टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 11 : जिल्ह्यातील टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा व अपेक्षित उपाययोजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिले आहेत.
पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून 1 हजार 108 उपाययोजना प्रस्तावित असून, सुमारे 24 कोटी 49 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावांत तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेस, तर लेहगाव व दाढीपेढी येथे पूरक नळ योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून 10 विंधनविहिरी व नऊ कुपनलिकांची कामे होत आहे. ही कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
टंचाई निवारणाच्या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या नियंत्रणात अधिक्षक राम लंके, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. कोपुलवार, अव्वल कारकून व्ही. आर. उगले, अभिजित पुराणिक, एच. बी. खरवडकर आदींचा कक्ष समितीत समावेश आहे.
00000
Comments
Post a Comment