूर्ण करावे. आवश्यक तिथे छोटे रस्ते करावेत. शेतक-याच्या जमिनी अधिग्रहित करताना तत्काळ मोबदला मिळवून द्यावा.
विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा
विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या कामांचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी कामांची माहिती दिली. युथ होस्टेल, संकुलांतर्गत रस्ते आदी कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
00000

अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची - पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर


अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची
-         पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर
अमरावती, दि. 4 : अपघातामुळे केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे वाहन चालविताना व्यक्तीने सजग व सतर्क असणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले.
परिवहन विभागातर्फे 30 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पोलीस अधिक्षक दिलीप झळके, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते, सार्वजनिक बांधकाम अभियंता विभावरी वैद्य आदी उपस्थित होते.
श्री. बाविस्कर म्हणाले की, तरुण पिढीने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पोलीसांना वाहतूक नियमांसाठी सहकार्य केले पाहिजे. वाहतूक नियम मोडल्यास एखाद्या व्यक्तीवर पोलीसाने कारवाई केली तर त्यालाच रोषाला बळी पडावे लागते. तसे घडू नये. अपघातविरहित सेवा देणा-या वाहनचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले. श्वेता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन काम करावे
मुद्रा बँक कर्ज वितरणाबाबत 3 दिवसांत तपशील सादर करा
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे बँकांना निर्देश

अमरावती, दि. 4 :  मुद्रा बँक योजनेत कर्ज वितरणाबाबत केवळ आकडेवारी न सांगता कर्जदाराची नावे, व्यवसाय आदी सविस्तर तपशील याद्यांसह येत्या 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रभावीपणे व लोकाभिमुख काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  मुद्रा बँक समन्वय समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह राज्यस्तरीय समितीचे सदस्य किरण पातुरकर, निवेदिता चौधरी दिधडे, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य विनोद कलंत्री, गिरीश शेरेकर, बादल कुलकर्णी, हरिष साऊरकर, विलास राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, एमसीईडीचे सदानंद डबीर, जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
योजनेत जिल्ह्यात 57 हजार 353 व्यक्तींना 227 कोटींचे कर्जवितरण झाले, अशी माहिती अग्रणी बँकेचे श्री. देशमुख यांनी दिली. त्याबाबत श्री. पोटे पाटील म्हणाले की, या योजनेत कोणत्या व्यवसायासाठी कर्जवितरण करण्यात आले, याबाबत बँकनिहाय व शाखानिहाय आकडेवारी जिल्हा अग्रणी बँकेने सादर करावी. उद्योग विभाग, ग्रामोद्योग आदी विविध व्यवसायांकडून प्रस्ताव जातात; पण बँकांकडून कार्यवाही होत नाही, असेही निदर्शनास आले आहे. छोट्या व्यवसायांच्या वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन मुद्रांतर्गत कर्जवितरण वाढले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, विद्यमान काळात उपलब्ध तंत्रज्ञान, यंत्रे मिळवून अनेक छोटे छोटे व्यवसाय निर्माण करता येणे शक्य आहे. शासनाकडून अशा गोष्टींसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे.  त्यांना अशा व्यवसायाबाबत मार्गदर्शन मिळून ही त्यासाठी मुद्रा बँक योजनेतून लाभ देता येता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासंबंधी आयोजित मेळाव्यातून प्रेरणादायी यशोगाथा व व्यवसायाबाबत माहिती- मार्गदर्शनाचाही समावेश असावा.  रेशीम विकास, मोबाईल रिपेरिंग, मधनिर्मिती, हातकागद निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती, हस्तकला अशा अनेक व्यवसायांबाबत मार्गदर्शन व्हावे जेणेकरुन योजनेची परिणामकारता वाढेल.  
बँकेत कर्ज मागण्यासाठी येणा-या व्यक्तींना संपूर्ण माहिती दिली पाहिजे. बँकेत फॉर्म उपलब्ध नाहीत , अशी माहिती देऊन परत पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसे घडता कामा नये. याबाबत नागरिकांना संपूर्ण सहकार्य करावे, असे श्रीमती दिधडे यांनी सांगितले. बँकांनी नागरिकांना योजनेबाबत परिपूर्ण माहिती देऊन कर्ज वितरणाबाबत सकारात्मक दृष्टीने काम करावे, असे श्री. पातुरकर म्हणाले.

Saturday, February 2, 2019

वरूडमध्ये 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - आमदार डॉ. अनिल बोंडे


अमरावती, दि. 2 :  कृषी विभाग व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषद दि. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्याद्वारे कृषी प्रदर्शनासह कृषी संस्कृती दर्शन व नवतंत्रज्ञानाविषयी माहिती, मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
          परिषदेचे उद्घाटन दि. 8 रोजी दुपारी 1 वाजता होईल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार रामदास तडस, अभिनेते मकरंद अनासपुरे व भारत गणेशपुरे उपस्थित राहतील. यादिवशी सायंकाळी 6 वाजता रामपाल महाराज यांचा ग्राम कृषी सप्तखंजिरी प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
  परिषदेत कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते दि. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाराजस्व अभियानाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी उपस्थित राहतील. शासकीय योजनांच्या लाभार्थींचा सन्मान सोहळाही यावेळी होईल. यादिवशी सकाळी 11 वाजता शैलेष मधने यांचा चारा, मुक्त संचार गोठा या विषयावर मार्गदर्शन व दु. 4 वाजता दंडार लोककला उत्सव होईल.
रविवार, दि. 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता राष्ट्रीय लिंबुवर्गीय संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लधानिया यांचा संत्रा लागवड व आधुनिक तंत्रज्ञान, तर शिरीष टांक यांचे जीवाणूयुक्त बायोकॅप्सुलद्वारे वाढीव उत्पादनाबाबत मार्गदर्शन होईल. दु. 2 वा. महिला उद्योजकता सन्मान, हळदीकुंकू, उखाणे स्पर्धा व सायंकाळी 5 वाजता युवा नृत्य स्पर्धा होईल.
सोमवार, दि. 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता रेशम शेती : उत्कृष्ट जोडधंदा व त्यानंतर पावसाच्या पाण्याचे संवर्धन, साठवण व पुनर्भरण आणि त्यानंतर सूक्ष्म सिंचनावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होईल. यादिवशी दु. 2 वाजता अल्पसंख्याक मिलन सोहळा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. दुपारी 3 वाजता समारोपप्रसंगी  बक्षीसवितरण, गौरव समारंभ आदी कार्यक्रम होतील, असेही त्यांनी सांगितले.
  0000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...