Saturday, August 31, 2019

मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणेसाठी ‘स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’

  दोन आठवड्यात कामाला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश  

अमरावती, दि. 31 : दुर्गम मेळघाटात रस्ते, वीज व नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ‘मेळघाट स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’ जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. भक्कम संपर्कयंत्रणेसाठी आवश्यक परवानग्या व इतर कार्यवाही दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश आज येथे दिले.
बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे, रिलायन्सचे योगेश ठाकरे, समीर केणे यांच्यासह विविध विभागांचे व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणा उभारण्यासाठी वीज, रस्ते व नेटवर्क कनेक्टिव्हिटी या सेवांची सुरळीत उपलब्धता असणे आवश्यक आहे.  त्यामुळे स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅननुसारनुसार समन्वयाने व गतीने काम करण्यात येईल. सर्व आवश्यक सेवांच्या एकसंध परिणामातूनच दुर्गम परिसरातही भक्कम संपर्क निर्माण होईल व विकासाला चालना मिळेल. धारणी तालुक्यातील 8 व चिखलदरा तालुक्यातील 16 गावांत वीज पोहोचविण्यासाठी 36 कोटी 92 लक्ष रुपये निधीचा महावितरणचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 12 गावांबाबतचा प्रस्ताव वनविभागाच्या परवानग्यांसाठी पाठविण्यात आला. उर्वरित गावांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा.
‘बीएसएनएल’कडून काही ठिकाणी टॉवर सुरु आहेत. मात्र, नियोजनानुसार सर्व टॉवर कार्यान्वित झाले नाहीत. ते काम दोन आठवड्यात पूर्ण करावे. ‘रिलायन्स जिओ’कडून 12 टॉवर उभारण्यात आले व 36 टॉवर निर्माण होत आहेत. वनविभागाकडून आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्यात याव्यात. गावांना जोडणा-या रस्त्यांची भक्कम बांधणी व वेळोवेळी दुरुस्ती करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आदी कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  
एकताई, भांडुम, सलिता, लाखेवाडी या गावांत विद्युतीकरणाची कार्यवाही होत आहे, असे श्री. खानंदे यांनी सांगितले.

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक शेतीची गरज - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

 कृषी मंत्र्यांचा श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद
                   




अमरावती, दि. 31 :  रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत घसरून उत्पादनक्षमता कमी होत आहे. त्यामुळे जैविक शेतीचा अवलंब होण्याची गरज आहे, असे पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी हातुर्णा येथे सांगितले.
  महर्षी अरविंद फौंडेशन व इथिक सायन्स फौंडेशनतर्फे हातुर्णा येथे श्रीलंकेतील 27 शेतकरी बांधवांसाठी पारंपरिक व जैविक शेतीपद्धती कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्याला उपस्थित राहून कृषी मंत्र्यांनी श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद साधला. श्रीलंकेतील कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्रीमती सुजीवा, फौंडेशनचे अध्यक्ष गज अरविंदजी, श्रीमती वसुधाताई बोंडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक कीटकनाशके, बियाण्याचा मोठा वापर झाला. त्याची परिणती जमिनीचा पोत घसरण्यात झाली. त्यामुळे उत्पादनक्षमताही कमी झाली. ही स्थिती सुधारण्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत पीक काढल्यानंतर घरी बियाणे काढून ठेवले जायचे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातही अनेक ठिकाणी अजूनही घरी उत्पादित  बियाणे वापरले जाते. जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणे व निसर्गाला अनुकूल पीकपद्धतीसाठी जैविक शेतीचा अवलंब व्हावा.
प्रा. सुजीवा म्हणाल्या की, भारत व श्रीलंकेतील सौहार्दपूर्ण संबंध प्राचीन आहेत. दोन्ही संस्कृतींत मोठे साम्य आहे. हे संबंध दृढ करण्याठी दोन्ही देशांनी जैविक शेतीसाठी संयुक्त शेतीविषयक कार्यशाळा घ्यावी. पृथ्वीतलावरील समस्त सजीवांसाठी जैविक शेतीचा अवलंब आवश्यक आहे.
यावेळी परिसरातूनही अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

फळपीकासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले वाणच लावावे - कृषी विभागाचे आवाहन




अमरावती, दि. 31 : फळपीकाची लागवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणाचीच लागवड व्हावी. अन्य वाण लावल्यास फळधारणा न होण्याचा धोका होऊ शकतो, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चांगल्या उत्पन्नाचा स्त्रेात म्हणू राज्यात शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे मोठया प्रमाणावरवळत आहेत. तथापि, सुरुवातीच्या 3-5 वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागत असुन जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत खात्री नसते.
        राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधुन कृषि विद्यापीठांनी शिफारस  केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अवास्तव स्वरुपाचीप्रचार प्रसिद्धी करुन खरेदीची भुरळ घातली जात आहे.   कृषि विदयापीठांनी शिफारस केली नसल्यास अशावाणांच्या गुणवत्तेबाबत साशंकता असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागूशकते.
        या पार्श्वभुमीवर, सीताफळ तसेच इतर सर्व फळपिकाकरिता कृषि विदयापीठांनी शिफारस केलेल्यावाणांचाच वापर करावा. द्य:स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या ज्या फळपिक वाणाची कृषिविदयापीठांनी शिफारस केलेली नाही अशा वाणांचा शेतकरी बांधवानी वापर करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                000

प्रशिक्षणाबरोबर कर्जपुरवठा व विपणनासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

 ‘महाबँके’तर्फे कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम

               





अमरावती, दि. 31 : जिल्ह्यात स्वयंरोजगारनिर्मितीसाठी शासन व बँकांच्या समन्वयातून कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांना चालना देण्यात आली आहे. हे काम केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याद्वारे उद्योग-व्यवसायाला कर्जपुरवठा व विपणनासाठी साह्य करण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरूड येथे केले.
            बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शासनाच्या सहकार्याने रोशनखेडा येथे मोटर रिवाइंडिंग व इतर कौशल्य प्रशिक्षण घेण्यात आला. त्यानिमित्त वरुडमध्ये दीनदयाळ उपाध्याय सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीमती वसुधाताई बोंडे, मोर्शीचे नगराध्यक्ष अप्पासाहेब गेडाम, माजी नगराध्यक्ष पिंटुभाऊ सावरकर, विशाल सावरकर, अजय येते, क्षेत्रीय व्यवस्थापक नीतिन घारड आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, स्वयंरोजगार निर्मितीसाठी  केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास कार्यक्रमांना चालना दिली आहे. यात प्रशिक्षित झालेल्या नागरिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला कर्जपुरवठा करणे, त्याच्या मालाचे मार्केटिंग करण्यासाठी साह्य करणे ही कामेही झाली पाहिजेत. त्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बँकेतर्फे व्यवसायासाठी मंजूर प्रकरणांच्या धनादेशांचे वाटपही करण्यात आले.  अरुणकुमार आठवले यांनी सूत्रसंचालन केले.
                                                000

Friday, August 30, 2019

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वरुडमध्ये पोळा साजरा शेतकरी-शेतमजूर बांधवांचा कृषी मंत्र्यांचा मनमोकळा संवाद


          अमरावती, दि. 30 : कृषी संस्कृतीत महन्मंगल मानला गेलेल्या पोळ्यानिमित्त आज कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी वरुडनगरीचे ग्रामदैवत असलेल्या केदारेश्वर मंदिरात आयोजित पोळा उत्सवात उपस्थित राहून शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधला व सर्वांना पोळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.
          वरुड येथील पोळा उत्सवाला मोठी परंपरा आहे. श्रीमती डॉ. वसुधाताई बोंडे, केदारेश्वर मंदिराचे सचिव श्रीपाद चांगदे, नंदकिशोर पनपालीया, निळकंठ आंडे, भाजप शहराध्यक्ष राजू सुपळे, पत्रकार गिरीधर देशमुख, पोलीस ठाणेदार मगन मेहत्रे, युवराज आंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
          शंभरहून अधिक बैलजोड्यांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत तोरण तोडून उत्सवाचा आरंभ झाला. शेतकरी बांधवांनी विविध प्रकारची सजावट करुन बैल आणले होते. शेतकरी बांधवांत व नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. बैल सजावटीसाठी कृष्णराव वानखडे व तुषार बेलसरे यांना प्रथम पारितोषिक विभागून देण्यात आले. दुसरे पारितोषिक पंकज खेरडे व तिसरे राजूभाऊ ढोरे यांना देण्यात आले.
          यावेळी शेतकरी व शेतमजूर बांधवांशी संवाद साधत पालकमंत्री डॉ.बोंडे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सांगली, कोल्हापूर परिसरात महापुराचे नैसर्गिक संकट उद्भवले. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविरत काम करून शेतक व नागरिकांना दिलासा दिला. कृषी विकासासह पायाभूत सुविधांची अनेक कामे जिल्ह्यात होत आहेत. सध्या पावसाची स्थिती बरी असून सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला झाल्यास धरणातील पाणी साठा निश्चित वाढेल. त्यामुळे भविष्यातही वरुण राज्याची कृपा व्हावी अशी प्रार्थनाही कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.   

गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत सुधारित प्रस्ताव 10 दिवसांत सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे रेल्वेला निर्देश


अमरावती, दि. 31: गोपाळनगराजवळील भुयारी मार्गाबाबत रेल्वे अधिका-यांनी सुधारित प्रस्ताव दहा दिवसांत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.
            महापालिकेतर्फे गोपाळनगर भुयारी मार्गाबाबत बैठक आज नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, उपमहापौर संध्याताई टिकले, महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे यांच्यासह महापालिकेचे अनेक पदाधिकारी व रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात स्थानिक रहिवासी यांची घरे व दुकाने प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे नकाशात बदल होण्याची मागणी आमदार श्री. राणा यांनी केली. या ठिकाणी यु टर्न मार्गाची रचना शक्य आहे. त्यानुसार स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन भुयारी मार्गाच्या नकाशात बदल करून घ्यावा व 10 दिवसांत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.   
जुनी वस्ती उड्डाणपूलानजिकच्या रेल्वे क्रॉसिंग व भुयारी मार्गाबाबत माहिती रेल्वे अधिका-यांनी सादर केली. 
                                                000

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे




          अमरावती, दि. 30 : लोकशाहीर  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडलाचे अध्यक्ष मधुकर कांबळे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल,  सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी साहीत्य क्षेत्रात अतुलनीय काम केले आहे. त्यांचे हे काम समाजातील नागरिकांना पर्यंत पोहचण्यासाठी आणि प्रेरणा मिळण्यासाठी स्मारक होणे आवश्यक आहे. 
          जिल्ह्यातील विद्यापीठ, तपोवन व  ए म आय डी सी च्या जागेवर स्मारक होऊ शकते, त्यामुळे या तीन जागेपैकी एक जागा कृती समितीने निश्चित करून परिपूर्ण प्रस्ताव शा सना ला सादर करावा असे डॉ. बोन्डे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्र्यांकडून पुनर्वसनाचा आढावा




          अमरावती, दि 30 : प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित  पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
          विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवार, (दि. 29 ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.
 प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासाठी निकषानुसार कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी दिले. ते म्हणाले की, निमन पेढी प्रकल्पात पाच गावातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पात्र कुटुंबाना घरे देण्याची कार्यवाही झाली आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेत घराचा लाभ देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा शासनाकडे निश्चित पाठपुरावा करू. त्यासाठी प्रस्ताव सादर करू. 
          निमन पेढी प्रकल्पात पुनर्वसनासाठी निकषाप्रमाणे कार्यवाही व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. वासनी, सापन, निमन वर्धा आदी विविध प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. 

मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा तिर्थक्षेत्र विकासाची कामे तत्काळ पूर्ण करा - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे



अमरावती : मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्यात समाविष्ट असलेली विकासकामे ज्या कंत्राटरांनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा काम पूर्ण करण्यासाठी विलंब करीत आहे, अशा कत्रांटदारांवर दंड थोटवून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. तसेच अपूर्ण कामे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, (29 ऑगस्ट) मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.‍ विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगावचे समन्वयक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोझरी विकास आराखड्या अंतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 142 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी.
श्रीक्षेत्र कौडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 14 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 16 कोटी 41 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले असून याअंतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्चुन निर्वाणभूमीचा सर्वांगिण विकासाची कामे झाली आहेत. निर्वाणभूमीची उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणांना दिले.  

ग्रामविकास व व्हीएसटीएफच्या कामांबाबत आढावा बैठक गावांत शाश्वत विकास घडवून आणावा - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. ३० : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) व ग्रामविकास विभागातर्फे नियोजन भवनात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा, व्यवस्थापक युवराज सासवडे, खोजचे महादेव गील्लुरकर, राहुल दभाने आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ग्राम परिवर्तकाने गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व विविध विभागांच्या समन्वयातून विविध योजनांचा मेळ घालून विकास घडवावा, हे अभियानात अपेक्षित आहे. त्यानुसार ग्राम परिवर्तकाने काम करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे उत्तम अभियान आकारास आले आहे. ग्राम परिवर्तकांनी स्थानिक जनजीवनाशी समरस होणे आवश्यक आहे. अभियानातून होणारे बदल टिपले पाहिजेत. अनेक चांगली कामे झाली आहेत. इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी यशोगाथेचे सादरीकरण केले पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तशा योजना बनवाव्यात. गावातील उच्चविद्याविभूषित किंवा मोठ्या पदावर गेलेल्या नागरिकांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करावे.


अभियानात ३४ गावात विकासकामे होत आहेत. यात सुरू झालेल्या 550 बचत गटांपैकी अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यात मेळघाटात प्राधान्याने कामे राबवण्यात आली. कुपोषणावर मात करण्यासाठी न्यूट्रीशन इंडिया कार्यक्रम १०५ गावात राबविण्यात येत आहे.  त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षण व आरोग्य सेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी कोरकू भाषेत जागृतीपर साहित्य वितरित करण्यात येत आहे, असे श्रीमती खत्री यांनी प्रास्ताविकात सांगितले.
     
गावात अनेक विधायक बदल घडून येत असल्याचे रानामालूर गावाच्या सरपंच चंदाताई जावरकर यांनी सांगितले. टाटा ट्रस्टच्या श्रीमती झा यांनीही मनोगत व्यक्त केले. विविध गावांच्या सरपंचांनी यावेळी अभियानाबाबत अनुभवकथन केले. वैष्णवी कायाळकर, मंगेश खराटे यांच्यासह ग्राम परिवर्तकांनी गावात राबविलेल्या कामांची माहिती दिली. अभियानाच्या यशोगाथेचे प्रकाशन यावेळी झाले.

Thursday, August 29, 2019

शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणीबाबत काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 29 : यंदा कपाशीचा पेरा वाढला असून, बोंडअळी नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत तालुका कृषी कार्यालयांकडून मार्गदर्शन केले जात असून, शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच फवारणी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तसेच कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात कपाशीच्या पे-यात वाढ झाली आहे. जुलै- ऑगस्टमधील पावसाने पिकांची स्थिती चांगली आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी केल्याने या अळीचे नियंत्रण ब-यापैकी यशस्वी झाले आहे. सद्यस्थितीत कपाशी फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे बोंडअळी नियंत्रण आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनात कार्यवाही करावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी पाच फेरोमॅन ट्रॅप, नीम अर्काची फवारणी, डोमकळी नष्ट करणे आदी उपाय योजावेत.
शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदीच्या पक्क्या बिलासह करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी.  संरक्षण किटचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये. शरीराला जखम असेल किंवा आजारी असल्यास फवारणी करू नये. केवळ फवारणीचे काम करणा-या मजूर बांधवांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी. विषबाधा झाल्याचे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत. सलग दिवस फवारणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                000   

गणपती विसर्जनासाठी शहरात 50 कृत्रिम तलाव



              पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
            अमरावती, दि. 29 : छत्री तलाव, वडाळी तलाव येथे गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरात प्रमुख चौकांत गणपती विसर्जनासाठी 50 कृत्रिम तलाव तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एन. चव्हाण, एस. ए. उमाळे डॉ. अरुण लोहकपुरे, अन्न व औषधे सहायक आयुक्त स. दे. केदारे, पोलीस निरीक्षक निलिमा आरज आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवात माती, शाडूच्या मूर्तीचा वापर होण्याबाबत महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेकडून नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करावे. यासाठी महापालिकेच्या कचरा संकलन गाड्यांवरील ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणेही शक्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा र्‌हास होतो. त्यामुळे माती व शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जागृती व्हावी. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूकांच्या मार्गावरील वीजेच्या तारा लोंबकळत असतील तर तत्काळ दुरुस्ती करावी.  सर्व पथदिवे सुरु राहण्याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी. 31 ऑगस्टपूर्वी हे काम झाले पाहिजे.  नादुरुस्त रस्त्यांमुळे मिरवणुकीत अडथळा आल्यास संबंधित यंत्रणा व अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
            मद्यप्राशन करुन वाहने चालविणा-यांवर सक्त कार्यवाही करावी. त्यासाठी चौकाचौकात पथक निर्माण करावे. गणेशोत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
                                                000 

ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन शहर विकासासाठी नव्या उद्योगांना चालना - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 29 : महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, अमरावती शहराच्या विकासासाठी  नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी आज येथे सांगितले.

महापालिकेच्या तारखेडा येथील ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयारपक्षनेता सुनील काळे, गोपाळ धर्माळे, प्रमिलाताई जाधव, आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ट्रक टर्मिनेस व व्यापारी संकुल शहराच्या विकासात योगदान देणारे ठरेल. शहरात टेक्सटाईल पार्कसाठी नव्याने चारशे हेक्टर जागा मिळविण्यात येत असून, नव्या उद्योगांना चालना देण्यात येईल. शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. नागरी आरोग्य सेवेत प्रत्येक झोनमध्ये चांगली रुग्णालये हवीत. शहरात प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत चांगली राबवली जात आहे. डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे अकोली बायपासचे काम होत आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे विदर्भात मोठा निधी मिळाला आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्री. सागर म्हणाले की, ट्रक टर्मिनसचे काम अभिनव व अत्यंत सुंदर झाले आहे. विकासाच्या प्रक्रियेत, अनेक सेवांमध्ये ट्रक चालकांच मोठे योगदान असते. या घटकाची जाणीव ठेवून हे काम केले, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रकारचा ट्रक टर्मिनस इतरत्र मी पाहिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका व इतरही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना इथे पाहणी करण्यासाठी आणण्यात येईल. इतर शहरातही असे टर्मिनस उभारण्यास निश्चित मदत करू, असेही ते म्हणाले.
डॉ. देशमुख म्हणाले की, एकेकाळी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड व मोठे अतिक्रमण होते. शहरात ट्रकचे अनधिकृत पार्किंग होत होते. ट्रक चोरीचे प्रकार घडत होते. आज ट्रक टर्मिनस व व्यापारी संकुल उभे राहिल्यामुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे. विदर्भातील पहिले ट्रक टर्मिनस अमरावतीत आकारास आले आहे.
जिल्ह्यातील इतर शहरातही या प्रमाणे टर्मिनस व  अद्ययावत कचरा निर्मूलन प्रकल्प व्हावेत,अशी अपेक्षा खासदार श्रीमती राणा यांनी व्यक्त केली.
संकुलात 192 गाळे आहेत. वाहनतळासह चालकांसाठी उपाहारगृह, प्रसाधनगृह आदी सुविधा आहेत, असे आयुक्त श्री. निपाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
          000. 

वरुड नप प्रशासकीय इमारत व जलतरण तलावाचे लोकार्पण जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. २९ : उत्तम पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी व वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनाने भर दिल्याने जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन 
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले. 
नगर परिषद वरुड कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा व जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगराध्यक्ष स्वाती आंडे, वसुधाताई बोंडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

         पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, वरुड, मोर्शी व शेंदूरजना घाट या तिन्ही नगरपालिका भविष्यात आदर्श ठराव्यात, अशी आदर्श कामे आकारास येत आहेत.  आदर्श पालिकेचे निकष पूर्ण होत आहेत. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारख्या उपक्रमाचे प्रस्ताव आहेत.

शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. परिसरात कृषी विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रकल्प आकारास येत आहे. ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक रस्ते तयार होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी होऊन संत्रा, शेतीमाल वाशीसारख्या मोठया बाजारपेठेत पोहचवणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

       श्री. सागर म्हणाले की, इमारत व जलतरण तलावाचे काम तीन वर्षात पूर्ण झाले. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात अनेक कामे होत आहेत. नगरविकास विभागाने १५ कोटी रुपये वरुड शहरासाठी दिले आहेत. रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
       वरूडची हद्दवाढ झाल्याने नव्या परिसरात विकासकामांसाठी १२ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे श्रीमती आंडे यांनी सांगितले.
        इमारतीसाठी ५ कोटी व जलतरण तलावासाठी ३ कोटी रू. निधी मिळाला. दोन्ही प्रकल्प वरुड नगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत, असे श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे, विविध बचत गटांना निधी वाटप यावेळी झाले.
        ०००

महाराष्ट्रावर बोलू काही नियोजनभवनात भरली विद्यार्थ्यांची संसद !


                                                




अमरावती, दि. 28 : अनेक विषय, शेकडो मुद्दे, तरूणांची व्यक्त होण्याची चढाओढ व ऊर्जा,  त्यातून होणारे विचारमंथन याची अनुभूती मंगळवारी उपस्थितांना आली. ‘महाराष्ट्रावर बोलू काही’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी- विद्यार्थिनींची संसदच नियोजनभवनात भरली होती.   
 क्रीडा व शालेय शिक्षण विभागातर्फे युवा सांसद व महाराष्ट्रावर बोलू काही वक्तृत्व स्पर्धा नियोजनभवनात झाली. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. देवीलाल ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता, रस्तेविकास, पीक विमा अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मत व्यक्त करून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आज उपस्थितांना जिंकून घेतले. युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी युवा छात्र सांसद उपक्रम घेण्यात आला. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम महाविद्यालय स्तरावर, नंतर तालुका स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. तालुका स्तरावर निवड झालेल्या 42 विद्यार्थ्यांनी जिल्हा स्पर्धेत भाग घेतला, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
                                                गायत्री हरणे जिल्ह्यातून प्रथम
या स्पर्धेत अंजनगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई दाभाडे महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री हरणे हिने पहिला, लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू महाविद्यालयाच्या नेहा परवीन अब्दुल गफ्फार हिने दुसरा व वरुडच्या जागृती महाविद्यालयाच्या निमिषा पारेखने तिसरा क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे दहा, सात व पाच हजार रूपये बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा स्पर्धेत निवड झालेल्या या तिन्ही विद्यार्थ्यांना मुंबईत विधीमंडळात 30 व 31 रोजी होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. डॉ. पी. डब्ल्यू. पानतावणे, डॉ. सुरेश बनसोड, डॉ. एस. व्ही. पडघन यांनी परीक्षण केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. उमेश बडवे, संजय कथळकर, भास्कर घटाळे, संतोष विघ्ने, अनिल बोरवार, शुभम मोहतुरे, शेख अकिल, वैभव पातुर्डे, संजय तांबे यांनी सहकार्य केले.
                                    000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...